Tag Archive for: तत्त्वज्ञान

विरोधी शक्ती माणसाच्या प्रामाणिकपणाची परीक्षा घेत असतात, आणि केवळ म्हणूनच या जगात त्यांना सहन केले जाते. ज्या दिवशी मनुष्य संपूर्णतः प्रामाणिक बनेल, त्या दिवशी त्या निघून जातील, कारण तेव्हा त्यांना येथे अस्तित्वात राहण्यासाठी कोणतेच कारण शिल्लक उरणार नाही.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 21)

एकत्व – ०३

संकल्प दृढ ठेवा. तुमच्यातील अडेलतट्टू घटकांना, आज्ञापालन न करणाऱ्या मुलांना ज्याप्रमाणे वागवतात त्याप्रमाणे, वागणूक द्या. त्यांच्यावर सातत्यपूर्वक, सहनशीलतेने कार्य करा. त्यांना त्यांच्या चुका समजावून सांगा.

तुमच्या जाणिवांच्या आत खोलवर चैत्य पुरुष असतो. हा चैत्य पुरुष म्हणजे तुमच्या अंतरंगामध्ये असणाऱ्या ईश्वराचे मंदिर असते. हे असे केंद्र असते की, ज्याच्या भोवती तुमच्यातील विभिन्न असणाऱ्या सर्व घटकांचे, तुमच्या अस्तित्वामधील सगळ्या परस्परविरोधी हालचालींचे एकीकरण झाले पाहिजे. एकदा का तुम्हाला त्या चैत्य पुरुषाची चेतना व त्याची अभीप्सा आत्मसात झाली की, सगळ्या शंका, अडचणी नाहीशा होऊ शकतात. त्याला कमी-अधिक वेळ लागेल, परंतु अंतत: तुम्ही यशस्वी होणार हे निश्चित ! एकदा जरी तुम्ही ईश्वरोन्मुख झाला असाल आणि म्हणाला असाल की, “मला तुझे होऊन रहावयाचे आहे. आणि त्याने ‘हो” असे म्हटले असेल, तर जगातील कोणतीच शक्ती तुम्हाला त्यापासून रोखू शकत नाही. जेव्हा जीवात्मा स्वत:चे समर्पण करतो, तेव्हा मुख्य अडचणच नाहीशी होते. बाह्य अस्तित्व हे केवळ एखाद्या कवचाप्रमाणे असते. सामान्य व्यक्तींमध्ये हे कवच इतके कठीण आणि जाड असते की, त्यामुळे ते त्यांच्या अंतरंगामध्ये असणाऱ्या ईश्वराबाबत यत्किंचितही जागरुक नसतात. एकदा, अगदी एका क्षणासाठी जरी, अंतरात्मा म्हणला असेल, ”मी इथे आहे आणि मी तुझाच आहे;” तर एक प्रकारचा सेतू निर्माण होतो आणि मग ते कवच हळूहळू पातळ पातळ होत जाते. जोपर्यंत आंतरिक अस्तित्व आणि बाह्य अस्तित्व हे दोन्ही भाग पूर्णपणे जोडले जाऊन, एकच होऊन जात नाहीत तोवर ही प्रक्रिया चालू राहते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 07)

एकत्व – ०२

 

आपण जर एखाद्या धार्मिक संघटनेचे उदाहरण घेतले – तर त्या संघाचे प्रतीक म्हणजे मठासारख्या वास्तुरचना, एकसमान पोषाख, एकसमान उपक्रम, एकसमान हालचालीसुद्धा असतात. मी अधिक स्पष्ट करून सांगते. प्रत्येकजण एकसारखाच गणवेश परिधान करेल, प्रत्येक जण सकाळी ठरावीक वेळीच उठेल, एकसारख्याच प्रकारचे अन्नग्रहण करेल, एकत्रितपणे येऊन समानच प्रार्थना करतील इ. ह्याला एक सर्वसाधारण अशी एकसमानता म्हणता येईल. आणि साहजिकपणेच, आंतरिकदृष्ट्या तेथे जाणिवांचा गोंधळ आढळून येतो, कारण प्रत्येक जण त्याच्या त्याच्या पद्धतीने वागत असतो. ही अशी एकरूपता जी विश्वास आणि विशिष्ट मतप्रणालीवर आधारित असते ती, सर्वस्वी ‘आभासी एकरूपता’ असते.

