Tag Archive for: समर्पण

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ३२

व्यक्तीने स्वतःमध्ये असलेले सर्वकाही ईश्वराला निवेदित करणे, व्यक्ती स्वतः जे आहे ते आणि तिच्यापाशी जे जे काही आहे ते ते सर्व ईश्वराला अर्पण करणे; स्वतःच्या कल्पना, इच्छा, सवयी इत्यादी यांचा आग्रह न धरणे, उलट त्यांची जागा सर्वत्र, ईश्वरी ‘सत्या’ला त्याच्या ज्ञानाद्वारे, त्याच्या संकल्पाद्वारे आणि त्याच्या कार्याद्वारे घेऊ देणे म्हणजे समर्पण.

*

ईश्वराप्रत स्वत:ला सोपवून देणे म्हणजे समर्पण. व्यक्ती जे काही आहे आणि तिच्यापाशी जे जे काही आहे ते ते सारे ‘ईश्वरा’ला देऊ करणे; आपले स्वत:चे असे काहीही नाही, असा दृष्टिकोन बाळगणे; अन्य कोणत्याही नव्हे, तर केवळ ‘ईश्वरी’ इच्छेच्या आज्ञेचे पालन करणे; अहंकारासाठी नव्हे तर, ‘ईश्वरा’साठी जीवन व्यतीत करणे म्हणजे समर्पण.

*

समर्पण हे परिपूर्तीचे साधन असते हेच आपल्या साधनेचे पहिले तत्त्व आहे आणि जोपर्यंत अहंकार किंवा प्राणिक मागण्या आणि इच्छावासना यांना खतपाणी घातले जाते तोपर्यंत संपूर्ण समर्पण अशक्य असते. आणि तोवर आत्मदानदेखील अपूर्ण असते. आम्ही ही गोष्ट कधीच लपविलेली नाही. समर्पण अवघड असू शकते, ते तसे असतेही परंतु तेच तर साधनेचे खरे तत्त्व आहे. समर्पण अवघड असल्यामुळेच, कार्य पूर्ती होईपर्यंत ते स्थिरपणे आणि धीराने केले पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 67 & 75-76)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – २४

योगामध्ये सुरुवाती सुरुवातीला तुम्हाला बरेचदा ईश्वराचे विस्मरण होण्याचा संभव असतो. परंतु सातत्यपूर्ण अभीप्सेने तुम्ही तुमचे स्मरण वाढविता आणि विस्मरण नाहीसे करून टाकता. पण एक कठोर शिस्त किंवा कर्तव्य या भावनेने ही गोष्ट घडता कामा नये तर ती प्रेम आणि आनंदाची (एक सहज) क्रिया असली पाहिजे. आणि मग लवकरच अशी एक अवस्था येईल की, तुम्हाला एका क्षणासाठी जरी ईश्वराचे अस्तित्व जाणवले नाही, तर मग तुम्ही काहीही करत असलात तरी तुम्हाला एकदम एकाकी, उदास, दुःखीकष्टी वाटायला लागते.

ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव झाल्याशिवाय तुम्ही एखादी गोष्ट करू शकत असाल आणि तरीही तुम्ही अगदी सुखी आहात असे जर का तुम्हाला आढळले तर, तुमच्या अस्तित्वातील ते अंग ईश्वराला समर्पित झालेले नाही, हे तुम्ही जाणले पाहिजे. ज्यांना ईश्वराच्या अस्तित्वाची कोणतीच निकड भासत नाही अशा सामान्य मानवतेचा हा मार्ग झाला. परंतु दिव्य जीवनाच्या साधकाच्या बाबतीत मात्र ही गोष्ट काहीशी निराळी असते. जेव्हा तुमचे ईश्वराशी संपूर्णतया एकत्व झालेले असते तेव्हा, ईश्वर तुमच्यापासून क्षणभर जरी दूर झाला, तर तुम्ही अगदी मृतवत होता. कारण तो ईश्वरच आता तुमच्या जीवनाचे जीवन असतो, तोच तुमचे समग्र अस्तित्व असतो, तोच तुमचा एकमेव आणि संपूर्ण आधार असतो. जर ईश्वर नसेल तर मग काही शिल्लकच उरत नाही.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 26-27)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ०८

