Tag Archive for: व्यावहारिक जीवन

नैराश्यापासून सुटका – २५

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

नैराश्यामुळे स्वत:ला निराश होऊ द्यायचे नाही, तर त्यापासून चार पावले मागे होऊन, त्याच्या कारणाचा शोध घ्यायचा आणि ते कारण दूर करायचे, हा ‘योगा’मधील एक नियम आहे. बरेचदा ते कारण तुमच्या स्वतःमध्येच असते. कदाचित कोठेतरी एखादा प्राणिक दोष असतो, एखाद्या चुकीच्या गोष्टीमध्ये व्यक्ती गुंतून पडते किंवा एखादी किरकोळ इच्छा तिच्या अंगलट येते. कधीकधी इच्छेची पूर्ती केल्यामुळे तर कधी ती पूर्ण न केल्यामुळे असे घडून येते.

योगामध्ये बरेचदा असे होते की, एखादी इच्छा-वासना अपूर्ण राहिल्यामुळे जेवढे अधःपतन होते, त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने अधःपतन तिच्या उपभोगामुळे किंवा एखाद्या चुकीच्या गोष्टीला डोक्यावर चढवून ठेवल्यामुळे होते. तर मग तुम्ही काय केले पाहिजे? इच्छा-वासनांची पूर्ती झाल्याचा किंवा न झाल्याचा त्रास आंतरतम असणाऱ्या चैत्य पुरुषाला (Psychic being) होत नाही; कारण ईश्वराशी असलेल्या त्याच्या सख्यत्वावर तो सुस्थिरपणे उभा असतो आणि त्याच्या खऱ्या अस्तित्वाच्या दृष्टीने या छोट्याछोट्या गोष्टींकडे, त्या परक्या असल्याप्रमाणे तो पाहत असतो. पण इच्छा-वासनांची पूर्ती झाल्याचा किंवा न झाल्याचा जास्त परिणाम बाह्यवर्ती प्राण व मन यांच्यावर होत असतो. तेव्हा बाह्यवर्ती प्राणिक व मानसिक जीवनात फारसे न राहता, तुम्ही अधिकाधिक सखोलपणे अंतरंगामध्ये राहून जीवन जगले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 189)

नैराश्यापासून सुटका – २४

 

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

जीवन निरर्थक झाले आहे अशा प्रकारची भावना, या प्रकारची खिन्नता तुम्ही दूर केलीच पाहिजे. जीवनात यश मिळू दे, नाहीतर अडचणी येऊ देत पण, जोपर्यंत जीवन हे ‘ईश्वराभिमुख’ असते तोपर्यंत जीवनाला काही ना काही अर्थ असतो. तुम्हाला संरक्षण पुरविले जाईल पण तुम्ही निराशा दूर केलीच पाहिजे; तसे केल्यामुळे तुम्ही शक्ती व साहाय्य स्वीकारू शकाल आणि ते उपयोगात आणू शकाल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 188)

नैराश्यापासून सुटका – २१

 

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

प्राणिक निराशेच्या कोणत्याही लहरीला तुमच्यामध्ये शिरकाव करू देऊ नका आणि खिन्न मनोदशेला तर अजिबातच थारा देऊ नका. बाह्य व्यक्तिमत्त्वाबाबत बोलायचे झाले तर, केवळ तुमच्यामध्येच नव्हे, तर प्रत्येकामध्येच, हाताळण्यास अतिशय अवघड असा एक पशु नेहमी दडलेला असतो. त्याला धीराने आणि शांत व प्रसन्न चिकाटीनेच हाताळले पाहिजे. त्याच्या प्रतिकाराने कधीच निराश होऊ नका, कारण त्यामुळे तो हळवा व उद्विग्न होतो आणि हाताळायला अधिकच अवघड होऊन बसतो; अन्यथा तो हतोत्साहित होतो. (तेव्हा निराश न होता) त्याला स्वच्छ सूर्यप्रकाशाचा दिलासा द्या, त्याच्यावर तुमच्या अविचलतेचे दडपण येईल असे पाहा आणि मग एक दिवस तो ‘ईश्वरी कृपे‌’प्रत पूर्णपणे खुला झाला असल्याचे तुम्हाला आढळून येईल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 187)

नैराश्यापासून सुटका – २०

 

साधक : मनामध्ये (स्वत:शीच) चालू असणारी अखंड बडबड कशी थांबवावी?

