Tag Archive for: तत्त्वज्ञान

जेव्हा मनाचे या पृथ्वीवर अवतरण झाले तेव्हा, या पृथ्वीच्या वातावरणात मनाचे आविष्करण होण्याचा क्षण आणि पहिला माणूस उदयाला येण्याचा क्षण, यांच्यामध्ये लाखो वर्षांचा काळ लोटला. आता मात्र अतिमानवाचा उदय होणे, ही गोष्ट अधिक जलद घडून येईल; कारण मानवाला आता त्या गोष्टीची एक प्रकारची धूसर कल्पना आहे, तो अतिमानवाचे आगमन अपेक्षित करत आहे. त्याला अतिमानवाच्या आगमनाची एक प्रकारे जाणीव असल्याने, तो त्याची अपेक्षा बाळगून आहे. पण माकडं मात्र मानवाच्या उदयाची अपेक्षा बाळगत नव्हती, त्यांनी तसा कधी विचारही केलेला नव्हता, कारण कदाचित त्यांना जास्त विचारच करता येत नव्हता. परंतु, मानवाने मात्र अतिमानवाचा विचार केलेला आहे आणि तो त्याची वाट पाहत आहे, त्यामुळे ते आता लवकर घडून येईल. पण लवकर म्हटले तरी, कदाचित हजारो वर्षे लागतील.

ज्या व्यक्ती आंतरिक दृष्ट्या तयार झालेल्या असतात, खुल्या असतात आणि उच्चतर शक्तींच्या संपर्कात असतात, अतिमानसिक प्रकाशाशी आणि चेतनेशी, ज्या व्यक्तींचा कमी अधिक प्रमाणात थेट व्यक्तिगत संपर्क असतो, त्या व्यक्तींना पृथ्वीच्या वातावरणातील फरक जाणवतो.

ज्याप्रमाणे समधर्मी व्यक्तीच दुसऱ्या समधर्मी व्यक्तीला ओळखू शकतात, त्याप्रमाणे व्यक्तीमध्ये असलेली अतिमानसिक जाणीवच केवळ, पृथ्वीच्या वातावरणामध्ये अतिमानस कार्यरत असल्याचे जाणू शकते. या किंवा त्या कारणाने ज्यांनी अशी आकलनशक्ती विकसित केली आहे, त्यांनाच ते दिसू शकते.

पण ज्यांना, आपल्या अगदी नजीक आत असणाऱ्या आंतरिक अस्तित्वाची साधी जाणीवदेखील नाही, आणि जे त्यांचा आत्मा कसा असतो, हेसुद्धा सांगू शकत नाहीत, ते पृथ्वीच्या वातावरणातील हा फरक समजून येण्याइतपत तयार नसतात. त्यांना त्यासाठी पुष्कळ मजल मारावी लागेल. कारण ज्यांची चेतना ही कमी-अधिक प्रमाणात केवळ बाह्यवर्ती व्यक्तित्वामध्ये म्हणजे मन, प्राण आणि शरीर यांमध्येच केंद्रित झालेली असते अशा व्यक्तींना अशा कोणत्याही गोष्टींची ओळख पटण्यासाठी, अशा गोष्टींनी काही वैचित्र्यपूर्ण आणि अकल्पित रूप घेतलेले, दिसावे लागते. तेव्हा मग ते अशा गोष्टींना चमत्कार म्हणतात. परंतु, शक्तींच्या हस्तक्षेपामुळे जे सातत्याने चमत्कार घडून येतात; परिस्थितीमध्ये, व्यक्तिमत्त्वांमध्ये बदल घडून येतो आणि ज्याचा परिणाम हा दूरवर पसरलेला असतो अशाला ते चमत्कार असे संबोधत नाहीत; कारण येथे केवळ बाह्य रूप पाहिले जाते आणि ते खूपच स्वाभाविक वाटते. पण, खरे सांगायचे तर, घडणाऱ्या लहानात लहान गोष्टींकडे पाहून तुम्ही त्याचे चिंतन केलेत तर, त्या चमत्कारसदृश आहेत असे म्हणणे तुम्हाला भागच पडेल.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 126-127)

