Tag Archive for: वासना

जीवन जगण्याचे शास्त्र – १०

(मागील भागापासून पुढे…)

वासनांवर विजय मिळविण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ लागल्यावर, मग एक वेळ अशी येते की, व्यक्ती परिपक्व होऊ लागलेली असते. तेव्हा व्यक्तीला प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक हालचालीमध्ये, प्रत्येक स्पंदनामध्ये, अवतीभोवतीच्या प्रत्येक वस्तुमध्ये एक प्रकारचा आनंद, अस्तित्वाचा आनंद अनुभवायला मिळतो. केवळ माणसांमध्ये आणि सचेत जिवांमध्येच नव्हे तर, वस्तुंमध्ये, गोष्टींमध्येसुद्धा तो अनुभवायला येतो. केवळ झाडाफुलांपानांमध्ये आणि सजीवांमध्ये नव्हे तर, व्यक्ती वापरत असलेल्या कोणत्याही वस्तुमध्ये, तिच्या अवतीभोवती असणाऱ्या वस्तुंमध्येसुद्धा व्यक्तीला त्या आनंदाचा अनुभव येतो. आणि तिला असे जाणवते की, प्रत्येक गोष्टच या आनंदाने स्पंदित होत आहे. व्यक्ती एखाद्या गोष्टीला स्पर्श करते आणि तिला हा आनंद अनुभवास येतो.

परंतु अर्थातच त्यासाठी, मी सुरुवातीला सांगितले तसा अभ्यास करावा लागतो. अन्यथा, जोपर्यंत व्यक्तीमध्ये इच्छावासना असतात, आवडीनिवडी असतात, आसक्ती आणि आकर्षण किंवा प्रतिकर्षण आणि त्यासारख्या इतर गोष्टी असतात तोपर्यंत तिला या आनंदाचा अनुभव येऊ शकत नाही. व्यक्तीला एखाद्या गोष्टीमध्ये जोपर्यंत शारीरिक किंवा प्राणिक सुख अनुभवास येते तोपर्यंत तिला हा आनंद जाणवणार नाही.

हा आनंद सर्वत्र असतो. हा आनंद अतिशय सूक्ष्म असतो. तुम्ही वस्तुंमधून वावरत असता आणि जणू काही त्या वस्तू तुमच्याजवळ गाणे गुणगुणून तो आनंद व्यक्त करत असतात. आणि मग एक वेळ अशी येते की, जेव्हा तुम्हाला तुमच्या अवतीभोवतीच्या जीवनामधील हा आनंद अगदी चिरपरिचित होऊन जातो. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 09 : 22)

आत्मसाक्षात्कार – १७

(अहंकारापासून मुक्त होण्याचा एक मार्ग म्हणजे वासना-मुक्ती. परंतु हा मार्ग काहीसा कोरडा, रुक्ष आणि दूरवरचा आहे, अशी टिपण्णी श्रीमाताजींनी केली आहे आणि त्याच्या तुलनेत अधिक वेगवान मार्ग कोणता तो त्या सांगत आहेत.)

अहंकारापासून मुक्त होण्याची समस्या जर शारीरिकरित्या सोडवायची असेल तर धैर्य आणि निश्चय बाळगून (स्वत:ला) झोकून द्या. वासनांच्या मागे धावण्याचा दूरचा, दुष्कर, कष्टदायक आणि निराशाजनक मार्ग सोडून, व्यक्तीने साधेपणाने, संपूर्णतया, कोणत्याही अटी न लादता जर त्या ‘परमोच्च सत्या’प्रत, ‘परमोच्च संकल्पशक्ती’प्रत, ‘परमपुरुषा’प्रत स्वत:ला समर्पित केले; अस्तित्वाच्या सर्व अंगांनिशी जर स्वत:चे संपूर्ण अस्तित्व, संपूर्णतया ‘त्या’च्या हाती सोपविले, तर अहंकारापासून सुटका करून घेण्याचा तो सर्वात वेगवान आणि क्रांतिकारी मार्ग आहे.

लोकं म्हणतील की, हा मार्ग आचरणात आणणे खूप अवघड आहे. परंतु या मार्गात एक प्रकारची ऊब आहे, उत्कटता आहे, उत्साह आहे, प्रकाश आहे, सौंदर्य आहे, उत्कट आणि सर्जनशील जीवन आहे.

