Tag Archive for: व्यावहारिक जीवन

एकत्व – ११

 

नेहमी ईश्वराच्या अस्तित्वामध्ये जीवन जगा, ते ईश्वरी अस्तित्वच तुमचे संचालन करत आहे आणि तुम्ही जे काही करत आहात ती प्रत्येक गोष्ट त्या ईश्वराकडूनच केली जात आहे ह्याची जाणीव बाळगून जगा. तुमच्या सर्व हालचाली, गतिविधी म्हणजे केवळ मानसिक कृती नव्हे तर, प्रत्येक विचार, प्रत्येक भावना, इतकेच काय पण तुमच्या अगदी सामान्यातिसामान्य, खाण्यापिण्यासारख्या अगदी बाह्य गोष्टीसुद्धा त्या ईश्वरालाच समर्पित करा. जेव्हा तुम्ही जेवण करत असाल तेव्हा, तुम्हाला असे जाणवले पाहिजे की, तो ईश्वरच तुमच्या माध्यमातून अन्नग्रहण करत आहे. जेव्हा अशा रीतीने तुम्ही तुमच्या सगळ्याच हालचाली ह्या एका अस्तित्वामध्ये एकत्रित कराल, तेव्हाच तुम्ही विभिन्नतेमध्ये जगण्याऐवजी एकात्मतेमध्ये जगू लागाल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 23-24)

जग जसे आहे तसे आहे. जग क्षुद्रतेने आणि अंधकाराने भरलेले आहे; त्याला तुम्हास अस्वस्थ करण्याची मुभा देऊ नका. केवळ ईश्वरच प्रकाश आणि व्यापकता, सत्य आणि करुणा आहे. म्हणून त्या ईश्वराचाच आश्रय घ्या आणि जगाच्या क्षुद्रतेविषयी काळजी करू नका; केवळ ईश्वराची उपस्थिती, त्याच्या शांती व निश्चलतेसहित तुमच्यामध्ये बाळगा.

– श्रीमाताजी
(White roses : 02)

एकत्व – १०

 

जागतिक परिस्थितीबद्दल श्रीमाताजी येथे बोलत आहेत. – मला आता खात्रीच पटली आहे की, हा सगळा जो गोंधळ चालू आहे तो, आपण आपले दैनंदिन जीवन कसे जगले पाहिजे हे शिकविण्यासाठीच चाललेला आहे. म्हणजे असे की, काय घडणार आहे, कसे होईल, याविषयी व्यग्र न राहता, व्यक्तिने जे कर्म करावयास हवे त्यामध्ये स्वतःला रोज व्यस्त ठेवले पाहिजे. सगळे विचार, पूर्वनियोजनं, व्यवस्था, सारे सारे काही हे या अव्यवस्थेलाच अनुकूल आहेत.

ऊर्ध्वमुख होत, अभीप्सा बाळगत क्षणाक्षणाला जीवन जगणे, त्या त्या क्षणाला जी गोष्ट करणे आवश्यक आहे, केवळ त्याकडेच लक्ष पुरविणे आणि बाकी सारे काही त्या सर्व-साक्षी चेतनेला ठरवू देणे… कितीही व्यापक दृष्टी असली तरी, ह्या गोष्टी आपल्याला कळू शकत नाहीत. आपण त्या आंशिकरित्याच जाणू शकतो, अगदीच आंशिकपणे जाणू शकतो. त्यामुळे आपले लक्ष इकडे किंवा तिकडे वेधले जाते, आणि आणखीही इतर काही गोष्टी असतातच. भयंकर आणि हानीकारक गोष्टींना जास्त महत्त्व दिल्यामुळे, आपण त्यांना अधिकच बळकटी देत असतो.