माणसांमध्ये ही अशी सामूहिकता नेहमी पाहावयास मिळते. समूहाने एकत्र यायचे, संबंधित राहायचे, एखाद्या समान आदर्शाभोवती, समान कृतीभोवती, समान साक्षात्काराभोवती एकसंघ राहावयाचे पण हे सारे काहीशा कृत्रिम पद्धतीने चालते. याउलट, श्रीअरविंद येथे खराखुरा समुदाय काय असतो ते सांगत आहेत – त्याला त्यांनी ‘विज्ञान वा अतिमानसिक समुदाय’ असे म्हटले आहे – असा हा समुदाय त्यातील प्रत्येक घटकाच्या आंतरिक साक्षात्काराच्या पायावरच उभा राहू शकतो. त्यातील प्रत्येक घटक हा त्या समुदायातील इतर घटकांबरोबरच्या खऱ्याखुऱ्या, मूर्त अशा एकात्मतेसाठी, एकरूपतेसाठी झटत असतो. म्हणजे असे की, समुदायातील इतर सर्व घटकांशी या ना त्या प्रकारे एखादा घटक जोडला गेलेला आहे, असे नव्हे; तर, त्यातील प्रत्येक घटक हा इतरांशी आंतरिकरित्या, सगळेजण म्हणजे जणू एकच आहेत ह्या पद्धतीने जोडलेला असतो. प्रत्येक व्यक्तीसाठी इतर घटक हे जणूकाही त्याच्या स्वतःच्या शरीराप्रमाणेच असतील, केवळ मानसिकरित्या, कृत्रिमपणाने नाही तर, एका आंतरिक साक्षात्काराद्वारा, चेतनेच्या वास्तविकतेच्या द्वारे देखील ते तसेच असतील.

म्हणजे, ही अतिमानसिक सामुदायिकता प्रत्यक्षात उतरविण्याची आशा बाळगण्यापूर्वी, आधी प्रत्येक व्यक्तीने विज्ञानमय अस्तित्व बनावयास हवे किंवा किमान ते बनण्याकडे वाटचाल तरी केली पाहिजे. हे तर उघडच आहे की, व्यक्तिगत कार्य हे आधी पुढे गेले पाहिजे आणि सामुदायिक कार्याने त्याचे अनुसरण केले पाहिजे. परंतु प्रत्यक्षात असे होते की, कोणत्याही अमुक एखाद्या इच्छेच्या हस्तक्षेपाविनाही, सहजगत्या, व्यक्तिगत प्रगती ही समुहाच्या अवस्थेमुळे नियंत्रित केली जाते, रोखली जाते. व्यक्ती आणि समाज ह्यांच्यामध्ये परस्परावलंबित्व असते आणि व्यक्तीने कितीही प्रयत्न केला तरीही, व्यक्ती त्यापासून स्वतःला मुक्त करू शकत नाही. आणि अगदी एखाद्या व्यक्तीने, ह्या पूर्णयोगात जरी स्वतःला पार्थिव आणि मानवी जाणिवेच्या स्थितीच्या अतीत होऊन, मुक्त होण्याचा प्रयत्न केला तरीही, किमान अवचेतनेमध्ये तरी, ती व्यक्ती समूहाच्या स्थितीमुळे बांधली जाते, समूहाची स्थिती एखाद्या रोधकाप्रमाणे काम करते आणि खरंतर ती मागे खेचते. व्यक्तीने कितीही वेगाने जाण्याचा प्रयत्न केला तरी, सर्व आसक्ती आणि जबाबदाऱ्यांचे ओझे टाकून देण्याचा प्रयत्न केला तरी, अगदी काहीही असले तरीसुद्धा, अगदी एखादी व्यक्ती शिखरस्थानी असली तरीसुद्धा आणि उत्क्रांतीच्या वाटचालीमध्ये ती सर्वात पुढे असली तरीसुद्धा, सर्वांच्या साक्षात्कारावर, या पृथ्वीनिवासी समुदायाच्या स्थितीवर त्याचा साक्षात्कार अवलंबून असतो. आणि यामुळे खरोखरच व्यक्ती मागे खेचली जाते. इतकी मागे खेचली जाते की, जे घडवून आणायचे आहे ते प्रत्यक्षात येण्यासाठी, या पृथ्वीची तयारी होण्यासाठी, कधीकधी व्यक्तीला शतकानुशतके देखील थांबावे लागते.

