Tag Archive for: आत्मनिवेदन

(पाँडिचेरी येथील श्रीअरविंद आश्रमात आबालवृद्ध, शाळेचे विद्यार्थी रोज नियमितपणे आश्रमाच्या मैदानावर जातात आणि शारीरिक शिक्षण घेतात. त्याचा संदर्भ येथे आहे.)

विद्यार्थी : मैदानावर रोज खेळण्यापूर्वी आणि त्यानंतर आम्ही एक मिनिटभर एकाग्र होऊन शांत बसतो. त्यावेळी आम्ही काय प्रयत्न केला पाहिजे?

श्रीमाताजी : तुम्ही जी कृती करणार आहात ती कृती प्रथम ईश्वरार्पण करा, म्हणजे तुम्ही जे काही कराल ते तुम्हाला आत्मनिवेदित भावाने (spirit of consecration) करता येईल. नंतर, “ईश्वराची सेवा करण्यासाठी आम्ही अधिकाधिक सुपात्र असे साधन व्हावे यासाठी, आमच्यामध्ये प्रगतीची इच्छा वाढीस लागू दे,” अशी प्रार्थना तुम्ही ईश्वराकडे करा. खेळण्यास सुरुवात करण्यापूर्वी, तुम्ही स्वतःला ईश्वराप्रत शांतपणे अर्पित करू शकता. आणि खेळून झाल्यावर निश्चल-नीरवपणे ईश्वराप्रत कृतज्ञतेने नतमस्तक व्हा. म्हणजे, मनामध्ये नुसते शब्दोच्चारण होत आहे पण त्यामध्ये भाव नाहीत अशी ती कृती असता कामा नये. ती कृती अगदी अंत:करणपूर्वक झाली पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 12 : 354-355)

 

अर्थातच, श्रीमाताजींनी जे काम नेमून दिलेले असते ते त्यांचे स्वतःचे कार्य असते, तो त्यांच्या स्वतःच्या कार्याचा भाग असतो. तसेच जे काम प्रामाणिकपणे केलेले असते आणि जे श्रीमाताजींना अर्पण केले जाते ते कामसुद्धा त्यांचेच कार्य असते, हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही. परंतु ‘कर्मा’मध्ये फक्त कामाचाच समावेश होतो असे नाही तर, सर्व प्रकारच्या कृतींचा समावेश होतो.

*

ईश्वराच्या कार्यासाठी तुम्ही जे आत्मनिवेदन (consecration) करत आहात, त्यामध्ये पूर्ण प्रामाणिकपणा ठेवा. तो प्रामाणिकपणाच तुम्हाला निश्चितपणे शक्ती व यश देईल.

– श्रीअरविंद आणि श्रीमाताजी (CWSA 32 : 417), (CWM 14 : 65)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ०३

पूर्णयोगामध्ये केवळ ईश्वराचा साक्षात्कार अपेक्षित नाही तर संपूर्ण आत्मनिवेदन (consecration) अभिप्रेत आहे, तसेच जोपर्यंत ईश्वरी चेतनेचे आविष्करण करण्यासाठी व्यक्तीचे आंतरिक व बाह्य जीवन सुपात्र ठरत नाही आणि जोपर्यंत व्यक्तीचे जीवन हे ईश्वरी कार्याचाच एक भाग बनून राहत नाही तोपर्यंत, आंतरिक व बाह्य जीवनामध्ये परिवर्तन घडवत राहणे हे या योगामध्ये अभिप्रेत आहे. याचा अर्थ असा की, निव्वळ नैतिक आणि शारीरिक उग्र तपस्येहून कितीतरी अधिक अचूक आणि कठोर असे आंतरिक अनुशासन (discipline) येथे अभिप्रेत आहे.

