Tag Archive for: साधना

कर्म आराधना – २८

कर्मामध्ये प्राणाचे समर्पण झाल्याची काही लक्षणं पुढीलप्रमाणे आहेत –

सर्व जीवन आणि कार्य हे ‘श्रीमाताजीं’चे आहे याची केवळ कल्पना किंवा अभीप्सा नव्हे तर, जाणीव असणे आणि या आत्मनिवेदनामध्ये, समर्पणामध्ये व्यक्तीला प्राणिक प्रकृतीच्या उत्कट आनंदाचा अनुभव येणे. परिणामतः स्थिरचित्त समाधान आढळून येणे आणि कर्माप्रत आणि त्याच्या वैयक्तिक फळाबाबत असलेल्या अहंकारी आसक्तीचा अभाव असणे आणि त्याच वेळी कर्मामध्ये आनंद जाणवणे आणि आपल्या क्षमतांचा ईश्वरी कार्यासाठी उपयोग होतो आहे याचा अतीव आनंद होणे. आपल्या कृतींच्या पाठीशी ती ‘ईश्वरी शक्ती’ कार्यरत आहे आणि प्रत्येक क्षणाला ती मार्गदर्शन करत आहे याची जाणीव होणे.

कोणत्याही परिस्थितीमुळे किंवा घटनेमुळे जिचा भंग होऊ शकणार नाही अशी सातत्यपूर्ण श्रद्धा असणे. अडचणी आल्याच तर, अशा व्यक्ती मनात कोणत्याही शंका उपस्थित करत नाहीत किंवा निष्क्रिय मूकसंमती देत नाहीत, तर त्यांच्या मनात एक ठाम विश्वास असतो की, आपण प्रामाणिक आत्मनिवेदन केले तर, ‘ईश्वरी शक्ती’ अडचणी दूर करेल. या विश्वासानिशी अशा व्यक्ती त्या दिव्य शक्तीकडे अधिक प्रमाणात वळतात आणि त्यासाठी त्या शक्तीवर विसंबून राहतात. जेथे संपूर्ण श्रद्धा आणि आत्मनिवेदन असते, तेथे ‘दिव्य शक्ती’बाबत ग्रहणशीलतादेखील येते, या ग्रहणशीलतेतून व्यक्ती योग्य गोष्ट करू लागते आणि योग्य साधनं निवडते, नंतर परिस्थिती स्वतःशी जुळवून घेते आणि परिणाम दिसू लागतो.

या अवस्थेप्रत येण्यासाठी आवश्यक असलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे – सातत्यपूर्ण अभीप्सा, दिव्य शक्तीला आवाहन आणि तिच्याप्रत आत्मार्पण, आणि मार्गात अडथळा बनून उभ्या राहणाऱ्या स्वतःमधील आणि सभोवतालच्या सर्व गोष्टींना नकार देण्याचा संकल्प. सुरुवातीला नेहमीच अडचणी असतात आणि परिवर्तनासाठी जोवर त्यांची आवश्यकता असते तोवर त्या अडचणी राहणारच. पण त्या अडचणींना व्यक्ती एका स्थिर श्रद्धेने, संकल्पाने आणि चिकाटीने सामोरी गेली तर त्या नाहीशा होणे अपरिहार्यच असते.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 233-234]

कर्म आराधना – २७

सहसा माणसं प्राणिक अस्तित्वाच्या सामान्य प्रेरणांनी उद्युक्त होऊन अथवा गरजेपोटी, संपत्ती किंवा यश किंवा पद किंवा सत्ता किंवा प्रसिद्धी यांबद्दलच्या इच्छेने प्रेरित होऊन किंवा कार्यरत राहण्याच्या ओढीने, आणि त्यांच्याकडे असलेल्या क्षमतांचे आविष्करण करण्याच्या सुखासाठी काम करतात, जीवनव्यवहार करतात. आणि ते त्यांच्या त्यांच्या कुवतीनुसार, त्यांच्या कार्यशक्तीनुसार आणि त्यांची प्रकृती व त्यांचे कर्म यांच्या फलस्वरूप असलेल्या सुदैवानुसार किंवा दुर्दैवानुसार त्यामध्ये यशस्वी होतात किंवा अपयशी ठरतात.

