Tag Archive for: व्यावहारिक जीवन

सद्भावना – ०९

तुमच्यामध्ये समजा एखादा दोष असेल, जो तुम्ही दूर करू इच्छित असाल आणि जर का तो तरीही टिकून राहिला आणि जर तुम्ही म्हणाल की, “मला जेवढे करता येणे शक्य होते तेवढे सगळे मी केले आहे,” तेव्हा तुम्ही निश्चितपणे असे समजा की, जे जे करणे आवश्यक होते ते सारे तुम्ही केलेले नाही. तुम्ही जर तसा प्रयत्न केला असता तर, तुम्हाला नक्कीच विजय प्राप्त झाला असता; कारण तुमच्या वाट्याला ज्या अडचणी येतात त्या अगदी तुमच्या सामर्थ्याच्या प्रमाणातच असतात – तुमच्या चेतनेचा भाग नसलेले असे काहीच तुमच्या बाबतीत घडू शकत नाही आणि जे जे काही तुमच्या चेतनेशी संबंधित असते त्यावर तुम्ही प्रभुत्व मिळवू शकता. ज्या गोष्टी किंवा सूचना बाहेरून येतात, त्यासुद्धा तुमच्या चेतनेने ज्याला संमती दिलेली असते अगदी तेवढ्या प्रमाणातच असतात आणि तुम्ही तुमच्या चेतनेचे स्वामी व्हावे यासाठीच तुमची निर्मिती झालेली असते. तुम्ही जर असे म्हणाल की, ”मला जे करणे शक्य होते ते सारे मी केले आहे आणि सगळ्या गोष्टी करून सुद्धा तो दोष तसाच कायम राहिला, आणि म्हणून मी प्रयत्न करणे सोडून दिले,” तर तुम्ही हे निश्चित समजा की, तुम्हाला जे जे काही करणे शक्य होते ते तुम्ही केलेले नाही. सगळे करून सुद्धा, जेव्हा कोणतीही त्रुटी शिल्लक राहते तेव्हा त्याचा अर्थ असा की, तुमच्या अस्तित्वात दडी मारून बसलेली एखादी गोष्ट (जॅक इन द बॉक्स) या खेळण्यातल्याप्रमाणे अचानक उसळून वर येते आणि तुमच्या जीवनाचा ताबा घेते. म्हणून, करण्यासारखी एकमात्र गोष्ट म्हणजे, तुमच्या आतमध्ये दडी मारून बसलेले सर्व छोटे कोपरे वेचून वेचून काढायचे आणि जर का त्या अंधाऱ्या भागावर सद्भावनेचा एक छोटासा कवडसा जरी तुम्ही टाकलात तर, तो अंधारा कोपरा शरण येईल, तो नाहीसा होऊन जाईल आणि एके काळी जी गोष्ट तुम्हाला अशक्य वाटली होती ती नुसती शक्यच होईल असे नाही, ती केवळ व्यवहारातच उतरेल असे नाही, तर ती पूर्ण झालेली असेल. तुम्हाला अनेक वर्षे सतावणारी अशी एखादी अडचण तुम्ही अशा रीतीने एका क्षणात दूर करू शकता. मी तुम्हाला अगदी खात्री देते. ते फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून असते आणि ती गोष्ट म्हणजे, तुम्हाला त्या दोषापासून, त्या त्रुटीपासून अगदी खरोखर, प्रामाणिकपणे सुटका करून घ्यायची इच्छा असली पाहिजे. आणि हे सर्व बाबतीत सारखेच असते, शारीरिक आजारपणापासून ते सर्वोच्च मानसिक अडचणींपर्यंत ही गोष्ट सारखीच लागू पडते.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 74-75)

सद्भावना – ०८

दयाळूपणा आणि सद्भावना यांमध्ये खरी महानता, खरी श्रेष्ठता सामावलेली असते.