पूर्णयोगाचा मार्ग हा इतर बहुतांश योगमार्गांपेक्षा अधिक विशाल व अधिक दुःसाध्य आहे. त्यामुळे, आपल्याला अंतरात्म्याकडून हाक आली आहे आणि अंतिम ध्येयाप्रत वाटचाल करत राहण्याची आपली तयारी आहे, या गोष्टीची खात्री पटल्याशिवाय व्यक्तीने या मार्गात प्रवेश करता कामा नये.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 27)

साधना, योग आणि रूपांतरण – ८०

अंतरंगामध्ये खूप खोलवर आणि दूर गेल्यावर सौख्य आणि शांती यांचा अनुभव येतो कारण या गोष्टी अंतरात्म्यामध्ये (psychic) असतात आणि अंतरात्मा हा आपल्या अंतरंगामध्ये खूप खोलवर, मन आणि प्राण यांनी झाकलेला असतो. तुम्ही जेव्हा ध्यान करता तेव्हा तुम्ही या अंतरात्म्याप्रत खुले होता, उन्मुख होता, आणि तेव्हा तुम्हाला अंतरंगामध्ये खोलवर असणाऱ्या आंतरात्मिक चेतनेची जाणीव होते आणि मग तुम्हाला सौख्य, शांती या गोष्टी जाणवतात. सौख्य, शांती आणि आनंद या गोष्टी अधिक समर्थ व स्थिर व्हाव्यात आणि त्यांचा अनुभव तुमच्या सर्व व्यक्तित्वामध्ये, आणि अगदी शरीरामध्येदेखील यावा यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये अधिक खोलवर गेले पाहिजे आणि अंतरात्म्याची पूर्ण शक्ती शारीरिक अस्तित्वामध्ये आणली पाहिजे.

खऱ्या चेतनेसाठी अभीप्सा बाळगून, नियमित एकाग्रता आणि ध्यान केल्याने, हे सर्वाधिक सहजतेने शक्य होते. हे कर्माद्वारे, निष्ठेद्वारेसुद्धा शक्य होते; स्वतःसंबंधी विचार न करता, हृदयामध्ये श्रीमाताजींप्रति सातत्याने आत्मनिवेदन (consecration) करत राहण्याच्या संकल्पनेवर नेहमी लक्ष केंद्रित करून, ‘ईश्वरा’साठीच कर्म करत राहिल्यानेसुद्धा हे शक्य होते. परंतु हे परिपूर्णपणे सुयोग्य रीतीने करणे सोपे नसते.

*

‘ईश्वरा’च्या संपर्कात असण्यासाठी समाधीमध्येच असले पाहिजे असे नाही.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 299), (CWSA 30 : 250)

कर्म आराधना – २९

वाचन आणि अभ्यास यांचा मनाच्या तयारीसाठी उपयोग होत असला तरीदेखील, ‘योगमार्गा’त प्रवेश करण्यासाठीची ती स्वयंसिद्ध उत्तम अशी माध्यमे नव्हेत. अंतरंगातून होणारे आत्मार्पण (self-dedication) हे उत्तम माध्यम असते. तुम्ही ‘श्रीमाताजी’च्या चेतनेशी एकरूप झाले पाहिजे; मन, हृदय आणि ‘संकल्प’शक्ती यांमधील प्रामाणिक आत्मनिवेदन (self consecration) ही त्यासाठीची माध्यमे आहेत. श्रीमाताजींनी दिलेले कर्म हे त्या आत्म-निवेदनासाठी नेहमीच उत्तम क्षेत्र असल्याचे मानले जाते, त्यांनी दिलेले कर्म हे त्यांनाच अर्पण करण्याच्या भावनेतून केले गेले पाहिजे, म्हणजे मग त्या आत्मार्पणाच्या माध्यमातून व्यक्तीला श्रीमाताजींच्या कार्यकारी शक्तीची आणि त्यांच्या उपस्थितीची जाणीव होऊ शकेल.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 246]

कर्म आराधना – २७

सहसा माणसं प्राणिक अस्तित्वाच्या सामान्य प्रेरणांनी उद्युक्त होऊन अथवा गरजेपोटी, संपत्ती किंवा यश किंवा पद किंवा सत्ता किंवा प्रसिद्धी यांबद्दलच्या इच्छेने प्रेरित होऊन किंवा कार्यरत राहण्याच्या ओढीने, आणि त्यांच्याकडे असलेल्या क्षमतांचे आविष्करण करण्याच्या सुखासाठी काम करतात, जीवनव्यवहार करतात. आणि ते त्यांच्या त्यांच्या कुवतीनुसार, त्यांच्या कार्यशक्तीनुसार आणि त्यांची प्रकृती व त्यांचे कर्म यांच्या फलस्वरूप असलेल्या सुदैवानुसार किंवा दुर्दैवानुसार त्यामध्ये यशस्वी होतात किंवा अपयशी ठरतात.

