Tag Archive for: व्यावहारिक जीवन

चेतना व्यापक करण्याचे बौद्धिक मार्गही बरेच आहेत. जेव्हा तुम्ही कशाने तरी कंटाळला असाल, जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला दुःखदायक किंवा अत्यंत अप्रिय वाटत असेल, तेव्हा जर तुम्ही कालाच्या अनंततेचा किंवा अवकाशाच्या असीमतेचा विचार करायला लागलात, जे काही आत्तापर्यंत घडून गेलेले आहे व जे काही पुढे घडणार आहे त्या सगळ्याचा विचार करायला लागलात आणि अनंत काळातील हा क्षण म्हणजे जणू काही ‘आला क्षण, गेला क्षण’ असा आहे हे जर तुम्हाला जाणवले तर मग या अनंत काळाच्या तुलनेत, अशा एखाद्या गोष्टीने अस्वस्थ होणे हे तुम्हाला अगदीच किरकोळ, हास्यास्पद वाटू लागते. अशी गोष्ट इतकी नगण्य ठरते की, तिची जाणीव होण्याइतका सुद्धा वेळ नसतो, तिला काही स्थान नसते, महत्त्व नसते कारण खरोखर अनंत काळाच्या अनंततेमध्ये एक क्षण तो काय?… तुमच्या जर हे लक्षात येऊ शकले आणि ते जर तुम्ही डोळ्यासमोर आणू शकलात, तुम्ही जर असे चित्र रंगवू शकलात की, आपण किती छोटी व्यक्ती आहोत, आपण ज्या पृथ्वीवर आहोत ती सुद्धा किती लहान आहे आणि जाणिवेतील एक क्षण, जो तुम्हाला आत्ता दुखावतो आहे किंवा अप्रिय वाटतो आहे, तो सुद्धा तुमच्या जीवनातील एक लहानसा क्षण आहे; तसेच तुम्ही पूर्वी काय काय होतात आणि पुढे काय काय होणार आहात ते आणि आत्ता जी गोष्ट तुमच्या मनावर परिणाम करत आहे ती, कदाचित दहा वर्षानंतर तुम्ही पूर्णपणे विसरूनही जाल किंवा तुम्हाला त्याची आठवण झाली तर तुम्ही म्हणाल, ‘मी त्या गोष्टीला इतके महत्त्व कसे दिले?”… हे सगळे मुळात जर तुम्हाला जाणवू शकले आणि नंतर तुम्हाला तुमच्या खुज्या व्यक्तित्वाची जाणीव झाली तर.. आणि हे व्यक्तित्वसुद्धा कसे? तर अनंत काळांतील जणू एखादा क्षण. नाही नाही, क्षणाइतकेही नाही, कळणारही नाही इतका क्षणाचाही अंशभाग म्हणावे असे तुमचे व्यक्तित्व आहे, ह्याची जाणीव तुम्हाला झाली तर?

तुम्हाला जर अशीही जाणीव झाली की, हे सबंध जग यापूर्वीही आविष्कृत झाले आहे आणि यापुढेही अनंत काळपर्यंत आविष्कृत होत राहणार आहे; समोर, पाठीमागे, सर्व बाजूंनी… तर तुम्हाला एकदम असे वाटू लागेल की तुमच्या बाबतीत जे काय घडले आहे, त्याला इतके महत्त्व देणे हे किती हास्यास्पद आहे!… खरोखरीच तुम्हाला असे वाटू लागेल, की तुम्ही तुमच्या स्वत:ला, तुमच्या जीवनाला आणि तुमच्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टींना जे महत्त्व देत आहात ते किती असमंजसपणाचे आहे.

जर तुम्ही असे योग्य प्रकारे केलेत तर केवळ तीन मिनिटांच्या अवधीत सर्व अप्रियपणा एकदम झटकला जाईल, अगदी खोलवर गेलेले दुःख देखील झटकून टाकता येईल. अशा रीतीने फक्त एकाग्रता करायला पाहिजे, आपण अनंतत्वात आणि शाश्वततेत आहोत अशी कल्पना केली पाहिजे. तर मग सर्वकाही निघून जाईल. त्यातून तुम्ही स्वच्छ होऊन बाहेर पडाल. हे सर्व योग्य रीतीने कसे करायचे हे जर तुम्हाला कळले तर तुम्ही सर्व आसक्तीपासून मुक्त होऊ शकाल, एवढेच नव्हे तर, मी सांगते की, अगदी खोलवर गेलेल्या दु:खापासूनसुद्धा तुम्ही मुक्त होऊ शकाल आणि त्यामुळे तुम्ही लगेच तुमच्या क्षुद्र अहंकारातूनही बाहेर याल.

 

– श्रीमाताजी [CWM 06 : 345-346]

अमृतवर्षा १०

 

धीर धरा! उगवता सूर्य दररोज प्रात:काळी आपल्या पहिल्यावहिल्या किरणांच्या द्वारे जी शिकवण, जो संदेश या पृथ्वीतलावर प्रक्षेपित करतो आहे, तो ऐका;  तो आशेचा आणि दिलासादायक संदेश असतो. जे रडत आहेत, जे दु:खभोग सहन करत आहेत, जे भयकंपित झाले आहेत, ज्यांना दु:खवेदनांचा अंतच दिसत नाही असे तुम्ही सारे, धीर धरा!