अत्यंत महत्त्वाच्या, एकमेवाद्वितीय म्हणता येईल अशा काळामध्ये, या भूतलावर जीवन जगण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे; अशा वेळी उलगडू पाहणाऱ्या घटनांकडे आपण केवळ पाहत बसणार का? आपल्या स्वत:च्या व्यक्तिगत वा कौटुंबिक मर्यादांपलीकडे ज्यांचे हृदय धाव घेत आहे; ज्यांचे विचार, किरकोळ व्यक्तिगत आवडीनिवडी आणि स्थानिक आचार-संकेत यांच्या पलीकडे असणारे असे काही कवळू पाहत असतील; थोडक्यात सांगावयाचे झाले तर, ज्यांना अशी जाण आहे की, ते त्यांचे स्वत:चे, त्यांच्या कुटुंबाचे किंवा अगदी त्यांच्या देशाचेही नाहीत; तर विविध देश, मानवजात यांच्या माध्यमातून जो ईश्वर अभिव्यक्त होत आहे त्याचे ते आहेत, अशा व्यक्तींनी खरोखरच, जागे झाले पाहिजे आणि त्यांनी येऊ घातलेल्या उषेच्या आगमनासाठी, मानवाच्या भवितव्यासाठी कार्य करण्याच्या कामास लागले पाहिजे…

नित्यनिरंतर-परिपूर्ण असलेल्या आत्म्याचे प्रकटीकरण, त्याचे उलगडत जाणे ह्यामध्येच अतिमानवतेचा मार्ग दडलेला आहे. मानव स्वत:च्या आध्यात्मिकीकरणासाठी एकदा जरी संमती देईल, तरी सर्व गोष्टी बदलून जातील, सर्व गोष्टी सोप्या होऊन जातील.

जेव्हा मानवाला स्वत:ची प्रकृती सापडलेली असेल, जेव्हा तो खऱ्या अर्थाने ‘स्वयं’ झालेला असेल आणि जेव्हा असा हा आध्यात्मिक मानव, त्याच्या स्वत:च्या ह्या साक्षात्कारी जीवाच्या सत्याच्या आज्ञेचे उत्स्फूर्तपणे पालन करेल, तेव्हा आध्यात्मिक जीवनाची उच्चतर पूर्णता घडून येईल. पण ही उत्स्फूर्तता, पशुप्रमाणे उपजत किंवा अवचेतन नसेल, तर ती अंतर्ज्ञानात्मक आणि पूर्ण, समग्रतया चेतन असेल.

नव्या युगामध्ये मानवतेच्या भविष्यासाठी सर्वाधिक साहाय्य करतील अशा व्यक्ती कोण असतील? तर ह्याचे उत्तर असे की, पशुमानवाचे ज्याप्रमाणे आत्यंतिक मनोमय मानवामध्ये मोठ्या प्रमाणात रूपांतर घडून आले होते, त्याप्रमाणे सद्यस्थितीतील मानवाचे आध्यात्मिक मानवामध्ये रूपांतर होणे किंवा उत्क्रांती होणे ही मनुष्यप्राण्याची सर्वाधिक गरज आहे आणि ही आध्यात्मिक उत्क्रांती हीच नियती आहे; हे ज्यांनी ओळखलेले असेल अशा व्यक्ती, मानवतेच्या भविष्यासाठी सर्वाधिक साहाय्य करतील.

अशा व्यक्ती धर्माचे विविध प्रकार आणि त्याविषयीच्या श्रद्धा यांबाबतीत तुलनेने इतरांपेक्षा उदासीन असतील. त्यांच्या लेखी ‘आध्यात्मिक रूपांतरा’वरील श्रद्धा हीच एकमेव महत्त्वाची बाब असेल.