पौर्वात्य लोकांपेक्षा पाश्चिमात्त्य लोकांसाठी योगसाधना अधिक धोकादायक असते असे काही नाही. तुम्ही योगाकडे कोणत्या भावनेतून वळता यावर सारे काही अवलंबून असते. जर योगसाधना तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी हवी असेल, स्वतःच्या वैयक्तिक हेतुंच्या पूर्ततेसाठी हवी असेल तर ती धोकादायक बनते. परंतु ईश्वराचा शोध घेणे हे उद्दिष्ट सतत लक्षात ठेवून, एका पवित्र भावनेने तुम्ही जर योगसाधनेकडे वळलात तर, ती धोकादायक तर ठरत नाहीच, उलट ती स्वतःच तुमची एक सुरक्षा, सुरक्षितता बनते.

जेव्हा माणसं ईश्वरासाठी नव्हे तर, शक्ती संपादन करून, योगाच्या पडद्याआडून स्वतःच्या आकांक्षा भागवू इच्छितात तेव्हा योगसाधनेमध्ये अडचणी आणि धोके निर्माण होतात. जर तुम्ही महत्त्वाकांक्षेपासून स्वतःची सुटका करून घेऊ शकत नसाल तर योगसाधनेला स्पर्शदेखील करू नका. मग ती आग आहे, ती सारे काही भस्मसात करून टाकेल.

… तुम्ही जर समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे आचरणात आणलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर समस्या निर्माण होणार नाही. प्रश्न असतो फक्त प्रामाणिकपणाचा! जर तुम्ही प्रामाणिक नसाल तर योगसाधनेला सुरुवातच करू नका. मानवी व्यवहार करत असताना तुम्ही फसवणूक केलीत तर त्यात यशस्वी होण्याची थोडीफार तरी शक्यता असू शकते पण ईश्वरासोबत मात्र फसवणुकीला यत्किंचितही थारा असू शकत नाही. जर तुम्ही विनम्र असाल आणि तुमचा गाभा खुला असेल आणि जर तुमचे साध्य ईश्वराचा साक्षात्कार आणि त्याची प्राप्ती हेच असेल आणि तोच आपला ‘चालविता धनी’ व्हावा हे जर तुमचे साध्य असेल तर तुम्ही या मार्गावरून सुरक्षितपणे जाऊ शकता.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 04-05)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ०४

येथे योगाचा जो मार्ग आचरला जातो त्या मार्गाचे (पूर्णयोगाचे) इतर योगांपेक्षा काहीएक भिन्न प्रयोजन आहे. कारण सर्वसामान्य अज्ञानी विश्व-चेतनेमधून बाहेर पडून, दिव्य चेतनेमध्ये उन्नत होणे हे केवळ या योगाचे ध्येय नाही, तर मन, प्राण आणि शरीर यांच्या अज्ञानामध्ये दिव्य चेतनेची अतिमानसिक शक्ती उतरविणे; मन, प्राण आणि शरीर यांचे रूपांतरण करणे, इहलोकामध्ये ईश्वराचे आविष्करण घडविणे आणि या जडभौतिकामध्ये दिव्य जीवन निर्माण करणे, हे या योगमार्गाचे ध्येय आहे. हे ध्येय अत्यंत कठीण आहे आणि हा योगमार्गही अत्यंत कठीण आहे; बऱ्याच जणांना किंबहुना बहुतेकांना तर तो अशक्यच भासतो. सर्वसामान्य अज्ञ विश्व-चेतनेच्या साऱ्या प्रस्थापित शक्ती या योगमार्गाच्या विरोधात असतात आणि त्या शक्ती या मार्गाला नाकारतात आणि त्या शक्ती या योगमार्गाला रोखण्याचा प्रयत्न करत असतात. साधकाला असे आढळून येईल की, त्याच्या स्वतःच्या मनामध्ये, प्राणामध्ये आणि शरीरामध्येच या साक्षात्कारासाठी प्रतिकूल असे सर्वाधिक हट्टी अडथळे ठासून भरले आहेत. जर तुम्ही हे ध्येय अगदी पूर्ण अंतःकरणाने स्वीकारलेत, साऱ्या अडीअडचणींना सामोरे गेलात, भूतकाळ आणि त्याचे सारे बंध तुम्ही मागे टाकून दिलेत, आणि सर्व गोष्टींचा त्याग करण्यास तयार झालात, या दिव्य शक्यतेसाठी प्रत्येक जोखीम घेण्यास तयार झालात, तरच केवळ तुम्हाला त्या पाठीमागील ‘सत्य’ हे अनुभवाच्या द्वारे सापडण्याची काही आशा असते.