अशी कोणतीच निशा नाही जिच्या अंती उषेचा उदय होत नाही; अंधकार जेव्हा अति घनदाट होतो त्याचवेळी अरुणोदय होतो. सूर्यप्रकाशाने भेदले जाणार नाही असे कोणतेच धुके नसते आणि त्याच्या उज्ज्वल किरणांनी ज्याची कड सोनेरी होत नाही असा कोणताच मेघ नसतो. असा कोणता अश्रू आहे की जो कधीच सुकणार नाही? असे कोणते तुफान आहे की ज्याच्या शेवटी विजयदर्शक इंद्रधनु सप्त किरणांनी चमकणार नाही? सूर्यप्रकाशाने वितळणार नाही असे बर्फ कुठे आहे का?

– श्रीमाताजी [CWM 02 : 44]

विचारशलाका ३८

 

(श्रीमाताजी येथे ‘विचार’ व्यापक करण्याच्या एका मार्गाबद्दल सांगत आहेत.)

 

समजा, तुमच्याबरोबर कोणी दुसरी एखादी व्यक्ती आहे.  ती व्यक्ती तुम्हाला काहीतरी सांगते, तेव्हा तुम्ही त्याच्या अगदी विरुद्ध असे काहीतरी त्या व्यक्तीला सांगता (विरोध करण्याच्या हिरिरीतून हे बहुधा नेहमीच घडते) आणि तुम्ही वादविवाद करायला सुरुवात करता. साहजिकच आहे की, तुम्ही कोणत्याच मुद्यापाशी येऊन पोहोचणार नाही; हो, तुम्ही जर भांडकुदळ असाल तर त्यातून भांडणं मात्र होतील.

पण तसे करण्याऐवजी, म्हणजे स्वत:च्या शब्दांमध्येच किंवा स्वत:च्या कल्पनांमध्येच बंदिस्त होऊन राहण्याऐवजी तुम्ही जर स्वत:ला सांगितलेत, “एक मिनिट थांब, मी प्रयत्न करून पाहातो आणि तो मला असे का म्हणाला ते समजावून घेतो. हो, तो मला तसे का बरे म्हणाला असेल?” तुम्ही चिंतन करता, “का? का? का?” तुम्ही प्रयत्न करत तिथेच थांबून राहता.

दुसरा माणूस मात्र बोलतच असतो, नाही का? – परंतु आता तो खूष होतो कारण तुम्ही आता त्याला विरोध करत नसता. तो तावातावाने बोलत राहतो; त्याला वाटते की, त्याने तुम्हाला त्याचे म्हणणे पटवून दिले आहे.

तो काय म्हणतो आहे त्यावर तुम्ही अधिकाधिक लक्ष एकवटू लागता; हळूहळू त्याच्या भावनेच्या आणि शब्दांच्या माध्यमातून जणू काही तुम्ही त्याच्या मनात प्रवेश करता. जेव्हा तुम्ही त्याच्या डोक्यात प्रवेश करता, तेव्हा एकदम तुम्ही त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये प्रवेश करता. आणि मग, तुमच्याशी तो तसा का बोलत आहे, याचे तुम्हाला आकलन होते.

आणि जर तुमच्याकडे पुरेसे बुद्धिचापल्य असेल आणि जर तुम्ही, तुम्हाला आधी जे माहीत होते ते आणि आत्ता जे समजले ते या दोन्ही गोष्टी जर शेजारी शेजारी ठेवल्यात तर आता तुमच्याकडे एकत्रितपणे दोन विचारसरणी असतील आणि त्या दोन्हींचा समेट घडविणारे असे सत्य तुम्ही शोधून काढू शकाल. आणि इथेच तुम्ही खरीखुरी प्रगती केलेली असेल.

स्वत:चे विचार व्यापक करण्याचा हा एक सर्वोत्तम मार्ग आहे.

तुम्ही जर एखाद्या युक्तिवादाला सुरुवात करणार असाल, तर ताबडतोब शांत व्हा. तुम्ही शांत राहिले पाहिजे, काहीही बोलू नका आणि ती दुसरी व्यक्ती गोष्टींकडे ज्या पद्धतीने पाहत आहे त्या पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे, तुम्ही तुमची पाहण्याची पद्धतच विसरून जाल, असे होणार नाही. त्याउलट, तुम्ही त्या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे ठेवू शकाल. तेव्हा तुम्ही खरंच प्रगती केलेली असेल, एक खरीखुरी प्रगती!

– श्रीमाताजी [CWM 05 : 218-220]

विचारशलाका २९

 

धम्मपद : ज्याप्रमाणे रणक्षेत्रातील हत्ती धनुष्यातून सुटलेले बाण सहन करतो त्याप्रमाणे मी अपमान सहन करेन कारण या जगात अनेक दुष्ट मनाची माणसे आहेत.

