Posts

साधना, योग आणि रूपांतरण – ३०९

रूपांतरण

(व्यक्ती स्वतःला हस्तिदंती मनोऱ्यामध्ये बंदिस्त करून घेऊ शकत नाही. हे मानसिक स्तरावर कसे व का अवघड असते ते कालच्या भागात पाहिले.)

तुम्ही केलेले काम शंभर वेळा बिघडेल, तुम्ही एकशे एक वेळा ते पुन्हा कराल. ते काम हजार वेळा होत्याचे नव्हते होईल, तरीसुद्धा तुम्ही ते पुन्हा एकदा कराल आणि मग एक वेळ अशी येईल की जेव्हा ते ’होत्याचे नव्हते’ होणार नाही.

व्यक्ती जर एकाच घटकाने बनलेली असती तर मग हे सोपे झाले असते. पण व्यक्ती अनेक घटकांनी मिळून बनलेली असते. आणि त्यामुळे असे होते की, अग्रभागी असणारा असा एखादा घटक असतो, त्याने (अमुक एका गोष्टीमध्ये सुधारणा होण्यासाठी) खूप परिश्रम केलेले असतात, तो खूप सचेत असतो आणि नेहमी जागरूक असतो आणि तो जेव्हा सक्रिय असतो तेव्हा सारे काही सुरळीत चाललेले असते; म्हणजे तेव्हा व्यक्ती स्वतःमध्ये कोणत्याही विरोधी गोष्टींना प्रवेश करू देत नाही, तेव्हा ती अगदी सजग असते आणि मग… व्यक्ती झोपी जाते, आणि दुसऱ्या दिवशी जागी होते तेव्हा आता दुसराच एखादा घटक सक्रिय झालेला असतो आणि मग व्यक्ती स्वतःच्या मनाशी म्हणते, “पण मी कालपर्यंत केलेल्या कामाचे काय झाले, ते सगळे काम कुठे गेले?”… आणि मग व्यक्तीला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी लागते.

सर्व घटकांना चेतनेच्या क्षेत्रामध्ये नेऊन, त्या सर्व घटकांमध्ये एक एक करून, जोवर परिवर्तन होत नाही तोपर्यंत व्यक्तीला पुन्हा पुन्हा अशी नव्याने सुरुवात करावी लागते. आणि मग जेव्हा तुमच्या परिश्रमांची परिसीमा होते तेव्हा मग परिवर्तन घडून येते, आता तुम्ही प्रगतीचा एक टप्पा पार केलेला असतो. नंतर पुन्हा, प्रगतीचा पुढचा टप्पा गाठण्यासाठी तुम्हाला स्वतःला तयार करावे लागते. पण तरीही तोवर निदान एक टप्पा तरी पार पडलेला असतो. अशा रीतीने व्यक्तित्वाचे सर्व घटक जेव्हा एका पाठोपाठ एक या पद्धतीने पृष्ठभागावर आणले जातात आणि तुम्ही जोपर्यंत त्या सर्व घटकांवर अगदी निरपवादपणे, चेतना, इच्छा आणि तुमचे ध्येय यांचा प्रकाश टाकत नाही तोपर्यंत हे असे करत राहावे लागते. सर्व गोष्टींमध्ये परिवर्तन होईल अशा पद्धतीने तुम्हाला हे करत राहावे लागते. आणि मग तेव्हा कुठे व्यक्तित्वाचे संपूर्ण रूपांतरण झालेले असते.

तुमचा उत्साहभंग करण्यासाठी मी हे सांगत नाहीये, पण मी तुम्हाला जाणीव करून देऊ इच्छिते. नंतर मग तुम्ही असे म्हणता कामा नये की, “मला हे इतके अवघड आहे हे आधी माहीत असते तर मी या गोष्टीची सुरुवातच केली नसती.” हे सारे अतिशय अवघड आहे हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. दृढ निश्चयाने प्रारंभ करा आणि जरी यामध्ये यश येण्यासाठी कितीही दूरवरची वाटचाल करावी लागली तरी ते पूर्णत्वास जाईपर्यंत कार्यरत राहा. त्यासाठी बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 04 : 333-334)

साधना, योग आणि रूपांतरण – ३०८

रूपांतरण

(व्यक्ती स्वतःला हस्तिदंती मनोऱ्यामध्ये बंदिस्त करून घेऊ शकत नाही. हे शारीरिकदृष्ट्या व प्राणिकदृष्ट्या कसे व का अवघड असते ते कालच्या भागात आपण पाहिले.)

