Tag Archive for: संकल्पना

आत्मसाक्षात्कार – २५

(मागील भागावरून पुढे…)

इथे तुम्ही कोणतीही चूक करता कामा नये. कारण ही चूक म्हणजे स्वतःला न जाणणे. तीच तुमच्या सर्व दुःखांचे उगमस्थान असते आणि तुमच्या सर्व अध:पतनाचे कारण असते.

तुम्हाला जो ‘मी’ आहे असे वाटते, त्या ‘मी’च्या अतीत तुम्ही गेलेच पाहिजे आणि तुम्ही ज्याला मनुष्य म्हणून ओळखता तो मनुष्य म्हणजे प्रकट ‘पुरुष’ असतो. आणि हा मनुष्य म्हणजे कोण? मनुष्य म्हणजे प्राण आणि जडभौतिक शरीर यांचा गुलाम असलेला मनोमय पुरुष असतो. आणि जेथे तो प्राण व शरीर यांचा गुलाम झालेला नसतो, तेथे तो त्याच्या मनाचा गुलाम असतो. पण ही फार मोठी गुलामी असते, कारण मनाचे गुलाम असणे म्हणजे मिथ्यत्वाचे, मर्यादिततेचे आणि व्यक्ताचे, दृश्याचे (apparent) गुलाम असणे होय. जो ‘स्व’ हा मन, प्राण आणि शरीर यांच्या पडद्याआड अंतरंगामध्ये असतो, तो ‘स्व’ तुम्ही बनले पाहिजे. आध्यात्मिक बनणे, दिव्य बनणे, अतिमानव, खरा ‘पुरुष’ बनणे म्हणजे ‘स्व’ बनणे. कारण मनोमय पुरुषाच्या ऊर्ध्वस्थित जर कोणी असेल तर तो ‘अतिमानव’ (superman) असतो.

अतिमानव बनणे म्हणजे तुम्ही तुमच्या मनाचे, तुमच्या प्राणाचे आणि तुमच्या शरीराचे स्वामी बनणे; आत्ता तुम्ही ज्या प्रकृतीच्या हातचे साधन आहात, त्या प्रकृतीचे तुम्ही सम्राट बनणे. आत्ता तुम्ही तिच्या पायाखाली आहात, तेच तुम्ही तिच्याही वर जाण्यासाठी उचलले जाणे म्हणजे अतिमानव बनणे. अतिमानव बनणे म्हणजे गुलाम नव्हे तर, मुक्त होणे; विभक्त असणे नव्हे तर एकत्व पावणे; मृत्युने झाकोळलेले नसणे तर अमर्त्य असणे, अंधकारमय नव्हे तर संपूर्ण प्रकाशमान असणे; दुःखशोक यांच्या खेळामध्ये नसणे तर पूर्णतया आनंदमय असणे; दुर्बलतेच्या गर्तेत जाऊन पडणे नव्हे तर शक्तिसामर्थ्यामध्ये उन्नत होणे. अतिमानव बनणे म्हणजे अनंतामध्ये जीवन जगणे आणि सांत गोष्टींवर (finite) ताबा मिळवणे. अतिमानव बनणे म्हणजे ईश्वरामध्ये जीवन जगणे आणि त्याच्या अस्तित्वामध्ये राहून त्याच्याशी एकत्व अनुभवणे. हे सर्व बनणे आणि त्यापासून प्रवाहित होणाऱ्या साऱ्या गोष्टी बनणे म्हणजे ‘स्व’ बनणे. (क्रमश:)

श्रीअरविंद (CWSA 12 : 150-151)

आत्मसाक्षात्कार – २२

पूर्णयोगाचे मूलभूत साक्षात्कार खालीलप्रमाणे आहेत.

१) संपूर्ण भक्ती ही ज्यायोगे हृदयाची मुख्य प्रेरणा व विचारांची स्वामिनी बनेल आणि ज्यायोगे जीवन व कर्म ‘श्रीमाताजीं’च्या आणि त्यांच्या ‘उपस्थिती’च्या नित्य एकत्वात घडत राहील अशा प्रकारचे चैत्य, अंतरात्मिक परिवर्तन (psychic change) घडणे.

