Tag Archive for: साधना

विचार शलाका – ३६

योगाची पहिली प्रक्रिया म्हणजे आत्मसमर्पणाचा संकल्प करणे. तुमच्या समग्र हृदयानिशी आणि तुमच्या सर्व सामर्थ्यानिशी स्वतःला ‘देवा’च्या हाती सोपवा. कोणतीही अट लादू नका, कोणतीही मागणी मागू नका, अगदी योगसिद्धीचीही मागणी करू नका. कारण अन्य कोणत्याही माध्यमातून नव्हे तर, तुमच्यामध्ये जे आहे त्याद्वारे आणि तुमच्या माध्यमातूनच ‘देवा’ची इच्छा थेटपणे कार्यरत होते. जे कोणी त्याच्याकडे मागणी करतात, त्यांना ‘देव’ त्यांनी जे मागितले आहे ते देतो. परंतु कोणतीही मागणी न करता, जे कोणी स्वतःलाच देऊ करतात, त्यांना ‘देव’ सर्व काही प्रदान करतो, त्यांनी जे मागितले असते किंवा त्यांना जे आवश्यक असते तेही तो देतो आणि त्याशिवाय, ‘देव’ स्वतःलाही त्यांना देऊ करतो आणि त्याच्या प्रेमाचे सहजस्फूर्त असे वरदानही प्रदान करतो.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 74)

विचार शलाका – ३५

प्रश्न : ध्यानासाठी अत्यावश्यक अशी आंतरिक व बाह्य परिस्थिती कोणती?

श्रीअरविंद : मूलभूत अशी काही बाह्य परिस्थिती आवश्यक नसते, परंतु ध्यानाच्या वेळी एकांत व विलगपणा असेल आणि त्याचबरोबर शरीराची स्थिरता असेल, तर ध्यानासाठी या गोष्टींची मदत होते. नवोदितांसाठी या गोष्टी बऱ्याचदा अगदी आवश्यक असतात. परंतु बाह्य परिस्थितीमुळे व्यक्तीवर मर्यादा पडता कामा नयेत.

एकदा ध्यानाची सवय झाली की मग, कोणत्याही परिस्थितीत म्हणजे, पहुडलेले असताना, उठताबसता, चालताना, एकटे असताना किंवा इतर लोकांसमवेत असताना, शांततेमध्ये किंवा गोंगाटामध्ये कोणत्याही परिस्थितीत ध्यान साधता आले पाहिजे. मनाचे सैरावैरा भरकटणे, विसराळूपणा, निद्रा, शारीरिक आणि नसांची अधीरता, अशांती या साऱ्या ध्यानाच्या आड येणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी ‘संकल्पाची एकाग्रता’ ही आंतरिक परिस्थिती सर्वप्रथम महत्त्वाची आहे.

दुसरी आवश्यक परिस्थिती म्हणजे चढतेवाढते पावित्र्य आणि जेथून विचार आणि भावनांचा उदय होतो, त्या चित्ताची स्थिरता. म्हणजे राग, दुःख, निराशा, ऐहिक घटनांविषयीची चिंता या साऱ्या अडथळा निर्माण करणाऱ्या प्रतिक्रियांपासून चित्त मुक्त असले पाहिजे. मानसिक पूर्णत्व आणि नैतिकता या दोन्ही गोष्टी एकमेकींशी घनिष्ठपणे जोडलेल्या आहेत.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 295)

विचार शलाका – ३२

प्रश्न : ध्यान म्हणजे नेमके काय?

श्रीअरविंद : ‘ध्याना’ची भारतीय संकल्पना स्पष्ट करण्यासाठी इंग्रजीमध्ये meditation आणि contemplation हे दोन शब्द उपयोगात आणले जातात. एकाच विषयाचा वेध घेण्यासाठी म्हणून विचारांच्या एका सलग मालिकेवर मनाचे लक्ष केंद्रित करणे म्हणजे ‘ध्यान’. एकाग्रतेच्या आधारे, वस्तुचे, प्रतिमेचे किंवा संकल्पनेचे ज्ञान, मनामध्ये स्वाभाविकरित्या उदित व्हावे म्हणून, कोणत्यातरी एकाच वस्तुवर, प्रतिमेवर किंवा संकल्पनेवर, एकाग्रता करणे म्हणजे ‘चिंतन’. हे दोन्ही प्रकार ही ध्यानाचीच दोन रूपं आहेत. कारण विचारावर असू दे, दृश्यावर असू दे किंवा ज्ञानावर असू दे, पण मनाची एकाग्रता करणे हे ध्यानाचे तत्त्व आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 293-294)