…संपूर्ण, समग्र, परिपूर्ण, नि:शेष आणि कोणत्याही अटीविना जे आत्मदान केले जाते, त्यालाच मी सकारात्मक मार्ग (positive way) म्हणते.

फक्त स्वत:साठी न जगता, स्वत:शी निगडित असे काहीही न ठेवता आणि स्वत:चा विचार न करता, सर्वाधिक सुंदर, तेजोमय, आनंदमय, शक्तिवान, करुणामय, अनंत असे जे काही आहे केवळ त्याचाच विचार करणे, त्या विचारांमध्ये निमग्न राहणे यामध्ये इतका अगाध आनंद आहे की, त्याची तुलना दुसऱ्या कशाशीच करता येऊ शकत नाही. ही एकच गोष्ट अर्थपूर्ण आहे, प्रयत्न करून पाहण्यायोग्य आहे. इतर सर्व गोष्टी म्हणजे निव्वळ कालापव्यय असतो. वळणावळणाच्या रस्त्याने, धीम्या गतीने, कष्टपूर्वक, टप्याटप्प्याने वर्षानुवर्षे पर्वत चढत जाणे (पिपीलिका मार्ग) आणि अदृश्य पंख पसरवून, थेट शिखराकडे झेपावणे (विहंगम मार्ग) यामध्ये जो फरक आहे तो येथे आहे.

– श्रीमाताजी (CWM 03 : 268-269)

साधना, योग आणि रूपांतरण – २५३

प्राणाचे रूपांतरण

प्राणशक्ती (Vitality) म्हणजे जीवन-शक्ती. जेथे कोठे जीवन असते, मग ते वनस्पतींमध्ये असू दे, प्राण्यांमध्ये असू दे किंवा माणसामध्ये असू दे, तेथे जीवन-शक्ती असते. प्राणाशिवाय जडभौतिकामध्ये जीवन असू शकत नाही, प्राणाशिवाय कोणतीही जिवंत कृती घडू शकत नाही. प्राण ही एक आवश्यक अशी शक्ती असते आणि जर प्राण हा साधनभूत म्हणून तेथे नसेल तर, शारीरिक अस्तित्वामध्ये कोणतीच गोष्ट निर्माण होऊ शकत नाही किंवा केली जाऊ शकत नाही. इतकेच काय पण साधनेसाठीसुद्धा प्राणशक्तीची आवश्यकता असते.

हा प्राण जितका उपयुक्त ठरू शकतो तेवढाच तो घातकदेखील ठरू शकतो. प्राण पुनर्जीवित न होता जर तसाच राहिलेला असेल, आणि तो जर इच्छावासना आणि अहंकाराचा गुलाम झालेला असेल तर, तो घातक ठरू शकतो. अगदी आपल्या सामान्य जीवनातसुद्धा मनाद्वारे आणि मानसिक इच्छाशक्तीद्वारे या प्राणाचे नियंत्रण करावे लागते, अन्यथा तो अव्यवस्था निर्माण करू शकतो किंवा अनर्थ घडवू शकतो. लोकं जेव्हा प्राणप्रधान मनुष्यासंबंधी बोलतात तेव्हा ती, मन किंवा आत्म्याद्वारे नियंत्रित न झालेल्या प्राणशक्तीचे वर्चस्व असलेल्या व्यक्तीविषयी बोलत असतात.

प्राण हा एक चांगले साधन बनू शकतो पण तो अगदी वाईट मालक असतो. या प्राणाला मारायची किंवा त्याला नष्ट करायची आवश्यकता नसते पण त्याला आंतरात्मिक आणि आध्यात्मिक नियमनाने शुद्ध करण्याची आणि त्याचे रूपांतर करण्याची आवश्यकता असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 106)

आम्ही जो उच्चस्थानी जाण्याचा प्रयत्न करीत असतो, त्या प्रयत्नात सुरुवातीलाच वासनेचा हीन घटक प्रवेश करतो, आणि हे स्वभाविकच आहे. ह्या हव्यासमय प्राणशक्तीचा वा वासनात्म्याचा स्वीकार करायचा झालाच तर तो स्वीकार रुपांतर करण्याच्या हेतूनेच आम्ही करावयास हवा. आरंभीच त्याला ही शिकवण द्यावी लागते की, दुसऱ्या सर्व वासना त्याने दूर कराव्यात आणि ईश्वरप्राप्तीचाच एकमेव ध्यास बाळगावा.

