Tag Archive for: रूपांतरण

साधना, योग आणि रूपांतरण – २२७

सर्वसाधारणपणे आपण अज्ञानामध्ये जीवन जगत असतो आणि आपल्याला ‘ईश्वर’ काय आहे हे माहीत नसते. सामान्य प्रकृतीच्या शक्ती या अ-दिव्य शक्ती असतात कारण त्या अहंकार, इच्छावासना आणि अचेतनेचा जणू एक पडदाच विणतात की, ज्यामुळे ‘ईश्वर’ आपल्यापासून झाकलेला राहतो. जी चेतना, ‘ईश्वर’ काय आहे ते जाणते आणि त्यामध्ये जाणीवपूर्वक निवास करते, अशा उच्चतर आणि गहन, सखोल चेतनेमध्ये आपला प्रवेश व्हायचा असेल तर, कनिष्ठ प्रकृतीच्या शक्तींपासून आपली सुटका झाली पाहिजे आणि ‘दिव्य शक्ती’च्या कृतीसाठी आपण स्वतःला खुले केले पाहिजे; म्हणजे मग ती ‘दिव्य शक्ती’ आपल्या चेतनेचे ‘दिव्य प्रकृती’मध्ये रूपांतरण घडवून आणेल.

‘दिव्यत्वा’च्या या संकल्पनेपासून आपण प्रारंभ केला पाहिजे; त्याच्या सत्याचा साक्षात्कार चेतनेच्या विकसनातून आणि तिच्या परिवर्तनामधूनच होणे शक्य आहे.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 07-08)

साधना, योग आणि रूपांतरण – २२५

साधक : फक्त आंतरिक चेतनेमध्ये परिवर्तन झाले तर बाह्य व्यक्तित्वातील अशुद्धता तशाच कायम राहण्याची शक्यता असेल ना?

श्रीमाताजी : हो, अर्थातच. केवळ आंतरिक चेतनेशी संबंधित असणाऱ्या प्राचीन योगपरंपरा आणि आपला पूर्णयोग यामध्ये हाच तर मूलभूत फरक आहे. प्राचीन समजूत अशी होती, आणि काही व्यक्ती भगवद्गीतेचा अर्थ या पद्धतीनेही लावत असत की, ज्याप्रमाणे धुराशिवाय अग्नी नसतो त्याप्रमाणे अज्ञानाशिवाय जीवन नसते. हा सार्वत्रिक अनुभव असतो पण ही काही आपली संकल्पना नाही, हो ना?

आपल्याला अनुभवातून हे माहीत आहे की, आपण जर शारीर-चेतनेपेक्षाही खाली म्हणजे अवचेतनेपर्यंत (subconscient) खाली उतरलो, किंबहुना त्याहूनही खाली म्हणजे अचेतनतेपर्यंत (inconscient) खाली उतरलो तर, आपल्याला आपल्यामध्ये अनुवंशिकतेमधून आलेल्या गोष्टींचे (atavism) मूळ सापडू शकते तसेच आपल्या प्रारंभिक शिक्षणामधून आणि आपण ज्या वातावरणामध्ये जीवन जगत असतो त्यामधून जे काही आलेले असते त्याचे मूळही आपल्याला सापडू शकते. आणि त्यामुळेच व्यक्तीमध्ये, म्हणजे तिच्या बाह्य प्रकृतीमध्ये, एक प्रकारची विशेष वैशिष्ट्यपूर्णता निर्माण होते आणि सर्वसाधारणतः असे समजले जाते की, आपण असेच जन्माला आलेलो आहोत आणि आयुष्यभर आपण असेच राहणार आहोत. परंतु अवचेतनेपर्यंत, अचेतनेपर्यंत खाली उतरून व्यक्ती तेथे जाऊन या घडणीचे मूळ शोधून काढू शकते. आणि जे तयार झाले आहे ते नाहीसे देखील करू शकते. म्हणजे व्यक्ती सामान्य प्रकृतीच्या गतिविधी आणि प्रतिक्रिया यांच्यामध्ये सचेत आणि जाणीवपूर्वक कृतीने परिवर्तन घडवून आणू शकते आणि अशा रीतीने ती खरोखरच स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचे रूपांतरण घडवून आणू शकते. ही काही सामान्य उपलब्धी नाही, परंतु ती करून घेण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे, हे असे करता येणे शक्य असते, एवढेच नव्हे, तर असे करण्यात आलेले आहे हे व्यक्ती ठामपणे म्हणू शकते. समग्र रूपांतरणाच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल असते. परंतु त्यानंतर, मी आधी ज्याचा उल्लेख केला ते पेशींचे रूपांतरण करणे अजूनही बाकी आहे.

