Tag Archive for: तत्त्वज्ञान

विचार शलाका – २७

माझी शिकवण ही आहे की, हे जग एका नवीन प्रगतीसाठी, एका नवीन उत्क्रांतीसाठी स्वतःला तयार करत आहे. जो कोणता देश, जो कोणता वंश या नवीन उत्क्रांतीची दिशा पकडेल आणि त्याची परिपूर्तता करेल तो देश, तो वंश हा मानववंशाचा नेता असणार आहे. या नवीन उत्क्रांतीचा पायाभूत विचार कोणता असणार आहे आणि ही नवीन उत्क्रांती कोणत्या ‘योग’पद्धतीने साध्य होऊ शकेल याचे मला जे दर्शन झाले ते मी ‘आर्य’मध्ये (श्रीअरविंद व श्रीमाताजी ‘आर्य’ नावाचे नियतकालिक प्रकाशित करत असत.) मांडले आहे. …ज्यांना जाणून घ्यावयाची इच्छा आहे, त्यांच्यासाठी तो संदेश तेथे आहे. वस्तुतः त्याचे तीन भाग आहेत.

०१) प्रत्येक मनुष्याने व्यक्ती म्हणून स्वतःला भविष्यकालीन दिव्य मानवतेच्या प्रकारामध्ये परिवर्तित करावे, उदयाला येण्यासाठी धडपडणाऱ्या नवीन सत्ययुगातील माणूस बनावे.

०२) मानववंशाचे नेतृत्व करू शकतील अशा माणसांचा एक वंश विकसित करावा.

०३) आणि या पथदर्शक लोकांच्या नेतृत्वाखाली, या निवडक वंशाच्या लोकांच्या नेतृत्वाखाली, या मार्गावरून वाटचाल करावी यासाठी म्हणून समस्त मानवजातीला आवाहन करावे.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 225)

विचार शलाका – २६

तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की, मठ, तपस्वी आणि संन्यासी तयार करणे हे काही माझे जीवितकार्य नाही; तर बलवान आत्म्यांना ‘कृष्ण’ आणि ‘काली’ यांच्या ‘लीले’मध्ये परत बोलविणे हे माझे कार्य आहे. ही माझी शिकवण आहे, ‘रिव्ह्यू’च्या अंकांमधूनही तुम्हाला ती पाहावयास मिळेल. माझे नाव कधीच मठादी प्रकारांशी किंवा संन्यासवादी आदर्शांशी जोडले जाता कामा नये. बुद्धाच्या काळापासून सुरु झालेल्या संन्यासमार्गाच्या प्रत्येक चळवळीमुळे भारत दुर्बल बनत गेला आहे आणि त्याचे कारण उघड आहे. जीवनाचा परित्याग ही एक गोष्ट आहे आणि खुद्द जीवनच मग ते राष्ट्रीय असो, वैयक्तिक असो, की वैश्विक जीवन असो ते जीवन महान आणि अधिक दिव्य बनविणे ही दुसरी गोष्ट आहे. …अहंकाराचा परित्याग आणि जीवनामध्ये ‘ईश्वरा’चा स्वीकार हा ‘योग’ मी शिकवितो – इतर कोणत्याही परित्यागाची शिकवण मी देत नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 222)

विचार शलाका – २४

शरीराकडे ते जणू प्रेत आहे असे समजून पाहाणे, हे संन्यासवाद्यांचे लक्षण आहे. हा निर्वाणाचा मार्ग आहे. ही संकल्पना ऐहिक जीवनाच्या संकल्पनेशी मिळतीजुळती नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद असला पाहिजे, चैतन्यामध्ये जेवढा आनंद आहे तेवढाच तो शरीरामध्येही असला पाहिजे. देह हा चैतन्याने बनलेला असतो, त्यामुळे देह हा देखील ‘ईश्वरा’चेच रूप आहे. मी या विश्वातील सर्व वस्तुमात्रांमध्ये ‘ईश्वरा’ला पाहतो. येथील सर्व काही हे ‘ब्रह्म’च आहे, ‘वासुदेव’, ‘ईश्वर’ हाच सर्व काही आहे, (सर्वम् इदम् ब्रह्म, वासुदेवं सर्वमिति) ही दृष्टी वैश्विक आनंद मिळवून देते. आनंदाच्या सघन लहरी अगदी शरीरामधूनही उठत राहतात. या अवस्थेत, आध्यात्मिक भावनेने भरलेले असतानासुद्धा, व्यक्ती हे ऐहिक जीवन, वैवाहिक जीवन जगू शकते. प्रत्येक कृतीमध्ये व्यक्तीला दिव्यत्वाचा आनंददायी आत्माविष्कार आढळतो.

