Tag Archive for: पूर्णयोग

विचार शलाका – १५

आपल्या आणि सर्व जीवमात्रांच्या अस्तित्वाच्या ‘दिव्य सत्या’शी एकत्व, हे ‘पूर्णयोगा’चे एक अत्यावश्यक उद्दिष्ट आहे. आणि ही गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे; आपण हे कायम स्मरणात ठेवावयास हवे की, आपण आपला हा योग अतिमानसाच्या प्राप्तीसाठी, अंगीकारलेला नाही, तर तो आपण ‘ईश्वरा’साठी अंगीकारलेला आहे. आपण अतिमानसाच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील असतो, ते त्याच्या आनंदासाठी किंवा त्याच्या महानतेसाठी नव्हे; तर दिव्य सत्याशी आपले एकत्व हे अधिक समग्र आणि परिपूर्ण व्हावे, यासाठी आपण प्रयत्नशील असतो. ते दिव्य सत्य संवेदित व्हावे, ते आत्मसात करता यावे, त्याच्या सर्वोच्च तीव्रतांनिशी आणि त्याच्या सर्वाधिक व्यापकतांनिशी, आपल्या अस्तित्वाच्या प्रत्येक शक्य असलेल्या मार्गानिशी ते क्रियाशील करता यावे; आपल्या प्रकृतीच्या प्रत्येक श्रेणीमध्ये, प्रत्येक वळणावाकणावर तसेच तिच्या विश्रांत स्थितीमध्ये सुद्धा ते दिव्य सत्य क्रियाशील करता यावे, म्हणून आपण अतिमानसाच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील असतो. अतिमानवतेच्या महाकाय भव्यतेप्रत, ईश्वरी सामर्थ्याप्रत आणि महानतेप्रत आणि व्यक्तिगत व्यक्तिमत्त्वाच्या व्यापकतेच्या आत्म-परिपूर्तीप्रत पोहोचणे, हे अतिमानस योगाचे उद्दिष्ट आहे; असा विचार करण्यास कित्येक जण प्रवृत्त होतील. पण असा विचार करणे म्हणजे विपर्यास करण्यासारखे आहे. ही विपर्यस्त आणि घातक संकल्पना आहे. घातक यासाठी की, त्यातून आपल्यामध्ये असणाऱ्या राजसिक प्राणिक मनाची महत्त्वाकांक्षा आणि गर्व, अभिमान वाढीस लागण्याची शक्यता असते आणि जर त्याच्या अतीत जाता आले नाही आणि त्यावर मात करता आली नाही तर, त्यातून आध्यात्मिक पतनाचा हमखास धोका संभवतो. ही संकल्पना विपर्यस्त एवढ्याचसाठी आहे ; कारण ती अहंजन्य संकल्पना आहे आणि अतिमानसिक परिवर्तनाची पहिली अटच मुळी अहंकारापासून मुक्ती ही आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 280)

विचार शलाका – १२

‘पूर्णयोगा’मध्ये केवळ ‘देवा’चा साक्षात्कारच अभिप्रेत नाही, तर संपूर्ण आत्मनिवेदन (consecration) अभिप्रेत आहे. तसेच, जोपर्यंत ईश्वरी चेतनेचे आविष्करण करण्यास व्यक्तीचे आंतरिक आणि बाह्य जीवन सुपात्र ठरत नाही आणि जोपर्यंत जीवन हे ईश्वरी कार्याचाच एक भाग बनून राहत नाही तोपर्यंत, आंतरिक व बाह्य जीवनामध्ये परिवर्तन घडवीत राहणे हे या योगामध्ये अभिप्रेत आहे. निव्वळ नैतिक आणि शारीरिक उग्रतपस्येहून कितीतरी अधिक अचूक आणि कठोर असे आंतरिक अनुशासन येथे अपेक्षित असते. हा योगमार्ग इतर बहुतेक योगमार्गांपेक्षा अधिक विशाल व अधिक दुःसाध्य आहे त्यामुळे, अंतरात्म्याकडून आलेल्या हाकेची खात्री असल्याखेरीज आणि अंतिम साध्याप्रत वाटचाल करीत राहण्याची तयारी असल्याची खात्री पटल्याशिवाय, व्यक्तीने या मार्गात प्रवेश करता कामा नये.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 27)