या योगाची साधना, कोणत्याही ठरावीक साचेबद्ध अशा मानसिक शिक्षणाने किंवा ध्यानधारणेच्या नेमून दिलेल्या प्रकारांच्या द्वारे, कोणत्याही मंत्रांनी किंवा तत्सम गोष्टींनी, प्रगत होत नाही; तर अभीप्सेद्वारे, अंतर्मुख आणि ऊर्ध्वमुख आत्म-एकाग्रतेद्वारे, ईश्वरी शक्तीच्या दिव्य प्रभावाप्रत स्वतःला खुले केल्याने, आपल्या ऊर्ध्वस्थित असणाऱ्या दिव्य शक्तीप्रत आणि तिच्या कार्याप्रत स्वतःला खुले केल्याने, हृदयामध्ये असणाऱ्या दिव्य अस्तित्वाला खुले होत, आणि या साऱ्यांना ज्या ज्या गोष्टी परक्या असतील त्या साऱ्या गोष्टींना नकार दिल्याने ही साधना प्रगत होते. केवळ श्रद्धा, अभीप्सा आणि समर्पण यांच्या द्वारेच हे आत्मउन्मीलन (self-opening) घडून येते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 19-20)

समर्पण – ५९

हातचे काहीही राखून न ठेवता, स्वत:च्या सर्व घटकांनिशी जे स्वत:ला ‘ईश्वरा’स समर्पित करतात अशा साधकांना, ‘ईश्वर’ स्वत:लाच देऊन टाकतो. अशा साधकांना स्थिरता, प्रकाश, शक्तीसामर्थ्य, परमानंद, स्वातंत्र्य, विशालता, ज्ञानाची उत्तुंगता आणि आनंदसागर या गोष्टी प्राप्त होतात.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 67)

समर्पण – ५८

या योगामध्ये दोन प्रक्रिया असतात, आणि त्यामध्ये एक संक्रमण-अवस्था असते; या योगाचे दोन कालावधी असतात – एक समर्पणाची प्रक्रिया आणि त्याचा परिणामस्वरूप असणारा, कळसाध्याय!

योगसाधनेचा पहिला टप्पा : पूर्वतयारी

पहिल्या प्रक्रियेमध्ये व्यक्ती तिच्या घटकांमध्ये दिव्यत्वाचे ग्रहण करता यावे म्हणून स्वतःला तयार करत असते. या पहिल्या कालावधीमध्ये त्या व्यक्तीला कनिष्ठ प्रकृतीच्या साधनांच्या माध्यमाद्वारेच कार्य करावे लागते, परंतु त्या प्रयत्नांना वरून अधिकाधिक प्रमाणात साहाय्य मिळत असते.

