Tag Archive for: तत्त्वज्ञान

साधना, योग आणि रूपांतरण – २३४

(एका साधकाने श्रीअरविंदांना असे सांगितले की, काही जणांना असे वाटते की, ‘आध्यात्मिक’ आणि ‘अतिमानसिक’ या दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत. त्यावर श्रीअरविंद यांनी दिलेले हे उत्तर…)

तसे जर असते तर, आजवर युगानुयुगे होऊन गेलेले ऋषीमुनी, भक्त, योगी, साधक हे सारे ‘अतिमानसिक जीव’ होते असे म्हणावे लागेल आणि मग अतिमानसाविषयी मी आजवर जे काही लिहिले आहे ते अगदी उथळ, निरुपयोगी, आणि अनावश्यक ठरेल. आध्यात्मिक आणि अतिमानसिक या दोन्ही गोष्टी समानच असतील तर मग ज्या ज्या कोणाला आध्यात्मिक अनुभव आलेले असतील ते सारेजण म्हणजे अतिमानसिक जीव आहेत असे होईल. आणि मग हा आश्रम (श्रीअरविंद-आश्रम) किंवा भारतातील प्रत्येक आश्रमच अतिमानसिक जिवांनी ओसंडून वाहत आहेत, असे म्हणावे लागेल.

व्यक्तीची इच्छा असेल तर आध्यात्मिक अनुभव हे आंतरिक चेतनेमध्ये स्थिरस्थावर होऊ शकतात; आणि त्यानंतर ते तिच्यामध्ये बदल घडवून, तिचे रूपांतरण करू शकतात. सर्वत्र ‘ईश्वर’च असल्याचा साक्षात्कार व्यक्तीला होऊ शकतो, सर्वांमध्ये ‘आत्मा’ आणि ‘आत्म्या’मध्ये सर्वकाही असल्याचा अनुभव तिला येऊ शकतो. विश्वात्मक ‘शक्ती’ या साऱ्या गोष्टी घडवीत आहे; आपण ‘ब्रह्मांडगत आत्म्यामध्ये किंवा आनंदमय भक्तीमध्ये किंवा ‘आनंदा’मध्ये विलीन होत आहोत अशी व्यक्तीला प्रचिती येऊ शकते.

मात्र, व्यक्ती ‘प्रकृती’च्या बाह्य सक्रिय भागांमधील जीवन बुद्धीच्या साहाय्याने किंवा फारफार तर अंतःस्फूर्त मनाच्या (intuitive mind) साहाय्याने विचार करत, मानसिक इच्छेच्या साहाय्याने संकल्प करत, प्राणाच्या पृष्ठवर्ती स्तरावर हर्ष व शोकाचा अनुभव घेत, शरीरात राहून शारीरिक आजारपणं आणि वेदना भोगत, जीवनसंघर्ष करत, शेवटी आजार व मृत्यु असे जीवन कंठत राहू शकते आणि सहसा हे असेच चालू राहते. यामध्ये जर का काही परिवर्तन होणे शक्य असेल तर ते फारफार तर एवढेच असू शकते की, व्यक्ती ‘प्रकृती’मधून बाहेर पडून पूर्णपणे ‘आत्म्या’मध्ये विलीन होत नाही तोपर्यंत तरी, उपरोक्त सर्व गोष्टी म्हणजे ‘प्रकृती’चा अपरिहार्य भाग आहे असे मानून, ‘अंतरात्मा’ या सगळ्याकडे विचलित न होता किंवा भांबावून न जाता, परिपूर्ण समत्वाने पाहू शकतो.

परंतु हे म्हणजे मला अभिप्रेत असणारे ‘रूपांतरण’ नव्हे. मला अभिप्रेत असणारे रूपांतरण म्हणजे ज्ञानाची एक निराळीच शक्ती आहे, ती निराळीच इच्छाशक्ती आहे, भावभावना आणि सौंदर्याचे ते एक आगळेवेगळे प्रकाशमान परिमाण आहे, शारीरिक चेतनेची ती एक निराळीच घडण आहे. आणि या साऱ्या गोष्टी अतिमानसिक परिवर्तनानेच (supramental change) घडून येणे आवश्यक आहे.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 273-274)