अन्नमय पुरुषामध्ये (physical being) पूर्णतः परिवर्तन करणे शक्य आहे परंतु ही गोष्ट आजवर कधीही करण्यात आलेली नाही.

– श्रीमाताजी (CWM 15 : 294-295)

साधना, योग आणि रूपांतरण – २२४

अर्थातच, आत्तापर्यंत, ज्यांनी कोणी हे सचेत रूपांतरण (transformation) साध्य करून घेतले आहे त्यांना स्वतःच्या अंतरंगामध्ये असलेल्या, व्यक्तित्वाच्या अगदी गहनतेमध्ये असलेल्या, शाश्वत आणि अनंत जीवनाची जाणीव झालेली आहे आणि ही चेतना टिकवून ठेवण्यासाठी म्हणून, त्यांना या आंतरिक अनुभवाशी सातत्याने संबंधितच राहावे लागते, यासाठी त्यांना आंतरिक निदिध्यासामध्ये म्हणजे कमीअधिक प्रमाणात सातत्याने ध्यानामध्ये राहणे आवश्यक असते. आणि जेव्हा ते त्या ध्यानावस्थेमधून बाहेर येतात तेव्हा, (जर त्यांनी संपूर्णपणे कर्मव्यवहार करणे सोडून दिले नसेल तर), त्यांची बाह्यवर्ती प्रकृती आधी जशी होती तशीच असते; त्यांची विचारपद्धती, प्रतिक्रिया देण्याची पद्धती यामध्येदेखील फारसा काही फरक झालेला नसतो.

या उदाहरणाबाबत, हा आंतरिक साक्षात्कार, चेतनेचे हे रूपांतरण, ज्या व्यक्तीने ते साध्य करून घेतलेले असते त्या व्यक्तीपुरतेच उपयोगी असते. त्यामुळे जडद्रव्याच्या किंवा पृथ्वीवरील जीवनाच्या परिस्थितीमध्ये यत्किंचितही फरक होत नाही. समग्र रूपांतरण जर यशस्वी व्हायचे असेल तर, सर्व मनुष्यमात्र, किंबहुना सर्व सजीव आणि त्यांचे भौतिक पर्यावरण हेदेखील रूपांतरित करण्याची आवश्यकता असते. अन्यथा गोष्टी जशा आहेत तशाच राहतील. व्यक्तिगत अनुभव पार्थिव जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणू शकत नाही. रूपांतरणाच्या जुन्या संकल्पनेमध्ये चैत्य पुरुषाविषयी आणि आंतरिक जीवनाविषयी सचेत होणे अभिप्रेत असते. परंतु, रूपांतरणाची आमची जी संकल्पना आहे, ज्याविषयी आपण बोलत आहोत, ती संकल्पना आणि रूपांतरणाची जुनी संकल्पना यामध्ये हा मूलभूत फरक आहे.

म्हणजे एखादी व्यक्ती किंवा कोणता एखादा व्यक्तीसमूह किंवा सर्व मनुष्यमात्र एवढेच नव्हे तर, संपूर्ण जीवन, कमीअधिक विकसित झालेली ही एकंदर जड-भौतिक चेतनाच रूपांतरित झाली पाहिजे. हे असे रूपांतरण घडून आले नाही तर या जगातील सर्व दुःख, सर्व संकटं आणि सर्व अत्याचार आत्ताप्रमाणेच कायम राहतील. काही व्यक्ती त्यांच्यामध्ये झालेल्या आंतरात्मिक विकसनामुळे यातून सुटका करून घेऊ शकतील पण सर्वसाधारण समाज मात्र त्याच दुःखपूर्ण स्थितीमध्ये खितपत पडलेला असेल. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 15 : 293-294)

साधना, योग आणि रूपांतरण – २२३

(‘रूपांतरणा’बाबत श्रीमाताजींनी अगोदर केलेल्या विवेचनातील काही भाग वाचून दाखविला गेला आहे. आणि आता श्रीमाताजी त्यावर भाष्य करत आहेत.)

