Tag Archive for: पूर्णयोग

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ०६

ज्यांच्या अंतरंगामध्ये ईश्वरासाठीची एक प्रामाणिक हाक आलेली असते, त्यांच्या मनाने किंवा प्राणाने कितीही विघ्ने निर्माण केली किंवा अशा व्यक्तींवर कितीही आघात झाले किंवा त्यांची प्रगती अगदी संथगतीने व वेदनादायक झाली; जरी ते काही काळासाठी मार्गच्युत झाले किंवा ते पथभ्रष्ट झाले तरी सरतेशेवटी चैत्य अस्तित्वच (psychic) नेहमी विजयी होते आणि ईश्वरी साहाय्य प्रभावी ठरल्याचे सिद्ध होते. त्यावर विश्वास ठेवा आणि चिकाटी बाळगा, मग ध्येय निश्चितपणे साध्य होईल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 29)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ०४

पूर्णयोगाची साधना करण्याची कोणाचीच योग्यता नसते, (असे जेव्हा मी म्हणालो तेव्हा) त्याचा अर्थ असा आहे की, कोणीही फक्त स्वत:च्या एकट्याच्या क्षमतेवर ही साधना करू शकत नाही. प्रश्न आहे तो, ती दिव्यशक्ती पूर्णत: प्राप्त करून घेण्यासाठी स्वत:ला घडविण्याचा!

ही साधना व्यक्ती केवळ स्वबळावर करू शकत नाही. जर व्यक्तीची सहमती व अभीप्सा असेल तर ती दिव्य शक्तीच ही साधना करून घेऊ शकते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 32)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ०३

पूर्णयोगामध्ये केवळ ईश्वराचा साक्षात्कार अपेक्षित नाही तर संपूर्ण आत्मनिवेदन (consecration) अभिप्रेत आहे, तसेच जोपर्यंत ईश्वरी चेतनेचे आविष्करण करण्यासाठी व्यक्तीचे आंतरिक व बाह्य जीवन सुपात्र ठरत नाही आणि जोपर्यंत व्यक्तीचे जीवन हे ईश्वरी कार्याचाच एक भाग बनून राहत नाही तोपर्यंत, आंतरिक व बाह्य जीवनामध्ये परिवर्तन घडवत राहणे हे या योगामध्ये अभिप्रेत आहे. याचा अर्थ असा की, निव्वळ नैतिक आणि शारीरिक उग्र तपस्येहून कितीतरी अधिक अचूक आणि कठोर असे आंतरिक अनुशासन (discipline) येथे अभिप्रेत आहे.

पूर्णयोगाचा मार्ग हा इतर बहुतांश योगमार्गांपेक्षा अधिक विशाल व अधिक दुःसाध्य आहे. त्यामुळे, आपल्याला अंतरात्म्याकडून हाक आली आहे आणि अंतिम ध्येयाप्रत वाटचाल करत राहण्याची आपली तयारी आहे, या गोष्टीची खात्री पटल्याशिवाय व्यक्तीने या मार्गात प्रवेश करता कामा नये.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 27)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ०२

योगाच्या ध्येयाप्रत पोहोचणे नेहमीच कठीण असते, पण पूर्णयोग हा इतर कोणत्याही योगांपेक्षा अधिक दुस्तर आहे. आणि ज्यांना या योगाची हाक आलेली आहे, ज्यांच्याजवळ प्रत्येक गोष्टीला व प्रत्येक जोखमीला तोंड देण्याची क्षमता, इच्छाशक्ती आहे, अगदी अपयशाचा धोका पत्करण्याचीदेखील ज्यांची तयारी आहे; आणि पूर्णपणे निःस्वार्थीपणा, इच्छाविरहितता व समर्पण यांजकडे प्रगत होण्याचा ज्यांचा संकल्प आहे अशा व्यक्तींसाठीच पूर्णयोग आहे.

