Tag Archive for: रूपांतरण

साधना, योग आणि रूपांतरण – ९०

तुम्ही बाह्यवर्ती व्यक्तित्वाबद्दल जे म्हणत आहात ते योग्य आहे. तुमच्या आंतरिक प्रकृतीच्या अंतरंगामध्ये जे आहे तेच तुमच्या बाह्य व्यक्तित्वाद्वारे आविष्कृत झाले पाहिजे आणि (त्यानुसार) त्याच्यामध्ये परिवर्तन झाले पाहिजे. परंतु त्यासाठी आधी तुम्हाला तुमच्या आंतरिक प्रकृतीचे अनुभव आले पाहिजेत आणि मग, त्यांच्याद्वारे आंतरिक प्रकृतीची शक्ती वृद्धिंगत होते. आंतरिक प्रकृती बाह्यवर्ती व्यक्तित्वावर पूर्णतः प्रभाव टाकू शकेल आणि त्याचा ताबा घेऊ शकेल, अशी स्थिती येईपर्यंत ती वृद्धिंगत होत राहते. आंतरिक चेतना विकसित न होताच, बाह्यवर्ती चेतनेमध्ये पूर्णतः परिवर्तन घडविणे हे खूपच अवघड असते. आणि म्हणूनच हे आंतरिक अनुभव आंतरिक चेतनेच्या विकसनाची तयारी करत राहतात.

(आपल्यामध्ये) एक आंतरिक मन, आंतरिक प्राण, आंतरिक शारीर-चेतना असते; ती बाह्यवर्ती चेतनेपेक्षा अधिक सहजतेने ऊर्ध्वस्थित असणाऱ्या उच्चतर चेतनेचे ग्रहण करू शकते तसेच ती स्वतःला चैत्य पुरुषाशी सुसंवादी करू शकते. असे घडून येते तेव्हा बाह्यवर्ती प्रकृती म्हणजे आपण स्वतः नसून, ती पृष्ठभागावरील केवळ एक किनार आहे असे तुम्हाला जाणवू लागते आणि मग बाह्यवर्ती प्रकृतीचे संपूर्णपणे रूपांतरण करणे अधिक सोपे होते. बाह्यवर्ती प्रकृतीमध्ये कितीही अडचणी असल्या तरीही त्यामुळे ज्या तथ्याला बाधा येऊ शकत नाही, ते तथ्य असे की, तुम्ही आता अंतरंगामध्ये जागृत झाला आहात, श्रीमाताजींची शक्ती तुमच्यामध्ये कार्य करत आहे आणि तुम्ही त्यांचे खरे बालक असल्याने, तुम्ही सर्व प्रकारे त्यांचे परिपूर्ण बालक होऊन राहणार आहात हे निश्चित आहे. तुम्ही तुमचे विचार आणि तुमची श्रद्धा समग्रतया श्रीमाताजींवर एकाग्र करा म्हणजे मग तुम्ही साऱ्यातून सुरक्षितपणे पार होऊ शकाल.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 211)

साधना, योग आणि रूपांतरण – ८६

(रूपांतरण करू इच्छिणाऱ्या साधकासाठी आपल्या आंतरिक प्रांतांविषयी सजग होणे कसे महत्त्वाचे असते हे आपण कालच्या भागात पाहिले.)

तुम्ही जर तुमच्या बाह्य ‘स्व’ शीच जखडून राहिलात, तुमच्या शारीर-मनाशी आणि त्याच्या क्षुल्लक हालचालींशी स्वतःला बांधून ठेवलेत, तर तुमची अभीप्सा कधीच प्रत्यक्षात उतरू शकणार नाही. बाह्य अस्तित्व हे आध्यात्मिक प्रेरणेचा स्रोत नसते, तर ते केवळ पडद्याआडून, अंतरंगामधून आलेल्या प्रेरणांचे अनुसरण करत असते. तुमच्यामधील आंतरिक चैत्य पुरुष हा भक्त आहे, तो आनंदाचा आणि (ईश्वराच्या) सायुज्याचा शोध घेत आहे. बाह्य प्रकृती जशी आहे तशीच तिला सोडून दिली तर ती जे कधीच करू शकली नसती ते परिपूर्णतेने करणे तिला, तो अडथळा मोडून पडल्यावर आणि अंतरात्मा अग्रस्थानी आल्यावर शक्य होते. कारण ज्या क्षणी अंतरात्मा प्रभावीपणे अग्रस्थानी येतो किंवा तो जेव्हा चेतना स्वतःमध्ये सबळपणे ओढून घेतो तेव्हापासून शांती, आनंद, मुक्तता, विशालता, प्रकाशाप्रति उन्मुखता, उच्चतर ज्ञान या गोष्टी स्वाभाविक, सहजस्फूर्त होण्यास सुरुवात होते; बऱ्याचदा त्यांचा उदय अगदी त्वरेने होतो. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 218)

