Tag Archive for: चेतना

चेतनेचा प्रवाह दुतर्फा असतो. पहिल्या प्रथम आरोहण किंवा ऊर्ध्वगमन असते; तुम्ही स्वत:ला जडभौतिक चेतनेमधून काढून, उच्चतर पातळ्यांवरील चेतनेमध्ये वर उचलून घेता. निम्नतर प्रतलामधून उच्चतर प्रतलावर होणारे हे आरोहण, उच्चतराने निम्नतर प्रतलावर अवतरित व्हावे अशी त्याला साद घालत असते. जेव्हा तुम्ही पृथ्वीच्या वर उठता तेव्हा, तुम्ही या पृथ्वीच्या वर असणारे असे काहीतरी खाली उतरवता – कोणतातरी प्रकाश, रुपांतरकारी अशी कोणतीतरी शक्ती, किंवा जुन्या प्रकृतीचे रूपांतरण घडवून आणण्याकडे जिचा कल असतो अशा शक्तीचे अवतरण घडवता.

आणि मग, ज्या गोष्टी वेगवेगळ्या होत्या, एकमेकांशी असंलग्न होत्या, एकमेकींपासून विलग होत्या; जसे की, तुमच्यामधील उच्चतर आणि निम्नतर स्तर, तुमच्या व्यक्तित्वाचे आंतरिक आणि बाह्य स्तर ह्या गोष्टी आता एकमेकांना भेटू लागतात, हळूहळू त्या एकमेकांमध्ये मिसळू लागतात आणि कालांतराने एका सुसंवादामध्ये एक सत्य बनून, एकरूप होतात. ज्याला चमत्कार चमत्कार असे म्हणतात ते असे घडून येतात.

हे विश्व चेतनेच्या अगणित स्तरांचे बनलेले आहे आणि त्या प्रत्येक स्तराचे, त्या प्रतलाचे स्वत:चे असे काही खास नियम असतात, कायदे असतात; एका स्तराचे कायदे दुसऱ्याला लागू पडत नाहीत. चमत्कार म्हणजे दुसरे तिसरे काही नसून, अचानक घडून आलेले अवतरण असते; एका वेगळ्या स्तरावरील चेतनेचे आणि तिच्या शक्तींचे उसळून येणे असते. बहुधा या प्राणिक शक्ती असतात आणि त्यांचे या जडभौतिक स्तरावर अवतरण होते. जडभौतिक यंत्रणेवर उच्चतर स्तरावरील यंत्रणेकडून वर्षाव होतो. जणू काही एका वीजकल्लोळाद्वारे आपल्या सामान्य चेतनेचे ढग भेदले जातात आणि त्यामध्ये उच्चतर शक्तींचा, गतिविधींचा, प्रवाहांचा वर्षाव होतो. आणि त्या परिणामाला आपण चमत्कार म्हणतो. कारण आपल्याला अचानक झालेला बदल दिसतो; आपल्या सामान्य पातळीवरील निसर्गकायद्यामध्ये आकस्मिक हस्तक्षेप झालेला आपल्याला दिसतो पण आपल्याला त्याचा क्रम, ती व्यवस्था, त्याचे कारण काय हे काहीच कळत नाही, दिसू शकत नाही कारण त्या चमत्काराचा स्रोत हा एका वेगळ्या स्तरावर असतो.

आपल्या जडभौतिक विश्वामध्ये त्यापलीकडील जगतांचा असा हस्तक्षेप होणे ही फार काही जगावेगळी घटना नाही, किंबहुना अशा घटना या सतत इंद्रियगोचर सुद्धा असू शकतात; आपल्याला त्या पाहण्याची दृष्टी असेल आणि त्यांचे निरीक्षण कसे करावे ह्याची जाण जर आपल्याला असेल तर असे पुष्कळ चमत्कार आपल्याला पदोपदी दिसू शकतील. विशेषत: उच्चतर स्तरावरील वैभवाचे, पृथ्वी-चेतनेमध्ये अवतरण घडवून आणण्यासाठी जे प्रयत्नशील असतात त्यांच्याबाबतीत तर ती नित्याची बाब असू शकते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 29-31)

चेतना म्हणजे केवळ स्वत:बद्दलची किंवा वस्तुमात्रांबाबतची जाणीव शक्ती नव्हे; तर ती एक गतिमान आणि क्रियाशील ऊर्जा आहे. किंवा तिच्याकडे गतिमान आणि क्रियाशील ऊर्जा असते. ती तिच्या प्रतिक्रिया ठरवू शकते किंवा या प्रतिक्रियांपासून स्वत:ला वेगळी राखू शकते; ती शक्तींना फक्त प्रतिक्रियाच देते असे नाही, तर ती या शक्ती निर्माण करू शकते किंवा स्वत:मधून शक्तींना बाहेरही काढू शकते.

