Tag Archive for: श्रद्धा

मानसिक परिपूर्णत्व – १४

 

ज्याचे अजूनपर्यंत आविष्करण झाले नाही, जे प्राप्त झाले नाही किंवा साध्य झाले नाही अशा गोष्टींकडे आत्म्याच्या साक्षीत्वाने पाहणे म्हणजे श्रद्धा. आपल्या अंतरंगामध्ये असणारा जो ज्ञाता, त्याला, कोणतेही संकेत मिळालेले नसतानासुद्धा ही जाणीव असते की, हे सत्य आहे किंवा अनुसरण्याजोगी वा प्राप्त करून घेण्याजोगी ही परमोच्च गोष्ट आहे. आपल्या अंतरंगामध्ये असणारी ही गोष्ट अशी असते की, जी मनाला निश्चित खात्री नसली, अगदी प्राण संघर्ष करत असला, बंड करत असला किंवा नकार देत असला तरीसुद्धा ती टिकून राहते. जो योगसाधना करतो आणि तरीही अशा तऱ्हेचे निराशेचे, अपयशाचे, अश्रद्धेचे आणि अंधाराचे दीर्घ कालावधी त्याच्या आयुष्यात आलेले नाहीत, असा कोण आहे? – पण तरीसुद्धा त्यामध्ये असे काहीतरी असते की, ज्यामुळे तो तग धरून राहतो. इतकेच नाही तर, वाटचाल करत राहतो, कारण त्याला जाणवत असते की, ज्याचे तो अनुसरण करत आहे ती गोष्ट सत्य आहे. आणि जाणवत असते म्हणण्यापेक्षा त्याला हे नक्की माहीत असते, असे म्हणणे अधिक योग्य ठरेल. ईश्वर अस्तित्वात आहे आणि तीच एक अशी गोष्ट आहे की, जिचे अनुसरण केले पाहिजे, त्याच्या तुलनेत जीवनातील दुसरी कोणतीच गोष्ट प्राप्त करून घेण्याजोगी नाही, ही जीवामध्ये उपजत असणारी श्रद्धाच, योगमार्गामधील मूलभूत श्रद्धा आहे. ह्या चढत्यावाढत्या श्रद्धेमुळेच तुम्ही या योगाकडे वळला आहात आणि तुमच्यामधील ही श्रद्धा अजूनही मृत झालेली नाही किंवा मंदावलेली नाही. तुमच्या पत्रावरून असे दिसून येते की, ती अधिक आग्रही आणि अतूट झाली आहे. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीमध्ये ती टिकून आहे तोपर्यंत ती व्यक्ती आध्यात्मिक जीवनासाठी निवडली गेली आहे, असे म्हणता येईल. मी तर असे म्हणेन की, त्याची प्रकृती ही कितीही अडथळेयुक्त असू दे, अडीअडचणी आणि नकारांनी ठासून भरलेली असू दे तरी, आणि अगदी अनेक वर्षे संघर्ष करत राहावा लागलेला असू दे तरीसुद्धा, व्यक्तीला आध्यात्मिक जीवनात यश मिळणार हे निश्चित.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 93)

मानसिक परिपूर्णत्व – १३

 

श्रद्धा ही कोणत्याही अनुभवावर अवलंबून असत नाही. ती अशी गोष्ट आहे की जी अनुभवपूर्व असते. व्यक्ती योगसाधनेला सुरुवात करते ती अनुभवाच्या बळावर नाही, तर ती सहसा श्रद्धेच्या बळावर सुरुवात करते. हे केवळ योगमार्ग आणि आध्यात्मिक जीवनाबाबतीतच आहे असे नाही; तर सामान्य जीवनात सुद्धा हेच लागू पडते. कार्यकर्ते, संशोधक, ज्ञाननिर्माते सुरुवात करतात ती श्रद्धेनेच आणि जोपर्यंत पुरावा सापडत नाही, किंवा ती गोष्ट घडून येत नाही तोपर्यंत निराशा आली, अपयश आले, विरोधी पुरावा सापडला, नकार मिळाला तरीदेखील ते त्या गोष्टीचा पाठपुरावा करत राहतात; कारण त्यांच्यामधीलच काहीतरी त्यांना सांगत असते की, यामध्ये तथ्य आहे, या गोष्टीचे अनुसरण केले पाहिजे, ही गोष्ट केली पाहिजे. आंधळी श्रद्धा ही चुकीची गोष्ट नाही का, असे रामकृष्णांना विचारले असताना ते तर पुढे जाऊन असे म्हणाले की, श्रद्धा एकाच प्रकारची असू शकते आणि ती म्हणजे आंधळी श्रद्धा. कारण श्रद्धा ही एकतर आंधळीच असते अन्यथा ती श्रद्धाच नसते, मग ती इतर काहीतरी असते – मग ते तर्कशुद्ध अनुमान, पुराव्याने सिद्ध केलेली प्रचिती किंवा स्थापित झालेले ज्ञान असते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 92-93)

