Tag Archive for: तत्त्वज्ञान

विचार शलाका – ३४

प्रश्न : ध्यानाची संकल्पना काय असली पाहिजे किंवा ध्यानाचे उद्दिष्ट काय असले पाहिजे ?

श्रीअरविंद : जे तुमच्या प्रकृतीशी आणि तुमच्या सर्वोच्च आकांक्षांशी अनुरूप असेल ते! परंतु जर तुम्ही मला नेमके उत्तर विचारत असाल, तर मी म्हणेन की, ध्यानासाठी म्हणजे मननासाठी किंवा चिंतनासाठी ‘ब्रह्म’ हे नेहमीच सर्वोत्कृष्ट उद्दिष्ट असते आणि मनाने सर्वांतर्यामी असणाऱ्या ‘देवा’वर, ‘देवा’मध्ये निवास करणाऱ्या सर्वांवर आणि सर्व काही ‘देव’च आहे या संकल्पनेवर आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. मग तो देव ‘अवैयक्तिक’ आहे की ‘वैयक्तिक’ आहे, की सापेक्ष असा ‘स्वतः’मधीलच देव आहे, या गोष्टीने वस्तुतः फारसा काही फरक पडत नाही. पण मला तरी ही संकल्पना सर्वोत्तम वाटते. कारण ती सर्वोच्च आहे आणि तिच्यामध्ये, म्हणजे ‘सर्व काही ब्रह्म आहे’ या संकल्पनेमध्ये, इहलौकिक सत्य असो अथवा, पारलौकिक सत्य असो, किंवा सर्व अस्तित्वाच्या अतीत असणारे सत्य असो, या सर्व सत्यांचा समावेश होतो.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 294-295)

विचार शलाका – ३०

चेतना ही एखाद्या शिडीसारखी असते. प्रत्येक युगामध्ये असा एखादा महान जीव असतो की, जो या शिडीमध्ये एका नवीन पायरीची भर घालण्यासाठी आणि आजवर सामान्य चेतना जेथवर जाऊन पोहोचू शकली नाही तेथवर जाण्यासाठी समर्थ असतो. उच्च अवस्था प्राप्त करून घेऊन, जडभौतिक चेतनेपासून पूर्णतः विलग होऊन जायचे असेही शक्य असते. पण मग तेव्हा व्यक्ती या शिडीचा भाग राहात नाही. परंतु, जडभौतिकाशी संपर्क न गमावता, या शिडीमध्ये एका नवीन पायरीची भर घालण्याची क्षमता हीच, विश्वातल्या महान युगामधील महान उपलब्धी राहिलेली आहे. म्हणजे, ‘सर्वोच्च’ अवस्थेपर्यंत जायचे आणि त्याच वेळी, विविध पातळ्यांवरील, परस्परांमधील संबंध एक प्रकारच्या रिक्तपणाने तोडून न टाकता, सर्वोच्चाचा धागा तळागाळाशीदेखील जोडून ठेवायचा.

अशा रीतीने वर आणि खाली जाणे आणि तळाचे सर्वोच्चाशी ऐक्य घडवून आणणे हेच साक्षात्काराचे पूर्ण रहस्य आहे आणि हेच ‘अवतारा’चे कार्य असते. प्रत्येक वेळी जेव्हा तो अशा रीतीने शिडीमध्ये एका नवीन पायरीची भर घालतो तेव्हा या पृथ्वीवर एक नवीन निर्मिती घडून येते.

श्रीअरविंदांनी ज्याला ‘अतिमानस’ (Supramental) असे संबोधले आहे त्या नवीन पायरीची भर त्यांनी घातली आहे. त्याचा परिणाम म्हणून, चेतना ही अतिमानसिक जगामध्ये प्रवेश करू शकेल आणि तरीही ती स्वतःचे वैयक्तिक रूप, तिची पृथगात्मकता (individualization) टिकवून ठेवू शकेल आणि एका नवीन निर्मितीच्या प्रस्थापनेसाठी खाली अवतरू शकेल. अर्थातच ही काही अंतिम निर्मिती असणार नाही, कारण जीवाच्या या पुढच्याही अधिक श्रेणी असतात. परंतु सध्या तरी आम्ही ही अतिमानसिक चेतना अवतरीत व्हावी म्हणून कार्यरत आहोत. त्याचा परिणाम म्हणून या जगाची पुनर्रचना होईल, या विश्वामध्ये सत्य दिव्य व्यवस्था पुन्हा एकवार परतेल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 178-179)