पाळीव हत्ती हा रणक्षेत्रामध्ये नेला जातो, त्यावर राजा आरुढ होतो. जो शांतपणे अपमान, निंदा सहन करतो तो माणसांमध्ये उत्तम मनुष्य होय.

श्रीमाताजी : येथे मोठा चांगला सल्ला दिला आहे : रणक्षेत्रातील हत्ती, ज्याला चांगले प्रशिक्षण देण्यात आले असते तो बाणांच्या भडिमाराने इतस्तत: पळायला सुरुवात करत नाही. तो वेदना सहन करतो, एखाद्या वीराने प्रतिकार करावा त्याप्रमाणे वृत्ती राखत तो पुढे पुढे चालतच राहतो. ज्याला योगमार्गाचे अनुसरण करायचे असते, साहजिकपणेच त्याला सर्व प्रकारच्या वाईट इच्छांच्या हल्ल्यांना सामोरे जावेच लागते. कारण इतर जण त्याला केवळ समजून घेऊ शकत नाहीत असे नाही, तर त्यांना जे समजत नाही त्याचा ते द्वेष करू लागतात.

सामान्य माणसे तुमच्याविषयी जे द्वेषपूर्ण उद्गार काढतात त्यामुळे, जर तुम्ही चिंताग्रस्त झालात, दुःखी झालात किंवा नाउमेद झालात तर तुम्ही मार्गावर फार पुढे जाऊ शकणार नाही. अशा गोष्टी तुमच्यापर्यंत येतात कारण तुम्ही दुर्दैवी आहात किंवा तुमच्या नशीबातच सुख नाही असे नसून, उलट दिव्य ‘चेतने’ने व दिव्य ‘कृपे’ने तुमचा संकल्प गांभीर्याने घेतला आहे आणि तुमचा निश्चय किती प्रामाणिक आहे, मार्गातील अडचणींना सामोरे जाण्यासाठी तुम्ही किती खंबीर आहात हे पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिस्थितीचा तिने एखाद्या (सोन्याचा) कस पाहणाऱ्या दगडाप्रमाणे (कसोटीचा दगड) म्हणून उपयोग केलेला असतो.

त्यामुळे जर का कोणी तुमचा उपहास केला किंवा कोणी तुमच्याविषयी निंदनीय शब्द उच्चारले तर पहिली गोष्ट तुम्ही ही केली पाहिजे की, अंतर्मुख होऊन, आपल्यातील कोणत्या दुर्बलतेमुळे वा कोणत्या अपूर्णतेमुळे असे घडले ते पाहिले पाहिजे. तसेच तुम्ही उदास, संतप्त किंवा उद्विग्न होता कामा नये, कारण तुमची खरी किंमत काय त्याची लोकांना कदर नसते. त्यापेक्षा तुमचा कोणता दोष, कोणती दुर्बलता वा कोणती विकृती दुरुस्त करायला हवी हे दाखवून दिल्याबद्दल तुम्ही दिव्य ‘कृपे’चे ऋणी असले पाहिजे.

आणि दुःखी होण्याऐवजी, तुम्ही पूर्णपणे संतुष्ट होऊ शकता आणि तुमच्या विरोधात, तुमचे अहित व्हावे म्हणून जो घाट घातला गेला होता त्याचा तुम्ही खूप फायदा करून घेऊ शकता.

तुम्हाला जर खरोखर या योगमार्गाचे अनुसरण करायचे असेल आणि योगसाधना करायची असेल, तर ती तुम्ही कोणत्याही कौतुकासाठी वा सन्मानासाठी करता कामा नये. ती तुमच्या जिवाची अनिवार्य अशी निकड असली पाहिजे, कारण तुम्ही त्याव्यतिरिक्त कोणत्याही इतर मार्गाने आनंदीच होऊ शकणार नाही, त्यासाठी तुम्ही ती केलीच पाहिजे. लोकांनी तुमची प्रशंसा केली काय किंवा नाही केली काय, ती गोष्ट अजिबात महत्त्वाची नाही. तुम्ही आधीच स्वत:ला हे समजावले पाहिजे की, तुम्ही सामान्य माणसांपेक्षा जेवढे अधिक प्रगत व्हाल, आणि जसजसे तुम्ही सामान्य जीवनपद्धतीला परके व्हाल, तेवढे लोकं तुमची प्रशंसा कमी करू लागतील; कारण साहजिकच आहे की, तुम्हाला ते नीट समजून घेऊ शकणार नाहीत. आणि मी पुन्हा एकवार सांगते की, हे अजिबात महत्त्वाचे नाही.

तुम्ही प्रगती केल्याशिवाय राहूच शकत नाही म्हणून, मार्गावर प्रगत होत राहण्यामध्येच खरी प्रामाणिकता सामावलेली आहे. तुम्ही दिव्य जीवनासाठी स्वत:ला समर्पित करता कारण त्याशिवाय तुम्ही राहूच शकत नाही; तुम्ही स्वत:चे रूपांतरण करण्यासाठी धडपडता, प्रकाशाला उन्मुख होता कारण त्याविना तुम्ही राहूच शकत नाही, कारण तेच तुमच्या जीवनाचे प्रयोजन असते. जेव्हा हे असे असते तेव्हा खात्री बाळगा की, तुम्ही योग्य मार्गावर आहात.