परंतु ह्या प्रक्रियेच्या पुढच्या संक्रमण-अवस्थेच्या टप्प्यावर आपले वैयक्तिक आणि त्यामुळे अर्थातच अज्ञानग्रस्त प्रयत्न हे पुढेपुढे अपुरे पडू लागतात आणि मग तेथे उच्चतर प्रकृती कार्यरत होते; शाश्वत शक्ती ही मर्त्यतेच्या या मर्यादित रूपामध्ये अवतरित होते आणि क्रमाक्रमाने त्याचा ताबा घेते आणि त्याचे रूपांतरण करते. आधी जी पहिली अटळ अशी क्रिया होती, त्या कनिष्ठ क्रियेची जागा आता दुसऱ्या कालावधीमध्ये एका अधिक श्रेष्ठ अशा क्रियेद्वारे घेतली जाते; परंतु जेव्हा आत्म-समर्पण हे पूर्णत्व पावते तेव्हाच हे घडून येते.

आपल्यामधील अहंभावात्मक पुरुष स्वतःच्या शक्तीने किंवा इच्छेने किंवा ज्ञानाने किंवा स्वतःच्या कोणत्याही गुणाने स्वतःचे रूपांतरण ‘दिव्यत्वा’मध्ये करू शकत नाही; तो फार फार तर एवढेच करू शकतो की, तो स्वतःला रूपांतरणासाठी योग्य बनवू शकतो आणि तो जे बनण्यासाठी प्रयत्नशील आहे त्याला अधिकाधिक समर्पण करू शकतो. जोपर्यंत आपल्यामध्ये अहंकार कार्यरत आहे तोपर्यंत आपली वैयक्तिक कृती ही स्वरूपतः नेहमीच अस्तित्वाच्या कनिष्ठ श्रेणींचा एक भाग असणार आणि ती तशी असणेच आवश्यक असते; ती धूसर किंवा अर्ध-प्रकाशित असते, ती तिच्या क्षेत्रामध्ये मर्यादित आणि तिच्या सामर्थ्यामध्ये अगदीच अंशतः प्रभावी असते.

आपल्या प्रकृतीमध्ये नुसते झगमगते परिवर्तन न घडविता, आध्यात्मिक रूपांतरण घडवायचे असेल तर, आपल्या व्यक्तिगत अद्भुत कार्यामध्ये प्रभावशाली व्हावे म्हणून आपण ‘दिव्य शक्ती’ला आवाहन केले पाहिजे; कारण आवश्यक असणारे अमर्याद, सर्वज्ञ, निर्णायक सामर्थ्य फक्त तिच्याकडेच असते. मात्र मानवी वैयक्तिक कृतीची जागा संपूर्णतया दिव्यत्वाने घेणे ही गोष्ट एकाएकी घडणे पूर्णपणे शक्य नसते. खालून होणारी सर्व लुडबुड की जी उच्चतर कृतीच्या सत्याला खोटे ठरविते, त्या लुडबुडीचा प्रथम प्रतिबंध केला पाहिजे किंवा ती अगदी नि:सत्त्व केली पाहिजे. आणि ही गोष्ट स्वेच्छेने केली पाहिजे.

कनिष्ठ प्रकृतीचे मिथ्यत्व आणि सारे आवेग यांना सातत्यपूर्ण, पुनःपुन्हा आणि नेहमीच नकार देणे तसेच आपल्या घटकांमध्ये वृद्धिंगत होणाऱ्या सत्याला आग्रहपूर्वक साहाय्य करणे हे आपल्याकडून अपेक्षित आहे. कारण क्रमाक्रमाने स्थिरावत जाणाऱ्या आपल्या प्रकृतीला आणि येणारा बोधक ‘प्रकाश’, ‘शुद्धता’ आणि ‘शक्ती’ टिकून राहण्यासाठी, त्यांच्या विकसनासाठी आणि त्यांच्या अंतिम परिपूर्णत्वासाठी, आपण त्यांचा मुक्तपणे स्वीकार करण्याची आवश्यकता असते; तसेच त्यांच्या विरोधात जे जे काही असेल, किंवा त्यांच्यापेक्षा जे जे काही गौण असेल किंवा त्यांच्याशी जे मिळतेजुळते नसेल त्याला आपण हट्टाग्रहाने नकार देणेच आवश्यक असते.