*

(योगमार्गासाठी एखाद्या व्यक्तीची) तयारी असणे, याचा मला अभिप्रेत असलेला अर्थ ‘क्षमता’ असा नसून ‘इच्छाशक्ती’ असा आहे. सर्व अडचणींना तोंड देऊन, त्यावर मात करण्याची आंतरिक इच्छा जर व्यक्तीकडे असेल, तर या मार्गाचा अवलंब करता येईल; मग त्यासाठी किती काळ लागतो हे तितकेसे महत्त्वाचे नाही.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 27)

नैराश्यापासून सुटका – ३८

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

आपल्याला काही किंमतच नाही अशी आत्म-अवमूल्यनाची (self-depreciation) अतिरंजित भावना, हताशपणा, असहाय्यता या भावना म्हणजे विरोधी शक्तींच्या सूचना असतात आणि त्या सूचनांचा व्यक्तीने कधीही स्वतःमध्ये शिरकाव होऊ देता कामा नये. तुम्ही ज्या दोषांबद्दल सांगत आहात ते दोष सर्व मानवी प्रकृतीमध्ये असतातच आणि प्रत्येकच साधकाचे बाह्यवर्ती अस्तित्व हे असे दोषयुक्त असते. त्या दोषांची जाणीव होणे ही गोष्ट रूपांतरणासाठी (transformation) आवश्यक असते, परंतु ते रूपांतरणाचे कार्य चैत्य पुरुषाला (psychic being) स्वाभाविक असे म्हणजे अविचल मनाने, ईश्वरा‌विषयीच्या श्रद्धेने व समर्पणाने आणि उच्चतर चेतनेबद्दलच्या प्रगाढ अभीप्सेने केले गेले पाहिजे.

बाह्यवर्ती अस्तित्वाचे (external being) रूपांतरण ही पूर्णयोगा‌मधील सर्वात कठीण गोष्ट आहे आणि त्यासाठी श्रद्धा, धीर, अविचलता आणि दृढ निश्चयाची आवश्यकता असते. नैराश्य वगैरे सर्व गोष्टी तुम्ही भिरकावून दिल्या पाहिजेत आणि योगमार्गावर स्थिरपणाने वाटचाल केली पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 207)

जीवन जगण्याचे शास्त्र – ३१

सर्वसाधारणपणे माणसं ज्याला प्रेम असे संबोधतात, ते प्रेम प्राणिक भावना असणारे प्रेम असते; ते प्रेम हे (खरंतर) प्रेमच नसते; तर ती केवळ एक प्राणिक वासना असते, एक प्रकारच्या अभिलाषेची ती उपजत प्रेरणा असते, तो मालकी भावनेचा आणि एकाधिकाराचा भावावेग असतो. योगमार्गामध्ये त्याच्या अंशभागाचीदेखील भेसळ होऊ देता कामा नये. ईश्वराभिमुख झालेले प्रेम हे असे प्रेम असता कामा नये. (कारण) ते दिव्य प्रेम नसते.

ईश्वराबद्दल वाटणाऱ्या प्रेमामध्ये आत्मदान (self-giving) असते, त्यामध्ये कोणतीही मागणी नसते. ते शरणभावाने आणि समर्पणाने परिपूर्ण असते. ते कोणतेही हक्क गाजवत नाही; ते कोणत्याही अटी लादत नाही; ते कोणताही सौदा करत नाही. मत्सर, अभिमान वा राग अशा प्रक्षोभक भावना त्याच्या ठिकाणी आढळत नाहीत, कारण या गोष्टी त्याच्या घडणीतच नसतात.

