Tag Archive for: अतिमानस

विचारशलाका ०६

श्रीअरविंद यांनी एके ठिकाणी असे सांगितले आहे की, “प्रकाशाला बळाने खाली खेचायचा प्रयत्न करणे हे खचितच चुकीचे आहे. ‘अतिमानस’ ही अट्टाहासाने खाली खेचण्याची गोष्ट नाही. योग्य वेळ येईल तेव्हा, ते स्वत:हून आपलेआपणच खुले होईल; पण हे घडून येण्यापूर्वी, बरेच काही करावे लागेल आणि ते मात्र धीराने व कोणतीही घाईगडबड न करता करावे लागेल.”

साधक : “एखाद्या गोष्टीला खाली खेचून आणणे’’ ही अनेकांची प्रवृत्ती असते का?

श्रीमाताजी : माणसांना घाई असते आणि त्यांना ताबडतोब फळ हवे असते. आणि मग, त्यांना असे वाटायला लागते की, ते जणूकाही ‘अतिमानस’ खाली उतरवीत आहेत – वास्तविक, त्यांनी एखादे छोटे प्राणिक अस्तित्व (vital individuality) खाली खेचलेले असते, जे त्यांना वाकुल्या दाखवत असते आणि अंतत: ते त्यांना मूर्ख बनविते. बहुतेक वेळा म्हणजे, शंभरपैकी नव्व्याण्णव वेळा हे असेच घडते. एखादे छोटेसे व्यक्तित्व, एखादे प्राणिक अस्तित्व मोठा खेळ खेळते; प्रकाशाचा चकचकीत, दिखाऊ असा खेळ उभा करते. मग तो बिचारा, ज्याने त्या अस्तित्वाला ‘खाली खेचले’ होते तो त्या चकचकीत प्रकाशाने दिपून जातो आणि म्हणतो, “अरे, हे काय, हेच ते अतिमानस!” आणि तो खड्ड्यात जाऊन पडतो.

तुम्हाला जेव्हा खरोखरच खऱ्या ‘ईश्वरी प्रकाशा’चा स्पर्श झालेला असतो, त्याचे थोडेसे जरी दर्शन झालेले असते, त्याच्याशी जेव्हा तुमचा संपर्क निर्माण झालेला असतो, तेव्हाच तुम्ही ‘ईश्वरी प्रकाश’ आणि प्राणिक प्रकाश यामधील फरक ओळखू शकता आणि तेव्हाच तुम्हाला तो जणू काही रंगमंचावरील प्रकाशाचा कृत्रिम खेळ आहे हे कळू शकते. परंतु तसे नसेल, तर मात्र, इतरजण त्याने दिपून जातात, कारण तो प्रकाश तसा दिपवणाराच असतो, ‘अद्भुत’ असतो आणि मग त्या प्रकाशामुळे ते फसतात. पण, जेव्हा तुम्ही ‘ईश्वरी प्रकाश’ पाहिलेला असतो, त्या ‘सत्या’शी तुमचा संबंध प्रस्थापित झालेला असतो, तेव्हा तुम्ही त्या कृत्रिम प्रकाशाकडे फक्त पाहता आणि हसता. (तो कृत्रिम प्रकाश) ही फसवणूक असते, पण ती फसवणूक आहे हे ओळखण्यासाठी सुद्धा, तुम्हाला सत्य काय आहे ते ज्ञात असावे लागते.