मानसिकदृष्ट्या तर ही गोष्ट अधिकच वाईट असते. मानवी मन हे सर्व बाजूंनी उघड्या असणाऱ्या एखाद्या सार्वजनिक ठिकाणासारखे असते. तेथे सर्व बाजूंनी गोष्टी आत येत असतात, जात असतात, एकमेकींवर आदळत असतात आणि त्यातील काही गोष्टी तेथेच स्थिरस्थावर होतात आणि त्या काही नेहमीचांगल्या असतातच असे नाही. आणि अशा या अनेकविध गोष्टींवर नियंत्रण प्रस्थापित करणे हे सर्वात कठीण असते.

तुमच्या मनामध्ये प्रवेश करणाऱ्या विचारांवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करा, म्हणजे मी काय म्हणत आहे ते तुमच्या लक्षात येईल. किती काळजीपूर्वक राहावे लागते हे तेव्हा तुमच्या लक्षात येईल. एखाद्या पहारेकऱ्याप्रमाणे, डोळे टक्क उघडे ठेवून, तुम्हाला सतर्क राहावे लागते आणि तुमच्या अभीप्सेशी सुसंगत असणाऱ्या संकल्पना कोणत्या आणि विसंगत असणाऱ्या संकल्पना कोणत्या याविषयी तुम्हाला पूर्णपणे सुस्पष्टपणे जाण असावी लागते. कोणत्याही ऐऱ्यागैऱ्या व्यक्तींचा त्या सार्वजनिक ठिकाणी प्रवेश होऊ नये यासाठी, तुम्हाला एखाद्या पोलिसाप्रमाणे प्रत्येक क्षणी लक्ष ठेवून राहावे लागते.

आणि हे विसरू नका की, तुम्ही अगदी कितीही प्रामाणिकपणे प्रयत्न करत असाल तरीही या सर्व अडचणींचा शेवट एका दिवसात, एका महिन्यात किंवा एका वर्षात होणार नाहीये. व्यक्ती जेव्हा हे प्रयत्न करायला सुरुवात करते तेव्हा तिच्यामध्ये अविचल अशी सहनशीलता, चिकाटी (patience) असणे आवश्यक असते. व्यक्तीने असे म्हटले पाहिजे की, “हे करण्यासाठी मला पन्नास वर्षे लागली, शंभर वर्ष लागली किंवा कितीही वर्षे लागली तरी चालेल, पण मला जे साध्य करायचे आहे ते मी साध्य करेनच.”

एकदा का तुम्ही असा निर्धार केलात आणि तुम्ही निर्धारित केलेले उद्दिष्ट हे सतत व अथक परिश्रम घेण्यायोग्य आहे याची तुम्हाला जाणीव झाली असेल तर मग तुम्ही (रूपांतरणाच्या या प्रक्रियेस) आरंभ करू शकता.

अन्यथा, कालांतराने तुम्ही निराश होऊन जाल, तुमचा उत्साहभंग होईल. मग तुम्ही स्वतःच्या मनाशी म्हणाल, “बापरे! हे खूपच अवघड आहे. मी (अमुक एक गोष्ट करण्याचा) प्रयत्न करतो आणि ती पुन्हा ‘होत्याची नव्हती’ होते, मग मी पुन्हा प्रयत्न करतो, परत तसेच होते. मी पुन्हा एकवार (मनाचा हिय्या करून) प्रयत्न करतो आणि परत तसेच होत्याचे नव्हते होते. काय करावे? मी माझ्या उद्दिष्टापर्यंत कधी जाऊन पोहोचणार?” (आणि म्हणूनच) व्यक्तीकडे प्रचंड सहनशीलता, चिकाटी असली पाहिजे. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 04 : 333-334)

साधना, योग आणि रूपांतरण – ३०७

रूपांतरण

(रूपांतरणाची प्रक्रिया ही दीर्घकालीन प्रक्रिया असते. त्यामध्ये धीर, चिकाटी यांची कशी आवश्यकता असते ते श्रीमाताजी येथे समजावून सांगत आहेत. या प्रक्रियेस आरंभ करण्यापूर्वी व्यक्तीला त्यासंबंधी पुरेशी स्पष्ट कल्पना असणे आवश्यक आहे, असे त्यांच्या म्हणण्याचा भावार्थ दिसतो. हा संपूर्ण भाग मुळातूनच विचारात घ्यावा असा आहे. तो क्रमश: पाच भागांमधून देत आहोत.)