(परंतु) एखादी व्यक्ती जेव्हा ‘योगमार्ग’ स्वीकारते आणि स्वतःचे जीवन ‘ईश्वरा’र्पण करू इच्छिते तेव्हा प्राणिक अस्तित्वाच्या या सामान्य प्रेरणांना पुरेसा आणि मुक्त वाव मिळेनासा होतो; अशा वेळी त्यांची जागा दुसऱ्या प्रेरणांनी घेतली गेली पाहिजे, प्रामुख्याने आंतरात्मिक आणि आध्यात्मिक प्रेरणांनी त्यांची जागा घेतली पाहिजे. त्यामुळे साधकाला पूर्वीच्याच ऊर्जेनिशी कर्म करणे शक्य होऊ शकते, (पण) आता ते कर्म त्याने स्वतःसाठी केलेले नसते, तर ते ‘ईश्वरा’साठी केलेले असते.

सामान्य प्राणिक प्रेरणा किंवा प्राणिक शक्ती ही जर मुक्तपणाने कार्यरत होऊ शकली नाही आणि तरीही इतर कोणत्या गोष्टीने तिची जागा घेतली नाही तर, कदाचित त्यानंतर, कर्मामध्ये ओतण्यात आलेली प्रेरणा वा शक्ती कमी होण्याची शक्यता असते किंवा यशप्राप्तीसाठी लागणारी शक्तीही तेथे शिल्लक न राहण्याची शक्यता असते. प्रामाणिक साधकासाठी ही अडचण तात्कालिकच असण्याची शक्यता असते; परंतु त्याने त्याच्या आत्मनिवेदनातील (consecration) किंवा त्याच्या दृष्टिकोनातील दोष शोधून तो काढून टाकला पाहिजे. तेव्हा मग दिव्य ‘शक्ती’ स्वतःहून अशा साधकाच्या माध्यमातून कार्य करू लागेल आणि तिच्या साध्यासाठी त्या व्यक्तीची क्षमता व प्राणिक शक्ती उपयोगात आणेल.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 233]

विचार शलाका – १२

‘पूर्णयोगा’मध्ये केवळ ‘देवा’चा साक्षात्कारच अभिप्रेत नाही, तर संपूर्ण आत्मनिवेदन (consecration) अभिप्रेत आहे. तसेच, जोपर्यंत ईश्वरी चेतनेचे आविष्करण करण्यास व्यक्तीचे आंतरिक आणि बाह्य जीवन सुपात्र ठरत नाही आणि जोपर्यंत जीवन हे ईश्वरी कार्याचाच एक भाग बनून राहत नाही तोपर्यंत, आंतरिक व बाह्य जीवनामध्ये परिवर्तन घडवीत राहणे हे या योगामध्ये अभिप्रेत आहे. निव्वळ नैतिक आणि शारीरिक उग्रतपस्येहून कितीतरी अधिक अचूक आणि कठोर असे आंतरिक अनुशासन येथे अपेक्षित असते. हा योगमार्ग इतर बहुतेक योगमार्गांपेक्षा अधिक विशाल व अधिक दुःसाध्य आहे त्यामुळे, अंतरात्म्याकडून आलेल्या हाकेची खात्री असल्याखेरीज आणि अंतिम साध्याप्रत वाटचाल करीत राहण्याची तयारी असल्याची खात्री पटल्याशिवाय, व्यक्तीने या मार्गात प्रवेश करता कामा नये.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 27)