– श्रीअरविंद
(CWSA 09 : 367)

विचार शलाका – १८

चक्रांमधून उन्नत होत होत, कुंडलिनी जागृत होण्याची प्रक्रिया आणि चक्रांचे शुद्धीकरण या गोष्टी ‘तंत्रयोगा’तील ज्ञानाचा भाग आहेत. आपल्या ‘योगा’मध्ये (पूर्णयोगामध्ये) चक्रांच्या हेतूपूर्वक शुद्धीकरणाची आणि उन्मीलनाची प्रक्रिया अभिप्रेत नसते, तसेच विशिष्ट अशा ठरावीक प्रक्रियेद्वारा कुंडलिनीचे उत्थापन देखील अभिप्रेत नसते. …परंतु तरीही तेथे विविध स्तरांकडून आणि विविध स्तरांद्वारे चेतनेचे आरोहण होऊन, ऊर्ध्वस्थित असणाऱ्या उच्चतर चेतनेशी ऐक्य घडून येते. तेथे चक्रांचे खुले होणे आणि त्या चक्रांचे ज्यांच्यावर नियंत्रण असते त्या (मानसिक, प्राणिक आणि शारीरिक) स्तरांचे खुले होणे देखील घडून येते; त्यामुळे, मी म्हटले त्याप्रमाणे या पूर्णयोगामध्ये रूपांतरणाच्या प्रक्रियेमागे ‘तंत्रयोगा’चे ज्ञान आहे.

*

‘पूर्णयोगा’मध्ये चक्रांचे प्रयत्नपूर्वक उन्मीलन केले जात नाही तर शक्तीच्या अवतरणामुळे ती चक्रे आपोआप खुली होतात. तंत्रयोगाच्या साधनेमध्ये ती ‘मूलाधारा’पासून सुरुवात करून ऊर्ध्वगामी दिशेने खुली होत जातात तर, पूर्णयोगामध्ये ती वरून खाली या दिशेने खुली होत जातात. परंतु ‘मूलाधारा’तून शक्ती वर चढत जाणे हे घडून येतेच.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 460)

विचार शलाका – १७

आपला आदर्श वास्तवात उतरविण्यासाठी म्हणून ज्यांना स्वत:च्या क्षणभंगुर असणाऱ्या अशा संपूर्ण अस्तित्वाचा पुरेपूर लाभ करून घ्यायचा आहे त्यांनी सद्य घडीस स्वत:कडे असलेल्या समाधानाचा त्याग कसा करायचा हे जाणून घेणे ही एक मोठी कला आहे.

यशस्वी व्यक्तींच्या अनेकविध श्रेणी असतात. त्यांच्या आदर्शाच्या कमीअधिक व्यापकतेवर, उदात्ततेवर, जटिलतेवर, शुद्धतेवर, प्रकाशमानतेनुसार त्या श्रेणी ठरतात. एखादी व्यक्ती भंगारमालाच्या व्यवसायात ‘यशस्वी’ होईल तर, एखादी व्यक्ती या विश्वाचा स्वामी म्हणून ‘यशस्वी’ होईल किंवा एखादी व्यक्ती सिद्ध तपस्वी म्हणून ‘यशस्वी’ होईल; ही उदाहरणे अगदी वेगवेगळ्या पातळीवरची असली तरी, या तिन्ही उदाहरणांबाबत, व्यक्तीचे स्वत:वर कितपत समग्रपणे आणि कितपत ठोस प्रभुत्व आहे यावर ते ‘यश’ अवलंबून असते.