(परंतु) एखादी व्यक्ती जेव्हा ‘योगमार्ग’ स्वीकारते आणि स्वतःचे जीवन ‘ईश्वरा’र्पण करू इच्छिते तेव्हा प्राणिक अस्तित्वाच्या या सामान्य प्रेरणांना पुरेसा आणि मुक्त वाव मिळेनासा होतो; अशा वेळी त्यांची जागा दुसऱ्या प्रेरणांनी घेतली गेली पाहिजे, प्रामुख्याने आंतरात्मिक आणि आध्यात्मिक प्रेरणांनी त्यांची जागा घेतली पाहिजे. त्यामुळे साधकाला पूर्वीच्याच ऊर्जेनिशी कर्म करणे शक्य होऊ शकते, (पण) आता ते कर्म त्याने स्वतःसाठी केलेले नसते, तर ते ‘ईश्वरा’साठी केलेले असते.

सामान्य प्राणिक प्रेरणा किंवा प्राणिक शक्ती ही जर मुक्तपणाने कार्यरत होऊ शकली नाही आणि तरीही इतर कोणत्या गोष्टीने तिची जागा घेतली नाही तर, कदाचित त्यानंतर, कर्मामध्ये ओतण्यात आलेली प्रेरणा वा शक्ती कमी होण्याची शक्यता असते किंवा यशप्राप्तीसाठी लागणारी शक्तीही तेथे शिल्लक न राहण्याची शक्यता असते. प्रामाणिक साधकासाठी ही अडचण तात्कालिकच असण्याची शक्यता असते; परंतु त्याने त्याच्या आत्मनिवेदनातील (consecration) किंवा त्याच्या दृष्टिकोनातील दोष शोधून तो काढून टाकला पाहिजे. तेव्हा मग दिव्य ‘शक्ती’ स्वतःहून अशा साधकाच्या माध्यमातून कार्य करू लागेल आणि तिच्या साध्यासाठी त्या व्यक्तीची क्षमता व प्राणिक शक्ती उपयोगात आणेल.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 233]

कर्म आराधना – २६

जे कर्म कोणत्याही वैयक्तिक हेतुंशिवाय, प्रसिद्धी किंवा लोकमान्यता किंवा लौकिक मोठेपणा अशा इच्छांविना केले जाते; ज्यामध्ये स्वतःच्या मानसिक हेतू किंवा प्राणिक लालसा व मागण्या किंवा शारीरिक पसंती-नापसंती यांचा आग्रह नसतो; जे कर्म कोणत्याही बढाईविना किंवा असंस्कृत स्व-मताग्रहाविना किंवा एखादे पद वा प्रतिष्ठेसाठी कोणताही दावा न करता केले जाते; जे केवळ आणि केवळ ‘ईश्वरा’साठीच आणि ‘ईश्वरी आदेशा’ने केले जाते, केवळ असेच कर्म आध्यात्मिकदृष्ट्या शुद्धीकरण करणारे असते. सर्व कर्मं जी जी अहंभावात्मक वृत्तीने केली जातात ती, या ‘अज्ञान’मय जगातील लोकांच्या दृष्टीने भलेही चांगली असू देत, पण ‘योगसाधना’ करणाऱ्या साधकाच्या दृष्टीने त्यांचा काहीच उपयोग नसतो.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 232]

कर्म आराधना – २५

केवळ कर्म हे उद्दिष्ट नाही; तर कर्म हे योगसाधना करण्याचे एक साधन आहे.
*
व्यक्तीने योग्य पद्धतीने आणि चेतना त्या ‘शक्ती’प्रत खुली ठेवून कर्म केलेले असेल तर असे कर्म ही साधनाच असते.
*
साधनेशिवाय योगाचे उद्दिष्ट साध्य होऊ शकत नाही. कर्म हे सुद्धा साधनेचाच एक भाग म्हणून स्वीकारले पाहिजे. पण अर्थातच, तुम्ही जेव्हा कर्म करत असता तेव्हा मात्र तुम्ही कर्माचाच विचार केला पाहिजे. ते कर्म ‘योग-चेतने’मध्ये राहून एक ‘साधन’ म्हणून, ‘ईश’स्मरणासहित कसे करायचे हे तुम्ही शिकाल.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 231]

कर्म आराधना – २४

कर्म हे ‘पूर्णयोगा’चे आवश्यक अंग आहे. तुम्ही जर कर्म केले नाहीत आणि सगळा वेळ जर ‘ध्याना’मध्येच व्यतीत केलात तर तुमची साधना व तुम्ही, वास्तवावरील पकड गमावून बसाल; आणि तुम्ही स्वतःला अनियंत्रित अशा व्यक्तिनिष्ठ कल्पनांमध्ये हरवून बसाल….