पण हे रूपांतर, कोणत्यातरी यंत्रणेने किंवा कोणत्यातरी बाह्य संस्थांच्या द्वारे घडून येऊ शकेल, असे समजण्याची चूक ते करणार नाहीत; तर ते प्रत्येक मनुष्याने आंतरिकरित्याच अनुभवणे आवश्यक आहे; अन्यथा ते रूपांतर वास्तवामध्ये कधीच उतरणार नाही, ह्याची त्यांना जाण असेल आणि ही गोष्ट ते कधीही विसरणार नाही.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 159, 165-166)

सद्यस्थितीमध्ये, मानवाचे जीवन हे बुद्धीने शासित केले जात आहे; मनाच्या सर्व कृती, हालचाली त्याला नेहमीच्या उपयोगाच्या अशा आहेत; निरीक्षण व अनुमान ही त्याच्या ज्ञानाची साधने आहेत; तो त्याच्या तर्कबुद्धीच्या आधारे जीवनातील निर्णय घेतो, मार्गाची निवड करतो. किंवा तो तर्कबुद्धीच्या आधारे तो तसे करतो, अशी त्याची समजूत असते.

परन्तु नवीन वंश हा मात्र अंतर्ज्ञानाने, म्हणजेच आंतरिक दिव्य कायद्याच्या थेट बोधाने शासित होईल. ही अंतर्ज्ञानशक्ती काही माणसांना खरंतर माहीत असते, आणि तिचा त्यांनी अनुभवदेखील घेतलेला असतो. ज्याप्रमाणे, मानवाच्या उदयापूर्वी जंगलातील काही ठरावीक अशा मोठ्या गोरिलांना निश्चितपणे तर्कबुद्धीची झलक दिसलेली होती, त्याप्रमाणे काही माणसांना ही अंतर्ज्ञानशक्ती माहीत असते, आणि तिचा त्यांनी अनुभवदेखील घेतलेला असतो. ज्यांनी आपला अंतरात्मा विकसित केलेला आहे, ज्यांनी आपल्या अस्तित्वाचा खरा कायदा काय, ह्याच्या शोधासाठी आपल्या ऊर्जा एकवटलेल्या आहेत, मानववंशातील अशा अगदी काही मोजक्याच व्यक्तींमध्ये अंतर्ज्ञानाची कमीअधिक शक्ती आढळते.

जेव्हा मन पूर्णपणे शांत असते, एखाद्या घासूनपुसून चकचकीत केलेल्या आरशाप्रमाणे स्वच्छ असते, वाराविरहित दिवशी असलेल्या निस्तरंग तळ्याप्रमाणे जेव्हा मन निस्तरंग असते तेव्हा, ज्याप्रमाणे, त्या पाण्यामध्ये वरून चांदण्यांचा प्रकाश पडतो, त्याप्रमाणे अतिमानवाचा, आंतरिक सत्याचा प्रकाश निश्चल मनाला उजळवून टाकतो आणि त्यातून अंतर्ज्ञानाचा उदय होतो. शांतीमधून येणारा हा आवाज ऐकण्याची ज्यांना सवय आहे, अशा व्यक्ती त्याकडे आपल्या कृतींचा प्रेरक प्रारंभ म्हणून पाहतात. जेव्हा इतर सर्वसामान्य माणसं बुद्धीच्या जटिल मार्गांवरून इतस्ततः भटकत राहतात, तेव्हा अशा व्यक्ती मात्र अंतर्ज्ञानाच्या साहाय्याने, या सरस उपजतप्रेरणेच्या साहाय्याने, जीवनाच्या वळणावळणाच्या मार्गावरून सरळ पुढे जातात; जणूकाही त्यांना सामर्थ्यवान आणि अमोघ अशा हातांकडून मार्गदर्शन मिळत असावे.

