Tag Archive for: अभीप्सा

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ०२

प्रश्न : आम्हाला योगासंबंधी काही सांगाल काय?

श्रीमाताजी : योग तुम्हाला कशासाठी हवा आहे? सामर्थ्य लाभावे म्हणून ? मन:शांती, शांतचित्तता प्राप्त व्हावी म्हणून ? का मानवतेची सेवा करायची आहे म्हणून?

परंतु, योगमार्ग स्वीकारण्यास तुम्ही पात्र आहात का हे लक्षात येण्यासाठी यांपैकी कोणतेही उद्दिष्ट पुरेसे नाही.

त्यासाठी तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत : तुम्हाला ईश्वराकरता योगसाधना करायची आहे का? ईश्वर हेच तुमच्या जीविताचे परमोच्च सत्य आहे का ? ईश्वरावाचून जगणेच आता अगदी अशक्य झाले आहे, अशी तुमची स्थिती आहे का? ईश्वर हेच तुमच्या अस्तित्वाचे एकमेव कारण आहे आणि ईश्वराविना तुमच्या जीवनास काहीच अर्थ नाही, असे तुम्हाला वाटते का? असे असेल तरच तुम्हाला योगमार्ग स्वीकारण्याविषयी आंतरिक हाक आली आहे असे म्हणता येईल.

ईश्वराविषयीची तळमळ, अभीप्सा (Aspiration) हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे.

पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या अभीप्सेचे संगोपन करावयाचे; ती सतत जागृत, सावध व जिवंत राखायची. आणि त्यासाठी आवश्यकता असते एकाग्रतेची, ईश्वरावरील एकाग्रतेची ! ईश्वरी संकल्प व उद्दिष्ट यांसाठी समग्रपणे व नि:शेषतया वाहून घेता यावे या दृष्टिकोनातून ईश्वराच्या ठिकाणी एकाग्रता करणे आवश्यक असते.

हृदयामध्ये एकाग्रता करा. त्यात प्रवेश करा, जेवढे तुम्हाला शक्य होईल तेवढे आत खोल खोल, अगदी आत जा. तुमच्या जाणिवेचे बाहेर दूरवर पसरलेले सारे धागे एकत्रित करून, ते सारे गुंडाळून घ्या आणि आत बुडी मारा, अगदी तळाशी जाऊन बसा.

तुम्हाला आढळेल की, हृदयाच्या त्या निवांत प्रशांत गाभाऱ्यात एक अग्नी तेवत आहे. तोच तुमच्या अंतरीचे ईश्वरत्व, तोच तुमचे खरेखुरे अस्तित्व. त्याचा आदेश ऐका, त्याच्या आज्ञेचे अनुसरण करा.

एकाग्रता करण्याची अन्य केंद्रदेखील आहेत, उदाहरणार्थ, एक असते मस्तकाच्या वर, दुसरे असते दोन भुवयांच्या मध्यभागी (भ्रूमध्यामध्ये)! प्रत्येक केंद्राचा स्वतंत्र असा प्रभाव असतो आणि त्यातून तुम्हाला वेगवेगळे विशिष्ट परिणामही अनुभवास येतात. पण मध्यवर्ती अस्तित्व (पुरुष) हे हृदयामध्येच असते आणि सर्व मुख्य प्रवृत्ती हृदयामधूनच उत्पन्न होतात – रूपांतरासाठी आवश्यक असलेली प्रेरणा व उत्कटता आणि साक्षात्कार करून घेण्याची शक्ती या गोष्टीसुद्धा तेथूनच निर्माण होतात.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 01)

समर्पण – ०२

…प्रामाणिक अभीप्सेचा परिणाम नक्कीच होतो; जर तुम्ही प्रामाणिक असाल तर तुम्ही दिव्य जीवनामध्ये उन्नत होता.

