Tag Archive for: तत्त्वज्ञान

प्रश्न : धर्माचे स्वरूप नेमके काय आहे? आध्यात्मिक जीवनमार्गातील तो अडथळा आहे का?

श्रीमाताजी : मानवतेच्या उच्चतर मनाशी धर्माचा संबंध असतो. मानवाचे उच्च मन, त्याच्या पलीकडे जे आहे त्याच्या पर्यंत पोहोचण्याचा स्वत:च्या क्षमतेनुसार प्रयत्न करत असते. मानव ज्याला ईश्वर वा चैतन्य वा सत्य वा श्रद्धा वा ज्ञान वा अनंत, केवल अशा नावांनी संबोधतो, ज्याच्या पर्यंत मानवी मन पोहोचू शकत नाही, पण तरीही तेथे पोहोचण्याचा ते प्रयत्न करत राहते, त्या प्रयत्नाला ‘धर्म’ ही संज्ञा आहे.

धर्म हा त्याच्या मूळ उगमापाशी दिव्य, ईश्वरी असू शकतो पण त्याचे व्यवहारातील स्वरूप हे ईश्वरी नसून मानवी असते. वस्तुत: आपण एक धर्म असे न म्हणता अनेक धर्मांविषयी बोलले पाहिजे कारण माणसांनी अनेक धर्मांची स्थापना केली आहे…..

सर्व धर्मांची गोष्ट एकसारखीच आहे. एखाद्या महान गुरुचे या भूतलावर येणे हे धर्माच्या उदयाचे निमित्त असते. तो येतो, तो त्या दिव्य सत्याचा अवतार असतो आणि तो ती दिव्य सद्वस्तु उघड करून दाखवितो; पण माणसं त्याचाच ताबा घेतात, त्याचा व्यापार मांडतात, एखादी राजकीय संघटना असावी तशी त्याची अवस्था करून टाकतात. मग अशा धर्माला शासन, धोरणे, नियम, पंथ, सिद्धान्त, कर्मकांड, सणसमारंभ, उत्सव यांनी सजवले जाते आणि या साऱ्या गोष्टी त्या त्या धर्मीयांसाठी जणूकाही निरपवाद व अनुल्लंघनीय अशा बनून जातात. तेव्हा मग धर्म देखील एखाद्या राज्यव्यवस्थेप्रमाणेच, त्याच्या निष्ठावान लोकांना बक्षिस देतो आणि जे बंडखोरी करतात किंवा जे धर्मापासून भरकटतात, जे पाखंडी आहेत, जे त्या धर्माचा त्याग करतात, त्यांना तो शिक्षा सुनावतो.

प्रस्थापित आणि अधिकृत अशा कोणत्याही धर्माचा पहिला आणि मुख्य सांगावा हाच असतो की, “माझे तत्त्व सर्वोच्च आहे, तेच एकमेव सत्य आहे, आणि इतर सारे मिथ्या वा गौण आहे.” कारण अशा प्रकारच्या ह्या मूलभूत सिद्धान्ताशिवाय, प्रस्थापित संप्रदायवादी धर्म अस्तित्वातच आले नसते. तुम्हाला एकट्यालाच सर्वोच्च सत्य गवसले आहे किंवा तुम्ही एकट्यानेच त्या ‘एका’ला कवळले आहे अशी जर तुमची खात्री नसेल आणि जर तुम्ही तसा दावा केला नाहीत तर तुम्ही लोकांवर प्रभाव टाकू शकत नाही आणि त्यांना तुमच्याभोवती गोळा करू शकत नाही. धार्मिक मनुष्याचा हा असा अगदी स्वाभाविक दृष्टिकोन असतो; पण त्यामुळेच धर्म हा आध्यात्मिक जीवनाच्या मार्गावरील अडथळा म्हणून समोर उभा ठाकतो.

– श्रीमाताजी

(CWM 03 : 76-77)

पूर्णयोग आणि बौद्धमत – ०२

दया आणि करुणा या दोन भिन्न प्रकारच्या भावना आहेत. माणसांच्या वाट्याला जे दुःखभोग आलेले असतात ते दूर करण्यासाठीची तीव्र उर्मी म्हणजे ‘करुणा’. दुसऱ्याचे दुःख पाहून वा इतरांच्या दुःखाबद्दलच्या विचाराने असहाय्य दुर्बलतेची भावना निर्माण होणे म्हणजे ‘दया’.

करुणा हा बलवंतांचा मार्ग आहे, भगवान बुद्धांच्या कुटुंबीयांना, मित्रमंडळींना, आप्तांना विरहदुःख सहन करावे लागले; त्यांचे जणू सर्वस्व गमावले गेले होते पण करुणार्द्र होऊन, या जगातील दुःखांचा निरास करण्यासाठी भगवान बुद्ध घराबाहेर पडले…

पूर्णमानव, सिद्ध किंवा बुद्ध हा विश्वव्यापी होतो, सहानुभूतीने व एकतेने सर्व अस्तित्वाला कवटाळतो, स्वत:मध्ये वसणाऱ्या ‘स्व’चा स्वत:मधल्याप्रमाणेच इतरांमध्येही शोध घेतो. आणि असे करून, तो विश्वशक्तीच्या अनंत सामर्थ्याला कमीअधिक प्रमाणात स्वत:च्या ठिकाणी आणतो, हे भारतीय संस्कृतीचे विधायक ध्येय आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 09 : 153-154) (CWSA 20 : 254)