ही जी आत्ता अपवादात्मक आणि असामान्य वाटणारी अशी क्षमता आहे, ती उद्याच्या मानवासाठी, येणाऱ्या नवीन प्रजातीसाठी, नूतन वंशासाठी अगदी सर्वसामान्य आणि स्वाभाविक असेल. पण कदाचित त्याचा सातत्यपूर्ण वापर हा बौद्धिक क्षमतांना बाधक ठरू शकेल. ज्याप्रमाणे माकडाकडे असलेल्या आत्यंतिक शारीरिक क्षमता ह्या माणसांमध्ये आढळत नाहीत, त्याचप्रमाणे मानवाकडे असलेली आत्यंतिक मानसिक क्षमता, अतिमानवाने गमावलेली असेल.

आजवर मानवाने जे काही विकसित केले आहे, – अगदी त्यामध्ये, जिच्या बद्दल त्याला सार्थ आणि तरीही उगीचच अभिमान असतो अशी बुद्धीदेखील आली; – ते सारे आता त्याला पुरेसे वाटत नाही, असे जाहीर करण्याचे धाडस जेव्हा मानव करेल आणि त्याच्या अंतरंगांत असलेल्या महत्तर शक्ती खुल्या करणे, त्यांचे अनावरण करणे, त्या बाहेर काढणे, हाच जेव्हा त्याचा मोठ्यातला मोठा उद्यम होईल, तेव्हा मानवाचा अतिमानत्वाकडे जाणारा मार्ग खुला होईल.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 163-64)

(उदयाला येऊ घातलेल्या अतिमानवाच्या आगमनाच्या तयारीविषयी जपानमधील स्त्रियांसमोर, श्रीमाताजी बोलत आहेत. गर्भवती स्त्रियांनी कसा दृष्टिकोन बाळगला पाहिजे, हे त्या सांगत आहेत.)

अतिमानव जन्माला यावयाचा आहे आणि तो स्त्रीच्या उदरातूनच जन्माला येणार, हे निर्विवाद सत्य आहे; पण म्हणून या सत्याविषयी केवळ अभिमान बाळगणे पुरेसे नाही; तर त्याचा अर्थ काय, हे आपण नीट समजून घेतले पाहिजे. त्यामधून आपल्यावर काय जबाबदारी येते, ह्याचे आपल्याला भान असले पाहिजे आणि आपल्यावर जे कार्य सोपविण्यात आले आहे, ते आपण अत्यंत जीव तोडून करावयास शिकले पाहिजे.

सध्याच्या विश्वव्यापक कार्यामध्ये आपल्या वाट्याला आलेले हे सर्वाधिक महत्त्वाचे कार्य आहे. यासाठी आपण सर्वप्रथम हे जाणून घेणे गरजेचे आहे की, सद्यकालीन गोंधळाचे आणि अंधकाराचे, प्रकाश आणि सुसंवादामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची माध्यमे कोणती असतील ? आणि किमान हे ढोबळमानाने तरी जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

…एका नवीनच आध्यात्मिक प्रकाशाचे, आपल्याला आजवर अज्ञात असलेल्या कोणत्यातरी दिव्य शक्तीचे या पृथ्वीवर आविष्करण होणार आहे; ईश्वरासंबंधीचा एक सर्वस्वी नवीन विचार, या विश्वामध्ये अवतरणार आहे आणि इथे एक नवीनच आकार जन्माला येणार आहे. आणि इथेच आपण, ‘खऱ्याखुऱ्या मातृत्वाची आपली जबाबदारी’ या आपल्या आरंभीच्या मुद्द्याकडे येतो.

कारण या नवीन आकारातूनच, पृथ्वीची सद्यकालीन स्थिती परिवर्तित करण्यासाठी, सक्षम असणारी आध्यात्मिक शक्ती आविष्कृत होणार आहे. हा नवीन आकार, हे नवीन रूप एक स्त्री घडविणार नाही तर दुसरे कोण?

