Tag Archive for: पूर्णयोग

कोणत्याही बाह्य गोष्टींमुळे, हर्ष किंवा शोक यामुळे, किंवा सुख-दु:खामुळे विचलित न होणे, तसेच लोकं काय म्हणतात किंवा काय करतात यामुळे विचलित न होणे, याला योगमार्गामध्ये समतेची अवस्था म्हणतात किंवा व्यक्तीमध्ये सर्व गोष्टींबाबत समभाव आहे, असे म्हटले जाते. या अवस्थेपर्यंत येऊन पोहोचणे हे साधनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते. यामुळे मन तसेच प्राणामध्ये, अविचलता (quietude) आणि निश्चल-निरवता (silence) येण्यास मदत होते. याचा अर्थ असा की, आता खरोखरच प्राण व प्राणिक मन स्वयमेव अविचल आणि निश्चल-निरव होऊ लागले आहे. त्या पाठोपाठ बुद्धीदेखील अविचल आणि निश्चल-निरव होणार हे निश्चित.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 335)

सत्त्वगुणाच्या माध्यमातून प्रगत होणे, ही पारंपरिक योगमार्गातील एक सर्वसाधारण संकल्पना आहे. पतंजलीप्रणीत योगामध्ये सांगितल्याप्रमाणे यमनियमाद्वारे असेल, किंवा बौद्धमतातील अष्टांगमार्गाद्वारे असेल किंवा भक्तिपंथातील साधुता यांसारख्या साधनांचा अवलंब करून, त्याद्वारे शुद्धीकरण आणि पूर्वतयारी करणे, या साऱ्या पारंपरिक योगाच्या संकल्पना आहेत.

पूर्णयोगामध्ये सत्त्वाच्या माध्यमातून विकसन होत नाही, तर येथे सत्त्वाची जागा समतेच्या जोपासनेद्वारा आणि आंतरात्मिक रूपांतरणाद्वारे (psychic transformation) घेतली जाते.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 424)

सर्व परिस्थितीमध्ये, अस्तित्वाच्या सर्व भागांमध्ये समता आणि शांती असणे हा योगस्थितीचा पहिला मुख्य आधार आहे. (तो दृढ झाला की मग) व्यक्तीचा कल जसा असेल त्यानुसार मग एकतर (ज्ञानासहित) प्रकाश येईल किंवा (सामर्थ्य आणि अनेक प्रकारची गतिमानता घेऊन) शक्ती अवतरेल किंवा (प्रेम आणि अस्तित्वाचा मोद घेऊन) आनंद येईल. परंतु पहिली आवश्यक स्थिती म्हणजे शांती! तिच्याविना (उपरोक्त) कोणतीच गोष्ट स्थिर होऊ शकत नाही.

श्रीअरविंद (CWSA 29 : 123)

व्यक्तीच्या अस्तित्वामध्ये जेव्हा सर्वत्र पूर्णतः शांती प्रस्थापित झालेली असते तेव्हा, कनिष्ठ प्राणाच्या प्रतिक्रिया त्या शांतीला विचलित करू शकत नाहीत. सुरुवातीला त्या प्रतिक्रिया, पृष्ठभागावर तरंग असावेत त्याप्रमाणे येऊ शकतात, नंतर त्या फक्त सूचनांच्या स्वरूपात येऊ शकतात. त्यांच्याकडे व्यक्ती लक्ष देईल किंवा देणारही नाही, परंतु काहीही असले तरी त्या आत शिरकाव करणार नाहीत, त्या अंतरंगातील शांतीवर परिणाम करणार नाहीत किंवा यत्किंचितही अस्वस्थता निर्माण करणार नाहीत.

या अवस्थेचे शब्दांत वर्णन करणे कठीण आहे, पण तरीही सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की, एखाद्या पर्वतावर कोणी दगड फेकून मारावेत आणि त्या पर्वताला जाणीव असेलच तर, फार फार त्याला त्या दगडांचा स्पर्श जाणवेल. पण तो स्पर्श इतका किरकोळ आणि वरवरचा असेल की, त्याचा त्या पर्वतावर काहीच परिणाम होणार नाही, तशी ही अवस्था असते. सरतेशेवटी ही प्रतिक्रियासुद्धा नाहीशी होते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 150-151)

शांतीमध्ये स्थिरतेच्या जाणिवेबरोबरच एक सुसंवादाची जाणीवदेखील असते आणि या जाणिवेमुळे मुक्तीची आणि परिपूर्ण तृप्तीची भावना निर्माण होते.