श्रीमाताजी : यासाठी पहिली आवश्यक गोष्ट म्हणजे शक्य तितके कमी बोला. दुसरी अट अशी की, तुम्ही ज्या क्षणी जी गोष्ट करत असता त्या क्षणी फक्त त्याच गोष्टीचा विचार करा. तुम्ही पूर्वी काय केले आहे किंवा यापुढे काय करायचे आहे याचा विचार करत बसू नका. जे होऊन गेले आहे त्याचा खेद करू नका किंवा भविष्यात काय घडेल याची चिंता करत बसू नका. तुमच्यातील निराशाजनक विचारांना आळा घालण्याचा शक्य होईल तेवढा प्रयत्न करा आणि जाणीवपूर्वक आशावादी बना.

– श्रीमाताजी (CWM 12 : 141)

*

निराशाजनक विचारांना तुम्ही थारा देऊ नका. तसे विचार मनात आलेच तर, ते विचार ‘तुमचे‌’ नाहीत तर, त्या बाहेरून आलेल्या सूचना आहेत, या दृष्टीने त्यांच्याकडे पाहा. शक्य तेवढे अविचल (quiet) राहा आणि ‘श्रीमाताजींच्या शक्ती‌’ला तुमच्यामध्ये कार्य करू द्या.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 186)

नैराश्यापासून सुटका – १६

 

प्राणाच्या असमाधानावर एकच उपाय असतो. प्राण म्हणजेच तुम्ही आहात, असे समजायचे नाही; हाच तो उपाय. जडत्वाबद्दलच्या विचारांमध्ये व्यग्र राहायचे नाही, तर ऊर्ध्वमुख व्हायचे तसेच ‘दिव्य प्रकाश’ आणि ‘दिव्य शक्ती‌’ने प्राणामध्ये प्रवेश करावा म्हणून त्यांना आवाहन करायचे; हा जडत्वावरील उपाय आहे.

*

दुःखभोगामध्ये रमणारी आणि त्याची इच्छा बाळगणारी अशी तुमच्यामध्ये जी गोष्ट असते ती मानवी प्राणाचाच एक भाग असते. या गोष्टींचेच वर्णन आम्ही प्राणाचा अप्रामाणिकपणा व त्याची विकृत अढी असे करतो. प्राणाचा तो भाग दुःख व संकटे यांच्याविरुद्ध ओरडत राहतो आणि ईश्वर, जीवन व इतर सारेजण ‘मला छळत आहेत’ असा आरोप तो करत राहतो. पण बहुतेक वेळा दुःख-संकटे येतात आणि ती टिकून राहतात याचे कारण, प्राणातील त्या विकृत भागालाच ती हवी असतात! प्राणातील त्या भागापासून तुम्ही स्वत:ची पूर्णपणे सुटका करून घेतलीच पाहिजे.

*

प्राण जर अविचल राहिला आणि त्याने मनाला गोष्टींकडे योग्य रितीने पाहू दिले तर ही निराशा येणारच नाही, हे स्वाभाविक आहे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 139-140, 178, 186-187)

नैराश्यापासून सुटका – १५

 

(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

अभिमाना‌पासून तुम्ही स्वतःची जेवढी लवकरात लवकर सुटका करून घ्याल तेवढे अधिक बरे. जो कोणी अभिमानाला खतपाणी घालतो तो विरोधी शक्तींच्या अंमलाखाली जातो. खऱ्या प्रेमाचा आणि अभिमानाचा काहीही संबंध नसतो; मत्सराप्रमाणेच (jealousy) अभिमान हा देखील प्राणिक अहंकाराचाच एक भाग असतो.