विचार शलाका – २५

भावनिक आवेग, भावभावना आणि मानसिक उत्साह यांना मी आता पाया बनवू इच्छित नाही. विशाल आणि मजबूत अशा समतेलाच मी माझ्या योगाचे अधिष्ठान बनवू इच्छितो. समतेवर अधिष्ठित असलेल्या जिवाच्या सर्व तऱ्हेच्या कृतींमध्ये, मला पूर्ण, स्थिर आणि अविचल असे सामर्थ्य हवे आहे आणि या शक्तिसामर्थ्याच्या सागरावर मला ‘ज्ञानसूर्य’ तळपताना हवा आहे आणि त्या तेजोमय विशालतेमध्ये अनंत प्रेमाचा परमानंद आणि आनंद आणि एकत्व सुस्थापित झालेले हवे आहेत.

मला हजारो शिष्यांची आवश्यकता नाही. क्षुद्र अशा अहंकारापासून मुक्त असणारे, ‘ईश्वरा’चे साधन बनलेले असे शंभर जरी शिष्य मला लाभले, तरी ते माझ्यासाठी पुरेसे असतील. नेहमीच्या पद्धतीच्या गुरुबाजीवर माझा विश्वास नाही. मला गुरु बनायचे नाहीये. मला काय हवे आहे तर, कोणीतरी एखादा माझ्या स्पर्शाने किंवा इतर कोणाच्या तरी स्पर्शाने जागृत होईल, त्याच्या सुप्त अशा आंतरिक दिव्यत्वातून तो आविष्कृत होईल आणि दिव्य जीवन प्रत्यक्ष उतरवू पाहील. अशी माणसेच या देशाची उन्नती करतील.

– श्रीअरविंद
(Bengali Writings : 372-373)

विचार शलाका – २३

समर्पण हे संपूर्ण असले पाहिजे आणि त्याने अस्तित्वाच्या प्रत्येक घटकाचा ताबा घेतला पाहिजे. चैत्य (The psychic) प्रतिसाद देत आहे आणि उच्चतर मानसिक अंग स्वीकार करत आहे किंवा अगदी आंतरिक प्राणिक अंग शरणागत होत आहे आणि आंतरिक शारीरिक चेतनेला प्रभाव जाणवत आहे, फक्त एवढेच पुरेसे नाही. अस्तित्वाचा कोणताही घटक असा असता कामा नये, अगदी अत्यंत बाह्यवर्ती भागसुद्धा असा असता कामा नये की जो स्वतःला अलग राखत आहे, शंका, गोंधळ आणि डावपेच यांच्या मागे काहीतरी दडवून ठेवत आहे, किंवा एखादा भाग बंड करत आहे किंवा नकार देत आहे, असे असता कामा नये.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 03)

विचार शलाका – २२

….खालून ऊर्ध्व दिशेप्रत असणारी उन्मुखता आणि वरून अवतरित होणारी सर्वोच्च अतिमानसिक ‘शक्ती’ या दोन गोष्टीच भौतिक प्रकृती आणि तिच्या अडीअडचणी यांना विजयपूर्वक हाताळू शकतील आणि त्यांचा निरास करू शकतील.

समर्पण हे संपूर्ण आणि प्रामाणिक असले पाहिजे; एकमेव दिव्य ‘शक्ती’प्रतच आत्म-उन्मुखता असली पाहिजे; अवतरित होणाऱ्या ‘सत्या’ची सातत्यपूर्ण आणि संपूर्ण निवड केली पाहिजे, मानसिक, प्राणिक आणि शारीरिक ‘शक्ती’ आणि त्यांची ‘रूपे’, जी अजूनही या ‘पृथ्वी-प्रकृती’वर शासन करत आहेत त्यांच्या मिथ्यत्वाला सातत्याने आणि पूर्णतया नकार दिला पाहिजे…

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 03)

