Tag Archive for: चैत्य पुरुष

आंतरिक सत्याविषयी सजग होणे

शिक्षक : एखाद्या प्रौढ व्यक्तीप्रमाणे लहान मूलदेखील त्याच्या आंतरिक सत्याविषयी सजग होऊ शकते का?

श्रीमाताजी : लहान मुलांमध्ये ही जाणीव अगदी सुस्पष्ट असते, कारण ते सत्य त्यांना कोणत्याही विचारांच्या वा शब्दांच्या गुंतागुंतीविना थेट संवेद्य होते – हे तेच असते ज्यामुळे त्याला अगदी स्वस्थ वाटते किंवा ज्यामुळे त्याला अस्वस्थ वाटते. ….आणि हे सगळे प्रौढ माणसांपेक्षा लहान मुलामध्ये अधिक सुस्पष्ट असते कारण प्रौढ व्यक्तीमध्ये ह्या आंतरिक सत्याविषयीची संवेदना मनाच्या कार्यामुळे झाकोळली जाते.

लहान मुलाला वेगवेगळे सिद्धान्त सांगणे अगदीच निरूपयोगी आहे कारण जेव्हा त्याचे मन जागृत होईल तेव्हा त्या सिद्धान्ताच्या विरोधी हजारो कारणे त्याला सापडतील.

मुलांमध्ये एक छोटेसे सत्य दडलेले असते ते म्हणजे त्यांच्या अंतरात्म्यामध्ये असणारी दिव्यत्वाची उपस्थिती. वनस्पती व प्राण्यांमध्येदेखील हे अस्तित्व असते. वनस्पतींमध्ये हे अस्तित्व जागृत नसते, प्राण्यांमध्ये ते जागृत व्हायला सुरुवात झालेली असते आणि लहान मुलांमध्ये ते खूपच जागृत असते. मला अशी मुले माहीत आहेत की, जी त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या वयाच्या चौदाव्या वर्षीपेक्षा आणि चौदाव्या वर्षी पंचविसाव्या वर्षापेक्षा या आंतरात्मिक अस्तित्वाविषयी, चैत्यपुरुषाविषयी (Psychic being) अधिक जागृत होती.

आणि आश्चर्य म्हणजे, ज्या क्षणापासून ती शाळेत जायला सुरुवात करतात, जेथे अस्तित्वाच्या बौद्धिक भागाकडे त्यांचे लक्ष वेधून घेईल असे गहन मानसिक शिक्षण ती घेतात, तेव्हापासून या चैत्यपुरुषाबरोबरचा असलेला त्यांचा संपर्क बहुधा ती नेहमीच व जवळजवळ पूर्णपणे हरवून बसतात.

जर तुम्ही अनुभवी निरीक्षक असाल, तर तुम्ही व्यक्तीच्या डोळ्यांत पाहूनच त्या व्यक्तीच्या आंतमध्ये काय चालू आहे ह्याविषयी सांगू शकाल. …डोळे हा आत्म्याचा आरसा असतो असे म्हटले जाते. पण जर डोळ्यांमधून अंतरात्मा अभिव्यक्त होत नसेल, तर त्याचे कारण असे असते की, तो खूप मागे गेलेला असतो, बऱ्याच गोष्टींनी झाकला गेलेला असतो. काळजीपूर्वकपणे लहान मुलांच्या डोळ्यांत पाहा, तुम्हाला त्यांच्या डोळ्यांत एक प्रकारचा प्रकाश दिसेल – काही जण त्याला निरागसता असे म्हणतात – ते इतके खरे असतात, ते जगाकडे कुतूहलाने टुकूटुकू पाहत असतात. हा कुतूहलाचा भाव चैत्यपुरुषाचा असतो, तो सत्य पाहत असतो पण त्याला या जगाविषयी फारशी काही माहिती नसते; कारण तो त्याच्यापासून फार दूर असतो. लहान मुलांमध्ये हे सारे असते पण जसजशी ती अधिकाधिक शिकत जातात, अधिकाधिक बुद्धिमान, अधिक शिक्षित होतात, तसतसे हे सारे पुसले जाते; आणि मग तुम्हाला त्यांच्या डोळ्यांमध्ये विचार, इच्छा, आवेग, दुष्टपणा – सारे काही दिसू लागते पण ती छोटीशी ज्योत, अत्यंत पवित्र, शुद्ध अशी ज्योत मात्र हरवलेली असते. तेव्हा तुम्ही खात्रीने सांगू शकता की, तेथे मनाचा प्रवेश झाला आहे आणि अंतरात्मा दूर खूप दूर गेलेला आहे.

