Tag Archive for: साधना

विचारशलाका ०७

हृदय-चक्राने त्याच्या मागे असलेल्या आणि मनाच्या चक्रांनी त्यांच्यापेक्षा वर असणाऱ्या सर्वांप्रत खुले होणे, उन्मुख होणे, या दोन गोष्टी (साधनेमध्ये) सर्वाधिक महत्त्वाच्या असतात. कारण हृदय हे चैत्य-पुरुषाप्रत (psychic being) खुले होते आणि मनाची चक्रं उच्चतर चेतनेप्रत (higher consciousness) खुली होतात. चैत्य पुरुष व उच्चतर चेतना यांच्यामधील परस्परसंबंध हेच तर ‘सिद्धी’चे मुख्य साधन असते.

‘ईश्वरा’ने आमच्यामध्ये आविष्कृत व्हावे म्हणून तसेच, त्याने चैत्यपुरुषाद्वारे आमच्या सर्व प्रकृतीचा ताबा घेऊन, तिचे नेतृत्व करावे म्हणून त्याला हृदयामध्ये एकाग्रतापूर्वक आवाहन केल्याने पहिली उन्मुखता (opening) घडून येते. साधनेच्या या भागाचा मुख्य आधार म्हणजे अभीप्सा, प्रार्थना, भक्ती, प्रेम व समर्पण या गोष्टी असतात. आणि आपण ज्याची आस बाळगत असतो, त्याच्या वाटेत अडसर बनू पाहणाऱ्या सर्व गोष्टींना नकार देणे ही बाब देखील यामध्ये समाविष्ट असते.

मस्तकामध्ये (आणि नंतर मस्तकाच्या वर) चेतनेचे एककेंद्रीकरण केल्याने दुसरी उन्मुखता घडून येते. (प्रथम फक्त शांती, किंवा शक्ती व शांती एकत्रितपणे) अशा ईश्वरी ‘शांती’चे, आणि ईश्वरी ‘शक्ती’, ‘प्रकाश’, ‘ज्ञान’, ‘आनंद’ यांचे व्यक्तित्वामध्ये अवतरण घडून यावे यासाठी आवाहन केल्याने, आणि तशी आस व सातत्यपूर्ण इच्छा बाळगल्याने दुसरी उन्मुखता (opening) घडून येते.

– श्रीअरविंद [CWSA 30 : 327-328]

विचारशलाका ०६

श्रीअरविंद यांनी एके ठिकाणी असे सांगितले आहे की, “प्रकाशाला बळाने खाली खेचायचा प्रयत्न करणे हे खचितच चुकीचे आहे. ‘अतिमानस’ ही अट्टाहासाने खाली खेचण्याची गोष्ट नाही. योग्य वेळ येईल तेव्हा, ते स्वत:हून आपलेआपणच खुले होईल; पण हे घडून येण्यापूर्वी, बरेच काही करावे लागेल आणि ते मात्र धीराने व कोणतीही घाईगडबड न करता करावे लागेल.”

साधक : “एखाद्या गोष्टीला खाली खेचून आणणे’’ ही अनेकांची प्रवृत्ती असते का?

श्रीमाताजी : माणसांना घाई असते आणि त्यांना ताबडतोब फळ हवे असते. आणि मग, त्यांना असे वाटायला लागते की, ते जणूकाही ‘अतिमानस’ खाली उतरवीत आहेत – वास्तविक, त्यांनी एखादे छोटे प्राणिक अस्तित्व (vital individuality) खाली खेचलेले असते, जे त्यांना वाकुल्या दाखवत असते आणि अंतत: ते त्यांना मूर्ख बनविते. बहुतेक वेळा म्हणजे, शंभरपैकी नव्व्याण्णव वेळा हे असेच घडते. एखादे छोटेसे व्यक्तित्व, एखादे प्राणिक अस्तित्व मोठा खेळ खेळते; प्रकाशाचा चकचकीत, दिखाऊ असा खेळ उभा करते. मग तो बिचारा, ज्याने त्या अस्तित्वाला ‘खाली खेचले’ होते तो त्या चकचकीत प्रकाशाने दिपून जातो आणि म्हणतो, “अरे, हे काय, हेच ते अतिमानस!” आणि तो खड्ड्यात जाऊन पडतो.