न संपणाऱ्या युद्धांचा दीर्घ इतिहास असतानासुद्धा मानवजातीने आजवर खोल अंतरंगात एका आनंदमय, शांतीपूर्ण आणि सुसंवादी अशा सामूहिक जीवनाची अभीप्सा जोपासलेली आहे. मानवाच्या धार्मिक आणि धर्मनिरपेक्ष विचारांमध्ये या अभीप्सेने वेगवेगळी रूपे धारण केली आहेत. पण आजवर आपण फक्त तिच्या जवळपास जाईल अशी तात्पुरती एकता संपादन करण्यात यशस्वी झालो आहोत, खरी एकता मिळविण्यात नाही. कदाचित खराखुरा पायाच गवसलेला नाही. ह्या वेळेला मात्र, अतिमानस चेतनेने सुसज्ज होत, मूर्तिमंत स्वयमेव भगवत्शक्तीच्या पुढाकाराने, ह्या प्रयत्नाला पुनश्च सुरुवात झाली असल्याचे आपण पाहत आहोत. अधिक तेजोमय, सुसंवादपूर्ण आणि सुंदर जीवनासाठी असलेली ही अभीप्साच ‘ऑरोविल’च्या मूलस्थानी आहे हे आपल्याला दिसत आहे; हा एक असा ईश्वरी प्रकल्प आहे की, ज्याचा प्रारंभ भगवत्शक्तीने केला आहे, ज्याला मार्गदर्शन व साहाय्य देखील भगवत्शक्तीनेच केले आहे. हा मानवजातीसाठी स्वप्नवत वाटावा असा प्रकल्प आहे यात शंकाच नाही, परंतु हे स्वप्न आहे खुद्द परमेश्वराचे !

*

या भूतलावर असे एक स्थान असावे की, जेथे कोणतेच राष्ट्र मालकी हक्काचा दावा करणार नाही. जिथे प्रामाणिक अभीप्सा बाळगणारी, शुभसंकल्प असणारी सर्व माणसं, या विश्वाचे नागरिक म्हणून मुक्त मनाने जीवन जगू शकतील. ते सारे केवळ ‘एका’चीच, म्हणजेच त्या परम सत्याचीच आज्ञा पाळतील.

शांती, सलोखा, सुमेळ यांनी युक्त असे हे स्थान असेल जेथे, माणसांमधील संघर्षभावनेच्या सर्व प्रेरणा ह्या केवळ आणि केवळ दु:खभोग व चिंता यांच्या मूळ कारणांवर विजय मिळविण्यासाठीच उपयोगात आणल्या जातील; त्या प्रेरणा व्यक्तीची दुर्बलता आणि अज्ञान यांच्यावर मात करण्यासाठी उपयोगात आणल्या जातील, त्याच्या मर्यादा व अक्षमता यांना उल्लंघून जाण्यासाठी उपयोगात आणल्या जातील.

हे असे स्थान असेल की, जेथे इच्छावासनांच्या परिपूर्तीपेक्षा, तसेच सुखसुविधा, मौजमजा यांच्या मागे धावण्यापेक्षा, प्रगतीची तळमळ व आत्म्याची गरज या गोष्टींना अधिक प्राधान्य दिले जाईल.

या ठिकाणी, स्वत:च्या आंतरात्म्याशी फारकत न होता, लहान मुलं समग्रपणे, सर्वांगीण रीतीने मोठी होतील, विकसित होतील; शिक्षण हे केवळ परीक्षेत उत्तीर्ण होणे, पद वा पदवी मिळविणे यांच्यासाठी दिले जाणार नाही; तर विद्यार्थ्यांमध्ये अंगभूत असलेल्या क्षमतांच्या विकसनासाठी, तसेच सुप्त असलेल्या नवीन क्षमतांच्या प्रकटीकरणासाठी शिक्षण दिले जाईल.

या ठिकाणी, पद, नावलौकिक, प्रतिष्ठा यांची जागा सेवा करण्याची, सुव्यवस्था लावण्याची संधी घेईल. एखादी व्यक्ती बौद्धिक, नैतिक, आध्यात्मिक दृष्ट्या श्रेष्ठ असेल तर, त्या व्यक्तीचे श्रेष्ठत्व त्या संरचनेमध्ये जीवनातील वाढती सुखसमृद्धी व सत्ता यांच्याद्वारे अभिव्यक्त होणार नाही; तर त्या व्यक्तीवरील वाढत्या कर्तव्यांच्या आणि जबाबदाऱ्यांच्या रूपात ते श्रेष्ठत्व अभिव्यक्त होईल.

कलेच्या विविध रूपांमधून – चित्रकला, शिल्पकला, संगीत, साहित्य यांद्वारे – व्यक्त होणारे सौंदर्य सर्वांना सारख्याच प्रमाणात सुलभप्राप्य असेल; त्यामधून मिळणाऱ्या आनंदाचा आस्वाद घेण्याची क्षमता ही त्या व्यक्तीच्या सामाजिक वा आर्थिक स्थानावर अवलंबून असणार नाही; तर त्या त्या व्यक्तीच्या क्षमतांवर आधारित असेल. कारण या आदर्श अशा ठिकाणी, पैसा हा सर्वसत्ताधीश या स्वरूपात अस्तित्वात उरणार नाही; भौतिक संपत्ती आणि सामाजिक स्थान यांपेक्षा व्यक्तीच्या गुणवत्तेला कितीतरी अधिक महत्त्व असेल.