ज्याचा मेंदू अजून पुरेसा विकसित झालेला नाही अशा मुलाकडे तुम्ही संरक्षणाचे किंवा प्रेमाचे, किंवा तळमळीचे किंवा सांत्वनाचे स्पंदन संक्रमित केलेत तर ते त्याला प्रतिसाद देते असे तुम्हाला आढळेल. पण जर तुम्ही एखाद्या शाळेत जाणाऱ्या चौदा वर्षाच्या मुलाचे उदाहरण घेतलेत की, ज्याचे आईवडील सामान्य आहेत आणि ज्यांनी त्याला सामान्य पद्धतीने वाढविले आहे, अशा मुलाबाबत त्याचे मन हे खूपच वर, पृष्ठस्तरावर आलेले आढळते; काहीतरी कठीण असे त्याच्या ठिकाणी असते, अंतरात्मा खूप दूर निघून गेलेला असतो. अशी मुले त्या कोणत्याच स्पंदनांना प्रतिसाद देत नाहीत. जणू काही ती प्लास्टर वा लाकडी ओंडक्याची बनलेली असावीत.

– श्रीमाताजी

(इंग्लंड मधील एक स्त्री आश्रमवासी कशी झाली त्याची कहाणी श्रीमाताजी सांगत आहेत…)

वरकरणी पाहिले तर, ती येथे आश्रमात येण्याचे कारण अगदीच मजेशीर होते. ती चारचौघींसारखीच होती, तरुण होती; तिचे लग्न ठरले होते पण ते झाले नाही; तिच्या होणाऱ्या नवऱ्याने दिलेला शब्द पाळला नाही. तेव्हा ती खूप दुःखीकष्टी झाली. ती खूप रडायची आणि त्यामुळे तिचा सुंदर चेहरा खराब होऊन गेला, तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या. आणि जेव्हा ती त्या दुःखाच्या भरातून बाहेर पडली, तेव्हा तिचे सौंदर्य लोप पावले होते. त्यामुळे ती खूप त्रस्त झाली. सौंदर्यसेवा पुरविणाऱ्या व्यावसायिकांचा तिने सल्लादेखील घेतला. त्यांनी तिला चेहऱ्यावर पॅराफिनची इंजेक्शन्स घेण्याचा सल्ला दिला आणि म्हणाले, “तसे केलेस तर मग तुझ्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडणार नाहीत.” तिला इंजेक्शन्स देण्यात आली पण त्यामुळे ईप्सित परिणाम साध्य होण्याऐवजी, तिच्या संपूर्ण चेहऱ्यावर त्याच्या गुठळ्या आल्या. ती दुःखाने चूर झाली कारण आता तर ती पूर्वीपेक्षा अधिकच कुरुप दिसू लागली होती.

मग तिला कोणी एक बुवा भेटले आणि त्यांनी तिला सांगितले, ”तुझा सुंदर चेहरा परत मिळविण्यासाठी येथे इंग्लडमध्ये काही उपाय नाहीत. भारतात जा, तेथे मोठेमोठे योगी आहेत, ते तुझे हे काम करतील.” आणि म्हणून ती इथे पाँन्डिचेरीला आली. तिने आल्याआल्या मला विचारले, ”माझा चेहरा किती खराब झाला आहे पाहा ना, तुम्ही मला माझे सुंदर रूप परत मिळवून द्याल का?” मी म्हणाले, “नाही.”

नंतर ती मला योगासंबंधी प्रश्न विचारू लागली आणि तेथेच ती खऱ्या अर्थाने प्रभावित झाली. तेव्हा ती मला म्हणाली, ”या सुरकुत्यांपासून माझी सुटका व्हावी म्हणून खरंतर मी भारतात आले, पण आत्ता तुम्ही मला जे काही सांगत आहात ते मला अधिकच भावते आहे. पण मग मी इथे कशी आले? इथे येण्याचे माझे खरे कारण तर हे नव्हते.”

तेव्हा मी तिला समजावून सांगितले की, “बाह्य व्यक्तिमत्त्वापेक्षा निराळे असेही काही असते. तुझ्यामधील चैत्य पुरुष (Psychic Being) तुला येथे घेऊन आला. चैत्य पुरुषाद्वारे बाह्य प्रेरणा ह्या केवळ निमित्तमात्र म्हणून वापरल्या जातात.”