तुम्हाला जेव्हा खरोखरच खऱ्या ‘ईश्वरी प्रकाशा’चा स्पर्श झालेला असतो, त्याचे थोडेसे जरी दर्शन झालेले असते, त्याच्याशी जेव्हा तुमचा संपर्क निर्माण झालेला असतो, तेव्हाच तुम्ही ‘ईश्वरी प्रकाश’ आणि प्राणिक प्रकाश यामधील फरक ओळखू शकता आणि तेव्हाच तुम्हाला तो जणू काही रंगमंचावरील प्रकाशाचा कृत्रिम खेळ आहे हे कळू शकते. परंतु तसे नसेल, तर मात्र, इतरजण त्याने दिपून जातात, कारण तो प्रकाश तसा दिपवणाराच असतो, ‘अद्भुत’ असतो आणि मग त्या प्रकाशामुळे ते फसतात. पण, जेव्हा तुम्ही ‘ईश्वरी प्रकाश’ पाहिलेला असतो, त्या ‘सत्या’शी तुमचा संबंध प्रस्थापित झालेला असतो, तेव्हा तुम्ही त्या कृत्रिम प्रकाशाकडे फक्त पाहता आणि हसता. (तो कृत्रिम प्रकाश) ही फसवणूक असते, पण ती फसवणूक आहे हे ओळखण्यासाठी सुद्धा, तुम्हाला सत्य काय आहे ते ज्ञात असावे लागते.

मूलत: प्रत्येक गोष्टीबाबत हे असेच असते. अशा प्रकारचे खेळ ज्याच्यावर चालू असतात, असा ‘प्राण’ हा जणू काही महा-रंगमंच असतो — तो खूप आकर्षक, डोळे दिपवणारा, फसवा असतो. परंतु, जेव्हा तुम्हाला ‘सद्वस्तु’ म्हणजे काय हे माहीत असते, तेव्हाच तुम्हाला चटकन ते जाणवते, कोणत्याही तर्काविना, उत्स्फूर्तपणे जाणवते आणि तेव्हा तुम्ही म्हणता, “नाही, मला हे नको आहे.” जेव्हा तुम्ही ‘खेचून आणता’, तेव्हा शंभरातील नव्व्याण्णव वेळा तरी हेच घडते… लाखातूनच एखाद्या वेळीच असे घडते की, एखाद्याने खरोखरच ‘सद्वस्तु’ खाली आणलेली असते – पण तेव्हा हे सिद्ध होते की, त्याची तयारी झालेली होती. अन्यथा नेहमीच, तुम्ही जे खेचून आणता ते प्राणिक अस्तित्व असते, वरवरचे काहीतरी असे, ते त्या सद्वस्तुचे रंगमंचीय रूप असते, ती ‘सद्वस्तु’ नसते.

एखादी गोष्ट खाली खेचून आणणे ही नेहमीच अहंमन्य प्रक्रिया असते. ते आकांक्षेचे विकृत रूप असते. खऱ्या अभीप्सेमध्ये देणे अथवा आत्म-दान समाविष्ट असते तर खेचून आणण्यामध्ये स्वत:साठी काहीतरी मागणी असते. अगदी तुमच्या मनामध्ये कितीही विशाल अशी आकांक्षा का असेना, ती अगदी पृथ्वीएवढी, ब्रह्मांडाएवढी का असेना, तिचा काहीच उपयोग नसतो, कारण अशी आकांक्षा म्हणजे केवळ मानसिक क्रियाव्यवहार असतो.