जेव्हा तुमच्यावर अशा गोंधळाचा आणि अशा प्रकारच्या अव्यवस्थेचा आघात होतो तेव्हा, तुम्ही फक्त एकच गोष्ट केली पाहिजे. जेथे तुम्हाला केवळ एकमेवाद्वितीयाचेच, एकमेव चेतनेचे, एकमेव शक्तिचे दर्शन घडेल अशा चेतनेमध्ये प्रवेश करावयाचा – तेथे केवळ एकमेव एकात्मता आहे. जे जे सर्व काही घडत आहे ते ह्या एकात्मतेमध्येच घडत आहे. आपली सारी क्षुल्लक दृष्टी, जाणकारी, आपली मते हे सगळं सगळं त्या चेतनेच्या तुलनेमध्ये काहीच नाही, या सर्वाला व्यापून असणाऱ्या चेतनेच्या तुलनेमध्ये हे अगदीच अणुवत आहे. त्यामुळे, ज्या कोणाकडे थोडीशीही तर्कबुद्धी असेल त्याला हे समजून येईल की, स्वतंत्र अस्तित्वं निर्माण का झाली. व्यक्तिला हे कळू शकेल की, अभीप्सा बाळगण्यासाठी, अभीप्सा असावी ह्याचसाठी, आत्मदान, समर्पणप्रक्रिया असावी ह्याचसाठी, विश्वास आणि श्रद्धा बाळगता यावी ह्याचसाठी स्वतंत्र व्यक्तित्वं अस्तित्वात आली. वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांची घडण झाली ती ह्याच कारणासाठी. आणि मग तुम्ही काय करावयास हवे ? तर संपूर्ण सचोटीने, तीव्रतेने तुम्ही तो ईश्वरच व्हावयास हवे.. हेच केवळ आवश्यक आहे.

हीच एकमेव आवश्यक अशी गोष्ट आहे, ही एकच गोष्ट टिकून राहणारी आहे. बाकी सारे काही – स्वप्नातल्याप्रमाणे क्षणभंगुर आहे.
– श्रीमाताजी
(CWM 11 : 184-185)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

भीती म्हणजे मूक संमती असते. तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीची भीती बाळगता तेव्हा, तिची संभाव्यता तुम्ही मान्य करता असा त्याचा अर्थ होतो आणि अशा प्रकारे तुम्ही तिचे हात बळकट करत असता. ती अवचेतन संमती असते असे म्हणता येईल. भीतीवर अनेक मार्गांनी मात करता येते. धैर्याचा, श्रद्धेचा, ज्ञानाचा मार्ग हे त्यापैकी काही मार्ग आहेत.

– श्रीमाताजी
(CWM 14:243-244)

एकत्व – ०९

 

इच्छावासना आणि त्यासारख्या इतर गोष्टी शंभरापैकी नव्वद वेळा तरी तुमच्याकडे इतर कोणाकडून तरी, किंवा एका विशिष्ट परिस्थितीमधून, किंवा परिस्थितीच्या संचाकडून आलेल्या असतात किंवा एखाद्या दुसऱ्याच व्यक्तिकडून किंवा इतर अनेक लोकांकडून आलेले ते स्पंदन असते. त्यामधील फरक कळणे ही गोष्ट खूपच सोपी आहे, फरक करण्याची पहिली कोणती गोष्ट असेल तर ती हीच. ते एक असे स्पंदन असते की, जे अचानकपणे तुमच्या मधील त्याच्याशी साधर्म्य असणाऱ्या कशाला तरी जागे करते. कशाचातरी तुमच्यावर प्रभाव पडतो आणि ह्या प्रभावामुळे तुमच्यामध्ये एक प्रतिसाद जागा होतो, ज्याप्रमाणे तुम्ही एखादा स्वर वाजवत असता तेव्हा होते तसेच. वासनेचे एक स्पंदन येते आणि विशिष्ट प्रकारे तुमच्यावर हल्ला करते आणि तुम्ही त्याला प्रतिसाद देता.