*

एकटा मनुष्य त्याच्या आध्यात्मिक शक्तीच्या साहाय्याने जे साध्य करू शकतो तीच गोष्ट, एखादा समूह सद्भावनेच्या विचाराने संघटित झाला तर साध्य होऊ शकते. एक खाल्डियन (Chaldean) म्हण आहे की, “तुम्ही बारा जणं जेव्हा सदाचरणासाठी एकत्रित याल तेव्हा ‘अनिर्वचनीय’ (सद्वस्तु) प्रकट होईल.”

*

सर्वांबद्दलच्या सद्भावना आणि सर्वांकडून मिळणाऱ्या सद्भावना हा शांती आणि सुसंवादाचा पाया असतो.

*

मानवतेची एकता ही एक आधारभूत आणि विद्यमान वस्तुस्थिती आहे. परंतु मनुष्यजातीचे बाह्य एकत्व हे मात्र मनुष्याच्या सद्भावनांवर आणि त्याच्या प्रामाणिकपणावर अवलंबून असते.

*

जिथे कुठे प्रामाणिकपणा आणि सद्भावना असते, तिथे ईश्वराचे साहाय्यसुद्धा असते.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 21), (CWM 02 : 114), (CWM 13 : 243), (CWM 15 : 66), (CWM 14 : 86)

सद्भावना – ०६

प्रश्न : एखाद्या व्यक्तीच्या सद्भावनेपेक्षा दुसऱ्या व्यक्तीच्या दुरिच्छेची ताकद अधिक मोठी असेल तर ?

श्रीमाताजी : हो, खरे आहे, असे घडू शकते. मूलतः म्हणूनच आपण पुन्हा त्याच गोष्टीपाशी येऊन पोहोचतो – व्यक्तीने स्वतःला शक्य असेल तितके सारे काही, शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने केले पाहिजे आणि ते सारे ‘ईश्वरा’ला अर्पण या भावनेने करायचे आणि मग, जेव्हा ते स्थिरस्थावर आणि सुव्यवस्थित झालेले असेल तेव्हा आणि त्या व्यक्तीमध्ये जर खरोखरच अभीप्सा असेल आणि ती व्यक्ती जर प्रकाशमय अस्तित्व असेल तर, ती व्यक्ती सारे वाईट प्रभाव निष्प्रभ करू शकते. पण एकदा का व्यक्तीने या जगात पाऊल टाकले की, सारे काही अगदी शुद्ध आणि वाईट प्रभावांपासून मुक्त असेल, अशी फारशी आशा बाळगता येत नाही. प्रत्येक वेळी व्यक्ती जेव्हा अन्नग्रहण करते, तेव्हा त्या प्रत्येक घासाबरोबर ते प्रभाव ती ग्रहण करत असते; प्रत्येक श्वासागणिक ते प्रभाव आत शोषून घेत असते. आणि त्यामुळेच, कोणती गोष्ट आवश्यक असेल तर ती म्हणजे, होता होईल तेवढे, हळूहळू, एकेक करून, शुद्धिकरणाचे काम करत राहायचे.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 413)

विचार शलाका – ३१

जेव्हा एखाद्या व्यक्तीची ‘पूर्णयोगा’साठी निवड निश्चित झालेली असते तेव्हा सर्व परिस्थिती, मनाचे आणि जीवनाचे सारे चढउतार हे त्या व्यक्तीला, या ना त्या प्रकारे योगाकडेच घेऊन जाण्यासाठी साहाय्यकारी ठरतात. त्याच्या स्वतःच्या चैत्यपुरुषाकडून आणि ऊर्ध्वस्थित असणाऱ्या ‘ईश्वरी शक्ती’कडून, अशा व्यक्तीच्या बाह्यवर्ती परिस्थितीचे चढउतार आणि मनाचे चढउतार या दोन्हींचा वापर त्या ध्येयाप्रत घेऊन जाण्यासाठी करून घेतला जातो.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 30-31)