– श्रीमाताजी [CWM 03 : 282-284]

विचारशलाका २३

 

साधक : समजा, एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट जाणून घ्यायची इच्छा आहे किंवा तिला मागर्दर्शनाची आवश्यकता असेल किंवा तिला इतर काही हवे असेल, तर त्या व्यक्तीला तिच्या गरजेनुसार ती गोष्ट ‘ईश्वरा’कडून कशी मिळू शकेल?

श्रीमाताजी : ‘ईश्वरा’कडे ती गोष्ट तुम्ही मागितलीत तर ती तुम्हाला मिळू शकेल. पण तुम्ही जर त्याची मागणीच केली नाहीत, तर ती तुम्हाला कशी मिळेल?

तुम्ही ‘ईश्वरा’कडे वळलात आणि त्याच्यावर संपूर्ण विश्वास ठेवलात आणि ‘त्याच्या’कडे मागणी केलीत तर, आवश्यक असलेली गोष्ट तुम्हाला मिळेल – अर्थात् जी गोष्ट गरजेची आहे असे ‘तुम्हाला वाटते’ ती मिळेलच असे नाही; तर तुम्हाला ज्या गोष्टीची ‘खरोखरच गरज’ असेल, ती गोष्ट तुम्हाला मिळेल. परंतु त्यासाठी त्या गोष्टीची तुम्ही ‘त्याच्या’कडे मागणी केली पाहिजे.

मात्र तुम्ही हा प्रयोग प्रामाणिकपणे केला पाहिजे. ती गोष्ट मिळविण्यासाठी इतर सर्व प्रकारचे बाह्य मार्ग आधी अवलंबायचे, धडपड करायची आणि (सर्व मार्ग खुंटले की मग) नंतर ‘ईश्वरा’कडून अपेक्षा बाळगायची की, त्याने तुम्हाला ती गोष्ट द्यावी, आणि तीसुद्धा तुम्ही त्याच्याकडे न मागता; हे असे करता कामा नये. खरे म्हणजे, दुसऱ्यांकडून जेव्हा तुम्हाला काही हवे असते, तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे ते मागता, हो की नाही? आणि ‘ईश्वरा’ने मात्र ती गोष्ट तुम्ही न मागतासुद्धा तुम्हाला द्यावी, अशी अपेक्षा तुम्ही त्याच्याकडून कशी बरे बाळगता?

सामान्य चेतनेच्या स्तरावर मात्र ही प्रक्रिया (अपेक्षित प्रक्रियेच्या) बरोबर उलट घडते. तुम्ही काहीतरी गृहीत धरता आणि म्हणता, “मला अमुक एका गोष्टीची गरज आहे, मला या नातेसंबंधाची आवश्यकता आहे; मला हे प्रेम, ही ममता हवी आहे; मला अमुक गोष्टीचे ज्ञान हवे आहे इत्यादी आणि ‘ईश्वरा’ने ते मला दिलेच पाहिजे, अन्यथा तो ‘ईश्वर’च नाही.” म्हणजे असे की, तुम्ही समस्या पूर्णपणे उलट करून टाकता.

पहिली गोष्ट ही की, तुम्ही म्हणता, ”मला अमुक गोष्टीची गरज आहे.” पण तुम्हाला खरंच माहीत असते का, की त्या गोष्टीची तुम्हाला खरोखरीच गरज आहे? की तशी तुमच्या मनात काहीतरी धूसर कल्पना असते? का ती केवळ एक इच्छा असते? का (मनात उमटलेला) तो फक्त एक अज्ञानी तरंग असतो? पहिला मुद्दा असा की, तुम्हाला त्याविषयी काहीच माहीत नसते.

दुसरा मुद्दा हा की, “मला याची आवश्यकता आहे,” असे म्हणत, खरंतर तुम्ही तुमची इच्छाच ‘ईश्वरा’वर लादू पाहत असता आणि तरीदेखील, “मला ते दे”, अशी मागणीसुद्धा तुम्ही ‘त्याच्या’जवळ करत नाही. उलट तुम्ही म्हणता, “मला ते हवे आहे. आणि ज्याअर्थी मला अमुक एक गोष्ट हवी आहे, त्याअर्थी मला ती मिळालीच पाहिजे, अगदी स्वाभाविकपणे, सहजपणे मला ती मिळाली पाहिजे, मला जे हवे ते देणे, हे ‘ईश्वरा’चे कामच आहे.”