स्वतःची तयारी करण्याच्या या पहिल्या प्रक्रियेमध्ये, म्हणजे वैयक्तिक प्रयत्नांच्या या कालावधीमध्ये, आपण ज्याच्या प्राप्तीसाठी धडपडत असतो त्या ‘दिव्यत्वा’वर आपल्या समग्र अस्तित्वाचे एककेंद्रीकरण करणे आणि त्याचाच स्वाभाविक परिणाम म्हणून, या ‘दिव्यत्वाचे खरे सत्य’ नसलेले असे जे जे काही आहे, त्याला घालवून देणे (katharsis), त्याला सातत्यपूर्ण नाकारणे, ही पद्धत आपण उपयोगात आणणे आवश्यक असते. आपण जे काही आहोत, आपण जो विचार करतो, आपल्याला जे संवेदित होते किंवा आपण जे काही करतो त्या साऱ्याचे संपूर्ण आत्मनिवेदन म्हणजे या प्रयत्नसातत्याचा परिणाम असेल. आपल्या या आत्मनिवेदनाची परिणती अंतिमतः त्या ‘परमोच्चा’प्रत केलेल्या संपूर्ण आत्मदानामध्ये झाली पाहिजे; कारण समग्र प्रकृतीचे सर्वसमावेशक निःशेष समर्पण म्हणजे त्याच्या पूर्णत्वाची खूण असेल; त्याचा मुकुटमणी असेल.

योगसाधनेचा दुसरा टप्पा : संक्रमण अवस्था

योगसाधनेच्या दुसऱ्या टप्प्यात, मानव आणि ईश्वरी कार्यकारित्व यांच्या संक्रमणामध्ये, एक चढतीवाढती, परिशुद्ध झालेली आणि सावध निष्क्रियता वाढीस लागलेली आढळेल; अन्य कोणत्याही शक्तीला नव्हे तर, केवळ ‘दिव्य शक्ती’ला अधिकाधिक प्रकाशमान असा दिव्य प्रतिसाद मिळताना आढळेल; आणि त्याचा परिणाम म्हणून वरून, एक महान आणि जागरूक चमत्कारसदृश्य कार्यकारितेचा चढतावाढता प्रवाह अनुभवास येईल.

योगसाधनेचा अंतिम टप्पा : दिव्यत्वाचे फूल उमलणे

अंतिम कालावधीमध्ये कोणतेही प्रयत्न शिल्लक राहात नाहीत, कोणतीही ठरावीक पद्धत असत नाही, कोणती ठरावीक साधना असत नाही; प्रयत्न आणि तपस्या या दोहोंची जागा, पार्थिव प्रकृतीच्या परिशुद्ध झालेल्या आणि परिपूर्ण झालेल्या कळीमधून एका नैसर्गिक, शुद्ध, शक्तिशाली आणि आनंददायी दिव्यत्वाचे फूल उमलण्याने घेतली जाईल. योगसाधनेच्या क्रियेचे हे स्वाभाविक टप्पे आहेत.

