Tag Archive for: संकल्पना

साधना, योग आणि रूपांतरण – २१७

चैत्य पुरुष (psychic being) अग्रस्थानी आणा आणि मन, प्राण व शरीरावर त्याची सत्ता चालवीत त्याला तिथे सुस्थिर करा. ज्यामुळे चैत्यपुरुष त्याच्या एकाग्र अभीप्सेची, विश्वासाची, श्रद्धेची आणि समर्पणाची शक्ती त्या तिघांपर्यंत पोहोचवू शकेल. आणि प्रकृतीमधील अनुचित असे जे काही आहे, जे ‘प्रकाश’ आणि ‘सत्य’ यांपासून दूर जाऊन, अहं व प्रमादाकडे वळले आहे त्याचा थेट आणि तात्काळ बोध तो चैत्यपुरुष मन, प्राण व शरीराला करून देऊ शकेल.

सर्व प्रकारचे अहंकार काढून टाका; तुमच्या चेतनेच्या प्रत्येक गतिविधीमधून ते अहंकार काढून टाका. वैश्विक चेतनेचा विकास करा. अहं-केंद्रित दृष्टिकोन विशालतेत, निर्व्यक्तिकतेत (impersonality), वैश्विक ‘ईश्वरा’च्या जाणिवेत, वैश्विक शक्तींच्या बोधात, वैश्विक आविष्काराच्या, (ईश्वरी) लीलेच्या आकलनात आणि साक्षात्कारात लीन होऊ द्या.

जीवात्मा हा ‘ईश्वरी’ अंश असतो, ‘जगन्माते’पासून त्याची उत्त्पत्ती झालेली असते आणि तो आविष्करणाचे साधन असतो. (तुमच्या) अहंने ज्याची जागा घेतली आहे तो जीवात्मा शोधून काढा. ‘ईश्वरा’चा अंश असल्याची आणि त्याचे एक साधन असल्याची जाणीव ही सर्व अभिमानांपासून, अहंच्या जाणिवेपासून किंवा त्याच्या हक्कापासून, श्रेष्ठतेच्या आग्रहीपणापासून, मागणी वा इच्छावासानांपासून मुक्त असली पाहिजे. कारण हे सर्व घटक जर तिथे असतील तर, ती खरी गोष्ट नाही असे समजावे. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 333)

साधना, योग आणि रूपांतरण – २१६

चैत्य पुरुष (psychic being) हा हृदयकेंद्राच्या मागे स्थित राहून मन, प्राण आणि शरीराला आधार पुरवत असतो. चैत्य किंवा आंतरात्मिक रूपांतरणामध्ये (psychic transformation) तीन मुख्य घटक असतात.
१) निगूढ अशा आंतरिक मन, आंतरिक प्राण आणि आंतरिक शरीराच्या खुलेपणामुळे (opening), पृष्ठवर्ती मन, प्राण आणि शरीर यांच्या पाठीमागे असलेल्या साऱ्याची व्यक्तीला जाणीव होते.
२) चैत्य पुरुषाच्या किंवा आत्म्याच्या खुलेपणामुळे, चैत्य पुरुष अग्रस्थानी येऊन मन, प्राण आणि शरीर यांचे शासन करतो आणि त्यांना ‘ईश्वरा’कडे वळवितो.
३) समग्र कनिष्ठ अस्तित्व आध्यात्मिक सत्याप्रत उन्मुख होते, या शेवटच्या गोष्टीला परिवर्तनाचा आंतर-आध्यात्मिक भाग (The psycho-spiritual part) असे म्हणता येईल.

आंतरात्मिक रूपांतरण हे व्यक्तीला तिच्या व्यक्तिगततेच्या अतीत, वैश्विकतेमध्ये घेऊन जाऊ शकते. एवढेच काय पण, गुह्य (occult) उन्मुखतासुद्धा वैश्विक मन, वैश्विक प्राण आणि वैश्विक जडभौतिकाशी व्यक्तीचा संबंध प्रस्थापित करते. अंतरात्म्याला सर्व जीवनाशी, सृष्टीशी (all existence) असलेल्या संपर्काची जाणीव असते. त्याला ‘आत्म्या’ची एकात्मता सर्वत्र अनुभवास येते, त्याला वैश्विक प्रेम आणि इतर साक्षात्कारांची प्रचिती येते आणि ती त्या अंतरात्म्यास वैश्विक चेतनेकडे घेऊन जाते.

