Tag Archive for: तत्त्वज्ञान

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – २३

आमचा योग हा रूपांतरणाचा योग आहे; हे रूपांतरण म्हणजे संपूर्ण चेतनेचे रूपांतर आहे; तसेच ते संपूर्ण प्रकृतीचे, तिच्या मस्तकापासून ते पायापर्यंत, तिच्या अगदी गुप्त आंतरिक घटकांपासून, ते तिच्या अगदी दृश्य बहिर्वर्ती हालचालींपर्यंतच्या प्रत्येक भागाचे रूपांतर आहे. हा बदल काही केवळ नैतिक नाही किंवा ते धार्मिक परिवर्तन नव्हे, किंवा संतत्व वा संन्यासमार्गी संयमदेखील नव्हे, उदात्तीकरण नाही किंवा, जीवनाचे व प्राणिक प्रवृत्तींचे दमनही आम्हाला अभिप्रेत नाही; किंवा ते काही गौरवीकरण नाही, अथवा कठोर असे नियंत्रणदेखील नाही; किंवा भौतिक अस्तित्वालाच नकार देणेही, अभिप्रेत नाही. अल्पतेकडून अधिकतेकडे, कनिष्ठाकडून उच्चतेकडे, पृष्ठवर्ती जाणिवेकडून सखोल चेतनेप्रत होणारा बदल आम्हाला अभिप्रेत आहे. सर्वाधिक महान, सर्वोच्च, सखोलतम असे संभाव्यकोटीतील रूपांतर आम्हाला अभिप्रेत आहे. तसेच समग्र अस्तित्वाचे त्याच्या साधनसामग्रीनिशी संपूर्ण परिवर्तन आणि क्रांती अभिप्रेत आहे; प्रत्येक तपशीलाचे अस्तित्वाच्या आजवर प्रत्यक्षीभूत न झालेल्या दिव्य प्रकृतीमध्ये रूपांतर होणे, हे आम्हाला अभिप्रेत आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 371)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – २२

केवळ अतिमानव बनण्याच्या कल्पनेने या योगाकडे वळणे ही प्राणिक अहंकाराची कृती ठरेल आणि त्यामुळे या योगाचे मूळ उद्दिष्टच निष्फळ ठरेल. जी माणसे त्यांच्या सर्व क्रियाकलापांसमोर हे उद्दिष्ट ठेवतात त्यांना अपरिहार्यपणे आध्यात्मिक आणि अन्य दु:खं सहन करावी लागतात. विभक्तकारी अहंकाराचे दिव्य चेतनेमध्ये विलयन करून, त्या द्वारे दिव्य चेतनेमध्ये प्रथम प्रवेश करणे (त्या अनुषंगाने, म्हणजे असे करत असताना, व्यक्तीला स्वतःच्या खऱ्या व्यक्तिगत ‘स्व’चा शोध लागतो; हा ‘स्व’ म्हणजे मर्यादित, निरर्थक आणि स्वार्थी मानवी अहंकार नसतो तर, तो ईश्वराचा अंश असतो.) आणि दुसरे म्हणजे, मन, प्राण आणि शरीर यांचे रूपांतरण करण्यासाठी म्हणून अतिमानसिक चेतना या पृथ्वीवर अवतरित करणे हे या योगाचे ध्येय आहे. बाकी सर्व गोष्टी या दोन ध्येयांचे परिणाम असू शकतात, परंतु त्या या योगाचे मुख्य उद्दिष्ट असू शकत नाहीत.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 21)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – १९

आत्म्याचा साक्षात्कार आणि विश्वपुरुषाचा साक्षात्कार या आपल्या योगातील आवश्यक पायऱ्या आहेत; (विश्वपुरुषाच्या साक्षात्काराविना आत्म्याचा साक्षात्कार अपूर्ण असतो.) इतर योगांची तेथे परिसमाप्ती होते, परंतु हीच जणू आपल्या योगाची सुरुवात असते; म्हणजे हाच तो टप्पा असतो जेथे (पूर्ण)योगाच्या वैशिष्ट्यपूर्ण साक्षात्काराचा आरंभ होऊ शकतो.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 334)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – १६

आपल्या समग्र अस्तित्वाने त्याच्या सर्व घटकांसहित आणि आपल्या अस्तित्वाने सर्वथा, ‘दिव्य सद्वस्तु’च्या समग्र चेतनेमध्ये प्रविष्ट होणे आणि आपल्या जीवात्म्याने व तत्त्वाने आपण वास्तविक जे आहोत, त्या ‘दिव्य सद्वस्तु’चे साधन आणि आविष्करण बनावे म्हणून, आपल्या वर्तमान अज्ञानी आणि मर्यादित प्रकृतीचे दिव्य प्रकृतीमध्ये परिवर्तन घडविणे, हीच आपल्या अस्तित्वाची परिपूर्ण परिपूर्ती आहे आणि हाच ‘पूर्णयोग’ आहे.