चेतना म्हणजे फक्त चित नाही, तर चित्शक्तीदेखील आहे. चेतनेचा संबंध हा सहसा मनाशी जोडला जातो, पण मानसिक जाणीव ही अशी एक मानवी कक्षा आहे की, त्या कक्षेपलीकडील चेतनेच्या सर्व संभाव्य श्रेणींना ती कवळून घेऊ शकत नाही. मानवाला जे दिसू शकते किंवा ऐकू येते अशा श्रेणींच्या वर आणि खालीसुद्धा अनेक श्रेणी असतात; त्या श्रेणी मानवाला अदृश्य किंवा अश्राव्य असतात. मानवाची दृष्टी रंगांच्या किंवा मानवाची श्रवणशक्ती ध्वनींच्या सर्व श्रेणी कवळू शकत नाही; मानवी चेतनेचेदेखील असेच असते.

मानवी कक्षेच्या वर आणि खालीदेखील चेतनेच्या अनेक श्रेणी आहेत; त्यांच्याशी सामान्य मानवाचा संपर्क नसतो आणि त्यामुळे त्या श्रेणी त्याला एकतर अचेतन, अधोमानसिक किंवा अधिमानसिक, अतिमानसिक अशा भासतात.

-श्रीअरविंद
(CWSA 28 : 15-16)

चेतना ही अस्तित्वामध्ये सहजस्वाभाविकपणे असणारी एक वस्तुस्थिती आहे. पृष्ठवर्ती भागामध्ये क्रियाशील नसताना जेव्हा ती शांत, गतिविहिन असते तेव्हाही ती तेथेच असते. वरवर पाहता ती दिसत नाही, किंवा बाह्य गोष्टींवर कोणतीही प्रतिक्रिया देत नाही, त्यांविषयी ती जागृत नाही असे वाटत असले तरीही ती तेथे असते; अंतरंगामध्ये ती अंतर्मुख पद्धतीने, क्रियाशील किंवा निष्क्रिय स्वरूपात असते; तिचे अस्तित्वच नाही असे आपल्याला वाटत असते; किंवा आपल्याला तिचे अस्तित्व अगदी अचेतन किंवा निर्जीव असे भासत असते तरीही ही चेतना तेथे असते.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 15)

प्रश्न : चेतना म्हणजे काय?

श्रीमाताजी : अनेक स्पष्टीकरणांपैकी एकाची निवड करावयाचा मी प्रयत्न करते. गंमतीदाखल म्हणायचे तर, अचेतनेच्या विरोधी जी असते ती चेतना. दुसरे एक स्पष्टीकरण…

विश्वाचे सृजनात्मक सत्त्व म्हणजे चेतना. चेतनेविना हे ब्रह्मांड नाही; कारण चेतना म्हणजे उत्पत्ती. चेतना म्हणजे जे आहे ते सर्व. कारण चेतनेविना काहीच नाही – हे उत्तम स्पष्टीकरण आहे. चेतनेविना जीवन नाही, प्रकाश नाही, उत्पत्ती नाही, सृष्टी नाही, ब्रह्मांड नाही. चेतना ही सर्व निर्मितीचे मूळ आहे. चेतना नाही तर निर्मिती नाही, सृष्टी नाही.

आपण ज्याला ‘जाणीव’ असे संबोधतो तिचा परमोच्च चेतनेशी फारच दूरान्वयाने संबंध आहे, त्यामध्ये कोणताही नेमकेपणा, निश्चितपणा नाही. जर म्हणावयाचेच झाले तर ते प्रतिबिंब आहे असे म्हणता येईल; पण ते मूळ चेतनेचे यथार्थ किंवा शुद्ध प्रतिबिंब नव्हे. ज्याला आपण आपली जाणीव असे म्हणतो ती म्हणजे मूळ चेतनेचे व्यक्तिरूप आरशामध्ये पडलेले धूसर असे प्रतिबिंब आहे. (कधी धूसर तर कधी विरूप.) ह्या प्रतिबिंबाच्या आधारे, सावकाशपणे मागे जात जात, जे प्रतिबिंबित झाले आहे त्याच्या मुळाशी, उगमाशी आपण गेलो तर आपण त्या सत्य चेतनेच्या संपर्कात येऊ शकतो.

आणि एकदा का आपण त्या सत्य-चेतनेच्या संपर्कात आलो की, मग आपल्याला जाणीव होते की, ती सत्य-चेतना सर्वत्र सारखीच आहे, केवळ विरूपीकरणामुळे तिच्यामध्ये भेद उत्पन्न होतात. जर विरूपीकरण नसेल तर सर्वकाही त्या एकाच आणि एकमेव चेतनेमध्ये सामावलेले आहे. म्हणजेच असे की, या विपर्यासातून, विपर्यास करणाऱ्या आरशातील प्रतिबिंबातूनच चेतनेमधील विभिन्नता आणि भेदाभेद निर्माण होतात, अन्यथा ती एकच एक अशी चेतना आहे. पण व्यक्ती ह्या साऱ्या गोष्टी फक्त अनुभवानेच जाणू शकते.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 233-34)

समाजजीवनात धर्माची आवश्यकता असते, कारण सामूहिक अहंकारावर उपाय म्हणून धर्माचा उपयोग होतो, या नियंत्रणाविना हा सामूहिक अहंकार प्रमाणाबाहेर वाढू शकतो.