साधना, योग आणि रूपांतरण – ८५

(चेतना अंतराभिमुख झाल्यावर साधकाला कोणकोणते अनुभव येतात हे कालच्या भागात आपण समजावून घेतले.)

साधकाने हे समजून घेतले पाहिजे की, हे अनुभव म्हणजे नुसत्या कल्पना नसतात किंवा स्वप्नं नसतात, तर त्या वास्तव घटना असतात. आणि जसे बऱ्याचदा घडते त्याप्रमाणे जरी त्या गोष्टी म्हणजे अगदी, नुसत्या मनोरचना असल्या, जरी त्या अगदी चुकीच्या किंवा दिशाभूल करणाऱ्या किंवा विरोधी प्रकृतीच्या असल्या तरीही त्यांच्यामध्ये रचनांची म्हणून त्यांची स्वतःची अशी एक शक्ती असते. आणि म्हणून त्या रचनांना नकार देण्यापूर्वी किंवा त्या नाहीशा करण्यापूर्वी ही गोष्ट लक्षात घेतली गेली पाहिजे.

प्रत्येक अनुभवाच्या मूल्यामध्ये जरी पुष्कळ फरक असला तरीही प्रत्येक आंतरिक अनुभव हा त्याच्या स्वतःच्या पद्धतीने पूर्णपणे खरा असतो, अंतरात्मा आणि आंतरिक स्तरांच्या वास्तविकतेच्या साहाय्याने तो खरा ठरतो. आपण फक्त शरीरानेच जीवन जगत असतो किंवा केवळ बाह्य मन आणि प्राण यांच्या साहाय्यानेच जीवन जगत असतो असा विचार करणे चूक आहे. आपण सदासर्वकाळ चेतनेच्या इतर स्तरांमध्ये राहत असतो, तेथे कृती करत असतो, तेथे इतरांना भेटत असतो आणि त्यांच्यावर क्रिया करत असतो आणि आपण तेथे जे काही करतो, अनुभवतो आणि विचार करतो, तेथे ज्या शक्ती आपण गोळा करतो, तेथे ज्या परिणामांची आपण तयारी करतो त्या सगळ्याचे आपल्याला ज्ञात नसलेले, अगणित परिणाम आपल्या बाह्य जीवनावर होत असतात, त्यांचे मोल अमाप असते. त्यापैकी सर्वच अनुभव (ते सर्व प्रांत ओलांडून आपल्यापर्यंत) येत नाहीत आणि ते जरी येथवर आलेच तर ते जडभौतिकामध्ये येताना वेगळाच रूपाकार धारण करतात. कधीकधी त्यांच्यामध्ये अगदी तंतोतंत साम्य असते परंतु हे अल्पस्वल्प साम्य हा आपल्या बाह्यवर्ती अस्तित्वाचा पाया असतो. आपण या भौतिक, शारीरिक जीवनामध्ये जे काही करतो, जे काही धारण करतो, जे बनतो त्याची तयारी आपल्या अंतरंगामध्ये पडद्यामागे सुरू असते. आणि म्हणूनच जो योग जीवनाचे रूपांतरण हे आपले ध्येय म्हणून डोळ्यासमोर ठेवतो त्या योगामध्ये, या प्रांतांमध्ये काय सुरू असते याविषयी जागरूक होणे, आणि आपली नियती निर्धारित करणाऱ्या, तसेच आपली आंतरिक आणि बाह्य वृद्धी किंवा विनाश निर्धारित करणाऱ्या गुप्त शक्तींची जाणीव होण्यासाठी, त्यांचे ज्ञान होण्यासाठी आणि त्यांच्याशी व्यवहार करण्यासाठी सक्षम होणे, आणि तेथे प्रभुत्व संपादन करणे या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. जे ईश्वराशी सायुज्यता संपादन करू इच्छितात त्यांच्यासाठी देखील या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतात, (कारण) त्यांच्याविना रूपांतरण अशक्य असते. (क्रमशः)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 217-218)

साधना, योग आणि रूपांतरण – ८३

(साधकाला चेतनेच्या आरोहणाचा आणि अवरोहणाचा अनुभव कसा प्रतीत होतो, हे कालच्या भागात आपण पाहिले.)