समग्र रूपांतरण आणि ज्या चेतनेच्या रूपांतरणाचा मी आधी उल्लेख केला होता त्या दोन्हीमध्ये मी फरक का करते? चेतना आणि व्यक्तीच्या इतर भागांमध्ये काय संबंध असतो? हे इतर भाग कोणते? जे जे कोणी योगसाधना करतात त्यांच्याबाबतीत हे चेतनेचे रूपांतरण घडून येते आणि ते ‘ईश्वरी उपस्थिती’विषयी किंवा स्वतःच्या अस्तित्वाच्या ‘सत्या’विषयी जागरूक होऊ लागतात. बऱ्याच जणांना याचा अनुभव आहे, असे मी म्हणत नाहीये पण किमान काही जणांना तरी हा अनुभव आलेला असतो. मग हा अनुभव आणि समग्र रूपांतरण यामध्ये काय फरक असतो?

साधक : समग्र रूपांतरणामध्ये बाह्यवर्ती प्रकृती आणि आंतरिक चेतना या दोन्ही रूपांतरित होतात. व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, तिच्या सवयी इत्यादी पूर्णपणे बदलून जातात, तसेच तिचे विचार आणि गोष्टींकडे पाहण्याचा तिचा मानसिक दृष्टिकोनही बदलून जातो.

श्रीमाताजी : हो, बरोबर आहे पण तुम्ही जर पुरेशी काळजी घेतली नाहीत आणि तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवले नाहीत तर, तुमच्यामध्ये असेही काही असते की ज्यामध्ये कोणतेही परिवर्तन न होता ते तसेच राहिलेले असते. ते नेमके काय असते? तर ती शारीर-चेतना (body consciousness) असते. आता ही शारीर-चेतना म्हणजे काय? त्यामध्ये अर्थातच प्राणिक चेतनेचाही समावेश असतो, म्हणजे येथे शारीर-चेतना ही समग्रत्वाने अभिप्रेत आहे. आणि मग या समग्र शारीर-चेतनेमध्ये शारीरिक मनाचाही (physical mind) समावेश होतो. हे असे मन असते की जे तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या सगळ्या सर्वसामान्य गोष्टींनी व्याप्त असते आणि त्याला प्रतिसाद देत असते. एक प्राणिक चेतनाही (vital consciousness) असते. संवेदना, आवेग, उत्साह आणि इच्छावासना यांबाबतची जाणीव म्हणजे ही चेतना असते. आणि सरतेशेवटी स्वयमेव एक शारीर-चेतना असते, ही भौतिक चेतना असते, ती शरीराची चेतना असते आणि ही चेतना आजवर पूर्णतः कधीच रूपांतरित झालेली नाही.

आजवर सार्वत्रिक, म्हणजे शरीराची एकंदर चेतना रूपांतरित करण्यात आली आहे म्हणजे, व्यक्तीला ज्या गोष्टी अपरिहार्य वाटत नाहीत अशा गोष्टी म्हणजे विचारांची, सवयींची बंधने व्यक्ती झुगारून देऊ शकते. या गोष्टीमध्ये परिवर्तन होऊ शकते, हे परिवर्तन झालेले आहे. परंतु पेशींची जी चेतना आहे त्यामध्ये आजवर कोणतेही परिवर्तन झालेले नाही. पेशींमध्ये एक चेतना असते. त्यालाच आम्ही ‘शारीरिक चेतना’ असे संबोधतो आणि ती चेतना संपूर्णपणे शरीराशी संबद्ध असते.

