Tag Archive for: समर्पण

विचार शलाका – १९

‘ईश्वराला समर्पण’ या भावाने केलेल्या कार्यामधून चेतनेचा सर्वोत्तम विकास घडून येतो.

*

आळस आणि निष्क्रियता ह्या बाबींचा परिणाम म्हणजे तमस. त्यातून व्यक्ती अचेतनतेमध्ये जाऊन पडते आणि ती गोष्ट प्रगती व प्रकाशाच्या पूर्णपणे विरोधी असते. अहंकारावर मात करणे आणि केवळ ‘ईश्वर’सेवेमध्ये जीवन व्यतीत करणे, हा ‘सत्यचेतना’ प्राप्त करून घेण्याचा निकटतम व आदर्श असा मार्ग आहे.

*

तुमच्यामध्ये जोपर्यंत दुसऱ्यांविषयी आपपर भाव शिल्लक असतो तोवर निश्चितपणे तुम्ही ‘सत्या’च्या परिघाबाहेर असता. तुम्ही तुमच्या हृदयात नित्य सद्भाव आणि प्रेमभाव जतन केला पाहिजे. आणि त्यांचा प्रगाढ शांतीने आणि समतेने सर्वांवर वर्षाव होऊ द्यावा.

*

जोपर्यंत जुन्या सवयी आणि पूर्व-समजुती यांना छेद दिला जात नाही, तोपर्यंत भविष्याप्रत वेगाने पुढे सरसावण्याची फारशी आशा बाळगता येणार नाही.

*

समाधान हे बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसून आंतरिक अवस्थेवर अवलंबून असते.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 211), (CWM 13 : 212), (CWM 13 : 191), (CWM 15 : 197), (CWM 14 : 215)

विचार शलाका – १३

तुमच्यामध्ये एक इच्छा असते आणि ती तुम्ही अर्पण करू शकता. आपल्या रात्रींविषयी जागरूक होण्याच्या इच्छेचे उदाहरण घेऊया. जर तुम्ही निष्क्रिय समर्पणाचा दृष्टिकोन स्वीकारलात तर तुम्ही म्हणाल, “मी जेव्हा जागरूक बनावे अशी ‘ईश्वरा’ची इच्छा असेल तेव्हा मी जागरूक होईन.” दुसऱ्या बाजूने, जर तुम्ही तुमची इच्छा ‘ईश्वरा’ला समर्पित कराल तर तुम्ही अशी इच्छा बाळगायला सुरुवात कराल आणि तुम्ही म्हणाल, “मी माझ्या रात्रींविषयी जागरूक होईन.” येथे तुम्ही, तसे व्हावे अशी इच्छा बाळगता, तुम्ही निष्क्रिय राहून नुसती वाट पाहत बसत नाही. “मी माझी इच्छा ‘ईश्वरार्पण’ करत आहे. मला माझ्या रात्रींविषयी जागरूक बनण्याची उत्कट इच्छा आहे, परंतु मला त्याचे ज्ञान नाही, ‘ईश्वरी’ संकल्पाद्वारे ते माझ्यामध्ये घडून यावे.” असा दृष्टिकोन जेव्हा तुम्ही बाळगता त्या वेळी समर्पण घडून येते. तुमची इच्छा ही स्थिरपणे कार्यरत असली पाहिजे, एखादी विशिष्ट कृती किंवा एखादी विशिष्ट गोष्ट हवी म्हणून नव्हे तर, तुम्हाला अंतिमतः जे ध्येय साध्य करून घ्यायचे आहे त्यावर तुमची सारी उत्कट अभीप्सा एकवटलेली असली पाहिजे. ही असते पहिली पायरी. जर तुम्ही दक्ष असाल, जर तुम्ही सावधचित्त असाल तर, तुम्हाला काय केले पाहिजे यासंबंधी प्रेरणा स्वरूपात एखादी गोष्ट निश्चितपणे उमगेल आणि मग मात्र तुम्ही त्या पद्धतीने ती गोष्ट केली पाहिजे. मात्र तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती अशी की, तुमच्या कृतीचे जे काही परिणाम असतील ते स्वीकारणे म्हणजे समर्पण. अगदी ते परिणाम तुम्ही जी अपेक्षा केली होती त्यापेक्षा वेगळे देखील असतील; पण त्यांचाही स्वीकार करणे म्हणजे समर्पण. या उलट दुसरीकडे, जर तुमचे समर्पण निष्क्रिय असेल तर तुम्ही काहीच करणार नाही, काही प्रयत्न करणार नाही, धडपड करणार नाही; तुम्ही सुखाने झोपी जाल आणि चमत्कार घडण्याची वाट पाहत राहाल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 19)