व्यक्ती सातत्याने सामूहिक सूचनांच्या गर्दीमध्ये वावरत असते, अगदी सातत्याने. उदाहरणार्थ, मला माहीत नाही, तुम्ही कधी अंत्ययात्रेला गेलेला आहात की नाही ते, किंवा एखाद्या घरात जिथे व्यक्तिचे निधन झाले आहे, अशा घरात तुम्ही गेला आहात की नाही ते मला माहीत नाही. अर्थातच तुम्ही स्वतःचे थोडेफार तरी निरीक्षण करत असला पाहिजेत, तसे नसेल तर मग तुम्हाला काहीच जाणवणार नाही – परंतु तुम्ही थोडेफार जरी निरीक्षण करत असाल तर, तुमच्या असे लक्षात येईल की, त्या निधन पावलेल्या व्यक्तिबद्दल दुःख वाटावे, शोक वाटावा असे खरंतर काहीच कारण नव्हते; तुमच्या लेखी ती व्यक्ती इतर अनेक व्यक्तिंप्रमाणेच होती. वास्तविक सामाजिक परिस्थितीचा सामायिक परिणाम म्हणून तुम्ही त्या घरी गेलेला असता. आणि तेथे, का कोण जाणे पण एकाएकी, काहीही कळत नसताना, तुम्हाला एकदम खूप दुःख, गहिरे दुःख जाणवते, तशी खूप तीव्र भावना तुमच्यामध्ये निर्माण होते आणि तुम्ही स्वतःलाच विचारता, “मी इतकी का बरे दुःखी आहे ?” तर त्याचे उत्तर असे की, ती भावना म्हणजे दुसरी तिसरी काही नसते, तर त्या स्पंदनांनी तुमच्यामध्ये प्रवेश केलेला असतो.

हे निरीक्षण करण्यासाठी अगदीच सोपे आहे. मी अगदी लहान होते तेव्हा हा अनुभव मला आलेला होता. तेव्हाही मी योगसाधना करत होते पण ती जागरुकपणे करत नव्हते. आणि तरीदेखील मी याचे अगदी स्पष्टपणे निरीक्षण केले होते. मी मलाच समजावून सांगितले, “नक्कीच, जे मला जाणवत आहे ते त्या इतरांचे दुःख आहे, कारण त्या व्यक्तिच्या जाण्याचा माझ्यावर काही खास परिणाम व्हावा असे काहीच कारण नाहीये.” आणि त्याचवेळी अचानक माझे डोळे अश्रूंनी भरून आले; गळा दाटून आला आणि मला रडावेसे वाटू लागले, जणू काही मी खूप दुःखामध्ये आहे – मी तेव्हा अगदीच लहान होते पण तेव्हा देखील चटकन माझ्या लक्षात आले की, “त्यांच्या दुःखाने माझ्यामध्ये प्रवेश केला आहे.”

हीच गोष्ट रागाबाबत देखील असते. हे अगदी उघड आहे, व्यक्ती कोणत्यातरी व्यक्तिकडून किंवा वातावरणातून – हो, वातावरणामध्ये तो असतो – त्या वातावरणातून अचानकपणे तो राग तुमच्यामध्ये शिरतो आणि तो सहसा खालून तुमचा ताबा घेतो, तो वर वर चढत जातो आणि तो राग मग तुमच्या मस्तकात जातो. अगदी एक मिनिटापूर्वी तुम्ही शांत असता, तुम्ही अगदी स्वतःमध्ये मग्न असता, तुमचा तोल ढळण्याचे तसे कोणतेच कारणही नसते. आणि अचानक तो राग तुमचा इतक्या ताकदीने ताबा घेतो की, तुम्हाला तो आवरतच नाही कारण तुम्ही पुरेसे जागृत नसता, तुम्ही त्याला खुशाल आत शिरकाव करू देता आणि मग तो तुमचा वापर करतो.. ज्याला तुम्ही स्वतः असे म्हणता, त्याचा वापर तो करतो. म्हणजे तुमच्या शरीराचा ! कारण वरवर पाहता तरी, शरीर हीच तुमच्यातील अशी गोष्ट असते की, जी तुम्हाला तुमच्या शेजारी असणाऱ्या व्यक्तिच्या शरीरापेक्षा वेगळी करते. अर्थात, हा सुद्धा एक दृष्टिभ्रम आहे; कारण वस्तुतः सदासर्वकाळ ज्याला सूक्ष्मकण म्हणता येतील असे अगदी भौतिक कण असतात, फाकले जाणारे किरण असावेत तसे ते तुमच्या शरीरातून बाहेर पडत असतात आणि इतरांच्या सूक्ष्मकणांमध्ये मिसळत असतात. आणि त्यामुळेच व्यक्ती जर पुरेशी संवेदनशील असेल तर, दुसऱ्याचे अस्तित्व एखाद्या व्यक्तिला दूर अंतरावरून देखील जाणवू शकते.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 53-55)