विचारी मनाच्या मार्गाने, किंवा हृदयाच्या मार्गाने किंवा कर्मामधील इच्छेच्या मार्गाने किंवा मानसिक प्रकृति-द्रव्याच्या परिवर्तनाद्वारे किंवा देहांतर्गत असलेली प्राण-शक्ती (Vital force) मुक्त करून, त्या दिव्यत्वामध्ये प्रविष्ट होणे पुरेसे नाही; हे एवढेच पुरेसे नाही. या साऱ्या गोष्टी एकत्रितपणे करून ते परिवर्तन घडविले पाहिजे. आणि खुद्द आपल्या इंद्रियांमधील तसेच शारीर-चेतनेमधील, अगदी जडभौतिक अचेतनापर्यंतच्या परिवर्तनाद्वारे, सर्वकाही त्या ‘ईश्वरा’विषयी सजग आणि त्या ईश्वरासमवेत दीप्तिमान झालेच पाहिजे. ईश्वराशी ऐक्य पावणे, ईश्वरामध्ये आणि त्याच्यासोबत जगणे, ईश्वरासमवेत त्याच्या प्रकृतीचेच होणे, हे आपल्या योगाचे उद्दिष्ट असले पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 356-357)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – १४

योगमार्ग अनेक आहेत, आध्यात्मिक साधना अनेक आहेत, मुक्ती आणि पूर्णत्वाप्रत घेऊन जाणारे मार्ग अनेक आहेत, आत्म्याचे ईश्वराभिमुख असणारे मार्ग अनेक आहेत. प्रत्येकाचे स्वतःचे स्वतंत्र ध्येय आहे, त्या ‘एकमेवाद्वितीय सत्या’बाबतचे प्रत्येकाचे वैशिष्ट्यपूर्ण दृष्टिकोन आहेत, प्रत्येकाच्या स्वतंत्र पद्धती आहेत, प्रत्येकास साहाय्यभूत असे त्यांचे तत्त्वज्ञान आणि साधनापद्धती आहे. पूर्णयोग (Integral Yoga) या साऱ्या पद्धतींचे सारग्रहण करतो आणि त्यांच्या ध्येयांच्या, पद्धतींच्या, दृष्टिकोनांच्या एकीकरणाप्रत (तपशीलांच्या नव्हे, तर साराच्या एकीकरणाप्रत) पोहोचण्याचा प्रयत्न करतो; ‘सर्वसमावेशक तत्त्वज्ञान आणि साधना’ म्हणजे पूर्णयोग.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 356)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – १३

मानवाने आध्यात्मिकीकरणासाठी एकदा जरी संमती दिली तरी हे अवघे विश्व बदलून जाईल परंतु मानवाची शारीरिक, प्राणिक आणि मानसिक प्रकृती ही या उच्चतर कायद्याबाबत बंडखोर असते. मानवाला स्वत:च्या अपूर्णतेविषयीच प्रेम असते.

आत्मा हे आपल्या अस्तित्वाचे सत्य आहे; अपूर्ण दशेमध्ये असताना मन, प्राण आणि शरीर हे त्याचे केवळ मुखवटे असतात, पण तेच त्यांच्या पूर्ण दशेमध्ये त्या आत्म्याचे साचे बनले पाहिजेत. केवळ आध्यात्मिक असणे पुरेसे नाही; त्यामधून स्वर्ग-गमनासाठी कित्येक आत्मे तयार होतात पण ही पृथ्वी मात्र जशी आहे तिथे व तशीच राहते. कोणतीही तडजोड हा मुक्तीचा मार्ग असू शकत नाही.

विश्वाला तीन प्रकारच्या क्रांती ज्ञात आहेत. भौतिक क्रांतीचे ठाशीव परिणाम दिसून येतात; नैतिक आणि बौद्धिक क्रांतीची फळे ही अधिक समृद्ध असतात आणि त्या क्रांतीचे क्षेत्रदेखील अनंतपटीने व्यापक असते; परंतु आध्यात्मिक क्रांतीमध्ये महान बीजे दडलेली असतात.