विचार शलाका – ११

‘योगा’च्या ध्येयाप्रत पोहोचणे नेहमीच कठीण असते, पण ‘पूर्णयोग’ इतर कोणत्याही योगांपेक्षा अधिक खडतर आहे, आणि ज्यांना ‘ती’ हाक आलेली आहे, ज्यांच्याजवळ क्षमता आहे, प्रत्येक गोष्टीला व प्रत्येक जोखमीला तोंड देण्याची ज्यांची तयारी आहे, अगदी अपयशाचा धोका पत्करण्याचीही ज्यांची तयारी आहे; आणि पूर्णपणे नि:स्वार्थीपणा, इच्छाविरहितता व समर्पण यांजकडे प्रगत होण्याचा ज्यांचा संकल्प आहे केवळ अशांसाठीच ‘पूर्णयोग’ आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 27)

विचार शलाका – १०

‘पूर्णयोग’ अत्यंत उन्नत आणि अत्यंत अवघड अशा आध्यात्मिक साध्याकडे घेऊन जाणारा वैशिष्ट्यपूर्ण मार्ग आहे.

व्यक्तीकडे या योगासाठी आवश्यक अशी क्षमता असल्याचा पुरेसा आधार असेल किंवा त्या व्यक्तीला दुर्दम्य अशी हाक आली असेल तरच हा योग त्यास प्रदान करण्यात येतो.

केवळ आंतरिक शांती हे या योगाचे उद्दिष्ट नाही, तर ती केवळ या योगासाठी आवश्यक असणाऱ्या प्राथमिक अटींपैकी एक अट आहे

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 27)

विचार शलाका – ०५

पूर्वीच्या योगांच्या तुलनेत ‘पूर्णयोग’ नवीन आहे : व्यक्तीने केवळ स्वतःसाठी, स्वतःपुरता ईश्वराचा साक्षात्कार करून व्यक्तिगत सिद्धी प्राप्त करून घ्यावी हे येथे उद्दिष्ट नाही. व्यक्तीने केवळ अति-वैश्विक उपलब्धीच नव्हे तर येथील पृथ्वीचेतनेसाठी, वैश्विक अशी काही प्राप्ती करून घ्यावी हेही येथे अपेक्षित आहे. आजवर या पृथ्वी-चेतनेमध्ये, अगदी आध्यात्मिक जीवनामध्येसुद्धा सक्रिय नसलेली किंवा सुसंघटित नसलेली अतिमानसिक (supramental) चेतनेची शक्ती आणणे आणि ती शक्ती सुसंघटित करणे आणि ती थेटपणे सक्रिय होईल हे पाहणे, ही गोष्टसुद्धा साध्य करून घ्यायची आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 400)

अपूर्णतेमधून आपल्याला पूर्णत्वाची उभारणी करायची आहे, मर्यादेमधून आपल्याला अनंताचा शोध घ्यायचा आहे, मृत्युमधूनच आपल्याला अमर्त्यत्व शोधायचे आहे, दुःखामधून आपल्याला दिव्य आनंदाची पुनर्प्राप्ती करून घ्यायची आहे, अज्ञानामधून दिव्य आत्मज्ञान विनिर्मुक्त (rescue) करायचे आहे, जडामधून चैतन्य प्रकट करायचे आहे. आपल्या स्वत:साठी आणि मानवतेसाठी या ध्येयाप्रत कार्यरत राहणे हे आमच्या योगसाधनेचे उद्दिष्ट आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 97)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ३५

…या योगामध्ये (पूर्णयोगामध्ये) कोणताही मंत्र दिला जात नाही. अंतरंगातून श्रीमाताजींप्रत चेतना खुली होणे ही खरी दीक्षा होय आणि मन व प्राण यांच्यातील अस्वस्थता घालवून दिल्याने आणि केवळ अभीप्सेद्वारे ही दीक्षा प्राप्त होऊ शकते.