अज्ञानमूलक चुका सुधारणे म्हणजे अंधकार नाहीसा करण्यासारखे आहे, जणू तुम्ही दिवा लावता आणि अंधार नाहीसा होतो; पण एखादी गोष्ट चुकीची आहे असे माहीत असूनदेखील, तीच चूक पुन्हा करणे म्हणजे जणू कोणीतरी दिवा प्रज्ज्वलित केलेला असावा आणि तुम्ही तो हेतुपुरस्सर विझवून टाकावा!… हे असे करणे म्हणजे, अंधकाराला हेतुपुरस्सर परत बोलावण्यासारखेच आहे.

-श्रीमाताजी
(CWM 09 : 306)

एकत्व – ०८

 

भगवान बुद्ध त्यांच्या शिष्यांना सांगत असत की, जेव्हा जेव्हा तुम्ही एखादे स्पंदन वातावरणामध्ये सोडता, उदाहरणार्थ एखादी इच्छा, एखाद्या विशिष्ट गोष्टीविषयीची इच्छा, तेव्हा ती इच्छा एका व्यक्तिकडून दुसऱ्या व्यक्तिकडे, दुसऱ्या व्यक्तिकडून तिसऱ्या व्यक्तिकडे अशी जगभर संक्रमित होत जाते आणि नंतर ती फिरून परत तुमच्यापाशीच येते. आणि वातावरणात सोडलेली ती काही एकमेव अशी गोष्ट नसते, तर गोष्टींचे एक आख्खे विश्वच असते आणि पुन्हा असे की, तुम्ही या विश्वातील प्रक्षेपण करणारे एकमेव केंद्र नसता तर, प्रत्येक व्यक्ती म्हणजे प्रक्षेपणाचे एक केंद्र असते – तेव्हा हा एवढा गोंधळ असतो की, तुम्ही तुमची भूमिकाच तेथे गमावून बसता. परंतु ही सर्व स्पंदनं अगदी एकाच, अगदी एकसारख्या क्षेत्रातूनच संक्रमित होत असतात. केवळ त्या स्पंदनांचे एकमेकांवर धडकणे, त्यांची व्यामिश्रता, यामुळे काहीतरी वेगळे, स्वतंत्र असल्याची भावना तुम्हाला होते.

स्वतंत्र, अलग असे काहीच नसते. एकच एक मूलद्रव्य आहे, एकच शक्ती आहे, एकच चेतना आहे, एकच संकल्प आहे जो अगणित अशा व्यक्तिमत्त्वांमधून संचार करत असतो. हे इतके गुंतागुंतीचे आहे की, व्यक्तिला त्याची जाणच नसते, परंतु जर व्यक्ती थोडी मागे सरकेल आणि त्या विचारप्रवाहाचा मागोवा घेत जाईल, मग तो विचारप्रवाह कोणता का असेना, तेव्हा व्यक्तिच्या लक्षात येईल की, ही विचारस्पंदनेच स्वतः एकातून दुसरे या पद्धतीने फैलावत जातात. वस्तुतः प्रत्यक्षात तेथे एकमेव एकत्व असते – मूलद्रव्याचे एकत्व, चेतनेचे एकत्व, संकल्पाचे एकत्व. येथे एकच एक सत्यता आहे. बाह्यतः एक प्रकारचा आभास असतो. अलगपणाचा, वेगळेपणाचा आभास असतो.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 52-53)