परंतु हा सर्व ऊर्ध्वस्थित असणाऱ्या आध्यात्मिकतेस उन्मुख झाल्याचा परिणाम असतो. आणि तो परिणाम मन, प्राण व शरीरामध्ये आध्यात्मिक प्रकाशाचे आणि सत्याचे प्रतिबिंब पडल्यामुळे किंवा त्या प्रकाशाचा आणि सत्याचा मन, प्राण व शरीरामध्ये अंतःप्रवेश झाल्यामुळे घडून येतो. जेव्हा व्यक्ती मनाच्या पलीकडे चढून जाते आणि तेथे राहून, वरून सर्वांचा कारभार चालवू लागते तेव्हा मूलभूत आध्यात्मिक रूपांतरणास (spiritual transformation) सुरुवात होते किंवा ते रूपांतरण शक्य होते.

आंतरात्मिक रूपांतरणामध्येसुद्धा व्यक्ती एक प्रकारे मन, प्राण आणि शरीर यांच्या अतीत जाऊ शकते आणि परत येऊ शकते परंतु शिखरस्थानी असलेल्या चेतनेमध्ये म्हणजे जेथे ‘अधिमानसा’चे स्थान असते तेथे, मानवी मनाच्या वर असणाऱ्या इतर स्तरांमध्ये, व्यक्ती अजूनपर्यंत स्थित झालेली नसते. जेव्हा सृष्टीच्या दोन गोलार्धांमध्ये असणारे किंवा कनिष्ठ आणि ऊर्ध्व गोलार्ध यांच्यामध्ये असणारे झाकण, आच्छादन दूर केले जाते आणि ‘अधिमानसा’च्या ऐवजी ‘अतिमानस’ जेव्हा सृष्टीची चालकशक्ती बनते तेव्हा अतिमानसिक रूपांतरण (supramental transformation) घडून येणे शक्य असते.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 332-333)

साधना, योग आणि रूपांतरण – २१४

आध्यात्मिकीकरण (Spiritualisation) म्हणजे उच्चतर शांती, शक्ती, प्रकाश, ज्ञान, विशुद्धता, आनंद इत्यादीचे अवतरण. या गोष्टी ‘उच्च मना’पासून ‘अधिमानसा’पर्यंतच्या (Higher Mind to Overmind) कोणत्याही उच्च स्तराशी संबंधित असू शकतात. कारण त्यांपैकी कोणत्याही स्तरावर ‘आत्म्या’चा साक्षात्कार होऊ शकतो.

आध्यात्मिकीकरणाद्वारे व्यक्तिनिष्ठ रूपांतरण घडून येते. यामध्ये साधनभूत प्रकृतीचे इतपतच रूपांतरण घडते की जेणेकरून त्या प्रकृतीकडून, ‘विश्वात्म्या’ला जे कार्य करून घ्यायचे असते त्याचे ती (सुयोग्य) साधन होऊ शकेल. हे होत असताना अंतरंगातील आत्मा स्थिर, मुक्त आणि ‘ईश्वरा’शी एकत्व पावलेला असा राहतो.

परंतु हे व्यक्तिगत रूपांतरण अपूर्ण असते. जेव्हा ‘अतिमानसिक’ परिवर्तन (Supramental change) घडून येते तेव्हाच साधनभूत ‘प्रकृती’चे संपूर्ण रूपांतरण होऊ शकते. तोपर्यंत प्रकृती अनेक अपूर्णतांनी भरलेली असते. परंतु उच्चतर स्तरावरील आत्म्याला त्याने काही फरक पडत नाही कारण तो या सर्वापासून मुक्त असतो, त्याच्यावर या गोष्टींचा कोणताही परिणाम होत नाही. आंतरिक पुरुष देखील अगदी आंतरिक शरीरापर्यंत मुक्त आणि अप्रभावित राहू शकतो. ‘अधिमानस’ हे परिणामकारक ‘दिव्य ज्ञाना’च्या कार्याच्या मर्यादांच्या, ‘दिव्य शक्ती’च्या कार्याच्या मर्यादांच्या अधीन असते. ते आंशिक आणि मर्यादित ‘दिव्य सत्या’दी गोष्टींच्या अधीन असते. केवळ ‘अतिमानसा’मध्येच संपूर्ण ‘सत्-चेतना’ (Truth consciousness) व्यक्तीमध्ये अवतरित होऊ शकते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 404)