अन्नाशिवाय आपण जगू शकत नाही हे खरेतर आपले दुर्दैव आहे असे म्हटले पाहिजे. कारण त्या अन्नाबरोबर, आपण दररोज आणि सातत्याने मोठ्या प्रमाणात अचेतनता, तामसिकता, जडत्व आणि मूढता यांचेही ग्रहण करत असतो. आपण सातत्याने, पूर्णपणे, अखंड सजग राहिले पाहिजे आणि जेव्हा एखादा अन्नघटक आपल्या शरीरामध्ये ग्रहण केला जातो तेव्हा आपण लगेच त्यावर क्रिया करून, त्याच्यामधील प्रकाश तेवढा बाजूला काढला पाहिजे आणि आपल्या चेतनेला अंधकारमय करणाऱ्या त्यामधील साऱ्या गोष्टींचा आपण अस्वीकार केला पाहिजे.

अन्नग्रहण करण्यापूर्वी ईश्वराला नैवेद्य दाखविण्याची, अर्पण करण्याची जी धार्मिक प्रथा आहे त्याचे मूळ येथे आहे आणि हेच त्याचे तर्कशुद्ध स्पष्टीकरण आहे. अन्न ग्रहण करताना, ते अन्न आपल्या क्षुद्र अशा मानवी अहंकाराद्वारे ग्रहण केले जाऊ नये तर ते आपल्या अंतरंगातील ईश्वरी चेतनेला अर्पण केले जावे अशी आस व्यक्ती बाळगत असते. सर्व योगमार्गांमध्ये, सर्व धर्मांमध्ये याला महत्त्व दिले जाते. दररोज, सातत्याने, आपल्याही नकळत आपण अचेतनता शोषून घेत असतो, आणि त्याचे प्रमाण वाढवत नेत असतो, ते प्रमाण शक्य तितके कमी केले जावे यासाठी, त्या अन्नाच्या पाठीमागे असणाऱ्या चेतनेशी आपला संपर्क व्हावा, हे त्या प्रथेचे मूळ आहे.

प्राणाच्या बाबतीतही तसेच आहे. प्राणिक दृष्टया तुम्ही प्राणिक जगतामध्ये राहात असता. त्या जगतामधील प्राणिक शक्तीचे प्रवाह तुमच्या चेतनेमध्ये प्रवेश करत असतात, बाहेर जात असतात, ते एकमेकांशी मिळूनमिसळून राहात असतात तर, कधी परस्परांना विरोधही करत असतात. ते प्राणिक प्रवाह भांडत असतात, एकमेकांमध्ये मिसळत असतात. आणि जरी तुम्ही तुमची प्राणिक चेतना शुद्ध करण्याचा वैयक्तिक प्रयत्न केलात आणि त्या चेतनेमधील वासनात्म्यावर व क्षुद्र मानवी अहंकारावर प्रभुत्व मिळविण्याचा प्रयत्न केलात तरीही, तुम्ही ज्यांच्यासमवेत राहत असता त्यांच्याकडून आलेली सर्व विरोधी स्पंदने सुद्धा तुमच्याकडून अपरिहार्यपणे (तुमच्या नकळत) शोषून घेतली जातात. (कारण) व्यक्ती स्वतःला हस्तिदंती मनोऱ्यामध्ये बंदिस्त करून घेऊ शकत नाही.