व्यक्तीच्या चेतनेच्या पातळीपेक्षा सामूहिक चेतनेची पातळी नेहमीच निम्न असते, हे लक्षात येण्याजोगे आहे. उदा. जेव्हा माणसं मोठ्या संख्येने एखाद्या गटात एकत्रित येतात तेव्हा त्यांच्या चेतनेची पातळी खूप घसरते. जमावाची चेतना ही व्यक्ती-चेतनेपेक्षा खालच्या स्तरावरची असते आणि समाजाची सामूहिक चेतना ही, ज्या व्यक्तींनी तो समाज बनलेला आहे त्या व्यक्तींच्या चेतनेपेक्षा खचितच खालच्या पातळीवरची असते. त्यासाठी धर्माची आवश्यकता आहे. सामान्य जीवनात, व्यक्तीला त्याची जाणीव असो वा नसो, तिला नेहमीच एक धर्म असतो, कधीकधी ह्या धर्माचे उद्दिष्ट अगदी कनिष्ठ प्रकारचे देखील असू शकते….

ती व्यक्ती ज्या देवाची पूजा करते ती यशाची देवता असेल, पैशाची देवता असेल, सत्तेची देवता असेल, किंवा अगदी कुलदेवता असेल, मुलाबाळांची देवता, कुटुंबाची किंवा कुळाची देवता, पूर्वजांची देवता असू शकेल.

धर्म हा नेहमीच अस्तित्वात असतो. प्रत्येक व्यक्तीगणिक त्या धर्माचा दर्जा वेगवेगळा असेल, पण अस्तित्वाचा केंद्रबिंदू असणाऱ्या कोणत्याही मूलभूत आदर्शाविना नुसतेच जीवन जगत राहणे हे माणसाला कठीण असते. बऱ्याचदा त्याला त्याच्या आदर्शाची जाणही नसते आणि जर त्याला विचारले की, तुझा आदर्श काय तर तो शब्दांतदेखील सांगू शकणार नाही, पण त्याचा काही एक धर्म असतो, भले तो अस्पष्ट, धूसर असेल, पण त्याच्या जीवनाच्या दृष्टीने ती खूप मोलाची गोष्ट असते.

बहुतांशी लोकांसाठी ते एक प्रकारचे संरक्षण असते. व्यक्तीला त्यामुळे जगण्यासाठी सुरक्षित वाटेल अशी परिस्थिती प्राप्त होते. त्याच्या दृष्टीने ते फार मोठे ध्येय असते. मानवी प्रयत्नांमागची ती एक मोठी प्रेरणा असते असेही म्हणता येईल. काही लोकांसाठी समाधान ही मोठी गोष्ट असते, तर काही जणांसाठी मौजमजा, चैन ही गोष्ट मोठी असते.

ह्या गोष्टी खरंतर खूप निम्न स्तरावरच्या आहेत आणि त्याला एका ध्येयाचे नाव देण्याची इच्छाही होत नाही, पण त्या गोष्टी धर्माची रूपे आहेत; त्या गोष्टी म्हणजे असे काहीतरी होय की ज्यासाठी व्यक्तीला आपले संपूर्ण जीवन खर्ची घालावे असे वाटू शकते…. आधार म्हणून अशा गोष्टींचा वापर करून, अनेक गोष्टी मानवावर आपला प्रभाव टाकण्याची धडपड करीत असतात. माणसांमधील असुरक्षिततेची भावना, अनिश्चिततेची भावना ह्याच गोष्टींचा वापर करून, राजकीय किंवा धार्मिक समूह त्यांच्यावर प्रभाव टाकू पाहतात. ते या भावनांशी खेळू पाहतात. प्रत्येक राजकीय वा सामाजिक संकल्पना ही एखाद्या धर्माच्या मूलभूत आदर्शाची भ्रष्ट अशी अभिव्यक्ती असते. व्यक्तीमध्ये एकदा का विचाराची शक्ती आली की, तेथे ताबडतोब क्षणोक्षणीच्या ह्या अगदी पशुवत अशा दैनंदिन जीवनापेक्षा, काहीतरी उच्चतर अशी आकांक्षा अपरिहार्यपणे त्याच्यामध्ये उदय पावते; आणि त्यातूनच त्याला जगण्याची उमेद आणि ऊर्जा प्राप्त होते. पण फारच थोडी माणसं स्वतंत्रपणे विचार करू शकतात, अशा वेळी त्यांनी स्वत:साठी स्वत:चाच एखादा वेगळा पंथ काढण्यापेक्षा, कोणत्यातरी धर्माचा स्वीकार करणे, त्यामध्ये सहभागी होणे, आणि त्या धार्मिक सामूहिकतेचा एक भाग बनणे हे अधिक सुकर असते. त्यामुळे वरवर पाहता, एखादी व्यक्ती ह्या धर्माची वा त्या धर्माची असते, पण हे फक्त वरवरचे भेद असतात.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 354-356)