२) शरीराच्या पेशी न्‌ पेशी ज्यामुळे भारल्या जातील अशा प्रकारे, ‘उच्चतर चेतने’च्या ‘शांती, प्रकाश, शक्ती’ इत्यादी गोष्टींचे मस्तकाद्वारे व हृदयाद्वारे संपूर्ण अस्तित्वामध्ये अवतरण होणे.

३) सर्वत्र अनंतत्वाने वसणाऱ्या ‘एकमेवाद्वितीय’ अशा ईश्वराची व श्रीमाताजींची अनुभूती येणे आणि त्या अनंत चेतनेमध्ये वास्तव्य घडणे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 319)

आत्मसाक्षात्कार – ०५

साधक : पूर्णयोगामध्ये ‘साक्षात्कारा’चे स्वरूप काय असते?

श्रीअरविंद : या योगामध्ये आपण सत्य-चेतना’ (Truth-consciousness) समग्र अस्तित्वामध्ये उतरवू इच्छित आहोत. अस्तित्वाचा कोणताही भाग त्याविना रिक्त राहता कामा नये. हे कार्य स्वयमेव ‘उच्चतर शक्ती’द्वारेच केले जाऊ शकते. मग तुम्ही काय करणे आवश्यक असते? तर, तुम्ही स्वतःला तिच्याप्रत खुले करायचे असते.

साधक : उच्चतर शक्तीच जर कार्य करणार असेल तर मग ती सर्व माणसांमध्येच ते का करत नाही?

श्रीअरविंद : कारण, सद्यस्थितीत, मनुष्य त्याच्या मनोमय अस्तित्वामध्ये, त्याच्या प्राणिक प्रकृतीमध्ये आणि त्याच्या शारीर-चेतनेमध्ये आणि त्यांच्या मर्यादांमध्ये बंदिस्त आहे. तुम्ही स्वतःला खुले केले पाहिजे. खुले करणे (an opening) म्हणजे मला असे म्हणायचे आहे की, ऊर्ध्वस्थित असणारी ‘शक्ती’ खाली अवतरित व्हावी म्हणून हृदयामध्ये अभीप्सा (Aspiration) बाळगली पाहिजे आणि ‘मना’मध्ये किंवा ‘मना’च्या वर असणाऱ्या पातळ्यांमध्ये त्या शक्तीप्रत खुले होण्याची इच्छा बाळगली पाहिजे.

उच्चतर शक्ती कार्य करू लागल्यावर प्रथम ती अस्तित्वाच्या सर्व भागांमध्ये शांती प्रस्थापित करते आणि ऊर्ध्वमुख खुलेपणा आणते. ही शांती म्हणजे केवळ मानसिक शांती नसते तर, ती शक्तीने ओतप्रोत भरलेली असते आणि त्यामुळे अस्तित्वामध्ये कोणतीही क्रिया घडली तरी समता, समत्व हा तिचा पाया असतो आणि शांती व समता कधीही विचलित होत नाहीत. ऊर्ध्वदिशेकडून शांती, शक्ती व हर्ष या गोष्टी अवतरित होतात. त्याचबरोबरीने उच्चतर शक्ती, आपल्या प्रकृतीच्या विविध भागांमध्ये परिवर्तन घडवून आणते, जेणेकरून हे भाग उच्चतर शक्तीचा दबाव सहन करू शकतील.

टप्प्याटप्प्याने आपल्यामध्ये ज्ञानदेखील विकसित व्हायला लागते आणि ते आपल्या अस्तित्वामधील कोणत्या गोष्टी काढून टाकणे आवश्यक आहे आणि कोणत्या गोष्टी जपून ठेवणे आवश्यक आहे हे आपल्याला दाखवून देते. खरंतर, ज्ञान आणि मार्गदर्शन दोन्ही गोष्टी एकत्रितपणे येतात. आणि त्यासाठी तुम्ही त्या मार्गदर्शनाला सातत्याने संमती देणे आवश्यक असते. एका बाजूपेक्षा दुसऱ्या बाजूने होणारी प्रगती काहीशी अधिक होत आहे, असे असू शकते. परंतु काहीही असले तरी, उच्चतर शक्तीच कार्य करत असते. बाकी सर्व गोष्टी या अनुभव आणि शक्तीच्या गतिविधीशी संबंधित असतात.