पूर्णपणे प्रामाणिक असणे म्हणजे – फक्त आणि फक्त ईश्वरी सत्याचीच अभीप्सा बाळगणे; दिव्य मातेप्रत स्वतःला अधिकाधिक समर्पित करणे; या अभीप्सेव्यतिरिक्त असणाऱ्या वैयक्तिक सर्व मागण्या व वासना यांचा परित्याग करणे; जीवनातील प्रत्येक कृती ही ईश्वरालाच समर्पण करणे आणि कोणताही अहंकार आड येऊ न देता, हे कार्य ईश्वराने दिलेले आहे असे मानून कार्य करणे. हाच दिव्य जीवनाचा पाया आहे.

व्यक्ती एकाएकी एकदम अशी होऊ शकत नाही. पण जर ती सातत्याने तशी अभीप्सा बाळगेल आणि ईश्वरी शक्तीने साहाय्य करावे म्हणून तिचा अगदी अंतःकरणपूर्वक आणि साध्यासरळ इच्छेने, नेहमी धावा करत राहील; तर व्यक्ती या चेतनेप्रत अधिकाधिक उन्नत होत राहते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 50-51)

मानसिक परिपूर्णत्व – १२

 

ईश्वरावरील श्रद्धा आणि विश्वास या गोष्टी आंतरिक समर्पणाचा गाभा आहेत. ”मला दुसरेतिसरे काहीही नको, ईश्वरच हवा,” असा दृष्टिकोन व्यक्ती अंगीकारते. …”मी ईश्वराला माझे समर्पण करू इच्छितो आणि माझ्या आत्म्याचीच ती मागणी असल्याने, इतर काहीही नाही, तर फक्त तेच. मी त्याला भेटेन, मी त्याचा साक्षात्कार करून घेईन. मी इतर काहीही मागणार नाही, केवळ हीच माझी मागणी असेल. जेणेकरून, मला त्याच्या सन्निध जाता येईल असे कार्य त्याने माझ्यामध्ये करावे; मग त्याचे ते कार्य गुप्त असेल वा प्रकट असेल, ते झाकलेले असेल वा आविष्कृत झाले असेल, मग ते कोणत्याही प्रकारचे असले तरी हरकत नाही. मी माझ्या स्वतःच्या मार्गासाठी आणि वेळेसाठी आग्रह धरणार नाही; त्याने त्याच्या त्याच्या वेळेनुसार व त्याच्या पद्धतीने सारे काही करावे; मी त्याच्यावर विश्वास ठेवेन; त्याची इच्छा प्रमाण मानेन; त्याच्या प्रकाशाची, त्याच्या उपस्थितीची, त्याच्या आनंदाची, अविचलपणे अभीप्सा बाळगेन; कितीही अडचणी आल्या, कितीही विलंब लागला तरी मी त्याच्यावर पूर्ण विसंबून राहीन आणि कधीही मार्ग सोडणार नाही. माझे मन शांत होऊन, त्याच्याकडे वळू दे आणि ते त्याच्या प्रकाशाप्रत खुले होऊ दे; माझा प्राण शांत होऊ दे आणि केवळ त्याच्याकडेच वळू दे; त्याच्या शांतीप्रत आणि त्याच्या आनंदाप्रत तो खुला होऊ दे. सारे काही त्याच्यासाठीच आणि मी स्वतःसुद्धा त्याच्यासाठीच. काहीही झाले तरी, मी अभीप्सा आणि आत्मदान दृढ बाळगेन आणि हे घडून येईलच अशा पूर्ण विश्वासाने वाटचाल करत राहीन.” व्यक्तीने हा दृष्टिकोन चढत्यावाढत्या प्रमाणात बाळगला पाहिजे. कारण ह्या गोष्टी परिपूर्णतया एकदम होणे शक्य नाहीत; मानसिक व प्राणिक हालचाली आड येत राहतात; पण जर व्यक्ती वरीलप्रमाणे इच्छा बाळगेल, तर त्या गोष्टी व्यक्तीमध्ये विकसित होत राहतात.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 70-71)

