Tag Archive for: साधना

कृतज्ञता – २९

सर्व अहंकार आणि सर्व अंधकार नाहीसा करण्यासाठी, कृतज्ञतेची शुद्ध, उबदार, मधुर आणि तेजस्वी ज्योत आपल्या हृदयामध्ये कायमच प्रज्वलित असली पाहिजे. साधकाला त्याच्या उद्दिष्टाप्रत घेऊन जाणाऱ्या ‘परमेश्वरी कृपे’ बद्दलच्या कृतज्ञतेची ही ज्योत कायमच प्रज्वलित असली पाहिजे. व्यक्ती जितकी अधिक कृतज्ञ राहील, तिला ईश्वरी कृपेच्या कृतीची जेवढी अधिक जाणीव असेल आणि त्याबद्दल ती जेवढी अधिक कृतज्ञ राहील, तेवढा मार्ग जवळचा होईल.
*
अहंकार हा आपल्याला काय हवे आहे आणि आपल्यापाशी काय नाही, याचा विचार सातत्याने करत असतो. अहंकार सतत याच विचारांनी व्याप्त असतो.

आपल्याला काय प्रदान करण्यात आलेले आहे, याची आत्म्याला जाणीव असते आणि तो अनंत अशा कृतज्ञतेमध्ये निवास करत असतो.

– श्रीमाताजी
(Bulletin 1964 – 08 : 100), (CWM 14 : 257)

कृतज्ञता – ३०

अंधकाराचा काळ वारंवार येत असतो आणि ही गोष्ट सार्वत्रिक असते. अशा वेळी सहसा, कधी आध्यात्मिक रात्री तर कधी पूर्ण प्रकाशाचे दिवस, असे आलटूनपालटून येत असतात, हे जाणून, कोणतीही काळजी न करता केवळ शांत राहणे पुरेसे असते. परंतु तुम्हाला शांतीमध्ये स्थिर राहता यावे यासाठी म्हणून तुम्ही, तुमच्या हृदयामध्ये ‘ईश्वरा’विषयी कृतज्ञता बाळगली पाहिजे. ‘ईश्वर’ तुम्हाला जे साहाय्य करतो त्याबद्दलची ही कृतज्ञता असली पाहिजे. परंतु जर ही कृतज्ञताही झाकोळली गेली तर मात्र अंधकाराचा कालावधी दीर्घकाळ राहण्याची शक्यता असते. असे असले तरी एक वेगवान आणि परिणामकारक उपायदेखील असतो, तो असा की : शुद्धीकरणाची ज्योत तुमच्या हृदयामध्ये कायम प्रज्वलित ठेवली पाहिजे. प्रगतीची आस, उत्कटता, आत्मनिवेदनाची इच्छा ही कायम ज्वलंत असली पाहिजे. जे कोणी प्रामाणिक असतात त्यांच्या हृदयामध्ये ही ज्योत प्रज्वलित होते; मात्र तुम्ही तुमच्या कृतघ्नपणाच्या राखेने ती ज्योत विझू देता कामा नये.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 246-247)

कृतज्ञता – २८

कृतज्ञता व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपण आपल्यामधील अहंकारावर मात केली पाहिजे आणि या रूपांतरणाच्या दिशेने सातत्यपूर्ण प्रयत्न केले पाहिजेत. ‘इतरजण तरी कुठे रूपांतरित झाले आहेत,’ या सबबीखाली मानवी अहंभाव स्वतःचा परित्याग करण्यास नकार देतो. परंतु ही एक प्रकारे त्याच्यावर असणारी दुरिच्छेची पकड असते, कारण इतर काय करतात किंवा काय करत नाहीत याकडे लक्ष न देता, स्वतःमध्ये रूपांतर घडविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असते.

हे रूपांतर, अहंकाराचा निरास करणे हा स्थायी शांती आणि आनंद मिळविण्याचा एकमेव मार्ग आहे, हे जर लोकांना समजले तर मग आवश्यक प्रयत्न करण्यास ते संमती देतील. हा ठाम विश्वासच त्यांच्यामध्ये जागृत करण्याची आवश्यकता आहे.