– श्रीमाताजी
(CWM 05 : 03-04)

चैत्य पुरुषाचे जागृत होणे आणि तो पुढे येणे ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. चैत्य पुरुषाचे जागृत होणे म्हणजे मागे असलेल्या चैत्याची जाणीवपूर्वक कृती…

जेव्हा तो पुढे येतो तेव्हा तो मन, प्राण आणि शरीर यांच्यावर अधिराज्य गाजवतो आणि त्यांच्या सर्व हालचालींचे चैत्यीकरण करतो. विशेषत: अभीप्सा बाळगून व कोणतेही प्रश्न उपस्थित न करता, नि:शेषत्वाने श्रीमाताजींकडे पूर्णपणे वळल्याने आणि त्यांना समर्पित झाल्याने चैत्यपुरुष पुढे येतो. परंतु कधीकधी ‘आधार’ (मन, प्राण आणि शरीर) जर सक्षम झालेला असेल तर, अशावेळी तो स्वत:हूनच पुढे येतो.

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 354-355)

एखाद्या व्यक्तीला चैत्य पुरुषाचा शोध घ्यावयाचा असेल, तर त्या व्यक्तीला चैत्य पुरुषाच्या अस्तित्वाविषयी दृढ विश्वास व श्रद्धा असणे, अपेक्षित आहे. व्यक्ती त्याविषयी जागरुक व्हावयास हवी आणि चैत्य पुरुषाने आपले जीवन हाती घेऊन, आपल्या कृतींना दिशादर्शन करणे हाती घ्यावे ह्यासाठी, व्यक्तीने त्याला संमती दिली पाहिजे. व्यक्तीने प्रत्येक वेळी त्याचा संदर्भ घेऊन, त्याला आपले मार्गदर्शक बनविले पाहिजे. व्यक्ती चैत्य पुरुषाला अधिकाधिक आत्मनिवेदन करत गेली, त्याचे मार्गदर्शन अधिकाधिक घेत राहिली तर, व्यक्ती स्वत:च्या अस्तित्वाच्या विविध गतिविधींविषयी जागरुक होते.

*

प्रश्न : चैत्य पुरुषाच्या संपर्कात येणे ही ‘सोपी गोष्ट’ नाही, असे तुम्ही मला लिहिले आहे. ते कठीण असते, असे तुम्ही का म्हणता? त्यासाठी मी कोठून सुरुवात करू?

श्रीमाताजी : मी ते ‘सोपे नाही’ असे म्हटले कारण तो संपर्क हा आपोआप घडत नाही, तो ऐच्छिक असतो. विचार व कृतींवर चैत्य पुरुषाचा नेहमीच प्रभाव पडत असतो, पण व्यक्तीला क्वचितच त्याची जाणीव असते. चैत्य पुरुषाबाबत सजग होण्यासाठी, व्यक्तीला तशी इच्छा हवी, तिने आपले मन शक्य तितके नि:स्तब्ध केले पाहिजे आणि स्वत:च्या हृदयात खोलवर प्रवेश केला पाहिजे, संवेदना व विचारांच्याही पलीकडे प्रवेश केला पाहिजे. शांत एकाग्रतेची आणि स्वत:च्या अस्तित्वात आत खोलवर उतरण्याची सवय व्यक्तीने लावून घ्यायला हवी. ज्यांनी ज्यांनी हा अनुभव घेतला आहे, त्यांना माहीत आहे त्याप्रमाणे, चैत्य पुरुषाचा शोध ही एक सुनिश्चित आणि अतिशय सघन अशी वास्तविकता आहे.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 302) आणि (CWM 16 : 399)

वस्तुत: खरंतर जी एकमेव शोकात्म गोष्ट आहे आणि तरीही ज्याची मनुष्याला खंत वाटत नाही, ती गोष्ट म्हणजे स्वत:च्या आत्म्याचा शोध घेण्यात आणि आत्मसत्तेनुसार जीवन जगण्यामध्ये त्याला आलेले अपयश ! स्वत:च्या आत्म्याविषयी, स्वत:च्या चैत्य पुरुषाविषयी (Psychic Being) जागृत न होणे आणि जीवनामध्ये पूर्णतया त्याचे मार्गदर्शन न लाभणे, हीच खरोखर एकमेव शोकात्म गोष्ट आहे. स्वत:च्या आत्म्याचा शोध घेतल्याशिवाय आणि त्याच्या कायद्यानुसार जीवन जगल्याशिवाय मरण पावणे, हे खरेखुरे अपयश आहे.