हा महत्त्वाचा मुद्दा साधल्यावर त्याला दुसरी शिकवण अशी द्यावी लागते की, त्याने आस बाळगावी परंतु ती स्वतःच्या वैयक्तिक लाभासाठी बाळगू नये, तर विश्वात पसरलेल्या ईश्वरासाठी आणि आम्हात असलेल्या ईश्वरासाठी धरावी.

जरी या योगमार्गात आम्हाला सर्व प्रकारचे आध्यात्मिक लाभ मिळण्याची खात्री असली, तरी आपला कोणताही आध्यात्मिक लाभ हे आपण आपले उद्दिष्ट ठेवू नये; तर आमच्यामध्ये आणि इतरांमध्ये जे महान कार्य करावयाचे आहे त्यावर आपली दृष्टी खिळवून ठेवावी.

ज्या आगामी उच्च आविष्काराने, विश्वात इश्वरेच्छेची वैभवपूर्ण परिपूर्ती होणार आहे, त्यावर आपली दृष्टी खिळवून ठेवावी. ज्या सत्याची प्राप्ती आम्हाला करून घ्यावयाची आहे, जे आमच्या जीवनात आम्हाला व्यक्त करावयाचे आहे आणि जे आम्हाला सिंहासनावर कायमचे बसवावयाचे आहे, त्या सत्यावर आपली दृष्टी खिळवून ठेवावी.

वासनात्म्याला शेवटी हे शिकविणे आवश्यक आहे की, त्याने केवळ ‘योग्य उद्दिष्टासाठी’च धडपड करायची आहे असे नाही तर, ही धडपड त्याने ‘योग्य रीतीनेही’ करावयाची आहे, पण ही गोष्ट त्याला अतिशय जड जाणारी आहे. कारण योग्य रीतीने साधना करणे हे योग्य उद्दिष्टासाठी साधना करण्याहून, वासनात्म्याला अवघड आहे. त्याला शेवटी हेही शिकवणे जरूर आहे की, त्याला इच्छा बाळगायचीच असेल तर ती स्वतःच्या अहंभावी मार्गाने बाळगू नये, तर ईश्वरी मार्गाने बाळगावी.

आता त्याने स्वतंत्र विभक्तपणे इच्छा बाळगू नये. मला पसंत असेल त्याच प्रकारे परिपूर्ती व्हावी, माझे जे स्वामीत्वाचे स्वप्न आहे ते पूर्ण व्हावे, माझी जी योग्य आणि इष्ट यासंबंधाची कल्पना आहे तीच मान्य केली जावी असा आग्रह त्याने धरू नये. आपल्या इच्छेहून महान असलेली ईश्वरी इच्छा पूर्ण करण्याचा ध्यास त्याने बाळगावा, त्याने अधिक ज्ञानपूर्ण, नि:स्वार्थी मार्गदर्शनाची वाट पाहावयास संमती द्यावी.

सामान्य वासनेला या प्रकारची शिकवण व शिस्त लागली तर तिचे दिव्य वासनेत रूपांतर होऊ शकेल; सामान्य वासना ही माणसाला त्रास देणारी, अनेक प्रकारे ठेचा खावयास लावणारी, स्वास्थ्यनाशक, तापदायक वस्तू आहे; तिला वर सांगितल्याप्रमाणे शिस्त लागली तर तिजमध्ये दिव्य रूपांतराची पात्रता येईल.

सामान्य वासना आणि सामान्य तळमळ यांचीच उच्च व दिव्य रूपेही असतात. सर्व प्रकारची तृष्णा आणि अनुरक्ती, आसक्ती यांच्या पलीकडे आत्माचा एक विशुद्ध आनंद असतो, परमसिद्धीप्राप्तीच्या वैभवात विराजमान होऊन बसलेल्या दिव्य आनंदाचा एक संकल्प असतो.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 84)

मर्यादित बहिर्मुख असणाऱ्या अहंकाराला हद्दपार करून, त्या जागी ईश्वराला सिंहासनावर बसवणे आणि प्रकृतीचा हृदयस्थ शासनकर्ता बनविणे हे आमच्या योगाचे प्रयोजन आहे. Read more