प्रत्येकाला हे वारंवार सांगितले पाहिजे की, तुमच्या अहंकाराचा निरास करा म्हणजे शांती तुमच्यावर सत्ता प्रस्थापित करेल.

‘ईश्वरी’ साहाय्य प्रामाणिक अभीप्सेला नेहमीच प्रतिसाद देते.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 428)

कृतज्ञता – २७

अहंकारी मनाचा दृष्टिकोन असा असतो की, माझ्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी साऱ्या जगाचे नुकसान झाले तरी हरकत नाही. असे अहंकारी मन त्याची तत्त्वे साऱ्यांवर लादू पाहत असते.

दिव्य दृष्टीला मात्र, तत्त्व किंवा इच्छावासना, एकसारख्याच भासतात. कारण तिच्या दृष्टीने, इच्छावासना म्हणजे प्राणाचा लहरीपणा असतो तर तत्त्व हा मनाचा लहरीपणा असतो.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 342)

कृतज्ञता – २६

(एक साधक श्रीमाताजीच्या ‘चार तपस्या आणि चार मुक्ती’ लेखामधील पुढील वचन वाचतो…)

“…अशा व्यक्ती पूर्णतः ईश्वराच्या झालेल्या असतात; त्यांच्या जीवनातील साऱ्या घटना या ईश्वरी इच्छेची अभिव्यक्ती असतात आणि त्या साऱ्या घटना अशा व्यक्ती केवळ शांत शरणागतीने स्वीकारतात असे नाही तर, त्या घटनांचा स्वीकार त्या व्यक्ती कृतज्ञतेने करतात; कारण त्यांच्या बाबतीत जे काही घडते ते त्यांच्या भल्यासाठीच घडते याची अशा व्यक्तींना पूर्ण खात्री असते.”

प्रश्न : वरील उताऱ्यामध्ये उद्धृत केल्याप्रमाणे, शांत शरणागती आणि कृतज्ञ शरणागती यामध्ये फरक काय असतो?

श्रीमाताजी : शांत शरणागती आणि कृतज्ञ शरणागती यामधील फरक तुम्हाला जाणून घ्यायचा आहे का? ठीक आहे… तुम्हाला जेव्हा एखादा आदेश मिळतो तेव्हा तुम्ही त्या आदेशाचे बरेचदा नाखुषीने पालन करता कारण, तुम्ही शरणागती पत्करण्याचा निर्धार केलेला असतो आणि त्यामुळे तुम्ही कोणत्याही खुषीविना किंवा आनंदाविना, अगदी शुष्कपणे आणि वरवर त्या आदेशाचे पालन करता आणि तुम्ही स्वतःला सांगता, ”मला अमुक अमुक करायला सांगण्यात आले आहे आणि त्यामुळे आता मी त्याप्रमाणे करत आहे.” याचा अर्थ असा की, तुम्ही काही समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही आणि तुम्हाला जे काही करायला सांगण्यात आलेले असते, त्याचे स्वखुषीने पालन करण्याचा तुम्ही प्रयत्न करत नाही. ही झाली नाखुषीने पत्करलेली शरणागती. तुम्ही तुमच्या नियतीचा स्वीकार करता आणि तुम्ही तक्रार करत नाही ती त्यामुळेच! कारण तुम्ही तक्रार करायची नाही असा निश्चय केलेला असतो, या निश्चयामुळेच तुम्ही तक्रार करत नाही, अन्यथा तुम्ही तक्रार केलीच असती.