मूलत: प्रत्येक गोष्टीबाबत हे असेच असते. अशा प्रकारचे खेळ ज्याच्यावर चालू असतात, असा ‘प्राण’ हा जणू काही महा-रंगमंच असतो — तो खूप आकर्षक, डोळे दिपवणारा, फसवा असतो. परंतु, जेव्हा तुम्हाला ‘सद्वस्तु’ म्हणजे काय हे माहीत असते, तेव्हाच तुम्हाला चटकन ते जाणवते, कोणत्याही तर्काविना, उत्स्फूर्तपणे जाणवते आणि तेव्हा तुम्ही म्हणता, “नाही, मला हे नको आहे.” जेव्हा तुम्ही ‘खेचून आणता’, तेव्हा शंभरातील नव्व्याण्णव वेळा तरी हेच घडते… लाखातूनच एखाद्या वेळीच असे घडते की, एखाद्याने खरोखरच ‘सद्वस्तु’ खाली आणलेली असते – पण तेव्हा हे सिद्ध होते की, त्याची तयारी झालेली होती. अन्यथा नेहमीच, तुम्ही जे खेचून आणता ते प्राणिक अस्तित्व असते, वरवरचे काहीतरी असे, ते त्या सद्वस्तुचे रंगमंचीय रूप असते, ती ‘सद्वस्तु’ नसते.

एखादी गोष्ट खाली खेचून आणणे ही नेहमीच अहंमन्य प्रक्रिया असते. ते आकांक्षेचे विकृत रूप असते. खऱ्या अभीप्सेमध्ये देणे अथवा आत्म-दान समाविष्ट असते तर खेचून आणण्यामध्ये स्वत:साठी काहीतरी मागणी असते. अगदी तुमच्या मनामध्ये कितीही विशाल अशी आकांक्षा का असेना, ती अगदी पृथ्वीएवढी, ब्रह्मांडाएवढी का असेना, तिचा काहीच उपयोग नसतो, कारण अशी आकांक्षा म्हणजे केवळ मानसिक क्रियाव्यवहार असतो.

– श्रीमाताजी [CWM 11 : 23]

आध्यात्मिकता २०

आपल्यामध्ये असलेल्या चिरंतन आत्म्याचा साक्षात्कार आपल्याला झाला आहे किंवा नाही हा प्रश्न व्यक्ती जोपर्यंत स्वतःला विचारत राहते; जोपर्यंत व्यक्तीच्या मनात काही शंका असते किंवा काही द्विधा मनस्थिती असते त्यातूनच हे सिद्ध होते की, अजूनपर्यंत ‘खरा’ संपर्क झालेला नाही. कारण जेव्हा ही घटना घडून येते, तेव्हा ती तिच्यासोबत अशी एक अवर्णनीय गोष्ट घेऊन येते, जी इतकी नूतन आणि इतकी खात्रीदायक असते की, शंकाकुशंका, प्रश्न यांना जागाच शिल्लक राहत नाही. तो खरोखरच एक नवजन्म असतो, ‘नवजन्म’ या शब्दाचा जो खराखुरा अर्थ आहे, अगदी त्या अर्थाने तो नवीन जन्म असतो.

तुम्ही एक नवीनच व्यक्ती बनता, आणि तुमचा मार्ग कोणताही असला किंवा नंतर त्या मार्गावर कोणत्याही अडचणी जरी आल्या तरी ती नवजन्माची जाणीव तुम्हाला कधीच सोडून जात नाही. ही गोष्ट इतर अनेक अनुभवांसारखी नसते, म्हणजे इतर अनुभव येतात आणि नंतर मागे पडतात, पडद्याआड जातात, त्यांची एक प्रकारची धूसर स्मृती तुमच्या मनात रेंगाळत राहते, ती स्मृती धरून ठेवणेसुद्धा काहीसे कठीण असते, त्याची आठवण कालांतराने अस्पष्ट, धूसर, अधिक धूसर होत जाते, मात्र हा अनुभव तसा नसतो.

तुम्ही एक नवीनच व्यक्ती बनलेले असता, आणि काहीही झाले तरी निश्चितपणे तुम्ही ती नवीन व्यक्ती असता. आणि मनाच्या सर्व अक्षमता, प्राणाच्या सर्व अडचणी, शरीराचे जडत्व या सर्वांनादेखील ही नवीन अवस्था बदलणे अशक्य असते. या नवीन अवस्थेमुळे चेतनेच्या जीवनामध्ये एक निर्णायक क्षण येतो. या साक्षात्कारापूर्वीची व्यक्ती आणि साक्षात्कारानंतरची व्यक्ती ही आता एकसारखीच असत नाही. …त्याचे खऱ्या अर्थाने पूर्णपणे प्रतिक्रमण (reversal) झालेले असते, ते प्रतिक्रमण असे असते की, ज्यामध्ये परतून मागे फिरता येत नाही.

