Tag Archive for: साधना

आत्मसाक्षात्कार – २४

(‘अतिमानव होणे म्हणजे काय’, ही संकल्पना श्रीअरविंदांनी येथे सुस्पष्ट करून सांगितली आहे. हा मजकूर दीर्घ असल्याने क्रमश: देत आहोत…)

परमेश्वराचे परिपूर्ण पात्र बनणे आणि दिव्य अतिमानव बनणे; हे तुमचे कार्य आहे आणि हे तुमच्या अस्तित्वाचे ध्येय आहे आणि त्याचसाठी तुम्ही इथे आहात. या व्यतिरिक्त इतर जे काही तुम्हाला करावे लागेल ते म्हणजे एकतर तुमची तयारी करून घेणे आहे किंवा तो मार्गावरील आनंद आहे; अन्यथा ते म्हणजे उद्देशापासून स्खलन, ध्येयच्युती आहे. या मार्गाच्या आधारे मिळणारी सत्ता वा शक्तिसामर्थ्य किंवा मार्गावरील आनंद हे तुमचे गंतव्य आणि प्रयोजन नसून, (परमेश्वराचे परिपूर्ण पात्र बनणे आणि दिव्य अतिमानव बनणे) हेच तुमचे गंतव्य आणि प्रयोजन आहे; त्या ध्येयपूर्तीच्या आनंदामध्ये तुमच्या अस्तित्वाची महानता आणि आनंद सामावलेला आहे. तुम्हाला मार्गावरील हा आनंद मिळत आहे कारण तुम्हाला ज्याचा वेध लागला आहे, तो (ईश्वर) देखील या मार्गावर तुमच्यासोबत आहे. तुम्ही तुमची सर्वोच्च शिखरे सर करावीत यासाठीच आरोहणाची शक्ती तुम्हाला प्रदान करण्यात आली आहे.

तुमचे काही कर्तव्य असेलच तर ते हेच आहे! तुमचे ध्येय काय असावे असे जर तुम्ही विचारत असाल, तर ते ध्येय हेच असावे. तुम्ही जर सुखाची अभिलाषा बाळगत असाल तर उपरोक्त गोष्टीइतका आनंद तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीत लाभणार नाही. कारण स्वप्नांचा आनंद असो, झोपेचा आनंद असो किंवा स्व-विस्मृतीचा आनंद असो, हे सारे आनंद खंडित वा मर्यादित असतात. पण उपरोक्त आनंद मात्र तुमच्या समग्र अस्तित्वाचा आनंद असतो. तुम्ही जर असे विचारत असाल की, माझे अस्तित्व काय आहे, तर ‘ईश्वर’ हेच तुमचे अस्तित्व आहे आणि इतर सर्वकाही ही त्याची केवळ खंडित वा विपर्यस्त रूपे आहेत. तुम्ही जर ‘सत्य’ शोधू पाहात असाल, तर ते ‘सत्य’ हेच आहे. सातत्याने तेच तुमच्या दृष्टीसमोर असू द्या आणि सर्व गोष्टींमध्ये तुम्ही त्याच्याशीच एकनिष्ठ राहा. (क्रमश:)

श्रीअरविंद (CWSA 12 : 150)

आत्मसाक्षात्कार – १८

‘केवळ ईश्वराचा साक्षात्कार पुरेसा नाही’, असे जेव्हा मी म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की, असा साक्षात्कार चेतनेमध्ये चिरस्थायी परिवर्तन घडवून आणण्यासाठी पुरेसा नसतो. मानवी प्रकृतीमध्ये परिवर्तन घडवायचे असेल तर, त्यासाठी ‘ईश्वराच्या गतिशील शक्ती’च्या कार्याची आवश्यकता असते.

