भारताची बहुप्रसवा सर्जनशीलता
भारत – एक दर्शन ०७
ज्याप्रमाणे कोणताही आधार नसताना, स्वप्नवत जादुई ढगांमधून गिरीशिखरं उदयाला येऊ शकत नाहीत त्याप्रमाणेच ‘आध्यात्मिकता’ ही पृथ्वीवर काहीही नसताना, एखाद्या पोकळीमध्ये बहरू शकत नाही. आपण जेव्हा भारताच्या गतकाळाकडे पाहतो तेव्हा त्याच्या आध्यात्मिकतेच्या खालोखाल आपल्या नजरेत भरते ती त्याची विस्मयकारक प्राणशक्ती, त्याची जीवनाची अक्षय शक्ती, जीवनाचा आनंद, आणि अकल्पनीय अशी बहुप्रसवा सर्जनशीलता!
किमान तीन हजार वर्षांपासून – खरंतर त्याही आधीपासून – प्रजासत्ताक आणि राज्ये व साम्राज्ये, तत्त्वज्ञाने व ब्रह्मांडशास्त्रं आणि शास्त्रं व पंथ आणि कला व काव्य आणि सर्व प्रकारची प्राचीन स्मारकं, राजमहाल व मंदिरे आणि सार्वजनिक कार्ये, समाज आणि संस्था आणि धर्माज्ञा, कायदे आणि विधिविधाने, प्रथा-परंपरा, भौतिक शास्त्रे, आंतरात्मिक शास्त्रे, योगपद्धती, राजकारण आणि प्रशासनव्यवस्था, लौकिक कला, आध्यात्मिक कला, व्यापारउदीम, उद्योग, कलाकौशल्ये – ही यादी न संपणारी आहे आणि या प्रत्येक मुद्यामध्येसुद्धा विविध उपक्रमांची रेलचेल आहे. या साऱ्याची भारत मुबलकतेने आणि सातत्याने, उदारतेने, अक्षय बहुआयामी निर्मिती करत आला आहे.
भारत निर्माण करत राहतो, करतच राहतो, तो कधीच संतुष्ट होत नाही, तो कधीच थकत नाही, या निर्मितीला जणू अंतच नाही. त्याला विश्रांती घेण्यासाठी थोडीशी उसंत, सुस्त पडून राहण्यासाठी थोडा वेळ किंवा लोळत पडण्यासाठी माळरान यांची क्वचितच गरज भासते असे दिसते.
– श्रीअरविंद [CWSA 20 : 07-08]
- आपल्याला काय संपादन करायचे आहे? - July 26, 2026
- आपले कार्य काय? - July 25, 2026
- विचार-कणिका - July 24, 2026