*

त्वरित परिणाम दिसून आले नाहीत तरी, नाउमेद न होणे हे अतिशय महत्त्वाचे असते, कारण अशावेळी आंतरिक शक्ती क्षीण होते. जेव्हा ती आंतरिक शक्ती क्षीण होते तेव्हा, ’तपोभंग‌’ होतो. पूर्वीचे ऋषीमुनी याविषयी नेहमी तक्रार करत असत. कारण ज्या ज्या वेळी असा तपोभंग होत असे तेव्हा तेव्हा पूर्वपदावर येण्यासाठी त्यांना प्रत्येक वेळी अगदी पहिल्यापासून पुन्हा नव्याने सुरूवात करावी लागत असे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 245, 182)

नैराश्यापासून सुटका – १२

 

दुःख किंवा आनंद किंवा इतर कोणतीही भावना असण्या-नसण्याचा हा प्रश्न नाही. ज्याने कोणी सामान्य ‘प्रकृती‌’वर मात केलेली नाही अशा प्रत्येकामध्ये या भावना असतातच. या गोष्टी असणे म्हणजे ‘भावविवशता‌’ नाही, तर या गोष्टी असणे म्हणजे ‘भावनिक‌’ असणे होय.

जेव्हा तुम्हाला या भावभावनांमध्ये रममाण होण्यात किंवा भावनांचे प्रदर्शन करण्यात मजा वाटते तेव्हा त्यातून किंवा कोणतेही कारण नसताना किंवा पुरेसे कारण नसतानासुद्धा जेव्हा तुम्ही भावनांमध्ये गुंतून पडता तेव्हा त्यातून ‘भावविवशता’ (sentimentalism) येते.

*

प्राणिक प्रकृतीमधील (vital nature) भावुकतेच्या अधीन असलेल्या घटकामुळे व्यक्ती इतर लोकांबरोबर भांडणे करण्यास प्रवृत्त होते आणि त्यांच्याशी अबोला धरते. व्यक्तीच्या ज्या भावस्थितीला (mood), इतरांशी गप्पागोष्टी करण्याचे सुख आणि नातेसंबंधांमधून मिळणारे सुख हवेहवेसे वाटत असते त्या भावस्थितीद्वारेच दिलेली ही प्रतिक्रिया असते. यांपैकी कोणतीही एक प्रवृत्ती जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत दुसरी प्रवृत्तीही तेथे असण्याची शक्यता असते. या भावुकतेपासून जेव्हा तुम्ही स्वतःची सुटका करून घेता आणि तुमच्या सर्व शुद्ध झालेल्या भावना ईश्वराकडे वळविता, तेव्हा हे भावनांचे चढउतार नाहीसे होतात आणि त्यांची जागा सर्वांविषयीची एक स्थिर सद्भावना घेते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 210)

नैराश्यापासून सुटका – ०९

माणसे ईश्वराभिमुख होत नाहीत आणि त्यामुळे ती स्वत:हूनच दु:ख आणि वेदना यांची अप्रत्यक्षरित्या निवड करत असतात. एवढेच नव्हे तर, प्राणिक चेतनेमध्येच (vital consciousness) असे काहीतरी असते की, जीवनामध्ये जर दुःखसंकटे नसतील तर तिला चुकल्या-चुकल्यासारखे वाटते. शरीराला दु:खभोगाचे भय असते, तिटकारा असतो; पण ‘प्राण’ मात्र त्याला जीवनरूपी लीलेचाच एक भाग म्हणून स्वीकारतो.
*
प्राण जीवन-नाट्याचा आनंद घेत असतो, दु:खसंकटांमध्ये देखील तो मजा घेत असतो. त्याच्या दृष्टीने नैराश्याचे क्षण म्हणजे विकृती नसते तर, जीवनलीलेचाच तो एक भाग आहे असे म्हणून तो त्यांचा स्वीकार करत असतो. अर्थात प्राणामध्ये देखील बंडखोरीची वृत्ती असते आणि त्यामध्ये तो मजा घेत असतो. ज्या भागाला दु:खभोग नकोसे असतात आणि ज्याला त्यापासून सुटका करून घेणे आवडते ती ‘शारीरिक चेतना’ (physical consciousness) असते; पण प्राण मात्र पुन्हा पुन्हा तिला रेटत राहतो आणि त्यामुळे शारीरिक चेतनेची (दु:खभोगापासून) सुटका होऊ शकत नाही. बंडखोरी असो की निराशेला कवटाळणे असो, दोन्ही बाबींना जबाबदार असतो तो राजसिक-तामसिक प्राणिक अहंकार (rajaso-tamasic vital ego)! रजोगुण प्रबळ असतो तेव्हा तेथे बंडखोरी असते व तमोगुण प्रबळ असतो तेव्हा तेथे नैराश्य असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 178, 178)