– श्रीअरविंद (Evening talks with Sri Aurobindo : 34-35)

आत्मसाक्षात्कार – ०४

साधक : माताजी, ‘ईश्वराचा साक्षात्कार होणे’ याचा नेमका काय अर्थ आहे ?

श्रीमाताजी : स्वत:च्या अंतरंगात असणाऱ्या किंवा आध्यात्मिक शिखरावर असणाऱ्या ‘ईश्वरी उपस्थिती’बाबत सजग होणे, सचेत होणे आणि एकदा का तुम्ही त्या ईश्वरी उपस्थितीबाबत सचेत झालात की, ईश्वराच्या इच्छेव्यतिरिक्त, तुमची स्वतःची अशी कोणतीही स्वतंत्र इच्छा शिल्लक राहणार नाही, इतक्या पूर्णपणे त्याला समर्पित होणे आणि अंतिमतः स्वत:ची चेतना ही त्याच्या चेतनेशी एकरूप करणे, याला म्हणतात ‘ईश्वराचा साक्षात्कार’!

*

‘ईश्वराचा साक्षात्कार’ होणे अशक्य आहे असा या जगात कोणीही नाही. मात्र काही जणांना त्यासाठी अनेक जन्म लागतील, तर काहीजण अगदी याच जन्मामध्ये तो साध्य करून घेऊ शकतील. हा इच्छाशक्तीचा प्रश्न आहे. इथे निवड तुम्ही करायची असते. पण मी हे निश्चितपणे सांगेन की, सद्यकालीन परिस्थिती त्यासाठी विशेष अनुकूल आहे.

– श्रीमाताजी (CWM 16 : 409-410)

आत्मसाक्षात्कार – ०२

आपल्यासाठी ‘ईश्वरा’चे तीन पैलू असतात.

१) सर्व वस्तुंच्या व व्यक्तींच्या अंतरंगामध्ये व पाठीमागे असणारे ‘चैतन्य’ आणि ‘विश्वात्मा’ म्हणजे ‘ईश्वर’. ज्याच्यापासून आणि ज्याच्यामध्ये विश्वातील सर्वाचे आविष्करण झाले आहे तो म्हणजे ईश्वर. सद्यस्थितीत हे आविष्करण अज्ञानगत असले तरीसुद्धा ते ईश्वराचेच आविष्करण आहे.

२) आपल्या अंतरंगातील, आपल्या अस्तित्वाचा ‘स्वामी’ व ‘चैतन्य’ म्हणजे ‘ईश्वर’. आपण त्याची सेवा केली पाहिजे; आपण आपल्या सर्व वर्तनामधून त्याची इच्छा अभिव्यक्त करायला शिकले पाहिजे, तसे केल्यामुळे आपल्याला अज्ञानामधून प्रकाशाकडे उन्नत होता येईल.

३) परात्पर ‘अस्तित्व’ आणि ‘चैतन्य’ म्हणजे ‘ईश्वर’. तो सर्व आनंद, प्रकाश, दिव्य ज्ञान आणि शक्ती आहे. त्या सर्वोच्च ईश्वरी अस्तित्वाकडे व त्याच्या प्रकाशाकडे आपण उन्नत झाले पाहिजे; तसेच त्याची सत्यता आपण आपल्या चेतनेमध्ये व आपल्या जीवनामध्ये अधिकाधिक उतरविली पाहिजे.

सर्वसाधारण जीवनात आपण अज्ञानामध्ये जगत असतो आणि आपल्याला ईश्वर काय आहे हे माहीत नसते. सामान्य प्रकृतीच्या शक्ती या अदिव्य शक्ती (undivine forces) असतात कारण त्या अहंकार, इच्छावासना व अचेतनेचा एक पडदा विणतात आणि त्यामुळे ईश्वर आपल्यापासून झाकलेला राहतो.