पण जेव्हा असे घडते तेव्हा, तुम्हाला खरंच कशाची गरज आहे, हे एकतर तुम्हाला माहीत नसते. आणि दुसरे म्हणजे तो केवळ तुमच्या मनाचा खेळ असतो, आणि त्यात काही तथ्य नसते आणि त्या देवघेवीमध्येही, तुम्ही ती गोष्ट तुमच्या आजूबाजूच्या जीवनाकडून मिळावी अशी अपेक्षा बाळगता आणि ‘ईश्वरा’कडे वळतसुद्धा नाही, ‘त्या’च्यामध्ये व तुमच्यामध्ये कोणतेही नाते तुम्ही निर्माण करत नाही, ‘त्या’चा क्षणभरही विचार करत नाही, किंवा ‘त्या’च्याकडे जेव्हा वळता तेव्हा तुमच्या दृष्टिकोनात थोडीसुद्धा मन:पूर्वकता बाळगत नाही. आणि तुम्ही त्या ‘ईश्वरा’कडे काहीच मागितलेले नसते त्यामुळे, ‘त्याने’ तुम्हाला देण्याचे काही कारणच उरत नाही.

पण तुम्ही जर ‘ईश्वरा’कडे मागणी केलीत, तर ‘तो’ ‘ईश्वर’च असल्यामुळे, तुम्हाला नेमकी कशाची गरज आहे हे तुमच्यापेक्षा त्याला अधिक चांगले कळत असते आणि त्यामुळे तुम्हाला ज्याची (खरोखरच) गरज आहे ते तो तुम्हाला देईलच.

परंतु, तरीही जर तुम्ही हट्ट धराल आणि तुमची इच्छा त्याच्यावर लादू पहाल, तर तुम्हाला जागृत करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव करून देण्यासाठी आणि खरंतर तुम्हाला त्या गोष्टीची काहीच गरज नव्हती, हे दाखवून देण्यासाठी तो तुम्ही मागितलेली गोष्ट कदाचित देईलही. पण नंतर तुम्ही पुन्हा तक्रार करू लागता आणि म्हणू लागता की, “मला त्रास होईल अशी गोष्ट ‘ईश्वरा’ने मला दिलीच कशासाठी?” पण तुम्ही तेव्हा हे पूर्णपणे विसरलेले असता, की ती गोष्ट तुम्हीच त्याच्याकडे मागितली होती.

दोन्ही बाबतीत, तुम्ही तक्रारच करता. तुम्ही जे काही मागितले होते, ते ‘त्या’ने तुम्हाला दिले आणि त्यामुळे तुम्हाला उपाय होण्याऐवजी जर अपायच झाला, तरी तुम्ही तक्रार करता आणि ‘त्या’ने ते तुम्हाला दिले नाही तरी तुम्ही तक्रारच करता. “हे काय ! मी तर ‘त्याला’ सांगितले की, मला याची गरज आहे आणि तरी ‘तो’ मला ते देत का नाही?” दोन्ही बाबतीत तुम्ही तक्रारच करता आणि बिचाऱ्या ‘ईश्वरा’लाच दोषी ठरवता.

या सर्व गोष्टींपेक्षा, तुमच्यामध्ये ‘त्या’चा शोध घेण्याची अभीप्सा असेल, उत्कंठा असेल, तीव्र, आर्त इच्छा असेल, तशी आत्यंतिक निकड तुम्हाला वाटत असेल, ज्याला साधारणत: तुम्ही कमीअधिक स्पष्टपणे तुमच्या अस्तित्वाचे सारभूत ‘सत्य’ समजता, वस्तुजाताचे मूळ ‘उगमस्थान’ समजता, सर्वोत्तम ‘हितकारक’ अशी बाब समजता, आपल्या सर्व इच्छांवरील ‘समाधान’ मानता, आपल्या सर्व समस्यांवरील ‘उपाय’ मानता, त्याविषयीची तीव्र निकड तुम्हाला भासत असेल, ते प्राप्त करून घेण्याची अभीप्सा तुम्ही बाळगत असाल, तर त्यानंतर तुम्ही ‘ईश्वरा’ला कधीच असे म्हणणार नाही, की ” मला हे दे, मला ते दे.” किंवा ”याची मला गरज आहे, ते मला मिळालेच पाहिजे.” तुम्ही ‘त्या’ला अशी विनवणी कराल की, ”माझ्यासाठी जे गरजेचे आहे ते तू कर आणि माझ्या अस्तित्वाच्या ‘सत्या’प्रत तू मला घेऊन चल; हे ‘ईश्वरा’, माझ्यासाठी जी गोष्ट आवश्यक आहे असे तुझ्या ‘परमप्रज्ञे’ला दिसते, ती तू मला प्रदान कर.”

आणि त्यानंतर मात्र, मग तुमच्याकडून कोणतीही चूक होणार नाही, याची तुम्हाला खात्री असेल. आणि ‘ईश्वर’ही मग तुम्हाला अपायकारक असे काही तुम्हाला देणार नाही.

…आणि नंतर, पुष्कळ धडपड केल्यानंतर, पुष्कळ चुका केल्यानंतर, बऱ्यापैकी दुःखकष्ट सहन केल्यानंतर, आणि खूप नाऊमेद झाल्यानंतर, मग सरतेशेवटी कधीतरी, एखादी व्यक्ती शहाणी, समजदार बनायला सुरुवात होते आणि स्तंभित होऊन, अकुंठित होऊन, जाणू पाहते की, या सगळ्यामधून बाहेर पडण्याचा काहीच मार्ग नाही का? म्हणजेच असे की, स्वत:च्या अज्ञानातून बाहेर पडण्याचा एखाद्याला काही तरणोपायच नसतो का? आणि तेव्हा मग, त्या क्षणी ती व्यक्ती ‘ईश्वरा’समोर बाहू फैलावून असे म्हणू शकते की, “मी इथे आहे, माझा स्वीकार कर आणि मला सत्याच्या मार्गाने घेऊन चल.” त्यानंतर मग सारे काही सुरळीत व्हायला सुरुवात होते.