– श्रीमाताजी [CWM 11 : 23]

विचारशलाका – ०५

साधक : आध्यात्मिक अनुभव यावेत अशी आकांक्षा आम्ही बाळगली पाहिजे का?

श्रीमाताजी : आध्यात्मिक अनुभव यावेत अशी आकांक्षा बाळगण्यापेक्षा, प्रगतीची आस बाळगणे किंवा अधिक सचेत, अधिक जागृत होण्याविषयी आस बाळगणे किंवा चांगले काही करावे, चांगले बनावे अशी आकांक्षा बाळगणे अधिक सुज्ञपणाचे आहे, असे मला वाटते. कारण आध्यात्मिक अनुभव यावेत अशी आकांक्षा बाळगण्यातून, कमीअधिक काल्पनिक आणि भ्रामक अनुभवांची दारे उघडू शकतात, उच्च गोष्टींचे रूप धारण करणाऱ्या प्राणिक हालचालींची दारे उघडू शकतात. त्याद्वारे व्यक्ती स्वत:चीच फसवणूक करून घेऊ शकते. आध्यात्मिक अनुभव हे वस्तुत: केवळ ‘अनुभवासाठी अनुभव’ अशा पद्धतीने येता कामा नयेत तर, ते सहजस्फूर्तपणे आले पाहिजेत, आंतरिक प्रगतीचा परिणाम म्हणून आले पाहिजेत.

*

आध्यात्मिक अनुभव म्हणजे स्वत:मधील किंवा बाहेरील, ‘ईश्वरा’च्या संपर्कात येणे. हा अनुभव सर्व देशांमध्ये, सर्व माणसांमध्ये, सर्व काळामध्ये सारखाच असतो. तुम्हाला जर ‘ईश्वर’ भेटला तर तो तुम्हाला नेहमीच सर्वत्र सारख्याच प्रकारे भेटतो. (आलेल्या अनुभवाचे वर्णन, ‘कोणी येशू ख्रिस्ताचे दर्शन झाले’ असे करतो तर ‘कोणी श्रीकृष्णाचे दर्शन झाले’ असे करतो, हा असा फरक पडतो.) कारण, आलेला अनुभव आणि त्याची शब्दांतील मांडणी यामध्ये एक खोल दरी असते. तुम्हाला प्रत्यक्ष आध्यात्मिक अनुभव येतो तो तुमच्या ‘आंतरिक चेतनेमध्ये’ आणि तो शब्दांकित केला जातो तुमच्या ‘बाह्य चेतनेमध्ये’! तुमचे शिक्षण, तुमची श्रद्धा, तुमच्या मानसिक वृत्तीप्रवृती यानुसार तो शब्दांकित केला जातो. केवळ एकच सत्य, एकच सद्वस्तु अस्तित्वात आहे, पण ते सत्य, ती सद्वस्तु ज्या रूपांमधून अभिव्यक्त होते ती रूपे मात्र अनंत आहेत.

– श्रीमाताजी [CWM 06 : 432], [CWM 03 : 17]

विचारशलाका – ०४

व्यक्ती जर ‘ईश्वरा’प्रति विश्वासाने आणि खात्रीपूर्वक आत्मदान करेल तर ‘ईश्वरा’कडून व्यक्तीसाठी सारे काही केले जाईल; आंतरिक चेतना जागृत केली जाईल, हृदय आणि प्रकृती शुद्ध केली जाईल, पडदे हटवले जातील. व्यक्तीला हे आत्मदान जरी अगदी एकदम पूर्णत्वाने करता आले नाही तरी, व्यक्ती जेवढे ते अधिकाधिक प्रमाणात करेल, तेवढ्या अधिकाधिक प्रमाणात तिला आंतरिक साहाय्य आणि मार्गदर्शन लाभत राहील आणि अंतरंगामध्ये ‘ईश्वरा’चा संपर्क आणि त्याची अनुभूती वाढत राहील. शंकेखोर मनाची सक्रियता कमी झाली आणि तुमच्यामध्ये विनम्रता व समर्पणाची इच्छा जर वाढीला लागली तर, हे घडून येणे निश्चितपणे शक्य आहे. त्यासाठी या व्यतिरिक्त, दुसऱ्या कोणत्याच तपस्येची आणि बळाची आवश्यकता नाही.