आणि म्हणूनच जेव्हा लोकं मला सांगतात, “माझा माझ्या आत्म्याशी संपर्क झाला आहे की नाही हे जाणून घ्यायला मला आवडेल, ” तेव्हा मी त्यांना सांगते, “ज्याअर्थी तुम्ही हा प्रश्न विचारत आहात त्याअर्थी हे उघड आहे की, अजूनपर्यंत तुमचा तुमच्या आत्म्याशी संपर्क झालेला नाही. तुम्हाला अन्य कोणी उत्तर देण्याची आवश्यकता नसते, ते उत्तर तुमचे तुम्हीच स्वतःला द्यायचे असते.” जेव्हा ही गोष्ट घडून येते, तेव्हा त्याव्यतिरिक्त अन्य काही शिल्लक नसते. सारे काही संपलेले असते.

आणि आपण आत्ता त्याबद्दल बोलत आहोत म्हणून मी पुन्हा एकदा आठवण करून देते; श्रीअरविंदांनी काय सांगितले आहे, त्यांनी पुन्हापुन्हा जे सांगितले आहे, लिहिले आहे, पुन्हापुन्हा ठाशीव पद्धतीने जे सांगितले आहे त्याची मी आठवण करून देते. त्यांनी सांगितले आहे की, त्यांच्या योगाचा, पूर्णयोगाचा प्रारंभ या अनुभवानंतरच होऊ शकतो, त्या आधी नाही… त्यामुळे हा अनुभव येण्यापूर्वी, अतिमानस काय आहे हे आता आपल्याला कळायला लागले आहे. त्याच्यासंबंधी काही कल्पना तयार करता येत आहेत किंवा कोणत्याही प्रकारे, मग ते कितीही अल्पसे का होईना पण तुम्हाला त्याचे मूल्यमापन करता येत आहे अशा प्रकारच्या कोणत्याही भ्रामक कल्पनांना खतपाणी घालू नका.

म्हणून, या मार्गावर प्रगत होण्याची जर तुम्हाला इच्छा असेल तर प्रथमतः या नवजन्माच्या मार्गावर अतिशय विनम्रपणे तुम्ही तुमची पहिलीवहिली पावले टाकली पाहिजेत आणि तुम्हाला अतिमानसिक अनुभव येऊ शकतात या भ्रांतकल्पनांचा परिपोष करण्यापूर्वी, तो नवजन्म प्रत्यक्षात उतरविला पाहिजे…

तुम्हाला दिलासा देण्यासाठी मी एक गोष्ट सांगू इच्छिते की, तुम्ही या पृथ्वीवर आत्ता जीवन जगत आहात, या वस्तुस्थितीमुळेच, भलेही तुम्ही त्याबद्दल सचेत असाल किंवा नसाल, तुम्हाला हवे असो किंवा नसो, आता या पृथ्वीच्या वातावरणात प्रसृत होऊ लागलेले, नूतन अतिमानसिक द्रव्य तुम्ही तुमच्या प्रत्येक श्वासागणिक ग्रहण करत आहात. आणि ते द्रव्य तुमच्यामध्ये काही गोष्टींची तयारी करत आहे, आणि तुम्ही निर्णायक पाऊल उचलताक्षणीच, ते द्रव्य अचानकपणे आविष्कृत होईल.

– श्रीमाताजी [CWM 09 : 336-337]

मानव जे जे काही साध्य करू शकतो ते सर्व काही ज्यांनी साध्य केले आहे, पण तरीही जे समाधानी नाहीत कारण, या जीवनात कधीच गवसू शकणार नाहीत अशा उच्चतर गोष्टींची ते या जीवनाकडून अपेक्षा करतात; अशाच लोकांसाठी ‘पूर्णयोग’ आहे.