हा तिहेरी बदल या परस्परांचा सुयोग्य संयोग घडवू शकला तर निर्दोष कार्य आकारास येऊ शकते; परंतु मानवजातीचे शरीर आणि मन हे, जोरकस असणारा आध्यात्मिक प्रवाह परिपूर्ण रीतीने धारण करू शकत नाहीत; त्यातील बहुतांश विखरून जातो, बाकी जे शिल्लक असते ते दूषित होऊन जाते. आपल्या या भूमितून पुष्कळशा अध्यात्म-बीजांमधून थोडासातरी परिणाम साध्य व्हावा म्हणून असंख्य बौद्धिक आणि शारीरिक सुधारणांची आवश्यकता आहे.

…आज आपण या विश्वामध्ये जे बदल पाहत आहोत ते त्यांच्या आदर्शाच्या आणि प्रयोजनाच्या बाबतीत बौद्धिक, नैतिक, आणि भौतिक आहेत. आध्यात्मिक क्रांती आपली वेळ येण्याची वाट पाहात थांबली आहे आणि तोपर्यंत तिच्या केवळ लाटाच इथे-तिथे प्रस्फुटित होत आहेत. इतरांना जोवर ह्याचा बोध होत नाही तोपर्यंत त्या क्रांतीचे आकलन होणार नाही आणि तोपर्यंत सद्यस्थितीतील घडामोडींची सर्व स्पष्टीकरणे आणि मानवाच्या भवितव्याविषयीची सर्व भाकिते ह्या गोष्टी फोल आहेत. कारण त्या आध्यात्मिक क्रांतीचे स्वरूप, तिचे सामर्थ्य, तिच्या घडामोडी याद्वारेच आपल्या मानवतेचे पुढील चक्र निर्धारित व्हावयाचे आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 210-211)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ३७

वैयक्तिक आत्म्याने सर्व जगताच्या अतीत जाऊन, विश्वात्मक ईश्वराचा साक्षात्कार करून घेणे एवढ्यापुरताच ‘पूर्णयोग’ मर्यादित नाही; तर ‘सर्व आत्म्यांची एकत्रित बेरीज’, म्हणजे विश्वात्मक साक्षात्कार देखील पूर्णयोग आपल्या कवेत घेतो; आणि त्यामुळे पूर्णयोग व्यक्तिगत मोक्ष किंवा व्यक्तिगत सुटका एवढ्यापुरताच मर्यादित राहू शकत नाही. पूर्णयोगाचा साधक विश्वात्मक मर्यादांच्या अतीत झालेला असूनही, तो सर्वात्मक ईश्वराशी देखील एकात्म असतो; त्यामुळे त्याचे या विश्वातील दिव्य कर्म अजूनही शिल्लक असते.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 270)