*

पूर्णयोगाच्या या साधनेचे सूत्र म्हणून केवळ एकच मंत्र उपयोगात आणला जातो, तो म्हणजे एकतर श्रीमाताजींचे नाम किंवा श्रीअरविंदांचे व श्रीमाताजींचे नाम! हृदयकेंद्रामध्ये एकाग्रता आणि मस्तिष्कामध्ये एकाग्रता ह्या दोन्ही पद्धती यामध्ये चालू शकतात; त्यांचे प्रत्येकाचे स्वत:चे असे परिणाम असतात. हृदयकेंद्रावर एकाग्रता साधली असता चैत्य पुरुष (Psychic being) खुला होतो आणि तो भक्ती, प्रेम आणि श्रीमाताजींशी एकत्व घडवून आणतो; हृदयामध्ये त्यांची उपस्थिती आणि प्रकृतीमध्ये त्यांच्या शक्तीचे कार्य घडवून आणतो. मस्तिष्ककेंद्रावर एकाग्रता साधली असता, मन हे आत्मसाक्षात्काराप्रत खुले होते; मनाच्या अतीत असणाऱ्या चेतनेप्रत, देहाच्या बाहेर असणाऱ्या चेतनेच्या आरोहणाप्रत आणि उच्चतर चेतनेच्या देहामधील अवतरणाप्रत मन खुले होते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 326)

*

श्रीअरविंद : श्रीमाताजींकडे जो जो कोणी वळला आहे तो माझा योग आचरत आहे. व्यक्ती पूर्णयोग ‘करू’ शकते असे समजणे ही एक मोठी चूक आहे. विशेषतः स्वतःच्या प्रयत्नांनिशी व्यक्ती या योगाचे आचरण करून, या योगाच्या सर्व बाजूंची पूर्तता करू शकते असे समजणे ही चूक आहे. कोणताच मनुष्य तसे करू शकत नाही. व्यक्तीने काय करायला हवे, तर स्वतःला श्रीमाताजींच्या हाती सोपवून द्यायला हवे आणि सेवेद्वारे, भक्तिद्वारे, अभीप्सेद्वारे स्वतःला त्यांच्याप्रत खुले केले पाहिजे; तेव्हा मग श्रीमाताजी त्यांच्या प्रकाशाद्वारे आणि शक्तिद्वारे त्या व्यक्तीमध्ये कार्य करू लागतील म्हणजे मग साधना घडेल. महान पूर्णयोगी बनण्याची आकांक्षा बाळगणे किंवा अतिमानसिक जीव बनण्याची आकांक्षा बाळगणे आणि त्या उद्दिष्टाप्रत मी कोठवर आलो आहे, हे स्वतःला विचारणे हीसुद्धा एक चूक आहे. श्रीमाताजींना समर्पित होणे आणि तुम्ही जे बनावे अशी त्यांची इच्छा आहे, तेच बनण्याची इच्छा बाळगणे हा खरा योग्य दृष्टिकोन आहे. उर्वरित सर्व गोष्टी या श्रीमाताजीच निश्चित करतात आणि तुमच्यामध्ये घडवून आणतात.

(Champaklal Speaks : 334-335)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ३४

(पूर्णयोगामध्ये कोणतीही एकच एक पद्धत अवलंबण्यात येत नाही. प्रत्येकाची त्याच्या त्याच्या प्रकृतीशी मिळतीजुळती अशी स्वतंत्र पद्धत असते, हे या योगाचे एक प्रकारे वेगळेपण आहे. पूर्णयोगाचे हे वैशिष्ट्य श्रीअरविंद यांच्या खालील पत्रांमधून अधोरेखित होते.)

योगाचे किंबहुना विश्व-बदलविणाऱ्या आणि प्रकृतीमध्ये परिवर्तन घडविणाऱ्या योगाचे परिपूर्ण तंत्र कोणते? एखादा हुक किंवा गळ टाकून माणसाला पकडले आणि एखाद्या पुलीद्वारे निर्वाणामध्ये किंवा स्वर्गामध्ये वर ओढून घेतले अशा प्रकारचे काही हे तंत्र नाही. विश्व-परिवर्तन करणाऱ्या योगाचे तंत्र हे, विश्वाप्रमाणेच विविधरूपी, वळणावळणाचे, सहनशील, सर्वसमावेशक असणे आवश्यक आहे. जर त्या तंत्राला सर्व अडीअडचणी किंवा शक्यता हाताळता आल्या नाहीत किंवा त्या तंत्राला, प्रत्येक आवश्यक घटकाला काळजीपूर्वकपणे हाताळता आले नाही तर, त्याला यश मिळण्याची शक्यता असेल का? आणि प्रत्येकालाच समजू शकेल अशा प्रकारचे एखादे परिपूर्ण तंत्र असे करू शकेल काय? (काव्यशास्त्रामधील) एखाद्या ठरावीक वृत्तामध्ये, थोडेफार फेरफार करून, एखादी छोटीशी कविता लिहिण्यासारखे हे नाही. तुम्ही जर ही कवितेची उपमा तशीच पुढे चालवली तर, विश्व-परिवर्तनाचे तंत्र म्हणजे महाभारताचेच महाभारत लिहिण्यासारखे आहे.

