आमच्या साधनेची पार्श्वभूमी एका आदर्शाकडे निर्देश करते. हा आदर्श पुढील सूत्रात व्यक्त करता येईल.
ईश्वरात राहावे, अहंभावात राहू नये; लहानशा, अहंभावी जाणिवेत राहून नव्हे; तर सर्वात्मक व सर्वातीत पुरुषाच्या जाणिवेत राहून, विशाल पायावर ठामपणे सुस्थिर होऊन, जीवन जगावे.
सर्व प्रसंगी व सर्व जीवांशी पूर्ण समत्वबुद्धीने वागावे; आपले आपल्याबरोबर आणि आपले ईश्वराबरोबर जसे वर्तन असते त्याप्रमाणे, आपण इतरांकडे पाहावे व त्यांना जाणून घ्यावे. आपल्या स्वत:मध्ये इतर सर्वांना पाहावे व सर्वांना ईश्वरामध्ये पाहावे; आणि ईश्वर सर्वांमध्ये आहे, आम्हीही इतर सर्वांमध्ये आहोत ही जाणीव बाळगावी.
अहंभावात राहून नव्हे; तर ईश्वरात निमग्न राहून कर्म करावे. या ठिकाणी पहिली गोष्ट ही ध्यानात ठेवावयाची की, वैयक्तिक गरजा वा वैयक्तिक आदर्शाकडे लक्ष ठेवून कृतीची निवड करावयाची नाही; तर वरती जे जिवंत सर्वोच्च सत्य आहे त्याची आज्ञा असेल त्यानुसार कृतीची निवड करावयाची.
दुसरी गोष्ट, आपल्या आध्यात्मिक जाणिवेची बैठक पुरेशी तयार झाली म्हणजे मग, आपल्या स्वत:च्या स्वतंत्र इच्छेने वा विचाराने, कृती करावयाची नाही; तर आपल्या पलीकडे असलेल्या ईश्वरी इच्छेचे मार्गदर्शन आणि प्रेरणा यांच्या प्रभावाने जी कृती आपल्या हातून घडेल, वाढेल ती तशी अधिकाधिक प्रमाणात घडू द्यावयाची, वाढू द्यावयाची.
शेवटी या साधनेचा श्रेष्ठ परिणाम : आपण स्वतःला उन्नत करून ईश्वरी शक्तीशी एकरूप व्हावयाचे; ज्ञान, शक्ती, जाणीव, कृती आणि अस्तित्वाचा आनंद या सर्व बाबतीत आपण ईश्वरी शक्तीशी एकरूप व्हावयाचे; आपली क्रियाशीलता मृत्युवश मानवी वासनेने, प्राणिक प्रेरणेने, भ्रामक मानसिक ‘स्वतंत्र’ इच्छेने प्रेरित व शासित होत नाही, तर ती अमृत आत्मानंद आणि अनंत आत्मज्ञान यांच्या प्रेरणेने, स्वच्छ ज्ञानाच्या प्रकाशात योजली जात आहे आणि विकास पावत आहे, ही जाणीव व भावना आपल्या ठिकाणी स्थिर करावयाची. आपल्यातील प्राकृतिक मानव दिव्य आत्म्याच्या आणि शाश्वत चैतन्याच्या जाणीवपूर्वकपणे आधीन केल्याने आणि विलीन केल्यानेच ही गोष्ट घडून येते. हे चैतन्यच विश्वप्रकृतीला मार्गदर्शन करत असते; ते कायमच तिच्या अतीत असते.
– श्रीअरविंद
(CWSA 23 : 101)
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…