*

पृष्ठभागावर अशांतता असतानासुद्धा, आंतरिक अस्तित्वामध्ये प्रस्थापित शांतीचा अनुभव येणे ही नित्याची गोष्ट आहे. वास्तविक, समग्र अस्तित्वामध्ये परिपूर्ण समता साध्य होण्यापूर्वीची कोणत्याही योग्याची ती नित्याची अवस्था असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 148 & 153)

(श्रीअरविंद येथे सकारात्मक आणि अभावात्मक स्थिरता म्हणजे काय ते सांगत आहेत. तसेच स्थिरता आणि शांती यामधील फरक देखील ते उलगडवून दाखवत आहेत.)

स्थिरतेपेक्षा (calm) शांती (peace) अधिक सकारात्मक असते. जिथे अस्वस्थता, अशांतता किंवा त्रास नाही अशी एक अभावात्मक (negative) स्थिरतासुद्धा असू शकते. परंतु शांतीमध्ये नेहमीच काहीतरी सकारात्मक असते. स्थिरतेप्रमाणे शांतीमध्ये केवळ सुटकाच नसते तर; शांती येताना स्वतःसोबत एक विशिष्ट आनंद किंवा स्वतःचा आनंद घेऊन येत असते.

(अभावात्मक स्थिरतेप्रमाणेच) एक सकारात्मक स्थिरतादेखील असते; त्रास देऊ पाहणाऱ्या सर्व गोष्टींच्या विरोधात ती ठामपणाने उभी राहते, ती अभावात्मक स्थिरतेसारखी क्षीण आणि तटस्थ नसते तर ती सशक्त आणि भव्य असते.

बरेचदा शांती आणि स्थिरता हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरले जातात पण वर सांगितल्यानुसार, दोन्हीच्या खऱ्या अर्थाच्या आधारे, व्यक्तीला त्या दोन्हीमधील फरक लक्षात येऊ शकतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 148)

रिक्त मन (vacant mind) आणि स्थिर मन (calm mind) यामध्ये फरक आहे. तो असा की, मन जेव्हा रिक्त असते तेव्हा त्यामध्ये कोणताही विचार नसतो, धारणा नसते, कोणत्याच प्रकारची कोणतीही मानसिक कृती तेथे नसते, कोणत्याही रचलेल्या कल्पना नसतात, तर गोष्टींचा एक मूलभूत बोध तेथे असतो. मात्र स्थिर मनामध्ये, मानसिक अस्तित्वाचे द्रव्य (substance) स्थिर झालेले असते; ते इतके स्थिर झालेले असते की त्यास कोणीही विचलित करू शकत नाही.

काही विचार आलेच किंवा काही कृती उदयाला आल्याच तर, त्या आता मनामधून उगम पावलेल्या नसतात; त्या बाहेरून आलेल्या असतात आणि निर्वात हवेमध्ये आकाशामधून पक्ष्यांचा थवा इकडून तिकडे भरारी घेऊन जावा त्याप्रमाणे ते विचार किंवा कृती मनामध्ये प्रवेश करतात आणि तशाच बाहेर निघून जातात. या गोष्टी (स्थिर) मनात फक्त येऊन जातात, त्या कशालाही धक्का लावत नाहीत किंवा त्या स्वतःची कोणती खूणही मागे सोडून जात नाहीत. अशा मनामध्ये अगदी हजारो प्रतिमा तरळून गेल्या किंवा प्रचंड उलथापालथ झाल्याच्या घटना जरी मनासमोरून तरळून गेल्या तरी ही स्थिर-अचलता तशीच टिकून राहते, जणू काही त्या मनाचा पोतच शाश्वत आणि अविनाशी शांतीच्या द्रव्याचा बनलेला असतो.

अशा प्रकारची स्थिरता प्राप्त झालेल्या मनाकडून कर्म करायला सुरुवात केली जाऊ शकते, अगदी अविरतपणे आणि जोरकसपणेही त्या कर्माचा प्रारंभ केला जाऊ शकतो, परंतु त्या परिस्थितीमध्येदेखील असे मन स्वतःची मूलभूत स्थिरता टिकवून ठेवते. (आता) त्या कर्माचा उगम हा त्या मनामधून होत नसतो तर असे मन फक्त, जे ऊर्ध्वस्थित आहे ते त्याच्याकडून ग्रहण करत असते आणि त्यामध्ये स्वतःचे असे काही न मिसळता, स्थिरचित्ताने, निरपेक्षपणे, पण तरीही सत्याच्या आनंदानिशी, त्यांना मानसिक रूप देत असते. मनाच्या माध्यमातून पुढे जात असताना त्या मार्गाचा प्रकाश आणि आनंदी शक्तीदेखील त्याच्या सोबत असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 145)

