Tag Archive for: साधना

नैराश्यापासून सुटका – १४

 

उद्वेग, असंतोष यांसारख्या भावावेगांना सावधपणे नकार द्या. अन्यथा त्यातून पुन्हा गोंधळ आणि नैराश्य निर्माण होते. हे भावावेग येण्यापूर्वीच त्यांना परतवून लावणे व्यक्तीला प्रत्येक वेळी जमेलच असे नाही, मात्र मनात ते भावावेग निर्माण झाल्याबरोबर लगेचच व्यक्ती ते काढून टाकू शकते. ते जितके जास्त नाकारले जातील, तितके त्यांचे पुन्हा पुन्हा येणे अवघड होत जाईल. किंवा जर ते भावावेग उत्पन्न झालेच तर, ते अगदी क्षणिक काळासाठीच तुमचा ताबा घेतील आणि नंतर नाहीसे होतील. त्यांना थारा देणे म्हणजे पुन्हा एकदा त्यांना खरी चेतना झाकोळू देण्याची संधी देण्यासारखे होईल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 187)

नैराश्यापासून सुटका – १३

 

(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

तुम्ही इतके अस्वस्थ व्हावे एवढे काही ते कारण मोठे नव्हते. खरंतर, ते कारण अगदीच किरकोळ होते. अर्ध्याकच्च्या आणि अवाजवी भावविवशतेची हीच मोठी अडचण असते. अगदी क्षुल्लक कारणामुळे, तुमच्यामधील ही भावविवशता उफाळून वर आली. साधकांमध्ये आढळून येणाऱ्या चिवट अशा अडथळ्यांपैकी ‘भावविवशता’ (sensitiveness) हा एक सर्वात मोठा अडथळा आहे.

त्यावर दोन उपाय आहेत. पहिला उपाय हा की, ‘श्रीमाताजीं‌’बद्दल आंतरात्मिक विश्वा स असला पाहिजे आणि त्याच्या जोडीला समर्पण असले पाहिजे; म्हणजे, “श्रीमाताजींची जी इच्छा असेल ती माझ्यासाठी सर्वेात्तमच असेल,” असा समर्पणाचा भाव असला पाहिजे.

आणि दुसरा उपाय म्हणजे, आत्ता तुमच्या अनुभवास येत असलेली विशालता! ही विशालता (wideness) खऱ्या आत्म्याची असते, तसेच ती खऱ्या मानसिक, प्राणिक आणि शारीरिक अस्तित्वाचीसुद्धा असते. त्यांपासून (भावविवशता, अस्वस्थता) या गोष्टी एखाद्या धुळीकणाप्रमाणे खाली पडतात. कारण या गोष्टींना त्यांच्या लेखी काही महत्त्वच नसते. तुम्ही एक गोष्ट केली पाहिजे आणि ती म्हणजे, या विशालतेमध्ये, शांतीमध्ये आणि निश्चल-निरवतेमध्ये नित्य वास्तव्य केले पाहिजे आणि त्यामध्ये तुमचा अहंकार विरघळून गेला पाहिजे आणि आसक्ती नाहीशी झाली पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 211)

नैराश्यापासून सुटका – ११

 

(एका साधकाला प्राणाच्या असहकार्यामुळे साधनेमध्ये ज्या अडचणी येत आहेत, त्याबाबत श्रीअरविंद यांनी केलेले मार्गदर्शन…)

तुमच्या शारीर-व्यवस्थेमध्ये काहीशी तामसिकता किंवा सुस्ती येताना दिसते आहे. प्राण (vital) त्याच्या परिस्थितीवर किंवा त्याला जे काही प्राप्त झाले आहे त्याबाबत असमाधानी असेल तर, काहीवेळा असे घडून येते. “मी संतुष्ट नाही, त्यामुळे मी कोणत्याही गोष्टीत रस घेणार नाही आणि काहीही करण्यासाठी तुला मदत करणार नाही,” असे म्हणत, तो एक प्रकारे असहकार किंवा निष्क्रिय प्रतिकार करायला सुरूवात करतो.