ईश्वराभिमुख झालेल्या प्रेमाला प्रतिसाद म्हणून ‘दिव्य माता’ खुद्द स्वत:लाच देऊ करते, अगदी मुक्तपणे! आणि आंतरिक वरदानामध्ये ती गोष्ट प्रतिबिंबित झालेली दिसते. दिव्य मातेचे अस्तित्व तुमच्या मनामध्ये, तुमच्या प्राणामध्ये, तुमच्या शारीरिक चेतनेमध्ये प्रतिबिंबित झालेले दिसते. तिची शक्ती तुमच्या अस्तित्वाच्या सर्व गतिविधी हाती घेऊन, त्यांना परिपूर्णत्व (perfection) आणि परिपूर्तीच्या (fulfillment) दिशेने घेऊन जात, दिव्य प्रकृतीमध्ये तुमची पुनर्घडण करते. तिच्या प्रेमाने तुम्हाला कवळून घेतले आहे आणि ती स्वतः तुम्हाला तिच्या कवेमध्ये घेऊन, ईश्वराकडे घेऊन जात आहे असे तुम्हाला जाणवते. तुम्हाला याची जाणीव व्हावी आणि तिने तुमच्या अगदी जडभौतिक अंगापर्यंत तुमचा ताबा घ्यावा, अशी अभीप्सा तुम्ही बाळगली पाहिजे. येथे मात्र कोणतीही मर्यादा असत नाही, ना काळाची ना समग्रतेची!

व्यक्तीने जर खरोखर अशी अभीप्सा बाळगली आणि ती जर तिला साध्य झाली तर, इतर कोणत्याही मागण्यांना किंवा अपूर्ण राहिलेल्या इच्छावासनांना जागाच असणार नाही. आणि व्यक्तीने जर खरोखरच अशी अभीप्सा बाळगली तर, ती जसजशी अधिकाधिक शुद्ध होत जाईल, तसतशी निश्चितपणे तिला ती गोष्ट अधिकाधिक साध्य होईलच. आणि आवश्यक असणारा बदल तिच्या प्रकृतीमध्ये घडून येईलच. कोणतेही स्वार्थी हक्क आणि इच्छा-वासना यांपासून मुक्त असे तुमचे प्रेम असू द्या; मग प्रेम ग्रहण करण्याची, धारण करण्याची तुमची जेवढी क्षमता आहे, तेवढे सर्व प्रेम प्रतिसादरूपाने तुम्हाला मिळत आहे, असे तुम्हाला आढळेल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 338-339)

जीवन जगण्याचे शास्त्र – २६

पूर्णयोगाचा मार्ग खूप दीर्घ आहे. स्वतःमधील आणि जगातील ईश्वराला आपली सर्व कर्मे त्यागबुद्धीने, यज्ञबुद्धीने समर्पित करणे हे या मार्गावरील पहिले पाऊल असते. हा मनाचा आणि हृदयाचा भाव असतो, त्याचा आरंभ करणे हे फारसे अवघड नाही, परंतु तो दृष्टिकोन पूर्ण मन:पूर्वकतेने अंगीकारणे आणि तो सर्वसमावेशक करणे फार अवघड असते.

कर्मफलावर असणारी आपली आसक्ती सोडून देणे हे या मार्गावरील दुसरे पाऊल असते. आपल्यामध्ये अनुभवास येणारी ‘ईश्वरी उपस्थिती, दिव्य चेतना आणि दिव्य सामर्थ्य’ हे त्यागाचे खरे, अपरिहार्य, अतिशय इष्ट असे फळ असते. ही एक गोष्ट आवश्यक असते. हे फळ मिळाले की, अन्य सर्व गोष्टींची त्याला जोड मिळेलच. हे दुसरे पाऊल म्हणजे आपल्या प्राणिक अस्तित्वातील, आपल्या वासनात्म्यातील (desire-soul), वासनामय प्रकृतीतील अहंभावप्रधान इच्छेचे रूपांतर असते; आणि ते फारच अवघड असते.