भारत हाच जगातील असा एकमेव देश आहे…

श्रीअरविंदांच्या जन्मापूर्वी, धर्म आणि आध्यात्मिकता या गोष्टी भूतकाळातील व्यक्तींभोवती केंद्रित झालेल्या होत्या. आणि त्या व्यक्ती ‘पृथ्वीवरील जीवनाला नकार हे (जीवनाचे) उद्दिष्ट’ असले पाहिजे असे सांगत असत. तेव्हा त्याकाळी तुमच्यापुढे दोन पर्याय ठेवले जात :

किरकोळ आनंद किंवा यातना, सुख किंवा दु:ख यांच्या चक्रामध्ये फिरत राहणारे हे इहलोकातील जीवन जगत असताना जर तुम्ही चुकीचे वर्तन केलेत (तुमच्याकडून पापाचरण घडले) तर तुम्हाला नरकाची भीती दाखविली जात असे. हा पहिला पर्याय असे.

दुसरा पर्याय म्हणजे, ऐहिक जीवनाचा त्याग करून स्वर्ग, निर्वाण, मोक्ष इत्यादी गोष्टींच्या प्राप्तीसाठी कोणत्यातरी दुसऱ्याच जगामध्ये पलायन करायचे.

तुम्हाला या दोन्हीपैकी एका पर्यायाची निवड करावी लागत असे, खरंतर त्यामध्ये निवड करण्यासारखे काहीच नसे कारण दोन्ही पर्याय एकसारखेच अयोग्य, सदोष आहेत.

श्रीअरविंदांनी आपल्याला असे सांगितले आहे की, अशा प्रकारचा विचार करणे हीच मूलभूत चूक होती; कारण त्यातूनच भारताची अवनती घडून आली आणि या गोष्टीच भारताच्या दुर्बलतेला कारणीभूत झाल्या…

मात्र, हेही तितकेच खरे आहे की, भारत हाच जगातील असा एकमेव देश आहे की, ज्याला आजही, जडभौतिकाच्या पलीकडेही काही असते याची जाणीव आहे. युरोप, अमेरिका आणि इतर देशांना याचा विसर पडलेला आहे. आणि म्हणूनच जतन करण्यायोग्य आणि विश्वाला देण्यायोग्य एक संदेश आजही भारताकडे आहे.

श्रीअरविंदांनी आम्हाला हे दाखवून दिले की, या भौतिक जीवनापासून पळ काढण्यामध्ये सत्य सामावलेले नाही; तर या भौतिक जीवनात राहूनच, त्याचे रूपांतरण करायचे आहे. या भौतिक जीवनाचे रूपांतरण ‘दिव्यत्वा’मध्ये केल्यामुळे, ‘ईश्वर’ या ‘इथे’च, या ‘जडभौतिक विश्वा’मध्ये आविष्कृत होऊ शकेल.

– श्रीमाताजी (CWM 12 : 210-211)

साधना, योग आणि रूपांतरण – २३२

साधक : ‘अपरिवर्तनीय रूपांतरण’ म्हणजे काय?

श्रीमाताजी : तुम्ही तुमच्या आधीच्या स्थितीमध्ये परत जाऊ शकत नाही असे रूपांतरण जेव्हा तुमच्या चेतनेमध्ये घडते, तेव्हा त्या रूपांतरणास ‘अपरिवर्तनीय रूपांतरण’ असे म्हटले जाते. एक क्षण असा येतो की हे परिवर्तन इतके परिपूर्ण झालेले असते की अशा वेळी मग तुम्ही पूर्वी जसे होतात तसे पुन्हा होणे अशक्यप्राय होऊन जाते.

साधक : परंतु रूपांतरण या शब्दातच अपरिवर्तनीय हा अर्थ सूचित होत नाही का?

श्रीमाताजी : रूपांतरण आंशिकसुद्धा असू शकते. श्रीअरविंद ज्या रूपांतरणाबद्दल सांगत आहेत ते आहे चेतनेचे प्रत्युत्क्रमण (reversal). म्हणजे येथे व्यक्ती स्वतःच्या वैयक्तिक सुखसमाधानांकडे वळलेली असण्याऐवजी आणि अहंकारी असण्याऐवजी, तिची चेतना समर्पित होऊन ‘ईश्वरा’भिमुख झालेली असते. आणि त्यांनी इथे हे स्पष्टपणे सांगितले आहे की सुरुवातीला समर्पण हे आंशिक असू शकते, म्हणजे (अस्तित्वाचे) काही भाग समर्पित आहेत आणि काही भाग समर्पित नाहीत, असे असू शकते. आणि म्हणून जेव्हा समग्र अस्तित्वाने, समग्रपणे, त्याच्या सर्व गतिविधींनिशी, स्वतःचे समर्पण केलेले असते तेव्हा ते समर्पण अपरिवर्तनीय असे असते. तेव्हा ते ‘दृष्टिकोनाचे अपरिवर्तनीय रूपांतरण’ असते.