– श्रीमाताजी [CWM 08 : 121-124]

विचारशलाका १९

नेहमीच असे सांगितले जाते की एखाद्याची प्रकृती बदलणे अशक्य आहे; तत्त्वज्ञानाच्या सर्व पुस्तकांमधून, अगदी योगामध्येसुद्धा तुम्हाला असेच सांगितले जाते की “तुम्ही तुमचा स्वभाव बदलू शकत नाही, कारण तुमच्या जन्माबरोबरच तो आलेला असतो, तुम्ही तसेच आहात.”

पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. मी खात्रीपूर्वक सांगू शकते की हे खोटे आहे. पण तुमची प्रकृती, तुमचा स्वभाव बदलण्यासाठी अत्यंत अवघड असे काही तुम्हाला करावे लागते. (कारण) तुम्हाला केवळ तुमचीच प्रवृत्ती बदलायची नसते तर, (तुमच्यामध्ये असलेली तुमच्या) पूर्वजांची प्रवृत्तीदेखील तुम्हाला बदलायची असते. तुम्ही त्यांच्यामध्ये बदल घडवून आणू शकत नाही (कारण त्यांचा तसा कोणताही हेतू नसतो), पण तुम्हाला मात्र  तुमच्यामधील ती प्रवृत्ती बदलणे आवश्यक असते.

त्यांनी ज्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या असतात – तुमच्या जन्माबरोबर जणू या सुंदर भेटवस्तू तुम्हाला मिळालेल्या असतात – त्या तुम्हाला बदलायच्या असतात. या गोष्टींचा मूळ, खरा धागा मिळविण्यात जर का तुम्ही यशस्वी झालात आणि तुम्ही जर त्यावर चिकाटीने आणि प्रामाणिकपणे काम केलेत तर, एखाद्या अवचित क्षणी तुम्ही त्यापासून मुक्त झालेले असाल; ते सारे काही तुमच्यापासून गळून पडलेले असेल आणि तुम्ही कोणत्याही ओझ्याविना एका नवीन जीवनाची सुरुवात करण्यास सक्षम झालेले असाल.

तेव्हा तुम्ही कोणी एक नवीनच व्यक्ती झालेले असाल; नवीन स्वभावाने, नवीन प्रकृतीनिशी एक नवीन जीवन जगत असाल.

– श्रीमाताजी [CWM 04 : 262]

विचारशलाका १७

साधक : ज्याला स्वत:ची शारीरिक अवस्था सुधारण्याची इच्छा आहे, ज्याला उपचाराचा परिणाम दिसून यावा असे वाटते किंवा जो स्वत:च्या शारीरिक कमतरतेवर उपाय करू पाहतो त्याने काय केले पाहिजे? जो बदल घडून येणे अपेक्षित आहे त्याच्या अंतिम टप्प्यावर लक्ष केंद्रित करून, त्याने स्वत:ची इच्छाशक्ती उपयोगात आणावी की, केवळ ते घडून येईलच अशा खात्रीने जगत राहावे की, ‘ईश्वरी शक्ती’ योग्य वेळ आली की, योग्य मार्गाने अपेक्षित तो परिणाम घडवून आणेलच असा विश्वास बाळगावा?

श्रीमाताजी : एकच गोष्ट करण्याचे हे भिन्न भिन्न मार्ग आहेत आणि त्यातील प्रत्येक मार्ग हे भिन्नभिन्न परिस्थितीमध्ये परिणामकारक ठरतात. यापैकी कोणती पद्धत तुम्हाला लागू पडेल, हे तुमच्यामध्ये विकसित झालेल्या चेतनेवर आणि कोणत्या स्वरूपाच्या शक्ती तुम्ही कार्यरत करू शकता यावर अवलंबून आहे.

तुम्ही पूर्णपणे बरे झाला आहात किंवा तुमच्यामध्ये अपेक्षित बदल घडून आला आहे अशा चेतनेमध्ये तुम्ही राहू शकता आणि तुमच्या आंतरिक रचनाशक्तीद्वारे बाह्य अवस्थेमध्ये देखील हळूहळू तो बदल घडवून आणू शकता. किंवा त्या गोष्टींवर परिणाम करू शकतील अशा शक्ती कोणत्या याची दृष्टी जर तुम्हाला असेल, तुम्ही जर ते जाणून घेऊ शकलात आणि त्या हाताळण्याचे कौशल्य जर तुमच्यापाशी असेल तर तुम्ही त्यांना खाली बोलावू शकता आणि ज्या भागांमध्ये कार्य होणे आवश्यक आहे तेथे त्या शक्ती उपयोगात आणू शकता; असे केलेत तर त्या शक्तीद्वारे तो बदल घडवून आणला जाईल. किंवा तुम्ही तुमची समस्या ‘ईश्वरा’समोर मांडलीत आणि त्यावर उपाय करावा म्हणून ‘ईश्वरी शक्ती’वर पूर्णपणे भरवसा ठेवून विनवणी केलीत तर, तेव्हाही तो बदल घडवून आणला जाईल.