दुसरा प्रकार म्हणजे अमुक एक आदेश का देण्यात आला आहे ते समजून घेणे, त्याच्या आंतरिक मूल्याचे आकलन करणे, आणि जे करण्यास सांगण्यात आलेले आहे, ते व्यक्तीने स्वतःच्या सामर्थ्यानिशी, ज्ञानानिशी, आनंदाने अभिव्यक्त करण्याची इच्छा बाळगणे; आणि त्याचा परिणाम म्हणून ईश्वर तुमच्या अधिक सन्निध येण्यासाठी आणि तुमचे पूर्ण समाधान करण्यासाठी बांधील असतो. अशा रीतीने तुम्ही आनंदी होता, समाधानी होता आणि मग तुम्ही त्याला सहकार्य करता. त्यामुळे बराच फरक पडतो.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 63-64)

कृतज्ञता – २४

प्रार्थना ही बरीचशी बाह्य गोष्ट आहे, ती बहुधा कोणत्यातरी एका विशिष्ट बाबीसंबंधी असते आणि ती नेहमीच सूत्रबद्ध असते कारण सूत्रातून प्रार्थना तयार होते. एखादी व्यक्ती जर अभीप्सा बाळगत असेल; आणि जरी ती त्या व्यक्तीला प्रार्थनेसमान भासत असेल तरीही प्रार्थनेपेक्षा ‘अभीप्सा’ सर्वच बाबतीत कितीतरी सरस ठरते. अभीप्सा ही प्रार्थनेपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात ‘ईश्वरा’च्या जवळ असते कारण अभीप्सा बाळगणारी व्यक्ती तिला, जे काही ईश्वरार्पण करायचे असते ते, व्यक्ती ‘स्व’ला विसरून करत असते.

तसेच ती व्यक्ती जे काही बनू इच्छिते किंवा जे काही करू इच्छिते त्यामध्ये निमग्न होऊन ती गोष्ट ती व्यक्ती करत असते. तुम्ही काहीतरी मागण्यासाठी प्रार्थना करू शकता, तसेच ‘ईश्वरा’ने तुम्हाला जे काही देऊ केले आहे त्याबद्दल त्याचे आभार मानण्यासाठीसुद्धा तुम्ही प्रार्थना करू शकता, आणि अशी प्रार्थना ही अधिक चांगली! अशी प्रार्थना म्हणजे कृतज्ञतापूर्वक केलेली कृती असते, असे तिच्याबाबत म्हणता येईल. ‘ईश्वरा’ने तुमच्याबाबतीत जो कनवाळूपणा दाखविला, त्याने तुमच्यासाठी जे काही केले, त्याबद्दलची कृतज्ञता म्हणून, तसेच तुम्हाला त्या ‘ईश्वरा’मध्ये जे काही आढळून आले त्याची स्तुती करायची तुमची इच्छा आहे म्हणून तुम्ही प्रार्थना करू शकता. या सर्व गोष्टींना प्रार्थनेचे रूप येऊ शकते. ही निश्चितपणे सर्वोच्च प्रार्थना असते कारण ती केवळ स्वत:मध्येच मग्न नसते, ती अहंमन्य अशी प्रार्थना नसते.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 141)

कृतज्ञता – २३

कधीकधी व्यक्ती अगदी उदारतेने केलेली एखादी कृती पाहते, जगावेगळे असे काहीतरी तिच्या कानावर पडते; उदारता, आत्म्याची थोरवी किंवा एखाद्या धाडसी वीराने केलेली कृती व्यक्ती पाहते, कधीकधी काही विशेष प्रतिभासंपन्न अशा गोष्टी ती पाहते किंवा एखादी गोष्ट अत्यंत असाधारण पद्धतीने, सुंदरतेने केली असल्याचे व्यक्ती पाहते, ते करणाऱ्या व्यक्तीशी तिची गाठभेठ होते; अशा प्रत्येक वेळी व्यक्तीच्या मनामध्ये अचानकपणे एक प्रकारचा उत्साह, एक प्रकारचे कौतुक, एक प्रकारची कृतज्ञता दाटून येते आणि त्यातूनच अभूतपूर्व अशा आनंदाची, एका उबदार, प्रकाशमय, चेतनेच्या एका नव्या स्थितीकडे घेऊन जाणारी द्वारे खुली होतात. हा देखील मार्गदर्शक सूत्र पकडण्याचा एक मार्ग आहे.

*

‘ईश्वरा’प्रत कृतज्ञता व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आनंदी राहणे.