विचार शलाका – ११

अतिमानस योगाचा (पूर्णयोगाचा) पहिला शब्द ‘समर्पण’ हा आहे आणि त्याचा अंतिम शब्ददेखील ‘समर्पण’ हाच आहे. दिव्य चेतनेमध्ये उचलून घेण्यासाठी म्हणून, पूर्णत्वासाठी म्हणून आणि रूपांतरणासाठी म्हणून, व्यक्तीची त्या शाश्वत ‘दिव्यत्वा’प्रत आत्मदान करण्याची इच्छा, यापासून या ‘योगा’चा प्रारंभ होतो. आणि निःशेष आत्मदानामध्ये त्याची परिणती होते. कारण जेव्हा आत्मदान पूर्णत्वाला पोहोचते, तेव्हाच या योगाची पूर्णत्वदशा येते, तेव्हाच प्रकृतीचे रूपांतरण होणे, व्यक्तीला पूर्णत्वप्राप्ती होणे आणि अतिमानसिक ‘दिव्यत्वा’मध्ये समग्रतया उन्नत होणे, या गोष्टी घडून येतात.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 367)

साधनेची मुळाक्षरे – ०९

(अहंभावात्मक मानसिक कल्पना, धारणा यांची व्यर्थता स्पष्ट करताना श्रीअरविंद एका साधकाला उद्देशून लिहितात…)
दिव्य मातेच्या हाती तुम्ही तुमचे आत्मदान मुक्तपणे आणि सहजसाधेपणाने कधीच केलेले नाही, तुम्ही कधीच खरेखुरे समर्पण केलेले नाही. आणि अतिमानसिक ‘योगा’मध्ये यशस्वी होण्याचा तोच तर एकमेव मार्ग आहे. ‘योगी’ बनणे, ‘संन्यासी’ बनणे किंवा ‘तपस्वी’ बनणे हे येथील योगाचे उद्दिष्ट नाही. रूपांतरण हे उद्दिष्ट आहे, आणि तुमच्या स्वतःपेक्षा अनंतपटीने महान असणाऱ्या शक्तिद्वारेच हे रूपांतरण घडणे शक्य असते; खरोखर ‘दिव्य माते’चे जणू बालक झाल्यानेच केवळ हे रूपांतरण शक्य आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 143)

साधनेची मुळाक्षरे – ०८

विश्वामध्ये जे जे काही केले जाते, त्या सर्व कृतींमागे ‘ईश्वर’च त्याच्या ‘शक्ति’द्वारा विद्यमान असतो पण तो त्याच्या ‘योगमाये’ने झाकला गेलेला असतो आणि कनिष्ठ प्रकृतीमध्ये तो जे कार्य करतो ते ‘जिवा’च्या अहंकाराद्वारा करत असतो.

‘योगा’मध्ये ‘ईश्वर’ हाच ‘साधक’ आणि ‘साधना’देखील असतो; त्याचीच ‘शक्ती’ स्वतःच्या प्रकाश, सामर्थ्य, ज्ञान, चेतना आणि ‘आनंद’ यांच्या साहाय्याने आधारावर (मन, प्राण, शरीर यांच्यावर) कार्य करते आणि जेव्हा आधार त्या शक्तिप्रत उन्मुख होतो, तेव्हा या सर्व दिव्य शक्ती त्या आधारामध्ये ओतल्या जातात आणि त्यामुळे ‘साधना’ शक्य होते. परंतु जोपर्यंत कनिष्ठ प्रकृती सक्रिय असते, तोपर्यंत ‘साधका’च्या व्यक्तिगत प्रयत्नांची आवश्यकता असतेच.