…ज्या व्यक्तीच्या इच्छांची परिपूर्ती पूर्णतया झालेली आहे, ज्या व्यक्तीने तिला स्वत:ला जे प्राप्त करून घ्यावयाचे होते ते साध्य केलेले आहे अशी व्यक्ती आणि एखादी अशी व्यक्ती की जिला काहीच साध्य झालेले नाही अशा टोकाच्या दोन व्यक्तींच्या दरम्यान अपरिमित असे मधले टप्पे असतात. ही व्याप्ती खरोखर खूपच जटिल असते कारण केवळ आदर्शाच्या प्राप्तीमध्येच फरक असतो असे नाही तर, खुद्द आदर्शाच्या प्रतवारीमध्ये देखील खूप फरक असतो. काही आकांक्षा या अगदी वैयक्तिक आवडीनिवडी, अगदी भौतिक, भावनिक वा बौद्धिक आवडीनिवडी अशाप्रकारच्या असतात; तर काही अधिक व्यापक, सामूहिक वा उच्चतर ध्येय गाठणे अशा प्रकारच्या असतात आणि काही तर अगदी अतिमानवी म्हणता येतील अशा असतात. म्हणजे अशा की, शाश्वत ‘सत्य’, शाश्वत ‘चेतना’ आणि शाश्वत ‘शांती’ यांच्या भव्यतेमुळे जी शिखरे खुली होतात ती कवळण्याची त्यांची अभीप्सा असते. व्यक्तीने जे ध्येय निवडले आहे त्याच्या व्यापकतेच्या आणि त्याच्या खोलीच्या प्रमाणात व्यक्तीच्या प्रयत्नांची आणि परित्यागाची ताकद असणार, हे सहज समजण्यासारखे आहे. ध्येयप्राप्तीसाठी आवश्यक असणारे सर्व प्रकारचे त्याग, त्यांचे स्वरूप आणि दुसऱ्या बाजूला, व्यक्तीमध्ये असणाऱ्या त्यागाची आणि आत्मनियंत्रणाची एकत्रित ताकद ह्यांचा परिपूर्ण असा समतोल फारच क्वचित आढळून येतो.

अगदी खालच्या स्तरापासून ते अगदी परमोच्च स्तरापर्यंत पाहिले तरीही फारच कमी वेळेला असा समतोल साधलेला आढळून येतो.

जेव्हा व्यक्तीच्या घडणीमध्ये अशा प्रकारचा परिपूर्ण समतोल आढळून येतो तेव्हा अशी व्यक्ती, या पार्थिव अस्तित्वाचा शक्य तेवढा पुरेपूर लाभ करून घेऊ शकते.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 121-122)

विचार शलाका – १६

प्रकृतीमध्ये मूलतः चेतनेची उत्क्रांती आकाराला येत आहे, पृथ्वीवर आध्यात्मिक विकसन होत आहे, हेच जर का या जडभौतिकामधील आपल्या जन्माचे गुप्त सत्य असेल तर, आजचा मनुष्य हा त्या उत्क्रांतीचा अखेरचा टप्पा असू शकणार नाही. कारण तो आत्म्याचा अगदी अपूर्ण आविष्कार आहे. मनदेखील खूपच मर्यादित रूप आहे आणि ते केवळ साधनभूत आहे. मन हे चेतनेचा केवळ एक मधला टप्पा आहे. त्यामुळेच मनोमय जीव (मनुष्य) हा केवळ संक्रमणशील जीवच असू शकतो.

आणि मनुष्य जर का अशा रीतीने स्वतःच्या मनोमयतेच्या अतीत जाण्यास अक्षम असेल तर, त्याला बाजूला सारून, अतिमानस आणि अतिमानव आविष्कृत झालेच पाहिजेत आणि त्यांनी या सृष्टीचे नेतृत्व केलेच पाहिजे.