ज्यांनी अज्ञाताचा ध्यास घेतलेला आहे आणि जे पूर्णत्वाची आस बाळगतात, भंडावून सोडणारे प्रश्न जे स्वत:ला विचारत राहतात आणि तरीही ज्यांच्या प्रश्नांची तड लागत नाही, कोणतीही निश्चित अशी उत्तरे त्यांना गवसत नाहीत, अशा लोकांचीच ‘पूर्णयोगा’साठी तयारी झालेली असते.

मानवजातीच्या भवितव्याची ज्यांना काळजी आहे आणि विद्यमान व्यवस्थेबाबत जे समाधानी नाहीत अशा लोकांना हमखासपणे जे प्रश्न पडत राहतात, अशा मूलगामी प्रश्नांची एक मालिकाच असते. ते प्रश्न साधारणपणे असे असतात :

मरायचेच असेल तर व्यक्ती जन्मालाच का येते?

दु:खभोग सहन करण्यासाठीच का व्यक्ती जीवन जगत असते?

जर वियोग होणारच असेल तर व्यक्ती प्रेमच का करते?

चुका करण्यासाठीच व्यक्ती विचार करते का?

चुका करण्यासाठीच का व्यक्ती कृती करते?

याचे स्वीकारार्ह असे एकमेव उत्तर आहे की, गोष्टी जशा असायला हव्यात तशा त्या नाहीत. मात्र हे विरोधाभास अटळ आहेत असे नाही, तर ते सुधारता येण्यासारखे आहेत आणि एक ना एक दिवस ते विरोधाभास नाहीसे होतीलच. जग आज जसे आहे त्यावर काही उपायच नाही असेही नाही.

ही पृथ्वी अशा एका संक्रमणकाळात आहे की, जो काळ मानवाच्या तोकड्या चेतनेला खूप दीर्घ भासतो पण शाश्वत चेतनेच्या दृष्टीने तो एखाद्या परमाणु इतका अल्प असतो. एवढेच नव्हे तर, अतिमानसिक चेतनेच्या अवतरणाबरोबर हा संक्रमणकाळसुद्धा संपुष्टात येईल. त्यावेळी विरोधाभास सुसंवादामध्ये आणि विरोध हा समन्वयामध्ये परिवर्तित होईल.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 98-99)

(उत्तरार्ध – भाग ०१ चा सारांश – आजवर जडभौतिक, प्राण आणि मन अशा क्रमाने उत्क्रांती झालेली आहे. अतिमानसाचे विकसन हे पुढील पाऊल असणार आहे, असे श्रीअरविंद म्हणतात…)

(उत्तरार्ध) – भाग ०२

श्रीअरविंद अशी शिकवण देतात की, अशा एका उच्चतर तत्त्वाचे अवतरण शक्य आहे की, ज्यामुळे आध्यात्मिक ‘स्व’ची मुक्ती केवळ या जगापासून दूर जाऊन नाही तर या जगात राहूनच शक्य होईल. एवढेच नव्हे तर, त्या उच्चतर तत्त्वाच्या अवतरणामुळे मनाच्या अज्ञानाची किंवा मर्यादित, अपुऱ्या ज्ञानाची जागा अशी अतिमानसिक सत्य-चेतना (truth-consciousness) घेईल, जी आंतरिक ‘स्व’चे पुरेसे माध्यम असेल आणि ज्यामुळे मानवाला अंतरंगामध्ये तसेच गतिशीलपणे स्वत:चा शोध घेता येईल आणि त्यामुळे त्याच्यामध्ये अजूनपर्यंत शिल्लक असलेल्या प्राणिसदृश मानवतेचे विकसन दिव्यतर वंशामध्ये करता येईल. उच्चतर चेतनेच्या म्हणजे अजूनही सुप्त असलेल्या अतिमानस तत्त्वाच्या कार्याद्वारे आणि अवतरणाद्वारे होणाऱ्या परिवर्तनासाठी किंवा रुपांतरणासाठी अस्तित्वाची सर्व अंगे खुली करून देणे या ध्येयापर्यंत ‘योगा’ची मानसिक तपस्या उपयोगात आणता येणे शक्य आहे.