या ठिकाणी, कर्म हे व्यक्तीच्या उपजीविकेचे साधन नसेल तर, स्वत:ला अभिव्यक्त करण्याचा तो मार्ग असेल. सर्व समष्टीसाठी सेवारत असताना, कर्म हा स्वत:च्या क्षमता व शक्यतांना विकसित करण्याचा मार्ग असेल, परिणामतः ते व्यक्तीला उपजीविकादेखील पुरवेल आणि कार्यक्षेत्रही पुरवेल.

थोडक्यात म्हणजे, हे असे एक स्थान असेल की जेथे, सर्वसाधारणत: जे मानवी नातेसंबंध स्पर्धासंघर्षांवर आधारित असतात; त्यांची जागा खराखुरा बंधुभाव, सहकार्य, काही चांगले करण्याची, त्याचे अनुसरण करण्याची तळमळ ह्या गोष्टींनी घेतली जाईल.

हा आदर्श प्रत्यक्षात, वास्तवात उतरविण्यासाठी, अजून तरी पृथ्वीची तयारी नक्कीच झालेली नाही, हे स्वप्न समजून घेण्यासाठी आणि आत्मसात करण्यासाठी आवश्यक असणारे पुरेसे ज्ञान अजून पर्यंत मानवजातीकडे नाही, तसेच ह्या आदर्शाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी अगदी अनिवार्य असणारी चेतनाशक्ती देखील मानववंशाकडे आजमितीस नाही, म्हणूनच मी ह्यास ‘स्वप्न’ असे म्हणते.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 93-94)

‘ऑरोविल’ ही नगरी म्हणजे असे विशाल स्वप्न साकारण्याचा प्रयत्न आहे. ह्या नगरीच्या प्रकल्पाचे उद्घाटन दि. २८ फेब्रुवारी १९६८ रोजी झाले.

चैत्य पुरुष जेव्हा देह सोडून जातो तेव्हा, त्याने अगदी मन आणि प्राणाला देखील मार्गावरील त्यांच्या त्यांच्या विश्रांतीस्थानी सोडलेले असते, अशा वेळीदेखील तो स्वत:सोबत त्याच्या अनुभवांचा गाभा बाळगतो. तो भौतिक घटना किंवा प्राणिक हालचाली, मानसिक रचना, क्षमता किंवा स्वभाव यांपैकी काहीच बाळगत नाही तर या सगळ्यांतून अगदी आवश्यक असे जे काही त्याने त्यांच्याकडून जमवलेले असते असे काहीतरी तो बाळगून असतो, त्याला ‘दिव्य घटक’ असे म्हणता येईल. (या दिव्य घटकासाठीच वरील भौतिक घटना वगैरे गोष्टी अस्तित्वात होत्या.) ही कायमस्वरूपी अशी अभिवृद्धी असते की जी, दिव्यत्वाकडे जो विकास चालू आहे त्यामध्ये साहाय्यकारी होते. आणि म्हणूनच बहुतेक वेळी गत जन्मांमधील बाह्य घटना वा परिस्थिती स्मरणात राहत नाहीत. अशी आठवण राहण्यासाठी मन, प्राण आणि अगदी सूक्ष्म शरीर यांच्या अ-भंग सातत्याच्या दिशेने त्यांचे विकसन झालेले असावे लागते; कारण जरी ते एक प्रकारच्या बीजरूपाने स्मरणात राहिले तरी ते सहसा उमलत नाहीत, विकसित होत नाहीत. निष्ठा, उमदेपणा, उच्च कोटीचे धैर्य या रूपाने, योद्ध्याच्या महानतेमध्ये अंतर्भूत असणारा दैवी घटक, सुसंवादी मानसिकता आणि कवीची उदारमनस्कता ह्यांद्वारे अभिव्यक्त होणारा दैवी घटक शिल्लक राहतो आणि व्यक्तित्वाच्या नव्या सुमेळामध्ये एक नवीनच रूप घेऊन व्यक्त होऊ शकतो किंवा त्याचे जीवन जर ईश्वराभिमुख झाले तर साक्षात्कारासाठी म्हणून त्या शक्ती वळविल्या जाऊ शकतात किंवा ईश्वरासाठी जे कार्य करावयाचे आहे त्यामध्ये त्यांचा उपयोग केला जाऊ शकतो.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 544)

प्रश्न : समजा एखाद्या व्यक्तीने एखाद्या जन्मात बुद्धिमान बनावे म्हणून खूप मेहनत केली, पण जर तो पुढच्या जन्मात निर्बुद्ध म्हणून जन्माला आला, तर त्याच्या त्या मेहनतीचा, परिश्रमांचा काय उपयोग?