साधनेची मुळाक्षरे – ०५

आध्यात्मिक क्षेत्रातसुद्धा, अशी पुष्कळ माणसं आहेत (ज्यांनी आध्यात्मिक जीवन स्वीकारले आहे आणि जे योगसाधना करत आहेत त्यांच्यापैकी बहुतांशी लोक, असे मी म्हणेन.) की जी, म्हणजे त्यांच्यापैकी बरीच जणं ही वैयक्तिक कारणांसाठी सारे करत असतात, अनेक प्रकारची वैयक्तिक कारणं असतात : काही जण जीवनामुळे उद्विग्न झालेले असतात, काही दुःखी असतात, काही जणांना अधिक काही जाणून घेण्याची इच्छा असते, काहींना आध्यात्मिक दृष्ट्या कोणीतरी महान व्यक्ती बनायचे असते, इतरांना शिकविता यावे म्हणून काही जणांना काही गोष्टी शिकायच्या असतात; योगमार्ग स्वीकारण्याची खरोखरच हजारो वैयक्तिक कारणं असतात. पण एक साधीशी गोष्ट – ईश्वराप्रत स्वतःचे आत्मदान करावे, जेणेकरून ईश्वरच तुम्हाला हाती घेईल आणि त्याची जशी इच्छा आहे त्याप्रमाणे तो तुम्हाला घडवेल आणि ते सारे त्याच्या शुद्धतेनिशी आणि सातत्यानिशी घडवेल आणि हे खरोखरच सत्य आहे पण असे करणारे फार जण आढळत नाहीत; खरेतर या आत्मदानामुळेच व्यक्ती ध्येयाप्रत थेट जाऊन पोहोचते आणि मग तिच्याकडून कोणत्या चुका होण्याचेही धोके नसतात. पण त्यामध्ये नेहमीच इतर प्रेरणादेखील मिसळलेल्या असतात, अहंकाराने कलंकित झालेल्या असतात आणि स्वाभाविकपणेच त्या तुम्हाला कधी इकडे तर कधी तिकडे नेतात, कधीकधी तर त्या तुम्हाला ध्येयापासून खूप दूरही नेतात.

ईश्वराशी संपूर्ण, परिपूर्ण, समग्र आत्मनिवेदन हेच तुमच्या अस्तित्वाचे एकमेव कारण असले पाहिजे, एकमेव साध्य, एकमेव प्रेरणा असली पाहिजे; तुमच्यामध्ये आणि ईश्वरामध्ये कोणते वेगळेपणच जाणवणार नाही असे तुमचे आत्मनिवेदन असले पाहिजे; कोणत्याही वैयक्तिक प्रतिक्रियेची ढवळाढवळ न होता आपण स्वतःच पूर्णतः, संपूर्णतः, समग्रतेने तो ईश्वर व्हावे, अशी जर तुमची भावना असेल तर तो आदर्श दृष्टिकोन आहे. आणि शिवाय, तुम्हाला जीवनामध्ये आणि तुमच्या कार्यामध्येही पुढे घेऊन जाईल असा हाच एकमेव दृष्टिकोन आहे, तोच तुमचे सर्व गोष्टींपासून आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या स्वतः पासून (की जो सर्व धोक्यांमधील तुमच्यासाठी असलेला सर्वात मोठा धोका असतो.) रक्षण करेल; ‘स्वतः’ इतका इतर कोणताच धोका मोठा नसतो. (येथे ‘स्वतः’ हा शब्द ‘अहंकारयुक्त मी’ या अर्थाने घेतला आहे.)

– श्रीमाताजी
(CWM 07 : 190)