– श्रीमाताजी (CWM 04 : 356)

साधना, योग आणि रूपांतरण – २२९

इच्छा, राजसिकता आणि अहंकार यांना दिलेल्या नकारामुळे व्यक्तीला अशी अचंचलता आणि शुद्धता प्राप्त होते की, ज्यामध्ये अनिर्वचनीय ‘शांती’ अवतरू शकते. व्यक्तीने स्वतःची इच्छा ‘ईश्वरा’प्रत अर्पण केली, तिने स्वतःची इच्छा ही ‘ईश्वरी ‘संकल्पा’मध्ये मेळविली (merging) तर व्यक्तीच्या अहंकाराचा अंत होतो आणि व्यक्तीला वैश्विक चेतनेमध्ये व्यापकता प्राप्त होते किंवा विश्वातीत असलेल्या गोष्टीमध्ये तिचे उन्नयन होते. व्यक्तीला ‘प्रकृती’पासून ‘पुरुषा’चे विलगीकरण अनुभवास येते आणि बाह्य प्रकृतीच्या बेड्यांपासून व्यक्तीची सुटका होते. व्यक्तीला तिच्या आंतरिक अस्तित्वाची जाणीव होते आणि बाह्यवर्ती अस्तित्व हे साधन असल्याचे जाणवते; ‘विश्वशक्ती’च व्यक्तीचे कार्य करत असल्याची आणि ‘आत्मा’ किंवा ‘पुरुष’ त्याकडे पाहात असल्याची किंवा तो साक्षी असून, मुक्त असल्याचे व्यक्तीला जाणवते. आपले कर्म हाती घेऊन, विश्व‘माता’ किंवा परम‘माता’च ते करत असल्याचे, किंवा हृदयापाठीमागून एक ‘दिव्य शक्ती’ त्या कर्माचे नियंत्रण करत आहे, किंवा ते कर्म करत आहे, असे व्यक्तीला जाणवते.

व्यक्तीने स्वतःची इच्छा आणि कर्म अशा रीतीने सतत ‘ईश्वरा’प्रत निवेदित केली तर, प्रेम आणि भक्ती वृद्धिंगत होते, चैत्य पुरुष पुढे येतो. ऊर्ध्वस्थित असणाऱ्या ‘शक्ती’प्रत निवेदन केल्यामुळे, ती शक्ती आपल्या ऊर्ध्वस्थित असल्याचा अनुभव आपल्याला येऊ शकतो. आणि तिच्या अवतरणाची आणि उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या चेतनेप्रत व ज्ञानाप्रत आपण उन्मुख होत आहोत अशी जाणीव आपल्याला होऊ शकते.

सरतेशेवटी कर्म, भक्ती आणि ज्ञान एकत्रित येतात आणि आत्मपरिपूर्णत्व शक्य होते; त्यालाच आम्ही ‘प्रकृतीचे रूपांतरण’ असे संबोधतो. अर्थातच हे परिणाम काही एकाएकी होत नाहीत, व्यक्तीची परिस्थिती आणि तिचा विकास यांनुसार, ते कमीअधिक धीमेपणाने, कमीअधिक समग्रतेने दिसून येतात.

ईश्वरी साक्षात्कारासाठी कोणताही सोपा राजमार्ग नाही. सर्वंकष आध्यात्मिक जीवनासाठी ‘गीता’प्रणीत ‘कर्मयोग’ मी अशा रीतीने विकसित केला आहे. तो कोणत्याही अनुमानावर आणि तर्कावर आधारलेला नाही तर, तो अनुभूतीवर आधारलेला आहे. त्यामधून ध्यान वगळण्यात आलेले नाही आणि त्यातून भक्तीदेखील नक्कीच वगळण्यात आलेली नाही. कारण ‘ईश्वरा’प्रत आत्मार्पण, ‘ईश्वरा’प्रत स्वतःच्या सर्वस्वाचे निवेदन हा जो ‘कर्मयोगा’चा गाभा आहे, तोच मूलतः भक्तीचा देखील एक मार्ग आहे.