श्रीमाताजी : अशा व्यक्तीचा चैत्य पुरुष हा निर्बुद्ध नसतो. उदाहरणार्थ असे समजा की, त्या व्यक्तीच्या चैत्य पुरुषाने लेखक असण्याचा आणि त्यामुळे त्याचे अनुभव पुस्तकं आणि भाषणं या माध्यमातून शब्दबद्ध करण्याचा अनुभव घेतला आहे. म्हणजे तो ज्या परिस्थितीमध्ये, ज्या सहसंबंधांनिशी जगत होता त्या विशिष्ट क्षेत्रातील सगळे अनुभव त्याने घेतले आहेत. पण असे करण्यामध्ये अनुभवाच्या एका क्षेत्राची कमतरता राहून गेली. उदाहरणार्थ, आता तो म्हणतो की, “आजवर मी माझ्या मेंदूने, बुद्धिने विचार करत जगत आलो, एखादा बुद्धिमान माणूस जीवनाला जशा प्रतिक्रिया देईल तशा पद्धतीने आजवर मी देत आलो, आता मात्र मला भावनांनिशी माझे जीवन जगायचे आहे.” कारण बघा नेहमी, बुद्धिच्या अतिवापरामुळे सामान्य जीवनामध्ये भावनांची क्षमता क्षीण होऊन जाते, गमावली जाते. तेव्हा आता एका वेगळ्या अनुभवाचे, विकासाचे क्षेत्र त्याला हवे असल्याने तो त्याच्या वैचारिक उंचीचा त्याग करतो; तो आता बुद्धिमान, प्रज्ञावान लेखक राहत नाही तर, तो एक अतिसामान्य माणूस बनतो, पण आता तो सहृदय बनतो; तो खूप दयाळू, खूप उदार असा बनतो…..

हे काही फार दुर्मिळ उदाहरण आहे असे नाही. उदाहरणार्थ, जो चैत्य पुरुष त्याच्या कमाल वाढीपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे, एकदा त्याने सत्ताधीशाचे अनुभव (एखाद्या सम्राटाच्या किंवा राजाच्या जीवनाचे) घेतले आहेत तर, आता बारा महिने चोवीस तास शासकीय दिमाख, तामझाम यामध्ये अडकलेले जीवन त्याला नकोसे वाटेल; अगदी सामान्य जीवन, अगदी सामान्य अशा परिस्थितीमध्ये जन्माला येणे, अगदी पारंपरिक सामान्य, मध्यमवर्गीय परिस्थितीमध्ये जन्माला येणे तो पसंत करेल हे शक्य आहे; त्यामुळे देशाचा प्रमुख म्हणून ज्या सगळ्या शासकीय शिष्टाचारांना तो बांधलेला होता त्यांच्याविना, अगदी अज्ञात राहून देखील त्याला काम करता येणे शक्य होईल.

म्हणून जर तुम्ही एका विशिष्ट दृष्टीने त्याकडे पाहिले तर तुम्ही म्हणाल, “हे असे कसे काय ? त्याचे अध:पतन झाले की काय?” पण हे अध:पतन नसते. हे समस्यांना दुसऱ्या बाजूने भिडणे असते, दुसऱ्या दृष्टिकोनातून सामोरे जाणे असते. कारण चेतनेसाठी (खऱ्याखुऱ्या, दिव्य चेतनेसाठी) यश किंवा अपयश ह्या समानच गोष्टी असतात, झगझगाट किंवा सामान्यपण ह्या गोष्टीदेखील सारख्याच असतात. महत्त्वाचा असतो तो चेतनेचा विकास ! आणि जी परिस्थिती अनुकूल आहे असे माणसाला वाटत असते ती कदाचित चेतनेच्या विकासाच्या दृष्टीने खूप प्रतिकूल देखील असू शकते….

– श्रीमाताजी
(CWM 05 : 267)

प्रश्न : प्रत्येक जन्मामध्ये मन, प्राण आणि शरीर नवीन असल्यामुळे, गत जन्मांमधील अनुभव त्याला कसे उपयोगी पडू शकतील? का आपल्याला त्या सगळ्या अनुभवांमधून पुन्हा एकदा जावे लागते?

श्रीमाताजी : काही अगदी अपवादात्मक व्यक्ती आणि उत्क्रांतीची अतिप्रगत अवस्था वगळता – विकसित होणारा आणि जन्मोजन्मी प्रगत होत राहणारा असा चैत्य पुरुष असतो, मन वा प्राण नाही. तर घडते असे की : ह्या चैत्य पुरुषाचा, कार्यमग्नतेचा आणि विश्रांतीचा एका आड एक असा काळ असतो. जडदेहातील सक्रिय जीवनामध्ये, शारीरिक जीवन जगत असताना येणाऱ्या अनुभवांमुळे एक प्रगतिमय जीवन त्याच्या अनुभवाला येते; ते जीवन देह, प्राण आणि मन यांचे अनुभव घेत असते; नंतर, सहसा, चैत्य पुरुष त्याचे आत्मसातीकरण करण्यासाठी एक प्रकारच्या विश्रांत स्थितीमध्ये जातो – तो कार्यमग्न जीवनामध्ये असताना, जी प्रगती त्याने सिद्ध केलेली असते त्याच्या परिणामांवर तेथे कार्य केले जाते. आणि जेव्हा हे आत्मसातीकरण पूर्ण होते, पृथ्वीवर सक्रिय जीवनात असताना त्याने केलेली ती प्रगती आत जिरवली जाते तेव्हा, आजवर झालेल्या त्या प्रगतीचा परिपाक घेऊन तो नवीन देह धारण करतो आणि प्रगत अशा अवस्थेमध्ये अवतरतो. या किंवा त्या घटकाचा अनुभव पूर्ण करण्याच्या दृष्टीने कोणत्या प्रकारचे जीवन असावे, शरीर कसे असावे, वातावरण कसे असावे ह्या साऱ्याची तो निवड करतो. अतिप्रगत अवस्थेमध्ये चैत्य पुरुष, देह सोडण्यापूर्वीच, त्याच्या पुढील जन्मामध्ये तो कोणत्या प्रकारचे जीवन जगणार आहे हे ठरवू शकतो.