शारीरिक दृष्टया असे करण्यापेक्षा प्राणिकदृष्ट्या तसे करणे अधिक अवघड असते आणि (त्यामुळेच) व्यक्ती स्वतःमध्ये सर्व प्रकारच्या गोष्टींचे ग्रहण करत असते. म्हणजे व्यक्ती जर सातत्याने पूर्णपणे जागरूक नसेल, सदैव सावध नसेल आणि आतमध्ये जे जे प्रवेश करत आहे त्यावर तिचे जर पुरेसे नियंत्रण नसेल, म्हणजे ती स्वतःच्या चेतनेमध्ये नको असलेल्या घटकांचा शिरकाव होऊ देत असेल तर, अशा व्यक्तीला तिच्या अवतीभोवती असणाऱ्या व्यक्तींकडून येणाऱ्या सर्व तऱ्हेच्या नकोशा स्पंदनाचा, सर्व लहानसहान अंधकारमय प्रतिक्रियांचा, सर्व कनिष्ठ गतिप्रवृत्तींचा, सर्व इच्छावासनांचा सतत संसर्ग होतो. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 04 : 333-334)

साधना, योग आणि रूपांतरण – ३०५

अचेतनाचे रूपांतरण

(साधना अचेतनापर्यंत [Inconscient] जाऊन पोहोचल्यामुळे साधकांमध्ये सर्वसाधारणपणे एक निरुत्साहाचे वातावरण दिसून येत आहे, असे निरीक्षण एकाने नोंदविले आहे, त्यावर श्रीअरविंदांनी दिलेले हे उत्तर…)

या साधकांच्या आंतरिक जीवनामध्ये अचेतनातून आलेल्या तामसिकतेमुळे एक प्रकारचा अडसर निर्माण झाला आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग त्यांना सापडत नाहीये, हेच तर दुखणे आहे. व्यक्तीने जर योग्य परिस्थिती व योग्य दृष्टिकोन बाळगला, आपल्याला नेमून दिलेल्या कामामध्ये आणि साधनेमध्ये जर रस घेतला तर ही अचडण निवळेल.

योग्य वृत्ती ठेवणे आणि हळूहळू किंवा शक्य असेल तर वेगाने, उच्चतर अभीप्सेचा प्रकाश व्यक्तित्वाच्या अचेतन भागामध्येसुद्धा उतरविणे हा यावरील उपाय आहे; म्हणजे परिस्थिती कशीही असली तरी, त्या भागालासुद्धा, योग्य संतुलन कायम ठेवता येईल. आणि मग अशा व्यक्तीला सूर्यप्रकाशित मार्ग (sunlit path) अशक्य वाटणार नाही.

• श्रीअरविंद (CWSA 31 : 618)

साधना, योग आणि रूपांतरण – ३०३

अचेतनाचे रूपांतरण

सद्यस्थितीत साधकांना भेडसावणारी गोष्ट म्हणजे परिवर्तनाची सार्वत्रिक अक्षमता! त्याचे कारण असे आहे की, साधना ही आता एक सार्वत्रिक तथ्य या दृष्टीने अचेतनापर्यंत (Inconscient) आलेली आहे. प्रकृतीचा जो भाग अचेतनावर थेटपणे अवलंबून असतो अशा भागामध्ये परिवर्तन करण्याचा आता दबाव आहे, आणि तशी हाक आलेली आहे. म्हणजे दृढमूल झालेल्या सवयी, आपोआप घडणाऱ्या हालचाली, प्रकृतीची यांत्रिक पुनरावृत्ती, जीवनाला दिलेल्या अनैच्छिक, प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया, या साऱ्या गोष्टी मनुष्याच्या व्यक्तिमत्त्वाचा एक स्थायी, अपरिवर्तनीय भाग असल्यासारख्या दिसतात. समग्र आध्यात्मिक परिवर्तनाची शक्यता निर्माण होण्यापूर्वी या गोष्टींमध्ये परिवर्तन होण्याची आवश्यकता आहे. आणि ही गोष्ट शक्य व्हावी म्हणून ‘दिव्य शक्ती’ (व्यक्तिगत स्तरावर नव्हे तर, सार्वत्रिक स्तरावर) कार्यरत आहे. आणि हा दबाव त्याचसाठी आहे. कारण इतर स्तरांवर, हे परिवर्तन यापूर्वीच शक्य झालेले आहे. (आणि हे लक्षात ठेवा की या परिवर्तनाचे आश्वासन प्रत्येकाला देण्यात आलेले नाही.)

परंतु अचेतनास प्रकाशाप्रत खुले करणे हे भगीरथ-कार्य आहे; त्या मानाने इतर स्तरांवरील परिवर्तन हे अधिक सोपे होते. आणि अचेतनावरील हे कार्य आत्ताआत्ता कुठे सुरू झाले आहे आणि त्यामुळे वस्तुमात्रांमध्ये किंवा माणसांमध्ये कोणतेही कोणताही बदल दिसून येत नाहीये यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. हा बदल घाईने नाही, पण योग्य वेळी (निश्चितपणे) घडून येईल.