एवढेच की, जीवनापासून पलायन करू पाहणाऱ्या एकांतिक अशा ध्यानाला तसेच, स्वतःच्याच आंतरिक स्वप्नामध्ये बंदिस्त होऊन राहणाऱ्या भावनाप्रधान भक्तीला मात्र पूर्णयोगाची समग्र प्रक्रिया म्हणून स्वीकारण्यात आलेले नाही. एखादी व्यक्ती तास न् तास ध्यानामध्ये पूर्णपणे गढून जात असेल किंवा आंतरिक अविचल आराधना आणि परमानंदामध्ये तास न् तास निमग्न होत असेल, तरीसुद्धा या गोष्टी म्हणजे समग्र पूर्णयोग नव्हे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 216-218)

साधना, योग आणि रूपांतरण – २२८

अज्ञान आणि अहंभावातून केलेल्या कृतीला म्हणजे, जी कृती अहंकाराच्या तुष्टीसाठी आणि राजसिक इच्छेने प्रेरित होऊन केली जाते त्या कृतीला मी ‘कर्म’ मानत नाही.

अज्ञानाचा जणू शिक्काच असणाऱ्या अहंकार, राजसिकता आणि इच्छावासना यांपासून सुटका करून घेण्याचा संकल्प असल्याखेरीज ‘कर्मयोग’ घडूच शकत नाही.

परोपकार किंवा मानवतेची सेवा किंवा नैतिक किंवा आदर्शवादी अशा उर्वरित सर्व गोष्टी, ज्या गोष्टी कार्याच्या गहनतर सत्याला पर्यायी आहेत, असे मानवी मन मानते, त्या सुद्धा माझ्या दृष्टीने ‘कर्म’ या संज्ञेला पात्र ठरत नाहीत.

जी कृती ‘ईश्वरा’साठी केली जाते, जी कृती ‘ईश्वरा’शी अधिकाधिक एकत्व पावून केली जाते आणि अन्य कशासाठीही नाही तर, केवळ ’ईश्वरा’साठीच केली जाते अशा कृतीला मी ’कर्म’ असे संबोधतो.

साहजिकच आहे की, ही गोष्ट सुरुवातीला तितकीशी सोपी नसते; गहन ध्यान आणि दीप्तिमान ज्ञान यांच्यापेक्षा ती काही कमी सोपी नसते, एवढेच काय पण, अगदी खरेखुरे प्रेम आणि भक्ती यांच्याहूनही ती गोष्ट काही कमी सोपी नसते. परंतु इतर गोष्टींप्रमाणेच या गोष्टीची (कर्माची) सुरुवात देखील तुम्ही सुयोग्य वृत्ती आणि दृष्टिकोन बाळगून केली पाहिजे, तुमच्यामधील सुयोग्य संकल्पासहित ही गोष्ट करण्यास तुम्ही सुरुवात केली पाहिजे, अशा वृत्तीने केलेले ‘कर्म’ हे भक्ती किंवा ध्यान यांच्याइतकेच प्रभावी ठरू शकते. अन्य गोष्टी त्यानंतर घडून येतील. (उत्तरार्ध उद्या)

– श्रीअरविंद (CWSA 29 : 216-218)

साधना, योग आणि रूपांतरण – २२७

सर्वसाधारणपणे आपण अज्ञानामध्ये जीवन जगत असतो आणि आपल्याला ‘ईश्वर’ काय आहे हे माहीत नसते. सामान्य प्रकृतीच्या शक्ती या अ-दिव्य शक्ती असतात कारण त्या अहंकार, इच्छावासना आणि अचेतनेचा जणू एक पडदाच विणतात की, ज्यामुळे ‘ईश्वर’ आपल्यापासून झाकलेला राहतो. जी चेतना, ‘ईश्वर’ काय आहे ते जाणते आणि त्यामध्ये जाणीवपूर्वक निवास करते, अशा उच्चतर आणि गहन, सखोल चेतनेमध्ये आपला प्रवेश व्हायचा असेल तर, कनिष्ठ प्रकृतीच्या शक्तींपासून आपली सुटका झाली पाहिजे आणि ‘दिव्य शक्ती’च्या कृतीसाठी आपण स्वतःला खुले केले पाहिजे; म्हणजे मग ती ‘दिव्य शक्ती’ आपल्या चेतनेचे ‘दिव्य प्रकृती’मध्ये रूपांतरण घडवून आणेल.