एकत्व – ०७

जर तुम्ही काळजीपूर्वक विश्लेषण केलेत तर, तुमच्या असे लक्षात येईल की, तुम्ही जे काही विचार करत असता, ते इतरांनी केलेले विचार असतात. त्यांचे ते विचार फिरत असतात आणि तुमच्या मधून जात असतात, परंतु ते विचार तुम्ही निर्माण केलेले नसतात, तुम्ही त्या विचारांचे निर्माणकर्ते नसता. तुमच्या सर्व प्रतिक्रिया या अनुवंशिकतेतून येतात, ज्यांनी तुम्हाला जन्म दिलेला असतो, ज्या परिसरात तुम्ही जीवन जगत असता, आजवर ज्या गोष्टी तुमच्या मनावर कोरल्या गेलेल्या असतात, त्यातून तुमची घडण झालेली असते. आणि तुम्हाला वाटत असते की, त्या साऱ्या गोष्टी म्हणजेच तुम्ही आहात. असे असूनसुद्धा ते विचार तुम्ही निर्माण केलेले नसतात, तर तुम्हाला ते जाणवलेले असतात, तुमच्या अनुभवास आलेले असतात. ते विचार जेव्हा तुमच्यामधून जात असतात, तेव्हा तुम्हाला त्यांची जाणीव होते, पण तुम्ही त्यांचे निर्माणकर्ते नसता, म्हणजे तुम्ही त्या विचारांना जन्म दिलेला नसतो.

उदाहरण द्यायचे झाले तर, असे म्हणता येईल की, ते विचार ध्वनींसारखे असतात. कोणत्याही प्रकारचे ध्वनी घ्या – शब्द, संगीत, कोणतेही ध्वनी – जे एका उपकरणाने ध्वनिमुद्रित केलेले असतात आणि ग्रामोफोनसारख्या दुसऱ्या एका उपकरणाच्या माध्यमातून ते परत वाजविण्यात आलेले असतात, त्याप्रमाणे हे असते. तुम्ही जो ध्वनी ऐकत आहात तो ग्रामोफोनने निर्माण केला आहे, असे तुम्ही म्हणाल का? नाही, असा विचारही तुमच्या मनाला शिवणार नाही. परंतु तुम्हाला तुमच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा भास होत असल्याने, तुमच्या मनाच्या माध्यमातून जे विचार दुसरीकडे जातात, ते विचार अभिव्यक्त होतात, तुमच्या प्राणिक अस्तित्वातून ज्या संवेदना जात असतात, त्यांना अभिव्यक्ती मिळते आणि तुम्हाला असे वाटते की, ते विचार, त्या संवेदना तुमच्याकडून आल्या आहेत, परंतु तुमच्याकडून काहीही येत नाही. निर्माण करण्यासाठी मुळात ‘तुम्ही’च असता कुठे ?

तुमच्या अस्तित्वातील सर्जक वास्तवेची तुम्हाला जाण येण्यासाठी आधी तुम्हाला तुमच्या अस्तित्वाचा जो शाश्वत गाभा आहे, तो शोधावयास हवा, त्यासाठी तुम्ही खूप आत, आत, अंतरंगात गेले पाहिजे.

आणि एकदा का तुम्हाला त्या शाश्वत गाभ्याचा शोध लागला की, तुम्हाला जाणीव होईल की, ती एकच एक अशी एकमेव सद्वस्तु आहे, इतर सर्वांमध्येही तीच सद्वस्तु आहे आणि मग असे असेल तर, तुमचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व शिल्लक रहातेच कोठे? काहीच शिल्लक रहात नाही.