… ज्यांच्याविषयी आपण ऐकलेले असते, वा ज्यांच्याविषयी आपल्याला माहिती असते, अशा कितीही का थोर व्यक्ती असेनात, त्यांच्यासारख्या किंवा त्यांच्याही पेक्षा थोर, अधिक विख्यात, सिद्ध आणि प्रतिभावान अशी व्यक्ती वा मानव घडविणे हे आता पुरेसे नाही; तर, जी परमोच्च शक्यता आजवरच्या मानवाची सर्व परिमाणं आणि वैशिष्ट्य ओलांडून, अतिमानवाला जन्म देणार आहे; त्या परमोच्च शक्यतेच्या संपर्कात येण्यासाठी, आपण आपल्या मनाने, आपल्या विचाराच्या आणि इच्छेच्या सातत्यपूर्ण अभीप्सेद्वारे, धडपडले पाहिजे.

काहीतरी पूर्णत: नवीन, आजवर कल्पनाही केली नव्हती, असे काही नवेच निर्माण करण्याची एक आस या प्रकृतीला पुन्हा एकवार लागली आहे आणि तिच्यामधील ह्या आवेगालाच आपण प्रतिसाद दिला पाहिजे आणि तिचे आज्ञापालन केले पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 160-161)

श्रीमाताजी : अतिमानस चेतनेला मानवी चेतनेमध्ये प्रवेश करून, स्वत:चे आविष्करण करता येणे शक्य व्हावे, ह्यासाठी मानवी चेतनेची अपेक्षित अशी अवस्था, एक दिवस निश्चितपणे येईल. मानव वंश तयार होण्यासाठी जसा प्रचंड काळ लागला होता, त्याप्रमाणेच हा नवीन वंश तयार होण्यासाठीदेखील खूप काळ लागण्याची शक्यता आहे. आणि हे क्रमाक्रमानेच घडून येणार आहे. पण मी म्हटले होते त्याप्रमाणे, जेव्हा घडायचे असेल तेव्हा ते घडेलच… एक वेळ असते, जेव्हा हे घडून येते, जेव्हा ते अवतरण घडून येते, जेव्हा संयोजन घडून येते, जेव्हा हे तादात्म्य घडून येते. कदाचित हे निमिषार्धातही घडून येते. एक क्षण असतो, जेव्हा हे घडते. नंतर मात्र कदाचित खूप, खूप, खूप वेळ जावा लागतो. एका रात्रीमध्ये जिकडे तिकडे अतिमानव प्रकट झालेले एखाद्याला दिसू शकतील, अशी कल्पना कोणी करता कामा नये. आणि ते असे असणारही नाही. मी म्हटले त्याप्रमाणे, ज्यांनी स्वत:ला पूर्णत: झोकून दिले आहे, ज्यांनी सर्वांसाठी सर्व प्रकारचा धोका पत्करला आहे, त्यांनाच हे कळू शकेल. केवळ त्यांनाच हे समजू शकेल; जेव्हा हे घडून येईल तेव्हा ते त्यांना ज्ञात होईल.

प्रश्न : म्हणजे, इतरांना ते दिसूही शकणार नाही?

श्रीमाताजी : इतरांना त्याची साधी जाणीवसुद्धा नसेल. काय घडले आहे ते जाणून न घेता, ते त्यांचे स्वत:चे मूढ जीवन तसेच चालू ठेवतील.

– श्रीमाताजी
(CWM 07 : 328-329)

आपण हे आधीच पाहिले आहे की, एका नवीन प्रजातीचा उदय ही नेहमीच या पृथ्वीवर एका नवीन तत्त्वाच्या, चेतनेच्या एका नवीन पातळीच्या, एका नव्या शक्तीच्या वा सामर्थ्याच्या आविष्करणाची घोषणा असते. पण त्याच वेळी, ही नवी प्रजाती, जेव्हा आजवर आविष्कृत न झालेली शक्ती वा चेतना प्राप्त करून घेते, तेव्हा ती तिच्या अगदी लगतच्या आधीच्या प्रजातीची वैशिष्ट्ये म्हणून गणल्या जाणाऱ्या एक वा अनेक निपुणता, सिद्धी, संपदा (perfections) गमावून बसण्याची शक्यता असते.

