Tag Archive for: समर्पण

समर्पण – ०४

तुमच्या आत्म्याचे जे जे काही आहे ते ते सारे ईश्वराला, ज्याचे तुम्ही एक भाग आहात अशा महत्तर चेतनेला देऊ करणे, हे समर्पणामध्ये अभिप्रेत आहे. समर्पण तुम्हाला क्षीण करणार नाही तर त्यामुळे वृद्धी होईल; ते तुमच्या व्यक्तिमत्त्वाची कोणतीही घट करणार नाही, काहीही दुर्बल करणार नाही किंवा तुमचे व्यक्तित्व नष्टही करणार नाही; तर समर्पण तुमचे व्यक्तिमत्त्व प्रभावी बनवेल, वृद्धिंगत करेल. दानाच्या सगळ्या आनंदासहित असलेले मुक्त समस्त दान हे समर्पणामध्ये अभिप्रेत असते; त्यामध्ये त्यागाची भावना नसते. आपण काही त्याग करत आहोत अशी थोडीशीही भावना तुमच्या मनात असेल तर मग ते काही समर्पण नव्हे. त्याचा अर्थ असा की तुम्ही काहीतरी हातचे राखून ठेवू पाहत आहात किंवा तुम्ही काहीतरी कुरकूर करत, कष्टाने आणि सायासाने देण्याचा प्रयत्न करत आहात; त्यामध्ये भेट देण्याचा कोणताच आनंद नाही; एव्हढेच काय पण तुम्ही काहीतरी देत आहात ही भावनादेखील त्यामध्ये असत नाही.

तुम्ही जेव्हा कोणतीही गोष्ट तुमच्या अस्तित्वाने संकोचून, दबून, अवघडून अशी करत असता तेव्हा ती तुम्ही चुकीच्या पद्धतीने करत आहात, हे निश्चित जाणा. खरे समर्पण तुम्हाला व्यापक करते, ते तुमची क्षमता वाढविते; तुम्हाला स्व-प्रयत्नाद्वारे कधीच प्राप्त करून घेता आले नसते एवढ्या मोठ्या प्रमाणात समर्पण तुमच्या गुणवत्तेमध्ये आणि संख्यात्मकतेमध्ये भर घालत असते. गुणात्मकतेतील आणि संख्यात्मकतेतील हे मोठे प्रमाण, तुम्ही समर्पणापूर्वी जे काही मिळवू शकला असता त्याच्यापेक्षा अगदी भिन्न असते. तुमचा एका नवीन जगामध्येच प्रवेश होतो, अशा एका व्यापकतेमध्ये प्रवेश होतो की, जर तुम्ही समर्पण केले नसते तर त्या व्यापकतेमध्ये तुमचा कधीच प्रवेश होऊ शकला नसता.

एखादा पाण्याचा थेंब सागरामध्ये पडला आणि तेथेसुद्धा जर त्याने स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवले, तर तो केवळ पाण्याचा एक लहानसा थेंब म्हणूनच शिल्लक राहील, अधिक काहीच बनणार नाही आणि परिणामत: त्या लहानशा थेंबाचा सभोवताली असलेल्या प्रचंडतेपुढे टिकाव लागणार नाही, कारण त्याने समर्पण केलेले नव्हते. परंतु, तेच समर्पणामुळे, तो त्या सागराशी एकजीव होतो आणि मग तो त्या संपूर्ण सागराच्या अथांगतेशी, त्याच्या शक्तीशी, त्याच्या प्रकृतीशी जोडला जातो आणि त्यात सहभागी होतो.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 114-115)

समर्पण – ०३

ईश्वराप्रत केलेले आत्मदान म्हणजे समर्पण. व्यक्ती जे काही आहे आणि तिच्यापाशी जे काही आहे ते सारे ईश्वराला देऊ करणे; काहीही स्वत:चे नाही असे समजणे; इतर कोणतीही आज्ञा न पाळता, केवळ ईश्वरी संकल्पाच्या आज्ञेचे पालन करणे; अहंकारासाठी नाही तर, ईश्वरासाठी जीवन व्यतीत करणे म्हणजे समर्पण.
*
स्वतःच्या कल्पना, इच्छा, सवयी यांचा कोणताही आग्रह न धरता, त्या साऱ्यांची जागा ‘ईश्वरी सत्या’ला त्याच्या ज्ञानाद्वारे, त्याच्या इच्छेद्वारे आणि त्याच्या कार्याद्वारे सर्वत्र घेता यावी म्हणून, त्याला सहमती देणे म्हणजे समर्पण. स्वतःमध्ये जे काही आहे ते ईश्वराप्रत निवेदित करणे, व्यक्तीने ती स्वतः जे आहे ते आणि तिच्यापाशी जे काही आहे ते ईश्वराप्रत अर्पण करणे, म्हणजे समर्पण!