विचार शलाका – २०

समत्व हा ‘पूर्णयोगा’चा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे; वेदना आणि दुःखभोग असतानादेखील समत्व बाळगणे आवश्यक आहे आणि त्याचा अर्थ असा की, दृढपणे आणि शांतपणे चिकाटी बाळगली पाहिजे; अस्वस्थ वा त्रस्त किंवा निराश वा उद्विग्न होता कामा नये तर, ‘ईश्वरी संकल्पा’वर अविचल श्रद्धा ठेवून वाटचाल केली पाहिजे. समत्वामध्ये उदासीन स्वीकाराचा समावेश होत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या वेळी साधनेमधील काही प्रयत्नांबाबत तात्पुरते अपयश आले तरी व्यक्तीने समत्व राखले पाहिजे; व्यक्तीने त्रस्त किंवा निराश होता कामा नये; तसेच ते अपयश म्हणजे ‘ईश्वरी इच्छे’चा संकेत आहे असे समजून, प्रयत्न सोडून देताही कामा नयेत. उलट, तुम्ही त्याचे कारण शोधून काढले पाहिजे, त्या अपयशाचा अर्थ शोधून काढला पाहिजे आणि विजयाच्या दिशेने श्रद्धापूर्वक मार्गक्रमण केले पाहिजे. अगदी त्याचप्रमाणे आजारपणाच्या बाबतीतसुद्धा – तुम्ही त्रस्त होता कामा नये, विचलित किंवा अस्वस्थही होता कामा नये, ‘ईश्वरी इच्छा’ आहे असे समजून तुम्ही ते आजारपण स्वीकारता कामा नये, तर ते शरीराचे अपूर्णत्व आहे या दृष्टीने तुम्ही त्याच्याकडे पाहिले पाहिजे; मानसिक दोष किंवा प्राणिक अपूर्णत्व यांच्यापासून सुटका करून घेण्यासाठी जसे तुम्ही प्रयत्न करता तसेच प्रयत्न हे शरीराचे अपूर्णत्व काढण्यासाठीसुद्धा केले पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 134)

विचार शलाका – १९

संसारी मनुष्य सर्व प्रकारच्या अडचणी, संकटे सहन करू शकतो. तो हे समर्थ मानसिक नियंत्रणाच्या साहाय्याने करतो. परंतु ती समता नाही, ती तितिक्षा होय. सहन करण्याची ही ताकद म्हणजे समतेची केवळ पहिली पायरी किंवा समतेचा केवळ तो पहिला घटक होय.

*

समता नसेल तर साधनेचा भरभक्कम पायाच रचला जाऊ शकत नाही. परिस्थिती कितीही त्रासदायक असू दे, इतरांची वागणूक भलेही तुम्हाला न पटणारी असू दे, तुम्ही त्या साऱ्या गोष्टी एका सुयोग्य धीराने आणि कोणत्याही अस्वस्थ प्रतिक्रियांविना स्वीकारायला शिकला पाहिजेत. या गोष्टी म्हणजे समतेची कसोटीच असते. जेव्हा सर्व गोष्टी सुरळीत चालू आहेत, माणसं आणि परिस्थिती सुखकारक आहे तेव्हा समत्व बाळगणे, धीर राखणे सहजसोपे आहे. परंतु जेव्हा यापेक्षा विपरित परिस्थिती असते तेव्हा धीर, शांती, समत्व ह्यांच्या पूर्णतेचा कस लागतो, अशा परिस्थितीमध्ये, त्या अधिक बळकट, अधिक परिपूर्ण केल्या जाऊ शकतात.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 135), (CWSA 29 : 129)

विचार शलाका – १३

खऱ्या शिक्षणाबाबत पहिले तत्त्व हे आहे की, काहीही शिकविता येत नाही. शिक्षक हे प्रशिक्षक किंवा काम करवून घेणारे नसतात, ते साहाय्यक आणि मार्गदर्शक असतात. त्यांनी सुचवायचे असते; लादायचे नसते. ते खरंतर, विद्यार्थ्याच्या मनाला प्रशिक्षण देत नाहीत, तर ज्ञानाची साधने परिपूर्ण कशी करावीत हे फक्त ते विद्यार्थ्याला दाखवून देतात आणि या प्रक्रियेमध्ये त्याला प्रोत्साहन देतात. ते विद्यार्थ्याला ज्ञान प्रदान करत नाहीत, तर ज्ञान स्वत:च कसे प्राप्त करून घ्यायचे हे त्याला दाखवितात. ते विद्यार्थ्याच्या अंतरंगातील ज्ञान बाहेर काढत नाहीत तर, ते ज्ञान कोठे आहे हे फक्त दाखवून देतात आणि ते पृष्ठभागी आणण्याची सवय कशी लावता येईल, हे विद्यार्थ्याला दाखवतात.