म्हणूनच श्रीअरविंद असे म्हणतात, दुहेरी प्रक्रिया आवश्यक आहे. व्यक्तीच्या प्रगतीचे आणि साक्षात्काराचे प्रयत्न हे समग्र समुहाच्या उत्थानाच्या प्रयत्नांच्या हातात हात घालून चालले पाहिजेत, कारण व्यक्तीच्या महत्तर प्रगतीसाठी ते आवश्यक आहे. त्याला सामुहिक प्रगती असे म्हणता येईल, ह्या प्रगतीमुळे व्यक्तीला अजून एक पाऊल पुढे टाकणे शक्य होईल.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 141-42)

एकत्व ०१

आत्ताच्या घडीला करायलाच हवे असे सर्वांत उपयुक्त कार्य कोणते? ‘क्रमवार विकसित होणाऱ्या वैश्विक सुसंवादित्वाचे आगमन’ ही गोष्ट साध्य करणे, हे सर्वसाधारण ध्येय असले पाहिजे.

पृथ्वीच्या संदर्भात, हे साध्य प्राप्त करून घेण्याचे साधन म्हणजे जे ‘एकम्’ आहे अशा आंतरिक दिव्यत्वाचे, सर्वांकडून आविष्करण आणि त्या ‘एकम्’ विषयीच्या जागृतीद्वारे, मानवी एकतेचे प्रत्यक्षीकरण हे होय.

आपल्या अंतरंगामध्ये असलेल्या ईश्वराचे साम्राज्य स्थापन करून, त्याद्वारे ऐक्य निर्माण करणे, हा ह्याचा अर्थ आहे.

त्यासाठी अतिशय उपयुक्त असणारे पुढील कार्य करावयास हवे –

१) व्यक्तिगत कार्य : व्यक्तीने आपल्या अंतरंगात असणाऱ्या ईश्वरी अस्तित्वाविषयी जागृत होणे आणि त्याच्याशी ऐक्य संपादन करणे.

२) मानवामधील आत्तापर्यंत जागृत नसलेल्या अस्तित्वातील अवस्थांचे व्यक्तिकरण (individualise) करणे आणि त्याद्वारे पृथ्वीपासून आजवर कुलूपबंद असलेल्या, एक किंवा अधिक वैश्विक शक्तींच्या उगमांशी, पृथ्वीचा संबंध जुळवून आणणे.

३) सद्यकालीन मानसिकतेशी मिळत्याजुळत्या अशा एका नवीनच रूपामध्ये शाश्वत वचन जगासमोर पुन्हा मांडणे. आजवरच्या सर्व मानवी ज्ञानाचा तो समन्वय असेल.

४) सामूहिक कार्य : एका शुभंकर अशा स्थानी, नव्याने फुलून येणाऱ्या नूतन वंशाची, ईश्वरपुत्रांच्या वंशाची एक आदर्श समाजव्यवस्था प्रस्थापित करणे.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 49)

श्रीमाताजी : तुम्ही तुमचे सर्व नातेसंबंध हे तुमच्या आंतरिक निवडीच्या स्वातंत्र्यानुसार नव्याने निर्माण केले पाहिजेत. तुम्ही ज्या परंपरेमध्ये जन्माला आला आहात किंवा मोठे झाला आहात ती परिस्थिती तुमच्यावर वातवारणाच्या दबावाने किंवा सामान्य मनाद्वारे वा इतरांच्या निवडीद्वारे लादण्यात आलेली आहे. तुमच्या मौनसंमतीमध्ये देखील सक्तीचा एक भाग असतो. धर्म हा देखील माणसांवर लादण्यात येतो, त्याला धार्मिक भीतीच्या सूचनेचा, वा कोणत्यातरी आध्यात्मिक किंवा इतर संकटाच्या धमकीचा आधार असतो.

ईश्वराशी तुमचे जे नाते असते त्याबाबतीत मात्र अशा प्रकारची कोणतीही बळजबरी चालत नाही. ते नाते स्वेच्छेचे असावे, ती तुमच्या मनाची आणि हृदयाची निवड असली पाहिजे. आणि ती निवड उत्साहाने आणि आनंदाने केलेली असली पाहिजे. ते कसले आले आहे ऐक्य की, ज्यामध्ये व्यक्ती भयकंपित होते आणि म्हणते, ”माझ्यावर सक्ती करण्यात आली आहे, मी काहीच करू शकत नाही !” सत्य हे स्वत:सिद्ध असते आणि ते जगावर लादता कामा नये. लोकांनी आपला स्वीकार करावा, अशी कोणतीही गरज सत्याला भासत नाही. ते स्वयंभू असल्यामुळे लोक त्याविषयी काय बोलतात किंवा लोकांची त्यावर निष्ठा आहे की नाही, यावर त्याचे अस्तित्व अवलंबून असत नाही.