‘दिव्यत्वा’च्या या संकल्पनेपासून आपण प्रारंभ केला पाहिजे; त्याच्या सत्याचा साक्षात्कार चेतनेच्या विकसनातून आणि तिच्या परिवर्तनामधूनच होणे शक्य आहे.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 07-08)

साधना, योग आणि रूपांतरण – २२६

व्यक्ती (योगसाधना करून देखील) जर स्वतःच्या प्रकृतीमध्ये कोणतेही परिवर्तन घडवू शकत नसेल तर, तिने योगसाधना करण्याचे कष्ट घेणे उपयुक्त ठरणार नाही; कारण प्रकृतीमध्ये परिवर्तन घडविण्यासाठीच तर योगसाधना केली जाते, अन्यथा त्याला काही अर्थ नाही, असे श्रीअरविंद आपल्याला सांगतात.
*
‘शांती’चे अवतरण, ‘शक्ती’चे अवतरण, ‘प्रकाशा’चे अवतरण आणि ‘आनंदा’चे अवतरण, या चार गोष्टी ‘प्रकृतीचे रूपांतरण’ घडवून आणतात.

– श्रीमाताजी (CWM 04 : 332), – श्रीअरविंद (CWSA 30 : 449)

साधना, योग आणि रूपांतरण – २२५

साधक : फक्त आंतरिक चेतनेमध्ये परिवर्तन झाले तर बाह्य व्यक्तित्वातील अशुद्धता तशाच कायम राहण्याची शक्यता असेल ना?

श्रीमाताजी : हो, अर्थातच. केवळ आंतरिक चेतनेशी संबंधित असणाऱ्या प्राचीन योगपरंपरा आणि आपला पूर्णयोग यामध्ये हाच तर मूलभूत फरक आहे. प्राचीन समजूत अशी होती, आणि काही व्यक्ती भगवद्गीतेचा अर्थ या पद्धतीनेही लावत असत की, ज्याप्रमाणे धुराशिवाय अग्नी नसतो त्याप्रमाणे अज्ञानाशिवाय जीवन नसते. हा सार्वत्रिक अनुभव असतो पण ही काही आपली संकल्पना नाही, हो ना?

आपल्याला अनुभवातून हे माहीत आहे की, आपण जर शारीर-चेतनेपेक्षाही खाली म्हणजे अवचेतनेपर्यंत (subconscient) खाली उतरलो, किंबहुना त्याहूनही खाली म्हणजे अचेतनतेपर्यंत (inconscient) खाली उतरलो तर, आपल्याला आपल्यामध्ये अनुवंशिकतेमधून आलेल्या गोष्टींचे (atavism) मूळ सापडू शकते तसेच आपल्या प्रारंभिक शिक्षणामधून आणि आपण ज्या वातावरणामध्ये जीवन जगत असतो त्यामधून जे काही आलेले असते त्याचे मूळही आपल्याला सापडू शकते. आणि त्यामुळेच व्यक्तीमध्ये, म्हणजे तिच्या बाह्य प्रकृतीमध्ये, एक प्रकारची विशेष वैशिष्ट्यपूर्णता निर्माण होते आणि सर्वसाधारणतः असे समजले जाते की, आपण असेच जन्माला आलेलो आहोत आणि आयुष्यभर आपण असेच राहणार आहोत. परंतु अवचेतनेपर्यंत, अचेतनेपर्यंत खाली उतरून व्यक्ती तेथे जाऊन या घडणीचे मूळ शोधून काढू शकते. आणि जे तयार झाले आहे ते नाहीसे देखील करू शकते. म्हणजे व्यक्ती सामान्य प्रकृतीच्या गतिविधी आणि प्रतिक्रिया यांच्यामध्ये सचेत आणि जाणीवपूर्वक कृतीने परिवर्तन घडवून आणू शकते आणि अशा रीतीने ती खरोखरच स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचे रूपांतरण घडवून आणू शकते. ही काही सामान्य उपलब्धी नाही, परंतु ती करून घेण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे, हे असे करता येणे शक्य असते, एवढेच नव्हे, तर असे करण्यात आलेले आहे हे व्यक्ती ठामपणे म्हणू शकते. समग्र रूपांतरणाच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल असते. परंतु त्यानंतर, मी आधी ज्याचा उल्लेख केला ते पेशींचे रूपांतरण करणे अजूनही बाकी आहे.