जेव्हा त्याची घडण जवळजवळ पूर्ण होते आणि तो जाणीवसंपन्न झालेला असतो तेव्हा तो नवीन देहाच्या घडणीमध्ये देखील सहभागी होतो आणि सहसा आंतरिक प्रभावाद्वारे, तो अशा प्रकारे त्या देहाचे घटक, द्रव्य निवडतो की, त्यामुळे त्या देहाला जे नवीन अनुभव घ्यावयाचे आहेत त्याच्या गरजा तो सहज स्वीकारू शकेल. पण हे खूपच प्रगत स्थितीमध्ये घडून येते. आणि नंतर, पूर्ण घडण झालेला तो जेव्हा या पृथ्वीतलावर सेवाभावी वृत्तीने परततो, समाजाला मदत करण्याच्या भावनेने येतो आणि ईश्वरी कार्यामध्ये सहभागी होतो तेव्हा, गत जन्मांमधील प्राण व मनाचे काही विशिष्ट घटक हे त्या देहाच्या निर्मितीमध्येही तो उतरवू शकतो. हे जे विशिष्ट घटक आहेत ते गेल्या अनेक जन्मांमधून चैत्य पुरुषाभोवती सुरचित होत गेलेले असतात, सगर्भ झालेले असतात आणि मग ते तसे घटक टिकून राहू शकतात आणि परिणामत: ते एकंदरच प्रगतीमध्ये सहभागी होऊ शकतात. पण हे फारच पुढच्या अवस्थेमध्ये घडून येते. जेव्हा चैत्य पुरुष हा पूर्ण विकसित आणि अत्यंत जाणीवसंपन्न होतो, जेव्हा तो ईश्वरी संकल्पाचे जागृत साधन बनतो तेव्हा, त्याच्याकडून प्राण व मन यांची अशा तऱ्हेने सुरचना केली जाते की, ज्यामुळे प्राण व मन देखील सर्वसाधारण सुमेळामध्ये सहभागी होऊ शकतात आणि टिकून राहू शकतात.

देहाचे जरी विघटन झाले तरी, विकसनाच्या उच्च स्तराकडून मानसिक आणि प्राणिक पुरुषाच्या काही भागांचे अस्तित्व टिकवून ठेवण्याची अनुमती दिली जाते. म्हणजे असे की, माणसाने एखाद्या कृतीचे जे भाग विशेषेकरून विकसित केले असतील ते – मनाचे वा प्राणाचे काही भाग – हे अगदी त्या आकारामध्ये, त्या रूपामध्ये देखील, (in their form) म्हणजे कृतीच्या ज्या आकारामध्ये ते जसे पूर्ण सुरचित झाले होते, तसेच्या तसे टिकवून ठेवले जातात. उदाहरणार्थ, ज्यांनी स्वत:च्या मेंदूचे विशिष्ट प्रकारे विकसन घडविलेले असते, अशा अतिशय बुद्धिमान लोकांमध्ये, त्यांच्या अस्तित्वाच्या मानसिक भागाची रचना ही एक सुविकसित, सुघटित मेंदू या रूपात तशीच टिकून राहू शकते, त्या मेंदूला त्याचे त्याचे असे स्वत:चे जीवन असू शकते आणि भावी जन्मापर्यंत ते अविकृत स्वरूपात म्हणजे जसे आहे तसेच, त्यात कोणताही बदल न होता टिकून राहू शकते की, ज्यामुळे त्याच्या सर्व लाभांनिशी ते त्या नवीन जन्मातही सहभागी होऊ शकते.

कलाकारांमध्ये, उदाहरणार्थ काही विशिष्ट वादकांमध्ये, ज्यांनी आपल्या हातांचा वापर विशिष्ट अशा जागरूकतेने केलेला होता, त्यांचे प्राणिक व मानसिक द्रव्य हे त्यांच्या हातांच्या रूपाने टिकून राहिले आणि ते हात पूर्णपणाने जागरूक राहिले होते. ज्यांच्याविषयी त्यांना विशेष जिव्हाळा आहे अशा जिवंत व्यक्तींच्या देहांचा ते उपयोग करून घेऊ शकतात.