केंद्रस्थ अहंभावाचे उच्चाटन आणि एवढेच नव्हे तर, ईश्वराचे साधन झाल्याच्या अहं जाणिवेचे देखील उच्चाटन हे या मार्गावरील तिसरे पाऊल असते. हे रूपांतरण सर्वाधिक अवघड असते; आणि जोपर्यंत पहिली दोन पावले उचलली जात नाहीत तोपर्यंत हे रुपांतरण पूर्ण होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत तिसऱ्या कळसरूपी पावलाची जोड मिळत नाही म्हणजेच अहंभाव नष्ट करून, वासनेचे मूळच उखडून फेकून दिले जात नाही तोपर्यंत, आधीच्या दोन पावलांचे कार्यसुद्धा पूर्ण होत नाही.

क्षुद्र अहंभाव प्रकृतीतून मुळापासून दूर केला जातो तेव्हाच, साधकाला ऊर्ध्वस्थित असणाऱ्या त्याच्या खऱ्या अस्तित्वाची जाणीव होऊ शकते; ईश्वराची शक्ती आणि ईश्वराचा एक अंशभाग असे त्याचे स्वरूप असते. साधकाला या खऱ्या अस्तित्वाची ओळख होते तेव्हाच तो ईश्वरी शक्तीच्या संकल्पाव्यतिरिक्त असणाऱ्या इतर सर्व प्रेरक-शक्तींचा त्याग करतो.

– श्रीअरविंद (CWSA 23-24 : 247-248)

जीवन जगण्याचे शास्त्र – १६

तुम्ही जर ईश्वरी शक्तीप्रत आत्मदान करू शकत नसाल आणि तिच्या कार्यावर तुमचा विश्वास नसेल तर, तुम्हाला पूर्णयोग करता येणे शक्यच होणार नाही. तुम्ही जर केवळ मनामध्ये आणि मनाच्या शंकाकुशंका व कल्पना यांच्यामध्येच जीवन जगत असाल तर, तुमच्याबाबतीत पूर्णयोगाची शक्यताच निर्माण होत नाही. त्यासाठी मन शांत करण्याची क्षमता तसेच श्रीमाताजींची शक्ती म्हणजे महत्तर ईश्वरी शक्ती तुमच्यामध्ये कार्य करत आहे यावर विश्वास ठेवण्याची आणि त्याचा अनुभव घेण्याची क्षमता तुमच्याकडे असणे महत्त्वाचे असते. त्याचप्रमाणे तुमच्या प्रकृतीमध्ये त्या कार्याच्या आड येणारे जे जे काही असते त्यास नकार देत, त्या कार्याला साहाय्यभूत होण्याची क्षमता तुमच्याकडे असणे आवश्यक असते. या गोष्टी म्हणजे तुमच्यामध्ये पूर्णयोग करण्याची क्षमता आहे याची कसोटी असते.
*
तुम्हाला अस्वस्थ करणाऱ्या गोष्टींचा विचार करणे थांबविणे आणि शांती व शक्ती यांना स्वतःहून आविष्कृत होण्यास आणि तुमच्यामध्ये कार्य करू देण्यास वाव देणे याचा अर्थ ‘मन स्थिर-शांत करणे’ असा होतो. असे असेल तर ‘अंतरंगामध्ये राहणे’ (living inside) ही गोष्ट आपोआप घडून येईल. मग, त्याच्या बरोबरीने येणारी आंतरिक शांती आणि चेतना म्हणजेच तुम्ही स्वतः आहात असे तुम्हाला अधिकाधिक जाणवू लागेल आणि अन्य सर्व गोष्टी बाह्यवर्ती, वरवरच्या, उथळ असल्याचे देखील जाणवू लागेल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 27-28)

जीवन जगण्याचे शास्त्र – १२

पूर्णयोगाची साधना करताना नेहमी गंभीर चेहऱ्याने वावरण्याची किंवा शांत शांत राहण्याची आवश्यकता नसते, पण योगसाधना मात्र गांभीर्याने घेणे आवश्यक असते. शांती आणि अंतर्मुख एकाग्रता या गोष्टींना या योगामध्ये फार मोठे स्थान आहे. अंतरंगात वळणे आणि तेथे ईश्वराला भेटणे हे जर व्यक्तीचे ध्येय असेल तर तिने स्वतःला सदासर्वकाळ बहिर्मुख ठेवून चालत नाही. पण म्हणून व्यक्तीने सदासर्वकाळ किंवा बहुतांश काळ गंभीर आणि उदास असले पाहिजे, असाही त्याचा अर्थ होत नाही.