– श्रीअरविंद [CWSA 36 : 547-548]

प्रकृतीमध्ये पाषाणातून वनस्पतीकडे, वनस्पतीकडून प्राण्याकडे, प्राण्याकडून मानवाकडे, अशाप्रकारे आरोहण करणारा क्रमविकास आहे. आजवर ज्ञात असलेल्या या विकासक्रमानुसार, सध्यातरी मानव हा सर्वात वरच्या पायरीवर आहे असे दिसून येते. अर्थातच, त्यामुळे आपण या विश्वातील विकासाचा अंतिम टप्पा असून, आपल्यापेक्षा उच्चतर असे या पृथ्वीतलावर काहीही असणे शक्य नाही, असा मनुष्याचा समज झाला आहे. आणि हाच त्याचा फार मोठा गैरसमज आहे. त्याच्या शारीरिक प्रकृतीच्या (physical nature) दृष्टीने तो आजही जवळजवळ पूर्णपणे प्राणीच आहे; विचार करणारा आणि बोलणारा प्राणी आहे इतकेच. मात्र त्याच्या शारीरिक सवयी आणि सहज स्वाभाविक प्रवृत्ती पाहता तो अजूनही प्राणिदशेतच आहे. अर्थातच अशा अपूर्ण निर्मितीत प्रकृती संतुष्ट असू शकत नाही हे निश्चित.

प्रकृती एक नवीन प्रजाती बनविण्याच्या प्रयत्नांत आहे. प्राण्याच्या दृष्टीने जसा मानव, त्याप्रमाणे मानवाच्या दृष्टीने ती प्रजाती असेल. ती प्रजाती बाह्य आकाराने मानवसदृशच असेल; तरीपण तिची चेतना मनाहून कितीतरी उच्च स्तरावरची असेल आणि ती प्रजाती अज्ञानाच्या दास्यत्वातून पूर्णपणे मुक्त झालेली असेल. मनुष्याला हे सत्य अवगत करून देण्यासाठी श्रीअरविंद या पृथ्वीतलावर आले. मानसिक चेतनेमध्ये जगणारा मनुष्य हा केवळ एक संक्रमणशील जीव आहे; परंतु एक नवी चेतना, ‘सत्य-चेतना’ प्राप्त करून घेण्याची क्षमता असणारा आणि एक पूर्णतया सुसंवादपूर्ण, कल्याणकारी, सुंदर, आनंदी आणि पूर्ण जाणीवयुक्त जीवन जगण्याची क्षमता असणारा असा तो जीव आहे, असे त्यांनी सांगितले आहे. ही चेतना, जिला त्यांनी ‘अतिमानस’ (Supermind) असे संबोधले आहे, ती चेतना स्वत:मध्ये (पृथ्वीकरिता) प्रस्थापित करण्यासाठी, आणि त्यांच्या भोवती जमलेल्या साधकांना देखील त्या चेतनेची अनुभूती यावी म्हणून साहाय्य करण्यासाठी, श्रीअरविंदांनी या पृथ्वीतलावर त्यांचा संपूर्ण आयुष्यभराचा वेळ देऊ केला.

– श्रीमाताजी [CWM 12 : 116]

ज्या ‘ईश्वरा’च्या प्राप्तीची आपण इच्छा बाळगतो तो कोणी दूरस्थ आणि अप्राप्य नाही. ‘तो’ त्याच्या स्वनिर्मित सृष्टीच्या अंतस्थ गाभ्यात विद्यमान आहे आणि आपल्याकडून ज्या कृतीची त्याला अपेक्षा असते ती कृती म्हणजे ‘त्या’चा शोध. तसेच आपल्या व्यक्तिगत रूपांतरणाच्या साहाय्याने ‘त्या’ला जाणण्यास, ‘त्या’च्याशी एकत्व पावण्यास, आणि अखेरीस जाणीवपूर्वक ‘त्या’ला अभिव्यक्त करण्यास आपण समर्थ बनणे ही होय. याच गोष्टीसाठी आपण स्वतःला समर्पित केले पाहिजे, हेच आपल्या अस्तित्वाचे प्रयोजन आहे. आणि या श्रेष्ठ साक्षात्काराच्या दिशेने पडणारे आपले पहिले पाऊल म्हणजे अतिमानसिक ‘चैतन्या’चे आविष्करण.