– श्रीअरविंद [CWSA 29 : 69]

विचारशलाका – ०३

आंतरिक एकाग्रतेच्या साधनेमध्ये पुढील गोष्टींचा अंतर्भाव होतो –

१) हृदयामध्ये चेतना स्थिर करणे आणि तिथे ‘दिव्य माते’चे नाम, प्रतिमा किंवा संकल्पना, यांपैकी जे तुमच्यासाठी सहजस्वाभाविक असेल त्यावर, चित्त एकाग्र करणे.

२) हृदयातील या एकाग्रतेच्या साहाय्याने मन हळूहळू आणि क्रमश: शांत शांत करत नेणे.

३) हृदयामध्ये ‘श्रीमाताजीं’ची उपस्थिती असावी आणि त्यांनी मन, प्राण आणि कृती यांचे नियंत्रण करावे यासाठी आस बाळगणे.

– श्रीअरविंद [CWSA 29 : 225]

विचारशलाका – ०१

जेव्हा आपली चेतना बदलेल तेव्हा परिवर्तन म्हणजे काय ते आपल्याला कळेल.

*

‘परिवर्तन’ म्हणजे नक्की काय?…

द्वेषाचे परिवर्तन सुसंवादामध्ये

मत्सराचे परिवर्तन औदार्यामध्ये

अज्ञानाचे परिवर्तन ज्ञानामध्ये

अंधकाराचे परिवर्तन प्रकाशामध्ये

असत्याचे परिवर्तन सत्यामध्ये

दुष्टपणाचे परिवर्तन चांगुलपणामध्ये

युद्धाचे परिवर्तन शांतीमध्ये

भीतीचे परिवर्तन निर्भयतेमध्ये

अनिश्चिततेचे परिवर्तन निश्चिततेमध्ये

संशयाचे परिवर्तन श्रद्धेमध्ये

गोंधळाचे परिवर्तन व्यवस्थेमध्ये

पराभवाचे परिवर्तन विजयामध्ये.

– श्रीमाताजी [CWM 15 : 223]

आध्यात्मिकता ४९

‘सर्व जीवन म्हणजे योगच आहे’

०१) पहिला आणि कदाचित सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की, मन हे आध्यात्मिक गोष्टींचे आकलन करण्यासाठी सक्षम नसते… आणि म्हणून या मार्गावर प्रगत व्हायचे असेल तर, सर्व मानसिक मतमतांतर आणि प्रतिक्रिया यांपासून स्वतःला दूर राखणे अगदी अनिवार्य असते.

०२) सुखसोयी, समाधान, मौजमजा, आनंद यासाठीची सर्व धडपड सोडून द्या. केवळ प्रगतीचा एक धगधगता अग्नी बनून राहा. जे काही तुमच्यापाशी येईल ते तुमच्या प्रगतीसाठी साहाय्यकारी आहे असे समजून त्याचा स्वीकार करा आणि जी कोणती प्रगती करणे आवश्यक आहे, ती ताबडतोब करून मोकळे व्हा.

०३) तुम्ही जे काही करता, त्यामध्ये आनंद घेण्याचा प्रयत्न करा; परंतु, आनंद मिळवायचा म्हणून कधीच काही करू नका.

०४) कधीही उत्तेजित होऊ नका, उदास होऊ नका किंवा क्षुब्ध, अस्वस्थ होऊ नका. कोणत्याही परिस्थितीत पूर्णत: शांत राहून त्या परिस्थितीला सामोरे जा.

