Tag Archive for: पूर्णयोग

पूर्णयोगाचे अधिष्ठान – १६

साधकाची योगमार्गावर जी वाटचाल चालू असते त्या वाटचालीमध्ये अशी एक अवस्था येते की, ज्या अवस्थेमध्ये साधक त्याच्या अंतरंगामध्ये कार्यरत असणाऱ्या दिव्य शक्तीविषयी सचेत असतो किंवा किमानपक्षी, तो त्या कार्याच्या परिणामाविषयी तरी नक्कीच सचेत असतो. (आणि अशा रितीने सचेत झाल्यामुळे) तो आता तिच्या अवतरणामध्ये किंवा तिच्या कार्यामध्ये, स्वतःच्या मानसिक गतिविधींमुळे किंवा स्वतःच्या प्राणिक अस्वस्थतेमुळे किंवा शारीरिक जडतेमुळे व तमोमयतेमुळे अडथळे निर्माण करत नाही. यालाच ‘ईश्वराप्रति खुले असणे’ (openness to the Divine) असे म्हणतात.

ईश्वराप्रति खुले होण्याचा समर्पण (Surrender) हा सवोत्तम मार्ग आहे. पण साधकामध्ये जोपर्यंत समर्पण भाव निर्माण होत नाही तोपर्यंत, अभीप्सा आणि अविचलतेच्या साहाय्याने एका विशिष्ट मर्यादेपर्यंत हे खुलेपण येऊ शकते.

स्वतःकडे असलेले सर्वकाही ईश्वराच्या स्वाधीन करणे; तसेच स्वतःकडे जे आहे ते सर्व आणि एवढेच नव्हे तर, स्वत:ला सुद्धा ईश्वराप्रति अर्पण करणे म्हणजे ‘समर्पण’. समर्पण करणाऱ्या व्यक्तीने स्वत:च्या कल्पना, इच्छा, सवयी यांचा आग्रह धरता कामा नये तर, त्या प्रत्येकाची जागा दिव्य सत्याच्या ज्ञानाने, संकल्पाने आणि कार्याने घ्यावी यासाठी, त्या दिव्य सत्याला मोकळीक देणे म्हणजे ‘समर्पण’.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 67)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – १५

उत्तरार्ध

पूर्णयोगामध्ये साधकाने प्रत्येक आदर्शवादी मानसिक संस्कारांच्या अतीत जाणे अभिप्रेत असते. संकल्पना आणि आदर्श हे मनाशी संबंधित असतात आणि या गोष्टी केवळ अर्धसत्य असतात; कोणतातरी एखादा आदर्श मी मानतो यामध्येच मन बरेचदा संतुष्ट असते; आदर्शवादाच्या आनंदामध्ये ते संतुष्ट असते आणि तेव्हा जीवनामध्ये मात्र कोणताही बदल न होता ते आहे तसेच राहते किंवा बदल झालाच तर तो बदल अगदी आंशिक आणि बरेचदा वरकरणी असतो.

आध्यात्मिक साधक हा केवळ आदर्शवादामध्ये रममाण होऊन, साक्षात्काराच्या दिशेने चाललेल्या प्रयत्नांकडे पाठ फिरवीत नाही; ‘दिव्य सत्या’चा केवळ आदर्श ठेवणे नव्हे तर, ते सत्य प्रत्यक्षात उतरविणे – मग ते परलोकामध्ये असो किंवा इहलोकामध्ये असो – हे त्याचे ध्येय असते. आणि तो हे ध्येय जर इहलोकामध्ये प्रत्यक्षात उतरवू इच्छित असेल तर, मन आणि प्राण यांच्यात रूपांतरण घडविणे आवश्यक असते आणि (तुमच्यामध्ये चालू असणाऱ्या) श्रीमाताजींच्या, ‘दिव्य शक्ती’च्या कार्याला समर्पित झाल्याशिवाय हे रूपांतरण घडू शकत नाही.