अन्नमय पुरुषामध्ये (physical being) पूर्णतः परिवर्तन करणे शक्य आहे परंतु ही गोष्ट आजवर कधीही करण्यात आलेली नाही.

– श्रीमाताजी (CWM 15 : 294-295)

साधना, योग आणि रूपांतरण – २२४

अर्थातच, आत्तापर्यंत, ज्यांनी कोणी हे सचेत रूपांतरण (transformation) साध्य करून घेतले आहे त्यांना स्वतःच्या अंतरंगामध्ये असलेल्या, व्यक्तित्वाच्या अगदी गहनतेमध्ये असलेल्या, शाश्वत आणि अनंत जीवनाची जाणीव झालेली आहे आणि ही चेतना टिकवून ठेवण्यासाठी म्हणून, त्यांना या आंतरिक अनुभवाशी सातत्याने संबंधितच राहावे लागते, यासाठी त्यांना आंतरिक निदिध्यासामध्ये म्हणजे कमीअधिक प्रमाणात सातत्याने ध्यानामध्ये राहणे आवश्यक असते. आणि जेव्हा ते त्या ध्यानावस्थेमधून बाहेर येतात तेव्हा, (जर त्यांनी संपूर्णपणे कर्मव्यवहार करणे सोडून दिले नसेल तर), त्यांची बाह्यवर्ती प्रकृती आधी जशी होती तशीच असते; त्यांची विचारपद्धती, प्रतिक्रिया देण्याची पद्धती यामध्येदेखील फारसा काही फरक झालेला नसतो.

या उदाहरणाबाबत, हा आंतरिक साक्षात्कार, चेतनेचे हे रूपांतरण, ज्या व्यक्तीने ते साध्य करून घेतलेले असते त्या व्यक्तीपुरतेच उपयोगी असते. त्यामुळे जडद्रव्याच्या किंवा पृथ्वीवरील जीवनाच्या परिस्थितीमध्ये यत्किंचितही फरक होत नाही. समग्र रूपांतरण जर यशस्वी व्हायचे असेल तर, सर्व मनुष्यमात्र, किंबहुना सर्व सजीव आणि त्यांचे भौतिक पर्यावरण हेदेखील रूपांतरित करण्याची आवश्यकता असते. अन्यथा गोष्टी जशा आहेत तशाच राहतील. व्यक्तिगत अनुभव पार्थिव जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणू शकत नाही. रूपांतरणाच्या जुन्या संकल्पनेमध्ये चैत्य पुरुषाविषयी आणि आंतरिक जीवनाविषयी सचेत होणे अभिप्रेत असते. परंतु, रूपांतरणाची आमची जी संकल्पना आहे, ज्याविषयी आपण बोलत आहोत, ती संकल्पना आणि रूपांतरणाची जुनी संकल्पना यामध्ये हा मूलभूत फरक आहे.

म्हणजे एखादी व्यक्ती किंवा कोणता एखादा व्यक्तीसमूह किंवा सर्व मनुष्यमात्र एवढेच नव्हे तर, संपूर्ण जीवन, कमीअधिक विकसित झालेली ही एकंदर जड-भौतिक चेतनाच रूपांतरित झाली पाहिजे. हे असे रूपांतरण घडून आले नाही तर या जगातील सर्व दुःख, सर्व संकटं आणि सर्व अत्याचार आत्ताप्रमाणेच कायम राहतील. काही व्यक्ती त्यांच्यामध्ये झालेल्या आंतरात्मिक विकसनामुळे यातून सुटका करून घेऊ शकतील पण सर्वसाधारण समाज मात्र त्याच दुःखपूर्ण स्थितीमध्ये खितपत पडलेला असेल. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 15 : 293-294)

साधना, योग आणि रूपांतरण – २२३

(‘रूपांतरणा’बाबत श्रीमाताजींनी अगोदर केलेल्या विवेचनातील काही भाग वाचून दाखविला गेला आहे. आणि आता श्रीमाताजी त्यावर भाष्य करत आहेत.)