हा आवश्यक असलेला व्यक्तिगत प्रयत्न म्हणजे अभीप्सा, त्याग आणि समर्पण अशी त्रिविध तपस्या होय.

अभीप्सा जागरुक, निरंतर आणि अविरत असली पाहिजे – मनामध्ये तोच संकल्प, अंत:करणात तोच ध्यास, प्राणतत्त्वाची त्यालाच संमती, भौतिक-शारीरिक चेतना व प्रकृती ग्रहणक्षम आणि लवचीक करण्याची तीव्र इच्छा अशा स्वरूपाची अभीप्सा पाहिजे.

कनिष्ठ प्रकृतीच्या सर्व गतिवृत्तींना नकार – मनाच्या कल्पना, मते, आवडीनिवडी, सवयी आणि रचना यांना नकार, की ज्यामुळे निश्चल-नीरव मनामध्ये खऱ्या ज्ञानाला पूर्ण मोकळी जागा मिळेल, – प्राणिक प्रकृतीच्या वासना, मागण्या, लालसा, संवेदना, आवेग, स्वार्थीपणा, गर्व, उद्धटपणा, कामुकता, लोभ, मत्सर, हेवेदावे, ‘सत्या’शी वैर यांचा त्याग, की ज्यामुळे निश्चल, विशाल, समर्थ आणि समर्पित अशा प्राणमय अस्तित्वामध्ये वरून खरी शक्ती आणि आनंद यांचा वर्षाव होईल – भौतिक-शारीरिक प्रकृतीची मूढता, संशय, अविश्वास, दिङ्मूढता, दुराग्रह, क्षुद्रता, आळस, परिवर्तन-विमुखता, तामसिकता यांचा त्याग, की ज्यामुळे सतत अधिकाधिक दिव्य होत जाणाऱ्या देहात प्रकाश, शक्ती आणि ‘आनंद’ यांचे खरे स्थैर्य प्रस्थापित होईल.

‘ईश्वर’ आणि त्याची ‘शक्ती’ यांना आपण आपल्या स्वत:चे, आपण जे काही आहोत आणि आपल्याजवळ जे काही आहे त्या सर्वाचे, चेतनेच्या प्रत्येक स्तराचे आणि आपल्या प्रत्येक स्पंदनाचे समर्पण केले पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 06)

ईश्वरी कृपा – ०७

व्यक्ती संपूर्ण समर्पणाच्या स्थितीत असेल आणि तिने स्वत:चे सर्वस्व समर्पित केले असेल, तिने जर त्या ईश्वरी ‘कृपे’स स्वत:ला देऊ केले असेल आणि त्या कृपेला जे योग्य वाटते ते तिने आपल्या बाबतीत करावे अशी त्या व्यक्तिची भावना असेल तर, ते अधिक चांगले! पण त्यानंतर मात्र “ईश्वरी कृपेने हे काय केले, ते का केले” असे प्रश्न तिला विचारता कामा नयेत. व्यक्तिने असे म्हणता कामा नये की, “मला असे होईल असे वाटले होते, म्हणून मी असे असे केले,” कारण व्यक्तिला खरोखरच काहीतरी हवे असेल आणि त्या भावनेने साद घालायची असेल तर जे काही हवे, जसे काही हवे ते अगदी साधेपणाने, प्रामाणिकपणाने शब्दांत मांडणे केव्हाही चांगले. त्यानंतर, ईश्वरी ‘कृपा’ तसे करायचे किंवा नाही ते ठरवेल; पण कोणत्याही परिस्थितित, व्यक्तिने तिला काय अपेक्षित आहे ते स्पष्टपणे मांडणे केव्हाही चांगले ; त्यात काही गैर नाही.