– श्रीअरविंद
(CWSA 29: 67)

समर्पण – ०२

…प्रामाणिक अभीप्सेचा परिणाम नक्कीच होतो; जर तुम्ही प्रामाणिक असाल तर तुम्ही दिव्य जीवनामध्ये उन्नत होता.

पूर्णपणे प्रामाणिक असणे म्हणजे – फक्त आणि फक्त ईश्वरी सत्याचीच अभीप्सा बाळगणे; दिव्य मातेप्रत स्वतःला अधिकाधिक समर्पित करणे; या अभीप्सेव्यतिरिक्त असणाऱ्या वैयक्तिक सर्व मागण्या व वासना यांचा परित्याग करणे; जीवनातील प्रत्येक कृती ही ईश्वरालाच समर्पण करणे आणि कोणताही अहंकार आड येऊ न देता, हे कार्य ईश्वराने दिलेले आहे असे मानून कार्य करणे. हाच दिव्य जीवनाचा पाया आहे.

व्यक्ती एकाएकी एकदम अशी होऊ शकत नाही. पण जर ती सातत्याने तशी अभीप्सा बाळगेल आणि ईश्वरी शक्तीने साहाय्य करावे म्हणून तिचा अगदी अंतःकरणपूर्वक आणि साध्यासरळ इच्छेने, नेहमी धावा करत राहील; तर व्यक्ती या चेतनेप्रत अधिकाधिक उन्नत होत राहते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 50-51)

समर्पण – ०१

आपल्या जीवनाची सारी जबाबदारी ईश्वराच्या हाती सोपविण्याचा निर्णय म्हणजे समर्पण (Surrender). या निर्णयाव्यतिरिक्त कोणतीच गोष्ट शक्य नाही. जर तुम्ही समर्पण केले नाहीत तर योगाचा प्रश्नच उद्भवत नाही. समर्पणानंतर सारे काही स्वाभाविकपणेच येते कारण योगाची प्रक्रियाच मुळी समर्पणाबरोबर सुरू होते. तुम्ही ज्ञानाच्या माध्यमातून किंवा भक्तीच्या माध्यमातून समर्पित होऊ शकता. केवळ ईश्वरच सत्य आहे ही एक दृढ अंतःप्रेरणा तुमच्यामध्ये असू शकते आणि ईश्वराखेरीज माझे काहीच चालणार नाही, अशी एक प्रकाशमय धारणा तुमच्यामध्ये असू शकते. किंवा मग आनंदी होण्याचा केवळ हाच एक मार्ग आहे, हीच एक दिशा आहे अशी उत्स्फूर्त भावना असू शकते; किंवा मग आपण केवळ ईश्वराचेच असावे अशी दृढ आंतरात्मिक इच्छा असू शकते. ”मी माझा नाही,” असे तुम्ही म्हणता आणि आपल्या अस्तित्वाची जबाबदारी तुम्ही ‘सत्या’वर सोपविता.

मग येते आत्मार्पण (Self-offering) : तुम्ही म्हणता की, “मी एक चांगल्या आणि वाईट साऱ्या गुणांनी बनलेला, अंधाऱ्या आणि प्रकाशपूर्ण गुणांनी बनलेला असा प्राणी आहे; मी जसा आहे तसा मी स्वतःला समर्पित करत आहे; माझ्या चढउतारांसहित, माझ्या परस्परविरोधी प्रेरणा आणि प्रवृत्तींनिशी माझा स्वीकार कर आणि तुला जे करावेसे वाटते ते माझ्याबाबतीत कर.” आणि मग जो पहिल्या प्रथम निर्णय घेतला होता त्या केंद्रवर्ती आंतरात्मिक इच्छेभोवती तुमच्या साऱ्या अस्तित्वाचे एकीकरण व्हायला सुरुवात होते. तुम्ही तुमच्या प्रकृतीमधील अडथळा निर्माण करणारे सारे घटक एकेक करून हाती घ्यायला हवेत आणि त्यांचे केंद्रवर्ती अस्तित्वाभोवती एकीकरण करावयास हवे. तुम्ही एका उत्स्फूर्त प्रेरणेने स्वतःला ईश्वराप्रत समर्पित करू शकता; पण अशा प्रकारे एकीकरण घडून आल्याखेरीज तुम्ही प्रभावीरित्या समर्पण करू शकत नाही.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 126)