उदाहरणादाखल, प्रकृतीच्या विकसनाची अगदी अलीकडची पायरी पाहू. मनुष्य आणि त्याच्या निकटचा पूर्ववर्ती असणारा वानर ह्यामधील लक्षणीय फरक कोणते आहेत? आपल्याला माकडांमध्ये पूर्णत्वाच्या जवळ जाणारी शारीरिक क्षमता आणि प्राणशक्ती आढळून येते; त्या निपुणतेचा नव्या प्रजातीमध्ये (माणसामध्ये) त्याग करावा लागला आहे. माणसामध्ये, आता झाडांवर ते सरासरा चढणे नाही, डोंगरदऱ्यांमधून केलेल्या कसरती नाहीत, या कड्यावरून त्या कड्यावर मारलेल्या उड्या नाहीत; पण त्या बदल्यात त्याला बुद्धिमत्ता, तर्कशक्ती, समन्वयाची, निर्मितीची शक्ती लाभलेली आहे. माणसाच्या आगमनाबरोबर या पृथ्वीवर मनाच्या, बुद्धीच्या जीवनाचा उदय झाला.

माकडामध्ये ज्याप्रमाणे मानसिक क्षमता सुप्तावस्थेत असतात त्याप्रमाणेच, मनुष्य हा मूलत: मनोमय जीव असल्यामुळे, जर त्याच्या शक्यता मनोमयापाशीच विराम न पावता, त्याला स्वत:मध्ये मनोमय जीवनाच्या पलीकडची इतर विश्वं, इतर क्षमता, चेतनेच्या इतर पातळ्या प्रतीत होत असतील तर, ते दुसरे तिसरे काही नसून भवितव्याचे आश्वासन असते.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 162-163)

परमोच्चाकडून पृथ्वी ज्या कोणत्या महत्तम गोष्टीची अपेक्षा करू शकेल, ते वरदान आम्ही परमश्रेष्ठाकडे मागितलेले आहे ; आम्ही असे परिवर्तन मागितले आहे की, जे प्रत्यक्षात उतरविणे खूप कठीण आहे; ज्याच्या अटी, शर्ती ह्या खूप कष्टप्रद असणार आहेत. परमसत्य आणि त्याच्या शक्तीचे जडामध्ये अवतरण; जडाच्या पातळीवर, जडचेतनेमध्ये, भौतिक विश्वामध्ये अतिमानसाची प्रस्थापना आणि जडतत्त्वाच्या अगदी मूळापर्यंत झालेले संपूर्ण रुपांतरण, ह्यापेक्षा कोणतीही निम्नतर गोष्ट आम्ही मागितलेली नाही. केवळ परमोच्च कृपेद्वारेच हा चमत्कार घडून येऊ शकतो.

ती परमशक्ती अगदी जडचेतनेमध्येदेखील अवतरलेली आहे; पण तिचे आविष्करण होण्यापूर्वी, तिच्या महान कार्याला उघडपणाने सुरुवात होण्यापूर्वी, प्रभावशाली, परमश्रेष्ठाची कृपा असलेली परिस्थिती येथे असावी अशी तिची मागणी आहे; आणि त्याची वाट पाहत, ती जडभौतिकाच्या घनदाट पडद्याआड उभी आहे. या प्रकृतीमध्ये आणि जडभौतिक अस्तित्वामध्ये त्याचे आविष्करण होण्यासाठीची पहिली अट ही आहे की, सत्य हे तुमच्यामध्ये संपूर्णतया आणि काहीही हातचे राखून न ठेवता स्वीकारले गेले पाहिजे.