जेव्हा केलेली मागणी मान्य केली जात नाही आणि अशा वेळी व्यक्ती बंड करून उठते तेव्हा मात्र गोष्टी बिघडून जातात. तेव्हा अर्थातच सारे काही बिनसते. आणि हाच तो क्षण असतो जेव्हा व्यक्तिने समजून घेतले पाहिजे की, तिची जी इच्छा असते, अभीप्सा असते, ती नेहमीच प्रबुद्ध असेल असे नाही. तसेच त्या व्यक्तिसाठी जे हितावह होते त्याचीच तिने मागणी केलेली असेल, असेही नाही. अशा वेळी व्यक्तिने थोडेसे समजूतदार झाले पाहिजे आणि म्हटले पाहिजे, “ठीक आहे, जशी तुझी इच्छा.” पण जोवर व्यक्तिला आतून काही आवडीनिवडी आहेत, अग्रक्रम आहेत तेव्हा तिने ते शब्दांमध्ये मांडण्यात गैर काही नाही. ती अगदी स्वाभाविक अशी क्रिया आहे.

उदाहरणार्थ, जर एखाद्याने मूर्खपणा केला असेल, काहीतरी चूक केली असेल आणि त्या व्यक्तिला खरोखर, मनापासून तशी चूक परत होऊ नये असे वाटत असेल, तर तशी विनवणी करण्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही. आणि खरंतर, व्यक्तिने अगदी अंत:करणपूर्वक, आंतरिक सचोटीने तशी विनवणी केली तर, तिची ती प्रार्थना मंजूर केली जाण्याची अधिक शक्यता असते.

तुम्हाला विरोध करणे हे ‘ईश्वरा’ला आवडते, असा विचार तुम्ही कधीच करता कामा नये. त्याला तसे करण्यामध्ये कोणताही रस नसतो. तुमच्यासाठी काय हिताचे आहे हे, तुमच्यापेक्षा त्याला अधिक चांगले समजते; परंतु अगदी अनिवार्य असेल तेव्हाच तो तुमच्या इच्छेला विरोध करतो. अन्यथा तुम्ही जे काही मागितले असेल, ते द्यायला तो नेहमीच तत्पर असतो.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 254-255)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ३२

व्यक्तीने स्वतःमध्ये असलेले सर्वकाही ईश्वराला निवेदित करणे, व्यक्ती स्वतः जे आहे ते आणि तिच्यापाशी जे जे काही आहे ते ते सर्व ईश्वराला अर्पण करणे; स्वतःच्या कल्पना, इच्छा, सवयी इत्यादी यांचा आग्रह न धरणे, उलट त्यांची जागा सर्वत्र, ईश्वरी ‘सत्या’ला त्याच्या ज्ञानाद्वारे, त्याच्या संकल्पाद्वारे आणि त्याच्या कार्याद्वारे घेऊ देणे म्हणजे समर्पण.

*

ईश्वराप्रत स्वत:ला सोपवून देणे म्हणजे समर्पण. व्यक्ती जे काही आहे आणि तिच्यापाशी जे जे काही आहे ते ते सारे ‘ईश्वरा’ला देऊ करणे; आपले स्वत:चे असे काहीही नाही, असा दृष्टिकोन बाळगणे; अन्य कोणत्याही नव्हे, तर केवळ ‘ईश्वरी’ इच्छेच्या आज्ञेचे पालन करणे; अहंकारासाठी नव्हे तर, ‘ईश्वरा’साठी जीवन व्यतीत करणे म्हणजे समर्पण.

*

समर्पण हे परिपूर्तीचे साधन असते हेच आपल्या साधनेचे पहिले तत्त्व आहे आणि जोपर्यंत अहंकार किंवा प्राणिक मागण्या आणि इच्छावासना यांना खतपाणी घातले जाते तोपर्यंत संपूर्ण समर्पण अशक्य असते. आणि तोवर आत्मदानदेखील अपूर्ण असते. आम्ही ही गोष्ट कधीच लपविलेली नाही. समर्पण अवघड असू शकते, ते तसे असतेही परंतु तेच तर साधनेचे खरे तत्त्व आहे. समर्पण अवघड असल्यामुळेच, कार्य पूर्ती होईपर्यंत ते स्थिरपणे आणि धीराने केले पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 67 & 75-76)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – २४