अन्यथा, अगदी सामान्य लोकांमध्ये म्हणजे ज्यांच्यामध्ये चैत्य अस्तित्व हे पुरेसे विकसित आणि सुघटित झालेले नाही, त्यांच्या बाबतीतही जेव्हा ते चैत्य अस्तित्व देह सोडते तेव्हा, विशेषत: मृत्यूवेळी ती व्यक्ती शांतचित्त आणि एकाग्र असेल तर, त्या व्यक्तीचे मानसिक व प्राणिक आकार काही काळ पर्यंत टिकून राहू शकतात; पण जर का व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला, आवेगपूर्ण स्थितीमध्ये, अनेकविध आसक्तींमध्ये गुंतलेले असताना जर मृत्यू झाला तर, अस्तित्वाचे हे विविध भाग विखुरले जातात, त्यांच्या त्यांच्या स्वत:च्या आयुष्यमानानुसार ते कमीअधिक काळ, त्या त्या संबंधित क्षेत्रांमध्ये जिवंत राहतात आणि नंतर नाहीसे होतात.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 268-270)

प्रश्न : जर मन, प्राण आणि शरीर हे पुन्हा जन्म घेणार नसतील आणि फक्त चैत्य पुरुषाचाच पुनर्जन्म होत असेल तर, मग आधी केलेल्या प्राणिक वा मानसिक प्रगतीचे पुढील जन्मासाठी काहीच मोल नाही का?

श्रीमाताजी : ही अंगे चैत्य पुरुषाच्या जेवढी निकट आणली असतील तेवढ्याच प्रगतीच्या प्रमाणात त्यांचा उपयोग होतो; म्हणजे, जेवढ्या प्रमाणात अस्तित्वाची ही सारी अंगे हळूहळू, क्रमाक्रमाने चैत्य पुरुषाच्या प्रभावाखाली आणली असतील तेवढ्या प्रमाणात त्यांचा उपयोग होतो कारण जे चैत्य पुरुषाच्या प्रभावाखाली असते, चैत्य पुरुषाशी जे एकात्म झालेले असते, तेवढे टिकून राहते व केवळ तेवढेच कायम राहते.

पण जर एखाद्या व्यक्तीबाबत चैत्य पुरुष हा त्याच्या चेतनेचे व जीवनाचे केंद्र झाला असेल आणि जर समग्र अस्तित्वाची जडणघडण या केंद्राभोवतीच झाली असेल तर, मग ते समग्र अस्तित्वच चैत्य पुरुषाच्या प्रभावाखाली येते, त्याच्याशी एकात्म पावते, आणि मग ते कायम राहू शकते – जर का ते कायम राहणे आवश्यक असेल तर.

खरोखर, जर चैत्य पुरुषाच्या प्रगतीनुसार आणि आरोहणाच्या त्याच्या क्षमतेनुसार जड देहदेखील समान प्रगती करू शकेल तर, त्याचे विघटन होण्याची गरजच उरणार नाही. पण इथेच तर खरी अडचण आहे.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 358-360)

श्रीमाताजी : पालक, वातावरण आणि परिस्थिती यांमुळे ज्याची घडण होते ते बाह्य अस्तित्व म्हणजे मानसिक, प्राणिक आणि शारीरिक अस्तित्व हे पुनर्जन्मामध्ये नव्याने जन्माला येत नाही; तर चैत्य पुरुष हा एका देहामधून दुसऱ्या देहामध्ये संक्रमित होत जातो. त्यामुळे, तर्कदृष्ट्या विचार केला तर, मानसिक किंवा प्राणिक अस्तित्वाला गत जन्मांचे स्मरण असू शकत नाही किंवा त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे होते किंवा या वा त्या व्यक्तीचे जीवनमान कसे होते, ह्याचे स्मरण असू शकत नाही. फक्त चैत्य पुरुषालाच त्याचे स्मरण असू शकते; आणि त्यामुळे, आपल्यामध्ये गत जन्मांचे नेमके कोणते ठसे उमटले आहेत हे, आपल्या चैत्य पुरुषाविषयी जागृत झाल्यावरच आपल्याला समजू शकते. पण खरेतर, आपण गत जन्मांमध्ये काय होतो यावर आपले लक्ष केंद्रित करण्यापेक्षा, आपल्याला काय बनायचे आहे त्यावर लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे आहे.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 124)

जीवाची उत्क्रांती किंवा जडाच्या पडद्यामधून बाहेर पडून क्रमश: आत्मशोध घेतघेत विकसित होणे, फुलून येणे हा पुनर्जन्माच्या सिद्धान्ताचा खरा आधार आहे……

पण या उत्क्रांतीचे प्रयोजन काय ? ….दिव्य ज्ञान, सामर्थ्य, प्रेम आणि शुद्धता यांच्या दिशेने होणारा सातत्यपूर्ण विकास हे ह्या उत्क्रांतीचे प्रयोजन असून ह्या गोष्टी हेच खरे तर गुण आहेत आणि हे गुण हेच त्याचे खरे बक्षीस होय.