०५) आणि तरीसुद्धा, तुम्ही अजून कोणती प्रगती करणे आवश्यक आहे याचा शोध घेण्यामध्ये कायम सतर्क राहा आणि तसे करण्यासाठी अजिबात वेळ दवडू नका.

०६) भौतिक घटनांच्या दर्शनी रूपावरून त्याचे मूल्य ठरवू नका. कारण त्या घटना म्हणजे निराळेच काही अभिव्यक्त करण्याचा एक ओबडधोबड असा प्रयत्न असतो, खरी गोष्ट आपल्या वरवरच्या आकलनामधून निसटून जाते.

०७) एखादी व्यक्ती तिच्या प्रकृतीमधील अमुक एका गोष्टीमुळे, तमुक एका प्रकारे वागत असते, तिच्या प्रकृतीमधील ती गोष्ट बदलवून टाकण्याची ताकद तुमच्यामध्ये असल्याशिवाय, त्या व्यक्तीच्या वर्तणुकीविषयी कधीही तक्रार करू नका, आणि तुमच्याकडे जर ती ताकद असेलच, तर तक्रार करण्याऐवजी (त्या व्यक्तीमधील ती गोष्ट) बदलून टाका.

०८) तुम्ही कोणतीही गोष्ट करत असलात तरी, तुम्ही जे ध्येय तुमच्या स्वतः समोर ठेवले आहे त्या ध्येयाचा कधीही विसर पडू देऊ नका. एकदा का तुम्ही या महान शोधासाठी (चैत्य पुरुषाचा शोध) प्रवृत्त झालात की, कोणतीच गोष्ट लहान वा थोर नसते; सर्व गोष्टी सारख्याच महत्त्वाच्या असतात आणि त्या एकतर तुम्हाला त्वरेने यश मिळवून देऊ शकतात किंवा त्या यशाला उशीर लावतात.

०९) खाण्यापूर्वी काही क्षण अशा अभीप्सेने चित्त एकाग्र करा की, तुम्ही जे अन्न ग्रहण करणार आहात त्यामुळे, तुमचे परमशोधासाठी जे प्रयत्न चालू आहेत त्या प्रयत्नांना एक भरभक्कम आधार प्राप्त होईल. तुमच्या शरीराला यथायोग्य (पोषक) द्रव्य मिळावे आणि तुमच्या त्या प्रयत्नांमध्ये सातत्य, चिकाटी राहावी म्हणून, त्या अन्नाद्वारे तुम्हाला ऊर्जा प्राप्त होईल, अशी भावना ठेवा.

१०) झोपी जाण्यापूर्वी काही क्षण अशी अभीप्सा बाळगा की, त्या झोपेमुळे तुमच्या थकल्याभागल्या नसा पुन्हा ताज्यातवान्या होतील, तुमच्या मेंदूला शांतता आणि शांती प्राप्त होईल. त्यामुळे तुम्ही जागे झालात की, परत ताजेतवाने होऊन, ताज्या दमाने, परमशोधाच्या मार्गावरील तुमची वाटचाल तुम्ही पुन्हा सुरू करू शकाल.

११) कोणतीही कृती करण्यापूर्वी अशी इच्छा बाळगा की, तुमची कृती तुम्हाला साहाय्यकारी होईल किंवा अगदीच नाही तर परमशोधाच्या दिशेने चाललेल्या तुमच्या मार्गक्रमणामध्ये किमान ती अडथळा तरी ठरणार नाही.

१२) जेव्हा तुम्ही बोलायला सुरुवात करता तेव्हा जे तुमच्या मुखातून बाहेर पडणे नितांत आवश्यक आहे तेवढेच बोलण्यास संमती द्या; परमशोधाच्या दिशेने चाललेल्या तुमच्या मार्गक्रमणामध्ये कोणत्याही प्रकारे हानीकारक ठरणार नाहीत केवळ त्याच शब्दांना मुखावाटे बाहेर पडण्यास संमती द्या.

