विचार शलाका – ३५

प्रश्न : ध्यानासाठी अत्यावश्यक अशी आंतरिक व बाह्य परिस्थिती कोणती?

श्रीअरविंद : मूलभूत अशी काही बाह्य परिस्थिती आवश्यक नसते, परंतु ध्यानाच्या वेळी एकांत व विलगपणा असेल आणि त्याचबरोबर शरीराची स्थिरता असेल, तर ध्यानासाठी या गोष्टींची मदत होते. नवोदितांसाठी या गोष्टी बऱ्याचदा अगदी आवश्यक असतात. परंतु बाह्य परिस्थितीमुळे व्यक्तीवर मर्यादा पडता कामा नयेत.

एकदा ध्यानाची सवय झाली की मग, कोणत्याही परिस्थितीत म्हणजे, पहुडलेले असताना, उठताबसता, चालताना, एकटे असताना किंवा इतर लोकांसमवेत असताना, शांततेमध्ये किंवा गोंगाटामध्ये कोणत्याही परिस्थितीत ध्यान साधता आले पाहिजे. मनाचे सैरावैरा भरकटणे, विसराळूपणा, निद्रा, शारीरिक आणि नसांची अधीरता, अशांती या साऱ्या ध्यानाच्या आड येणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी ‘संकल्पाची एकाग्रता’ ही आंतरिक परिस्थिती सर्वप्रथम महत्त्वाची आहे.

दुसरी आवश्यक परिस्थिती म्हणजे चढतेवाढते पावित्र्य आणि जेथून विचार आणि भावनांचा उदय होतो, त्या चित्ताची स्थिरता. म्हणजे राग, दुःख, निराशा, ऐहिक घटनांविषयीची चिंता या साऱ्या अडथळा निर्माण करणाऱ्या प्रतिक्रियांपासून चित्त मुक्त असले पाहिजे. मानसिक पूर्णत्व आणि नैतिकता या दोन्ही गोष्टी एकमेकींशी घनिष्ठपणे जोडलेल्या आहेत.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 295)

श्रीअरविंद