– श्रीअरविंद
[CWSA 32 : 248]

कर्म आराधना – २३

कर्मासाठीच केलेले कर्म किंवा कोणतीही मागणी न करता, पारितोषिकाची किंवा कोणत्याही वैयक्तिक प्रतिफळाची वा मोबदल्याची अपेक्षा न करता, इतरांसाठी केलेले कर्म असा सामान्यत: ‘निरपेक्ष कर्मा’चा अर्थ घेतला जातो. परंतु ‘ईश्वरा’साठी, कोणत्याही अटीविना वा मागणीविना एक अर्पण म्हणून केलेले इच्छाविरहित कर्म, असा ‘योगा’मध्ये ‘निरपेक्ष कर्मा’चा अर्थ होतो. असे कर्म, एकतर ‘ईश्वरा’ची तशी इच्छा आहे म्हणून केले जाते किंवा ‘ईश्वरा’च्या प्रेमापोटी केले जाते.
*
स्वतःची आंतरिक प्रगती आणि परिपूर्णता एवढेच तुमच्या ‘योग’साधनेचे उद्दिष्ट असता कामा नये तर, ‘ईश्वरा’साठी कार्य करायचे म्हणूनदेखील तुम्ही योगसाधना केली पाहिजे.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 231]

कर्म आराधना – २२

सामान्य जीवनामध्ये असलेले कर्म हे कधीकधी एखाद्या मानसिक आदर्शाने स्पर्शित होऊन, कोणत्यातरी मानसिक किंवा नैतिक नियंत्रणाखाली, कोणत्यातरी वैयक्तिक हेतुसाठी किंवा इच्छापूर्तीसाठी केले जाते.

‘गीता’प्रणीत योगामध्ये, ईश्वराप्रत केलेला यज्ञ या भूमिकेतून व्यक्तीचे कर्म अर्पण केले जाते. इच्छाजय, अहंकारविरहित आणि इच्छाविरहित कृती, ‘ईश्वरा’विषयी भक्ती, वैश्विक चेतनेमध्ये प्रवेश, सर्व जीवमात्रांविषयी एकत्वाची भावना, ‘ईश्वरा’बद्दलची ऐक्यभावना यांचा ‘गीता’प्रणीत योगातील कर्मामध्ये समावेश होतो.

अतिमानसिक ‘प्रकाशा’चे व ‘शक्ती’चे अवतरण आणि प्रकृतीचे रूपांतरण ही ‘पूर्णयोगा’ची अंतिम उद्दिष्टे आहेत. या उद्दिष्टांची पूर्णयोग ‘गीता’प्रणीत योगामध्ये भर घालतो.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 238]

कर्म आराधना – २०

‘भगवद्गीते’मध्ये कर्मयोगाचा गाभा म्हणून सांगितला आहे, तो गाभा तुम्ही ग्रहण करू शकलात तर – स्वतःला विसरा आणि तुमच्या काळज्या, दुःखं यांना एका महत्तर चेतनेप्रत असलेल्या अभीप्सेमध्ये विरून जाऊ द्या. एक महत्तर ‘शक्ती’ या विश्वामध्ये कार्यरत आहे याची जाणीव करून घ्या आणि या विश्वामध्ये जे कार्य करायचे आहे, त्या कार्यासाठी स्वतःला एक साधन बनवा. मग ते कार्य अगदी छोटेसे का असेना! पण काहीही असले तरी, तुम्ही ते संपूर्णतया स्वीकारले पाहिजे आणि तुम्ही तुमची समग्र इच्छा त्यामध्ये ओतली पाहिजे – विभाजित आणि विचलित अशा इच्छेनिशी तुम्हाला कोणत्याच गोष्टीमध्ये यश मिळण्याची आशा बाळगता येणार नाही, – ना जीवनामध्ये आणि ना ‘योगा’मध्ये!