१३) सारांश रूपाने म्हणायचे तर, तुमच्या जीवनाचे ध्येय आणि तुमचे उद्दिष्ट कधीही विसरू नका. त्या परमशोधाची इच्छा ही नेहमीच तुमच्या वर असली पाहिजे; तुम्ही जे काही करता, तुम्ही जे काही आहात त्या प्रत्येक अस्तित्वाच्या वर त्या परमशोधाची इच्छा असली पाहिजे. तुमच्या अस्तित्वाच्या सर्व हालचालींवर प्रभुत्व गाजवणाऱ्या एखाद्या भल्यामोठ्या प्रकाशपक्ष्याप्रमाणे ती इच्छा असली पाहिजे.

१४) तुमच्या या सातत्यपूर्ण अथक परिश्रमांमुळे, एक दिवस अचानकपणे आंतरिक द्वार खुले होईल आणि एका लखलखीत, प्रकाशमान दीप्तिमध्ये तुमचा उदय होईल, त्यातून तुम्हाला अमर्त्यतेची खात्री पटेल, तुम्ही नेहमीच जिवंत होतात आणि पुढेही जिवंत असणार आहात, बाह्य रूपे केवळ नाहीशी होतात आणि तुम्ही वस्तुतः जे काही आहात त्याच्याशी तुलना करता, ही बाह्य रूपे म्हणजे जीर्ण कपडे जसे टाकून द्यावेत त्याप्रमाणे असतात, याचा मूर्तिमंत अनुभव तुम्हाला येईल. आणि तेव्हा मग, सर्व बंधनातून मुक्त झालेले तुम्ही ताठपणे उभे राहाल. एरवी प्रकृतीने तुमच्यावर जे परिस्थितीचे ओझे लादलेले असते त्या ओझ्याच्या भाराने दबून जाऊ नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर, तुम्हाला मोठ्या कष्टाने ते ओझे वागवत पुढे चालावेच लागते, ते ओझे सहन करावेच लागते, आता मात्र तसे करावे न लागता, तुम्ही सरळ, खंबीरपणे मार्गक्रमण करू शकाल. आता तुम्हाला तुमच्या नियतीची जाण असेल, आता तुम्ही तुमच्या जीवनाचे स्वामी असाल.

‘आध्यात्मिकता’ ही मालिका येथे समाप्त झाली.

– श्रीमाताजी [CWM 12 : 33-35]

आध्यात्मिकता ४७

‘आध्यात्मिकता’ या मालिकेमधून आपण आजपर्यंत आध्यात्मिकता आणि तिचे स्वरूप समजून घेतले, दैनंदिन जीवनामध्ये तिचे आचरण कसे करावे हेदेखील आपण समजून घेतले.

ज्याला एरवी आध्यात्मिकता असे संबोधले जाते त्या जप, तप, नामस्मरण, ध्यानधारणा यांसारख्या गोष्टी हा आध्यात्मिकतेचा केवळ अंशभाग असतो, हे श्रीअरविंद आपल्याला सांगतात. तो अंतरंग साधनेचा भाग आहे, परंतु २४ तासापैकी केवळ एखादा तास अशा प्रकारे ‘अध्यात्म’ करायचे आणि उरलेले २३ तास केवळ बाह्यवर्ती चेतनेमध्ये रहात, जीवन व्यतीत करायचे हे ‘पूर्णयोगा’मध्ये अभिप्रेत नाही.

उपरोक्त अंतरंग साधनेमुळे मनाचे उन्नयन होऊ शकेल, पण प्राण आणि शरीर मात्र आहेत तसेच कनिष्ठ प्रकृतीच्या अधिपत्याखाली राहतील, हे ‘पूर्णयोगा’त अभिप्रेत नाही. ‘पूर्णयोगा’मध्ये केवळ मनाचे उन्नयन अपेक्षित नाही, तर त्याच बरोबर प्राणाचे शुद्धीकरण आणि शरीराचे सक्षमीकरण अपेक्षित आहे. सामान्य जीवनाचे ‘दिव्य जीवना’मध्ये परिवर्तन घडविणे अपेक्षित आहे. त्यासाठी आपल्या मन, प्राण, आणि शरीराचे रुपांतरण आपल्याला घडवायचे आहे.