या चेतनेमध्ये परिवर्तन होणे अतिशय कठीण असते कारण ही चेतना सामूहिक सूचनेच्या प्रभावाखाली असते आणि ही सामूहिक सूचना रूपांतरणाच्या पूर्णपणे विरोधी असते. आणि त्यामुळे व्यक्तीला या सामूहिक सूचनेच्या विरोधात संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष फक्त वर्तमानकालीन सामूहिक सूचनांच्या बाबतीतच करावा लागतो असे नाही तर, संपूर्ण पृथ्वी-चेतनेशी संबंधित असणाऱ्या सामूहिक सूचनेच्या विरोधातही हा संघर्ष करावा लागतो. आणि या पार्थिव मानवी चेतनेचे मूळ मनुष्याची जेव्हा सर्वप्रथम निर्मिती झाली, घडण झाली तेथपर्यंत जाऊन पोहोचते. पेशींना ‘सत्या’ची, जडद्रव्याच्या ‘शाश्वतते’ची उत्स्फूर्तपणे जाणीव होण्यापूर्वी उपरोक्त सामूहिक सूचनांवर मात करावी लागते. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 15 : 292-293)

साधना, योग आणि रूपांतरण – २२२

आपल्याला समग्र रूपांतरण हवे आहे; शरीराचे आणि त्याच्या सर्व क्रियांचे रूपांतरण हवे आहे. पूर्वी जेव्हा ‘रूपांतरणा’विषयी बोलले जात असे तेव्हा तेथे केवळ आंतरिक चेतनेचे रूपांतरणच अभिप्रेत असे. ही सखोल चेतना स्वत:मध्ये शोधण्याचा व्यक्ती प्रयत्न करत असे; हे करत असताना, आंतरिक गतिविधींवरच लक्ष केंद्रित करायचे असल्याने, शरीराला आणि त्याच्या क्रियाकलापांना, ती व्यक्ती एक लोढणं समजत असे; आणि निरुपयोगी गोष्ट म्हणून त्यास ती धुडकावून देत असे.

परंतु, हे पुरेसे नसल्याचे श्रीअरविंदांनी स्पष्ट केले. जडभौतिक जगताने देखील या रूपांतरणामध्ये सहभागी व्हावे आणि त्यानेही या गहनतर ‘सत्या’ची अभिव्यक्ती करावी, अशी त्या ‘सत्या’कडून मागणी होत आहे, हे त्यांनी स्पष्ट केले आहे. परंतु लोकांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना असे वाटले की, अंतरंगामध्ये काय घडत आहे याची अजिबात काळजी न करतादेखील शरीर आणि त्याच्या क्रिया यांचे रूपांतरण घडविणे शक्य आहे, अर्थात हे खरे नाही.

हे शारीरिक रूपांतरणाचे कार्य हाती घेण्यापूर्वी, म्हणजे जे सर्वात अवघड असे कार्य आहे ते हाती घेण्यापूर्वी, तुमची आंतरिक चेतना ही सत्यामध्ये दृढपणे प्रस्थापित झालेली असली पाहिजे; म्हणजे मग हे रूपांतरण म्हणजे त्या ‘सत्या’चा चरम आविष्कार असेल, किमान आत्ताच्या घडीपुरता तरी तो चरम असेल.

या रूपांतरणाचा प्रारंभबिंदू असतो ग्रहणशीलता! रूपांतरण प्राप्त करून घेण्यासाठीची ही अत्यावश्यक अट आहे. त्यानंतर चेतनेमध्ये परिवर्तन घडून येते. चेतनेचे हे परिवर्तन आणि त्याची पूर्वतयारी यांची तुलना नेहमी अंड्यातील कोंबडीच्या पिलाच्या घडणीशी केली जाते. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अंडे जसेच्या तसे दिसत असते, त्यामध्ये काहीही बदल दिसत नाही आणि जेव्हा ते पिल्लू आत पूर्ण विकसित झालेले असते, पूर्णपणे सजीव झालेले असते, तेव्हा ते त्याच्या छोट्याशा चोचीने त्या कवचाला टोचे मारते आणि त्यातून बाहेर पडते. चेतनेच्या परिवर्तनाच्या क्षणीसुद्धा असेच काहीसे घडून येते.