संपूर्ण समर्पण; केवळ दिव्य प्रभावासाठीच स्व-चे उन्मीलन; सातत्याने व संपूर्णपणे सत्याची निवड आणि असत्याचा त्याग, केवळ ह्याच अटी आहेत. पूर्णतया, कोणताही अंगचोरपणा न करता, कोणतीही कुचराई व ढोंगीपणा न करता; जडभौतिक जाणिवेच्या आणि तिच्या कार्याच्या अगदी खोलवरपर्यंत ह्या अटींचे पालन प्रामाणिकपणे केले पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 372-373)

उठा, स्वत:च्या अतीत जा, तुम्ही स्वत: जे आहात ते बना. तुम्ही माणूस आहात आणि माणसाची संपूर्ण प्रकृतीच अशी आहे की, त्याने स्वत:पेक्षा अधिकतर व्हावे. एकेकाळी जो मनुष्य-प्राणी होता, आता तो पशु-मानवापेक्षा वरच्या श्रेणीत प्रविष्ट झाला आहे. तो विचारवंत आहे, कारागीर आहे, तो सौंदर्योपासक आहे. पण तो विचारवंतापेक्षाही अधिक असे काही बनू शकतो, तो ज्ञान-द्रष्टा बनावा, तो कारागीरापेक्षा अधिक काही बनावा. तो निर्माणकर्ता बनावा आणि त्याच्या निर्मितीचा स्वामी बनावा; त्याला सर्व सौंदर्य आणि सर्व आनंद यांचा लाभ घेता यावा म्हणून, त्याने निव्वळ सौंदर्याची उपासना करण्यापेक्षा अधिक काही बनावे.

मनुष्य हा शरीरधारी असल्यामुळे, तो त्याचे अमर्त्य द्रव्य मिळविण्यासाठी धडपडतो; तो प्राणमय जीव असल्यामुळे, तो अमर्त्य जीवनासाठी आणि त्याच्या प्राणमय अस्तित्वाच्या अनंत सामर्थ्यासाठी धडपडतो; तो मनोमय जीव असल्यामुळे, आणि त्याच्याकडे आंशिक (Partial) ज्ञान असल्यामुळे, तो संपूर्ण प्रकाश आणि दिव्य दृष्टी ह्यांच्या प्राप्तीसाठी धडपडतो.

ह्या सर्व गोष्टी प्राप्त करून घेणे म्हणजे अतिमानव बनणे होय; कारण हे बनणे म्हणजे मनामधून अतिमनाकडे उन्नत होणे होय. त्याला दिव्य मन वा दिव्य ज्ञान किंवा अतिमन काहीही नाव द्या; ती दिव्य संकल्पाची आणि दिव्य चेतनेची शक्ती आणि प्रकाश आहे. आत्म्याने अतिमनाच्या माध्यमातून पाहिले आणि त्याने स्वत:साठी ही विश्वं निर्माण केली, अतिमनाच्याद्वारेच तो त्यांच्यामध्ये राहतो आणि शासन करतो. अतिमनामुळेच तो स्वराट आणि सम्राट, म्हणजे अनुक्रमे स्व-सत्ताधीश आणि सर्व-सत्ताधीश आहे.

अतिमन म्हणजे अतिमानव; त्यामुळे मनाच्या वर उठणे ही महत्त्वाची अट आहे.

अतिमानव असणे म्हणजे दिव्य जीवन जगणे, देव बनणे. कारण देव असणे म्हणजे देवाचे शक्तिसामर्थ्य असणे. तुम्ही मानवामधील देवाचे सामर्थ्य बना.

दिव्य अस्तित्वामध्ये ठाण मांडून जीवन जगणे आणि आत्म्याच्या चेतनेने, आनंदाने, संकल्पशक्तीने आणि ज्ञानाने तुमचा ताबा घेणे आणि तुमच्या बरोबर आणि तुमच्या माध्यमातून लीला करणे हा त्याचा अर्थ आहे.

हे तुमच्या अस्तित्वाचे सर्वोच्च रूपांतरण होय. स्वत:मध्ये देवाचा शोध घेणे आणि त्याचे प्रकटीकरण प्रत्येक गोष्टीमध्ये करणे, हे तुमचे सर्वोच्च रूपांतरण आहे. त्याच्या अस्तित्वामध्ये जगा, त्याच्या प्रकाशाने उजळून निघा, त्याच्या शक्तीने कृती करा, त्याच्या आनंदाने आनंदी व्हा. तुम्ही तो अग्नी व्हा, तो सूर्य व्हा, आणि तो महासागर व्हा. तुम्ही तो आनंद, ती महत्ता आणि ते सौंदर्य बना.