‘निर्गुण-निराकार’ ईश्वराचा (Impersonal) शोध घेण्यासाठी धडपडणे हा अशा लोकांचा मार्ग असतो की, जे या जीवनापासून दूर जाऊ पाहतात; आणि ते सहसा ही गोष्ट त्यांच्या स्व-प्रयत्नाच्या बळावर करू पाहतात; परंतु उच्चतर ‘शक्ती’प्रत स्वतःला खुले करून अथवा समर्पणाच्या मार्गाने ते ही गोष्ट करत नाहीत; पण निर्गुण-निराकार ईश्वर हा काही कोणी साहाय्य करणारा किंवा मार्गदर्शन करणारा नसतो; तर तो प्राप्त करून घ्यायचा असतो आणि प्रत्येक मनुष्याला त्याच्या त्याच्या मार्गाने आणि त्याच्या प्रकृतीच्या क्षमतेनुसार तो प्राप्त करून घेण्यासाठी ईश्वर मोकळीक देतो. तर दुसरीकडे, श्रीमाताजींप्रत खुले राहिले आणि समर्पण केले तर निर्गुण-निराकार ईश्वराबरोबरच ‘सत्या’च्या अन्य प्रत्येक पैलूचा देखील व्यक्ती साक्षात्कार करून घेऊ शकते.

समर्पण हे अगदी अनिवार्यपणे प्रगमनशीलच (progressive) असले पाहिजे. कोणतीही व्यक्ती अगदी प्रारंभापासूनच संपूर्ण समर्पण करू शकत नाही, त्यामुळे व्यक्ती जेव्हा स्वतःच्या अंतरंगात डोकावण्याचा प्रयत्न करते तेव्हा व्यक्तीला तेथे समर्पणाचा अभावच आढळतो, परंतु हे अगदी स्वाभाविक आहे. त्यामुळे, समर्पणाचे तत्त्वच न स्वीकारण्याचे आणि एकेक पायरी, एकेक क्षेत्र ओलांडत स्थिरपणे, प्रकृतीच्या सर्व भागांमध्ये क्रमाक्रमाने समर्पणचा अवलंब करत करत वाटचाल न करण्याचे कोणतेच कारण दिसत नाही.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 141)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – १४

पूर्वार्ध

एकीकडे तुम्ही असे म्हणत असाल की, मी स्वतःला ‘श्रीमाताजीं’प्रति खुले ठेवले आहे आणि त्याच वेळी तुम्ही समर्पण मात्र हातचे राखून ठेवत असाल तर, तुमच्या त्या म्हणण्याला फारसा आध्यात्मिक अर्थ नाही. जे पूर्णयोगाची साधना करतात त्यांनी आत्मदान करावे किंवा समर्पण करावे असे अभिप्रेत असते. कारण, व्यक्तीच्या अशा प्रकारच्या प्रगमनशील (progressive) समर्पणाखेरीज, ध्येयाच्या जवळपास पोहोचणे देखील अशक्यप्राय असते.

स्वतःला खुले ठेवणे म्हणजे तुमच्यामध्ये कार्य करावे यासाठी श्रीमाताजींच्या ‘शक्ती’स आवाहन करणे. पण तुम्ही जर त्या शक्तीला समर्पित झाला नाहीत तर, त्याचा परिणाम असा होतो की, एकतर तुम्ही तुमच्यामध्ये त्या शक्तीला कार्य करण्यास संमती देत नाही किंवा तुम्हाला ते कार्य ज्या पद्धतीने व्हावे असे वाटते त्या पद्धतीने होणार असेल तरच, तुम्ही त्या शक्तीला कार्य करण्यास संमती देता. म्हणजेच, त्या शक्तीला तुम्ही तिच्या पद्धतीने म्हणजे दिव्य सत्याच्या पद्धतीने कार्य करू देत नाही.