आरोहण प्रक्रियेचे (ascension) विविध परिणाम आढळून येतात. ही प्रक्रिया चेतनेला मुक्त करू शकते त्यामुळे तुम्ही शरीरामध्ये बंदिस्त नाही किंवा शरीराच्या वर आहात असा अनुभव तुम्हाला येतो, किंवा तुम्ही शरीरासह इतके विशाल होता की जणूकाही तुमचे शारीर-अस्तित्व उरतच नाही. किंवा तुम्ही म्हणजे तुमच्या मुक्त विशालतेमधील केवळ एक बिंदू आहात असा तो अनुभव असतो. त्यामुळे व्यक्तीला किंवा तिच्या एखाद्या घटकाला शरीरातून बाहेर पडता येते आणि तो घटक इतरत्र जाऊ शकतो. शरीरातून बाहेर पडून इतरत्र जाण्याच्या या कृतीसोबतच सहसा एक प्रकारच्या आंशिक समाधीची अन्यथा संपूर्ण योगतंद्रीची अवस्था येते. किंवा त्यामुळे चेतना सशक्त होऊ शकते. आता ती चेतना शरीरापुरतीच किंवा बाह्यवर्ती प्रकृतीच्या सवयींपुरतीच मर्यादित राहत नाही. त्याची परिणती चेतना अंतरंगामध्ये शिरण्यामध्ये, आंतरिक मानसिक गहनतांमध्ये प्रवेश करण्यामध्ये, तसेच चेतना आतंरिक प्राणामध्ये, आंतरिक सूक्ष्म देहामध्ये, अंतरात्म्यामध्ये प्रवेश करण्यामध्ये होते. त्यामुळे व्यक्ती स्वतःच्या अगदी आंतरतम चैत्य अस्तित्वाविषयी किंवा आंतरिक मानसिक, प्राणिक आणि सूक्ष्म शारीर अस्तित्वाविषयी सजग होते. त्यामुळे व्यक्ती प्रकृतीच्या घटकांशी संबंधित असणाऱ्या त्या त्या क्षेत्रांमध्ये, त्या स्तरांमध्ये, त्या जगतांमध्ये वास्तव्य करण्यास आणि तेथे वावरण्यास सक्षम होते.

कनिष्ठ चेतनेच्या या पुनःपुन्हा आणि नित्य होणाऱ्या आरोहणामुळे मन, प्राण आणि शरीर हे घटक अतिमानसिक स्तरापर्यंतच्या उच्चतर स्तरांच्या संपर्कात येण्यासाठी सक्षम होतात आणि त्या उच्चतर स्तरांच्या प्रकाशामुळे, त्यांच्या शक्तीमुळे आणि त्यांच्या प्रभावामुळे भारित होतात. आणि पुनःपुन्हा व नित्य होणारे ‘दिव्य चेतने’चे आणि तिच्या ‘ऊर्जे’चे हे अवरोहण हेच समग्र अस्तित्वाच्या आणि समग्र प्रकृतीच्या रूपांतरणाचे साधन असते. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 216)

साधना, योग आणि रूपांतरण – ७९

साधक : बाह्यवर्ती घटकांमध्ये (मन, प्राण आणि शरीर) परिवर्तन होण्यासाठी आंतरिक साक्षात्कार आणि अनुभव यांचे साहाय्य होते का ?

श्रीमाताजी : साहाय्य झालेच पाहिजे असे काही आवश्यक नाही. त्यांचे साहाय्य व्हावे अशी तुमची इच्छा असेल तरच साहाय्य होईल. अन्यथा, व्यक्ती बाह्यवर्ती प्रकृतीपासून स्वतःला अधिकाधिक अलिप्त करत नेते. मुमुक्षू (मुक्तीची आस असलेल्या) लोकांबाबत नेहमीच असे घडत असते. बाह्य प्रकृती, तिचे स्वरूप आणि तिच्या सवयी या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्यामध्ये व्यक्तीने गुंतून पडता कामा नये अशा काहीतरी पूर्णपणे तिरस्करणीय गोष्टी आहेत, असे समजून ते त्या गोष्टी नाकारतात. त्यांच्या सर्व ऊर्जा, चेतनेच्या सर्व शक्ती (बाह्यवर्ती प्रकृतीमधून) काढून घेतात आणि उच्चतेप्रत वळवितात. आणि त्यांना हे जर पुरेशा पूर्णत्वाने साध्य करता आले तर सहसा ते कायमसाठी स्वतःच्या देहाचा त्याग करतात.