या प्रक्रिया नेहमीच, अगदी एकापाठोपाठ एक याच क्रमाने घडतात, असे नाही. पहिली प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच दुसऱ्या टप्प्यातील प्रक्रियेला सुरुवात झालेली असते; दुसरी प्रक्रिया पूर्णत्वाला जाईपर्यंत पहिली प्रक्रिया आंशिक रूपात चालू राहते; अंतिम दिव्य कार्यकारकत्व अंतिमतया सुस्थिर होण्यापूर्वी आणि प्रकृतीसाठी ते सामान्य होण्यापूर्वी, एक अभिवचन या स्वरूपात ते वेळोवेळी आविष्कृत होत राहते. व्यक्तीला तिच्या वैयक्तिक परिश्रमामध्ये आणि प्रयत्नामध्येसुद्धा दिशादर्शन करणारे असे, त्या व्यक्तीपेक्षा अधिक उच्चतर आणि अधिक महान असे काहीतरी नेहमीच असते. कनिष्ठ प्रकृतीच्या अप्रत्यक्ष नियंत्रणापासून व्यक्तीच्या सर्व घटकांसहित समग्र प्रकृतीची परिशुद्धता होण्यापूर्वीसुद्धा पुष्कळ आधीपासून व्यक्तीला पडद्यामागून मिळणाऱ्या या महत्तर मार्गदर्शनाची जाणीव होऊ शकते; व्यक्तीला काही कालावधीसाठी त्याची पूर्णपणे जाणीव होऊ शकते, तसेच व्यक्तीच्या अस्तित्वाच्या काही भागांना तर ही जाणीव कायमस्वरूपी होऊ शकते. तसेच, कधीकधी ती व्यक्ती अगदी आरंभापासूनसुद्धा याबाबत सजग असू शकते; जरी इतर घटक नाहीत तरी, व्यक्तीचे मन आणि हृदय हे या पकड घेणाऱ्या आणि मर्मभेदक अशा मार्गदर्शनाला एका विशिष्ट प्रारंभिक पूर्णतेनिशी योगसाधनेच्या अगदी पहिल्या पायरीपासूनच प्रतिसाद देऊ शकतात. परंतु जसजसा हा अंतिम टप्पा नजिक येऊ लागतो तसतसा, महान थेट नियंत्रणाच्या सातत्यपूर्ण, परिपूर्ण आणि एकसमान कृतीमुळे या संक्रमण-अवस्थेमध्ये आणि अंतिम टप्प्यामध्ये अधिकाधिक भेद पडू लागतो. आपल्यापुरतेच व्यक्तिगत नसलेल्या, या महत्तर दिव्यतर मार्गदर्शनाचे हे प्राबल्य म्हणजे व्यक्तीची प्रकृती ही समग्र आध्यात्मिक रूपांतरणासाठी चढत्यावाढत्या प्रमाणात परिपक्व होत चालली आहे याचे निदर्शक असते. आत्म-निवेदन हे फक्त तत्त्वतःच नव्हे तर कृतीमध्ये आणि शक्तीमध्येसुद्धा स्वीकारले गेले आहे, याचे हे अचूक लक्षण असते. निवडलेल्या, विस्मयकारी प्रकाशाच्या, शक्तीच्या आणि आनंदाच्या मानवी पात्रावर परमेश्वराने आपला प्रकाशमान वरदहस्त ठेवल्याची ती खूण असते.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 86-88)

समर्पण – ५७

प्रश्न : आपले समर्पण हे समग्र आहे किंवा नाही हे व्यक्तीला कसे समजेल?

श्रीमाताजी : मला तरी यात काही अवघड आहे असे वाटत नाही. व्यक्तीने एक छोटासा प्रयोग करून पाहायला हरकत नाही. एखादा असे म्हणू शकेल की, “मी ‘ईश्वरा’ला समर्पित झालो आहे, माझ्या जीवनातील प्रत्येक गोष्ट त्याने ठरवावी अशी माझी इच्छा आहे, बघू या.” तेव्हा हा तुमचा आरंभबिंदू असतो.