साधना, योग आणि रूपांतरण – ३९

(पूर्णयोगांतर्गत साक्षात्कारामध्ये, स्वत:मधील ईश्वराचे दर्शन, विश्वगत ईश्वराचे दर्शन, विश्वातीत ईश्वराचे दर्शन या तीन साक्षात्कारांचा समावेश होतो. त्यातील ‘विश्वगत ईश्वराचे दर्शन’ घेण्याचा मार्ग श्रीअरविंद येथे सांगत आहेत.
श्रीअरविंदलिखित Synthesis of Yoga या पुस्तकामधील एक उतारा आणि नंतर त्याचे श्रीअरविंदकृत स्पष्टीकरण)

…ही एकाग्रता ‘संकल्पने’वर आधारित असते. कारण या ‘संकल्पने’च्या माध्यमातून मनोमय पुरुष सर्व अभिव्यक्तीच्या अतीत उन्नत होतो; जे अभिव्यक्त झाले आहे त्याच्याप्रत तो उन्नत होतो; खुद्द ती संकल्पना ही ज्याचे केवळ एक साधन आहे अशा ‘सद्वस्तु’प्रत तो उन्नत होतो. ‘संकल्पने’वर एकाग्रता केल्याने, आपण आज जे आहोत ते आपले मानसिक अस्तित्व, आपल्या मानसिकतेच्या कक्षा ओलांडून खुले होते आणि त्या चेतनेच्या एका स्थितीप्रत, जिवाच्या एका स्थितीप्रत, सचेत-पुरुषाच्या शक्तीच्या स्थितीप्रत आणि सचेत-पुरुषाच्या परमानंदाप्रत येऊन पोहोचते. ती संकल्पना ज्याच्याशी संबंधित असते आणि ती संकल्पना ज्याचे प्रतीक असते, ज्याची गतिविधी आणि लय असते अशा सद्वस्तुप्रत ती येऊन पोहोचते.

*

(वरील उताऱ्याचे श्रीअरविंदकृत स्पष्टीकरण…)

येथे वेदान्ती ज्ञानाच्या पद्धतीचे उदाहरण घेता येईल. यामध्ये ‘ब्रह्म सर्वत्र उपस्थित आहे’ या संकल्पनेवर व्यक्ती लक्ष केंद्रित करते आणि झाडाकडे, आजूबाजूच्या वस्तुमात्रांकडे, त्यामध्ये ब्रह्माचा निवास आहे आणि ते झाड किंवा ती वस्तू केवळ एक रूप आहे, या संकल्पनेनिशी पाहते. जर ती एकाग्रता योग्य प्रकारची असेल तर कालांतराने, व्यक्तीला तेथे एका अस्तित्वाची, एका उपस्थितीची जाणीव होऊ लागते आणि तेव्हा मग समोर दिसणारे झाड हे जणू एखाद्या बाह्य आवरणासारखे दिसते आणि त्यामधील अस्तित्व किंवा उपस्थिती हीच एकमेव वस्तुस्थिती असल्याचे व्यक्तीला जाणवू लागते. कालांतराने मग संकल्पना गळून पडते, आणि त्याची जागा त्या वस्तुच्या थेट दर्शनाने घेतली जाते. आता मग संकल्पनेवर लक्ष एकाग्र करण्याची आवश्यकताच उरलेली नसते, कारण व्यक्ती आता त्याकडे गहनतर चेतनेच्या साहाय्याने पाहत असते. येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, संकल्पनेवर एकाग्रता करणे म्हणजे काही केवळ विचार करणे नसते, ते केवळ मननही नसते तर ती एकाग्रता म्हणजे त्या संकल्पनेच्या गाभ्यामध्ये केलेला आंतरिक निवास असतो.

– श्रीअरविंद (CWSA 23 : 321), (CWSA 29 : 305-306)