परंतु अशा उदाहरणांमध्ये, पुष्कळ वेळा असे आढळते की, ही गोष्ट ते आंशिकरितीनेच करतात आणि जेव्हा ते त्यांच्या ध्यानामधून, त्यांच्या निदिध्यासनामधून किंवा त्यांच्या समाधी अवस्थेमधून बाहेर येतात तेव्हा ते बहुधा इतरांपेक्षाही अधिक वाईट ठरतात कारण त्यांनी त्यांच्या बाह्यवर्ती प्रकृतीवर (परिवर्तनाचे) कोणतेही परिश्रम न घेता तिला आहे त्याच परिस्थितीत बाजूला सारलेले असते.

अगदी सामान्य माणसांच्या बाबतीत सुद्धा असे आढळते की, जर त्यांच्यातील दोष, दुर्गुण अगदी ठळकपणे नजरेत भरत असतील तर, जीवनामध्ये त्यामुळे फार त्रास होऊ नये म्हणून, ती माणसं त्या दोषांमध्ये सुधारणा करण्याचा किंवा त्यांच्यावर थोडे का होईना पण नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. (आणि या मुमुक्षू मंडळींच्या बाबतीत काय परिस्थिती असते?) व्यक्तीने आपले शरीर आणि आपली बाह्यवर्ती चेतना ही पूर्णपणे सोडली पाहिजे आणि संपूर्णपणे ”आध्यात्मिक उंची”प्रत स्वतःला नेले पाहिजे, हाच योग्य दृष्टिकोन आहे, अशी ज्यांची समजूत असते अशी माणसं शरीराला आणि बाह्यवर्ती प्रकृतीला एखादा जुना कपडा असावा त्याप्रमाणे टाकून देतात आणि त्यामध्ये सुधारणा करत नाहीत आणि मग जेव्हा तो कपडा पुन्हा वापरण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तो वापरण्याजोगा राहिलेला नसतो. त्याचा काहीही उपयोग होत नाही. परंतु परिवर्तन घडवावे अशी तुमच्यापाशी जर प्रामाणिक इच्छा असेल तरच आंतरिक अनुभव आणि साक्षात्कार यांचे साहाय्य होते.

तुमच्यापाशी परिवर्तन करण्याची प्रामाणिक इच्छा असेल तर मग मात्र त्याचे खूप साहाय्य होते कारण परिवर्तन घडवून आणण्यासाठी आवश्यक असणारी शक्ती त्यातून तुम्हाला मिळते, परिवर्तनासाठी आवश्यक असा आधार त्यातून तुम्हाला मिळतो. परंतु तुम्हाला परिवर्तन करण्याची खरोखरच प्रामाणिक इच्छा असली पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 04 : 348-349)

साधना, योग आणि रूपांतरण – ७७

[श्रीअरविंद येथे अवरोहण (descent) प्रक्रियेच्या संदर्भात काही सांगत आहेत.]