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 237-238]

कर्म आराधना – १९

केवळ एक सर्वसाधारण दृष्टिकोन असून चालणार नाही तर, प्रत्येक कर्मच ‘दिव्य माते’ला अर्पण केले पाहिजे म्हणजे मग तो दृष्टिकोन सदासर्वदा जिवंत राहील.

काम करत असताना त्या वेळामध्ये ध्यान करता कामा नये, कारण त्यामुळे कामामधून लक्ष निघून जाईल, परंतु ज्याच्याप्रत तुम्ही ते कर्म अर्पण करणार आहात त्या ‘एकमेवाद्वितीय’ ईश्वराचे स्मरण मात्र तुमच्यामध्ये कायम असले पाहिजे.

ही केवळ एक पहिली प्रक्रिया आहे; कारण, पृष्ठवर्ती मन (surface mind) जेव्हा कर्म करत असते तेव्हा, ‘ईश्वरी उपस्थिती’च्या संवेदनेवर तुमच्या अंतरंगातील शांत अस्तित्व एकाग्र असल्याची सातत्यपूर्ण जाणीव जर तुम्हाला असेल, किंवा दिव्य ‘माते’ची शक्तीच कार्य करत आहे आणि तुम्ही केवळ एक माध्यम आहात किंवा एक साधन आहात अशी जाणीव जर तुम्हाला नेहमीच होऊ लागली तर मग, ईश-स्मरणाच्या जागी, ‘योग’साक्षात्कार आपोआपच नित्य घडू लागेल, कर्मामध्ये दिव्य ऐक्य होण्यास सुरुवात होईल.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 247)

कर्म आराधना – १८

(भगवद्गीता ही प्राणिक इच्छांवर मानसिक नियंत्रणाचा नियम सांगून थांबत नाही, तर ती अमर्त्य आत्म्याची अचलता प्रतिपादित करते.)

सर्व परिणामांबाबत, सर्व प्रतिक्रियांबाबत, सर्व घटनांबाबत ‘मनाची आणि हृदयाची संपूर्ण समता’ ही कसोटी असल्याचे भगवद्गीता सांगते. सद्भाग्य असो वा दुर्भाग्य, सन्मान असो वा अपमान, कीर्ती असो वा दुष्कीर्ती, जय असो वा पराभव, सुखद असोत किंवा दुःखद घटना, या गोष्टी आपल्याला हादरवून टाकत नसतील, इतकेच नव्हे तर त्याचा स्पर्शही जर आपल्याला होत नसेल, भावभावनांपासून आपण मुक्त असू, मज्जागत प्रतिक्रियांपासून आपण मुक्त असू, मानसिक दृष्ट्या आपण मुक्त असू, अस्वस्थ न होता वा आपल्या प्रकृतीमध्ये कोणतेही स्पंदन उत्पन्न होऊ न देता जर आपण त्याला प्रतिसाद देत असू, तर मग ‘गीता’ आपल्याला जिचा निर्देश करते ती संपूर्ण मुक्ती आपल्याला लाभलेली आहे, असा त्याचा अर्थ होतो, अन्यथा नाही. (आपली) अगदी बारीकशीही प्रतिक्रिया ही साधना अपूर्ण असल्याचे द्योतक आहे आणि आपल्यामधील काही भाग अज्ञान आणि बंध हा त्यांचा धर्म आहे असे मानत असल्याचे तसेच, तो भाग अजूनही जुन्या प्रकृतीलाच चिकटून असल्याचे द्योतक आहे. आपला आत्म-जय हा अजूनही आंशिक रीतीनेच साध्य झाला आहे आणि आपल्या प्रकृतीच्या भूमीमधील एखादा अल्पसा कण, किंवा एखादा भाग किंवा काही प्रदेश हा अजूनही अपूर्ण आहे वा अ-वास्तव आहे, याचे ते निदर्शक आहे. आणि अपूर्णतेचा तो छोटासा कण आपल्या ‘योगा’ची सारी सिद्धी मातीमोल करू शकतो.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 103)