मानसिक परिपूर्णत्व – ०६

 

इतर कोणा व्यक्तीला, कोणत्याही कल्पनेला, कोणत्याही गोष्टीला, तुम्ही तुमच्या आणि ईश्वराच्यामध्ये का येऊ देता? जेव्हा तुम्ही पूर्ण अभीप्सायुक्त असता, आनंदात असता तेव्हा इतर कोणतीच गोष्ट महत्त्वाची नाही; ईश्वर आणि तुमची अभीप्सा याव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीला महत्त्व देता कामा नये. जर एखाद्या व्यक्तीला ईश्वर त्वरेने, संपूर्णतः, समग्रतेने मिळावा असे वाटत असेल, तर त्या व्यक्तीचा दृष्टिकोन तसाच संपूर्ण, सर्वसमावेशक असावयास हवा. तोच त्याचा एकमेव उद्दिष्टबिंदू असावयास हवा आणि त्यामध्ये इतर कशाचीही, अगदी कशाचीही लुडबूड असता कामा नये.

ईश्वर कसा असावा, त्याने कसे वागावे, त्याने कसे वागता कामा नये, यासंबंधीच्या मानसिक कल्पनांना काहीही किंमत नाही, उलट त्या मानसिक कल्पना म्हणजे मार्गातील धोंडच ठरतात. एक ईश्वरच केवळ महत्त्वाचा आहे. जेव्हा तुमची चेतना ईश्वराला कवळून घेते, तेव्हाच खऱ्या अर्थाने ईश्वर काय आहे हे तुम्हाला समजते, त्या आधी नाही. कृष्ण हा कृष्ण आहे, त्यामुळे त्याने काय केले, काय केले नाही याला मग अशी व्यक्ती महत्त्व देत नाही तर ती व्यक्ती त्याला पाहाते, त्याला भेटते; त्याचा प्रकाश, त्याची उपस्थिती, त्याचे प्रेम, त्याचा आनंद हाच काय तो त्याच्यासाठी महत्त्वाचा ठरतो. आध्यात्मिक अभीप्सेबाबतीत नेहमी हे असेच असते – हा आध्यात्मिक जीवनाचा कायदा आहे.

कोणत्याही मानसिक कल्पना किंवा प्राणिक चढउतार यांच्यावर वेळ वाया घालवू नका – ते ढग पळवून लावा. जी एकमेव आवश्यक गोष्ट आहे त्यावरच तुमचे लक्ष केंद्रित करा.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 55-56)

मानसिक परिपूर्णत्व – ०५

 

हृदयापासून केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा आणि अभीप्सा हीच एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती गोष्ट क्षमतांपेक्षाही अधिक आवश्यक आणि अधिक प्रभावी असते.
*
व्यक्तीने जितके शक्य आहे तितके स्वतःला श्रीमाताजींच्या शक्तीप्रत खुले राखणे आणि प्रामाणिकपणे अभीप्सा बाळगणे आवश्यक आहे. मग कितीही अडचणी आल्या तरीही त्यावर मात करता येते – कदाचित त्याला काही वेळ लागेल पण परिणामाची खात्री असते.
*
श्रीमाताजींची शक्ती आपल्या अवतीभोवती सर्वत्र आहे असे समजून, ती आत प्रविष्ट व्हावी म्हणून व्यक्तीने तिचा धावा करावयास हवा. जर व्यक्तीला तशी खरीच जाणीव झाली तर उत्तमच, पण जरी तसे झाले नाही तरीही व्यक्तीची श्रद्धा असेल आणि त्या धाव्यामध्ये शक्ती असेल तरीही, श्रीमाताजींची शक्ती आत प्रवाहित होऊ शकते.
*
व्यक्तीने ईश्वरावर विसंबून असावे आणि त्यासोबतच काही सक्षम साधनासुद्धा करावी. साधनेच्या प्रमाणात नव्हे तर, जीवाच्या आणि त्याच्या अभीप्सेच्या प्रमाणात, ईश्वर त्याचे फल प्रदान करतो. चिंता करत बसणे देखील उपयोगाचे नाही. ”मी असा होईन, मी तसा होईन, मी कसे असावे बरे?” याऐवजी, ”मला मी काय व्हावेसे वाटते यासाठी नाही तर, ईश्वराला मी कोण बनणे अपेक्षित आहे, तसे व्हावयास मी तयार आहे” असे म्हणणे आवश्यक आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी त्याच आधारावर झाल्या पाहिजेत.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 55-56)