पण ज्याला धर्माची स्थापना करावयाची असते त्याला मात्र अनेक अनुयायी असावे लागतात. एखाद्या धर्मामध्ये जरी खरीखुरी महानता नसली तरी, कितीजण त्या धर्माचे अनुयायी आहेत त्या संख्येवर लोक त्या धर्माची ताकद आणि महानता ठरवितात. मात्र आध्यात्मिक सत्याची महानता ही संख्येवर अवलंबून नसते.

मला एका नवीन धर्माचा प्रमुख माहीत आहे, जो त्या धर्माच्या संस्थापकाचा मुलगा आहे. तो एकदा म्हणाला की, “अमुक धर्माची जडणघडण होण्यासाठी इतकी शतकं लागली आणि तमुक धर्माला अमुक इतकी शतकं लागली, पण आमच्या धर्मात मात्र गेल्या पन्नास वर्षातच चाळीस लाखांपेक्षा अधिक अनुयायी आहेत, तेव्हा बघा आमचा धर्म केवढा श्रेष्ठ आहे !”

एखाद्या धर्माच्या महानतेचे मोजमाप हे त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांच्या संख्येवर अवलंबून असू शकते, पण जरी अगदी एकही अनुयायी लाभला नाही तरीही सत्य मात्र सत्यच असते. जेथे मोठमोठा गाजावाजा चाललेला असतो तेथे माणसं खेचली जातात; पण जिथे सत्य शांतपणे आविष्कृत होत असते, तेथे कोणीही फिरकत नाहीत. जे स्वत:च्या मोठेपणाचा दावा करतात, त्यांना जोरजोरात सांगावे लागते, जाहिरात करावी लागते, अन्यथा त्यांच्याकडे लोक मोठ्या संख्येने आकर्षित होणार नाहीत. पण लोक त्याविषयी काय म्हणतात याची पर्वा न करता काम केले असेल, तर ते फारसे विख्यात नसते आणि साहजिकच, लोक त्याकडे मोठ्या संख्येने वळत नाहीत. पण सत्याला मात्र जाहिरातबाजीची गरज नसते, ते स्वत:ला दडवून ठेवत नाही पण स्वत:ची प्रसिद्धीदेखील करत नाही. परिणामांची चिंता न करता, आविष्कृत होण्यातच त्याची धन्यता सामावलेली असते, ते प्रशंसा मिळावी म्हणून धडपडत नाही किंवा अप्रशंसा टाळत नाही, जगाने त्याचा स्वीकार केला काय किंवा त्याच्या कडे पाठ फिरवली काय, सत्याला त्याने काहीच फरक पडत नाही.

– श्रीमाताजी

(CWM 03 : 82-84)

अध्यात्माचा, अतिमानसाचा, सामान्य मानवी चेतनेच्या अतीत असणाऱ्या आणि त्या उच्च क्षेत्रामधून जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या गोष्टीचा वेध घेणे म्हणजे ‘धर्म’ अशी धर्माची व्याख्या श्रीअरविंदांनी केली आहे. अशा रीतीने, धर्म तर्कबुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या गोष्टींचा वेध घेत असल्याने धर्म हा तर्कातीत असतो. त्यामुळे धर्माच्या क्षेत्रामध्ये तर्कबुद्धीचा कसा काय पाडाव लागणार ? त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा की, एखाद्याने धर्माच्या क्षेत्राचे मूल्यमापन करण्यासाठी आणि त्यात प्रगती करण्यासाठी तर्कबुद्धीचा वापर करावयाचे ठरविले तर निश्चितपणे त्याच्या चुका होणार. कारण तर्कबुद्धी ही तेथील स्वामी नाही, आणि ती त्यावर प्रकाशदेखील टाकू शकणार नाही. जर तुम्ही कोणताही धर्म तुमच्या बुद्धिमत्तेच्या साहाय्याने मापू पाहत असाल तर तुमच्या चुका निश्चितपणे होणार. कारण धर्म हा तर्कक्षेत्राच्या पलीकडचा आणि बाहेरचा आहे. सामान्य जीवनामध्ये बुद्धीचे क्षेत्र ज्या परिघापर्यंत आहे तेथवर तर्कबुद्धी मूल्यमापन करू शकते. आणि श्रीअरविंदांनी म्हटल्याप्रमाणे, सामान्य मानवी जीवनात प्राणिक आणि मानसिक कृतींवर नियंत्रण ठेवणे, त्यांचे नियमन करणे हेच तर्कबुद्धीचे खरेखुरे कार्य असते.