तुम्ही ह्यापैकी अंशभाग जरी करू शकलात तर, तुम्ही अतिमानवतेच्या पहिल्या पायऱ्या गाठल्याप्रमाणे होईल.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 151-152)

परमेशाचे परिपूर्ण पात्र बनणे आणि दिव्य अतिमानव बनणे; हे तुमचे कार्य आहे आणि हे तुमच्या अस्तित्वाचे ध्येय आहे आणि ह्याचसाठी तुम्ही इथे आहात.

या व्यतिरिक्त इतर जे काही तुम्हाला करावे लागेल ते दुसरे तिसरे काही नसून, एकतर तुमची तयारी करून घेणे आहे, किंवा मार्गावरील आनंद आहे, किंवा हेतूपासून स्खलन, ध्येयच्युती आहे.

या मार्गाधारे मिळणारी सत्ता वा शक्तिसामर्थ्य किंवा मार्गावरील आनंद हे तुमचे गंतव्य आणि प्रयोजन नसून, परमेशाचे परिपूर्ण पात्र बनणे आणि दिव्य अतिमानव बनणे; हेच तुमचे गंतव्य आणि प्रयोजन आहे.

तुम्हाला मार्गावरील हा आनंद मिळत आहे, कारण तुम्हाला ज्याचा वेध लागला आहे, तोदेखील या मार्गावर तुमच्या बरोबर आहे. तुम्ही तुमची सर्वोच्च शिखरे सर करावीत, यासाठीच आरोहणाची ही शक्ती तुम्हाला देण्यात आली आहे.

जर तुमचे काही कर्तव्य असेलच तर ते हेच होय; जर तुम्ही असे विचारत असाल की, तुमचे ध्येय काय असावे, तर ते ध्येय हेच असावे. जर तुम्ही सुखाची अभिलाषा बाळगत असाल तर, उपरोक्त गोष्टीपेक्षा अधिक दुसरा कोणताच आनंद नाही; कारण स्वप्नाचा आनंद असो किंवा झोपेचा आनंद असो किंवा स्व-विस्मृतीचा आनंद असो, हे सारे इतर आनंद तोडकेमोडके वा मर्यादित असतात. पण हा तुमच्या संपूर्ण अस्तित्वाचा आनंद आहे.

जर तुम्ही असे विचारत असाल की, माझे अस्तित्व काय, तर ईश्वर हे तुमचे अस्तित्व आहे आणि इतर सर्वकाही ही त्याची केवळ भग्न वा विपर्यस्त रूपे आहेत.

जर तुम्ही सत्य शोधू पाहात असाल, तर ते सत्य हेच होय. तेच तुमच्यासमोर सातत्याने असू द्या आणि सर्व गोष्टींमध्ये तुम्ही त्याच्याशीच एकनिष्ठ राहा.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 150)

अतिमानव म्हणजे चढाई करून, स्वत:च्या प्राकृतिक शिखरावर जाऊन पोहोचलेला कोणी मानव नव्हे किंवा अतिमानव म्हणजे माणसाच्या महानतेची, ज्ञानाची, उर्जेची, बुद्धिमत्तेची, संकल्पशक्तीची, चारित्र्याची, विद्वतेची, गतिमान शक्तीची, संतपणाची, प्रेमाची, शुद्धतेची वा पूर्णत्वाची अधिक श्रेष्ठ अशी श्रेणीही नाही. अतिमानस हे मनोमय मानव आणि त्याच्या मर्यादांच्या अतीत असणारे असे काही आहे; मानवी प्रकृतीला मानवेल अशा उच्चतम चेतनेपेक्षादेखील ही अतिमानस चेतना अधिक महान आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 158)