*

परिवर्तनाची जी हाक तुम्हाला आली आहे, त्याबद्दल तुमच्यामधीलच एखादा प्रतिरोध करणारा भाग (पूर्ण नव्हे तर एखादा भागच) अजूनही असमाधानी आहे; त्यामुळे तुमच्यामध्ये ही चलबिचल, (अस्वस्थतेची) आंदोलने निर्माण होत आहेत. जेव्हा एखाद्या प्राणिक घटकाला परिवर्तनाची हाक दिली जाते किंवा त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी त्याला भाग पाडले जाते, मात्र तसा बदल करण्यास अद्यापि तो इच्छुक नसतो; आणि जेव्हा तो नाराज व असमाधानी असतो तेव्हा, प्रतिसाद न देण्याची किंवा सहकार्य न करण्याची प्राणाची प्रवृत्ती असते. तसेच प्राणिक जोम नसल्यामुळे शारीरिक घटक हा देखील निरस आणि संवेदनाहीन ठरतो. (परंतु) आंतरात्मिक दबावामुळे प्रतिरोधाचे हे उरलेसुरले अवशेषदेखील निघून जातील.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 139, 138)

नैराश्यापासून सुटका – १०

(साधनाभ्यासामध्ये प्राण सहकार्य करत नाहीये, हे असे का होत असावे अशी विचारणा एका साधकाने श्रीअरविंद यांच्यापाशी केली आहे. तेव्हा त्यांनी दिलेले हे उत्तर…)

तुमचा प्राण (vital) इच्छावासनांच्या कचाट्यात सापडला होता त्यामुळे आणि मानसिक इच्छाशक्तीद्वारे नियंत्रित न झाल्यामुळे, तो आता अशा रितीने स्वत:च्याच तंत्राने वागू लागला आहे. जेव्हाजेव्हा त्याच्या इच्छावासना पूर्ण केल्या जात नाहीत तेव्हातेव्हा तो असाच आक्रस्ताळेपणा करत असतो. मानसिक इच्छाशक्तीकडून जेव्हा प्राणावर नियंत्रण ठेवले जात नाही आणि त्याला त्याच्या जागी ठेवले जात नाही तेव्हा, दिसून येणारी मनुष्याच्या प्राणाची ही सार्वत्रिक प्रतिक्रिया असते.
*
पुढील दोन प्रकारच्या परिस्थितीमध्ये प्राण सहकार्य करत नाही.
१) जेव्हा त्याच्या सामान्य अहंनिष्ठ कृतींना किंवा त्या कृतीमागील हेतुंना वाव दिला जात नाही तेव्हा प्राण सहकार्य करत नाही.
२) जेव्हा व्यक्ती अगदी शारीर स्तरापर्यंत खाली उतरते आणि जोपर्यंत वरची ‘शक्ती‌’ तिथे कार्यकारी नसते तोपर्यंत, प्राण कधीकधी किंवा काही काळासाठी सुस्त होऊन जातो.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 138, 138-139)

नैराश्यापासून सुटका – ०६

आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये सामर्थ्याला (strength) निश्चितच एक मूल्य असते, पण आध्यात्मिक साक्षात्कार हा केवळ सामर्थ्यामुळेच होऊ शकतो आणि तो अन्य कोणत्याच मार्गामुळे होऊ शकत नाही, असे म्हणणे ही खूपच अतिशयोक्ती ठरेल.