उदाहरणार्थ, जर कोणा व्यक्तीमध्ये प्राणिक असमतोल असेल, विकार असतील, आवेग, वासना आणि तत्सम इतर गोष्टी असतील आणि अशा वेळी जर त्या व्यक्तीने तर्कबुद्धीचा आश्रय घेतला आणि त्या तर्कबुद्धीचा वापर करून त्या दृष्टीने या गोष्टींकडे पाहावयाचा प्रयत्न केला तर, ती व्यक्ती या सर्व गोष्टी परत सुव्यव्यस्थित करू शकते. प्राण आणि मन यांच्या सर्व हालचाली संघटित करणे आणि नियमित करणे हे खरोखर तर्कबुद्धीचे खरे कार्य आहे. उदाहरण द्यायचे झाले तर, दोन संकल्पना एकमेकींशी मिळत्याजुळत्या आहेत, का त्या एकमेकींच्या विरोधी आहेत, आपल्या मानसिक संरचनेमध्ये दोन सिद्धान्त एकमेकांना पूरक आहेत, का ते सिद्धान्त एकमेकांना मारक आहेत, हे पाहण्यासाठी तुम्ही तर्कबुद्धीचा आश्रय घेऊ शकता. सर्व गोष्टी पारखणे आणि त्यांची सुव्यवस्था लावणे, आणि त्यापेक्षा देखील अमुक एखादा आवेग हा उचित म्हणजे तर्कसंगत आहे की अनुचित आहे, त्यातून काही अरिष्ट तर उद्भवणार नाही ना, हे पाहणे किंवा ज्यामुळे आयुष्यामध्ये फारसे काही बिघडणार नाही, तो आवेग चालवून देण्याजोगा आहे का, हे पाहण्याचे काम तर्कबुद्धीचे आहे. हे तर्कबुद्धीचे खरे कार्यक्षेत्र आहे, हा श्रीअरविंदांच्या म्हणण्याचा अर्थ आहे.

– श्रीमाताजी
(CWM 07 : 166-167)

प्रश्न : धर्माचे स्वरूप नेमके काय आहे? आध्यात्मिक जीवनमार्गातील तो अडथळा आहे का?

श्रीमाताजी : मानवतेच्या उच्चतर मनाशी धर्माचा संबंध असतो. मानवाचे उच्च मन, त्याच्या पलीकडे जे आहे त्याच्या पर्यंत पोहोचण्याचा स्वत:च्या क्षमतेनुसार प्रयत्न करत असते. मानव ज्याला ईश्वर वा चैतन्य वा सत्य वा श्रद्धा वा ज्ञान वा अनंत, केवल अशा नावांनी संबोधतो, ज्याच्या पर्यंत मानवी मन पोहोचू शकत नाही, पण तरीही तेथे पोहोचण्याचा ते प्रयत्न करत राहते, त्या प्रयत्नाला ‘धर्म’ ही संज्ञा आहे.

धर्म हा त्याच्या मूळ उगमापाशी दिव्य, ईश्वरी असू शकतो पण त्याचे व्यवहारातील स्वरूप हे ईश्वरी नसून मानवी असते. वस्तुत: आपण एक धर्म असे न म्हणता अनेक धर्मांविषयी बोलले पाहिजे कारण माणसांनी अनेक धर्मांची स्थापना केली आहे…..

सर्व धर्मांची गोष्ट एकसारखीच आहे. एखाद्या महान गुरुचे या भूतलावर येणे हे धर्माच्या उदयाचे निमित्त असते. तो येतो, तो त्या दिव्य सत्याचा अवतार असतो आणि तो ती दिव्य सद्वस्तु उघड करून दाखवितो; पण माणसं त्याचाच ताबा घेतात, त्याचा व्यापार मांडतात, एखादी राजकीय संघटना असावी तशी त्याची अवस्था करून टाकतात. मग अशा धर्माला शासन, धोरणे, नियम, पंथ, सिद्धान्त, कर्मकांड, सणसमारंभ, उत्सव यांनी सजवले जाते आणि या साऱ्या गोष्टी त्या त्या धर्मीयांसाठी जणूकाही निरपवाद व अनुल्लंघनीय अशा बनून जातात. तेव्हा मग धर्म देखील एखाद्या राज्यव्यवस्थेप्रमाणेच, त्याच्या निष्ठावान लोकांना बक्षिस देतो आणि जे बंडखोरी करतात किंवा जे धर्मापासून भरकटतात, जे पाखंडी आहेत, जे त्या धर्माचा त्याग करतात, त्यांना तो शिक्षा सुनावतो.