आपल्याला गाठायचा पल्ला फार दूरचा असल्याने, केवळ एक तासाची अध्यात्मसाधना येथे पुरेशी नाही, तर दिवसातील प्रत्येक तास, प्रत्येक क्षण, आपला प्रत्येक श्वास, आपले प्रत्येक कर्म हीच साधना बनणे आवश्यक आहे. हे प्रत्यक्षात उतरवायचे म्हणजे नेमके काय करायचे? या संबंधी श्रीमाताजींनी सूत्ररूपाने काही सांगितले आहे.

चैत्य पुरुष, समर्पण इत्यादी मालिकांमधून आपण आजवर अंतरंग साधनेचा भाग विचारात घेतला होता, त्यामुळे आत्ताच्या या मालिकेमध्ये आपण त्याची पुनरुक्ती केलेली नाही. फक्त संदर्भासाठी म्हणून त्यातील महत्त्वाचा भाग आपण उद्या पाहणार आहोत.

परवाच्या पोस्टमधील भाग थोडासा दीर्घ असणार आहे, पण तो फारच उपयुक्त आहे, असे विनम्रपणे सांगावेसे वाटते. एखाद्या ‘चेकलिस्ट’प्रमाणे आपण संदर्भ म्हणून हरघडी उपयोगात आणू शकतो असे हे लिखाण आहे.

श्रीमाताजी सूत्ररूपाने जे सांगणार आहेत त्याचा भर प्रामुख्याने बहिरंग साधनेवर असणार आहे, हे येथे नमूद करावेसे वाटते. २४ तास, प्रत्येक क्षणी, अगदी रोजच्या व्यवहारात राहून, अध्यात्म जगायचे म्हणजे नक्की काय करायचे याचे अगदी सोप्या पद्धतीने उत्तर श्रीमाताजींनी दिले आहे.

उद्याच्या भागात  – अंतरंग साधना (शोध कशाचा घ्यायचा?) परवाच्या भागात – बहिरंग साधना (शोध घेताना मार्गक्रमण कसे करायचे?)

संपादक – ‘अभीप्सा’ मासिक

आध्यात्मिकता ४६

सर्व अहंकार आणि सर्व अंधकार नाहीसा करण्यासाठी, कृतज्ञतेची शुद्ध, उबदार, मधुर आणि तेजस्वी ज्योत आपल्या हृदयामध्ये कायमच प्रज्वलित असली पाहिजे. साधकाला त्याच्या उद्दिष्टाप्रत घेऊन जाणारा जो परमेश्वर, त्या ‘परमेश्वराच्या कृपे’बद्दल कृतज्ञतेची ज्योत कायमच तेवत राहिली पाहिजे. व्यक्ती जितकी अधिक कृतज्ञ राहील, जेवढी तिला ‘ईश्वरी कृपे’च्या कृतीची अधिक जाण होईल आणि त्याबद्दल ती जेवढी अधिक कृतज्ञ राहील, तेवढा मार्ग जवळचा होईल.