जी चेतना, ‘ईश्वर’ म्हणजे काय हे जाणते आणि त्यामध्ये जाणिवपूर्वक निवास करते, अशा उच्चतर व सखोल चेतनेमध्ये प्रविष्ट व्हायचे असेल तर, आपण कनिष्ठ प्रकृतीच्या शक्तींपासून आपली सुटका करून घेतली पाहिजे आणि दिव्य शक्तीच्या क्रियेसाठी आपण स्वत:ला खुले केले पाहिजे. तसे केल्याने ती दिव्य शक्ती, आपल्या चेतनेचे दिव्य प्रकृतीमध्ये रूपांतर घडवून आणेल.

ही आहे ‘ईश्वरा’ची, ‘दिव्यत्वा’ची संकल्पना आणि तिच्यापासून आपण प्रारंभ केला पाहिजे. दिव्यत्वाच्या सत्याचा साक्षात्कार, चेतना खुली होण्याने आणि तिच्या परिवर्तनामुळेच होणे शक्य असते.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 07-08)

साधना, योग आणि रूपांतरण – २६६

प्राणाचे रूपांतरण

संपूर्ण प्राणिक प्रकृतीचे शुद्धीकरण व्हावे आणि सर्व अहंभावात्मक इच्छावासना व आवेग नाहीसे होऊन, ‘ईश्वरी संकल्पा’शी सुसंगत असतील तेवढ्याच शुद्ध, सात्त्विक वृत्तीप्रवृत्ती शिल्लक राहाव्यात यासाठी, संपूर्ण प्राणिक प्रकृती आणि तिच्या वृत्तीप्रवृत्ती ‘ईश्वरा’ला अर्पण करणे म्हणजे प्राणाचे स्वाहाकरण (vital consecration) होय.
*
साधक : ‘प्राणाचे स्वाहाकरण’ म्हणजे काय ?
श्रीअरविंद : समग्र प्राणिक प्रकृती ही कनिष्ठ प्रकृतीशी नव्हे तर, श्रीमाताजींशी संबंधित व्हावी यासाठी, समग्र प्राणिक प्रकृती श्रीमाताजींना समर्पित करणे आणि ती शुद्ध बनविणे, म्हणजे ‘प्राणाचे स्वाहाकरण’.
*
तुम्हाला ज्या मुक्तीची आस लागली आहे ती साधकासाठी खरोखरच अत्यंत आवश्यक असते. आणि याचा अर्थ, प्रकृतीच्या समग्र प्राणिक भागाच्या मुक्तीची आस असा आहे. मात्र ही गोष्ट एकाएकी किंवा इतक्या सहजतेने करता येणे शक्य नसते. तुमची तळमळ ही सातत्यपूर्ण, धीरयुक्त आणि चिकाटीची असली पाहिजे, (ती तशी असेल तरच) अंतिमतः तिचा विजय होईल. वरून उच्चतर स्थिरता आणि शांती आपल्या प्रणालीमध्ये (system) खाली अवतरावी म्हणून तिला आवाहन करणे ही मुख्य गोष्ट असते; ती अवतरित होत आहे अशी जाणीव जर तुम्हाला होत असेल तर तो मुक्तीचा आरंभ असतो.
*
खरी चेतना तुमच्या प्राणामध्ये अवतरित होत होती, परंतु तुमच्या शरीरामध्ये पुन्हा एकदा जुनीच अडचण उफाळून आली आहे, पुन्हा एकदा प्राणिक हल्ला झालेला आहे. जेव्हा तुमचा प्राण अशांत, विचलित न होता, किंवा आक्रंदन न करता, सदोदित या हल्ल्याला सामोरा जाऊ शकेल आणि तुमच्या अंतरंगात स्थिरशांत असणारी प्रतिकार व अस्वीकार करणारी शक्ती जेव्हा दूर लोटून तिचा प्रतिबंध करेल, तेव्हा ती संपूर्ण मुक्तीची खूण असेल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 113, 313), (CWSA 31 : 111, 111 )

साधना, योग आणि रूपांतरण – २४२

नमस्कार वाचकहो,

मानवी प्रकृतीचे रूपांतरण हे पूर्णयोगाचे एक वैशिष्ट्य आहे.