प्रस्थापित आणि अधिकृत अशा कोणत्याही धर्माचा पहिला आणि मुख्य सांगावा हाच असतो की, “माझे तत्त्व सर्वोच्च आहे, तेच एकमेव सत्य आहे, आणि इतर सारे मिथ्या वा गौण आहे.” कारण अशा प्रकारच्या ह्या मूलभूत सिद्धान्ताशिवाय, प्रस्थापित संप्रदायवादी धर्म अस्तित्वातच आले नसते. तुम्हाला एकट्यालाच सर्वोच्च सत्य गवसले आहे किंवा तुम्ही एकट्यानेच त्या ‘एका’ला कवळले आहे अशी जर तुमची खात्री नसेल आणि जर तुम्ही तसा दावा केला नाहीत तर तुम्ही लोकांवर प्रभाव टाकू शकत नाही आणि त्यांना तुमच्याभोवती गोळा करू शकत नाही. धार्मिक मनुष्याचा हा असा अगदी स्वाभाविक दृष्टिकोन असतो; पण त्यामुळेच धर्म हा आध्यात्मिक जीवनाच्या मार्गावरील अडथळा म्हणून समोर उभा ठाकतो.

– श्रीमाताजी

(CWM 03 : 76-77)

पूर्णयोग आणि बौद्धमत – ०२

दया आणि करुणा या दोन भिन्न प्रकारच्या भावना आहेत. माणसांच्या वाट्याला जे दुःखभोग आलेले असतात ते दूर करण्यासाठीची तीव्र उर्मी म्हणजे ‘करुणा’. दुसऱ्याचे दुःख पाहून वा इतरांच्या दुःखाबद्दलच्या विचाराने असहाय्य दुर्बलतेची भावना निर्माण होणे म्हणजे ‘दया’.

करुणा हा बलवंतांचा मार्ग आहे, भगवान बुद्धांच्या कुटुंबीयांना, मित्रमंडळींना, आप्तांना विरहदुःख सहन करावे लागले; त्यांचे जणू सर्वस्व गमावले गेले होते पण करुणार्द्र होऊन, या जगातील दुःखांचा निरास करण्यासाठी भगवान बुद्ध घराबाहेर पडले…

पूर्णमानव, सिद्ध किंवा बुद्ध हा विश्वव्यापी होतो, सहानुभूतीने व एकतेने सर्व अस्तित्वाला कवटाळतो, स्वत:मध्ये वसणाऱ्या ‘स्व’चा स्वत:मधल्याप्रमाणेच इतरांमध्येही शोध घेतो. आणि असे करून, तो विश्वशक्तीच्या अनंत सामर्थ्याला कमीअधिक प्रमाणात स्वत:च्या ठिकाणी आणतो, हे भारतीय संस्कृतीचे विधायक ध्येय आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 09 : 153-154) (CWSA 20 : 254)

न संपणाऱ्या युद्धांचा दीर्घ इतिहास असतानासुद्धा मानवजातीने आजवर खोल अंतरंगात एका आनंदमय, शांतीपूर्ण आणि सुसंवादी अशा सामूहिक जीवनाची अभीप्सा जोपासलेली आहे. मानवाच्या धार्मिक आणि धर्मनिरपेक्ष विचारांमध्ये या अभीप्सेने वेगवेगळी रूपे धारण केली आहेत. पण आजवर आपण फक्त तिच्या जवळपास जाईल अशी तात्पुरती एकता संपादन करण्यात यशस्वी झालो आहोत, खरी एकता मिळविण्यात नाही. कदाचित खराखुरा पायाच गवसलेला नाही. ह्या वेळेला मात्र, अतिमानस चेतनेने सुसज्ज होत, मूर्तिमंत स्वयमेव भगवत्शक्तीच्या पुढाकाराने, ह्या प्रयत्नाला पुनश्च सुरुवात झाली असल्याचे आपण पाहत आहोत. अधिक तेजोमय, सुसंवादपूर्ण आणि सुंदर जीवनासाठी असलेली ही अभीप्साच ‘ऑरोविल’च्या मूलस्थानी आहे हे आपल्याला दिसत आहे; हा एक असा ईश्वरी प्रकल्प आहे की, ज्याचा प्रारंभ भगवत्शक्तीने केला आहे, ज्याला मार्गदर्शन व साहाय्य देखील भगवत्शक्तीनेच केले आहे. हा मानवजातीसाठी स्वप्नवत वाटावा असा प्रकल्प आहे यात शंकाच नाही, परंतु हे स्वप्न आहे खुद्द परमेश्वराचे !