अजून एक छोटासा प्रयोग लक्षात घेऊ : समजा ईश्वर ठरविणार आहे की, अमुक अमुक गोष्ट घडणार आहे आणि नेमकी ती तुमच्या भावनांच्या विरोधात जाणारी असेल. तर अशा वेळी व्यक्ती स्वत:लाच म्हणते, “जर ईश्वराने मला, ‘तू अमुक अमुक गोष्ट सोडून द्यायची आहे’ असे सांगितले तर?…’’ – तुमची प्रतिक्रिया काय होते ते लगेच पाहा, तुम्हाला स्पष्टपणे कळून चुकेल; जर त्यामुळे आतमध्ये काहीतरी टोचणी लागली असेल तर तुम्ही स्वत:ला असे सांगू शकता, “समर्पण अजून परिपूर्ण झालेले नाही” – कारण आत कोठेतरी रुखरुख लागलेली आहे, आत काहीतरी ठुसठुसत आहे.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 345-346)

समर्पण ५६

प्रश्न : ‘ईश्वरा’प्रत समर्पण केल्याचा साधकाने जो निश्चय केलेला असतो त्याचा, त्याच्या प्रत्यक्ष जीवनामध्ये काही परिणाम झाला आहे, हे दर्शविणारे लक्षण कोणते ?

श्रीमाताजी : समर्पणाच्या निश्चयातून काही विशिष्ट असे परिणाम दिसून येतात, असे श्रीअरविंद म्हणतात. पहिला परिणाम म्हणजे कोणताही प्रश्न उपस्थित न करता, अगदी सहजतेने (ईश्वराचे) आज्ञाधारक बनणे आणि दुसरा परिणाम म्हणजे, ‘ईश्वरा’च्या प्रभावाखेरीज इतर सर्व प्रभाव नाकारण्याची शक्ती असणे. हे फार मोठे परिणाम आहेत. एखाद्या व्यक्तीने जर या गोष्टी साध्य केलेल्या असतील तर, ती व्यक्ती आधीपासूनच बऱ्यापैकी प्रगत दशेत आहे, असे समजावे.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 129)

समर्पण ५५

समर्पणाची प्रक्रिया म्हणजेच एक तपस्या आहे. इतकेच नव्हे तर, वास्तविक ती तपस्येची दुहेरी प्रक्रिया आहे; समर्पणाची प्रक्रिया चांगल्या रीतीने सुरू झालेली असली तरीदेखील, चढतेवाढते समर्पण दीर्घकाळपर्यंत टिकून राहते. नंतर मग एक वेळ अशी येते की, जेव्हा व्यक्तीला ‘ईश्वरी अस्तित्व’ आणि ‘ईश्वरी शक्ती’ सातत्याने आणि अधिकाधिक रीतीने जाणवू लागते; तीच सारे काही करत आहे असे अधिकाधिक जाणवू लागते – त्यामुळे अगदी अतिशय अवघड अडचणीसुद्धा ह्या जाणिवेला धक्का पोहोचवू शकत नाहीत. आणि वैयक्तिक प्रयत्नांची आता आवश्यकता उरत नाही आणि ते शक्यही होत नाहीत. प्रकृतीचे ईश्वराच्या हाती पूर्ण समर्पण झाल्याची ही खूण असते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 82)

समर्पण – ५४

कोणताच मार्ग हा पूर्णतः सोपा नसतो आणि समर्पणाच्या मार्गाबाबत सांगायचे तर, खरेखुरे आणि संपूर्ण समर्पण करणे हीच एक मोठी अवघड गोष्ट असते. परंतु एकदा का ते घडून आले की मग त्यामुळे गोष्टी निश्चितपणे अधिक सोप्या होतात – म्हणजे या साऱ्या गोष्टी क्षणार्धात घडून येतात असे नाही किंवा अडीअडचणी नाहीशा होतात असेही नाही; पण तेथे एक प्रकारची आश्वासकता असते, एक आधार असतो, आणि एक तणावरहितता असते की जी प्रतिकाराच्या वाईटातल्या वाईट रूपांपासून स्वातंत्र्य प्रदान करते आणि चेतनेला शांती तसेच सामर्थ्य प्रदान करते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 81-82)