…‘ईश्वरी चेतना’ धारण करण्याची क्षमता सर्वच आधारांमध्ये, म्हणजे प्राकृतिक रचनांमध्ये नसते, हे खरे आहे आणि या प्राकृतिक साधनाची क्षमता वृद्धिंगत करण्याचा ते कोणता प्रयत्नही करत नाहीत. एकदा का तुम्ही त्या ईश्वरी चेतनेमधून खाली उतरलात की मग, तुम्ही अगदी एखाद्या सामान्य माणसासारखेच होऊन जाता. आणि म्हणून, जेव्हा ईश्वराचे अवतरण होते तेव्हा ते धारण करण्यासाठी म्हणून, व्यक्तीने स्वतःच्या प्राकृतिक साधनाच्या क्षमता, त्याच्या जटिलतेनिशी आणि बहुअंगांनिशी वृद्धिंगत करत नेण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे.

– श्रीअरविंद (Evening Talks with Sri Aurobindo : 349-350)

आत्मसाक्षात्कार – १७

(अहंकारापासून मुक्त होण्याचा एक मार्ग म्हणजे वासना-मुक्ती. परंतु हा मार्ग काहीसा कोरडा, रुक्ष आणि दूरवरचा आहे, अशी टिपण्णी श्रीमाताजींनी केली आहे आणि त्याच्या तुलनेत अधिक वेगवान मार्ग कोणता तो त्या सांगत आहेत.)

अहंकारापासून मुक्त होण्याची समस्या जर शारीरिकरित्या सोडवायची असेल तर धैर्य आणि निश्चय बाळगून (स्वत:ला) झोकून द्या. वासनांच्या मागे धावण्याचा दूरचा, दुष्कर, कष्टदायक आणि निराशाजनक मार्ग सोडून, व्यक्तीने साधेपणाने, संपूर्णतया, कोणत्याही अटी न लादता जर त्या ‘परमोच्च सत्या’प्रत, ‘परमोच्च संकल्पशक्ती’प्रत, ‘परमपुरुषा’प्रत स्वत:ला समर्पित केले; अस्तित्वाच्या सर्व अंगांनिशी जर स्वत:चे संपूर्ण अस्तित्व, संपूर्णतया ‘त्या’च्या हाती सोपविले, तर अहंकारापासून सुटका करून घेण्याचा तो सर्वात वेगवान आणि क्रांतिकारी मार्ग आहे.

लोकं म्हणतील की, हा मार्ग आचरणात आणणे खूप अवघड आहे. परंतु या मार्गात एक प्रकारची ऊब आहे, उत्कटता आहे, उत्साह आहे, प्रकाश आहे, सौंदर्य आहे, उत्कट आणि सर्जनशील जीवन आहे.

…संपूर्ण, समग्र, परिपूर्ण, नि:शेष आणि कोणत्याही अटीविना जे आत्मदान केले जाते, त्यालाच मी सकारात्मक मार्ग (positive way) म्हणते.

फक्त स्वत:साठी न जगता, स्वत:शी निगडित असे काहीही न ठेवता आणि स्वत:चा विचार न करता, सर्वाधिक सुंदर, तेजोमय, आनंदमय, शक्तिवान, करुणामय, अनंत असे जे काही आहे केवळ त्याचाच विचार करणे, त्या विचारांमध्ये निमग्न राहणे यामध्ये इतका अगाध आनंद आहे की, त्याची तुलना दुसऱ्या कशाशीच करता येऊ शकत नाही. ही एकच गोष्ट अर्थपूर्ण आहे, प्रयत्न करून पाहण्यायोग्य आहे. इतर सर्व गोष्टी म्हणजे निव्वळ कालापव्यय असतो. वळणावळणाच्या रस्त्याने, धीम्या गतीने, कष्टपूर्वक, टप्याटप्प्याने वर्षानुवर्षे पर्वत चढत जाणे (पिपीलिका मार्ग) आणि अदृश्य पंख पसरवून, थेट शिखराकडे झेपावणे (विहंगम मार्ग) यामध्ये जो फरक आहे तो येथे आहे.

– श्रीमाताजी (CWM 03 : 268-269)

आत्मसाक्षात्कार – १५

साधक : आम्ही जेव्हा कोणताही एखादा प्रयत्न करतो, तेव्हा आमच्यामध्ये असे काहीतरी असते की, ते लगेचच स्वत:वर खूष होऊन जाते, बढाया मारू लागते आणि एवढ्या-तेवढ्या प्रयत्नांनीच संतुष्ट होऊन जाते आणि परिणामी सारे काही बिघडून जाते. तेव्हा यापासून सुटका कशी करून घ्यायची?