– श्रीमाताजी [CWM 13 : 347]

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

‘अधिमानस’ आणि ‘अतिमानस’ यातील फरक स्पष्ट करताना श्रीमाताजी म्हणतात, पृथ्वी-रूपांतरणाचे एक आगळेवेगळे कार्य हे श्रीअरविंदांचे मुख्य कार्य आहे. मनाच्या वर चेतनायुक्त जिवाचे अनेकानेक स्तर आहेत, त्यामध्येच जे खरे दिव्य विश्व आहे, ज्याला श्रीअरविंदांनी ‘अतिमानस’ (Supermind) असे संबोधले आहे, ते सत्याचे विश्व आहे. परंतु त्या दरम्यान (पृथ्वी आणि अतिमानसिक विश्व यांच्या दरम्यान) ज्याला त्यांनी ‘अधिमानस’ (Overmind) म्हणून ओळखले होते ते वैश्विक देवदेवतांचे जगत आहे. आत्तापर्यंत आपल्या विश्वाचे शासन या ‘अधिमानसा’ने केले होते. स्वतःच्या प्रदीप्त अशा चेतनेमध्ये मनुष्याला अधिमानसाचीच प्राप्ती करून घेता येणे शक्य झाले होते. आणि तेच परमोच्च दिव्य आहे असे समजण्यात येत होते आणि आजवर जे कोणी तेथवर जाऊन पोहोचले होते त्यांच्या मनात, त्यांनी सत्य-चैतन्याला स्पर्श केला आहे, याविषयी तीळमात्रही शंका नव्हती. कारण सामान्य मानवी चेतनेच्या दृष्टीने याचे (अधिमानसाचे) वैभव एवढे महान असते, ते एवढे चमकदार असते की, त्यामुळे आपण अंतिमतः शिखरस्थानी असणाऱ्या सत्याप्रत पोहोचलो आहोत असे मानण्यास ते मनुष्याला प्रवृत्त करते. तथापि वास्तव हे आहे की ‘अधिमानस’ हे अस्सल ‘दिव्यत्वा’च्या पुष्कळ खाली आहे. ते सत्याचे खरेखुरे धाम नाही. तर इतिहासाच्या आरंभापासून माणसं ज्यांच्यापुढे नतमस्तक होत आली आहेत अशा पूर्वसुरींचे, सर्व सर्जक शक्तींचे आणि सर्व देवदेवतांचे ते क्षेत्र आहे. पण अस्सल दिव्यत्व आजवर आविष्कृत झालेले नाही आणि त्याने या पृथ्वी-प्रकृतीमध्ये रूपांतरण घडविलेले नाही. याचे कारण हेच की, आजवर ‘अधिमानसा’लाच ‘अतिमानस’ म्हणून समजण्याची चूक झाली. वैश्विक देवदेवता सत्य-चेतनेमध्ये पूर्णतः वसती करत नाहीत : तर त्या केवळ त्या ‘सत्य-चेतने’च्या संपर्कात असतात आणि त्या देवदेवता त्या वैभवाच्या प्रत्येकी एकेका पैलूचे प्रतिनिधित्व करत असतात.

….’अधिमानसा’मध्ये मानवतेचे दिव्य प्रकृतीमध्ये रूपांतर करण्याची क्षमता नसते आणि ती त्याच्याकडे असूही शकत नाही. त्यासाठी, ‘अतिमानस’ हेच एकमेव प्रभावी मध्यस्थ आहे. आणि येथेच आमचा योग (पूर्णयोग) हा जीवनाचे आध्यात्मिकीकरण करू पाहणाऱ्या भूतकाळातील इतर प्रयत्नांपेक्षा वेगळा ठरतो. कारण ‘अधिमानसा’चे वैभव हे सर्वोच्च वास्तव नाही तर, मन आणि अस्सल ‘दिव्यत्व’ या दोहोंच्या दरम्यानची ती केवळ एक पायरी आहे, हे आमचा योग (पूर्णयोग) जाणतो. (क्रमश:)