आणि खरे महाकाव्य, खरे वैभव जर कोणते असेल तर, ते म्हणजे स्वत:मधील ईश्वराचा शोध घेणे आणि त्याच्या कायद्यानुसार जीवन व्यतीत करणे.

– श्रीमाताजी
(CWM 10 : 277)

प्रश्न : “आपल्या गुप्त प्रकृतीमध्ये, असे काहीतरी असते की जे कळत-नकळतपणे, नेहमीच ईश्वराची आस बाळगत असते, म्हणून तो ईश्वर हाच आपले एकमेव उद्दिष्ट असले पाहिजे.” असे येथे म्हटले आहे. आपल्या गुप्त प्रकृतीमध्ये आस बाळगून असणारी ही गोष्ट कोणती?

श्रीमाताजी : तो आपल्या अस्तित्वाचा एक भाग असतो, परंतु तो प्रत्येकाच्या बाबतीत सारखाच नसतो. तो प्रत्येक व्यक्तीमधील असा एक घटक असतो की, जो उपजतपणे चैत्याच्या प्रभावासाठी खुला असतो. प्रत्येकामध्ये नेहमीच असा एक घटक असतो – काहीकाही वेळा चैत्य खरोखरच खूप झाकलेले असते, आपण त्याविषयी अजिबात जागृत नसतो – आपल्यातील तो घटक मात्र चैत्याकडे वळलेला असतो आणि त्याचा प्रभाव स्वीकारत असतो. हा घटक, आपली बाह्य जाणीव आणि चैत्य जाणीव यांच्यामधील मध्यस्थ असतो.

हा घटक प्रत्येकाच्या बाबतीत एकच असतो असे नाही तर, प्रत्येक व्यक्तिगणिक तो भिन्न असतो. व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये किंवा व्यक्तिमत्त्वामध्ये असा एक घटक असतो की, ज्याच्या माध्यमातून ती व्यक्ती चैत्याला स्पर्श करू शकते आणि त्या माध्यमातून ती चैत्य प्रभाव स्वीकारू शकते. ते व्यक्तीवर अवलंबून असते. प्रत्येक व्यक्तीनुसार ही गोष्ट वेगवेगळी असते, परंतु प्रत्येकामध्ये असा एक घटक असतोच असतो.

तुम्हाला असे सुद्धा जाणवू शकते की, काही ठरावीक गोष्टी अशा असतात की, ज्या तुम्हाला एकदम पुढे रेटतात, तुमचे उन्नयन करण्यास त्या मदत करतात, कोणत्या तरी अधिक महान अशा एखाद्या गोष्टीकडचा दरवाजा त्या जणू उघडून देतात. अशा बऱ्याच गोष्टी असतात, पण ते प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीवर अवलंबून असते. व्यक्तीमधील तो एक असा घटक असतो की, जो इतर घटकांपेक्षा अधिक उत्सुक असतो. त्या घटकाला अधिक हुरुप असतो.

येथे दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. ही अशी एक ‘उत्साहवर्धक क्षमता’ असते की जी, व्यक्तीला तिच्या कमीअधिक जडतेमधून बाहेर काढते आणि ज्यामुळे ती व्यक्ती प्रभावित झाली होती त्या गोष्टीमध्ये कमीअधिक प्रमाणात पूर्णपणे झोकून देण्यास व्यक्तीला प्रवृत्त करते. उदाहरणार्थ, कलाकाराला त्याची कला किंवा शास्त्रज्ञाला त्याचे विज्ञान जसे प्रवृत्त करते त्याप्रमाणे…. आणि साधारणत:, जी व्यक्ती काही निर्मिती करते, काही घडवते तिच्यामध्ये हे अशा प्रकारचे खुलेपण असते, एका असामान्य क्षमतेसाठी ती व्यक्ती खुली असते, ज्यामुळे तिच्यामध्ये एक हुरुप येतो. जेव्हा अशी निर्मितीक्षमता सक्रिय होते तेव्हा व्यक्तीमधील कोणतीतरी एक गोष्ट जागृत होते आणि त्यामुळे ज्या गोष्टीची निर्मिती चालू आहे त्यामध्ये, त्या व्यक्तीचे समग्र व्यक्तित्वच सहभागी होते. ही झाली पहिली गोष्ट.