‘रूपांतरण कोणत्या शक्तीद्वारे घडून येणार’ या निकषावर आधारित असलेले, आंतरात्मिक रूपांतरण, आध्यात्मिक रूपांतरण आणि अतिमानसिक रूपांतरण हे तीन प्रकार आपण आजवर पाहिले. अगदी सारांशरूपाने सांगायचे तर, चैत्य पुरुषाद्वारे होणारे रूपांतरण हे आंतरात्मिक रूपांतरण, उच्चतर चेतनेद्वारे होणारे रूपांतरण हे आध्यात्मिक रूपांतरण आणि अतिमानसिक शक्तीद्वारे होणारे रूपांतरण हे अतिमानसिक रूपांतरण असते हे आता आपल्याला ज्ञात झाले आहे.

आता ‘रूपांतरण कोणाचे’ या निकषावर आधारित असलेले मानसिक, प्राणिक व शारीरिक रूपांतरण हे तीन प्रकार आपल्याला समजावून घ्यायचे आहेत. या रूपांतरणामध्ये मन, प्राण आणि शरीर यांच्या रूपांतरणाचा समावेश होतो. तसेच पुढे जाऊन, आपल्यामधील अवचेतन, आणि अचेतनाचे रूपांतरणही पूर्णयोगामध्ये अभिप्रेत असते.

मनुष्य देहरूपात आला तेव्हा त्याला स्वत:च्या मूळ स्वरूपाचे, आणि स्वत:च्या अंतरीच्या दिव्यत्वाचे विस्मरण झाले. आणि त्याच्या मन, प्राण व शरीर या साधनांमध्ये विकार निर्माण झाले. आणि त्यामुळेच दिव्य जीवनाकडे चालणाऱ्या मार्गक्रमणामध्ये, साधनेमध्ये अडचणी निर्माण होतात. त्यामुळे त्यांच्यावर मात करून पुढे जाणे हे साधकासाठी आवश्यक ठरते. त्यावर मात करायची झाली तर त्याचे नेमके स्वरूप, त्याची लक्षणे, त्याची गुणवैशिष्ट्ये व मर्यादा माहीत असणे आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टींचा म्हणजे, मन, प्राण, शरीर यांचे स्वरूप काय आहे, त्यांची बलस्थानं कोणती व त्यांच्या मर्यादा कोणत्या याचा सारासार आणि सांगोपांग विचार श्रीअरविंद व श्रीमाताजी यांनी केला आहे. हा विचार इतका विस्तृत व सखोल आहे की, त्या सगळ्याचा येथे समावेश करायचा ठरवले तर एक स्वतंत्र ग्रंथच तयार होईल. त्यामुळे इतक्या तपशिलात न जाता, परंतु तरीही त्यातील गाभाभूत विचार वाचकांच्या हाती लागावा, असा आमचा प्रयत्न आहे. आता आपण क्रमशः मन, प्राण व शरीर यांच्या रूपांतरणासाठी साहाय्यक होतील असे विचार समजावून घेण्याचा प्रयत्न करू या. उद्यापासून ‘मानसिक रूपांतरण’ हा भाग सुरू करत आहोत.

धन्यवाद.
संपादक, अभीप्सा मराठी मासिक

साधना, योग आणि रूपांतरण – २४१

‘अंतरात्म्या’ची प्राप्ती किंवा ‘ईश्वर’ प्राप्ती हा पूर्णयोगाचा पाया असला आणि त्याविना रूपांतरण शक्य नसले तरी, पूर्णयोग म्हणजे केवळ ‘अंतरात्म्या’च्या प्राप्तीचा किंवा ‘ईश्वर’ प्राप्तीचा योग नाही. तर तो व्यक्तीच्या रूपांतरणाचा योग आहे.