योगाचे दोन मार्ग आहेत, एक मार्ग तपस्येचा आणि दुसरा मार्ग समर्पणाचा. Read more

मानसिक परिपूर्णत्व – १२

 

ईश्वरावरील श्रद्धा आणि विश्वास या गोष्टी आंतरिक समर्पणाचा गाभा आहेत. ”मला दुसरेतिसरे काहीही नको, ईश्वरच हवा,” असा दृष्टिकोन व्यक्ती अंगीकारते. …”मी ईश्वराला माझे समर्पण करू इच्छितो आणि माझ्या आत्म्याचीच ती मागणी असल्याने, इतर काहीही नाही, तर फक्त तेच. मी त्याला भेटेन, मी त्याचा साक्षात्कार करून घेईन. मी इतर काहीही मागणार नाही, केवळ हीच माझी मागणी असेल. जेणेकरून, मला त्याच्या सन्निध जाता येईल असे कार्य त्याने माझ्यामध्ये करावे; मग त्याचे ते कार्य गुप्त असेल वा प्रकट असेल, ते झाकलेले असेल वा आविष्कृत झाले असेल, मग ते कोणत्याही प्रकारचे असले तरी हरकत नाही. मी माझ्या स्वतःच्या मार्गासाठी आणि वेळेसाठी आग्रह धरणार नाही; त्याने त्याच्या त्याच्या वेळेनुसार व त्याच्या पद्धतीने सारे काही करावे; मी त्याच्यावर विश्वास ठेवेन; त्याची इच्छा प्रमाण मानेन; त्याच्या प्रकाशाची, त्याच्या उपस्थितीची, त्याच्या आनंदाची, अविचलपणे अभीप्सा बाळगेन; कितीही अडचणी आल्या, कितीही विलंब लागला तरी मी त्याच्यावर पूर्ण विसंबून राहीन आणि कधीही मार्ग सोडणार नाही. माझे मन शांत होऊन, त्याच्याकडे वळू दे आणि ते त्याच्या प्रकाशाप्रत खुले होऊ दे; माझा प्राण शांत होऊ दे आणि केवळ त्याच्याकडेच वळू दे; त्याच्या शांतीप्रत आणि त्याच्या आनंदाप्रत तो खुला होऊ दे. सारे काही त्याच्यासाठीच आणि मी स्वतःसुद्धा त्याच्यासाठीच. काहीही झाले तरी, मी अभीप्सा आणि आत्मदान दृढ बाळगेन आणि हे घडून येईलच अशा पूर्ण विश्वासाने वाटचाल करत राहीन.” व्यक्तीने हा दृष्टिकोन चढत्यावाढत्या प्रमाणात बाळगला पाहिजे. कारण ह्या गोष्टी परिपूर्णतया एकदम होणे शक्य नाहीत; मानसिक व प्राणिक हालचाली आड येत राहतात; पण जर व्यक्ती वरीलप्रमाणे इच्छा बाळगेल, तर त्या गोष्टी व्यक्तीमध्ये विकसित होत राहतात.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 70-71)

मानसिक परिपूर्णत्व – ११

 