आणि असे काही जण असतात की, ज्यांच्यामध्ये उपजतच कृतज्ञतेची एक शक्ती असते; या समग्र जीवनाच्या पाठीमागे दडून असलेले जे आश्चर्य आहे असे त्यांना वाटते त्या गोष्टीप्रत, आत्मीयतेने, भक्तीने, आनंदाने प्रतिक्रिया देण्याची, प्रतिसाद देण्याची एक उत्कट गरज त्यांना भासते. अगदी छोट्यात छोट्या अशा गोष्टीमागे, जीवनातील अगदी लहानशा घटनेमागे, ज्यांना त्या ईश्वराची अनंत कृपा किंवा सार्वभौम सौंदर्य जाणवते अशा लोकांमध्ये त्या ईश्वराप्रत एक प्रकारची कृतज्ञतेची भावना असते.

मला अशी काही माणसं माहीत आहेत की, ज्यांना काही ज्ञान नव्हते, म्हणजे ते काही फार शिकलेले होते असेही नाही, त्यांची मनं ही अगदीच सर्वसाधारण म्हणता येतील अशी होती परंतु त्यांच्याकडे ही आत्मीयतेची, कृतज्ञतेची भावना होती, त्या भावनेमुळेच ते सर्व काही द्यायला तयार असत, त्या भावनेपोटीच त्यांना समज येत असे आणि ते कृतज्ञ असत. अशा व्यक्तींबाबत, अगदी नेहमी, सातत्याने हा चैत्य संपर्क होत असे.. ते जेवढ्या प्रमाणात सक्षम असत, जेवढ्या प्रमाणात सजग असत – अगदी खूप सजग असेसुद्धा नाही, थोडे जरी सजग असत तेवढ्या प्रमाणात त्यांचे उन्नयन झाल्यासारखे, त्यांना कोणीतरी उचलून घेतल्याचे, त्यांना साहाय्य मिळाल्याचे जाणवत असे.

‘उत्साहवर्धक क्षमता’ आणि ‘कृतज्ञतेची भावना’ ह्या दोन गोष्टी व्यक्तींची तयारी करून घेत असतात. ही किंवा ती गोष्ट घेऊन व्यक्ती जन्माला येते आणि थोडेसे जरी कष्ट घेतले तर ती गोष्ट हळूहळू वृद्धिंगत होते, विकसित होत जाते. म्हणजे, तुम्हाला तुमच्या क्षुद्र आणि त्रासदायक अशा अहंकारातून बाहेर काढते अशी तुमच्यामधील उत्साहवर्धक क्षमता ही एक गोष्ट किंवा दुसरी गोष्ट म्हणजे, अशी उदारहृदयी कृतज्ञता, की ज्यामुळे तुम्ही तुमच्या क्षुद्र अशा अहंकारातून बाहेर पडून, कृतज्ञतेने समर्पित होऊ पाहता अशी कृतज्ञतेची उदारता!

स्वत:च्या चैत्य पुरुषामध्ये वसलेल्या ईश्वराच्या संपर्कात येण्यासाठीच्या या अतिशय शक्तिशाली तरफा आहेत. ह्या गोष्टी चैत्य पुरुषाशी जोडणारा एक खात्रीशीर धागा म्हणून काम करतात.

– श्रीमाताजी
(CWM 07 : 417-19)

प्रश्न : चैत्य पुरुषाच्या संपर्कात येणे ही ‘सोपी गोष्ट’ नाही, असे तुम्ही मला लिहिले आहे. ते कठीण असते, असे तुम्ही का म्हणता? त्यासाठी मी कोठून सुरुवात करू?

श्रीमाताजी : मी ते ‘सोपे नाही’ असे म्हटले कारण तो संपर्क हा आपोआप घडत नाही, तो ऐच्छिक असतो. विचार व कृतींवर चैत्य पुरुषाचा नेहमीच प्रभाव पडत असतो, पण व्यक्तीला क्वचितच त्याची जाणीव असते. चैत्य पुरुषाबाबत सजग होण्यासाठी, व्यक्तीला तशी इच्छा हवी, तिने आपले मन शक्य तितके नि:स्तब्ध केले पाहिजे आणि स्वत:च्या हृदयात खोलवर प्रवेश केला पाहिजे, संवेदना व विचारांच्याही पलीकडे प्रवेश केला पाहिजे. शांत एकाग्रतेची आणि स्वत:च्या अस्तित्वात आत खोलवर उतरण्याची सवय व्यक्तीने लावून घ्यायला हवी. ज्यांनी ज्यांनी हा अनुभव घेतला आहे त्यांना माहीत आहे त्याप्रमाणे, चैत्य पुरुषाचा शोध ही एक सुनिश्चित आणि अतिशय सघन अशी वास्तविकता आहे.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 399)