विचार शलाका – ३०

चेतना ही एखाद्या शिडीसारखी असते. प्रत्येक युगामध्ये असा एखादा महान जीव असतो की, जो या शिडीमध्ये एका नवीन पायरीची भर घालण्यासाठी आणि आजवर सामान्य चेतना जेथवर जाऊन पोहोचू शकली नाही तेथवर जाण्यासाठी समर्थ असतो. उच्च अवस्था प्राप्त करून घेऊन, जडभौतिक चेतनेपासून पूर्णतः विलग होऊन जायचे असेही शक्य असते. पण मग तेव्हा व्यक्ती या शिडीचा भाग राहात नाही. परंतु, जडभौतिकाशी संपर्क न गमावता, या शिडीमध्ये एका नवीन पायरीची भर घालण्याची क्षमता हीच, विश्वातल्या महान युगामधील महान उपलब्धी राहिलेली आहे. म्हणजे, ‘सर्वोच्च’ अवस्थेपर्यंत जायचे आणि त्याच वेळी, विविध पातळ्यांवरील, परस्परांमधील संबंध एक प्रकारच्या रिक्तपणाने तोडून न टाकता, सर्वोच्चाचा धागा तळागाळाशीदेखील जोडून ठेवायचा.

अशा रीतीने वर आणि खाली जाणे आणि तळाचे सर्वोच्चाशी ऐक्य घडवून आणणे हेच साक्षात्काराचे पूर्ण रहस्य आहे आणि हेच ‘अवतारा’चे कार्य असते. प्रत्येक वेळी जेव्हा तो अशा रीतीने शिडीमध्ये एका नवीन पायरीची भर घालतो तेव्हा या पृथ्वीवर एक नवीन निर्मिती घडून येते.

श्रीअरविंदांनी ज्याला ‘अतिमानस’ (Supramental) असे संबोधले आहे त्या नवीन पायरीची भर त्यांनी घातली आहे. त्याचा परिणाम म्हणून, चेतना ही अतिमानसिक जगामध्ये प्रवेश करू शकेल आणि तरीही ती स्वतःचे वैयक्तिक रूप, तिची पृथगात्मकता (individualization) टिकवून ठेवू शकेल आणि एका नवीन निर्मितीच्या प्रस्थापनेसाठी खाली अवतरू शकेल. अर्थातच ही काही अंतिम निर्मिती असणार नाही, कारण जीवाच्या या पुढच्याही अधिक श्रेणी असतात. परंतु सध्या तरी आम्ही ही अतिमानसिक चेतना अवतरीत व्हावी म्हणून कार्यरत आहोत. त्याचा परिणाम म्हणून या जगाची पुनर्रचना होईल, या विश्वामध्ये सत्य दिव्य व्यवस्था पुन्हा एकवार परतेल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 178-179)

विचार शलाका – १६

प्रकृतीमध्ये मूलतः चेतनेची उत्क्रांती आकाराला येत आहे, पृथ्वीवर आध्यात्मिक विकसन होत आहे, हेच जर का या जडभौतिकामधील आपल्या जन्माचे गुप्त सत्य असेल तर, आजचा मनुष्य हा त्या उत्क्रांतीचा अखेरचा टप्पा असू शकणार नाही. कारण तो आत्म्याचा अगदी अपूर्ण आविष्कार आहे. मनदेखील खूपच मर्यादित रूप आहे आणि ते केवळ साधनभूत आहे. मन हे चेतनेचा केवळ एक मधला टप्पा आहे. त्यामुळेच मनोमय जीव (मनुष्य) हा केवळ संक्रमणशील जीवच असू शकतो.

आणि मनुष्य जर का अशा रीतीने स्वतःच्या मनोमयतेच्या अतीत जाण्यास अक्षम असेल तर, त्याला बाजूला सारून, अतिमानस आणि अतिमानव आविष्कृत झालेच पाहिजेत आणि त्यांनी या सृष्टीचे नेतृत्व केलेच पाहिजे.