अशा प्रकारच्या अटी घालणे हे सहसा कोणत्यातरी विरोधी शक्तीकडून केले जाते किंवा मनाच्या किंवा प्राणाच्या एखाद्या अहंभावात्मक घटकाकडून केले जाते. त्याला ईश्वरी ‘कृपा’ किंवा ‘शक्ती’ हवी असते पण ती त्याला स्वतःच्या हेतुसाठी वापरायची असते; त्याला ईश्वरी उद्दिष्टासाठी जीवन जगण्याची इच्छा नसते. त्याला ईश्वराकडून जे जे मिळविणे शक्य असते ते सर्व हवे असते पण तो स्वतःला मात्र ईश्वराप्रति अर्पण करू इच्छित नसतो. उलटपक्षी, सत्-अस्तित्व (true being), आत्मा हा ईश्वराभिमुख होतो आणि त्याला ईश्वराप्रति समर्पण करण्याची केवळ इच्छाच असते असे नाही तर, तो आनंदाने समर्पण करण्यासाठी तत्पर असतो. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 32 : 140-141)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – १३

श्रीमाताजींप्रति स्वत:ला उन्मुख, खुले ठेवा, त्यांचे नित्य स्मरण ठेवा आणि श्रीमाताजींच्या शक्तीव्यतिरिक्त इतर सर्व प्रभावांना नकार द्या आणि त्या शक्तीला तुमच्यामध्ये कार्य करू द्या; हा पूर्णयोगाचा नियम आहे.

*

श्रीमाताजींसमोर आंतरात्मिकरित्या उन्मुख, खुले राहिल्याने, कार्यासाठी किंवा साधनेसाठी जे काही आवश्यक असते ते सर्व क्रमश: विकसित होत जाते. साधनेच्या महत्त्वाच्या रहस्यांपैकी हे एक रहस्य आहे, साधनेचे ते केंद्रवर्ती रहस्य आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 109), (CWSA 32 : 154)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – १२

योगसाधनेचे दोन मार्ग आहेत. एक मार्ग असतो ज्ञानाचा व व्यक्तीच्या स्वत:च्या प्रयत्नांचा आणि दुसरा मार्ग असतो श्रीमाताजींवर भिस्त ठेवण्याचा. या दुसऱ्या मार्गामध्ये, श्रीमाताजींच्या शक्तीने आपल्यावर कार्य करावे म्हणून, व्यक्तीने आपले मन व हृदय आणि सर्वकाही श्रीमाताजींना अर्पण करणे अभिप्रेत असते तसेच सर्व अडीअडचणींच्या वेळी त्यांना आवाहन करणे आणि त्यांच्यावर श्रद्धा व भक्ती ठेवणे अभिप्रेत असते.

चेतनेची ही अशी तयारी होण्यासाठी सुरुवातीला वेळ लागतो, बरेचदा खूप काळ लागतो आणि त्या दरम्यान पुष्कळ अडचणी येऊ शकतात. परंतु व्यक्तीने प्रयत्नसातत्य ठेवले तर एक वेळ अशी येते की, जेव्हा सर्व तयारी झालेली असते, अशा वेळी ‘श्रीमाताजींची शक्ती‌’ व्यक्तीच्या चेतनेला पूर्णत: ईश्वराभिमुख करते. अशा वेळी, जे जे काही विकसित होणे आवश्यक असते ते ते सारे व्यक्तीच्या अंतरंगामध्ये विकसित होते, आध्यात्मिक अनुभूती येतात आणि त्यासोबतच ज्ञान येते आणि ईश्वराशी ऐक्य घडून येते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 200)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ११

व्यक्ती ईश्वरी प्रभावाप्रत स्वतःला खुली करू शकते की नाही यावरच पूर्णयोगामध्ये सर्व काही अवलंबून असते. अभीप्सेमध्ये जर प्रामाणिकता असेल आणि उच्चतर चेतनेप्रत पोहोचण्याचा धीरयुक्त संकल्प असेल तर, कितीही अडथळे आले तरी, कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये खुलेपण (opening) हे निश्चित येते. यासाठी कमी वेळ लागेल की जास्त हे मन, हृदय आणि शरीराच्या कमी-अधिक तयारीवर अवलंबून असते. आणि म्हणून व्यक्तीकडे आवश्यक तेवढा धीर नसेल तर, आरंभ करताना येणाऱ्या अडचणीमुळेच ती व्यक्ती ते प्रयत्न सोडून देईल, अशी शक्यता असते.