*

या भूतलावर असे एक स्थान असावे की, जेथे कोणतेच राष्ट्र मालकी हक्काचा दावा करणार नाही. जिथे प्रामाणिक अभीप्सा बाळगणारी, शुभसंकल्प असणारी सर्व माणसं, या विश्वाचे नागरिक म्हणून मुक्त मनाने जीवन जगू शकतील. ते सारे केवळ ‘एका’चीच, म्हणजेच त्या परम सत्याचीच आज्ञा पाळतील.

शांती, सलोखा, सुमेळ यांनी युक्त असे हे स्थान असेल जेथे, माणसांमधील संघर्षभावनेच्या सर्व प्रेरणा ह्या केवळ आणि केवळ दु:खभोग व चिंता यांच्या मूळ कारणांवर विजय मिळविण्यासाठीच उपयोगात आणल्या जातील; त्या प्रेरणा व्यक्तीची दुर्बलता आणि अज्ञान यांच्यावर मात करण्यासाठी उपयोगात आणल्या जातील, त्याच्या मर्यादा व अक्षमता यांना उल्लंघून जाण्यासाठी उपयोगात आणल्या जातील.

हे असे स्थान असेल की, जेथे इच्छावासनांच्या परिपूर्तीपेक्षा, तसेच सुखसुविधा, मौजमजा यांच्या मागे धावण्यापेक्षा, प्रगतीची तळमळ व आत्म्याची गरज या गोष्टींना अधिक प्राधान्य दिले जाईल.

या ठिकाणी, स्वत:च्या आंतरात्म्याशी फारकत न होता, लहान मुलं समग्रपणे, सर्वांगीण रीतीने मोठी होतील, विकसित होतील; शिक्षण हे केवळ परीक्षेत उत्तीर्ण होणे, पद वा पदवी मिळविणे यांच्यासाठी दिले जाणार नाही; तर विद्यार्थ्यांमध्ये अंगभूत असलेल्या क्षमतांच्या विकसनासाठी, तसेच सुप्त असलेल्या नवीन क्षमतांच्या प्रकटीकरणासाठी शिक्षण दिले जाईल.

या ठिकाणी, पद, नावलौकिक, प्रतिष्ठा यांची जागा सेवा करण्याची, सुव्यवस्था लावण्याची संधी घेईल. एखादी व्यक्ती बौद्धिक, नैतिक, आध्यात्मिक दृष्ट्या श्रेष्ठ असेल तर, त्या व्यक्तीचे श्रेष्ठत्व त्या संरचनेमध्ये जीवनातील वाढती सुखसमृद्धी व सत्ता यांच्याद्वारे अभिव्यक्त होणार नाही; तर त्या व्यक्तीवरील वाढत्या कर्तव्यांच्या आणि जबाबदाऱ्यांच्या रूपात ते श्रेष्ठत्व अभिव्यक्त होईल.

कलेच्या विविध रूपांमधून – चित्रकला, शिल्पकला, संगीत, साहित्य यांद्वारे – व्यक्त होणारे सौंदर्य सर्वांना सारख्याच प्रमाणात सुलभप्राप्य असेल; त्यामधून मिळणाऱ्या आनंदाचा आस्वाद घेण्याची क्षमता ही त्या व्यक्तीच्या सामाजिक वा आर्थिक स्थानावर अवलंबून असणार नाही; तर त्या त्या व्यक्तीच्या क्षमतांवर आधारित असेल. कारण या आदर्श अशा ठिकाणी, पैसा हा सर्वसत्ताधीश या स्वरूपात अस्तित्वात उरणार नाही; भौतिक संपत्ती आणि सामाजिक स्थान यांपेक्षा व्यक्तीच्या गुणवत्तेला कितीतरी अधिक महत्त्व असेल.