पण जरी तुम्ही यांपैकी काहीही केलेत, कोणतीही प्रक्रिया अवलंबलीत आणि त्याबाबतचे आत्यंतिक कौशल्य व शक्तीदेखील तुम्हाला प्राप्त झालेली असली तरीदेखील, त्याचे फळ मात्र तुम्ही त्या ‘ईश्वरा’च्या हाती सोपविले पाहिजे. तुम्ही नेहमीच प्रयत्न केले पाहिजेत परंतु तुमचे ते प्रयत्न सफल होणार का निष्फळ होणार हे ‘ईश्वरा’च्या हाती असते. तेथे तुमची वैयक्तिक शक्ती खुंटलेली असते; जर परिणाम दिसून आला तर तो परिणाम तुमच्यामुळे नसून, ‘ईश्वरी शक्ती’मुळे घडून आलेला असतो.

तुम्ही असे विचारले आहे की, ‘ईश्वरा’कडे अशा प्रकारच्या गोष्टींची मागणी करणे योग्य आहे का? नैतिक दोषांचे निराकरण करण्यासाठी ‘ईश्वरा’ची विनवणी करण्याच्या तुलनेत, शारीरिक अपूर्णतेचे निराकरण करण्यासाठी ‘ईश्वरा’कडे वळणे अधिक बरे. अर्थात, तुम्ही कशाचीही मागणी करत असाल, तुम्ही कितीही प्रयत्न केलेत तरी, अगदी तुम्ही शर्थीचे प्रयत्न करत असतानादेखील, किंवा तुमचे ज्ञान उपयोगात आणतानादेखील किंवा शक्तीचा वापर करत असतानादेखील तुम्हाला ही जाणीव असली पाहिजे की, त्याचा परिणाम दिसून येणे ही गोष्ट ‘ईश्वरी कृपे’वर अवलंबून असते.

एकदा तुम्ही ‘योगमार्ग’ स्वीकारलात की, मग तुम्ही जे काही कराल ते पूर्णपणे समर्पण वृत्तीने केले पाहिजे. “मी माझ्यामधील अपूर्णता घालविण्याचे यथाशक्य सर्व प्रयत्न करत आहे, मी माझ्यापरीने सर्वाधिक प्रयत्न करत आहे, मी माझ्यामध्ये सुधारणा व्हावी अशी आस बाळगत आहे पण त्याच्या फलनिष्पत्तीसाठी मी स्वत:ला पूर्णत: त्या ईश्वराच्या हाती सोपवत आहे;” असा तुमचा भाव असला पाहिजे.

– श्रीमाताजी [CWM 03 : 96-97]

विचारशलाका १६

ज्या क्षणी तुम्ही समाधान पावून, अभीप्सा बाळगेनासे होता, तेव्हापासून तुम्ही मरणपंथाला लागलेले असता. जीवन ही एक वाटचाल आहे, जीवन हा एक प्रयास आहे; जीवन म्हणजे पुढे चालत राहणे, भावी प्रकटीकरण आणि साक्षात्काराप्रत उन्नत होणे. विश्रांती घेण्याची इच्छा बाळगणे याइतकी दुसरी कोणतीच भयानक गोष्ट नाही.

*

प्रगती हेच पृथ्वीवरील जीवनाचे प्रयोजन आहे. तुम्ही जर प्रगत होत राहणे थांबविलेत तर तुम्ही मृत्युमुखी पडाल. प्रगत न होता जो कोणता क्षण तुम्ही व्यतीत करता, तो प्रत्येक क्षण तुम्हाला स्मशानाच्या एक पाऊल जवळ घेऊन जाणारा असतो.

– श्रीमाताजी [CWM 15 : 75]

विचारशलाका १५

‘दिव्य अस्तित्व’ तुमच्या अंतरंगातच असते. ते तुमच्या आतच असते, आणि तुम्ही मात्र त्याचा बाहेर शोध घेत राहता; अंतरंगात डोकावून पाहा. ते तुमच्या आतच आहे. तेथे त्या ‘अस्तित्वा’ची उपस्थिती असते. सामर्थ्य मिळण्यासाठी तुम्हाला इतरांकडून प्रशंसा हवी असते – त्यातून ते सामर्थ्य तुम्हाला कधीही मिळणार नाही. सामर्थ्य तुमच्या अंतरंगातच आहे. तुम्हाला जर ते सामर्थ्य हवे असेल तर, तुम्हाला जे सर्वेाच्च उद्दिष्ट – सर्वोच्च प्रकाश, सर्वोच्च ज्ञान, सर्वोच्च प्रेम – आहे असे वाटते, त्यांविषयी तुम्ही अभीप्सा बाळगू शकता. ते तुमच्या अंतरंगातच आहे – अन्यथा तुम्ही कधीच त्याच्याशी संपर्क साधू शकणार नाही. तुम्ही जर अंतरंगात पुरेसे खोलवर गेलात तर नेहमीच सरळ वर जाणाऱ्या प्रज्वलित ज्योतीप्रमाणे तेथे तुम्हाला ‘त्या’चे अस्तित्व सापडेल.