आपले (समग्र) अस्तित्व श्रीमाताजींनी हाती घ्यावे म्हणून त्यांच्या उपस्थितीला आणि त्यांच्या शक्तीला, शक्यतो हृदयामध्ये लक्ष एकाग्र करून आवाहन करणे आणि त्यांच्या शक्तिकार्याद्वारे चेतनेचे रूपांतरण होणे याखेरीज पूर्णयोगामध्ये अन्य कोणतीही पद्धत नाही. तुम्ही मस्तकामध्ये किंवा भ्रूमध्यामध्ये देखील चित्त एकाग्र करू शकता परंतु बऱ्याच जणांना अशा प्रकारे उन्मुख, खुले होणे फारच कठीण जाते.

जेव्हा मन अविचल होते आणि एकाग्रता दृढ होते, जेव्हा अभीप्सा तीव्र होते, तेव्हा अनुभव येऊ लागतात. जितकी श्रद्धा अधिक तितकेच परिणाम लवकर प्राप्त होण्याची शक्यता असते. इतर साऱ्या गोष्टींसाठी व्यक्तीने फक्त स्वतःच्या प्रयत्नांवर विसंबून राहता कामा नये तर, ईश्वराशी संपर्क प्रस्थापित करण्यामध्ये आणि श्रीमाताजींची शक्ती व उपस्थिती ग्रहण करण्यामध्ये यश संपादन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 107)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – १०

ईश्वरी प्रभावाप्रत स्वत:ला खुले करणे हा पूर्णयोगाचा समग्र सिद्धान्त आहे. ईश्वरी प्रभाव तुमच्या ऊर्ध्वस्थित असतो आणि एकदा का तुम्ही त्याबाबत सचेत (conscious) होऊ शकलात तर मग, त्याने तुमच्यामध्ये प्रवेश करावा म्हणून तुम्ही केवळ त्याला आवाहन करायचे असते. तो ईश्वरी प्रभाव तुमच्या मनामध्ये, शरीरामध्ये शांतीच्या, प्रकाशाच्या, कार्यकारी शक्तीच्या रूपाने अवतरतो; आनंदरूपाने अवतरतो. ईश्वरी उपस्थिती म्हणून साकार किंवा निराकार रूपात तो अवतरतो. ही चेतना प्राप्त होण्यासाठी अगोदर व्यक्तीने श्रद्धा बाळगली पाहिजे आणि खुलेपणाची (opening) आस बाळगली पाहिजे.

अभीप्सा (aspiration), आवाहन (call), प्रार्थना (prayer) या सर्व गोष्टी म्हणजे एकाच गोष्टीची विविध रूपे असतात आणि या साऱ्याच गोष्टी सारख्याच प्रभावी असतात. यांपैकी, तुमच्यापाशी जी कोणती गोष्ट असते किंवा जी तुम्हाला अगदी सहजसोपी, स्वाभाविक वाटते त्या गोष्टीचा तुम्ही अवलंब करण्यास हरकत नाही.

दुसरा मार्ग एकाग्रतेचा. तुम्ही तुमची चेतना तुमच्या हृदयामध्ये एकाग्र करायची (काहीजण मस्तकामध्ये वा मस्तकाच्या वर एकाग्र करतात.) आणि अंत:करणामध्ये श्रीमाताजींचे ध्यान करायचे आणि तेथे त्यांना आवाहन करायचे.

व्यक्ती यांपैकी कोणत्याही गोष्टीचे अनुसरण करू शकते किंवा वेगवेगळ्या वेळी (आलटून-पालटून) या दोन्ही गोष्टी करू शकते. यापैकी जी गोष्ट तुम्हाला सहजस्वाभाविक वाटेल किंवा ज्या क्षणी तुम्ही जी गोष्ट करण्यासाठी प्रवृत्त व्हाल ती गोष्ट तुम्ही करावी.

विशेषत: सुरुवातीला एक गोष्ट आत्यंतिक निकडीची असते ती म्हणजे, मन निश्चल करायचे आणि ध्यानाच्या वेळी, साधनाबाह्य असे सारे विचार, स्पंदने हद्दपार करायची. अशा शांत मनामध्ये, अनुभूती येण्यासाठीची प्रगतिशील तयारी चालू होते.