समर्पणाची प्रक्रिया म्हणजेच एक तपस्या आहे. इतकेच नव्हे तर, वास्तविक ती तपस्येची दुहेरी प्रक्रिया आहे; समर्पणाची प्रक्रिया आधीपासून चांगल्या रीतीने सुरु झालेली असतानाही, चढतेवाढते समर्पण दीर्घकाळपर्यंत टिकून राहते. नंतर मग एक वेळ अशी येते की, जेव्हा व्यक्तीला ईश्वरी अस्तित्व आणि ईश्वरी शक्ती सातत्याने आणि अधिकाधिक रीतीने जाणवू लागते; तीच सारे काही करत आहे असे अधिकाधिक जाणवू लागते आणि त्यामुळे अगदी अतिशय अवघड अडचणीसुद्धा ह्या जाणिवेला धक्का पोहोचवू शकत नाहीत. आणि वैयक्तिक प्रयत्नांची आता आवश्यकता उरत नाही आणि ते शक्यही होत नाहीत. प्रकृतीचे ईश्वराच्या हाती पूर्ण समर्पण झाल्याची ही खूण असते. काही जण असेही असतात की, जे हा अनुभव येण्याच्या आधीच श्रद्धेच्या आधारे ही भूमिका घेतात. आणि जर व्यक्तीची भक्ती आणि श्रद्धा खूप बळकट असेल तर, या गोष्टी त्या अनुभवाप्रत व्यक्तीला घेऊन जातात. परंतु सर्वच जण अगदी सुरुवातीपासून अशी भूमिका घेऊ शकत नाहीत आणि कधीकधी तर हे धोकादायकसुद्धा ठरू शकते; कारण ईश्वर आहे असे समजून, त्यांनी स्वतःला एखाद्या चुकीच्या शक्तीच्या हाती, सोपवून देण्याची शक्यता असते. पण बहुतेकांच्या बाबतीत तरी, त्यांनी तपस्येच्या माध्यमातूनच समर्पणामध्ये वृद्धिंगत होणे आवश्यक असते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 82)

मानसिक परिपूर्णत्व – १०

 

देवावर श्रद्धा, विश्वास, ईश्वरी शक्तीप्रत आत्मदान आणि समर्पण या आवश्यक आणि अनिवार्य गोष्टी आहेत. पण देवावरील विश्वास हा, कनिष्ठ प्रकृतीच्या आवेगांप्रत शरणागती, दुर्बलता, निरुत्साह यांचा बहाणा बनता कामा नये. दिव्य सत्याच्या मार्गामध्ये जे काही आड येईल त्या सर्वांना सातत्याने नकार दिला पाहिजे; तो नकार आणि अथक अभीप्सा यांच्या समवेत त्या विश्वासाने मार्गक्रमण केले पाहिजे. ईश्वराप्रत समर्पण हे, स्वतःच्या इच्छांना, कनिष्ठ हालचालींना शरण जाण्याचे, किंवा स्वतःच्या अहंकाराला शरण जाण्याचे किंवा ईश्वराचे मायावी रूप धारण केलेल्या, अज्ञान व अंधकाराच्या कोणत्यातरी शक्तींना शरण जाण्याचे एक कारण, एक बुरखा, एक निमित्त बनता उपयोगाचे नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 87)

मानसिक परिपूर्णत्व – ०८

 

दिव्य शक्तीने सर्वाचा स्वीकार करावा आणि त्यात परिवर्तन घडवून आणावे म्हणून, तुमचे म्हणून जे काही आहे ते सर्व आणि तुम्ही स्वतः यांना, ईश्वराला समर्पित करणे म्हणजे आत्मसमर्पण.

*

स्वतःच्या कल्पना, इच्छा, सवयी यांचा आग्रह न धरता, सर्वत्र त्यांची जागा ईश्वरी सत्याला त्याच्या ज्ञानाद्वारे, त्याच्या इच्छेद्वारे आणि त्याच्या कार्याद्वारे घेता यावी म्हणून सहमती देणे म्हणजे समर्पण. स्वतःमध्ये जे काही आहे ते ईश्वराप्रत निवेदित करणे, व्यक्तीने ती स्वतः जे आहे ते आणि तिच्यापाशी जे काही आहे ते ईश्वराप्रत अर्पण करणे, म्हणजे समर्पण !

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 67)

मानसिक परिपूर्णत्व – ०७

 

ईश्वराप्रत केलेले आत्मदान म्हणजे समर्पण. व्यक्ती जे काही आहे आणि तिच्यापाशी जे काही आहे ते सारे ईश्वराला देऊ करणे; काहीही स्वत:चे नाही असे समजणे; इतर कोणतीही आज्ञा न पाळता, केवळ ईश्वरी संकल्पाच्या आज्ञेचे पालन करणे; अहंकारासाठी नाही तर, ईश्वरासाठी जीवन व्यतीत करणे म्हणजे समर्पण.
*
जे हातचे काहीही राखून न ठेवता, स्वतःच्या सर्व अंगांनिशी ईश्वराप्रत स्वतःला देऊ करतात, त्यांना ईश्वर स्वतःलाच देऊन बसतो. आणि मग त्यांना स्थिरता, प्रकाश, शक्तिसामर्थ्य, आनंद, स्वातंत्र्य, विशालता, ज्ञानाची उत्तुंगता, आनंदसागर या गोष्टी प्राप्त होतात.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 67)