अनुभवादी गोष्टी ठीक आहेत पण मूळ प्रश्न असा की, अनुभवादींमुळे केवळ चेतना समृद्ध होते, त्यामुळे प्रकृतीमध्ये परिवर्तन होताना दिसत नाही. मनाच्या स्तरावर, जरी अगदी ब्रह्माचा साक्षात्कार झाला तरी तो अनुभवसुद्धा, काही अपवाद वगळता प्रकृतीस, ती जवळजवळ जिथे जशी आहे तशीच सोडून देतो. आणि म्हणूनच पहिली आवश्यकता म्हणून आम्ही चैत्य किंवा आंतरात्मिक रूपांतरणावर (psychic transformation) भर देत असतो. कारण त्यामुळे प्रकृतीमध्ये परिवर्तन घडते आणि त्याचे मुख्य साधन भक्ती, समर्पण इत्यादी असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 617)

साधना, योग आणि रूपांतरण – ३०२

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

अवचेतनाला (subconscient) प्रकाशाने भेदले पाहिजे आणि अवचेतन हे सत्याची आधारशिला तसेच योग्य संस्कारांचे आणि ‘सत्या’ला दिलेल्या योग्य शारीरिक प्रतिसादांचे भांडार झाले पाहिजे. नेमकेपणाने सांगायचे तर, असे झाल्यास ते अवचेतन म्हणून शिल्लकच राहणार नाही, तर अवचेतन हे उपयोगात आणता येईल अशा खऱ्या मूल्यांची एक प्रकारची पेढीच (bank) तयार झालेली असेल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 612)

साधना, योग आणि रूपांतरण – ३०१

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

साधक : व्यक्ती ज्याप्रमाणे स्वतःचे सचेत (conscious) विचार नियंत्रित करू शकते त्याप्रमाणे ती स्वतःच्या अवचेतनावर (subconscient) नियंत्रण मिळविण्यास शिकू शकते का?

श्रीमाताजी : विशेषतः शरीर जेव्हा निद्रिस्त असते तेव्हा व्यक्ती अवचेतनाच्या संपर्कात येते. स्वतःच्या रात्रींविषयी सचेत झाल्यामुळे अवचेतनावर नियंत्रण मिळविणे अधिक सोपे होते. पेशी जेव्हा त्यांच्यामधील ‘ईश्वरा’विषयी सचेत होतात आणि त्या स्वेच्छेने ‘त्याच्या’ प्रभावाप्रत खुल्या होतात तेव्हा हे नियंत्रण सर्वांगीण होऊ शकते. गेल्या वर्षी (१९६९) या पृथ्वीवर जी चेतना अवतरित झाली होती ती चेतना या गोष्टीसाठीच कार्य करत आहे. हळूहळू शरीराच्या अवचेतनाच्या यांत्रिकतेची जागा ‘ईश्वरी उपस्थिती’च्या चेतनेने घेतली जात आहे आणि ती चेतना आता शरीराच्या संपूर्ण क्रियाकलापांवर शासन करू लागली आहे.

– श्रीमाताजी (CWM 14 : 365)

साधना, योग आणि रूपांतरण – ३००

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

साधक : अवचेतनाने (subconscient) उच्चतर चेतनेचा स्वीकार केला आहे का?

श्रीमाताजी : अवचेतनाने उच्चतर चेतनेचा स्वीकार केला असता, तर ते अवचेतन या रूपात शिल्लकच राहिले नसते, तर ते स्वयमेव चेतना बनले असते. मला वाटते तुम्हाला असे विचारायचे आहे की, अवचेतनाने उच्चतर चेतनेचा आधिपत्य आणि कायदा मान्य केला आहे का? ही गोष्ट समग्रतया झालेली नाही कारण अवचेतन ही प्रचंड आणि जटिल अशी गोष्ट आहे; मानसिक अवचेतन, प्राणिक अवचेतन, जडभौतिक अवचेतन आणि शारीरिक-अवचेतन अशा प्रकारच्या अवचेतना असतात. आपल्याला या अवचेतनाच्या अज्ञानी आणि जड प्रतिकाराला अंशाअंशाने बाहेर काढायचे आहे.