विचार शलाका – २९

…‘अवतार’ कोणत्या कारणासाठी जन्म घेतात? तर मानवाला पुन्हा पुन्हा अधिकाधिक उंचीवर घेऊन जाण्यासाठी; त्याच्यामध्ये उच्च, उच्चतर, अधिकाधिक उच्चतर अशी मानवता विकसित व्हावी यासाठी; दिव्य जीवाचा अधिकाधिक महान विकास व्हावा यासाठी; जोवर आपले परिश्रम पूर्णत्वाला जात नाहीत, आपले कार्य सिद्धीस जात नाही आणि या जडभौतिक विश्वामध्येसुद्धा ‘सच्चिदानंद’ परिपूर्णतेने भरून जात नाही, तोवर या पृथ्वीवर पुन्हा पुन्हा अधिकाधिक स्वर्गलोकाचे अवतरण घडविण्यासाठी, अवतार जन्माला येत असतात. केवळ स्वतःच्या किंवा काही मोजक्या लोकांच्या मुक्तीसाठी जर एखादा परिश्रम करत असेल आणि जरी तो त्यात यशस्वी झाला तरी त्याचे कार्य हे लहानच असते. परंतु जो अखिल मानवजातीच्या पूर्णत्वासाठी, शुद्धतेसाठी, आनंदासाठी, जिवाच्या शांतीसाठी प्रयत्नशील राहतो आणि त्यासाठीच जीवन जगतो, तो जरी अयशस्वी झाला किंवा जरी त्याला त्यामध्ये आंशिकच यश मिळाले किंवा काही काळापुरतेच यश मिळाले तरी, त्याचे ते कार्य अनंतपटीने महान असते.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 90)

विचार शलाका – २८

आपण ‘देवा’ची प्रतिमूर्तीच बनावे, त्याच्यामध्येच आपण निवास करावा, त्याच्या सन्निध राहावे आणि त्याच्या आनंदाचे व शक्तीचे आपण एक माध्यम बनावे, त्याच्या कार्याचे आपण एक साधन बनावे यासाठीची हाक आपल्याला आलेली आहे. सर्व अशुभापासून शुद्धीकरण करतकरत, ईश्वराच्या स्पर्शाने जीवाचे रूपांतरण होत, आपल्याला दिव्य विद्युत-जनित्राप्रमाणे (dynamos) या जगामध्ये कार्य करायचे आहे आणि ती दिव्य ऊर्जा सर्व मानवजातीमध्ये वितरित करायची आहे. तिच्या प्रकाशाने मानवजात रोमांचित होत, प्रकाशमान होईल अशा रीतीने ती वितरित करायची आहे. त्यामुळे आपल्यापैकी कोणीही एखादा जिथे कोठे उभा असेल, त्याच्या अवतीभोवती असणारे शेकडो लोक ‘देवा’च्या प्रकाशाने, त्याच्या शक्तीने भारले जातील, ते ‘देवा’ने परिपूर्ण आणि आनंदाने परिपूर्ण होऊन जातील.

चर्च, परंपरा, धर्मविद्या, तत्त्वज्ञानं मानवजातीला वाचविण्यामध्ये अपयशी ठरली कारण त्यांनी स्वतःला बौद्धिक पंथ, सिद्धान्त, कर्मकांड, संस्था यांमध्ये, तसेच आचारशुद्धी, दर्शने यांमध्ये स्वतःला गुंतवून ठेवले, जणू काही यामुळे मानवजातीचे रक्षण होणार होते. हे करत असताना, जी गोष्ट करणे गरजेचे होते, त्याकडे मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. त्यांनी आत्म्याच्या शक्तीकडे आणि तिच्या शुद्धीकरणाकडे लक्ष पुरविले नाही. आपण त्या आवश्यक गोष्टीकडे परतले पाहिजे. ‘ख्रिस्ता’ची पावित्र्याची आणि मानवजातीच्या परिपूर्णतेची शिकवण, ‘महंमद’च्या (पैगंबर) परिपूर्ण शरणागतीची, आत्मसमर्पणाची आणि ईश्वरसेवेची शिकवण, मानवातील ईश्वराच्या आनंदाची व प्रेमाची ‘चैतन्यां’नी (महाप्रभू) दिलेली शिकवण, सर्व धर्मांच्या एकत्वाची आणि मानवातील ‘देवा’च्या दिव्यत्वाची रामकृष्णांनी (परमहंस) दिलेली शिकवण अंगीकारत, या साऱ्या प्रवाहांचे एका मोठ्या नदीमध्ये एकत्रीकरण करत, ‘गंगे’प्रमाणे विशुद्ध करून घेत, त्यांना उद्धारून घेत आपणही, ‘भगीरथा’ने ज्याप्रमाणे ‘गंगे’चे अवतरण करून घेतले आणि आपल्या पूर्वजांच्या अस्थी त्यामध्ये विसर्जित केल्या, त्याप्रमाणे या भौतिकतावादी मानवतेच्या मृतवत झालेल्या जीवनावर, त्याचा वर्षाव करायला हवा. ज्यामुळे, या मानवजातीमधील आत्मतत्त्वाचे पुनरुत्थान होईल आणि पुन्हा एकदा काही काळासाठी या विश्वामध्ये ‘सत्ययुग’ अवतरेल.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 90)