हो, ती केवळ ध्वनिमुद्रण करणारी आणि पुन्हा ध्वनी वाजवणारी उपकरणे असतात आणि त्यामध्ये नेहमीच विकार निर्माण होत राहतात. काही विकार चांगल्यासाठी असतात, काही विकार वाईटासाठी असतात, मुळातील विचारांमध्ये फार मोठे बदल घडण्याचीही शक्यता असते. एका व्यक्तिमधून दुसऱ्यामध्ये ते विचार संक्रमित होत असताना, ते जसेच्या तसे संक्रमित होत नाहीत कारण आंतरिक रचनाच तशा असतात, ते उपकरण अतिशय जटिल असे असते.

परंतु ती एकच आणि समान अशी गोष्ट असते की, जी जागृत संकल्पाद्वारे संचालित होत असते, ती सर्व वैयक्तिक इच्छांपासून स्वतंत्र अशी असते.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 51-52)

एकत्व – ०६

 

भांडणं न करतासुद्धा व्यक्ती जीवन जगू शकते. असे म्हणणे हे काहीसे विचित्र वाटेल कारण गोष्टी आज जशा आहेत, तशा पाहिल्या तर हे जीवन जणू काही भांडणतंट्यांनीच बनलेले असावे असे दिसते. म्हणजे असे की, जी माणसं एकत्र राहतात त्यांचा मुख्य उद्योग हा जणू भांडाभांडी करणे, मग ती उघडपणे असोत किंवा छुपी असोत, हाच असतो. आपण अगदी प्रत्येक वेळीच बाचाबाची करतो असे नाही, किंवा अगदी हमरीतुमरी वर येतो असेही नाही – सुदैवाने – पण आतून तुम्ही सतत एकसारख्या चिडचिडलेल्या अवस्थेमध्ये वावरत असता कारण, तुम्हाला स्वतःमध्ये जी परिपूर्णता आणावयाची इच्छा असते ती तुम्हाला तुमच्या आजूबाजूला सापडत नाही. वास्तविक ती गोष्ट प्रत्यक्षात उतरविणे तुम्हाला देखील अवघड असते – परंतु तुम्हाला मात्र असे वाटत असते की, ती इतरांनी प्रत्यक्षात आणलीच पाहिजे.

…प्रत्येक गोष्टीकडे हसतमुखाने पाहा. ज्या गोष्टींमुळे तुमची चिडचिड होते त्या गोष्टींकडे तुम्ही एक धडा या दृष्टीने पाहा. तसे कराल तर तुमचे जीवन हे अधिक शांतिपूर्ण आणि अधिक प्रभावीदेखील असेल. कारण जी परिपूर्णता तुम्ही स्वतः प्रत्यक्षात आणू इच्छित असता, ती तुम्हाला इतरांमध्ये दिसली नाही तर, तुमची जी चिडचिड होते त्यामध्ये निश्चितपणे तुमच्यामधील पुष्कळशी ऊर्जा तुम्ही गमावून बसता.

इतरांनी परिपूर्णता प्रत्यक्षात उतरवली पाहिजे या मुद्द्यापाशीच तुम्ही थांबता आणि जे उद्दिष्ट वास्तविक तुम्ही साध्य करून घेतले पाहिजे त्याविषयी तुम्ही क्वचितच जागरुक असता. जर तुम्ही त्याविषयी जागरुक झालात, म्हणजे, तुम्हाला जे नेमून देण्यात आले आहे ते कार्य करावयास तुम्ही सुरुवात केलीत तर, म्हणजे, तुमचे जे काही कर्तव्य आहे ते प्रत्यक्षात आणावयास सुरुवात केलीत तर, इतर काय करतात, याची चिंता करणे सोडून द्या. कारण, खरंतर ते तुमचे कामच नाही. आणि खऱ्याखुऱ्या योग्य दृष्टिकोनाचा मार्ग सांगावयाचा झाला तर तो हाच की, “जे कोणी माझ्या अवतीभोवती आहेत, जी कोणती परिस्थिती जीवनात माझ्या वाट्याला आली आहे, माझ्या जवळच्या असणाऱ्या ज्या कोणी व्यक्ती आहेत त्या म्हणजे, मी कोणती प्रगती करावयास हवी हे मला दाखवून देणारे जणू काही ईश्वरी चेतनेने माझ्यासमोर धरलेले आरसेच आहेत. इतरांच्या जर कोणत्या एखाद्या गोष्टीचा मला धक्का बसला तर, त्याचा अर्थ हाच की, मला ते कार्य माझ्या स्वतःमध्ये करणे आवश्यक आहे.”