‘ईश्वरा’ प्रत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, शांतीपूर्वक आनंदी राहण्यासारखा अन्य कोणताही चांगला मार्ग नाही.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 405), (CWM 14 : 154-155)

कृतज्ञता – २२

व्यक्तीच्या आत्मदानामध्ये एक महान शुद्धी आणि एक उत्कटता असली पाहिजे, ‘तसेच आपल्यासाठी काय हिताचे आहे, काय नाही, हे आपल्यापेक्षा ‘ईश्वरा’ला अधिक चांगले कळते,’ असा ईश्वरी ‘कृपे’च्या परमप्रज्ञेविषयी एक प्रगाढ विश्वास व्यक्तीला असला पाहिजे. आणि मग असे सारे असताना, व्यक्तीने स्वतःची अभीप्सा अर्पण करताना, स्वतः ला पुरेशा उत्कटतेने ईश्वराप्रत झोकून दिले तर त्याचे परिणाम अद्भुत असतात. परंतु त्याकडे कसे पाहायचे हे व्यक्तीला उमगलेच पाहिजे. कारण जेव्हा ते परिणाम घडून येतात म्हणजे जेव्हा त्या गोष्टी प्रत्यक्षात उतरतात तेव्हा बहुतेक लोकांना त्या अगदी स्वाभाविक वाटतात, त्या गोष्टी का आणि कशामुळे घडल्या याकडे त्यांचे लक्षच नसते आणि ते स्वतःशीच म्हणतात, “हो, हे असेच घडायला हवे होते.” आणि मग ते कृतज्ञतेचा आनंद गमावून बसतात. त्यांचे हृदय जर ईश्वरी ‘कृपे’ विषयी धन्यवाद देण्याच्या आणि कृतज्ञतेच्या भावनेने कृतकृत्य होऊ शकले तर, त्यामुळे जणू (कुशल चित्रकाराने) अखेरचा कुंचला फिरवावा तसे काहीसे होते आणि मग प्रत्येक पावलागणिक व्यक्तीला जाणवायला लागते की, ‘गोष्टी जशा असायला हव्यात, जशा घडू शकतात, अगदी तशाच, सर्वोत्तम रीतीने त्या घडत आहेत.’

– श्रीमाताजी
(CWM 07 : 239)

कृतज्ञता – २१

तुमच्यामध्ये भक्तिभाव असतो आणि तरीही तुम्ही तुमचा अहंकारही सांभाळत राहता. आणि नंतर मग हा अहंकारच तुम्हाला भक्तीच्या माध्यमातूनसुद्धा अनेक प्रकारच्या गोष्टी करायला भाग पाडतो, अगदी अत्यंत अहंकारी गोष्टी करायलासुद्धा भाग पाडतो. म्हणजे असे की, तुम्ही फक्त तुमचाच विचार करत राहता, इतरांचा नाही, जगाचा नाही, कार्याचाही नाही किंवा जे करायला हवे त्याचाही नाही तर, तुम्ही फक्त स्वत:च्याच भक्तीचा विचार करत राहता आणि त्यामुळेच तुम्ही प्रचंड अहंकारी बनता. आणि म्हणून, जेव्हा तुम्हाला असे आढळते की, ईश्वर कोणत्याही कारणाने म्हणा पण, तुम्हाला अपेक्षित आहे तेवढ्या उत्साहाने तुमच्या भक्तीला प्रतिसाद देत नाही तेव्हा, तुम्ही निराश होता आणि निराशेतच अडकून राहाता.