मन किंवा प्राण हे जेव्हा विचारांमुळे आणि भावनांमुळे त्रस्त झालेले नसतात, अस्वस्थ नसतात किंवा ते विचार व भावनांमध्ये गुंतून पडलेले नसतात, तसेच जेव्हा त्यांच्यामध्ये विचार व भावनांचा कल्लोळ नसतो, तेव्हा तेथे ‘अविचलता’ (Quietness) असते. प्रामुख्याने मन जर अलिप्त असेल आणि विचार व भावनांकडे ते पृष्ठवर्तीय गतीविधी म्हणून पाहत असेल तर, ‘मन अविचल आहे’ असे आपण म्हणतो. तसेच प्राणाबाबतही म्हणता येते.

अस्वस्थतेचा तसेच अस्वस्थपणे केलेल्या हालचालींचा किंवा अशांततेचा अभाव असणे म्हणजेच स्थिरता (Calmness) नव्हे, तर स्थिरता ही त्याहूनही एक अधिक सकारात्मक अवस्था असते.

कोणतीही गोष्ट जिला अशांत करत नाही किंवा करू शकत नाही अशी महान आणि सघन प्रशांतता असल्याची सुस्पष्ट जाणीव जेव्हा मनाला किंवा प्राणाला असते; तेव्हा आपण म्हणतो की, तेथे ‘स्थिरता‌’ प्रस्थापित झालेली आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 137-138)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९

(पूर्वार्ध)

श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या आधीपासूनच अस्तित्वात असते. सर्वसाधारणपणे असे आढळते की, व्यक्ती अनुभवाच्या बळावर नाही, तर श्रद्धेच्या बळावर योगसाधनेला सुरुवात करते. ही गोष्ट फक्त योगमार्ग आणि आध्यात्मिक जीवनाबाबतीतच लागू पडते असे नाही; तर ती सामान्य जीवनात सुद्धा लागू पडते. कार्यप्रवण व्यक्ती, संशोधक, नवज्ञान-शोधक (inventors), ज्ञाननिर्माते (त्यांच्या वाटचालीला) सुरुवात करतात ती श्रद्धेनेच. जोपर्यंत एखादी गोष्ट सिद्ध होत नाही किंवा घडून येत नाही तोपर्यंत अगदी निराशा जरी आली, अपयश आले, किंवा विरोधी पुरावा सापडला, नकार मिळाला तरीदेखील ते त्या गोष्टीचा पाठपुरावा करत राहतात; कारण त्यांच्यामधीलच कोणीतरी त्यांना सांगत असते की, (तुम्ही ज्याचा पाठपुरावा करत आहात) त्यामध्ये तथ्य आहे, त्याचा पाठपुरावा केलाच पाहिजे, ती गोष्ट साध्य केली पाहिजे.

अंधश्रद्धा चुकीची नाही का, असे रामकृष्ण परमहंस यांना विचारले असता, ते तर पुढे जाऊन असे म्हणाले की, श्रद्धा एकाच प्रकारची असू शकते आणि ती म्हणजे अंधश्रद्धा. कारण श्रद्धा ही एकतर अंधच असते अन्यथा ती श्रद्धाच नसते, मग ती इतर काहीतरी असते – मग ते तर्कशुद्ध अनुमान असेल, पुराव्याने सिद्ध केलेली प्रचिती असेल किंवा स्थापित झालेले ज्ञान असेल. (उत्तरार्ध उद्याच्या भागात)

– श्रीअरविंद (CWSA 29 : 92-93)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६

जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प आणि अभीप्सेला स्थान आहे, मात्र इच्छेला थारा नाही. जर इच्छा असेल तर तेथे आसक्ती, अपेक्षा, लालसा, समत्वाचा अभाव, ईश्वरप्राप्ती झाली नाही तर होणारे दुःख यासारख्या, योगाशी विसंगत असणाऱ्या सर्व गोष्टी आढळून येतील.

*

व्यक्तीला जे काही प्राप्त होते त्याबाबत तिने समाधानी असले पाहिजे आणि तरीही सर्वत्व (all) साध्य होत नाही तोपर्यंत व्यक्तीने, अधिकासाठी कोणताही संघर्ष न करता, शांतपणे आस बाळगली पाहिजे. तेथे इच्छा असता कामा नये, संघर्षसुद्धा असता कामा नये तर अभीप्सा, श्रद्धा, खुलेपणा असला पाहिजे आणि (मुख्य म्हणजे) ईश्वरी कृपा असली पाहिजे.

श्रीअरविंद (CWSA 29 : 61, 60)