…‘क्ष’मध्ये (एका साधकाचा येथे निर्देश आहे.) दोन व्यक्तिमत्त्वं दडलेली आहेत. त्यातील एकाला जीवनामध्ये (बहिर्मुखी) प्राणिक विस्तार हवाहवासा वाटतो तर त्यातील दुसऱ्याला आंतरिक जीवन हवेसे वाटते. त्यातील पहिले व्यक्तिमत्त्व अस्वस्थ होते कारण आंतरिक जीवन हे काही बहिर्मुख विस्ताराचे जीवन नसते. तर (आंतरिक ओढ असलेले) दुसरे व्यक्तिमत्त्व दुःखीकष्टी होते कारण त्याचे ध्येय प्रत्यक्षात उतरत नाही.

पूर्णयोगामध्ये दोहोंपैकी (आंतरिक आणि बाह्य) कोणतेच व्यक्तिमत्त्व सोडून देण्याची आवश्यकता नसते. परंतु बाह्य प्राणिक अस्तित्वाने, आधी आंतरिक अस्तित्व प्रस्थापित होण्यासाठी वाव दिला पाहिजे, त्याला प्राधान्य दिले पाहिजे आणि त्याने (बाह्य प्राणिक अस्तित्वाने) आत्म्याचे साधन बनण्यासाठी व आंतरिक जीवनाचे कायदे पाळण्यासाठी संमती दिली पाहिजे.

ही गोष्ट मान्य करण्यास ‘क्ष’चे मन अजूनही नकार देत आहे. त्याला असे वाटते की, व्यक्तीने एकतर पूर्ण उदास, थंड आणि गंभीर असले पाहिजे; नाही तर, आंतरिक जीवनामध्ये भावनिक उकळ्या फुटल्या पाहिजेत आणि (उत्साहाचे) उधाण आणले पाहिजे. आंतरिक अस्तित्वाद्वारे प्राणिक अस्तित्वाचे शांत, आनंदी आणि प्रसन्नचित्त नियमन करणे ही गोष्ट काही अजून त्याच्या पचनी पडत नाही.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 175)

आत्मसाक्षात्कार – २२

पूर्णयोगाचे मूलभूत साक्षात्कार खालीलप्रमाणे आहेत.

१) संपूर्ण भक्ती ही ज्यायोगे हृदयाची मुख्य प्रेरणा व विचारांची स्वामिनी बनेल आणि ज्यायोगे जीवन व कर्म ‘श्रीमाताजीं’च्या आणि त्यांच्या ‘उपस्थिती’च्या नित्य एकत्वात घडत राहील अशा प्रकारचे चैत्य, अंतरात्मिक परिवर्तन (psychic change) घडणे.

२) शरीराच्या पेशी न्‌ पेशी ज्यामुळे भारल्या जातील अशा प्रकारे, ‘उच्चतर चेतने’च्या ‘शांती, प्रकाश, शक्ती’ इत्यादी गोष्टींचे मस्तकाद्वारे व हृदयाद्वारे संपूर्ण अस्तित्वामध्ये अवतरण होणे.

३) सर्वत्र अनंतत्वाने वसणाऱ्या ‘एकमेवाद्वितीय’ अशा ईश्वराची व श्रीमाताजींची अनुभूती येणे आणि त्या अनंत चेतनेमध्ये वास्तव्य घडणे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 319)