पूर्णयोगा’मध्ये साधना आणि बाह्य जीवन यांमध्ये कोणताही भेद नाही; दैनंदिन जीवनात प्रत्येक क्षणी ‘सत्या’चा शोध घेतलाच पाहिजे आणि तो आचरणात आणलाच पाहिजे.
– श्रीमाताजी
(White roses : 33)

पूर्णयोगा’मध्ये साधना आणि बाह्य जीवन यांमध्ये कोणताही भेद नाही; दैनंदिन जीवनात प्रत्येक क्षणी ‘सत्या’चा शोध घेतलाच पाहिजे आणि तो आचरणात आणलाच पाहिजे.
– श्रीमाताजी
(White roses : 33)
साधकाने सर्व कामधाम सोडून द्यावे आणि फक्त वाचन व ध्यान करावे, हे श्रीमाताजींना अपेक्षित नाही. कर्म हा योगसाधनेचा एक भाग आहे आणि प्राण व त्याच्या क्रियांमध्ये ईश्वरी उपस्थिती’, ‘प्रकाश’ आणि ‘शक्ती’ खाली अवतरित व्हाव्यात म्हणून त्यांना आवाहन करण्यासाठी कर्म एक उत्तम संधी प्रदान करते; कर्मामुळे समर्पणाचे क्षेत्रदेखील विस्तारित होते आणि समर्पणाची संधीही वाढीस लागते.
– श्रीअरविंद
(CWSA 32 : 247)
भौतिकामध्ये अंतरात्म्याची प्राप्ती व्हावी अशी जर तुमची इच्छा असेल तर, केवळ ध्यानामध्ये बसल्याने आणि अमूर्त अनुभव घेतल्याने ते साध्य होणार नाही; भौतिक जीवन आणि कर्मामध्ये, श्रीमाताजींसाठी केलेल्या कार्याद्वारे, आज्ञापालनाद्वारे व श्रीमाताजींप्रत केलेल्या कर्मसमर्पणाद्वारे, त्याचा शोध घेतल्यानेच तो अंतरात्मा तुम्हाला प्राप्त होईल…
– श्रीअरविंद
(CWSA 32 : 249-250)
…कर्म हे पूर्णयोगाचे आवश्यक अंग आहे. तुम्ही कर्म केले नाहीत आणि सगळा वेळ जर ‘ध्याना’मध्येच व्यतीत केलात तर तुमची साधना व तुम्ही वास्तवावरील पकड गमावून बसाल; आणि तुम्ही स्वतःला अनियंत्रित अशा वैयक्तिक कल्पनांमध्ये गमावून बसाल…
-श्रीअरविंद
(CWSA 32 : 248)
…आजवर जे काही केले आहे त्याच्या तुलनेत, अजूनही जे करायचे बाकी आहे त्याच्या सापेक्षतेची जाण असणे तसेच, ईश्वराच्या कृपेशिवाय व्यक्तीच्या अस्तित्वाला काहीच अर्थ नाही, याची जाणीव असणे म्हणजे ‘आध्यात्मिक विनम्रता’.
-श्रीअरविंद
(CWSA 28 : 432)
… (ईश्वराने आपल्याला देऊ केलेल्या गोष्टींचा) स्वतःच्या महत्त्वाकांक्षेपोटी किंवा स्वार्थासाठी दुरूपयोग करता कामा नये; अभिमान नसावा, प्रौढी नसावी, उच्चतेची भावना नसावी, ईश्वराचे साधन असल्याचा कोणताही दावा किंवा अहंकारदेखील नसावा; तर ज्या कोणत्या मार्गाने, प्रकृतिजन्य सहज व शुद्ध आंतरात्मिक साधन कसे बनता येईल की ज्यामुळे ते ईश्वराच्या सेवेसाठी सुपात्र बनेल, याविषयी व्यक्तीने जागरूक असले पाहिजे.
