Tag Archive for: आविष्करण

 

जग ही जिवाची आत्मवंचना (self-delusion) आहे किंवा जग ही सैतानाची निर्मिती आहे असे आम्ही मानत नाही; तर आमच्या दृष्टीने, जग हे ‘ईश्वराचे आविष्करण‌’ (manifestation) आहे. अद्यापि जरी ते अंशतःच आविष्कृत झालेले असले तरी ते प्रगमनशील आणि उत्क्रांतिमय आविष्करण आहे. आणि म्हणून जीवनाचा परित्याग करणे, संन्यास घेणे (renunciation) हे आमच्या दृष्टीने जीवनाचे ध्येय असू शकत नाही किंवा ज्यासाठी या जगाची निर्मिती झाली आहे, त्या जगालाच नकार देणे हे देखील जीवनाचे उद्दिष्ट असू शकत नाही.

– श्रीअरविंद (CWSA 23-24 : 328)

 

(अंतिमत: नेहमी सत्याचाच विजय होतो असे म्हटले जाते पण प्रत्यक्षात मात्र परिस्थिती विपरीत दिसते, असे का? असा प्रश्न एका साधकाने विचारला आहे, त्यावर श्रीमाताजींनी विस्तृत उत्तर दिले आहे. त्यातील हा अंशभाग…)

जगामध्ये नित्यनिरंतन परिवर्तन होत आहे, अगदी सातत्याने परिवर्तन होत आहे. जग एक क्षणसुद्धा एकसारखे असत नाही. सर्वसाधारण सुसंवाद अधिकाधिक परिपूर्ण रितीने अभिव्यक्त होत राहतो आणि त्यामुळे कोणतीच गोष्ट जशी आहे तशीच कायम राहू शकत नाही. वरकरणी दिसणारे दृश्य अगदी प्रतिकूल दिसत असले तरी हे अखिल विश्व नेहमीच सातत्याने प्रगतिपथावर वाटचाल करत असते. सुसंवाद हा अधिकाधिक सुसंवादी होत आहे आणि सत्य हे ‘आविष्करणा‌’मध्ये (स्थळकाळनिविष्ट झालेल्या या जगामध्ये, Manifestation) अधिकाधिक प्रत्यक्ष वास्तवात उतरत आहे. परंतु ते समजण्यासाठी, व्यक्तीला समग्रतेने पाहता आले पाहिजे; पण मनुष्य पाहतो ते मात्र… त्याला मानवी क्षेत्रसुद्धा संपूर्णपणे पाहता येत नाही; त्याला केवळ त्याचे स्वतःचे वैयक्तिक क्षेत्र दिसते की जे अगदी छोटे, अगदीच छोटे, अणुवत असते; त्यामुळे त्याला (जगाची सातत्याने प्रगतिपथावर चाललेली वाटचाल) ही गोष्ट समजू शकणार नाही.

जसजसे हे ‘आविष्करण‌’ स्वतःविषयी अधिकाधिक सचेत होत जात आहे, तसतशी त्याची अभिव्यक्तीसुद्धा अधिकाधिक परिपूर्ण होत आहे आणि ती अधिकाधिक यथातथ्य होत आहे. या दोन्ही गोष्टी हातात हात घालून जात असतात. एकमेकांत सरमिसळ झालेली असल्याप्रमाणे दोहोंमध्ये क्रिया-प्रतिक्रिया घडत असते. ही प्रक्रिया दुहेरी असते आणि ती स्वत:च स्वतःला परिपूर्ण करत नेणारी असते.

– श्रीमाताजी (CWM 11 : 76)

 