म्हणजे, एकतर ईश्वर निष्ठुर आहे असे तुम्हाला वाटू लागते. आपण अशा गोष्टी वाचल्या आहेत. उत्साही भक्तांच्या तर अशा कितीतरी गोष्टी असतात. असे उत्साही भक्त मग ‘ईश्वरा’वर टिका करू लागतात. कारण (त्यांच्यादृष्टीने) ‘ईश्वर’ आता त्यांच्याबाबतीत पूर्वीप्रमाणे जवळचा, प्रेमळ उरलेला नसतो, तो दूर निघून गेलेला असतो. मग असा भक्त (मनाशीच) म्हणू लागतो, “तू मला उद्ध्वस्त करून का गेलास? तू मला असे टाकून का गेलास? तू खूप निष्ठुर आहेस.” त्यांच्यामध्ये प्रत्यक्ष असे म्हणण्याचे धाडस नसते पण ते असा विचार करत असतात; अन्यथा मग ते म्हणतात, ‘मी नक्कीच काहीतरी घोर पातक केले असले पाहिजे आणि म्हणूनच ईश्वराने मला दूर लोटले आहे.” आणि ते निराशेच्या गर्तेमध्ये जाऊन पडतात.

म्हणून श्रद्धेबरोबर एक स्पंदनही असायला हवे…. एक अशी कृतज्ञतेची भावना हवी की, ‘ईश्वर’ अस्तित्वात आहे. ही कृतज्ञतेची अद्भुत भावना, तुम्हाला उत्कट आनंदाने भारून टाकते. तुम्हाला जाणवू लागते की, आपल्याला दिसतो तसा, या विश्वामध्ये दिसणारा भयानकपणाच फक्त अस्तित्वात आहे असे नाही तर, या विश्वामध्ये ‘ईश्वर’ म्हणूनही काहीतरी अस्तित्वात आहे, होय, येथे ‘ईश्वर’ आहे, ईश्वरी अस्तित्व आहे!

जेव्हा कधी, एखादी अगदी छोटीशी गोष्ट, प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे त्या ईश्वरीय अस्तित्वाच्या उदात्त ‘वास्तवा’शी तुमचा संपर्क घडविते तेव्हा, त्या प्रत्येक वेळी, तुमचे हृदय अगदी उत्कट, अगदी अद्भुत आनंदाने, कृतज्ञतेने भरून जाते. बाकी सर्व गोष्टींच्या तुलनेत अशी कृतज्ञता म्हणजे सर्वाधिक आनंददायी गोष्ट असते.

दुसरी कोणतीच गोष्ट तुम्हाला कृतज्ञतेइतका आनंद देऊ शकत नाही. व्यक्ती एखाद्या पक्षाचे गाणे ऐकते, एखादे सुंदरसे फूल पाहते, एखाद्या लहानग्या बालकाकडे पाहते, उदारतेची एखादी कृती पाहते, एखादे चांगलेसे वाक्य वाचते, मावळत्या सूर्याकडे पाहते, असे काहीही असू शकते की, जे अवचितपणे तुमच्या समोर येते आणि मग, हे विश्व ‘ईश्वरा’ची अभिव्यक्ती करत आहे, या विश्वापाठीमागे असे काहीतरी आहे की, जे ‘ईश्वरी’ आहे यासारखी उत्कट, गाढ, तीव्र अशी भावना मनात दाटून येते.

म्हणून कृतज्ञतेविना भक्ती ही अपूर्ण आहे; भक्तीसोबत कृतज्ञतादेखील असायलाच हवी.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 39-40)

कृतज्ञता – १७

(श्रीमाताजी येथे ‘धम्मपदा’तील एका वचनाविषयी विवेचन करत आहेत.)

मानवी प्रगतीसाठी उपयुक्त असणाऱ्या सर्वच धर्मग्रंथांमध्ये नेहमीच असे सांगितलेले आढळते की, जो तुम्हाला तुमचे दोष दाखवून देतो त्या व्यक्तीविषयी तुम्ही कृतज्ञ असले पाहिजे आणि त्याच्या सहवासाची तुम्ही इच्छा बाळगली पाहिजे. पण येथे धम्मपदामध्ये तीच गोष्ट मोठ्या समर्पकपणे सांगितलेली आहे : एखादा दोष तुम्हाला दाखविण्यात आला तर जणू काही तुम्हाला खजिनाच दाखविण्यात आला आहे, असे समजा. म्हणजेच याचा अर्थ असा की, जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्यामध्ये एखादा दोष, अक्षमता, आकलनक्षमतेचा अभाव, दुर्बलता, अप्रामाणिकपणा, तुम्हाला प्रगतीपासून रोखणारे असे जे जे काही तुमच्यामध्ये सापडेल तेव्हा ते म्हणजे जणू काही अद्भुत खजिनाच लाभल्यासारखे तुम्हाला वाटेल.