श्रीमाताजी : आपण जेव्हा काहीतरी करत असतो तेव्हा आपल्यातीलच कोणीतरी त्यावर सदोदित लक्ष ठेवत असतो, निरीक्षण करत असतो. आणि मग कधीकधी तो गर्वाने फुलून जातो. तेव्हा साहजिकच, आपल्या प्रयत्नांमधील सामर्थ्य पुष्कळ प्रमाणात कमी होते.

काम करत असताना, जीवन जगत असताना व्यक्तीला स्वत:चे निरीक्षण करण्याची सवय असते. स्वत:चे निरीक्षण केलेच पाहिजे; परंतु त्याहूनही अधिक आवश्यक असते ते संपूर्णपणे प्रामाणिक राहण्याचा व सहजस्वाभाविक असण्याचा प्रयत्न करणे. व्यक्ती जे काही करत असते त्याबाबत ती अगदी सहजस्वाभाविक असली पाहिजे; म्हणजे व्यक्तीने सतत स्वत:चे निरीक्षण करत राहणे, स्वत:ला जोखत राहणे, स्वत:चे मूल्यमापन करत राहणे, कधीकधी तर खूपच कठोरपणे मूल्यमापन करणे, असे करू नये. खरेतर, स्वत:वरच खुश होऊन स्वत:चीच पाठ थोपटून घेणे जितके वाईट, तितकीच ही गोष्टदेखील वाईट असते; या दोन्हीही गोष्टी सारख्याच घातक असतात.

व्यक्ती अभीप्सेबाबत (aspiration) इतकी प्रामाणिक असली पाहिजे की, तिला आपण अभीप्सा बाळगत आहोत हेदेखील कळता कामा नये; जणू काही ती स्वत:च अभीप्सा बनून राहिली पाहिजे. जेव्हा हे खरोखर प्रत्यक्षात उतरेल तेव्हा व्यक्तीने खऱ्या अर्थाने काही असामान्य शक्ती प्राप्त केलेली असेल.

…व्यक्ती जेव्हा स्व-केंद्रित राहात नाही, ती म्हणजे काम करत असताना स्वत:कडे पाहणारा अहंकार असत नाही, तर व्यक्ती स्वत: ती कृतीच बनून जाते, त्याही पलीकडे जात, ती स्वत:च एक अभीप्सा बनून जाते तेव्हा, ते खरोखर चांगले असते. म्हणजे जेव्हा अभीप्सा बाळगणारी व्यक्ती म्हणूनसुद्धा ती शिल्लक राहत नाही, तर ती व्यक्ती म्हणजे स्वयमेव अभीप्साच बनून जाते आणि जेव्हा अशी व्यक्ती संपूर्ण एकाग्र अशा आवेगाने (ईश्वराप्रत) झेपावते तेव्हा ती खरोखरच खूप प्रगत होते. अन्यथा, नेहमीच एक प्रकारची क्षुद्र स्व-संतुष्टता, क्षुद्र आत्मप्रौढी आणि स्वत:बद्दलची कीव अशा सर्व प्रकारच्या गोष्टींचा व्यक्तीमध्ये शिरकाव होतो आणि सारे काही बिघडून जाते. अवघड असते हे सारे!

– श्रीमाताजी (CWM 06 : 402)

आत्मसाक्षात्कार – १२

(प्राणाच्या पृथगात्मतेविषयीचा (individualised) विचार आपण काल केला. आज आपण मनाच्या पृथगात्मतेविषयी श्रीमाताजी काय सांगत आहेत ते समजावून घेऊ.)