दीर्घ काळपर्यंत काहीच घडत नाही असेच तुम्हाला वाटत असते; तुमची चेतना नेहमीप्रमाणेच आहे, त्यात काहीच बदल झालेला नाही असेच तुम्हाला वाटत असते. तुमच्यापाशी जर का उत्कट अभीप्सा असेल तर तुम्हाला कधीकधी विरोधदेखील जाणवतो; जणूकाही तुम्ही एखाद्या भिंतीवर धडका मारत आहात पण ती काही ढासळत नाही. मात्र जेव्हा तुमची अंतरंगातून तयारी झालेली असते तेव्हा एक शेवटचा प्रयत्न – तुमच्या अस्तित्वाच्या कवचाला धडका मारण्याचा एक प्रयत्न पुरेसा ठरतो आणि मग सर्वकाही खुले होते – आणि तुम्ही एका अन्य चेतनेमध्ये उन्नत झालेले असता.

मी असे म्हटले होते की ही मूलभूत समतोलाची क्रांती आहे. म्हणजे त्यामध्ये चेतनेचे संपूर्णतः प्रत्युत्क्रमण होते. लोलकामधून प्रकाश जेव्हा बाहेर पडतो तेव्हा जसे होते तसेच येथे होते. किंवा असे म्हणता येईल की, जणूकाही तुम्ही एखादा चेंडू आतून बाहेर वळवता (म्हणजे येथे चेंडूची आतली बाजू बाहेर आणि बाहेरची बाजू आतमध्ये जाते.) आणि ही गोष्ट चतुर्थ मितीशिवाय (fourth dimension) शक्य नसते. व्यक्ती येथे सामान्य त्रिमिती चेतनेमधून बाहेर पडून, अधिक उच्च अशा चतुर्थ मितीच्या चेतनेमध्ये प्रवेश करते. व्यक्ती अगणित मिती असलेल्या चेतनेमध्ये प्रवेश करते. हा अनिवार्य असा आरंभबिंदू असतो. जोपर्यंत तुमच्या चेतनेची ही मितीच बदलत नाही तोपर्यंत तुम्हाला वस्तुमात्रांविषयीची जी वरकरणी दृष्टी असते त्याच स्थितीमध्ये तुम्ही कायम राहता आणि त्यामुळे तुम्ही त्यांची अगाधता, गहनता गमावून बसलेले असता.

– श्रीमाताजी (CWM 04 : 18-19)

साधना, योग आणि रूपांतरण – २२१

उत्तरार्ध

चेतनेमध्ये अंशतः झालेल्या परिवर्तनामुळे, एकेकाळी ज्या गोष्टी तुम्हाला हव्याहव्याशा वाटायच्या त्यातील तुमचे स्वारस्य नाहीसे होते. परंतु हे चेतनेमधील ‘परिवर्तन’ असते; आम्ही ज्याला ‘रूपांतरण’ म्हणतो ते हे नव्हे. कारण रूपांतरण हे मूलभूत आणि परिपूर्ण असते, तो काही केवळ बदल नसतो अथवा परिवर्तन नसते, तर ते चेतनेचे प्रत्युत्क्रमण (reversal) असते. म्हणजे यामध्ये व्यक्तीचे अस्तित्व हे जणू काही अंतर्बाह्य पालटते, आणि त्यामुळे व्यक्ती पूर्णतः एका वेगळ्या अवस्थेमध्ये प्रवेश करते.