विचार शलाका – २७

माझी शिकवण ही आहे की, हे जग एका नवीन प्रगतीसाठी, एका नवीन उत्क्रांतीसाठी स्वतःला तयार करत आहे. जो कोणता देश, जो कोणता वंश या नवीन उत्क्रांतीची दिशा पकडेल आणि त्याची परिपूर्तता करेल तो देश, तो वंश हा मानववंशाचा नेता असणार आहे. या नवीन उत्क्रांतीचा पायाभूत विचार कोणता असणार आहे आणि ही नवीन उत्क्रांती कोणत्या ‘योग’पद्धतीने साध्य होऊ शकेल याचे मला जे दर्शन झाले ते मी ‘आर्य’मध्ये (श्रीअरविंद व श्रीमाताजी ‘आर्य’ नावाचे नियतकालिक प्रकाशित करत असत.) मांडले आहे. …ज्यांना जाणून घ्यावयाची इच्छा आहे, त्यांच्यासाठी तो संदेश तेथे आहे. वस्तुतः त्याचे तीन भाग आहेत.

०१) प्रत्येक मनुष्याने व्यक्ती म्हणून स्वतःला भविष्यकालीन दिव्य मानवतेच्या प्रकारामध्ये परिवर्तित करावे, उदयाला येण्यासाठी धडपडणाऱ्या नवीन सत्ययुगातील माणूस बनावे.

०२) मानववंशाचे नेतृत्व करू शकतील अशा माणसांचा एक वंश विकसित करावा.

०३) आणि या पथदर्शक लोकांच्या नेतृत्वाखाली, या निवडक वंशाच्या लोकांच्या नेतृत्वाखाली, या मार्गावरून वाटचाल करावी यासाठी म्हणून समस्त मानवजातीला आवाहन करावे.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 225)

विचार शलाका – २६

तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की, मठ, तपस्वी आणि संन्यासी तयार करणे हे काही माझे जीवितकार्य नाही; तर बलवान आत्म्यांना ‘कृष्ण’ आणि ‘काली’ यांच्या ‘लीले’मध्ये परत बोलविणे हे माझे कार्य आहे. ही माझी शिकवण आहे, ‘रिव्ह्यू’च्या अंकांमधूनही तुम्हाला ती पाहावयास मिळेल. माझे नाव कधीच मठादी प्रकारांशी किंवा संन्यासवादी आदर्शांशी जोडले जाता कामा नये. बुद्धाच्या काळापासून सुरु झालेल्या संन्यासमार्गाच्या प्रत्येक चळवळीमुळे भारत दुर्बल बनत गेला आहे आणि त्याचे कारण उघड आहे. जीवनाचा परित्याग ही एक गोष्ट आहे आणि खुद्द जीवनच मग ते राष्ट्रीय असो, वैयक्तिक असो, की वैश्विक जीवन असो ते जीवन महान आणि अधिक दिव्य बनविणे ही दुसरी गोष्ट आहे. …अहंकाराचा परित्याग आणि जीवनामध्ये ‘ईश्वरा’चा स्वीकार हा ‘योग’ मी शिकवितो – इतर कोणत्याही परित्यागाची शिकवण मी देत नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 222)