प्रश्न : प्रत्येकातील चैत्य पुरुष (Psychic Being) नेहमी शुद्धच असतो का? की, तो शुद्ध करावा लागतो?
श्रीमाताजी : अस्तित्वामधील चैत्य पुरुष हा नेहमीच अतिशय शुद्ध असतो, कारण अस्तित्वाचा हा एक असा भाग आहे की, जो ईश्वराच्या संपर्कात असतो आणि अस्तित्वाचे सत्य तो अभिव्यक्त करत असतो. परंतु हा चैत्य पुरुष म्हणजे व्यक्तिच्या अस्तित्वाच्या अंधकारातील एक ठिणगी असू शकते किंवा तो जागृत, पूर्ण विकसित व स्वतंत्र असा प्रकाशमय पुरुष असू शकतो. या दोहोंच्या दरम्यान अनेक श्रेणी असतात.

प्रश्न : तो सहसा झाकलेलाच असतो का?
श्रीमाताजी : बाह्यवर्ती जाणीव (Outer consciousness) ही त्याच्या संपर्कात असत नाही, कारण ती आतमध्ये वळलेली असण्याऐवजी, बाहेरच्या दिशेला वळलेली असते कारण ती बाह्य गोंगाट, हालचाली या साऱ्यांमध्ये जगत असते. अंतरंगामध्ये पाहण्याऐवजी, अस्तित्वाच्या तळाशी पाहण्याऐवजी आणि आंतरिक प्रेरणांचे ऐकण्याऐवजी, ती जाणीव बाह्यामध्ये जे काही पाहते, जे काही करते, जे काही बोलते त्या साऱ्या गोष्टींमध्येच वावरत असते.

प्रश्न : चैत्य पुरुषाकडे कोणती शक्ती असते का?
श्रीमाताजी : सहसा, जीवाला मार्गदर्शन करणारा चैत्य पुरुषच तर असतो. व्यक्तीला त्याविषयी काहीच माहीत नसते कारण व्यक्ती त्याविषयी जागृत नसते, परंतु चैत्य पुरुषच सहसा जीवाला मार्गदर्शन करत असतो. जर का व्यक्ती सावध राहिली तर, व्यक्तीला त्याची जाण येते. परंतु बहुसंख्य लोकांना त्याची पुसटशी देखील कल्पना नसते.

उदाहरणार्थ, त्यांनी काहीतरी करावयाचे ठरविलेले असते, अर्थात त्यांच्या बाह्यवर्ती अज्ञानापोटीच, काहीतरी करावयाचे ठरविलेले असते आणि सारे काही असे घडत जाते की, जे करायचे ठरविले होते त्याऐवजी ते काहीतरी भलतेच करून बसतात आणि मग ते चिडतात, त्रागा करता, दैवाला दोष देत, संताप व्यक्त करत राहतात (ते ज्याच्या त्याच्या भावना व श्रद्धा यांवर अवलंबून असते.) ते म्हणत राहतात, प्रकृती दुष्ट आहे, किंवा नियती निर्दयी आहे किंवा मग देवच अन्यायी आहे किंवा…असेच काहीही. (ते ज्याच्या त्याच्या समजुतींवर अवलंबून असते.) खरंतर, बरेचदा तीच परिस्थिती त्यांच्या आंतरिक विकासासाठी अत्यंत अनुकूल अशी असते.

तुम्हाला आरामदायी जीवन हवे आहे, पैसा हवा आहे, कुलदीपक अशी मुलेबाळे हवी आहेत, त्या साऱ्या गोष्टी मिळाव्यात म्हणून मला मदत कर, असे जर तुम्ही तुमच्या चैत्य पुरुषाला सांगाल तर तो तुम्हाला त्यात साहाय्य करणार नाही, हे उघडच आहे. परंतु जेणेकरून, ईश्वराशी एकरूप होण्याची निकड तुमच्या जाणिवेमध्ये उत्पन्न व्हावी, असे काहीतरी तुमच्यामध्ये जागृत होईल, अशी परिस्थिती मात्र तो तुमच्यासाठी निर्माण करेल.