तुम्हाला जर स्वयमेव तुमच्या शारीर-मनाची (physical mind) जाणीव झाली तर… बरेच जणं त्याला ‘चव्हाटा’ (public square) असे संबोधतात, कारण तेथे प्रत्येक गोष्ट असते, तेथून प्रत्येक गोष्ट जात असते, पुन्हा परतून येत असते… सर्व संकल्पना तेथे (मनामध्ये) जातात, त्या एका जागी प्रवेश करतात, दुसरीकडून बाहेर पडतात. काही इथे असतात, काही तिथे असतात. अशा रितीने मन म्हणजे जणू एक चव्हाटाच असतो. त्यामध्ये कोणतीही सुव्यवस्था नसते आणि त्यामुळे बहुधा संकल्पना तिथे एकत्र येतात, एकमेकांवर आदळतात आणि मग सर्व तऱ्हेचे गोंधळ उडतात.

परंतु मग कधीतरी एखाद्या दिवशी व्यक्ती सजग होते आणि विचार करू लागते की, ‘माझं मन’ असे मी कशाला बरं म्हणू शकेन? किंवा ‘माझं मन’ म्हणजे काय? व्यक्तीला स्वतःच्या पद्धतीने विचार करायलादेखील अनेक वर्षं लागतात. ही एक साधीशी गोष्ट करण्यामध्ये यशस्वी होण्यासाठी अनेक वर्षं सजगतेने, अतिशय काळजीपूर्वक, अगदी सयुक्तिक, अतिशय सुसंगत असे काम करावे लागते; सुव्यवस्था लावावी लागते, निवड करावी लागते, घडण करावी लागते. व्यक्तीला असे वाटत असते की, माझी माझी स्वतःची अशी एक विचारसरणी आहे, पण असे अजिबात नसते.

व्यक्ती ज्या लोकांशी संवाद साधत असते, ती जी पुस्तके वाचत असते आणि तिची जी काही मनोवस्था (mood) असते त्यावर ती पूर्णतः अवलंबून असते. तुमचे पचन व्यवस्थित झाले आहे की तुम्हाला अपचन झाले आहे; खुली हवा नसलेल्या एका खोलीत तुम्ही स्वतःला बंदिस्त करून घेतले आहे की, तुम्ही स्वच्छ मोकळ्या हवेत आहात; तुमच्या नजरेसमोर एखादे सुंदर दृश्य आहे, स्वच्छ सूर्यप्रकाश आहे की पाऊस पडत आहे, अशा सगळ्या गोष्टींवर तुमचे त्या त्या वेळचे विचार अवलंबून असतात. आणि तुम्हाला त्याची जाणीवसुद्धा नसते. तुमच्याशी संबद्ध नसलेल्या, पूर्णपणे असंबद्ध अशा ढिगभर गोष्टींचा तुम्ही विचार करत राहता. मात्र एक सुव्यवस्थित, सुसंगत, तर्कसंगत विचारसरणी तयार होण्यासाठी बारकाईने तपशिलवार, प्रदीर्घ काम करण्याची आवश्यकता असते.

यामधील गमतीचा भाग असा की, जेव्हा तुम्ही अशा तऱ्हेची एक सुंदर, सुरचित, सशक्त, शक्तिशाली मानसिक रचना घडविण्यामध्ये यशस्वी होता, नेमकी तेव्हाच तुम्हाला पहिली गोष्ट सांगण्यात येते ती अशी की, “तुम्हाला ईश्वराशी ऐक्य पावण्यासाठी सक्षम व्हायचे असेल तर, या सर्व मानसिक रचना तुम्ही मोडून काढल्या पाहिजेत.” (अर्थात हेही तितकेच सत्य आहे की,) जोपर्यंत तुम्ही ती रचना घडवलेली नसते, तोपर्यंत तुम्ही ईश्वराशी एकरूपही होऊ शकत नाही कारण तोपर्यंत तुम्ही म्हणजे नुसता एक वस्तुंचा ढिगारा असता, तुम्ही ‘तुम्ही’ नसता आणि त्यामुळे त्या वस्तुंच्या ढिगाऱ्याखेरीज ईश्वराला देण्यासारखे तुमच्यापाशी काहीच नसते. आत्मदान करता येण्यापूर्वी व्यक्ती आधी स्वतंत्रपणे अस्तित्वात असली पाहिजे. मी (प्राणाबाबतीत) जे सांगितले तेच मी आत्ता पुन्हा येथे (मनाबाबत) सांगितले. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 06 : 258-259)