या रूपांतरणामध्ये चार घटक असतात. आंतरात्मिक खुलेपणा, अज्ञेय प्रांत ओलांडून जाणे किंवा अज्ञेय प्रांतामधून संक्रमण करणे, आध्यात्मिक मुक्ती, आणि अतिमानसिक परिपूर्णत्व. या चार घटकांपैकी कोणताही एक घटक जरी साध्य झाला नाही तरी हा योग अपूर्ण राहतो.

– श्रीअरविंद (CWSA 12 : 367-368)

साधना, योग आणि रूपांतरण – २४०

दिव्य जीवनासाठी फक्त उच्चतर मानसिक चेतनेच्या संपर्कात येणे पुरेसे नसते. ती फक्त एक अनिवार्य अशी अवस्था असते. दिव्य जीवनासाठी अधिक उच्च आणि अधिक शक्तिशाली स्थानावरून ‘दिव्य शक्ती’चे अवतरण होणे आवश्यक असते.

पुढील सर्व गोष्टी सद्यस्थितीत अदृश्य असलेल्या शिखरावरून अवतरित होणाऱ्या ‘शक्ती’विना अशक्यप्राय आहेत :
१) उच्चतर चेतनेचे अतिमानसिक प्रकाश आणि शक्तीमध्ये रूपांतरण,
२) प्राण आणि त्याच्या जीवनशक्तीचे विशुद्ध, विस्तृत, स्थिरशांत, दिव्य ऊर्जेच्या शक्तिशाली आणि उत्कट साधनामध्ये रूपांतरण,
३) तसेच स्वयमेव शरीराचे दिव्य प्रकाश, दिव्य कृती, सामर्थ्य, सौंदर्य आणि हर्ष यांच्यामध्ये रूपांतरण

‘ईश्वरा’प्रत आरोहण या एका गोष्टीबाबत इतर योग आणि पूर्णयोग यांमध्ये साधर्म्य आढळते परंतु पूर्णयोगामध्ये केवळ आरोहण पुरेसे नसते तर मन, प्राण, शरीर यांच्या सर्व ऊर्जा रूपांतरित करण्यासाठी ‘ईश्वरा’चे अवतरण होणेदेखील आवश्यक असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 118-119)

साधना, योग आणि रूपांतरण – २३९

(आपल्या व्यक्तित्वामध्ये दोन प्रणाली कार्यरत असतात. एक अध-ऊर्ध्व म्हणजे जडभौतिकापासून ते सच्चिदानंदापर्यंत असणारी प्रणाली आणि दुसरी बाहेरून आत जाणारी म्हणजे बाह्य व्यक्तित्व ते चैत्य पुरुष अशी असणारी केंद्रानुगामी प्रणाली. या दोन्ही प्रणालींचा येथे संदर्भ आहे.)

रूपांतरणासाठी ‘संपूर्ण’ आणि ‘समग्र’ ईश्वराधीनतेची (consecration) आवश्य कता असते. सर्वच प्रामाणिक साधकांची तीच आस असते, नाही का?

‘संपूर्ण’ ईश्वराधीनता म्हणजे ऊर्ध्व-अधर (vertically) अशा पद्धतीने ईश्वराधीन होणे. येथे व्यक्ती सर्व अवस्थांमध्ये, म्हणजे अगदी जडभौतिक अवस्थांपासून ते अगदी सूक्ष्म अशा सर्व अवस्थांपर्यंत, सर्वत्र ईश्वराधीन असते.

आणि ‘समग्र’ ईश्वराधीनता म्हणजे क्षितिजसमांतर (horizontally) पद्धतीने ईश्वराधीन होणे. शरीर, प्राण, मन यांनी मिळून ज्या बाह्यवर्ती व्यक्तित्वाची घडण झालेली असते त्या व्यक्तित्वाच्या विभिन्न आणि बरेचदा परस्परविरोधी असणाऱ्या सर्व घटकांमध्ये ईश्वराधीनता असणे म्हणजे समग्र ईश्वराधीन असणे.

– श्रीमाताजी (CWM 15 : 88)