या ठिकाणी, कर्म हे व्यक्तीच्या उपजीविकेचे साधन नसेल तर, स्वत:ला अभिव्यक्त करण्याचा तो मार्ग असेल. सर्व समष्टीसाठी सेवारत असताना, कर्म हा स्वत:च्या क्षमता व शक्यतांना विकसित करण्याचा मार्ग असेल, परिणामतः ते व्यक्तीला उपजीविकादेखील पुरवेल आणि कार्यक्षेत्रही पुरवेल.

थोडक्यात म्हणजे, हे असे एक स्थान असेल की जेथे, सर्वसाधारणत: जे मानवी नातेसंबंध स्पर्धासंघर्षांवर आधारित असतात; त्यांची जागा खराखुरा बंधुभाव, सहकार्य, काही चांगले करण्याची, त्याचे अनुसरण करण्याची तळमळ ह्या गोष्टींनी घेतली जाईल.

हा आदर्श प्रत्यक्षात, वास्तवात उतरविण्यासाठी, अजून तरी पृथ्वीची तयारी नक्कीच झालेली नाही, हे स्वप्न समजून घेण्यासाठी आणि आत्मसात करण्यासाठी आवश्यक असणारे पुरेसे ज्ञान अजून पर्यंत मानवजातीकडे नाही, तसेच ह्या आदर्शाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी अगदी अनिवार्य असणारी चेतनाशक्ती देखील मानववंशाकडे आजमितीस नाही, म्हणूनच मी ह्यास ‘स्वप्न’ असे म्हणते.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 93-94)

‘ऑरोविल’ ही नगरी म्हणजे असे विशाल स्वप्न साकारण्याचा प्रयत्न आहे. ह्या नगरीच्या प्रकल्पाचे उद्घाटन दि. २८ फेब्रुवारी १९६८ रोजी झाले.

चैत्य पुरुष जेव्हा देह सोडून जातो तेव्हा, त्याने अगदी मन आणि प्राणाला देखील मार्गावरील त्यांच्या त्यांच्या विश्रांतीस्थानी सोडलेले असते, अशा वेळीदेखील तो स्वत:सोबत त्याच्या अनुभवांचा गाभा बाळगतो. तो भौतिक घटना किंवा प्राणिक हालचाली, मानसिक रचना, क्षमता किंवा स्वभाव यांपैकी काहीच बाळगत नाही तर या सगळ्यांतून अगदी आवश्यक असे जे काही त्याने त्यांच्याकडून जमवलेले असते असे काहीतरी तो बाळगून असतो, त्याला ‘दिव्य घटक’ असे म्हणता येईल. (या दिव्य घटकासाठीच वरील भौतिक घटना वगैरे गोष्टी अस्तित्वात होत्या.) ही कायमस्वरूपी अशी अभिवृद्धी असते की जी, दिव्यत्वाकडे जो विकास चालू आहे त्यामध्ये साहाय्यकारी होते. आणि म्हणूनच बहुतेक वेळी गत जन्मांमधील बाह्य घटना वा परिस्थिती स्मरणात राहत नाहीत. अशी आठवण राहण्यासाठी मन, प्राण आणि अगदी सूक्ष्म शरीर यांच्या अ-भंग सातत्याच्या दिशेने त्यांचे विकसन झालेले असावे लागते; कारण जरी ते एक प्रकारच्या बीजरूपाने स्मरणात राहिले तरी ते सहसा उमलत नाहीत, विकसित होत नाहीत. निष्ठा, उमदेपणा, उच्च कोटीचे धैर्य या रूपाने, योद्ध्याच्या महानतेमध्ये अंतर्भूत असणारा दैवी घटक, सुसंवादी मानसिकता आणि कवीची उदारमनस्कता ह्यांद्वारे अभिव्यक्त होणारा दैवी घटक शिल्लक राहतो आणि व्यक्तित्वाच्या नव्या सुमेळामध्ये एक नवीनच रूप घेऊन व्यक्त होऊ शकतो किंवा त्याचे जीवन जर ईश्वराभिमुख झाले तर साक्षात्कारासाठी म्हणून त्या शक्ती वळविल्या जाऊ शकतात किंवा ईश्वरासाठी जे कार्य करावयाचे आहे त्यामध्ये त्यांचा उपयोग केला जाऊ शकतो.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 544)