केवळ ईश्वर‌च हवा, अन्य काहीही नको असे या संपूर्ण सृष्टीला वाटले पाहिजे. अन्य कोणाचे नाही तर, फक्त ईश्वराचे‌च आविष्करण करावे असे तिला वाटले पाहिजे. सृष्टी जे सारे काही करत असते, (अगदी तिच्या तथाकथित चुकासुद्धा) त्या साऱ्या गोष्टी म्हणजे फक्त साधनं असतात. समग्र सृष्टीने अपरिहार्यपणे केवळ ईश्वरा‌चेच आविष्करण करावे यासाठी ती साधनं तिला प्रवृत्त करत असतात. अर्थात, सहसा ईश्वर म्हटल्यावर, ‘ईश्वर असा असतो किंवा ईश्वर तसा नसतो’ अशी मनुष्याची जी मर्यादित आणि सीमित धारणा असते त्या ईश्वरा‌चे नव्हे, तर प्रचंड ऊर्जा आणि प्रकाशाची समग्रता‌ हे ज्या ईश्वरा‌चे स्वरूप आहे, त्या ईश्वरा‌चे आविष्करण करावे असे सृष्टीला वाटले पाहिजे.

आता (१९५६ मध्ये झालेल्या अतिमानस अवतरणानंतर) या जगामध्ये खरोखरच दिव्य शक्ती‌ विद्यमान आहे. ईश्वरा‌ची सर्वशक्तिमानता आविष्कृत व्हावी आणि ती ‘आविष्करणयोग्य‌’ (manifestable) ठरावी यासाठी एक नवीन, अद्भुत आणि विस्मयकारक दिव्य शक्ती‌ या जगात अवतरली आहे. आणि तिने स्वत:ला आविष्कृत करणे आवश्यकच आहे.

अवधानपूर्वक आणि काळजीपूर्वक केलेल्या निरीक्षणानंतर, मी या निष्कर्षाप्रत आले आहे की, ज्याला आम्ही ‘अतिमानस‌’ (Supramental) असे संबोधतो ते अतिमानस हे, या सृष्टीला उच्चतर ‘शक्ती‌’प्रत, जिला आम्ही ‘दिव्य‌’ असे संबोधतो, तिच्याप्रत अधिक संवेदनशील, अधिक ग्रहणशील बनवीत आहे. आपण सद्यस्थितीत जसे आहोत त्याच्या तुलनेत ती शक्ती दिव्य आहे…. हा जो (अतिमानसाचा) दबाव आहे, हे जे अवतरण आहे त्याने, त्या दिव्य शक्ती‌ला प्रतिसाद देण्यासाठी, जडभौतिकास अधिक संवेदनशील आणि अधिक प्रतिसादक्षम (responsive) बनवणे आवश्यकच आहे.

– श्रीमाताजी (CWM 11 : 315)

शिष्य : एका विधानाची सध्या इथे चर्चा आहे. त्यात असे म्हटले आहे की, “नुकतेच ह्या विजयाच्या बरोबरीने जे काही घडले आहे, ते केवळ अवतरण नव्हते तर ते आविष्करण होते. आणि एखाद्या व्यक्तिगत घटनेपेक्षा त्याचे मोल अधिक आहे : कारण अतिमनाचा वैश्विक लीलेमध्ये उदय झालेला आहे.”

श्रीमाताजी : हो, हो. खरंतर मीच हे सारे म्हटले होते.

शिष्य : ते म्हणतात की, अतिमानस तत्त्व आता कार्यरत झाले आहे…

श्रीमाताजी : ….प्रथम जाणिवेचे आरोहण होते, नंतर जाणीव तेथील ‘सद्वस्तु’ ग्रहण करते आणि तिला घेऊन खाली येते. ही ‘व्यक्तिगत’ घटना असते. मी ह्याला ‘अवतरण’ म्हणते.

परंतु, हीच व्यक्तिगत घटना जेव्हा अशा रीतीने घडून येते की, ज्यामुळे सार्वत्रिक स्तरावरील शक्यता निर्माण होण्यास ती पुरेशी आहे असे सिद्ध होते, तेव्हा ते केवळ ‘अवतरण’ नसते तर ते ‘आविष्करण’ असते.

ज्याला मी अवतरण म्हणते ती व्यक्तीच्या जाणिवेमध्ये घडून आलेली, व्यक्तिगत क्रिया असते. पण जर उदाहरणच द्यावयाचे झाले तर, जेव्हा मन या पृथ्वीतलावर प्रसृत झाले होते त्याप्रमाणे, या जुन्या विश्वामध्ये, एखादे नवीनच विश्व आविष्कृत होते, तेव्हा त्याला मी ‘आविष्करण’ म्हणते.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 133)