आत्म्याच्या सर्वसमावेशक आलिंगनातील परमानंद आणि विश्वाविषयीचा जिव्हाळा यांपर्यंत जाऊन पोहोचू शकेल अशी सातत्याने वृद्धिंगत होत जाणारी क्षमता आणि प्रेमानंद हेच प्रेमाच्या कार्याचे खरेखुरे बक्षीस असते. योग्य ज्ञानाच्या कार्याचे खरेखुरे बक्षीस म्हणजे अनंत अशा प्रकाशामध्ये हळूहळू, क्रमाक्रमाने विकसित होत राहणे; योग्य शक्तीच्या कार्याचे खरेखुरे बक्षीस म्हणजे दिव्य शक्तीमध्ये स्वत: अधिकाधिकपणे तळ ठोकणे आणि शुद्धतेच्या कार्याचे खरेखुरे बक्षीस म्हणजे अहंकारापासून अधिकाधिक मोकळे होत होत, जेथे सर्व गोष्टी रूपांतरित होत, दिव्य समतेशी सममेळ पावतात त्या निष्कलंक व्यापकतेप्रत जाऊन पोहोचणे हे होय. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही बक्षिसाची अपेक्षा बाळगणे म्हणजे स्वत:ला एक प्रकारच्या मूर्खतेशी आणि पोरकट अज्ञानाशी जखडून ठेवणे होय; वर उल्लेख केलेल्या गोष्टींव्यतिरिक्त इतर गोष्टींना बक्षीस समजणे हे अपरिपक्वतेचे आणि अपूर्णतेचे लक्षण आहे.

आणि मग दु:खभोग आणि आनंद, दुर्दैव आणि समृद्धी ह्यांचे काय ? ह्याचे उत्तर असे की : हे सर्व जीवाच्या प्रशिक्षणातील अनुभव असून ते त्याला त्याच्या घडणीमध्ये साहाय्य करतात, त्या गोष्टी टेकूसारख्या असतात, ती साधने असतात, त्या परीक्षा असतात, त्या अग्निपरीक्षा असतात आणि समृद्धी ही तर दुःखभोगापेक्षाही अधिक दुष्कर अशी अग्निपरीक्षा असते. खरेतर, आपत्ती, दुःखभोग याकडे पापाची शिक्षा म्हणून पाहण्यापेक्षा, त्यांच्याकडे गुणांचे पारितोषिक म्हणून पाहिले गेले पाहिजे. कारण उमलून येण्याची धडपड करू पाहणाऱ्या जीवाच्या दृष्टीने या गोष्टी त्याचे शुद्धीकरण घडविणाऱ्या आणि अत्यंत साहाय्यक ठरतात. दुःखभोग म्हणजे जणू न्यायाधीशाने दिलेले कठोर पारितोषिक किंवा दुःखभोग म्हणजे वैतागलेल्या सत्ताधीशाचा संताप आहे असे समजणे किंवा दुःखभोग म्हणजे वाईट कृत्याचा परिणाम म्हणून वाईट फळ मिळणे असे समजणे म्हणजे या विश्व-उत्क्रांतीच्या कायद्याविषयी आणि ईश्वराच्या जीवाबरोबरच्या संभाव्य व्यवहाराविषयी अगदीच वरवरचा दृष्टिकोन बाळगणे होय.

आणि मग ही भौतिक समृद्धी, वैभव, मुलेबाळे, कला, सौंदर्य, सत्ता ह्यांचा उपभोग ह्यांचे काय? तर, आपल्या आत्म्याला हानी न पोहोचता, जर त्या गोष्टी प्राप्त करून घेतल्या आणि आपल्या भौतिक अस्तित्वावर दिव्य आनंद व कृपा यांचा वर्षाव या भूमिकेतून त्यांचा आनंद घेतला तर त्या चांगल्या आहेत. त्या आपण प्रथमत: इतरांसाठी, खरंतर सर्वांसाठी मिळविण्याचा प्रयत्न करूयात; आपल्यासाठी त्या वैश्विक परिस्थितीचा केवळ एक अंशभाग असतील किंवा पूर्णत्व अधिक जवळ आणण्याचे ते केवळ एक साधन असेल.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 267-268)

(पुनर्जन्म म्हणजे बक्षीस किंवा शिक्षा असते अशी समजूत असणारी माणसं कसा विचार करतात याविषयी श्रीअरविंद येथे सांगत आहेत.)

एखादा माणूस भला दिसतो आहे पण त्या माणसाकडे श्रीमंती, पैसे, भाग्य नसेल तर सर्वसामान्य माणसं असा समज करून घेतात की, तो गत जन्मामध्ये नीच असला पाहिजे; तो त्याच्या गुन्ह्यांची सजा ह्या जन्मामध्ये भोगत असला पाहिजे. पण केवळ अचानकपणे मातेच्या उदरात असताना त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे आणि तो भला म्हणून या जन्मात जन्माला आला आहे. आणि त्याचवेळी दुसरीकडे, जर एखाद्या दुष्ट माणसाची भरभराट होत आहे आणि जग त्याच्या पायाशी लोळण घेत आहे असे दिसले, तर (वरीलप्रमाणे विचार करणाऱ्या लोकांच्या लेखी,) तो त्याच्या गतजन्मातील चांगुलपणाचा परिणाम असतो. वास्तविक, एकेकाळी तो संतसत्पुरुष असणार पण त्याने सद्गुणांच्या मोठेपणाच्या क्षणिकतेचा अनुभव घेतला असेल आणि म्हणून तर त्याने ह्या जन्मी हा पापाचा पंथ स्वीकारला नसेल ना? (असा ते विचार करतात.) त्यांच्याकडे सगळ्या गोष्टींचे स्पष्टीकरण असते, त्यांना सगळ्या गोष्टींचे समर्थन करता येते. आपण मागच्या जन्मात केलेल्या पापांमुळे दुःख भोगतो, ह्या जन्मातील गुणांचे आपल्याला पुढील जन्मी बक्षीस मिळणार आहे आणि हे असे अनंत काळपर्यंत चालत राहणार आहे; असे त्यांचे मत असते.