तुम्ही आखलेल्या चांगल्याचांगल्या योजना जर यशस्वी झाल्या, तर तुमच्या बाह्य अज्ञानाचे, तुमच्या मूर्ख क्षुल्लक महत्त्वाकांक्षांचे आणि तुमच्या ध्येयहीन कृतींचे आवरण अधिकाधिक घट्ट होत जाईल अशी शक्यता असते. परंतु जेव्हा तुम्हाला मोठा धक्का बसतो, ज्याची तुम्ही अभिलाषा बाळगली होती ते पद तुम्हाला नाकारले जाते, तुमच्या योजना छिन्नविछिन्न होऊन जातात, जेव्हा तुम्ही पूर्णपणे विफल झालेले असता तेव्हा, कधीकधी ही प्रतिकूलताच तुमच्यासाठी अधिक सत्य आणि अधिक सखोल अशा कोणत्यातरी गोष्टींची दारे खुली करून देते.

आणि मग नंतर कधीतरी, जेव्हा तुम्ही थोडेसे जागृत असता आणि मागे वळून पाहू लागता तेव्हा, तुम्ही थोडेसे जरी प्रामाणिक असाल तर तुम्ही म्हणता, “खरंच की ! तेव्हा माझे म्हणणं बरोबर नव्हते – प्रकृती किंवा ईश्वरी कृपा किंवा माझा चैत्य पुरुष ह्यांचेच बरोबर होते, त्यांनीच हे सारे घडवून आणले आहे.” तो चैत्य पुरुषच असतो की, ज्याने हे सारे घडवून आणलेले असते.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 393-394)

आपल्यामधील चैत्य घटक हा असा भाग असतो की, जो थेट ईश्वराकडून आलेला असतो आणि ईश्वराच्या संपर्कामध्ये असतो. मूलत: चैत्य घटक म्हणजे दिव्य शक्यतांनी गर्भित असलेले असे एक केंद्र असते की जे, मन-प्राण-शरीर यांच्या कनिष्ठ आविष्कारत्रयीला आधार पुरविते. हे ईश्वरी वा दिव्य तत्त्व सर्व सजीवांमध्ये असते; पण ते सामान्य चेतनेच्या मागे लपलेले असते. ते केंद्र प्रथमत: विकसित झालेले नसते आणि जरी अगदी विकसित झालेच तरीही, ते नेहमीच किंवा बहुतांशी वेळा पुढे आलेले नसते; मन-प्राण-शरीर या साधनांच्या अपूर्णतांकडून जेवढी मुभा मिळेल तेवढेच, त्यांच्या माध्यमातूनच आणि त्यांच्या मर्यादांमध्ये राहूनच, हे तत्त्व स्वत:ला अभिव्यक्त करते.

ईश्वरानुगामी अनुभूतींच्या योगे, त्याची चेतनेमध्ये वृद्धी होत असते; आपल्यामध्ये जेव्हा जेव्हा उच्चतर क्रिया होते, त्या प्रत्येक वेळी त्याला सामर्थ्य प्राप्त होत जाते आणि सरतेशेवटी, ह्या सखोल आणि उच्चतर अशा गतिविधींच्या संचयामधून चैत्य व्यक्तित्वाची घडण होते आणि त्यालाच आपण सर्वसाधारणत: ‘चैत्य पुरुष वा चैत्य अस्तित्व’ असे म्हणतो.

मनुष्य आध्यात्मिक जीवनाकडे वळण्याचे निमित्त-कारण खरंतर हाच चैत्य पुरुष असतो; ह्या चैत्यपुरुषाचीच मनुष्याला सर्वात अधिक मदत होत असते पण बरेचदा हे निमित्त-कारणच अनभिज्ञ राहते. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या ह्या पूर्णयोगामध्ये त्याला मागून पुढे पृष्ठभागी आणले पाहिजे.

इंग्रजी भाषेमध्ये ‘आत्मा आणि चैत्य पुरुष’ (Soul & Psychic) हे दोन्ही शब्द अगदीच ढोबळमानाने आणि विविध अर्थांनी वापरले जातात. बहुतांशी वेळा तर, मन आणि आत्मा ह्यांमध्ये स्पष्ट फरकच केला जात नाही आणि त्यापेक्षा अधिक गंभीर गोंधळ पुढील बाबतीत केला जातो : ‘आत्मा’ वा ‘चैत्य’ या शब्दाद्वारे त्यांना, खराखुरा आत्मा वा चैत्य पुरुष अभिप्रेत नसतो, तर इच्छावासनांचे प्राणिक अस्तित्व – म्हणजे वासनात्मा वा भ्रामक आत्मा (desire-soul) हाच अभिप्रेत असतो.