तुमचे आध्यात्मिक परिवर्तन व प्रगती हीच तुमच्यासाठी महत्त्वाची असली पाहिजे आणि त्यासाठी, तुमच्यासोबत असणाऱ्या श्रीमाताजींच्या शक्तीवर आणि त्यांच्या कृपेवरच पूर्णतः विश्वास ठेवा. कोणत्याही गोष्टींमुळे किंवा लोकांमुळे तुम्ही अस्वस्थ होऊ नका. कारण तुमच्या अंतरंगातील सत्याशी आणि श्रीमाताजींच्या चेतनेच्या पूर्ण प्रकाशाच्या दिशेने चाललेल्या तुमच्या वाटचालीपुढे या गोष्टी अगदी नगण्य आहेत.

*

श्रीमाताजी हे ध्येय आहे, (कारण) सारेकाही त्यांच्यामध्येच सामावलेले आहे. त्यांची कृपा प्राप्त झाली की सारे प्राप्त झाल्यासारखेच आहे. तुम्ही जर श्रीमाताजींच्या चेतनेमध्ये राहिलात तर अन्य सारेकाही स्वतःहूनच उलगडत जाईल.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 397)

अस्वस्थतेपासून सुटका करून घेण्यासाठी श्रीमाताजींकडे प्रत्यक्ष येण्याची आवश्यकता नाही आणि ते उपयोगाचे देखील नाही. तुम्ही आंतरिकरित्या त्यांच्या आश्रयाला गेले पाहिजे आणि चुकीची वृत्ती टाकून दिली पाहिजे.

त्यांना प्रत्यक्ष भेटायला येण्यामुळे, तुम्ही चूक करायची आणि ती दुरूस्त करण्यासाठी श्रीमाताजींकडे यायचे अशी सवयच तुम्हाला लागण्याची शक्यता असते. आणि त्यातून आणखी एक चुकीची गोष्ट घडण्याची शक्यता असते; ती म्हणजे, अंतरंगातून, मुळातून ती चुकीची गोष्ट सोडून देण्याऐवजी आणि ती त्यांना समर्पित करण्याऐवजी, तुम्ही ती चुकीची गोष्ट त्यांच्यावर सोपवून मोकळे होण्याची शक्यता असते. येथे एका सर्वसमावेशक समर्पणाची आवश्यकता असते. असे समर्पण करता आले तर, किरकोळ गोष्टींवरून अस्वस्थता, अहंकार, स्वतःच्या दृष्टिकोनावर अतिरिक्त भर, राग या गोष्टींना आळा बसतो.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 499-500)

श्रीमाताजी या अनंतरूपधारिणी आहेत हे खरे आहे, पण आंतरिक रूपातील श्रीमाताजी आणि दृश्य रूपातील श्रीमाताजी यांच्यामध्ये फार फरक करता कामा नये. कारण केवळ दृश्यरूपात दिसणाऱ्या श्रीमाताजीच तेवढ्या अस्तित्वात आहेत असे नाही तर, त्यांच्यामध्येच त्यांची इतर अनेक रूपं सामावलेली आहेत आणि त्यांच्यामध्येच आंतरिक अस्तित्व व बाह्य अस्तित्व यांच्यामधील सुसंवाद प्रस्थापित झालेला आहे.

परंतु दृश्य रूपातील श्रीमाताजींना खऱ्या अर्थाने जाणून घेण्यासाठी, व्यक्तीने केवळ त्यांच्या बाह्य रूपाकडे पाहता कामा नये तर, त्यांच्या अंतरंगामध्ये काय आहे हे जाणून घेतलेच पाहिजे. व्यक्ती जर त्यांना अंतरंगाद्वारे भेटेल आणि त्यांच्या चेतनेमध्ये वृद्धिंगत होईल तरच हे जाणणे शक्य होते. जे कोणी त्यांच्याशी फक्त बाह्यतः नाते ठेवू पाहतात त्यांना ते समजणे शक्य नाही.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 483)