आणि हे करणे खूप अवघड आहे, असे समजू नका. ते अवघड आहे, असे वाटते कारण तुमची दृष्टी कायम बाह्याकडेच वळलेली असते आणि त्यामुळे तुम्हाला ‘त्या’च्या उपस्थितीची जाणीव होत नाही. पण जर आधारासाठी, साहाय्यासाठी तुम्ही बाहेरच्या ऐवजी अंतरंगांत लक्ष केंद्रित केलेत आणि – प्रत्येक क्षणी काय करायला हवे ते जाणण्यासाठी, त्याचा मार्ग जाणण्यासाठी, अंतरंगांमध्ये, सर्वोच्च ज्ञानाकडे – प्रार्थना केलीत; आणि तुम्ही जे काही आहात व तुम्ही जे काही करता, ते सर्व तुम्ही पूर्णत्वप्राप्तीसाठी समर्पित केलेत, तर तुम्हाला तेथेच अंतरंगातच आधार असल्याचे आणि तो तुम्हाला कायमच साहाय्य व मार्गदर्शन करत असल्याचे जाणवेल.

आणि जर कधी अडचण आली तर तिच्याशी दोन हात करण्यापेक्षा; तिला हाताळण्यासाठी – सर्व वाईट इच्छा, सर्व गैरसमजुती आणि सर्व अनिष्ट प्रतिक्रिया यांना हाताळण्यासाठी – तुम्ही त्या अडचणीला सर्वोच्च प्रज्ञेकडे सुपुर्द करा. जर तुम्ही पूर्णपणे समर्पित झालात, तर तो आता तुमच्या काळजीचा विषय उरतच नाही : तो त्या ‘परमेश्वरा’चा विषय बनतो, ‘परमेश्वर’ स्वत:च तो हाती घेतो आणि त्यातून मार्ग कसा काढायचा हे इतर कोणापेक्षाही तोच अधिक चांगल्या रीतीने जाणतो. यातून बाहेर पडण्याचा हाच एकमेव मार्ग आहे, केवळ हाच मार्ग आहे.

– श्रीमाताजी [CWM 15 : 399-400]

विचारशलाका १३

केवळ सद्यकालीन मानवी सभ्यतेचे रक्षण करण्याची आवश्यकता आहे असे नाही तर, या जगाचेच रक्षण करण्याची आवश्यकता आहे आणि ते निश्चितपणे केले जाईल. परंतु काही जणांची जशी इच्छा आहे किंवा ते कल्पना करतात तितक्या सहजतेने किंवा तितक्या लवकर किंवा ते कल्पना करतात तशा पद्धतीनेच ते होईल असे मात्र नाही. सद्यकालीन सभ्यतेमध्ये निश्चितपणे परिवर्तन झालेच पाहिजे पण ते परिवर्तन विध्वंसानंतर होईल का अधिक महान सत्याच्या पायावर आधारित एका नवीन रचनेद्वारे ते परिवर्तन होईल, एवढाच काय तो प्रश्न आहे. …आशावाद किंवा निराशावाद हे काही सत्य नसते, तर या गोष्टी म्हणजे मनाच्या प्रवृत्ती असतात किंवा स्वभावाच्या भावावस्था असतात. आणि म्हणूनच आपण सारेजण, अतिआशावादी किंवा अतिनिराशावादी न राहता, “थोडे थांबूया आणि बघूया काय होते ते.”

*

तुमच्यासाठी आणि सर्वांसाठीच हा काळ मोठ्या कष्टाचा आहे हे मला माहीत आहे. संपूर्ण जगासाठीच तो तसा कष्टप्रद आहे; सर्वत्र गोंधळ, त्रास, विस्कळीतपणा आणि अव्यवस्था ही सर्वसाधारणपणे सगळ्यांचीच स्थिती आहे. भावी काळात येऊ घातलेल्या चांगल्या गोष्टींची ही तयारी चाललेली आहे किंवा त्या गोष्टी एका पडद्याआड विकसित होत आहेत आणि जागोजागी सर्वत्र वाईट गोष्टी मात्र ठळकपणाने दिसून येत आहेत. एकच गोष्ट करायला हवी आणि ती म्हणजे तग धरून राहायचे. प्रकाशाची घटिका येत नाही तोपर्यंत तग धरून राहायचे.

– श्रीअरविंद [CWSA 35 : 221 & 222]

*

जगाच्या सद्यकालीन परिस्थितीमध्ये ‘ईश्वरा’प्रति निरपवाद निष्ठा ही एक अपरिहार्य आवश्यकता बनली आहे.

– श्रीमाताजी [CWM 14 : 156]