विचार शलाका – २४

शरीराकडे ते जणू प्रेत आहे असे समजून पाहाणे, हे संन्यासवाद्यांचे लक्षण आहे. हा निर्वाणाचा मार्ग आहे. ही संकल्पना ऐहिक जीवनाच्या संकल्पनेशी मिळतीजुळती नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद असला पाहिजे, चैतन्यामध्ये जेवढा आनंद आहे तेवढाच तो शरीरामध्येही असला पाहिजे. देह हा चैतन्याने बनलेला असतो, त्यामुळे देह हा देखील ‘ईश्वरा’चेच रूप आहे. मी या विश्वातील सर्व वस्तुमात्रांमध्ये ‘ईश्वरा’ला पाहतो. येथील सर्व काही हे ‘ब्रह्म’च आहे, ‘वासुदेव’, ‘ईश्वर’ हाच सर्व काही आहे, (सर्वम् इदम् ब्रह्म, वासुदेवं सर्वमिति) ही दृष्टी वैश्विक आनंद मिळवून देते. आनंदाच्या सघन लहरी अगदी शरीरामधूनही उठत राहतात. या अवस्थेत, आध्यात्मिक भावनेने भरलेले असतानासुद्धा, व्यक्ती हे ऐहिक जीवन, वैवाहिक जीवन जगू शकते. प्रत्येक कृतीमध्ये व्यक्तीला दिव्यत्वाचा आनंददायी आत्माविष्कार आढळतो.

– श्रीअरविंद
(CWSA 09 : 367)

विचार शलाका – १८

चक्रांमधून उन्नत होत होत, कुंडलिनी जागृत होण्याची प्रक्रिया आणि चक्रांचे शुद्धीकरण या गोष्टी ‘तंत्रयोगा’तील ज्ञानाचा भाग आहेत. आपल्या ‘योगा’मध्ये (पूर्णयोगामध्ये) चक्रांच्या हेतूपूर्वक शुद्धीकरणाची आणि उन्मीलनाची प्रक्रिया अभिप्रेत नसते, तसेच विशिष्ट अशा ठरावीक प्रक्रियेद्वारा कुंडलिनीचे उत्थापन देखील अभिप्रेत नसते. …परंतु तरीही तेथे विविध स्तरांकडून आणि विविध स्तरांद्वारे चेतनेचे आरोहण होऊन, ऊर्ध्वस्थित असणाऱ्या उच्चतर चेतनेशी ऐक्य घडून येते. तेथे चक्रांचे खुले होणे आणि त्या चक्रांचे ज्यांच्यावर नियंत्रण असते त्या (मानसिक, प्राणिक आणि शारीरिक) स्तरांचे खुले होणे देखील घडून येते; त्यामुळे, मी म्हटले त्याप्रमाणे या पूर्णयोगामध्ये रूपांतरणाच्या प्रक्रियेमागे ‘तंत्रयोगा’चे ज्ञान आहे.

*

‘पूर्णयोगा’मध्ये चक्रांचे प्रयत्नपूर्वक उन्मीलन केले जात नाही तर शक्तीच्या अवतरणामुळे ती चक्रे आपोआप खुली होतात. तंत्रयोगाच्या साधनेमध्ये ती ‘मूलाधारा’पासून सुरुवात करून ऊर्ध्वगामी दिशेने खुली होत जातात तर, पूर्णयोगामध्ये ती वरून खाली या दिशेने खुली होत जातात. परंतु ‘मूलाधारा’तून शक्ती वर चढत जाणे हे घडून येतेच.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 460)

विचार शलाका – १७

आपला आदर्श वास्तवात उतरविण्यासाठी म्हणून ज्यांना स्वत:च्या क्षणभंगुर असणाऱ्या अशा संपूर्ण अस्तित्वाचा पुरेपूर लाभ करून घ्यायचा आहे त्यांनी सद्य घडीस स्वत:कडे असलेल्या समाधानाचा त्याग कसा करायचा हे जाणून घेणे ही एक मोठी कला आहे.

यशस्वी व्यक्तींच्या अनेकविध श्रेणी असतात. त्यांच्या आदर्शाच्या कमीअधिक व्यापकतेवर, उदात्ततेवर, जटिलतेवर, शुद्धतेवर, प्रकाशमानतेनुसार त्या श्रेणी ठरतात. एखादी व्यक्ती भंगारमालाच्या व्यवसायात ‘यशस्वी’ होईल तर, एखादी व्यक्ती या विश्वाचा स्वामी म्हणून ‘यशस्वी’ होईल किंवा एखादी व्यक्ती सिद्ध तपस्वी म्हणून ‘यशस्वी’ होईल; ही उदाहरणे अगदी वेगवेगळ्या पातळीवरची असली तरी, या तिन्ही उदाहरणांबाबत, व्यक्तीचे स्वत:वर कितपत समग्रपणे आणि कितपत ठोस प्रभुत्व आहे यावर ते ‘यश’ अवलंबून असते.