समर्पण –२०

जरी अजून तुम्हाला सदा सर्वकाळ तुमच्या कर्मव्यवहारामध्ये ईश्वराचे स्मरण ठेवता आले नाही, तरी फार काळजी करू नका, त्याने फारसा फरक पडत नाही. कोणतेही कर्म करताना सुरूवातीस ईश्वराचे स्मरण करणे आणि त्याला अर्पण करणे आणि कर्म संपल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करणे हे सद्यस्थितीत पुरेसे आहे. किंवा जर कामाच्या मध्ये थोडा वेळ मिळाला तर तेव्हाही त्याचे स्मरण ठेवणे पुरेसे आहे. जेव्हा लोक काम चालू असताना सदोदित स्मरण राखतात (असे करता येणे शक्य असते) तेव्हा, सहसा ते त्यांच्या मनाच्या पार्श्वभागी असते किंवा त्यांच्यामध्ये हळूहळू दुहेरी विचारांची किंवा दुहेरी चेतनेची एक क्षमता निर्माण झालेली असते – एक चेतना पृष्ठभागी कार्यरत असते आणि दुसरी चेतना ही साक्षी असते आणि स्मरण राखत असते. अभीप्सा आणि कर्म करण्यासाठी महत्तर शक्तीला आवाहन करत, आत्मनिवेदनाचा संकल्प करणे ही अशी पद्धती आहे की ज्यामुळे महान परिणाम घडून येतात. जरी काही जणांना या गोष्टीसाठी बराच वेळ लागत असला तरीदेखील होणारे परिणाम महान असतात. सर्व गोष्टी मनाच्या प्रयासांनीच करण्यापेक्षा, पाठीशी असणाऱ्या किंवा वर असणाऱ्या शक्तीद्वारे कर्म कशी घडवून घ्यायची हे जाणणे, हे साधनेचे महान रहस्य आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 214-215)

दुर्दम्य हाक आली असेल तर आणि तरच हा योग त्यास प्रदान करण्यात येतो. केवळ आंतरिक शांती हे या योगाचे उद्दिष्ट नाही, तर या योगासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत घटकांपैकी ती एक आवश्यक बाब आहे, इतकेच.

*

योगाच्या ध्येयाप्रत पोहोचणे नेहमीच कठीण असते, पण पूर्णयोग हा इतर कोणत्याही योगांपेक्षा अधिक खडतर आहे, आणि ज्यांना ‘ती’ हाक आलेली आहे, ज्यांच्याजवळ क्षमता आहे, प्रत्येक गोष्टीला व प्रत्येक जोखमीला तोंड देण्याची ज्यांची तयारी आहे, अगदी अपयशाचा धोका पत्करण्याचीही ज्यांची तयारी आहे; आणि पूर्णपणे नि:स्वार्थीपणा, इच्छाविरहिततता व संपूर्ण शरणागती यांजकडे वाटचाल करण्याचा ज्यांचा दृढ संकल्प आहे केवळ त्यांच्यासाठीच हा योग आहे.

*

पूर्णयोगामध्ये ईश्वराचा केवळ साक्षात्कार अभिप्रेत नाही, तर संपूर्ण आत्मनिवेदन अभिप्रेत आहे. तसेच, ईश्वरी चेतनेचे आविष्करण करण्यास व्यक्तीचे आंतरिक आणि बाह्य जीवन जोपर्यंत सुपात्र ठरत नाही आणि जोपर्यंत जीवन हे ईश्वरी कार्याचाच एक भाग बनून राहत नाही तोपर्यंत, आंतरिक व बाह्य जीवनामध्ये परिवर्तन घडवीत राहणे हे या योगामध्ये अभिप्रेत आहे. निव्वळ नैतिक आणि शारीरिक उग्रतपस्येहून कितीतरी अधिक अचूक आणि कठोर असे आंतरिक अनुशासन येथे अपेक्षित असते.

*

हा योगमार्ग इतर बहुतेक योगमार्गांपेक्षा अधिक विशाल व अधिक दुःसाध्य आहे त्यामुळे, अंतरात्म्याकडून आलेल्या हाकेची खात्री असल्याखेरीज आणि अंतिम साध्याप्रत वाटचाल करीत राहण्याची ‘तयारी असल्या’ची खात्री पटल्याखेरीज, व्यक्तीने या मार्गामध्ये प्रवेश करता कामा नये. ‘तयारी असणे’, याचा मला अभिप्रेत असलेला अर्थ ‘क्षमता’ असा नसून ‘इच्छाशक्ती’ असा आहे. जर सर्व अडचणींना तोंड देऊन, त्यावर मात करण्याची आंतरिक इच्छाशक्ती असेल, तरच या मार्गाचा अवलंब करता येईल; मग त्यासाठी किती काळ लागतो हे तितकेसे महत्त्वाचे नाही.

– श्रीअरविंद

(CWSA 29 : 27)