– श्रीअरविंद
(CWSA 01 : 384)

विचार शलाका – ०२

तुम्हाला जर खरोखर या योगमार्गाचे (पूर्णयोगाचे) अनुसरण करावयाचे असेल आणि योगसाधना करायची असेल, तर ती तुम्ही कोणत्याही कौतुकासाठी वा सन्मानासाठी करता कामा नये. योगसाधना ही तुमच्या जीवाची अनिवार्य निकड असल्यामुळे तुम्ही ती केली पाहिजे, कारण तुम्ही त्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने आनंदीच होऊ शकणार नाही यासाठी तुम्ही योगसाधना केलीच पाहिजे. लोकांनी तुमची प्रशंसा केली काय किंवा नाही केली काय, ती गोष्ट अजिबात महत्त्वाची नाही. तुम्ही अगोदरच स्वत:ला समजावले पाहिजे की जसजसे तुम्ही सामान्य माणसापासून वर उठाल, माणसाच्या सामान्य जीवनपद्धतीला परके व्हाल, तसतसे लोकं तुमची प्रशंसा कमी प्रमाणात करू लागतील, हे साहजिकच आहे कारण की, ती लोकं तुम्हाला नीट समजून घेऊ शकणार नाहीत. आणि मी पुन्हा एकवार सांगते की, या गोष्टीला अजिबात महत्त्व नाही.

तुम्ही प्रगती केल्याशिवाय राहूच शकत नाही म्हणून मार्गावर प्रगत होत राहण्यामध्ये खरी प्रामाणिकता सामावलेली आहे. तुम्ही ‘दिव्य जीवना’साठी स्वत:ला समर्पित करता कारण त्याशिवाय तुम्ही राहूच शकत नाही, तुम्ही स्वत:चे रूपांतर करण्यासाठी धडपडता, प्रकाशाला उन्मुख होता कारण त्याविना तुम्ही राहूच शकत नाही, कारण तेच तुमच्या जीवनाचे प्रयोजन असते.

जेव्हा हे असे असते तेव्हा खात्री बाळगा की, तुम्ही योग्य मार्गावर आहात.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 282-284)

(इसवी सन : १९१०)
मला राजकारणात काही करता येण्यासारखे नव्हते म्हणून मी राजकारण सोडले असे म्हणता येण्यासारखे नाही, अशी ही कल्पना देखील माझ्यापासून कोसो दूर आहे. मी त्यापासून दूर आलो कारण कोणत्याही गोष्टीचा माझ्या योगसाधनेमध्ये मला हस्तक्षेप नको होता आणि याबाबतीत मला अगदी निश्चित असा ‘आदेश’ प्राप्त झाला होता.

मी राजकारणाशी असलेले संबंध पूर्णत: तोडून टाकले कारण तसे करण्यापूर्वी मला ह्याची आतूनच जाणीव झाली होती की, मी जे कार्य तिथे हाती घेतले होते ते पुढे चालविले जाणारच, मी ज्या दिशेने त्या कार्याचा विचार केला होता, त्याच दिशेने इतरांकडून केले जाणार आहे, आणि मी ज्या कार्याला सुरुवात केली होती त्या चळवळीचा माझ्या प्रत्यक्ष वैयक्तिक कृतीविना किंवा माझ्या उपस्थितीविनाही अंतिम विजय होणारच, हे मला ज्ञात होते. माझ्या राजकारण निवृत्तीमागे निरर्थकतेची कोणतीही भावना किंवा नैराश्याची यत्किंचितही प्रेरणा नव्हती.