आणि जर व्यक्ती स्वतःमध्ये अशी खरीखुरी परिपूर्णता बाळगेल तर व्यक्तिला तीच परिपूर्णता बऱ्याचदा इतरांमध्येही आढळून येईल.

– श्रीमाताजी
(CWM 10 : 22-23)

एकत्व – ०५

दुसऱ्या व्यक्तिच्या जाणिवेमध्ये काय चालू आहे, हे नेमकेपणाने जाणण्यासाठी तुम्ही कधीच त्या व्यक्तिच्या जाणिवेमध्ये शिरण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. तुमची जाणीव त्या व्यक्तिमध्ये प्रक्षेपित करावयाची नाही; कारण तसे केलेत तर, तुम्हाला त्या व्यक्तिमध्ये स्वतःचेच दर्शन होईल आणि ते काही स्वारस्यपूर्ण नाही – त्याऐवजी त्या व्यक्तिच्या आतमध्ये असणाऱ्या जाणिवेच्या संपर्कात प्रवेश करावयाचा, उदाहरणार्थ, जेव्हा तुम्हाला दुसऱ्या व्यक्तिच्या काही गोष्टी पटत नाहीत तेव्हा, तुम्ही अमुक एका गोष्टीकडे अमुक एका पद्धतीने पाहत असता, तर दुसरी व्यक्ती त्याच गोष्टीकडे दुसऱ्याच पद्धतीने पाहत असते. जर माणसं समंजस असतील तर ती भांडत बसत नाहीत. पण जेव्हा माणसं समंजस नसतात तेव्हा, ती भांडाभांडी करायला सुरुवात करतात. तेव्हा, भांडत बसण्यापेक्षा एक चांगली गोष्ट अशी करावयास हवी; ती म्हणजे, दुसऱ्याच्या जाणिवेमध्ये प्रवेश करावयाचा आणि स्वतःला विचारायचे की, तो अमुक अमुक गोष्टी अशा का करत आहे, त्याला असे म्हणायला किंवा करायला लावणारे कोण आहे ? त्याने असा दृष्टिकोन बाळगावा यासाठी, वस्तुमात्रांकडे पाहण्याची त्याची कोणती दृष्टी कारणीभूत आहे, त्या पाठीमागचे आंतरिक कारण काय असेल ? हे खूपच रोचक असते. जर तुम्ही असे कराल, तर तुमचे रागावणे ताबडतोब बंद होईल. पहिली गोष्ट अशी घडेल की, तुम्ही रागावूच शकणार नाही. तेव्हा हा एक फारच मोठा फायदा आहे. आणि दुसरे म्हणजे, जरी दुसऱ्याचे रागावणे चालूच राहिले तरी त्याचा तुमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. आणि नंतर मग, हळूहळू, व्यक्तिने दुसऱ्याशी स्वतः पूर्णतया एकत्व पावण्याचा व त्याद्वारा मग भेदाभेदाच्या, विरुपतेच्या स्पंदनांना रोखण्याचा आणि भांडणं थांबवायचा प्रयत्न करायचा. हे अतिशय उपयोगी ठरते.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 424-425)