*

या योगामध्ये आत्म-निवेदनाचे आणि आत्म-दानाचे सार्वत्रिक तत्त्व सर्वांसाठी समानच आहे पण प्रत्येकाचा आत्मनिवेदनाचा आणि आत्म-दानाचा स्वतःचा असा एक मार्ग असतो. ‘क्ष’ चा मार्ग हा ‘क्ष’ साठी चांगला आहे, तसाच तुम्ही निवडलेला मार्ग हा तुमच्यासाठी चांगला आहे, कारण तो तुमच्या प्रकृतीशी मिळताजुळता आहे. अशा प्रकारची लवचीकता आणि विविधता योगामध्ये नसती आणि सर्वांना एकाच साच्यामध्ये बसवावे लागले असते तर योग म्हणजे एक कठोर मानसिक यंत्रसामग्रीच ठरला असता, तो एक जिवंत शक्ती बनला नसता.

*

योगमार्ग ही एक जिवंत गोष्ट असली पाहिजे, तो एखादा मानसिक सिद्धान्त नाही किंवा आवश्यक सर्व विभिन्नतांच्या विरोधात जिला चिकटून राहावी अशी, योग म्हणजे कोणतीही एकच एक अशी पद्धती नव्हे.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 294), (CWSA 29 : 103), (SABCL 24 : 1463)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ३३

पूर्णयोगाच्या प्रक्रियेच्या तीन अवस्था आहेत; त्या एकमेकींपासून वेगळ्या ओळखता येण्यासारख्या नाहीत किंवा त्या पूर्ण वेगळ्याही नाहीत; परंतु त्या एका विशिष्ट प्रमाणात क्रमबद्ध आहेत.

प्रथम, स्वतःच्या अतीत जाण्याची आणि ईश्वराशी संपर्क साधण्याची पात्रता येण्यासाठी किमान अगदी प्राथमिक प्रयास केले पाहिजेत ही पहिली पायरी. जे अतीत आहे आणि ज्याच्याशी आपण ऐक्य साध्य केले आहे त्याचा, आपले समग्र जाणीवयुक्त अस्तित्व रूपांतरित व्हावे म्हणून आपण आपल्या स्वतःमध्ये स्वीकार करणे ही दुसरी पायरी; आणि या रूपांतरित मनुष्यत्वाचा दिव्य कार्यकेंद्र म्हणून विश्वात उपयोग करणे, ही तिसरी पायरी होय.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 58)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ३०

…येथे धैर्याचा अर्थ ‘परम साहसाविषयीची आवड असणे’ असा आहे. आणि परम साहसाची ही आवड म्हणजे ‘अभीप्सा’ (Aspiration). अशी अभीप्सा जी, तुमचा पूर्णपणे ताबा घेते आणि कोणताही मागचा पुढचा विचार न करता, हातचे काहीही राखून न ठेवता, परतीच्या साऱ्या शक्यता नसतानाही, तुम्हाला ‘ईश्वरी’ शोधाच्या ‘महान साहसा’साठी झोकून देण्यास प्रवृत्त करते; ईश्वर-भेटीसाठीच्या महान साहसासाठी आणि त्याहूनही अधिक महान अशा ‘ईश्वरी साक्षात्काराच्या साहसा’साठी तुम्हाला झोकून देण्यास प्रवृत्त करते.

‘पुढे काय होईल?’ याविषयी एक क्षणभरही शंका उपस्थित न करता, मागे वळून न पाहता या साहसामध्ये तुम्ही स्वतःला झोकून देता.

…धैर्य आणि अभीप्सा या गोष्टी हातात हात घालून नांदतात. खरीखुरी अभीप्सा ही धैर्ययुक्त असते.

– श्रीमाताजी

(CWM 08 : 40-41)