…ज्या व्यक्तीच्या इच्छांची परिपूर्ती पूर्णतया झालेली आहे, ज्या व्यक्तीने तिला स्वत:ला जे प्राप्त करून घ्यावयाचे होते ते साध्य केलेले आहे अशी व्यक्ती आणि एखादी अशी व्यक्ती की जिला काहीच साध्य झालेले नाही अशा टोकाच्या दोन व्यक्तींच्या दरम्यान अपरिमित असे मधले टप्पे असतात. ही व्याप्ती खरोखर खूपच जटिल असते कारण केवळ आदर्शाच्या प्राप्तीमध्येच फरक असतो असे नाही तर, खुद्द आदर्शाच्या प्रतवारीमध्ये देखील खूप फरक असतो. काही आकांक्षा या अगदी वैयक्तिक आवडीनिवडी, अगदी भौतिक, भावनिक वा बौद्धिक आवडीनिवडी अशाप्रकारच्या असतात; तर काही अधिक व्यापक, सामूहिक वा उच्चतर ध्येय गाठणे अशा प्रकारच्या असतात आणि काही तर अगदी अतिमानवी म्हणता येतील अशा असतात. म्हणजे अशा की, शाश्वत ‘सत्य’, शाश्वत ‘चेतना’ आणि शाश्वत ‘शांती’ यांच्या भव्यतेमुळे जी शिखरे खुली होतात ती कवळण्याची त्यांची अभीप्सा असते. व्यक्तीने जे ध्येय निवडले आहे त्याच्या व्यापकतेच्या आणि त्याच्या खोलीच्या प्रमाणात व्यक्तीच्या प्रयत्नांची आणि परित्यागाची ताकद असणार, हे सहज समजण्यासारखे आहे. ध्येयप्राप्तीसाठी आवश्यक असणारे सर्व प्रकारचे त्याग, त्यांचे स्वरूप आणि दुसऱ्या बाजूला, व्यक्तीमध्ये असणाऱ्या त्यागाची आणि आत्मनियंत्रणाची एकत्रित ताकद ह्यांचा परिपूर्ण असा समतोल फारच क्वचित आढळून येतो.

अगदी खालच्या स्तरापासून ते अगदी परमोच्च स्तरापर्यंत पाहिले तरीही फारच कमी वेळेला असा समतोल साधलेला आढळून येतो.

जेव्हा व्यक्तीच्या घडणीमध्ये अशा प्रकारचा परिपूर्ण समतोल आढळून येतो तेव्हा अशी व्यक्ती, या पार्थिव अस्तित्वाचा शक्य तेवढा पुरेपूर लाभ करून घेऊ शकते.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 121-122)

विचार शलाका – १६

प्रकृतीमध्ये मूलतः चेतनेची उत्क्रांती आकाराला येत आहे, पृथ्वीवर आध्यात्मिक विकसन होत आहे, हेच जर का या जडभौतिकामधील आपल्या जन्माचे गुप्त सत्य असेल तर, आजचा मनुष्य हा त्या उत्क्रांतीचा अखेरचा टप्पा असू शकणार नाही. कारण तो आत्म्याचा अगदी अपूर्ण आविष्कार आहे. मनदेखील खूपच मर्यादित रूप आहे आणि ते केवळ साधनभूत आहे. मन हे चेतनेचा केवळ एक मधला टप्पा आहे. त्यामुळेच मनोमय जीव (मनुष्य) हा केवळ संक्रमणशील जीवच असू शकतो.

आणि मनुष्य जर का अशा रीतीने स्वतःच्या मनोमयतेच्या अतीत जाण्यास अक्षम असेल तर, त्याला बाजूला सारून, अतिमानस आणि अतिमानव आविष्कृत झालेच पाहिजेत आणि त्यांनी या सृष्टीचे नेतृत्व केलेच पाहिजे.

पण मनाच्या अतीत असणाऱ्या गोष्टीप्रत खुले होण्याची जर मनुष्याच्याच मनाची क्षमता असेल तर मग त्याने स्वतःच अतिमानस आणि अतिमानव तत्त्वापर्यंत जाऊन का पोहोचू नये? किंवा किमान त्याने प्रकृतीमध्ये आविष्कृत होणारे आत्म्याचे जे महान तत्त्व आहे त्याच्या उत्क्रांतीसाठी आपली मनोमयता, आपला प्राण, आपले शरीर स्वाधीन का करू नये?

– श्रीअरविंद
(CWSA 21-22 : 879)