प्रत्युत्क्रमित झालेल्या या चेतनेमध्ये व्यक्ती ही जीवन आणि वस्तुमात्रांच्या ऊर्ध्वस्थित झालेली असते आणि तेथून त्यांच्याशी व्यवहार करते. ती चेतना प्रत्येक गोष्टीच्या केंद्रस्थानी असते आणि ती व्यक्तीच्या बाह्यवर्ती सर्व कृतींना तेथून दिशा दर्शन करत असते. उलट सामान्य चेतनेमध्ये व्यक्ती बाहेर आणि खालच्या बाजूस स्थित असते. बाहेरून, खालून ती केंद्रस्थानी पोहोचण्याचा प्रयत्न करत असते आणि असे करत असताना ती स्वतःच्याच अज्ञानाच्या व अंधतेच्या ओझ्यामुळे दबली जाते. त्यांच्या अतीत जाण्यासाठी ती अत्यंत निकराचा प्रयत्न करत असते. वस्तु प्रत्यक्षात कशा आहेत, त्यांचे वास्तव काय आहे याबाबत सामान्य चेतना अज्ञ असते, ती त्यांचे फक्त बाह्य आवरणच पाहू शकते. परंतु खरी चेतना ही केंद्रस्थानी असते, ती वास्तवाच्या हृदयस्थानी असते आणि तिला सर्व गतिविधींच्या उमगाबद्दलची थेट दृष्टी असते. ती अंतरंगामध्ये आणि ऊर्ध्वस्थित वसलेली असल्याने तिला सर्व गोष्टींचा व शक्तींचा उगमस्रोत आणि कार्यकारणभाव ज्ञात असतो.

मी पुन्हा एकदा सांगते की, हे प्रत्युक्रमण अचानकपणे घडून येते. तुमच्यामधील काहीतरी खुले होते आणि अचानकपणे तुमचा एका नवीन जगामध्ये प्रवेश झाला असल्याचे तुम्हाला आढळते. प्रारंभी हे परिवर्तन अंतिम आणि निर्णायक स्वरूपाचे असेलच असे नाही. ते परिवर्तन चिरस्थायी रूपात स्थिरस्थावर होऊन, तो तुमचा प्रकृतिधर्म होण्यासाठी कधीकधी अधिक कालावधीची आवश्यसकता असते. परंतु एकदा का हे परिवर्तन घडून आले की मग ते तेथे कायम राहते; तत्त्वतः कायमसाठी ते तेथे स्थिर होते. आणि नंतर मग कशाची गरज असेल तर ती म्हणजे ते परिवर्तन क्रमाक्रमाने व्यावहारिक जीवनाच्या तपशिलात अभिव्यक्त करण्याची!

रूपांतरित चेतनेचे पहिले आविष्करण हे नेहमीच अचानकपणे झाल्यासारखे दिसते. तुमचे एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेमध्ये, हळूहळू, क्रमाक्रमाने परिवर्तन होत आहे हे तुम्हाला जाणवतही नाही; तर आपण अचानकपणे एका नवीन चेतनेमध्ये जागृत झालो आहोत किंवा नव्याने जन्माला आलो आहोत असे तुम्हाला जाणवते. कोणत्याही मानसिक प्रयत्नांमुळे तुम्ही या अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचू शकत नाही. कारण हे रूपांतरण नक्की कसे असते याची कल्पना मनाच्या साहाय्याने तुम्ही करू शकत नाही. कोणतेच मानसिक वर्णन येथे पुरेसे ठरू शकत नाही. (पूर्णयोगांतर्गत) संपूर्ण रूपांतरणाचा आरंभबिंदू हा असा असतो.

– श्रीमाताजी (CWM 12 : 80-81)

साधना, योग आणि रूपांतरण – २२०

आपल्याला संपूर्ण रूपांतरण अपेक्षित आहे, म्हणजे शरीर आणि त्याच्या सर्व कृती यांचे रूपांतरण आपल्याला अपेक्षित आहे. परंतु अन्य कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी, पहिली पायरी अगदी अनिवार्य असते आणि ती म्हणजे चेतनेचे रूपांतरण. या रूपांतरणासाठी अभीप्सा असणे आणि ती प्रत्यक्षात उतरविण्याचा संकल्प असणे हा अर्थातच आरंभबिंदू आहे, त्याशिवाय काहीच होणे शक्य नाही. परंतु या अभीप्सेबरोबर जर व्यक्तीमध्ये आंतरिक खुलेपणा, उन्मुखता असेल, एक प्रकारची ग्रहणशीलता असेल तर अशी व्यक्ती या रूपांतरित चेतनेमध्ये एका प्रयत्नामध्ये प्रवेश करू शकते आणि स्वतःला तेथे सुस्थिर करू शकते. तसे म्हटले तर, चेतनेमधील हे परिवर्तन काहीसे आकस्मिक (abrupt) असते. म्हणजे जेव्हा हे परिवर्तन घडून येते तेव्हा ते अचानकपणे घडून येते, जरी या परिवर्तनाची पूर्वतयारी ही संथपणे आणि दीर्घकाळ चालू असण्याची शक्यता असली तरीसुद्धा जेव्हा हे परिवर्तन घडून येते तेव्हा मात्र ते अचानकपणे घडून येते.