मन वा प्राण यांपासून चैत्य पुरुष हा पूर्णत: भिन्न असतो; मन व प्राण दोघेही हृदयस्थानी जिथे एकत्रित येतात तेथे, तो त्यांच्या पाठीमागे उभा असतो. त्याचे मध्यवर्ती स्थान तेथे असते, हृदयात नव्हे तर, हृदयाच्या पाठीमागे असते. हृदय हे भावभावनांचे स्थान असते, असे लोक सहसा ज्याविषयी म्हणतात, त्या मानवी भावभावना म्हणजे मानसिक प्राणिक आवेग असतात; त्या सहसा चैत्य स्वरूपाच्या असत नाहीत. मन आणि प्राणशक्तीपेक्षा भिन्न असणारी, पार्श्वस्थानी असणारी ही बहुतांशी गुप्त शक्ती म्हणजे खरा आत्मा होय, आपल्यातील चैत्य पुरुष होय.

वास्तविक, चैत्य पुरुषाची शक्ती ही मन, प्राण व शरीर यांच्यावर कार्य करू शकते, विचारांचे, बोधाचे, भावनांचे (ह्याच भावना नंतर चैत्य भावना बनतात) तसेच संवेदना, कृती आणि आपल्यातील इतर सर्वच गोष्टींचे शुद्धीकरण करते आणि त्यांनी दिव्य गतिविधी बनावे म्हणून त्यांची पूर्वतयारी करून घेते.

भारतीय भाषांमध्ये या चैत्य पुरुषाचे वर्णन ‘हृदयामधील पुरुष’ असेही केले जाते. येथे आंतरहृदयाचा किंवा गुप्त असणाऱ्या हृदयाचा (हृदये गुहायाम्) असा बोध व्हावयास हवा.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 103-104)

मानवातील दिव्यत्वाचा प्रतिनिधी म्हणजे ‘चैत्य पुरुष’ (Psychic Being) होय. असे पाहा की, ईश्वर ही काहीतरी दूर कोठेतरी, अप्राप्य असणारी अशी गोष्ट नाही. ईश्वर तुमच्या अंतरंगामध्येच आहे पण तुम्हाला मात्र त्याची पूर्ण जाणीव नाही.

खरंतर…आत्ता तो तुमच्यामध्ये ‘अस्तित्व’ असण्यापेक्षा, ‘प्रभाव’ या स्वरूपात कृती करतो. पण तो एक जितेजागते अस्तित्व असला पाहिजे. तो काय आहे? कसा आहे? ईश्वर या जगाकडे कोणत्या दृष्टीने पाहतो? इ. प्रश्न, तुम्ही प्रत्येक क्षणी स्वत:लाच विचारू शकला पाहिजेत. प्रथम ईश्वर कसा पाहतो, मग ईश्वर इच्छा कशी बाळगतो आणि अंतत: ईश्वर कशा रीतीने कार्य करतो; असा विचार करावयास हवा. आणि हे शोधण्यासाठी कोणत्यातरी निर्जन प्रदेशामध्ये जाण्याची जरुरी नाही, तो अगदी येथेच आहे.

फक्त इतकेच की, आत्ताच्या या घडीला आपल्यातील सर्व जुन्या सवयी व सर्वसामान्य अचेतना यांनी आपल्यावर एक प्रकारचे आवरण निर्माण केले आहे आणि ते आवरणच आपल्याला त्याला पाहण्यापासून व त्याच्या संवेदनेपासून रोखत आहे. तुम्ही ते आवरण दूर केलेच पाहिजे.

खरं तर, तुम्ही आता एक जाणीवयुक्त असे साधन बनले पाहिजे – ईश्वराविषयी जागरूक बनले पाहिजे. बहुधा यासाठी एक उभे आयुष्य खर्ची पडते, तर कधीकधी काही लोकांना त्यासाठी जन्मानुजन्मं लागू शकतात. इथे सद्यस्थितीत तुम्ही काही महिन्यातच ते करू शकता. ज्यांच्यापाशी अतिउत्कट अशी अभीप्सा आहे, ते अगदी थोड्या महिन्यातच हे साध्य करून घेऊ शकतील.

-श्रीमाताजी
(CWM 12 : 428)