जेव्हा तुम्ही योगमार्गाकडे वळता तेव्हा, तुमच्या सर्व मानसिक रचना आणि तुमचे सर्व प्राणिक मनोरे कोलमडून पडले तरी चालतील, अशी स्वत:ची तयारी ठेवली पाहिजे. तुमच्या श्रद्धेखेरीज तुम्हाला इतर कोणत्याही गोष्टीचा आधार नाही, अशा निराधार अवस्थेत हवेत लटकत राहण्याची तुमची तयारी असली पाहिजे. तुम्ही तुमचा भूतकालीन ‘स्व’ आणि त्याला चिकटून असलेले सर्व काही पूर्णांशाने विसरले पाहिजे, तुमच्या चेतनेमधून त्या उपटून फेकून दिल्या पाहिजेत आणि सर्व प्रकारच्या बंधनांपासून मुक्त अशा स्थितीत नव्याने जन्माला आले पाहिजे. तुम्ही काय होतात ह्याचा विचार करू नका, पण तुम्हाला काय व्हायचे आहे, त्याच अभीप्सेचा विचार करा; जे तुम्ही प्रत्यक्षात उतरवू पाहत आहात त्याच्यामध्येच तुम्ही असले पाहिजे. तुमच्या मृत भूतकाळाकडे पाठ फिरवा आणि भविष्याकडे पाहा. ईश्वर हाच तुमचा धर्म, ईश्वर हाच तुमचा देश, ईश्वर हेच तुमचे कुटुंब.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 82-84)

आणखीही एक गोष्ट असते. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार योगसाधना करत असता. तुम्हाला असे सांगण्यात आले असते की, “स्वतःला खुले करा, तुम्हाला शक्ती प्राप्त होईल.” तुम्हाला असे सांगण्यात आलेले असते की, ”श्रद्धा आणि सदिच्छा बाळगा, तुमचे संरक्षण केले जाईल.” आणि तुम्ही खरोखरच त्या चैतन्यामध्ये न्हाऊन निघता, त्या शक्तीमध्ये न्हाऊन निघता, त्या संरक्षणात न्हाऊन निघता आणि जेवढ्या प्रमाणात तुमच्यामध्ये श्रद्धा असते, जितके तुम्ही स्वतःला खुले करता, तेवढ्या प्रमाणात तुम्हाला ते सारे लाभते ; काही छोटे आंतरिक अडथळे आलेच तर, त्याचे निराकरण करण्यास, तसेच ते अडथळे आल्यानंतर, पुन्हा व्यवस्था प्रस्थापित करण्यास आणि तुम्हाला निरोगी ठेवण्यामध्ये त्या चैतन्याची तुम्हाला मदत होते. जे छोटेमोठे आघात तुमच्यावर झाले असते किंवा कदाचित जे अपघात होऊ शकले असते त्यापासून तुमचे संरक्षण करण्यासाठी त्याची तुम्हाला मदत होते.

पण जर का तुमच्यामध्ये, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये किंवा अगदी प्राणामध्ये किंवा मनामध्ये, किंवा अनेक भागांमध्ये किंवा अगदी एखाद्या भागामध्येही – ही अवतरित होणारी शक्ती ग्रहण करण्याची जर क्षमता नसेल, तर ती गोष्ट यंत्रामध्ये येणाऱ्या एखाद्या वाळूच्या कणाप्रमाणे गडबड करून जाते. सर्व काही सुरळीत चालू असणारे असे एक चांगले सुस्थितीतील यंत्र सुरु असते आणि अशावेळी तुम्ही जर त्यामध्ये एखादा वाळूचा कण टाकलात, तर अचानक सर्व काही बिघडून जाते आणि ते यंत्र थांबते. तर असा कोठेतरी ग्रहणशीलतेचा थोडासा अभाव असतो, येणारी शक्ती ग्रहण करण्यास कोणीतरी अक्षम असते, म्हणजे त्याने स्वतःला पूर्णपणे बंद करून घेतलेले असते (जेव्हा व्यक्ती त्याकडे पाहू लागते तेव्हा, कोठेतरी एखादा छोटासा काळा ठिपका असावा असे ते बनून जाते; दगडासारखी छोटीशी अगदी कठीण गोष्ट बनून जाते – शक्ती त्यामध्ये प्रवेश करू शकत नाही, ती गोष्ट शक्ती ग्रहण करणे नाकारते, एकतर ती करू शकत नाही किंवा ग्रहण करण्याची तिची इच्छा नसते) आणि त्यातूनच ताबडतोब एक मोठा असमतोल निर्माण होतो; आणि मग हीच गोष्ट, जी खरंतर ऊर्ध्वगामी वाटचाल करत होती, अद्भुतरित्या बहरत होती, तिला स्वतःलाच आजारी पडल्यासारखे वाटू लागते आणि याउलट जेव्हा तुम्ही अगदी सर्वसामान्य जीवन जगत असता, तेव्हा मात्र तुमचे आरोग्य उत्तम असते, सर्वकाही सुरळीत चालू असते, तक्रार करण्याजोगे काहीच नसते.