मी येथे फक्त मानसिक दृष्टिकोनात होणाऱ्या परिवर्तनाविषयी बोलत नाहीये तर स्वयमेव चेतनेमधील परिवर्तनाविषयी बोलत आहे. हे अगदी संपूर्ण आणि परिपूर्ण असे परिवर्तन असते, म्हणजे त्याच्या मूलभूत अवस्थेमध्येच एक प्रकारची क्रांती घडून येते. एखादा चेंडू आतून बाहेरच्या बाजूस उघडावा तशी ही प्रक्रिया असते. (म्हणजे येथे चेंडूची आतली बाजू बाहेर आणि बाहेरची बाजू आतमध्ये जाते.) रूपांतरित चेतनेला प्रत्येक गोष्ट नवीन आणि निराळी वाटते; एवढेच नाही तर सामान्य चेतनेला एखादी गोष्ट जशी दिसते त्याच्या जवळजवळ उलट अशा पद्धतीने ती गोष्ट रूपांतरित चेतनेला दिसते. सामान्य चेतनेमध्ये असताना तुम्ही अतिशय संथपणाने, एकापाठोपाठ एक अनुभव घेत घेत, अज्ञानाकडून खूप दूरवर असणाऱ्या आणि बरेचदा संदिग्ध ज्ञानाच्या दिशेने प्रगत होता. परंतु रूपांतरित चेतनेमध्ये मात्र तुमचा आरंभबिंदू ज्ञान हा असतो आणि तुम्ही ज्ञानाकडून ज्ञानाकडे प्रगत होत जाता. तथापि, ही केवळ एक सुरुवात असते. कारण आंतरिक रूपांतरणाचा परिणाम म्हणून बाह्यवर्ती चेतना, बाह्यवर्ती सक्रिय व्यक्तित्वाचे विविध स्तर आणि विविध घटक हे संथपणे आणि क्रमाक्रमाने रूपांतरित होतात. (उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी (CWM 12 : 80)

साधना, योग आणि रूपांतरण – २१९

चेतना ईश्वराप्रत खुली करणे, अधिकाधिकरित्या आंतरिक चेतनेमध्ये राहून, तेथून बाह्य जीवनावर कार्य करणे, आंतरतम असणाऱ्या चैत्य पुरुषाला (psychic) पुढे आणणे आणि त्याच्या शक्तीने अस्तित्वाचे अशा रीतीने शुद्धीकरण आणि परिवर्तन घडविणे की ज्यामुळे ते अस्तित्व रूपांतरणासाठी सज्ज होऊ शकेल आणि ‘दिव्य ज्ञान’, ‘दिव्य संकल्प’ आणि ‘दिव्य प्रेम’ यांच्याशी एकत्व पावू शकेल, हे पूर्णयोगाचे पहिले ध्येय आहे.

योगिक चेतना विकसित करणे म्हणजे, अस्तित्वाचे त्याच्या सर्व स्तरांवर वैश्विकीकरण करणे, ब्रह्मांड-पुरुषाविषयी आणि ब्रह्मांड-शक्तींविषयी (cosmic being and cosmic forces) जागृत होणे, आणि ‘अधिमानसा’पर्यंतच्या (Overmind) सर्व स्तरांवर ‘ईश्वरा’शी एकत्व पावणे, हे पूर्णयोगाचे दुसरे ध्येय आहे.