योगामध्ये सुरुवाती सुरुवातीला तुम्हाला बरेचदा ईश्वराचे विस्मरण होण्याचा संभव असतो. परंतु सातत्यपूर्ण अभीप्सेने तुम्ही तुमचे स्मरण वाढविता आणि विस्मरण नाहीसे करून टाकता. पण एक कठोर शिस्त किंवा कर्तव्य या भावनेने ही गोष्ट घडता कामा नये तर ती प्रेम आणि आनंदाची (एक सहज) क्रिया असली पाहिजे. आणि मग लवकरच अशी एक अवस्था येईल की, तुम्हाला एका क्षणासाठी जरी ईश्वराचे अस्तित्व जाणवले नाही, तर मग तुम्ही काहीही करत असलात तरी तुम्हाला एकदम एकाकी, उदास, दुःखीकष्टी वाटायला लागते.

ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव झाल्याशिवाय तुम्ही एखादी गोष्ट करू शकत असाल आणि तरीही तुम्ही अगदी सुखी आहात असे जर का तुम्हाला आढळले तर, तुमच्या अस्तित्वातील ते अंग ईश्वराला समर्पित झालेले नाही, हे तुम्ही जाणले पाहिजे. ज्यांना ईश्वराच्या अस्तित्वाची कोणतीच निकड भासत नाही अशा सामान्य मानवतेचा हा मार्ग झाला. परंतु दिव्य जीवनाच्या साधकाच्या बाबतीत मात्र ही गोष्ट काहीशी निराळी असते. जेव्हा तुमचे ईश्वराशी संपूर्णतया एकत्व झालेले असते तेव्हा, ईश्वर तुमच्यापासून क्षणभर जरी दूर झाला, तर तुम्ही अगदी मृतवत होता. कारण तो ईश्वरच आता तुमच्या जीवनाचे जीवन असतो, तोच तुमचे समग्र अस्तित्व असतो, तोच तुमचा एकमेव आणि संपूर्ण आधार असतो. जर ईश्वर नसेल तर मग काही शिल्लकच उरत नाही.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 26-27)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ०८

पौर्वात्य लोकांपेक्षा पाश्चिमात्त्य लोकांसाठी योगसाधना अधिक धोकादायक असते असे काही नाही. तुम्ही योगाकडे कोणत्या भावनेतून वळता यावर सारे काही अवलंबून असते. जर योगसाधना तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी हवी असेल, स्वतःच्या वैयक्तिक हेतुंच्या पूर्ततेसाठी हवी असेल तर ती धोकादायक बनते. परंतु ईश्वराचा शोध घेणे हे उद्दिष्ट सतत लक्षात ठेवून, एका पवित्र भावनेने तुम्ही जर योगसाधनेकडे वळलात तर, ती धोकादायक तर ठरत नाहीच, उलट ती स्वतःच तुमची एक सुरक्षा, सुरक्षितता बनते.

जेव्हा माणसं ईश्वरासाठी नव्हे तर, शक्ती संपादन करून, योगाच्या पडद्याआडून स्वतःच्या आकांक्षा भागवू इच्छितात तेव्हा योगसाधनेमध्ये अडचणी आणि धोके निर्माण होतात. जर तुम्ही महत्त्वाकांक्षेपासून स्वतःची सुटका करून घेऊ शकत नसाल तर योगसाधनेला स्पर्शदेखील करू नका. मग ती आग आहे, ती सारे काही भस्मसात करून टाकेल.