एखाद्या दिवशी तुम्ही एखादी नवीन संकल्पना समजावून घेतलेली असते, एक नवीनच आवेग निर्माण झालेला असतो, तुमच्यामध्ये जोरदार अभीप्सा असते आणि बरीच मोठी शक्ती तुम्ही ग्रहण केलेली असते आणि एखादी अद्भुत अनुभूती तुम्हाला आलेली असते, आंतरिक द्वारे खुली करणारा असा एखादा अनुभव तुम्हाला आलेला असतो, त्यातून तुम्हाला पूर्वी नसलेले ज्ञान मिळून गेलेले असते; अशा वेळी तुम्हाला खात्री असते की, सारे काही सुरळीत चालू आहे… आणि तुम्ही दुसऱ्याच दिवशी आजारी पडलेले असता. मग तुम्ही म्हणता, “हे काय? हे असे अजूनही चालूच आहे ? हे अशक्य आहे, असे घडता कामा नये.” पण मी अगदी आत्ता सांगितले त्याप्रमाणे ती गोष्ट म्हणजे वाळूचा कण होती. असे काहीतरी होते की जे ग्रहण करू शकत नव्हते. आणि ताबडतोब त्यातूनच असंतुलितपणा येतो. जरी तो अगदी छोटासा असला तरीही मग तुम्ही आजारी पडता.
(क्रमश:)

– श्रीमाताजी
(CWM 05 : 171-181)

एखाद्या व्यक्तीला चैत्य पुरुषाचा शोध घ्यावयाचा असेल, तर त्या व्यक्तीला चैत्य पुरुषाच्या अस्तित्वाविषयी दृढ विश्वास व श्रद्धा असणे, अपेक्षित आहे. व्यक्ती त्याविषयी जागरुक व्हावयास हवी आणि चैत्य पुरुषाने आपले जीवन हाती घेऊन, आपल्या कृतींना दिशादर्शन करणे हाती घ्यावे ह्यासाठी, व्यक्तीने त्याला संमती दिली पाहिजे. व्यक्तीने प्रत्येक वेळी त्याचा संदर्भ घेऊन, त्याला आपले मार्गदर्शक बनविले पाहिजे. व्यक्ती चैत्य पुरुषाला अधिकाधिक आत्मनिवेदन करत गेली, त्याचे मार्गदर्शन अधिकाधिक घेत राहिली तर, व्यक्ती स्वत:च्या अस्तित्वाच्या विविध गतिविधींविषयी जागरुक होते.

*

प्रश्न : चैत्य पुरुषाच्या संपर्कात येणे ही ‘सोपी गोष्ट’ नाही, असे तुम्ही मला लिहिले आहे. ते कठीण असते, असे तुम्ही का म्हणता? त्यासाठी मी कोठून सुरुवात करू?

श्रीमाताजी : मी ते ‘सोपे नाही’ असे म्हटले कारण तो संपर्क हा आपोआप घडत नाही, तो ऐच्छिक असतो. विचार व कृतींवर चैत्य पुरुषाचा नेहमीच प्रभाव पडत असतो, पण व्यक्तीला क्वचितच त्याची जाणीव असते. चैत्य पुरुषाबाबत सजग होण्यासाठी, व्यक्तीला तशी इच्छा हवी, तिने आपले मन शक्य तितके नि:स्तब्ध केले पाहिजे आणि स्वत:च्या हृदयात खोलवर प्रवेश केला पाहिजे, संवेदना व विचारांच्याही पलीकडे प्रवेश केला पाहिजे. शांत एकाग्रतेची आणि स्वत:च्या अस्तित्वात आत खोलवर उतरण्याची सवय व्यक्तीने लावून घ्यायला हवी. ज्यांनी ज्यांनी हा अनुभव घेतला आहे, त्यांना माहीत आहे त्याप्रमाणे, चैत्य पुरुषाचा शोध ही एक सुनिश्चित आणि अतिशय सघन अशी वास्तविकता आहे.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 302) आणि (CWM 16 : 399)

योगमार्गावर साधक दीर्घकाळ धीमेपणाने चाललेला असेल, तर त्याच्या हृदयाची श्रद्धा अतिप्रतिकूल परिस्थितीतही टिकून राहू शकते; ती काही काळ दडून बसेल, पराभूत झाल्यासारखी दिसेल, परंतु पहिली संधी मिळताच ती पुन्हा प्रकट होईलच होईल. Read more