पूर्णयोग

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ३५

मर्यादित बहिर्मुख अहंभावाला हद्दपार करून, त्याच्या जागी प्रकृतीचा हृदयस्थ शासनकर्ता म्हणून ईश्वराला सिंहासनावर बसविणे, हे आमच्या योगाचे प्रयोजन आहे. प्रथमतः वासनेचा वारसा रद्द करणे, आणि त्यानंतर, वासनाभोगाला आपल्या जीवनाचे शासन करण्यास संमती न देणे; असा ह्याचा अर्थ आहे. वासनेमधून आध्यात्मिक जीवन पोषण मिळविणार नाही; तर सारभूत जीवनाचा एक नि:स्वार्थी शुद्ध आध्यात्मिक आनंद असतो, त्यामधून आध्यात्मिक जीवन पोषण मिळवेल. वासनेचा शिक्का असलेली आपली जी प्राणिक प्रकृती आहे, केवळ तिलाच नवा जन्म, नवे रूपांतर आवश्यक आहे असे नाही, तर आपल्या मनोमय अस्तित्वाचाही नवा जन्म, नवे रूपांतर होणे आवश्यक आहे. आपला भेदमय, अहंप्रधान, मर्यादित, अज्ञानव्याप्त विचार व तशाच प्रकारची बुद्धी नष्ट झाली पाहिजे. त्यांच्या जागी छायाविरहित दिव्य प्रकाश, सर्वगामी निर्दोष प्रकाश प्रवाहित झाला पाहिजे; या प्रकाशाची वाढ होऊन शेवटी त्याची परिणती, चाचपडणारे अर्धसत्य आणि ठेचाळणारा प्रमाद यापासून मुक्त अशा स्वाभाविक स्वयंभू सत्य-जाणिवेमध्ये झाली पाहिजे. आपली गोंधळलेली आणि खजिल झालेली अहंभावकेंद्रित क्षुद्र हेतूंची इच्छा व कृती थांबली पाहिजे; आणि त्यांची जागा द्रुतगतीच्या समर्थ, सुबोध स्वयंचलित, ईश्वरप्रेरित, ईश्वरी मार्गदर्शन लाभलेल्या शक्तीने घेतली पाहिजे; ईश्वराच्या इच्छेशी आपली इच्छा स्वखुशीने संपूर्णपणे एकरूप झाली पाहिजे आणि मग ही आपली श्रेष्ठ, निर्व्यक्तिक, न अडखळणारी, निश्चयात्मक इच्छा आपल्या सर्व कार्यात पायाभूत होऊन सक्रिय झाली पाहिजे. आपल्या अहंभावप्रधान, पृष्ठवर्ती, असंतुष्ट, दुर्बल भावनांचा खेळ बंद झाला पाहिजे; आणि त्याच्या जागी स्वतःच्या संधीची वाट पाहात असणाऱ्या, गुप्त, खोल, व्यापक आंतरात्मिक हृदयाचा व्यापार सुरू झाला पाहिजे. ईश्वराचे स्थान असलेल्या या आंतरिक हृदयाने प्रेरित झालेल्या आपल्या भावना तेव्हा मग, दिव्य प्रेम व बहुविध आनंद यांच्या शांत, जोरकस दुहेरी व्यापारांमध्ये रुपांतरित होतील. दिव्य मानवता किंवा अतिमानसिक मानवजात कशी असेल त्याची ही व्याख्या आहे. ज्याच्यामध्ये असामान्य कोटीची वा परिशुद्ध अशी मानवी बुद्धी आणि मानवी कृती आहे, अशा तऱ्हेचा अतिमानव नव्हे तर, उपरोक्त स्वरूपाचा, लक्षणाचा अतिमानव, आमच्या योगाच्या द्वारा आम्ही विकसित करावा, अशी हाक आम्हाला आली आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 90-91)

पूर्णयोग

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ३४

 

आमचा योग-समन्वय, मानव हा शरीरधारी आत्मा असण्यापेक्षा, मनोमय आत्मा आहे असे धरून चालतो; म्हणजेच मनाच्या पातळीवर मानव आपल्या साधनेला आरंभ करू शकतो, असे मानतो; आणि उच्चतर आध्यात्मिक शक्तीला आणि अस्तित्वाला स्वतः थेट खुला होत, मानव मनामधील आत्मशक्तीच्या योगे, आपले अस्तित्व अध्यात्मसंपन्न करू शकतो, असे मानतो; त्या उच्चतर शक्तीने परिव्याप्त (Possessed) झालेला तो, स्वतःला परिपूर्ण बनवू शकतो आणि आपल्या समग्र प्रकृतीमध्ये या गोष्टी तो कृतीत उतरवू शकतो, अशी क्षमता मानवाकडे असते, असे आमचा समन्वय-योग मानतो. याप्रमाणे आमची दृष्टी असल्याने, आमचा प्रारंभिक जोर मनामध्ये असणाऱ्या आत्मशक्तीच्या उपयोगावर आहे; आत्म्याच्या कुलुपांना ज्ञान, कर्म, भक्तीची त्रिविध किल्ली वापरून, ती कुलुपं उघडण्यावर आमचा भर आहे; तेव्हा आमच्या समन्वययोगात हठयोग-पद्धती उपयोगात आणावी लागत नाही; मात्र तिचा थोडासा उपयोग करण्यास हरकत नाही. राजयोगपद्धती आमच्या समन्वययोगात अनौपचारिक अंग म्हणून येऊ शकते. आध्यात्मिक शक्तीच्या आणि आध्यात्मिक अस्तित्वाच्या अधिकात अधिक विकसनाप्रत, सर्वांत जवळच्या मार्गाने जाऊन पोहोचावे आणि त्यायोगे दिव्य झालेली आणि मानवी जीवनाच्या सर्व प्रांतात जिचा अत्युच्च मुक्ताविष्कार असेल अशी प्रकृती असावी, अशी आमची स्फूर्तिदायक प्रेरणा आहे.
– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 612-613)