अंतिम विजयाविषयी कोणतीही शंका न बाळगता योगमार्गावरून वाटचाल करा – तुम्हाला अपयश येऊच शकणार नाही! शंकाकुशंका या क्षुल्लक गोष्टी आहेत; अभीप्सेचा अग्नी प्रज्ज्वलित ठेवा, हाच तो अग्नी असतो जो विजयी होतो.

– श्रीअरविंद
(CWSA 28: 347)

(उदयाला येऊ घातलेल्या अतिमानवाच्या आगमनाच्या तयारीविषयी जपानमधील स्त्रियांसमोर, श्रीमाताजी बोलत आहेत. गर्भवती स्त्रियांनी कसा दृष्टिकोन बाळगला पाहिजे, हे त्या सांगत आहेत.)

अतिमानव जन्माला यावयाचा आहे आणि तो स्त्रीच्या उदरातूनच जन्माला येणार, हे निर्विवाद सत्य आहे; पण म्हणून या सत्याविषयी केवळ अभिमान बाळगणे पुरेसे नाही; तर त्याचा अर्थ काय, हे आपण नीट समजून घेतले पाहिजे. त्यामधून आपल्यावर काय जबाबदारी येते, ह्याचे आपल्याला भान असले पाहिजे आणि आपल्यावर जे कार्य सोपविण्यात आले आहे, ते आपण अत्यंत जीव तोडून करावयास शिकले पाहिजे.

सध्याच्या विश्वव्यापक कार्यामध्ये आपल्या वाट्याला आलेले हे सर्वाधिक महत्त्वाचे कार्य आहे. यासाठी आपण सर्वप्रथम हे जाणून घेणे गरजेचे आहे की, सद्यकालीन गोंधळाचे आणि अंधकाराचे, प्रकाश आणि सुसंवादामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची माध्यमे कोणती असतील ? आणि किमान हे ढोबळमानाने तरी जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

…एका नवीनच आध्यात्मिक प्रकाशाचे, आपल्याला आजवर अज्ञात असलेल्या कोणत्यातरी दिव्य शक्तीचे या पृथ्वीवर आविष्करण होणार आहे; ईश्वरासंबंधीचा एक सर्वस्वी नवीन विचार, या विश्वामध्ये अवतरणार आहे आणि इथे एक नवीनच आकार जन्माला येणार आहे. आणि इथेच आपण, ‘खऱ्याखुऱ्या मातृत्वाची आपली जबाबदारी’ या आपल्या आरंभीच्या मुद्द्याकडे येतो.

कारण या नवीन आकारातूनच, पृथ्वीची सद्यकालीन स्थिती परिवर्तित करण्यासाठी, सक्षम असणारी आध्यात्मिक शक्ती आविष्कृत होणार आहे. हा नवीन आकार, हे नवीन रूप एक स्त्री घडविणार नाही तर दुसरे कोण?

… ज्यांच्याविषयी आपण ऐकलेले असते, वा ज्यांच्याविषयी आपल्याला माहिती असते, अशा कितीही का थोर व्यक्ती असेनात, त्यांच्यासारख्या किंवा त्यांच्याही पेक्षा थोर, अधिक विख्यात, सिद्ध आणि प्रतिभावान अशी व्यक्ती वा मानव घडविणे हे आता पुरेसे नाही; तर, जी परमोच्च शक्यता आजवरच्या मानवाची सर्व परिमाणं आणि वैशिष्ट्य ओलांडून, अतिमानवाला जन्म देणार आहे; त्या परमोच्च शक्यतेच्या संपर्कात येण्यासाठी, आपण आपल्या मनाने, आपल्या विचाराच्या आणि इच्छेच्या सातत्यपूर्ण अभीप्सेद्वारे, धडपडले पाहिजे.