विचार शलाका – २१

मानवी स्तरावरील सामान्य प्राणिक मागण्यांच्या विरोधात, साधक जेव्हा स्वतःच्या योगमार्गावर अढळपणे उभा राहतो तेव्हा, ज्यांना त्या साधकाबाबत काही जाण नसते असे लोक नेहमीच (“हा दगडासारखा भावशून्य आहे’’ इ. प्रकारची) निंदा करत राहतात. पण त्यामुळे तुम्ही (साधकाने) अस्वस्थ होता कामा नये. मानवी प्रकृतीच्या सामान्य प्राणिक चिखलाने भरलेल्या मार्गावरील हलकी आणि निःसत्त्व माती बनून राहण्यापेक्षा, दिव्यत्वाकडे जाणाऱ्या मार्गावरील दगड होणे परवडले.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 315)

विचार शलाका – १४

सूर्याच्या ओढीने शेकडो प्रकारची वळणे घेत घेत, फक्त सूर्यप्रकाश मिळावा म्हणून झगडणाऱ्या अगणित वृक्षवेली असलेले जंगल तुम्ही कधी पाहिले नाहीयेत का? भौतिकातील अभीप्सेची भावना, ती आस, ती स्पंदनं, सूर्यप्रकाशाबद्दल असलेली ओढ ती हीच होय. माणसांपेक्षा वनस्पतींच्या शारीर-अस्तित्वामध्ये ती अभीप्सा अधिक असते. त्यांचे संपूर्ण जीवन म्हणजे प्रकाशपूजाच असते. अर्थातच येथे ‘प्रकाश’ हे ‘ईश्वरा’चे भौतिक प्रतीक आहे आणि भौतिक परिस्थितीमध्ये, सूर्याद्वारे, ‘परम-चेतना’ दर्शविली जाते. वनस्पतींना दृष्टी नसूनसुद्धा, त्यांच्या स्वत:च्या अगदी सहजस्वाभाविक पद्धतीने ती भावना अगदी स्पष्टपणाने जाणवून जाते. तुम्हाला त्यांच्या भावनांविषयी सजग कसे व्हायचे हे जर माहीत असेल तर तुम्हाला कळेल की, त्यांची अभीप्सा किती उत्कट असते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 132)

विचार शलाका – ११

‘योगा’च्या ध्येयाप्रत पोहोचणे नेहमीच कठीण असते, पण ‘पूर्णयोग’ इतर कोणत्याही योगांपेक्षा अधिक खडतर आहे, आणि ज्यांना ‘ती’ हाक आलेली आहे, ज्यांच्याजवळ क्षमता आहे, प्रत्येक गोष्टीला व प्रत्येक जोखमीला तोंड देण्याची ज्यांची तयारी आहे, अगदी अपयशाचा धोका पत्करण्याचीही ज्यांची तयारी आहे; आणि पूर्णपणे नि:स्वार्थीपणा, इच्छाविरहितता व समर्पण यांजकडे प्रगत होण्याचा ज्यांचा संकल्प आहे केवळ अशांसाठीच ‘पूर्णयोग’ आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 27)

विचार शलाका – ०४

प्रश्न : चैत्य अग्नी (psychic fire) प्रज्वलित कसा करावा?

श्रीमाताजी : अभीप्सेच्या द्वारे.

प्रगतीसाठीच्या संकल्पाद्वारे आणि आत्मशुद्धीकरणाने हा चैत्य अग्नी चेतवला जातो.

जेव्हा प्रगतीची इच्छा तीव्र असते, व ती इच्छा आध्यात्मिक प्रगती आणि शुद्धीकरण या दिशेने वळविली जाते तेव्हा आपोआप त्या व्यक्तीमधील हा अग्नी प्रदिप्त होतो.

एखाद्याला जर स्वत:मधील एखादा दोष, एखादी त्रुटी दूर करावयाची असेल, त्याच्या प्रकृतीमधील काहीतरी त्याला प्रगत होण्यापासून रोखत असेल, त्याची जर त्याने या चैत्य अग्नी मध्ये आहुती दिला तर तो अग्नी अधिक तीव्रतेने प्रज्वलित होतो. आणि ही केवळ प्रतिमा नाही, ती सूक्ष्म भौतिक पातळीवरील वस्तुस्थिती आहे. कोणी त्या ज्योतीची ऊब अनुभवू शकतो, तर कोणी एखादा सूक्ष्म भौतिक स्तरावर त्या ज्योतीचा प्रकाशदेखील पाहू शकतो.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 251)