Tag Archive for: ईश्वरी कृपा

अडीअडचणीमध्ये, संकटामध्ये असताना व्यक्तीला देवाची आठवण होते, अशी व्यक्ती देवाचा धावा करते, त्या परिस्थितीमधून सोडवावे म्हणून त्याची प्रार्थना करते, ‘ईश्वरी कृपा’ व्हावी अशी तिला आस असते. आणि कधीकधी ‘ईश्वरी कृपा’ घडूनही येते. पण ती केव्हा झाली, कशी झाली, कृपा झाली म्हणजे नेमके काय झाले, व्यक्तीने अशा वेळी काय करायला हवे, तिचा दृष्टिकोन कसा असावा? किंवा कृपा व्हावी म्हणून काय करायला हवे, याची तिला जाण नसते. कृपा होणे म्हणजे स्वतःच्या मनाप्रमाणे सारे काही होणे अशी व्यक्तीची समजूत असते, त्यामध्ये कितपत तथ्य आहे, या साऱ्याचा मागोवा श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या विचारांच्या आधारे घेण्याचा आपण उद्यापासून प्रयत्न करणार आहोत.

तसेच एकंदर विश्वसंचालनामध्ये ‘ईश्वरी कृपे’चे कार्य कसे चालते, तेही आपण येथे समजावून घेणार आहोत. सामान्य जीवन ज्या कर्मसिद्धान्ताच्या नियमानुसार चालल्यासारखे दिसते, त्या सिद्धान्ताच्या वर ‘ईश्वरी कृपा’ असते, आणि तिच्यामध्ये गतकर्मांच्या बंधनांचा निरास करण्याची क्षमता असते, असे श्रीअरविंद आपल्याला सांगतात. श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या वचनांच्या आधारे, ‘ईश्वरी कृपा’ म्हणजे नेमके काय ते आपण समजावून घेऊ. उद्यापासून ‘ईश्वरी कृपा’ ही मालिका सुरु करत आहोत. धन्यवाद…

– संपादक, अभीप्सा मराठी मासिक

मानसिक परिपूर्णत्व – १७

 

(येथे श्रीअरविंद एका साधकाला पत्राच्या माध्यमातून उत्तर देत आहेत.)

ईश्वरी कृपेविषयी कोणतीच शंका घेण्याचे कारण नाही. जर माणूस प्रामाणिक असेल तर तो ईश्वरापर्यंत पोहोचेलच, हे म्हणणेही अगदी खरे आहे. पण याचा अर्थ असा नाही की, तो अगदी लगेचच, सहजपणे, कोणताही विलंब न लागता पोहोचेल. इथेच तुमची चूक होत आहे. तुम्ही देवासाठी पाच वर्षे, सहा वर्षे, अमुक इतकी वर्षे असा कालावधी नेमून देत आहात आणि अजूनपर्यंत कोणताच परिणाम दिसत नाही म्हणून त्याविषयी शंका घेत आहात. एखादी व्यक्ती ही तिच्या गाभ्यामध्ये प्रामाणिक असू शकते आणि तरीही तिच्यामध्ये अशा अनेक गोष्टी असू शकतात की, ज्या गोष्टींमध्ये, साक्षात्कार होण्यापूर्वी परिवर्तन घडविण्याची आवश्यकता असते. व्यक्ती तिच्या प्रामाणिकपणामुळे नेहमीच चिकाटी बाळगण्यास सक्षम झाली पाहिजे. कारण ईश्वरासाठीची तळमळच अशी असते की, जी कशामुळेही मावळू शकत नाही. विलंबामुळे, निराशेमुळे, कोणत्याही अडचणीमुळे किंवा इतर कोणत्याही गोष्टीमुळे ही इच्छा मावळता कामा नये.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 116-117)

बहुधा कोणतेही दोन मार्ग अगदी एकसारखेच असत नाहीत, प्रत्येकाने स्वत:चा मार्ग स्वत:च शोधावयास हवा. पण याचा अर्थ असा नव्हे की, तो मार्ग बुद्धीने शोधायचा, तो मार्ग अभीप्सेच्या (Aspiration) आधारे शोधावयास हवा; विश्लेषण आणि अभ्यास याद्वारे नव्हे तर, अभीप्सेची तीव्रता आणि आंतरिक उन्मुखतेबद्दलची निष्ठा यांच्या माध्यमातून शोधावयास हवा.

जेव्हा व्यक्ती खरोखर आणि पूर्णपणे त्या आध्यात्मिक सत्यालाच अभिमुख झालेली असते, मग त्याला नाव कोणतेही दिलेले असूदे, जेव्हा बाकी सर्व गोष्टी तिच्या दृष्टीने गौण ठरतात, जेव्हा ते आध्यात्मिक सत्यच तिच्या लेखी अपरिहार्य आणि अटळ गोष्ट बनते, तेव्हा त्याकडून उत्तर मिळण्यासाठी, त्याकडून प्रतिसाद मिळण्यासाठी तीव्र, संपूर्ण एकाग्रतेचा केवळ एक क्षणदेखील पुरेसा असतो.

अशा उदाहरणामध्ये अनुभव आधी येतो, नंतर त्याचा परिणाम आणि स्मृती म्हणून त्या अनुभवाची मांडणी स्पष्ट बनते. ती मांडणी कमी अधिक तंतोतंत असू शकते.

…ती मांडणी तुमच्यासाठी चांगली आहे, हेच केवळ महत्त्वाचे आहे. ती कशीही असू दे, अगदी ती स्वयंपूर्ण असली तरीदेखील जेव्हा तुम्ही ती इतरांवर लादू पाहता तेव्हाच ती मिथ्या बनते…

मार्ग दाखविला पाहिजे, प्रवेशद्वारे खुली केली पाहिजेत पण प्रत्येकाने स्वत:चा मार्ग स्वत:चा आक्रमिला पाहिजे, त्या प्रवेशद्वारांमधून जात, स्वत:च्या वैयक्तिक साक्षात्काराच्या दिशेने स्वत:च वाटचाल करावयास हवी.

अशा वेळी, केवळ एकच मदत मिळू शकते आणि तीच स्वीकारली पाहिजे ती मदत असते ‘ईश्वरी कृपेची’! ही कृपा, प्रत्येकामध्ये ज्याच्या त्याच्या गरजेनुरूप, स्वत:ची अशी योजना करीत असते.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 407)