परंतु हे सारे जरी एकदम जमले नाही तरी त्यामुळे तुम्ही अधीर, अस्वस्थ होता कामा नये. कारण मनामध्ये संपूर्ण निश्चलता येण्यासाठी बराच काळ लागतो; तुमच्या चेतनेची तयारी होईपर्यंत तुम्हाला वाटचाल करत राहावी लागते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 106)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ०९

प्रकाश, शांती, आनंद इ. गोष्टी सोबत घेऊन येणाऱ्या ‘दिव्य शक्ती’ला व्यक्तीने स्वत:मध्ये प्रवाहित होऊ देणे आणि तिला रूपांतरणाचे कार्य करू देणे, हे आत्म-उन्मुखतेचे (self-opening) उद्दिष्ट असते. अशा रितीने, व्यक्ती जेव्हा दिव्य शक्तीचे ग्रहण करते आणि ती शक्ती त्या व्यक्तीमध्ये कार्य करते आणि जेव्हा त्या कार्याचे परिणाम दिसू लागतात (भलेही मग, त्या व्यक्तीला त्या प्रक्रियेची जाणीव असो किंवा नसो) तेव्हा ती व्यक्ती खुली (open) आहे, असे म्हटले जाते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 106)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ०८

पूर्णयोगाच्या साधनेमध्ये, कोणतीही एकच एक अशी ठरावीक साचेबंद मानसिक शिकवण नसते किंवा ध्यानधारणेचे कोणते नेमून दिलेले प्रकार किंवा कोणत्या मंत्र-तंत्रादी गोष्टीदेखील नसतात.

तर अभीप्सेद्वारे आणि अंतर्मुख व ऊर्ध्वमुख अशा आत्म-एकाग्रतेद्वारे, आणि आपल्या ऊर्ध्वस्थित असणाऱ्या ‘दिव्य शक्ती’प्रत व तिच्या कार्याप्रत, तिच्या ‘दिव्य प्रभावा’प्रत स्वतःला उन्मुख केल्यामुळे, तसेच हृदयामध्ये असणाऱ्या ‘दिव्य अस्तित्वा’प्रत स्वतःला खुले केल्यामुळे ही साधना घडत जाते. तसेच या सर्वांना विरोधी असणाऱ्या सर्व गोष्टींना नकार देणेही या साधनेमध्ये अभिप्रेत असते.

श्रद्धा, अभीप्सा आणि समर्पण यांद्वारेच केवळ ही आत्म-उन्मुखता (self-opening) घडून येते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 20)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ०७

पूर्णयोगामध्ये आत्म-निवेदनाचे (self-consecration) आणि आत्म-दानाचे (self-giving) सर्वसाधारण तत्त्व सर्वांसाठी समानच आहे पण प्रत्येकाचा आत्म-निवेदनाचा आणि आत्म-दानाचा स्वतःचा असा एक मार्ग असतो. ‘क्ष‌’ या साधकाचा मार्ग हा ‘क्ष‌’साठी चांगला आहे, तसाच तुम्ही निवडलेला मार्ग हा तुमच्यासाठी चांगला आहे, कारण तो तुमच्या प्रकृतीशी मिळताजुळता आहे. अशा प्रकारची लवचीकता आणि विविधता योगामध्ये नसती आणि सर्वांना एकाच साच्यामध्ये बसवावे लागले असते तर योग म्हणजे चैतन्यमय शक्ती न राहता, तो एक अलवचिक अशी मानसिक यंत्रणा ठरला असता.
*

योगमार्ग ही एक जिवंत, चैतन्यमय गोष्ट असली पाहिजे. व्यक्तीपरत्वे विभिन्नता असते आणि (एक प्रकारे) ती आवश्यकदेखील असते. पण त्या विभिन्नतेला न मानता, ज्याला चिकटून राहावे असे कोणते एकच एक मानसिक तत्त्व किंवा पद्धती म्हणजे योगमार्ग, असे असता कामा नये.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 103), (SABCL 24 : 1463)