‘ईश्वरी कृपा’ ही काही एखादी काल्पनिक गोष्ट नाही, तर ती अनुभवास येणारी आध्यात्मिक वस्तुस्थिती आहे. विद्वान आणि सामर्थ्यवान व्यक्ती ज्यांना अगदी नगण्य समजतात अशा अनेक जणांना ‘ईश्वरी कृपे‌’मुळे आध्यात्मिक साक्षात्कार झालेला आहे. अशिक्षित असताना आणि कोणतीही मानसिक शक्ती किंवा प्रशिक्षण नसताना, व्यक्तित्वामध्ये (तुम्ही म्हणता तसे त्यांच्यापाशी) कोणतेही ‘सामर्थ्य’ नसताना किंवा संकल्पशक्ती नसताना देखील, त्यांनी (फक्त आणि फक्त) अभीप्साच बाळगली होती आणि त्यांना एकाएकी, अगदी अल्पावधीतच आध्यात्मिक साक्षात्कार झाला होता; कारण त्यांच्यापाशी श्रद्धा होती किंवा ते प्रामाणिक होते.

ही जी तथ्यं आहेत, ती आध्यात्मिक इतिहासातील तथ्यं आहेत आणि ती तथ्यं अगदी सार्वत्रिक आध्यात्मिक अनुभवाचा भाग आहेत. असे असूनही या गोष्टी काल्पनिक आहेत असे समजून, त्यांच्या बाबतीत एवढा उहापोह का केला जातो, त्यांच्या बाबतीत इतके युक्तिवाद का केले जातात, किंवा या गोष्टी नाकारल्या का जातात हेच मला कळत नाही.

सामर्थ्य, जर आध्यात्मिक असेल तर, त्यामध्ये आध्यात्मिक साक्षात्काराची शक्ती असते; (पण) त्याहूनही अधिक शक्ती प्रामाणिकपणामध्ये असते; आणि सर्वाधिक शक्ती ‘ईश्वरी कृपे‌’मध्ये असते. कितीही वेळ लागला आणि कितीही अडचणी आल्या तरी, एखादी व्यक्ती जर प्रामाणिक असेल तर ती या सगळ्यामधून पार होतेच, हे मी असंख्य वेळा सांगितले आहे. मी अनेकवेळा ईश्वरी कृपे‌विषयीदेखील बोललो आहे. “शोक करू नकोस; मी तुला सर्व पापांमधून आणि अनिष्ट गोष्टींपासून मुक्त करेन,” (अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्ष्ययिष्यामि मा शुच:) हे ‘गीते‌’मधील वचन मी अनेकवेळा उद्धृत केले आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 172)

नैराश्यापासून सुटका – ०३

(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

एखादी अशी गोष्ट की, जी अद्यापि आविष्कृत किंवा साध्य झालेली नाही, किंवा जी अद्यापि प्रत्यक्षात उतरलेली नाही; परंतु ती सत्य आहे आणि अनुसरण्यास किंवा साध्य करून घेण्यास परमयोग्य आहे याची जाणीव आपल्या अंतरंगात वसणाऱ्या ‘ज्ञात्या‌’ला असते. अगदी कोणतेही संकेत मिळालेले नसतानासुद्धा ज्ञात्याला तशी जाणीव असते. त्या गोष्टीबाबत असणारे आत्म्याचे साक्षित्व म्हणजे श्रद्धा! मनामध्ये जरी त्या गोष्टीबाबत अगदी ठाम विश्वास नसला किंवा प्राण जरी त्याबाबतीत झगडत असला, बंड करत असला किंवा त्या गोष्टीस नकार देत असला तरीसुद्धा आपल्या अंतरंगातील ती गोष्ट तशीच टिकून राहू शकते.