पूर्णयोग

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ३३

आपल्याला जी पद्धती उपयोगात आणावी लागते ती अशी असते की, आपण आपल्या सर्व जाणीवयुक्त अस्तित्वाने ईश्वराशी संपर्क साधावा, त्याच्याशी नाते जुळवावे; आणि आपले समग्र अस्तित्व हे त्याने त्याच्या रूपामध्ये रूपांतरित करावे म्हणून, आपण त्याला आवाहन करावे. म्हणजेच एक प्रकारे, आपल्यातील खरा पुरुष जो ईश्वर तोच साधनेचा साधक बनतो आणि तोच योगाचा प्रभुही बनतो. आणि मग या ईश्वराद्वारे, आपले कनिष्ठ व्यक्तिमत्त्व हे त्याच्या स्वतःच्या पूर्णतेचे साधन म्हणून, तसेच दिव्य रूपांतराचे केंद्र म्हणून उपयोगात आणले जाते….

या पद्धतीचे मानसशास्त्रीय तथ्य सांगायचे तर असे म्हणता येईल की, ह्या पद्धतीमध्ये अहंभाव त्याच्या सर्व क्षेत्रांसह, सर्व साधनसंभारासह क्रमश: अहंभावातीत परमतत्त्वाप्रत समर्पित होतो. या परमतत्त्वाच्या क्रिया अफाट असतात, त्यांचे मोजमाप करणे अशक्य असते आणि त्या नेहमी अटळ, अपरिहार्य अशा असतात. खचितच, ही साधना सोपी साधना नाही, किंवा हा मार्ग जवळचादेखील नाही. येथे प्रचंड श्रद्धेची आवश्यकता असते, पराकोटीचे धैर्य येथे लागते आणि सर्वांहूनही अधिक, कशानेही विचलित न होणारी सबुरी आवश्यक असते. कारण या मार्गात तीन टप्पे असतात आणि त्यापैकी केवळ शेवटच्या टप्प्यांत वेगाने वाटचाल होते व ही वाटचाल आनंदमयी असते.

पहिला टप्पा : या टप्प्यात आपला अहंभाव हा ईश्वराशी व्यापकतेने आणि समग्रतेने संपर्क साधावयाचा प्रयत्न करीत असतो;

दुसरा टप्पा : खालच्या प्रकृतीची सर्व तयारी या टप्प्यात केली जात असते. ही तयारी ईश्वरी कार्याद्वारे होत असते, वरिष्ठ प्रकृतीला कनिष्ठ प्रकृतीने ग्रहण करावे व कालांतराने स्वत:च वरची प्रकृती व्हावे, ह्यासाठी कनिष्ठ प्रकृतीची तयारी केली जात असते.

तिसरा टप्पा : या टप्प्यात कनिष्ठ प्रकृतीचे वरिष्ठ प्रकृतीमध्ये अंतिम रूपांतर होत असते. तथापि, वास्तवात ईश्वरी शक्ती न कळत पडद्याआडून आपल्याकडे बघत असते व आपला दुबळेपणा पाहून, ती स्वत:च पुढे सरसावते आणि आपल्याला आधार देते. आपली श्रद्धा, धैर्य, सबुरी कमी पडेल त्या त्या वेळी ती आपल्याला आधार देऊन सावरते. ही ईश्वरी शक्ती “आंधळ्याला पाहाण्याची शक्ती देते, लंगड्याला डोंगर चढण्याची शक्ती देते.” आपल्या बुद्धीला ही जाणीव होते की, आपल्याला वर चढण्याचा प्रेमाने आग्रह करणारा असा दिव्य कायदा आपल्या मदतीला आहे; सर्व वस्तुजातांचा स्वामी असणाऱ्या, मानवांचा सखा असणाऱ्या ईश्वराबद्दल किंवा विश्वमातेबद्दल आपले हृदय आपल्याला सांगत असते की, आपण जेथे जेथे अडखळतो तेथे तेथे हा स्वामी व ही विश्वमाता आपल्याला हात देऊन सावरतात. तेव्हा असे म्हणणे भाग आहे की, हा मार्ग अतिशय अवघड, कल्पनातीत अवघड असला तरी, या मार्गाचे परिश्रम आणि या मार्गाचे उद्दिष्ट यांची तुलना केली असता, हा मार्ग अतिशय सोपा व अतिशय खात्रीचा आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 45-46)