समग्र रूपांतरण आणि ज्या चेतनेच्या रूपांतरणाचा मी आधी उल्लेख केला होता त्या दोन्हीमध्ये मी फरक का करते? चेतना आणि व्यक्तीच्या इतर भागांमध्ये काय संबंध असतो? हे इतर भाग कोणते? जे जे कोणी योगसाधना करतात त्यांच्याबाबतीत हे चेतनेचे रूपांतरण घडून येते आणि ते ‘ईश्वरी उपस्थिती’विषयी किंवा स्वतःच्या अस्तित्वाच्या ‘सत्या’विषयी जागरूक होऊ लागतात. बऱ्याच जणांना याचा अनुभव आहे, असे मी म्हणत नाहीये पण किमान काही जणांना तरी हा अनुभव आलेला असतो. मग हा अनुभव आणि समग्र रूपांतरण यामध्ये काय फरक असतो?

साधक : समग्र रूपांतरणामध्ये बाह्यवर्ती प्रकृती आणि आंतरिक चेतना या दोन्ही रूपांतरित होतात. व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, तिच्या सवयी इत्यादी पूर्णपणे बदलून जातात, तसेच तिचे विचार आणि गोष्टींकडे पाहण्याचा तिचा मानसिक दृष्टिकोनही बदलून जातो.

श्रीमाताजी : हो, बरोबर आहे पण तुम्ही जर पुरेशी काळजी घेतली नाहीत आणि तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवले नाहीत तर, तुमच्यामध्ये असेही काही असते की ज्यामध्ये कोणतेही परिवर्तन न होता ते तसेच राहिलेले असते. ते नेमके काय असते? तर ती शारीर-चेतना (body consciousness) असते. आता ही शारीर-चेतना म्हणजे काय? त्यामध्ये अर्थातच प्राणिक चेतनेचाही समावेश असतो, म्हणजे येथे शारीर-चेतना ही समग्रत्वाने अभिप्रेत आहे. आणि मग या समग्र शारीर-चेतनेमध्ये शारीरिक मनाचाही (physical mind) समावेश होतो. हे असे मन असते की जे तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या सगळ्या सर्वसामान्य गोष्टींनी व्याप्त असते आणि त्याला प्रतिसाद देत असते. एक प्राणिक चेतनाही (vital consciousness) असते. संवेदना, आवेग, उत्साह आणि इच्छावासना यांबाबतची जाणीव म्हणजे ही चेतना असते. आणि सरतेशेवटी स्वयमेव एक शारीर-चेतना असते, ही भौतिक चेतना असते, ती शरीराची चेतना असते आणि ही चेतना आजवर पूर्णतः कधीच रूपांतरित झालेली नाही.

आजवर सार्वत्रिक, म्हणजे शरीराची एकंदर चेतना रूपांतरित करण्यात आली आहे म्हणजे, व्यक्तीला ज्या गोष्टी अपरिहार्य वाटत नाहीत अशा गोष्टी म्हणजे विचारांची, सवयींची बंधने व्यक्ती झुगारून देऊ शकते. या गोष्टीमध्ये परिवर्तन होऊ शकते, हे परिवर्तन झालेले आहे. परंतु पेशींची जी चेतना आहे त्यामध्ये आजवर कोणतेही परिवर्तन झालेले नाही. पेशींमध्ये एक चेतना असते. त्यालाच आम्ही ‘शारीरिक चेतना’ असे संबोधतो आणि ती चेतना संपूर्णपणे शरीराशी संबद्ध असते.

या चेतनेमध्ये परिवर्तन होणे अतिशय कठीण असते कारण ही चेतना सामूहिक सूचनेच्या प्रभावाखाली असते आणि ही सामूहिक सूचना रूपांतरणाच्या पूर्णपणे विरोधी असते. आणि त्यामुळे व्यक्तीला या सामूहिक सूचनेच्या विरोधात संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष फक्त वर्तमानकालीन सामूहिक सूचनांच्या बाबतीतच करावा लागतो असे नाही तर, संपूर्ण पृथ्वी-चेतनेशी संबंधित असणाऱ्या सामूहिक सूचनेच्या विरोधातही हा संघर्ष करावा लागतो. आणि या पार्थिव मानवी चेतनेचे मूळ मनुष्याची जेव्हा सर्वप्रथम निर्मिती झाली, घडण झाली तेथपर्यंत जाऊन पोहोचते. पेशींना ‘सत्या’ची, जडद्रव्याच्या ‘शाश्वतते’ची उत्स्फूर्तपणे जाणीव होण्यापूर्वी उपरोक्त सामूहिक सूचनांवर मात करावी लागते. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 15 : 292-293)