योगसाधना करणाऱ्या प्रत्येकालाच कधी ना कधी निराशेच्या, अपयशाच्या, अविश्वासाच्या आणि अंधकाराच्या प्रदीर्घ कालावधीस सामोरे जावे लागलेले असते. परंतु त्याच्याठायी अशी एक गोष्ट असते की, जी त्याला आधार देते व त्यामुळे तो टिकून राहतो आणि स्वतःबाबत साशंकता असतानासुद्धा, तो मार्गक्रमण करत राहतो. कारण त्याच्या श्रद्धेला असे जाणवत असते, किंबहुना त्याला हे ज्ञात असते की, तो ज्याचे अनुसरण करत आहे ते आजही सत्यच आहे. ‘ईश्वर’ अस्तित्वात आहे आणि जिचे अनुसरण केले पाहिजे अशी ‘ईश्वर’ हीच एकमेव गोष्ट आहे, हे त्याला ज्ञात असते. त्या तुलनेत जीवनातील अन्य कोणतीच गोष्ट प्राप्त करून घेण्यायोग्य नाही, ही जिवामध्ये उपजत असणारी श्रद्धाच, योग‌मार्गामधील मूलभूत श्रद्धा असते.

तुमच्या पत्रावरून असे दिसून येते की, या चढत्यावाढत्या श्रद्धेमुळेच तुम्ही या योगा‌कडे वळला आहात आणि तुमच्यामधील ही श्रद्धा अजूनही मृत पावलेली नाही किंवा मंदावलेली नाही. (उलट) ती अधिक दृढ आणि स्थायी झालेली आहे. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीमध्ये ही श्रद्धा टिकून असते, तोपर्यंत ती व्यक्ती आध्यात्मिक जीवनासाठी पात्र असते. मी तर असेही म्हणेन की, त्या व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये कितीही अडथळे असले, तिची प्रकृती अडीअडचणी व नकारांनी अगदी कितीही ठासून भरलेली असली आणि अनेक वर्षे जरी त्या व्यक्तीला संघर्ष करावा लागलेला असला तरीसुद्धा, तिला आध्यात्मिक जीवनात यश मिळणार हे निश्चित!

– श्रीअरविंद (CWSA 29 : 93)

जीवन जगण्याचे शास्त्र – ३६

साधकासमोर ‘कर्माधिपती’ (Master of the work) स्वतःला अचानक प्रकट करत नाही. त्याची ‘शक्ती’ नेहमीच पडद्याआडून कार्य करत असते, आणि आपण जेव्हा कार्य-कर्ते असल्याचा अहंकार सोडून देतो तेव्हाच तो कर्माधिपती आविष्कृत होतो. आणि हा अहंकार-त्याग जितका अधिकाधिक परिपूर्ण होत जातो तेवढ्या प्रमाणात त्या कर्माधिपतीचे प्रत्यक्ष कार्य वाढीस लागते. जेव्हा त्याच्या ‘ईश्वरी शक्ती’प्रति असलेले आपले समर्पण हे निरपवाद, निःशेष होईल तेव्हाच त्याच्या असीम उपस्थितीमध्ये जीवन जगण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होईल.

– श्रीअरविंद (CWSA 23-24 : 243)

जीवन जगण्याचे शास्त्र – ३५

सदासर्वदा ‘ईश्वरी शक्ती’च्या संपर्कात राहा आणि तिला तिचे कार्य करू द्या, ही तुमच्यासाठी सर्वोत्तम गोष्ट आहे. आवश्यकता असेल तेव्हा ती शक्ती तुमच्यातील कनिष्ठ ऊर्जांचा ताबा घेईल आणि त्यांचे शुद्धिकरण करेल. इतर वेळी ती तुमच्यामधून त्या कनिष्ठ ऊर्जा काढून टाकेल आणि त्या जागी ती स्वतःला स्थापित करेल.