– श्रीअरविंद
(CWSA 29 : 245)
जे काही तुम्ही केले पाहिजे त्यावरच लक्ष केंद्रित करा आणि असंबंधित व्यस्ततांमुळे किंवा अन्य कोणत्याही प्रभावामुळे, स्वतःला या किंवा त्या मार्गावर भरकटू देऊ नका…
– श्रीअरविंद
(CWSA 32 : 350)
(श्रीअरविंद लिखित एका पत्रामधून…)
तुम्ही कार्यासाठी जोपर्यंत त्या ‘शक्ती’चा उपयोग केलात आणि तुम्ही जोपर्यंत त्या कार्याला धरून राहिलात तोपर्यंत त्या शक्तीचे साहाय्य तुम्हाला लाभले. त्या कार्याचे स्वरूप हे धार्मिक आहे की अ-धार्मिक ही बाब प्रथमतः तितकीशी महत्त्वाची नसते, ज्या दृष्टिकोनातून ते कार्य केले जाते तो आंतरिक दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. तो दृष्टिकोन आंतरात्मिक (psychic) नसून प्राणिक (vital) असेल, तर अशा वेळी व्यक्ती स्वतःला त्या कार्यात झोकून देते आणि आंतरिक संपर्क गमावून बसते. आणि तो दृष्टिकोन जर आंतरात्मिक असेल तर, व्यक्तीचा आंतरिक संपर्क टिकून राहतो, आणि त्या कार्याला ‘शक्ती’चे साहाय्य लाभत आहे किंवा ती ‘शक्ती’च ते कार्य करत आहे, असे त्या व्यक्तीला जाणवते आणि साधना प्रगत होत राहते.
– श्रीअरविंद
(CWSA 29 : 271)
कृतज्ञता – १४
प्रश्न : ‘ईश्वरी कृपा’ कृतज्ञतापूर्वक स्वीकारण्याचा मार्ग कोणता?
श्रीमाताजी : सर्वप्रथम तुम्हाला त्याची आवश्यकता जाणवली पाहिजे.
हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे त्या ईश्वरी कृपेविना तुम्ही असाहाय्य आहात याची जाणीव करून देणारी, एक विशिष्ट अशी आंतरिक विनम्रता असणे आवश्यक आहे. खरोखरच, तुम्ही त्याविना अपूर्ण आणि शक्तिहीन असता. सुरुवात करायची तर ही पहिली गोष्ट आहे. ही पहिली अट आहे…
…आणि मग, ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही सापडलेले असता, त्या परिस्थितीतून केवळ ती ईश्वरी कृपाच तुम्हाला तारू शकते, तीच तुम्हाला उपाय सुचवू शकते आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी लागणारे सामर्थ्यदेखील तीच देऊ शकते, फक्त ईश्वरी ‘कृपा’च हे सारे करू शकते, अशी जाणीव जर तुम्हाला झाली तर, अगदी स्वाभाविकपणे तुमच्यामध्ये एक उत्कट आस निर्माण होते, चेतना खुलेपणात अभिव्यक्त झालेली असते. तुम्ही जर धावा कराल, आस बाळगाल आणि प्रतिसाद मिळावा अशी आशा बाळगाल तर, अगदी स्वाभाविकपणे तुम्ही त्या ईश्वरी ‘कृपे’प्रत खुले होता.
आणि नंतर ईश्वरी ‘कृपा’ तुम्हाला जो प्रतिसाद देते, त्याकडे तुम्ही अगदी बारकाईने लक्ष दिले पाहिजे, ती ‘कृपा’ तुम्हाला तुमच्या त्रासामधून बाहेर काढते, ती तुमच्या समस्येवर उपाय सुचविते किंवा तुमच्या अडचणीमधून बाहेर पडण्यास तुम्हाला साहाय्य करते. पण एकदा का तुमची त्या त्रासापासून सुटका झाली आणि तुम्ही त्या अडचणीमधून बाहेर आलात तर, तुम्हाला त्यातून बाहेर काढणारी ‘ईश्वरी कृपा’च होती, हे तुम्ही विसरता कामा नये; तुम्हीच स्वतःला त्या परिस्थितीतून बाहेर काढले आहे, असे समजता कामा नये. हा खरोखरच, महत्त्वाचा मुद्दा आहे. अडचण दूर झाली की, लगेचच बहुसंख्य लोक असे म्हणतात, “त्या अडचणीतून मी स्वतःला कसे बाहेर काढले, माझे मलाच माहीत.”