तत्त्वज्ञानी लोकांना मात्र ह्यात काही राम आढळत नाही आणि ते पाप आणि पुण्य या दोन्हींपासून स्वत:ची सुटका करून घ्यायला सांगतात आणि इतकेच नव्हे तर अद्भुतरित्या चालविल्या जाणाऱ्या या विश्वापासून सुटका करून घेणे, ह्यातच आपले भले आहे असे ते सांगतात, पण ह्यात काही नवल नाही.

हे उघड आहे की, ही विचारसरणी ही जुन्याच लौकिक-पारलौकिक लालूच आणि धमकी यांचे एक वेगळे रूप आहे; चांगल्या वागणुकीसाठी स्वर्गीय सुखांच्या लयलूटीची लालूच आणि दुष्प्रवृत्त माणसासाठी नरकातील शाश्वत आगीची वा पाशवी नरकयातनांची धमकी !

या जगताचे नियमन कोणा एका बक्षीस वा शिक्षा देणाऱ्या योजकाकरवी होत असते, ही यामागील कल्पना आहे. परमेश्वर हा जणू काही न्यायाधीश आहे, पिता आहे, किंवा परमेश्वर म्हणजे जणूकाही, वर्गातील गुणी मुलांना नेहमी लॉलिपॉप देणारा व खोडकर, वात्रट मुलांना दमात घेणारा कोणी शाळाशिक्षक आहे, ह्या कल्पनेशी सादृश्य राखणारी वरील कल्पना आहे.

सामाजिक गुन्हा केला की, त्याला अवमानित करणारी शिक्षा द्यावयाची, कधीकधी तर अगदी अमानुष अशी शिक्षा द्यावयाची, या रानटी आणि अविचारी विचारप्रणालीशी साधर्म्य राखणारी ही कल्पना आहे.

देवाच्या प्रतिमेनुसार स्वत:ला घडविण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा, आपल्या स्वत:च्या प्रतिमेमध्ये देवाला बसविण्यावर माणसाचा नेहमी भर असतो; परंतु या सर्व कल्पना म्हणजे आपल्यातील बालबुद्धीचे, आपल्यामध्ये असणाऱ्या रानटीपणाचे वा पशुचे प्रतिबिंब असते. आपण अजून त्यापलीकडे गेलो नाही किंवा आपल्यामध्ये रूपांतर घडवून आणू शकलो नाही, ह्याचेच ह्या कल्पना निदर्शक असतात….

ज्याअर्थी ह्या कल्पना इतक्या ठाशीवपणे आढळतात त्याअर्थी त्यांचा मानवाला घडविण्यामध्ये काही एक उपयोग असणार हे निश्चित. कदाचित असेदेखील असू शकेल की, अप्रगत जीवदशेतील लोकांबरोबर परमेश्वर त्यांच्या त्यांच्या बालीशतेला धरून व्यवहार करीत असेल; आणि मृत्युनंतरच्या जीवनाविषयीच्या वा पुनर्जन्माविषयीच्या, स्वर्गनरकाच्या त्यांच्या ज्या काही रोमांचकारी कल्पना असतात त्या कल्पना त्यांना बाळगू देण्यास तो संमती देत असेल. कदाचित मृत्युनंतरच्या जीवनाविषयीच्या आणि पुनर्जन्माविषयीच्या या बक्षीस व शिक्षेच्या कल्पना आवश्यक असतील, कारण त्या आपल्या अर्ध-मानसिक पशुतेशी मिळत्याजुळत्या होत्या. पण खरंतर, एका विशिष्ट दशेनंतर ही प्रणाली तितकीशी परिणामकारक ठरत नाही. माणसं स्वर्ग व नरक या कल्पनांवर विश्वास ठेवतात पण ….मृत्युशय्येवर पश्चात्ताप होईपर्यंत किंवा गंगातीरी जाऊन स्नान करेपर्यंत किंवा बनारसमध्ये पवित्र मरण येईपर्यंत खुशाल पापं करीत राहतात; (बालीशपणापासून सुटका करून घेण्याची ही सारी बालीश साधनं आहेत.)

पण सरतेशेवटी, मन परिपक्व बनते तेव्हा मग ह्या बालीश, शाळकरी उपायांना ते तिरस्काराने दूर करते. कारण ज्याच्यामध्ये दैवी क्षमता सामावलेली असते अशा मानवाने, केवळ बक्षीस मिळते म्हणून गुणवान होणे किंवा भयामुळे पापापासून दूर राहणे हे मानवण्यासारखे नाही…. कृपणा: फलहेतव: असे गीतेमध्ये यथार्थपणे म्हटले आहे. ह्या एवढ्या विशालकाय, प्रचंड अशा जगाची व्यवस्था ह्या असल्या क्षुद्र, क्षुल्लक प्रेरणांवर बसवली असेल, हे न पटण्यासारखे आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 265-268)