मात्र तुम्ही जर तुमच्या मनाला प्राधान्य दिलेत आणि काय केले पाहिजे किंवा काय नाही याचे (मानसिक निकषांच्या आधारे) चर्वितचर्वण करत बसलात आणि त्याआधारे निर्णय घेतलात, तर तुम्ही तुमचा ‘ईश्वरी शक्ती’शी असलेला संपर्क गमावून बसाल. आणि मग (ईश्वरी शक्तीच्या ऐवजी) त्या कनिष्ठ ऊर्जा कृतिप्रवण होतील आणि मग साऱ्याच गोष्टी गोंधळाच्या होऊन बसतील आणि त्यांना चुकीचे वळण लागेल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 189)

जीवन जगण्याचे शास्त्र – ३४

श्रीमाताजींचे नित्य स्मरण केल्यामुळे व्यक्तीची पूर्ण उन्मुखतेच्या, खुलेपणाच्या (opening) दृष्टीने तयारी होते. हृदय खुले होण्याने श्रीमाताजींच्या उपस्थितीची जाणीव व्हायला सुरुवात होते आणि ऊर्ध्वस्थित असलेल्या त्यांच्या शक्तिप्रत उन्मुख झाल्याने, उच्चतर चेतनेचे सामर्थ्य देहामध्ये खाली उतरते आणि तेथे राहून ते, (व्यक्तीची) संपूर्ण प्रकृती बदलण्याचे कार्य करते.
*
श्रीमाताजींची प्रार्थना करणे, त्यांचा धावा करणे या गोष्टी मनाच्या क्रिया आहेत; तर उन्मुखता ही चेतनेची एक अशी स्थिती आहे की, जी चेतनेची इतर सर्व गतिविधींपासून मुक्तता करून, तिला श्रीमाताजींकडे अभिमुख ठेवते. अशी चेतना ईश्वराकडून जे काही येईल केवळ त्याचीच आस बाळगून असते आणि ते ग्रहण करण्यास ती सक्षम असते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 167), (CWSA 29 : 105)

जीवन जगण्याचे शास्त्र – ३३

उन्मुख असणे, खुले असणे (To be open) याचा अर्थ असा की, श्रीमाताजींचे कार्य तुमच्यामध्ये कोणत्याही नकाराविना किंवा अडथळ्याविना चालावे अशा रितीने तुम्ही श्रीमाताजींकडे वळलेले असणे.

मन जर त्याच्या स्वतःच्या कल्पनांमध्येच बंदिस्त राहिले आणि त्याने जर स्वतःमध्ये ‘प्रकाश’ व ‘सत्य’ आणण्यासाठी, श्रीमाताजींना कार्य करू देण्यास नकार दिला तर ती व्यक्ती उन्मुख झालेली नाही, असा त्याचा अर्थ होतो.

प्राण जर त्याच्या इच्छावासनांनाच चिकटून राहिला आणि श्रीमाताजींची शक्ती, जी खरी प्रेरणा व खरे भावावेग घेऊन येत असते, त्या गोष्टींना जर त्याने स्वतःमध्ये प्रवेश करू दिला नाही तर, ती व्यक्ती उन्मुख झालेली नाही, असा याचा अर्थ होतो.

शरीर जर स्वतःच्या इच्छा, सवयी व जडत्वामध्येच बंदिस्त राहिले आणि त्यामध्ये ‘प्रकाश’ व ‘शक्ती’चा प्रवेश होऊ देण्यास आणि कार्य करू देण्यास शरीराने मुभा दिली नाही, तर ती व्यक्ती उन्मुख झालेली नाही, असा त्याचा अर्थ होतो.

एकाच वेळी सर्व गतिविधींमध्ये संपूर्णतया खुले, उन्मुख होता येणे शक्य नसते, परंतु (फक्त मनामध्येच नव्हे तर) तुमच्या प्रत्येक भागामध्ये एक मध्यवर्ती उन्मुखता (central opening) असली पाहिजे आणि केवळ श्रीमाताजींच्या कार्यालाच प्रवेश करू देईल अशी प्रभावशाली अभीप्सा व संकल्पशक्ती असली पाहिजे, उर्वरित सर्व गोष्टी (श्रीमाताजींच्या शक्तीद्वारे) चढत्यावाढत्या क्रमाने केल्या जातील.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 151)