पूर्वीचे योग हे प्रामुख्याने अनुभवांच्या मनो-आध्यात्मिक अतींद्रिय श्रेणींपुरतेच मर्यादित असत. त्यामध्ये उच्चतर अनुभव हे स्थिर मनामध्ये किंवा एकाग्रचित्त हृदयामध्ये एक प्रकारे झिरपत येतात किंवा प्रतिबिंबित होतात. या अनुभवाचे क्षेत्र हे ब्रह्मरंध्रापासून खाली असते. साधक (ब्रह्मरंध्राच्या) वर फक्त समाधी अवस्थेमध्येच जात असत किंवा अचल मुक्तीच्या स्थितीमध्ये जात असत, पण त्यांना गतिशील अवरोहणाचा कोणताही अनुभव येत नसे. (मला) जे जे गतिशील अनुभव आले होते ते सर्व अनुभव, आध्यात्मिकीकरण झालेल्या मनाच्या आणि प्राणिक-शारीरिक (vital-physical) चेतनेच्या क्षेत्रामध्ये आले होते. (काही विशिष्ट मनो-आध्यात्मिक-अतींद्रिय अनुभवांद्वारे, साधकाच्या कनिष्ठ क्षेत्राची, प्रकृतीची पूर्वतयारी झाल्यानंतर), पूर्णयोगामध्ये चेतना ही ब्रह्मरंध्राच्या वर, मूलभूत आध्यात्मिक चेतनेशी संबंधित असणाऱ्या उच्चतर श्रेणींप्रत ऊर्ध्वाभिमुख केली जाते. आणि तेथून नुसते काही ग्रहण करण्याऐवजी, चेतनेने तिथे निवास करून, तेथून कनिष्ठ चेतना पूर्णपणे परिवर्तित करणे अपेक्षित असते. कारण आध्यात्मिक चेतनेला साजेशी गतिशीलता, क्रियाशक्ती (dynamism) तेथे असते. दिव्य ‘प्रकाश’, ‘ऊर्जा’, ‘आनंद’, ‘शांती’, ‘ज्ञान’ आणि अनंत ‘बृहत्व’ हे तिचे स्वरूप असते आणि त्यांचे समग्र अस्तित्वामध्ये अवरोहण झाले पाहिजे. आणि साधकाने या सर्व गोष्टी प्राप्त करून घेतल्या पाहिजेत. अन्यथा त्याला मुक्ती लाभू शकते (सापेक्ष मनो-आध्यात्मिक बदल घडू शकतो.) परंतु त्याला पूर्णत्व मिळत नाही किंवा त्याचे रूपांतरण होऊ शकत नाही.

परंतु मी जर तसे म्हटले तर, ‘प्राचीन संतमहात्म्यांना अवगत नसलेले ज्ञान माझ्यापाशी आहे,’ असा दावा मी करत आहे आणि मी संतमहात्म्यांच्या अतीत गेलो असल्याचे दाखवितो आहे, अशी लोकांची समजूत होईल आणि या अक्षम्य गृहितकाच्या विरोधात गदारोळ उठेल. या संदर्भात मी असे म्हणू शकतो की, उपनिषदांमध्ये (नेमकेपणाने सांगायचे तर तैत्तरिय उपनिषदामध्ये) या उच्चतर स्तरांचे व त्यांच्या स्वरूपाचे आणि समग्र चेतना एकवटण्याच्या व त्या स्तरांमध्ये आरोहण करण्याच्या शक्यतेचे काही संकेत मिळतात. परंतु कालांतराने हे ज्ञान विस्मृतीमध्ये गेले आणि बुद्धी हीच सर्वोच्च गोष्ट आहे, आणि तिच्या किंचित वर ‘पुरूष’ किंवा ‘आत्मा’ आहे असे लोकं म्हणू लागले. परंतु त्यांना या उच्चतर स्तरांची सुस्पष्ट कल्पना नव्हती. परिणामी, समाधी अवस्थेमध्ये संभवतः, अज्ञाताप्रति आणि अनिर्वचनीय स्वर्गीय प्रदेशांमध्ये आरोहण होण्याची शक्यता असे; पण अवरोहण शक्य होत नसे. आणि त्यामुळे तशी संसाधनेसुद्धा उपलब्ध नसत; त्यामुळेच येथे भौतिकामध्ये रूपांतरणाचीही कोणती शक्यताच नसे. केवळ या जीवनापासून सुटका आणि गोलोकामध्ये, ब्रह्मलोकामध्ये, शिवलोकामध्ये किंवा परब्रह्मामध्ये मुक्ती लाभत असे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 378-379)

साधना, योग आणि रूपांतरण – ६२

अभीप्सेच्या शक्तीमधील आणि साधनेच्या ऊर्जेमधील चढ-उतार अटळ असतात. आणि जोवर साधकाचे संपूर्ण अस्तित्व हे रूपांतरणासाठी तयार झालेले नसते तोवर सर्वच साधकांच्या बाबतीत हे चढ-उतार नेहमीचेच असतात. अंतरात्मा जेव्हा अग्रभागी आलेला असतो किंवा तो सक्रिय असतो आणि मन, प्राण त्याला सहमती दर्शवितात तेव्हा तेथे उत्कटता आढळून येते.