पण मनाच्या अतीत असणाऱ्या गोष्टीप्रत खुले होण्याची जर मनुष्याच्याच मनाची क्षमता असेल तर मग त्याने स्वतःच अतिमानस आणि अतिमानव तत्त्वापर्यंत जाऊन का पोहोचू नये? किंवा किमान त्याने प्रकृतीमध्ये आविष्कृत होणारे आत्म्याचे जे महान तत्त्व आहे त्याच्या उत्क्रांतीसाठी आपली मनोमयता, आपला प्राण, आपले शरीर स्वाधीन का करू नये?

– श्रीअरविंद
(CWSA 21-22 : 879)

विचार शलाका – १५

आपल्या आणि सर्व जीवमात्रांच्या अस्तित्वाच्या ‘दिव्य सत्या’शी एकत्व, हे ‘पूर्णयोगा’चे एक अत्यावश्यक उद्दिष्ट आहे. आणि ही गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे; आपण हे कायम स्मरणात ठेवावयास हवे की, आपण आपला हा योग अतिमानसाच्या प्राप्तीसाठी, अंगीकारलेला नाही, तर तो आपण ‘ईश्वरा’साठी अंगीकारलेला आहे. आपण अतिमानसाच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील असतो, ते त्याच्या आनंदासाठी किंवा त्याच्या महानतेसाठी नव्हे; तर दिव्य सत्याशी आपले एकत्व हे अधिक समग्र आणि परिपूर्ण व्हावे, यासाठी आपण प्रयत्नशील असतो. ते दिव्य सत्य संवेदित व्हावे, ते आत्मसात करता यावे, त्याच्या सर्वोच्च तीव्रतांनिशी आणि त्याच्या सर्वाधिक व्यापकतांनिशी, आपल्या अस्तित्वाच्या प्रत्येक शक्य असलेल्या मार्गानिशी ते क्रियाशील करता यावे; आपल्या प्रकृतीच्या प्रत्येक श्रेणीमध्ये, प्रत्येक वळणावाकणावर तसेच तिच्या विश्रांत स्थितीमध्ये सुद्धा ते दिव्य सत्य क्रियाशील करता यावे, म्हणून आपण अतिमानसाच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील असतो. अतिमानवतेच्या महाकाय भव्यतेप्रत, ईश्वरी सामर्थ्याप्रत आणि महानतेप्रत आणि व्यक्तिगत व्यक्तिमत्त्वाच्या व्यापकतेच्या आत्म-परिपूर्तीप्रत पोहोचणे, हे अतिमानस योगाचे उद्दिष्ट आहे; असा विचार करण्यास कित्येक जण प्रवृत्त होतील. पण असा विचार करणे म्हणजे विपर्यास करण्यासारखे आहे. ही विपर्यस्त आणि घातक संकल्पना आहे. घातक यासाठी की, त्यातून आपल्यामध्ये असणाऱ्या राजसिक प्राणिक मनाची महत्त्वाकांक्षा आणि गर्व, अभिमान वाढीस लागण्याची शक्यता असते आणि जर त्याच्या अतीत जाता आले नाही आणि त्यावर मात करता आली नाही तर, त्यातून आध्यात्मिक पतनाचा हमखास धोका संभवतो. ही संकल्पना विपर्यस्त एवढ्याचसाठी आहे ; कारण ती अहंजन्य संकल्पना आहे आणि अतिमानसिक परिवर्तनाची पहिली अटच मुळी अहंकारापासून मुक्ती ही आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 280)