काहीतरी पूर्णत: नवीन, आजवर कल्पनाही केली नव्हती, असे काही नवेच निर्माण करण्याची एक आस या प्रकृतीला पुन्हा एकवार लागली आहे आणि तिच्यामधील ह्या आवेगालाच आपण प्रतिसाद दिला पाहिजे आणि तिचे आज्ञापालन केले पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 160-161)

मानवाची महानता तो काय आहे ह्यामध्ये नसून, तो काय करू शकतो ह्यामध्ये सामावलेली आहे. मानव ही बंदिस्त अशी एक जागा आहे आणि जिवंत परिश्रमांची ती अशी एक गुप्त कार्यशाळा आहे की, ज्यामध्ये त्या दिव्य कारागीराकडून अतिमानवता घडवली जात आहे आणि हेच मानवाचे खरेखुरे वैभव आहे.

पण यापेक्षाही एका अधिक महानतेमध्ये त्याचा प्रवेश झाला आहे. ती महानता अशी की, कोणत्याही कनिष्ठ प्रजातींना मिळाली नाही अशी एक संधी त्याला मिळालेली आहे. मानवामध्ये होणाऱ्या दिव्य परिवर्तनाचा जाणीवसंपन्न कारागीर बनण्याची, त्या परिवर्तनामध्ये थोड्याफार प्रमाणात सहभागी होण्याची परवानगी त्याला मिळालेली आहे.

मात्र त्याच्या देहामध्ये ही महानता प्रत्यक्षात उतरावी याकरिता, म्हणजेच मानवी देहाचे अतिमानवामध्ये रूपांतर शक्य व्हावे याकरिता, मानवाची स्वेच्छापूर्वक संमती, त्याची एकदिश झालेली इच्छाशक्ती आणि त्याचा सहभाग यांची आवश्यकता आहे. त्याची ‘अभीप्सा’ ही पृथ्वीने त्या अतिमानसिक निर्मिकाला दिलेली हाक आहे.

जर पृथ्वी आवाहन करेल आणि परमश्रेष्ठ त्यास प्रतिसाद देईल तर, त्या भव्य आणि गौरवशाली रूपांतरणाची घटिका अगदी आत्तादेखील असू शकते.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 160)

अभीप्सा म्हणजे जीवाने उच्चतर गोष्टींसाठी केलेला धावा होय; जे काही उच्चतर किंवा ईश्वरी चेतनेशी संबंधित आहे, त्यासाठी किंवा ईश्वरासाठी केलेला धावा होय, त्याला दिलेली हाक आहे.

*

अभीप्सा ही वासनेचे रूप असता कामा नये तर, ती अंतरात्म्याच्या निकडीची भावना आणि ईश्वराप्रत व ईश्वरप्राप्तीची शांत, स्थिर इच्छा असली पाहिजे, आस असली पाहिजे.

*

साधकाने योगमार्ग चालणे सुरु केल्यानंतर, आरंभीआरंभी व पुढेही दीर्घ काळपर्यंत त्याला अनुभव किती वेगाने येतील, अनुभवाची व्यापकता किती असेल, त्यांची तीव्रता किती असेल, अनुभवाच्या फलांची ताकद किती असेल हे सारे मूलतः साधकाच्या अभीप्सेवर आणि त्याच्या व्यक्तिगत प्रयत्नांवर अवलंबून असते.