तर हे सारे असे असते. आणि नंतर तुम्ही कडीकोयंडा लावून दरवाजा बंद करून टाकता आणि त्यानंतर मग तुम्ही काहीही ग्रहण करू शकत नाही. तुमच्या अशा प्रकारच्या आंतरिक मूर्खपणापासून स्वतःला बाहेर काढण्यासाठी तुम्ही स्वतः काहीच करू शकत नाही, याची तुम्हाला पुन्हा एकदा जाणीव व्हावी म्हणून, पुन्हा एखादा तीव्र झटका, एखादी भयानक अडचण आवश्यक होऊन बसते. कारण आपण शक्तिहीन आहोत याची जाणीव जेव्हा तुमच्यामध्ये वाढू लागते तेव्हाच, तुम्ही थोडेसे खुले आणि लवचीक होऊ लागता. कारण, तुम्ही जे काही करता ते तुमच्या स्वतःच्या कौशल्यावर आणि तुमच्या स्वतःच्या क्षमतांवर अवलंबून आहे असे जोपर्यंत तुम्हाला वाटत असते तोपर्यंत, तुम्ही एकच दरवाजा बंद करता असे नाही, तर खरोखरच तुम्ही एकापाठोपाठ अनेक दरवाजे बंद करत असता, अगदी कडीकोयंडे लावून ते बंद करत असता. तुम्ही जणू काही एखाद्या गढीमध्ये स्वतःला बंद करून घेता आणि मग त्यामध्ये कोणत्याच गोष्टीचा प्रवेश होऊ शकत नाही. ही मोठीच उणीव आहे, व्यक्ती चटकन साऱ्या गोष्टी विसरून जाते. स्वाभाविकपणे ती स्वतःच्याच क्षमतांवर समाधानी राहते.
– श्रीमाताजी
(CWM 06 : 322-323)
हे परमेश्वरा, अस्तित्वाच्या प्रत्येक अवस्थेमध्ये, सर्व कृतींमध्ये, सर्व वस्तुंमध्ये, सर्व जगतांमध्ये व्यक्ती तुला (ईश्वराला) भेटू शकते, तुझ्याशी एकत्व पावू शकते कारण, तू सर्वत्र, सदोदित विद्यमान आहेस. एखादी व्यक्ती तिच्या अस्तित्वाच्या एखाद्या कृतीद्वारे तुझ्याप्रत पोहोचलेली असते किंवा या ब्रह्मांडातील एखाद्या जगतामध्ये तुला भेटलेली असते आणि ती व्यक्ती म्हणते, “मला तो परमेश्वर गवसला.” आणि मग अशी व्यक्ती अधिक शोध घ्यायचा थांबवते; त्या व्यक्तीला असे वाटते की, जणू ती मानवी संभाव्यतांच्या शिखरावरच जाऊन पोहोचली आहे. पण असे समजणे ही केवढी मोठी चूक आहे.
सर्व स्थितीमध्ये, सर्व प्रकारांमध्ये, सर्व वस्तुमात्रांमध्ये, सर्व जगतांमध्ये, सर्व घटकांमध्ये आम्ही तुझा शोध घेतला पाहिजे आणि तुझ्याशी एकत्व पावले पाहिजे आणि त्यामधून, एखादाही घटक जरी बाजूला राहून गेला, मग भले तो कितीका लहान असेना, तर मग ते सायुज्य पूर्ण होऊ शकणार नाही, मग तो साक्षात्कार परिपूर्ण होणार नाही. आणि म्हणून तुझा शोध लागणे ही अनंत अशा शिडीवरील केवळ एक सुरुवातीची पायरी आहे.
हे मधुर स्वामी, सार्वभौम रूप-परिवर्तनकारा, सर्व प्रकारच्या दुर्लक्षाची, निष्काळजीपणाची, सर्व आळशी निरुत्साहाची परिसमाप्ती कर, आमच्या सर्व ऊर्जा तू एकत्रित कर, आणि त्यांचे दुर्दम्य, अजय अशा संकल्पशक्तीमध्ये परिवर्तन कर.
हे प्रकाशा, प्रेमा, अनिर्वचनीय शक्तिरूपा, तू त्यांच्यामध्ये शिरून त्यांचे रूपांतर करावेस म्हणून, सर्व अणुरेणू तुझ्याप्रत आकांत करत आहेत.
सर्वांना सायुज्यतेचा परम आनंद प्रदान कर.
– श्रीमाताजी
(CWM 01 : 200)