विचार शलाका – १२

‘पूर्णयोगा’मध्ये केवळ ‘देवा’चा साक्षात्कारच अभिप्रेत नाही, तर संपूर्ण आत्मनिवेदन (consecration) अभिप्रेत आहे. तसेच, जोपर्यंत ईश्वरी चेतनेचे आविष्करण करण्यास व्यक्तीचे आंतरिक आणि बाह्य जीवन सुपात्र ठरत नाही आणि जोपर्यंत जीवन हे ईश्वरी कार्याचाच एक भाग बनून राहत नाही तोपर्यंत, आंतरिक व बाह्य जीवनामध्ये परिवर्तन घडवीत राहणे हे या योगामध्ये अभिप्रेत आहे. निव्वळ नैतिक आणि शारीरिक उग्रतपस्येहून कितीतरी अधिक अचूक आणि कठोर असे आंतरिक अनुशासन येथे अपेक्षित असते. हा योगमार्ग इतर बहुतेक योगमार्गांपेक्षा अधिक विशाल व अधिक दुःसाध्य आहे त्यामुळे, अंतरात्म्याकडून आलेल्या हाकेची खात्री असल्याखेरीज आणि अंतिम साध्याप्रत वाटचाल करीत राहण्याची तयारी असल्याची खात्री पटल्याशिवाय, व्यक्तीने या मार्गात प्रवेश करता कामा नये.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 27)

विचार शलाका – १०

‘पूर्णयोग’ अत्यंत उन्नत आणि अत्यंत अवघड अशा आध्यात्मिक साध्याकडे घेऊन जाणारा वैशिष्ट्यपूर्ण मार्ग आहे.

व्यक्तीकडे या योगासाठी आवश्यक अशी क्षमता असल्याचा पुरेसा आधार असेल किंवा त्या व्यक्तीला दुर्दम्य अशी हाक आली असेल तरच हा योग त्यास प्रदान करण्यात येतो.

केवळ आंतरिक शांती हे या योगाचे उद्दिष्ट नाही, तर ती केवळ या योगासाठी आवश्यक असणाऱ्या प्राथमिक अटींपैकी एक अट आहे

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 27)

विचार शलाका – ०६

निर्व्यक्तिक, ‘केवल’, ‘अनंत’ अशी ईश्वराची कल्पना करून, त्याचा अनुभव घ्यावयाचा की विश्वातीत, विश्वात्मक नित्य पुरुषाचा वेध घेऊन, त्याला जाणून घ्यावयाचे, त्याचा अनुभव घ्यावयाचा; हे ठरवण्याची आपल्याला मोकळीक आहे; आपला त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग कोणताही असू देत, परंतु आध्यात्मिक अनुभूतीचे एक महत्त्वाचे सत्य हे आहे की, तो ईश्वर आपल्या हृदयांतच आहे; तो सर्व जीवनाच्या केंद्रस्थानी आहे आणि सर्व जीवन त्याच्यामध्ये सामावलेले आहे आणि त्याचा शोध घेणे म्हणजेच महान आत्मशोध होय.

सांप्रदायिक श्रद्धांचे भिन्न भिन्न प्रकार हे, भारतीय मनाला, सर्वत्र असलेल्या एकमेव ‘परमात्म्या’च्या व ‘ईश्वरा’च्या दर्शनाचे भिन्न प्रकार म्हणून प्रतीत होतात. ‘आत्मसाक्षात्कार’ ही एकच आवश्यक गोष्ट आहे. ‘अंतरात्म्या’प्रत खुले होणे, ‘अनंता’त वसति, ‘शाश्वता’ची साधना व सिद्धी, ‘ईश्वरा’शी ऐक्य, हे भारतीय धर्माचे एकमेव साध्य आहे. आध्यात्मिक मोक्षाचा अर्थ हाच आहे, हेच ते जिवंत ‘सत्य’ आहे, जे मानवाला पूर्णत्व देते व मुक्त करते.

सर्वोच्च आध्यात्मिक सत्याचे केलेले गतिमान अनुसरण आणि सर्वोच्च आध्यात्मिक ध्येय हे भारतीय धर्माला एकत्र आणणारे बंध आहेत; त्याच्या हजारो रूपांच्या पाठीमागे, जर कोणते सामाईक सार असेल तर ते हेच होय.

– श्रीअरविंद
(CWSA 20 : 183-184)