वैश्विक ‘ईश्वरी प्रेम’ सर्वांसाठी समानच असते. त्याचबरोबर व्यक्तिगत असणारा असा एक आंतरात्मिक अनुबंधदेखील (psychic connection) असतो. मूलतः तोदेखील सर्वांसाठी समानच असतो, पण त्यामध्ये प्रत्येकाशी असलेल्या विशेष नात्याला मुभा असते, आणि हे नाते मात्र सर्वांसाठी समान नसते, तर ते प्रत्येक व्यक्तिगणिक भिन्नभिन्न असते. आणि त्याचे त्याचे स्वतःचे असे स्वतंत्र स्वरूप असते, ते त्याच्याच पद्धतीचे असते आणि त्याची इतरांशी तुलना करता येत नाही. इतर नात्यांशी तुलना करता ते तसेच असावे किंवा तोलूनमापून, संतुलित असावे अशी अपेक्षा इथे बाळगता येत नाही कारण ते प्रत्येक नाते अगदी स्वतंत्र असते.

…श्रीमाताजींचे प्रेम व्यक्तीला जाणवेल किंवा नाही हे ती व्यक्ती त्यांच्याप्रति खुली आहे किंवा नाही यावर अवलंबून असते, ती व्यक्ती भौतिकदृष्ट्या त्यांच्यापासून किती जवळ वा दूर आहे यावर ते अवलंबून नसते. आंतरिक नात्याबद्दल व्यक्तीला ज्या ज्या गोष्टी अचेत, जाणीवरहित (unconscious) बनवितात त्या गोष्टी तिने स्वतःमधून काढून टाकणे म्हणजे खुलेपणा (Openness). व्यक्तीला अंतरंगामध्ये जे नाते जाणवते त्याऐवजी त्या नात्याच्या बाह्याविष्करणाद्वारे त्याचे मोजमाप करणे, या संकल्पनेइतकी अन्य कोणतीच संकल्पना व्यक्तीला अचेत बनवीत नाही; (इतकेच नव्हे तर) या संकल्पनेमुळे, आंतरिक नात्याचे जे काही बाह्य आविष्करण दिसून येत असते त्याबद्दलही व्यक्ती अंध किंवा असंवेदनशील बनते. व्यक्ती श्रीमाताजींपासून भौतिकदृष्ट्या दूर अंतरावर असली किंवा ती त्यांना क्वचितच भेटत असली तरीही व्यक्तीला ते नाते जाणवते; उलट व्यक्ती भौतिकदृष्ट्या त्यांच्याजवळ असूनही किंवा ती नेहमी श्रीमाताजींच्या प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये वावरत असली तरीदेखील, म्हणजे असे नाते असूनसुद्धा ते त्या व्यक्तीला न जाणवण्याची शक्यता असते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 507-508)

‘अतिमानसिक साक्षात्कार’ (supramental realization) हे आपले उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी जे करणे आवश्यक आहे ते आपण केले पाहिजे किंवा प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक परिस्थितीत, त्या साक्षात्काराकडे घेऊन जाणारे जे काही आहे ते आपण केले पाहिजे. शारीरिक चेतनेची तयारी करणे ही सद्यकालीन आवश्यकता आहे; आणि त्यासाठी संपूर्ण समता व शांती आणि वैयक्तिक मागण्या किंवा इच्छा यांपासून मुक्त असणारे शारीरिक व कनिष्ठ प्राणिक भागांमधील संपूर्ण समर्पण या गोष्टी प्रस्थापित करण्याची आवश्यकता आहे. इतर सर्व गोष्टी त्यांच्या योग्य वेळी येऊ शकतील. शारीरिक समीपता ही त्या इतर गोष्टींपैकीच एक गोष्ट आहे, आत्ता त्याचा अट्टहास करण्याची खरंतर गरज नाही, मात्र शारीरिक चेतनेमध्ये आंतरात्मिक खुलेपण (psychic opening) आणि तेथे श्रीमाताजींची उपस्थिती व त्यांचे मार्गदर्शन यांची सध्या खरी आवश्यकता आहे.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 491-492)