नैराश्यापासून सुटका – ०८

 

निराशा कोणत्या ना कोणत्यातरी निमित्ताने येते; पण वास्तविक ती कोणत्या एखाद्या विशिष्ट कारणामुळे नव्हे तर, स्वतःच्या मर्जीनुसार येत असते. निराशा प्रत्येकामध्ये अशा रितीनेच कार्य करत असते.
*
कण्हणे-विव्हळणे, रुदन करणे, किंबहुना व्यथावेदना आणि सर्व प्रकारचे दु:खभोग, यांमध्ये जो सुख घेतो तो ‘आत्मा’ नसतो, तर तो ‘प्राण’ किंवा त्याच्यातील एखादा भाग असतो.
*
कोणत्याही प्रकारचे नैराश्य वाईटच, कारण त्यामुळे चेतना निम्नस्तरावर येते, त्यामुळे ऊर्जा खर्च होते आणि मनुष्य विरोधी शक्तींच्या अंमलाखाली येतो.
*
नैराश्य मग ते कसेही आणि कोठूनही आलेले असले तरी, त्याबाबतीत एकच गोष्ट केली पाहिजे आणि ती म्हणजे ते नैराश्य बाहेर फेकून दिले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 183, 178, 183, 186)

नैराश्यापासून सुटका – ०७

(नैराश्य कोणत्या कारणांनी येऊ शकते यासंबंधी श्रीअरविंद एका साधकाला पत्राद्वारे सांगत आहेत.)

सहसा निराशेच्या लाटा या सामान्य ‘प्रकृती’मधून येतात. जेव्हा कोणतेच कारण नसते तेव्हा मन निराशेसाठी आंतरिक किंवा बाह्य असे एखादे निमित्त शोधून काढते. निराशेचे कारण न कळण्याचे हे एक कारण असू शकते.

दुसरे असेही एक कारण असू शकते की, कर्माची किंवा साधनेची जी वाटचाल चालू आहे, तिचे अनुसरण करण्याची जिवामधील (being) एखाद्या भागाची उमेद नाहीशी झालेली असू शकते किंवा तो भाग त्या वाटचालीचे अनुसरण करण्यास अनिच्छुक असू शकतो किंवा तो श्रान्तक्लान्त झालेला असू शकतो.

तो जर प्राणिक अस्तित्वामधील (vital being) एखादा भाग असेल तर, आपले पितळ उघडे पडू नये म्हणून किंवा ते कारण दूर होऊ नये म्हणून तो स्वतःला दडवून ठेवू शकतो. तो जर शारीरिक अस्तित्वामधील एखादा भाग असेल तर तो नुसताच मंद आणि अंधुक, स्वतःला व्यक्त करण्यास अक्षम असणारा असा असू शकतो.

आणि शेवटचे एक कारण म्हणजे ती निराशा अवचेतन (subconscient) भागामधून आलेली असू शकते. विनाकारण नैराश्य दाटून येणे, हेही निराशेच्या अनेकविध कारणांपैकी एक कारण असू शकते. व्यक्तीने स्वतःच स्वतःचे निरीक्षण करून, नक्की काय कारण आहे ते शोधले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 185)