परंतु अंतरात्मा जेव्हा तितकासा अग्रेसर नसतो आणि कनिष्ठ प्राण जेव्हा त्याच्या सामान्य गतिविधी बाळगून असतो किंवा मन हे त्याच्या अज्ञानी कृतीमध्ये मग्न असते आणि तेव्हा जर साधक अगदी सतर्क नसेल तर विरोधी शक्ती साधकामध्ये प्रवेश करतात. सहसा सामान्य शारीरिक चेतनेमधून जडत्व येते. विशेषतः जेव्हा साधनेला प्राणाचा सक्रिय आधार मिळत नाही, तेव्हा जडत्व येते. उच्चतर आध्यात्मिक चेतना सातत्याने अस्तित्वाच्या सर्व भागांमध्ये खाली उतरवीत राहिल्यानेच या गोष्टींचे निवारण करणे शक्य होते.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 61)

साधना, योग आणि रूपांतरण – ४२

तुम्ही दिव्य ‘शक्ती’प्रत स्वत:ला उन्मुख, खुले करण्यासाठी ध्यान करू शकता, (तुमच्यातील) सामान्य चेतनेचा त्याग करण्यासाठी म्हणूनही तुम्ही ध्यान करू शकता, तुमच्या अस्तित्वामध्ये अधिक खोलवर प्रवेश व्हावा म्हणून तुम्ही ध्यान करू शकता, स्वत:चे पूर्णतया आत्मदान कसे करावे हे शिकण्यासाठी म्हणून तुम्ही ध्यान करू शकता. या अशा सर्व प्रकारच्या गोष्टींसाठी तुम्ही ध्यान करू शकता. तुम्ही शांती, अचंचलता, निश्चल-नीरवता यांमध्ये प्रवेश व्हावा म्हणूनही ध्यान करू शकता. लोक बहुधा यासाठीच ध्यान करतात पण त्यात त्यांना यश मिळत नाही. रूपांतरणाची ‘शक्ती’ प्राप्त व्हावी म्हणूनदेखील तुम्ही ध्यान करू शकता, तुमच्यातील कोणत्या गोष्टींचे रूपांतर व्हायला हवे त्याचा शोध घेण्यासाठी तुम्ही ध्यान करू शकता, प्रगतीची दिशा ठरविण्यासाठी ध्यान करू शकता. अगदी व्यावहारिक कारणांसाठीदेखील तुम्ही ध्यान करू शकता. तुम्हाला एखादी अडचण दूर करायची आहे, त्यावर उपाय शोधायचा आहे, एखाद्या कृतीमध्ये किंवा तत्सम एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला मदतीची आवश्यकता आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्ही ध्यान करू शकता.

– श्रीमाताजी (CWM 08 : 89)

साधना, योग आणि रूपांतरण – २० (भाग ०४)

माझ्या दृष्टीने, माझ्या अनुभवाच्या आधारे सांगायचे तर (आणि माझा अनुभव पुरेसा दीर्घ आहे, कारण गेली सुमारे तेहतीस वर्षे मी विविध लोकांच्या संपर्कात आहे; त्यांचे प्रश्न, त्यांची योगसाधना, त्यांचे आंतरिक प्रयत्न मला माहीत आहेत; मी येथेही आणि इतरत्र, जगभरामध्ये सर्वत्र ते प्रश्न हाताळले आहेत.) मला असे वाटते की, ध्यानाद्वारे तुम्ही स्वतःमध्ये रूपांतर घडवून आणू शकत नाही… उलटपक्षी, (कर्माबाबत) मात्र मला अगदी खात्रीच आहे.

तुम्हाला जे कर्म करणेच भाग आहे, मग ते कर्म कोणतेही असो, ते जर तुम्ही केलेत आणि ते करत असताना ‘ईश्वरा’चे विस्मरण होऊ नये म्हणून काळजी घेतलीत, सतर्क राहिलात; तुम्ही जे काही कर्म केले असेल ते ‘ईश्वरा’र्पण केलेत आणि ‘ईश्वरा’ने तुमच्या प्रतिक्रियांमध्ये परिवर्तन घडवून आणावे म्हणून तुम्ही स्वतःचे आत्मदान केलेत; तुमच्या प्रतिक्रिया स्वार्थी, क्षुल्लक, मूर्ख आणि अज्ञ असण्याऐवजी तुम्ही त्या तेजोमय, उदार अशा बनविल्यात तर, (तुम्ही जर अशा रीतीने वागलात तर) तुम्ही प्रगती कराल. याप्रकारे, तुम्ही केवळ स्वतःचीच प्रगती केलेली असते असे नाही, तर तुम्ही सार्वत्रिक प्रगतीला देखील हातभार लावलेला असतो.