‘अधिमानसा’च्या पलीकडे असणाऱ्या, अतिमानसिक चेतनेद्वारे (supramental consciousness), परात्पर ‘ईश्वरा’च्या (transcendent Divine) संपर्कात येणे, चेतनेचे व प्रकृतीचे अतिमानसिकीकरण घडविणे आणि गतिशील अशा ‘दिव्य सत्या’च्या साक्षात्कारासाठी तसेच त्या सत्याच्या पार्थिव-प्रकृतीमधील रूपांतरकारी अवतरणासाठी स्वतःला त्याचे एक साधन बनविणे, हे पूर्णयोगाचे तिसरे ध्येय आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 20)

साधना, योग आणि रूपांतरण – २१४

आध्यात्मिकीकरण (Spiritualisation) म्हणजे उच्चतर शांती, शक्ती, प्रकाश, ज्ञान, विशुद्धता, आनंद इत्यादीचे अवतरण. या गोष्टी ‘उच्च मना’पासून ‘अधिमानसा’पर्यंतच्या (Higher Mind to Overmind) कोणत्याही उच्च स्तराशी संबंधित असू शकतात. कारण त्यांपैकी कोणत्याही स्तरावर ‘आत्म्या’चा साक्षात्कार होऊ शकतो.

आध्यात्मिकीकरणाद्वारे व्यक्तिनिष्ठ रूपांतरण घडून येते. यामध्ये साधनभूत प्रकृतीचे इतपतच रूपांतरण घडते की जेणेकरून त्या प्रकृतीकडून, ‘विश्वात्म्या’ला जे कार्य करून घ्यायचे असते त्याचे ती (सुयोग्य) साधन होऊ शकेल. हे होत असताना अंतरंगातील आत्मा स्थिर, मुक्त आणि ‘ईश्वरा’शी एकत्व पावलेला असा राहतो.

परंतु हे व्यक्तिगत रूपांतरण अपूर्ण असते. जेव्हा ‘अतिमानसिक’ परिवर्तन (Supramental change) घडून येते तेव्हाच साधनभूत ‘प्रकृती’चे संपूर्ण रूपांतरण होऊ शकते. तोपर्यंत प्रकृती अनेक अपूर्णतांनी भरलेली असते. परंतु उच्चतर स्तरावरील आत्म्याला त्याने काही फरक पडत नाही कारण तो या सर्वापासून मुक्त असतो, त्याच्यावर या गोष्टींचा कोणताही परिणाम होत नाही. आंतरिक पुरुष देखील अगदी आंतरिक शरीरापर्यंत मुक्त आणि अप्रभावित राहू शकतो. ‘अधिमानस’ हे परिणामकारक ‘दिव्य ज्ञाना’च्या कार्याच्या मर्यादांच्या, ‘दिव्य शक्ती’च्या कार्याच्या मर्यादांच्या अधीन असते. ते आंशिक आणि मर्यादित ‘दिव्य सत्या’दी गोष्टींच्या अधीन असते. केवळ ‘अतिमानसा’मध्येच संपूर्ण ‘सत्-चेतना’ (Truth consciousness) व्यक्तीमध्ये अवतरित होऊ शकते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 404)

साधना, योग आणि रूपांतरण – २१३

‘दिव्य चेतने’च्या विविध अवस्था असतात. त्याचप्रमाणे रूपांतरणाच्या देखील विविध अवस्था असतात.

प्रथम असते ते आंतरात्मिक रूपांतरण (psychic transformation). यामध्ये सर्व गोष्टी ‘ईश्वरा’शी आंतरात्मिक चेतनेच्या माध्यमातून संपर्कात असतात.

नंतर असते ते आध्यात्मिक रूपांतरण (spiritual transformation). यामध्ये सर्व गोष्टी वैश्विक चेतनेमधील ‘ईश्वरा’मध्ये विलीन होतात.

तिसरे असते ते अतिमानसिक रूपांतरण (supramental transformation). यामध्ये सर्व गोष्टींचे दिव्य विज्ञानमय चेतनेमध्ये अतिमानसिकीकरण होते.

या अंतिम रूपांतरणाबरोबर मन, प्राण आणि शरीर यांचे संपूर्ण रूपांतरण (संपूर्णपणाच्या माझ्या संकल्पनेनुसार) होण्यास सुरुवात होते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 414)