… तुम्ही जर समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे आचरणात आणलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर समस्या निर्माण होणार नाही. प्रश्न असतो फक्त प्रामाणिकपणाचा! जर तुम्ही प्रामाणिक नसाल तर योगसाधनेला सुरुवातच करू नका. मानवी व्यवहार करत असताना तुम्ही फसवणूक केलीत तर त्यात यशस्वी होण्याची थोडीफार तरी शक्यता असू शकते पण ईश्वरासोबत मात्र फसवणुकीला यत्किंचितही थारा असू शकत नाही. जर तुम्ही विनम्र असाल आणि तुमचा गाभा खुला असेल आणि जर तुमचे साध्य ईश्वराचा साक्षात्कार आणि त्याची प्राप्ती हेच असेल आणि तोच आपला ‘चालविता धनी’ व्हावा हे जर तुमचे साध्य असेल तर तुम्ही या मार्गावरून सुरक्षितपणे जाऊ शकता.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 04-05)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ०४

येथे योगाचा जो मार्ग आचरला जातो त्या मार्गाचे (पूर्णयोगाचे) इतर योगांपेक्षा काहीएक भिन्न प्रयोजन आहे. कारण सर्वसामान्य अज्ञानी विश्व-चेतनेमधून बाहेर पडून, दिव्य चेतनेमध्ये उन्नत होणे हे केवळ या योगाचे ध्येय नाही, तर मन, प्राण आणि शरीर यांच्या अज्ञानामध्ये दिव्य चेतनेची अतिमानसिक शक्ती उतरविणे; मन, प्राण आणि शरीर यांचे रूपांतरण करणे, इहलोकामध्ये ईश्वराचे आविष्करण घडविणे आणि या जडभौतिकामध्ये दिव्य जीवन निर्माण करणे, हे या योगमार्गाचे ध्येय आहे. हे ध्येय अत्यंत कठीण आहे आणि हा योगमार्गही अत्यंत कठीण आहे; बऱ्याच जणांना किंबहुना बहुतेकांना तर तो अशक्यच भासतो. सर्वसामान्य अज्ञ विश्व-चेतनेच्या साऱ्या प्रस्थापित शक्ती या योगमार्गाच्या विरोधात असतात आणि त्या शक्ती या मार्गाला नाकारतात आणि त्या शक्ती या योगमार्गाला रोखण्याचा प्रयत्न करत असतात. साधकाला असे आढळून येईल की, त्याच्या स्वतःच्या मनामध्ये, प्राणामध्ये आणि शरीरामध्येच या साक्षात्कारासाठी प्रतिकूल असे सर्वाधिक हट्टी अडथळे ठासून भरले आहेत. जर तुम्ही हे ध्येय अगदी पूर्ण अंतःकरणाने स्वीकारलेत, साऱ्या अडीअडचणींना सामोरे गेलात, भूतकाळ आणि त्याचे सारे बंध तुम्ही मागे टाकून दिलेत, आणि सर्व गोष्टींचा त्याग करण्यास तयार झालात, या दिव्य शक्यतेसाठी प्रत्येक जोखीम घेण्यास तयार झालात, तरच केवळ तुम्हाला त्या पाठीमागील ‘सत्य’ हे अनुभवाच्या द्वारे सापडण्याची काही आशा असते.

या योगाची साधना, कोणत्याही ठरावीक साचेबद्ध अशा मानसिक शिक्षणाने किंवा ध्यानधारणेच्या नेमून दिलेल्या प्रकारांच्या द्वारे, कोणत्याही मंत्रांनी किंवा तत्सम गोष्टींनी, प्रगत होत नाही; तर अभीप्सेद्वारे, अंतर्मुख आणि ऊर्ध्वमुख आत्म-एकाग्रतेद्वारे, ईश्वरी शक्तीच्या दिव्य प्रभावाप्रत स्वतःला खुले केल्याने, आपल्या ऊर्ध्वस्थित असणाऱ्या दिव्य शक्तीप्रत आणि तिच्या कार्याप्रत स्वतःला खुले केल्याने, हृदयामध्ये असणाऱ्या दिव्य अस्तित्वाला खुले होत, आणि या साऱ्यांना ज्या ज्या गोष्टी परक्या असतील त्या साऱ्या गोष्टींना नकार दिल्याने ही साधना प्रगत होते. केवळ श्रद्धा, अभीप्सा आणि समर्पण यांच्या द्वारेच हे आत्मउन्मीलन (self-opening) घडून येते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 19-20)