– श्रीमाताजी : Conversations with disciple, July 15, 1964

आध्यात्मिकता ४४

(तिमिर जावो….भाग ०३)

 

…स्वतःमधील द्वंद्व दिसण्यासाठी, ते लक्षात येण्यासाठी, व्यक्ती पुरेशी निर्मळ आणि प्रामाणिक असली पाहिजे. सहसा व्यक्ती या गोष्टींकडे पुरेसे लक्ष देत नाही. व्यक्ती या टोकाकडून त्या टोकाकडे हेलकावत राहते. म्हणजे अगदी साध्या शब्दांत सांगायचे तर, तुम्ही असे म्हणू शकता की, एखाद्या दिवशी मी चांगला असतो, आणि दुसऱ्या दिवशी मी वाईट असतो. आणि तुम्हाला हे सारे अगदी स्वाभाविक वाटते. एवढेच काय पण कधीकधी तर, एका तासासाठी तुम्ही अगदी चांगले असता, आणि पुढच्याच तासाला तुम्ही अगदी दुष्ट होता, किंवा कधीकधी तुम्ही आख्खा दिवस चांगले असता आणि अचानक एकदम तुम्ही दुष्टासारखे वागू लागता, एखादा क्षण अतिशय दुष्टाप्रमाणे वागता, म्हणजे तुम्ही जेवढे चांगले असता, तितकेच टोकाचे दुष्टसुद्धा असता! फक्त एवढेच की, तुम्ही त्याकडे लक्ष देत नाही, तुमच्या मनामध्ये अतिशय हिंसक, वाईट, मत्सरयुक्त अशा गोष्टी येऊन जात असतात… सहसा व्यक्ती त्याकडे लक्षच देत नाही. पण हीच गोष्ट पकडली पाहिजे. ज्या क्षणी तुमच्या मनामध्ये ती गोष्ट उदयाला येते, त्या क्षणी तिच्या मानगुटीला धरून तिला घट्ट पकडली पाहिजे, तिला पकडून प्रकाशासमोर उभे केले पाहिजे आणि म्हटले पाहिजे, “नाही, मला तुझी गरज नाही, मला तू नको आहेस, मला तुझ्याशी काही घेणेदेणे नाही. तू इथून चालती हो आणि परत फिरकू नकोस.”

आणि हा असा अनुभव असतो की व्यक्तीला तो रोज येऊ शकतो किंवा बरेचदा… काही क्षण अतीव उत्साहाचे, उदात्त अभीप्सेचे असतात, जेव्हा व्यक्तीला अचानक स्वतःच्या दिव्य उद्दिष्टाची जाणीव होते, व्यक्तीला ‘ईश्वरा’प्रत एक आस असते, ईश्वरी कार्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा असते, व्यक्ती स्वतःमधून अतीव आनंदाने, अतीव ऊर्जेने बाहेर पडते… आणि नंतर, काही तासांतच, तीच व्यक्ती अगदी छोट्याछोट्या गोष्टींसाठी हीनदीन होऊन जाते, अगदी किरकोळ, अगदी संकुचित, अगदी सुमार दर्जाच्या, स्वार्थपरायण गोष्टींमध्ये लिप्त होऊन जाते, अगदी सुमार इच्छावासना बाळगते… आणि मग त्यापुढे त्या सगळ्या उदात्त भावना क्षणार्धात लुप्त होऊन जातात, इतक्या की जणूकाही त्या तिथे कधी अस्तित्वातच नव्हत्या. हे विरोधाभास तुमच्या अंगवळणी पडलेले असतात, तुम्ही त्याकडे लक्ष देत नाही आणि म्हणूनच या गोष्टी सख्खे-शेजारी असल्याप्रमाणे गुण्यागोविंदाने तुमच्यामध्ये वसती करून असतात. तुम्ही प्रथम या गोष्टी शोधल्या पाहिजेत आणि तुमच्या चेतनेमध्ये त्यांची सरमिसळ होण्यापासून त्यांना रोखले पाहिजे, प्रकाश कोणता आणि काळोख कोणता त्याचा निर्णय केला पाहिजे, त्यांना विलग केले पाहिजे. असे केल्यानंतर मग, व्यक्ती या काळोख्या भागापासून स्वतःची सुटका करून घेऊ शकते. (तिमिर जावो…. भाग समाप्त)

– श्रीमाताजी [CWM 06 : 263-264]