“अरे देवा, अजून एक दोष!” असे म्हणत न बसता व त्याविषयी खंत बाळगत न बसता, उलट तुम्हाला जणूकाही एखादी अद्भुत उपलब्धी झाली असल्याप्रमाणे आनंद झाला पाहिजे. कारण आजवर जी गोष्ट तुम्हाला प्रगत होण्यापासून रोखत होती, ती गोष्ट आता तुमच्या पकडीत आलेली असते. आणि एकदा का ती गोष्ट तुमच्या पकडीत आली की, तिला खेचून बाहेर काढा. कारण असे मानले जाते की जो योगसाधना करतो, त्याला ज्या क्षणी अमुक एक गोष्ट करण्यास योग्य नाही असे समजते, त्याच क्षणी ती दूर सारणे, बाद करणे आणि नष्ट करणे ही शक्ती त्याच्या ठायी असते.

दोषाचा शोध लागणे ही एक प्राप्ती असते, उपलब्धी असते. जणू काही नुकत्याच बाहेर घालवून दिलेल्या धूसरतेच्या छोट्या कणाची जागा घेण्यासाठी प्रकाशाचा पूर आत शिरला आहे.

तुम्ही जर योगसाधना करत असाल, तर तुम्ही दुर्बलता, नीचता, इच्छाशक्तीचा अभाव, ज्ञानापाठोपाठ सामर्थ्य न येणे ह्या बाबींचा स्वीकार करता कामा नये. एखादी गोष्ट आपल्यात असता कामा नये याची जाणीव होणे आणि तरीही ती तशीच चालू ठेवणे हे दुर्बलतेचे लक्षण असते; ही दुर्बलता कोणत्याही गंभीर अशा योगसाधनेत स्वीकारली जात नाही; अशा संकल्पशक्तीचा अभाव हा व्यक्तीला अप्रामाणिकतेच्या उंबरठ्यावर आणून सोडतो.

अमुक एक गोष्ट असता कामा नये, हे तुम्हाला ज्या क्षणी कळते, तेव्हा ती गोष्ट आपल्यात राहता कामा नये, हे ठरविणारे तुम्हीच असता. कारण ज्ञान आणि सामर्थ्य ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे असे म्हणता येईल की, तुमच्या अस्तित्वाच्या कोणत्याही भागात तुम्ही तुमच्या प्रगतीच्या मध्यवर्ती संकल्पशक्तीला विरोधी असणाऱ्या, वाईट इच्छेच्या छायेला थारा देता कामा नये; कारण तसे केल्याने ज्या अनिष्टाचा तुम्ही नायनाट केला पाहिजे त्याच अनिष्टासमोर तुमच्या प्रगतीची संकल्पशक्ती पौरुषहीन, दुबळी, धैर्यहीन, सामर्थ्यहीन ठरते…

अज्ञानातून घडलेले पाप हे पाप नसते; तो या जगतातील सर्वसाधारण अशा अनिष्टाचा एक भाग असतो; पण तुम्हाला माहीत असूनदेखील तुम्ही जेव्हा पाप करता तेव्हा ते अधिक गंभीर असते. याचा अर्थ असा की, फळामध्ये ज्याप्रमाणे एखादा कृमी दडून बसलेला असतो तसा दुरिच्छेचा एखादा घटक तुमच्यामध्ये दडून बसलेला असतो, त्याला शोधून कोणत्याही परिस्थितीत नष्ट केले पाहिजे, कारण बरेचदा अशा वेळी दाखविलेली दुर्बलता ही पुढे जाऊन कधीच दुरुस्त न होऊ शकणाऱ्या अडचणींचे कारण बनते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 220-221)