वस्तूंच्या बाह्यवर्ती रूपांमध्ये व त्यांच्या आकर्षणात बुडालेल्या अहंप्रधान जाणिवेतून बाहेर पडून, एका उच्च अवस्थेच्या दिशेने मानवी आत्म्याचे वळणे की ज्या अवस्थेत मग विश्वरूप आणि विश्वातीत असलेले तत्त्व व्यक्तिरूपी साच्यात उतरून, व्यक्तिरूप साच्याचे परिवर्तन घडवू शकते, ती प्रक्रिया म्हणजे योगाप्रक्रिया होय. म्हणून या सिद्धीचा पहिला निर्णायक घटक असतो तो म्हणजे, आत्म्याला अंतर्मुख करणाऱ्या शक्तीची, आत्माभिमुखतेची तीव्रता.

साधकाच्या हृदयातील अभीप्सेचा जोर, त्याची इच्छाशक्ती, मनाची एकाग्रता, त्याच्या प्रयत्नांची चिकाटी आणि शक्तीचे उपयोजन करण्याचा त्याचा निर्धार ह्या गोष्टी म्हणजे ती तीव्रता दर्शविणारे मापदंड असतात….

….ईश्वरप्राप्तीचा हा उत्साह आणि ईश्वरप्राप्तीसाठी हृदयाची तळमळ, व्याकुळता ह्या गोष्टी साधकाचा अहंकार नष्ट करतात आणि त्याचा क्षुद्र, मर्यादित असा जो साचा असतो त्याच्या मर्यादा मोडून काढतात. आणि ज्याच्या भेटीसाठी तो तळमळत होता त्याच्या परिपूर्ण व व्यापक स्वागतासाठी जागा करून देतात. आणि त्यामुळे वैयक्तिक आत्मा व प्रकृती ही कितीही मोठी, कितीही उच्च असली तरी, ज्याचे स्वागत करावयाचे ते ईश्वरीतत्त्व हे विश्वरूप असल्याने अधिक व्यापक असते, आणि ते विश्वातीत असल्याने वैयक्तिक आत्म्याच्या अतीत असते.

– श्रीअरविंद

(CWSA 29 : 56), (CWSA 29 : 60-61), (CWSA 23 : 58)

प्रश्न : चैत्य अग्नी (Psychic Fire) कसा प्रज्वलित करावा?

श्रीमाताजी : अभीप्सेच्या द्वारे ! प्रगतीसाठी केलेला संकल्प आणि परिपूर्णतेप्रत बाळगलेली आस यांद्वारे ! आणि सर्वांवर कळस म्हणजे, प्रगतीसाठीचा संकल्प आणि आत्मशुद्धीकरण यांद्वारे हा चैत्य अग्नी चेतवला जातो.

ज्यांच्यामध्ये प्रगतीची इच्छा तीव्र असते आणि जेव्हा ते ती इच्छा आध्यात्मिक प्रगती आणि शुद्धीकरण या दिशेने वळवितात तेव्हा, आपोआप त्यांच्यामधील चैत्य अग्नी प्रदिप्त होतो. एखाद्याला जर स्वत:मधील एखादा दोष, एखादी त्रुटी दूर करावयाची असेल, त्याच्या प्रकृतीमधील काहीतरी त्याला प्रगत होण्यापासून रोखत असेल, ते सारे जर त्याने या चैत्य अग्नी मध्ये फेकून दिले तर, हा अग्नी अधिक तीव्रतेने प्रज्वलित होतो. आणि ही केवळ प्रतिमा नाही, ती सूक्ष्म भौतिक पातळीवरील वस्तुस्थिती आहे.

कोणी त्या ज्योतीची ऊब अनुभवू शकतो, तर कोणी एखादा सूक्ष्म भौतिक स्तरावर त्या ज्योतीचा प्रकाशदेखील पाहू शकतो. जेव्हा प्रकृतीमध्ये असे काही असते की, जे प्रगत होण्यापासून रोखत असते; ते जर व्यक्तीने त्या अग्नीमध्ये फेकून दिले, तर ते जळू लागते आणि ती ज्वाला अधिकाधिक मोठी होत जाते.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 251)