कमीअधिक प्रमाणात रिक्त, पोकळ ध्यान करण्यासाठी ज्यांनी सर्वसंगपरित्याग केला आहे, ध्यान करत बसले आहेत आणि त्यांनी बरीच प्रगती केली आहे, असे मला आढळले नाही; किंवा त्यांनी काही प्रगती केली असेलच तर ती अगदीच किरकोळ होती.

उलट, मी अशीही काही माणसं बघितली आहेत की, आपण योगसाधना करत आहोत असा त्यांच्यामध्ये कोणताही आविर्भाव नव्हता, परंतु ते, या पृथ्वीचे रूपांतरण करण्याच्या उत्साहाने आणि ‘ईश्वरा’चे या जगामध्ये अवतरण होणार या संकल्पनेमुळे उत्साहाने भारलेले होते आणि त्यांनी त्यांच्या वाट्याला आलेले जे काही छोटेमोठे कार्य होते ते हृदयापासून, उत्साहाने, स्वतःमध्ये जे काही आहे ते, हातचे काहीही राखून न ठेवता, संपूर्णपणे झोकून देऊन केले होते. त्या पाठीमागे वैयक्तिक मुक्तीची कोणतीही स्वार्थी संकल्पना नव्हती, अशा लोकांनी उत्कृष्ट प्रगती, खरोखरच उत्कृष्ट प्रगती केलेली मी पाहिली आहे. आणि कधीकधी खरोखरच अशी माणसं अद्भुत असतात.

मी संन्यासी पाहिले आहेत, मठांमध्ये राहणारे लोक पाहिले आहेत, जे स्वतःला योगी म्हणवून घेतात अशी माणसंही मी पाहिली आहेत. पण अशी बारा माणसं आणि (वर सांगितल्याप्रमाणे,) उत्कृष्ट कार्य करणारी एक व्यक्ती यांची बरोबरीच होऊ शकत नाही. (म्हणजे मी हे, पृथ्वीच्या रूपांतरणाच्या आणि जगाच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून बोलत आहे. म्हणजे आपण जे करू इच्छित आहोत, हे जग जसे आत्ता आहे ते तसेच राहू नये आणि ते खऱ्या अर्थाने, दिव्य चेतनेनिशी ‘ईश्वरी’ संकल्पाचे साधन बनावे या दृष्टिकोनातून मी हे म्हणत आहे.) या जगापासून दूर पलायन करून तुम्ही या जगामध्ये परिवर्तन घडवू शकणार नाही. तर इथेच राहून, विनम्रपणे, विनयाने परंतु हृदयामध्ये अर्पण भाव जागता ठेवून ते शक्य होईल. (क्रमशः)

– श्रीमाताजी (CWM 05 : 43-44)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (१०)

केवळ ‘अतिमानव’ बनण्याच्या कल्पनेने या ‘योगा’कडे (पूर्णयोगाकडे) वळणे ही प्राणिक अहंकाराची एक कृती ठरेल आणि ती या योगाचे मूळ उद्दिष्टच निष्फळ करेल. जे कोणी त्यांच्या सर्व जीवनव्यवहारामध्ये असे उद्दिष्ट ठेवतात त्यांना निरपवादपणे आध्यात्मिक आणि अन्य प्रकारची दुःखं सहन करावी लागतात. प्रथम विभक्तकारी अहंकार (separative ego) दिव्य चेतनेमध्ये विलीन करून, त्याद्वारे दिव्य चेतनेमध्ये प्रवेश करणे आणि दुसरे म्हणजे, मन, प्राण आणि शरीर यांचे रूपांतरण करण्यासाठी अतिमानसिक चेतना या पृथ्वीवर अवतरित करणे हे या ‘योगा’चे ध्येय आहे. (अहंकार दिव्य चेतनेमध्ये विलीन करत असताना, त्या अनुषंगाने, व्यक्तीला स्वतःच्या खऱ्या जीवात्म्याचा (individual self) शोध लागतो; हा जीवात्मा म्हणजे मर्यादित, व्यर्थ आणि स्वार्थी मानवी अहंकार नसतो तर तो ‘ईश्वरा’चा अंश असतो.) बाकी सर्व गोष्टी म्हणजे या दोन ध्येयांचे परिणाम असू शकतात, परंतु त्या या ‘योगा’चे प्राथमिक उद्दिष्ट असू शकत नाहीत.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 21)