इतर गोष्टींबाबत बोलायचे झाले तर, जागतिक घडामोडींबाबतच्या कोणत्या महत्त्वाच्या घटनेमध्ये माझा संकल्प शेवटी अपयशी झाला असे मला तरी माहीत नाही आणि हो, हे शक्य आहे की, जागतिक शक्तींना तो संकल्प पूर्ण करण्यासाठी खूप वेळ लागला असेल.

– श्रीअरविंद
(CWSA 35 : 26)

विचार शलाका – ०५

प्रश्न : आजारपण येणार असे वाटत असेल तर, व्यक्तीने ते कशा प्रकारे थोपवावे?

श्रीमाताजी : सर्वप्रथम, तुम्हाला आणि तुमच्या शरीरातील कोणालाच ते हवे असता कामा नये. आपण आजारीच पडता कामा नये, अशी तुमच्यामध्ये अतिशय प्रबळ इच्छाशक्ती असली पाहिजे. ही पहिली अट आहे.

दुसरी अट अशी की, प्रकाशाला, साम्यावस्थेच्या प्रकाशाला, शांतीच्या, स्थिरतेच्या आणि समतोलाच्या प्रकाशाला आवाहन करून, तो प्रकाश शरीरातील पेशींपर्यंत पोहोचविला पहिजे. पेशी भयभीत होऊ नयेत म्हणून, त्यांचे प्रशासन केले पाहिजे; ही सुद्धा आणखी एक अट आहे.

तुम्ही आजारपणाला आकर्षित करता कामा नये किंवा त्याने घाबरून देखील जाता कामा नये. आजारपणाच्या भीतीमुळे ते नको असेही तुम्हाला वाटता कामा नये. ‘ईश्वरी कृपे’ची शक्ती तुमचे प्रत्येक गोष्टीपासून संरक्षण करेल याविषयी, तुम्हाला पूर्ण विश्वास आणि धीरयुक्त खात्री असली पाहिजे. त्यानंतर तुम्ही कोणत्यातरी दुसऱ्या गोष्टीचा विचार करा, त्या आजारपणाचा विचार करणे पूर्णपणे सोडून द्या.

जेव्हा तुम्ही या दोन गोष्टी केलेल्या असतील, म्हणजे, एकतर तुमच्या इच्छेनिशी तुम्ही आजारपणाला नकार दिला असेल आणि देहपेशींमधील भीतीचा पूर्णपणे निरास होईल असा विश्वास त्या पेशींमध्ये ओतला असेल आणि नंतर आजारपणाविषयी यत्किंचितही विचार न करता, तो अस्तित्वात आहे ह्याचा जराही विचार न करता, दुसऱ्या कोणत्यातरी गोष्टीमध्ये स्वतःला पूर्णपणे गुंतवून घेतले असेल तर, अगदी संसर्गजन्य रोग झालेल्या लोकांच्या जरी तुम्ही संपर्कात आलात, तरीही तो आजार तुम्हाला होणार नाही.

पण हे कसे करावयाचे हे तुम्हाला माहीत हवे – अनेक जण म्हणतात, “मी काही घाबरलेलो नाहीये.” अशा वेळी, त्या माणसाच्या मनामध्ये भीती नसते, त्याचे मन घाबरलेले नसते, ते कणखर असते, ते घाबरलेले नसते, पण त्याच्या शरीराचा मात्र थरकाप उडालेला असतो आणि त्याला मात्र ते माहीतच नसते, कारण ही भयकंपितता त्याच्या शरीराच्या पेशींमध्ये असते. त्याचे शरीर प्रचंड चिंतेने थरकापत असते आणि त्यातूनच आजारपणाला निमंत्रण मिळते. आणि अशा वेळीच, व्यक्तिने पूर्ण शांतीची स्थिरता व शक्ती आणि ‘ईश्वरी कृपा’ यांवर संपूर्ण श्रद्धा ठेवली पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWA 07 : 142-143)