– श्रीमाताजी (CWM 14 : 363-364)

*

जेव्हा मन निःस्तरंग, नीरव होते तेव्हाच अवचेतन रिक्त होऊ शकते. त्यासाठी काय केले पाहिजे? तर, अवचेतनामधून सर्व जुन्या अज्ञानी अ-योगिक, योगसुसंगत नसलेल्या गोष्टी बाहेर काढून टाकल्या पाहिजेत.

*

(तुमच्यामधील) अवचेतन प्रांत जर रिकामा झाला असेल तर त्याचा अर्थ असा की, आता तुम्ही सामान्य चेतनेच्या पलीकडे गेला आहात आणि स्वयमेव अवचेतन हे ‘सत्या’चे साधन होण्यासाठी सुसज्ज झाले आहे.

*

जोपर्यंत अगदी अवचेतनापर्यंत, पूर्णपणे आणि समग्रतया, अतिमानसिक परिवर्तन होत नाही तोपर्यंत व्यक्तीच्या या ना त्या भागावर कनिष्ठ प्रकृतीचा ताबा राहणारच.

– श्रीअरविंद (SABCL 24 : 1594), (CWSA 31 : 611 & 595)

साधना, योग आणि रूपांतरण – २९९

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

तुमचे सध्या शारीर-चेतनेवर (physical consciousness) कार्य चालू असल्यामुळे, सर्व जुने संस्कार एकत्रितपणे उफाळून वर आले आहेत आणि ते तुमच्या चेतनेवर चाल करून आले असावेत. हे जुने संस्कार सहसा अवचेतनामध्ये शिल्लक असतात आणि वेळोवेळी पृष्ठभागावर येत असतात आणि दरम्यानच्या काळामध्ये विचार, कृती आणि भावभावना यांच्यावर नकळतपणे प्रभाव टाकत असतात.

साधकाला ते दिसावेत आणि त्याने त्यास नकार द्यावा आणि साधकाने आपल्या सचेत आणि अवचेतन भागांमध्ये दडलेल्या शारीरिक भूतकाळापासून स्वतःची पूर्णपणे सुटका करून घ्यावी यासाठी ते अशा रीतीने पृष्ठभागावर येत असतात.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 603)

साधना, योग आणि रूपांतरण – २९८

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

अवचेतनामध्ये (subconscient) प्रवेश करणाऱ्या आणि परिवर्तन करणाऱ्या प्रकाशाचे काही पहिलेवहिले परिणाम पुढीलप्रमाणे असतात –

१) अवचेतनामध्ये काय दडलेले आहे ते आता अधिक सहजतेने अवचेतनाकडून दाखविले जाते.

२) अवचेतनामधून पृष्ठभागावर येणाऱ्या गोष्टींचा स्पर्श चेतनेला होण्यापूर्वी किंवा त्यांचा परिणाम चेतनेवर होण्यापूर्वीच त्या गोष्टींची मनाला जाणीव होते.

३) आता अवचेतन हे अज्ञानी व अंधकारमय गतिप्रवृत्तींचे आश्रयस्थान राहत नाही तर, आता उच्चतर चेतनेला जडभौतिकाकडून अधिक आपसूकपणे प्रतिसाद मिळू लागतो.

४) विरोधी शक्तींच्या सूचनांना अवचेतन आता अधिक उघडपणे सामोरे जाते आणि त्या सूचनांना वाव देण्याचे प्रमाणही कमी होते.

५) निद्रेमध्ये सचेत राहणे आता अधिक सहजसोपे होते आणि स्वप्नांमध्ये अधिक उच्च प्रकारचे अनुभव येऊ शकतात. विरोधी स्वप्नं पडली तर, म्हणजे उदाहरणार्थ, स्वप्नांमध्ये कामुक सूचना आल्या तर त्यांचा तिथेच सामना करता येतो आणि अशी स्वप्नं थांबविता येतात आणि स्वप्नदोषासारखा परिणामदेखील थांबविता येतो.

६) झोपण्यापूर्वी स्वप्नावस्थेवर एक जागृत संकल्प केंद्रित करणे अधिकाधिक परिणामकारक ठरते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 612)