पण मनाच्या अतीत असणाऱ्या गोष्टीप्रत खुले होण्याची जर मनुष्याच्याच मनाची क्षमता असेल तर मग त्याने स्वतःच अतिमानस आणि अतिमानव तत्त्वापर्यंत जाऊन का पोहोचू नये? किंवा किमान त्याने प्रकृतीमध्ये आविष्कृत होणारे आत्म्याचे जे महान तत्त्व आहे त्याच्या उत्क्रांतीसाठी आपली मनोमयता, आपला प्राण, आपले शरीर स्वाधीन का करू नये?

– श्रीअरविंद
(CWSA 21-22 : 879)

अतिमानसिक देह

जे अतिमानसिक शरीर येथे अस्तित्वात आणायचे आहे त्या शरीराची हलकेपणा (lightness), अनुकूलनशीलता (adaptability), विकासानुगामित्व (plasticity) आणि प्रकाशमानता (luminosity), ही चार गुणवैशिष्ट्ये असतील.

जेव्हा शरीर हे सर्वांगांने दिव्य होईल तेव्हा जणू काही असे वाटेल की, ते हवेमधून चालत आहे, त्यामध्ये कोणतेही जडत्व किंवा तमस किंवा अचेतनता असणार नाही.

त्याच्या अनुकूलनशीलतेच्या शक्तीला कोणतीच मर्यादा असणार नाही. त्याला ज्या कोणत्या परिस्थितीमध्ये ठेवण्यात येईल, ती परिस्थिती त्याच्याकडून जी मागणी करेल त्या मागणीशी ते लगेचच स्वतःला अनुकूल करून घेईल; नेहमी जसे आत्म्याला जडत्व (जडभौतिक शरीर) हे लोढणे म्हणून वागवावे लागते तसे आता करावे लागणार नाही; कारण त्या शरीरातील पूर्ण चैतन्य हे जडत्व आणि अक्षमता या गोष्टींना पूर्ण हद्दपार करेल.

शरीरावर आघात करू पाहणाऱ्या प्रत्येक विरोधी शक्तीच्या हल्ल्याचा सामना करण्यास अतिमानसिक विकासानुगामित्व त्या शरीरास सक्षम बनविते. शरीर त्या हल्ल्याचा प्रतिकार दुबळेपणाने करणार नाही; उलट, ते शरीर एवढे लवचिक, लवलवीत असेल की विरोधी शक्तीला निघून जाण्यासाठी वाट मोकळी करून देऊन, ते त्या शक्तीलाच शून्यवत करून टाकेल. त्यामुळे त्याला कोणतेही हानीकारक परिणाम सहन करावे लागणार नाहीत आणि अगदी प्राणघातक हल्लेदेखील त्याला कोणतीही हानी न पोहोचवता निघून जातील.

आणि अंततः ते शरीर दीप्तिमान होऊन जाईल, त्याच्या प्रत्येक पेशीमधून अतिमानसिक उज्ज्वलता प्रस्फुरित होत राहील. सूक्ष्म दृष्टी खुली होण्याइतपत ज्यांचा विकास झाला आहे केवळ अशा व्यक्तींनाच नव्हे; तर अगदी सामान्य माणसालादेखील ही प्रभा जाणवेल. अगदी हरएक व्यक्तीसाठी ती गोष्ट उघड सत्य असेल, अगदी शंकेखोर माणसाची सुद्धा ज्यामुळे खात्री पटेल असा तो रूपांतरणाचा स्थायी पुरावा असेल.

देहाचे रूपांतरण हा सर्वोच्च आध्यात्मिक पुनर्जन्म असेल – हे रूपांतर म्हणजे सामान्य गतकाळ पूर्णतया नाहीसा होणे असेल. कारण सातत्याने आपले आधीचे सहसंबंध आणि आधीची परिस्थिती झुगारून देत, प्रत्येक नव्या क्षणी जणू नव्यानेच जीवन सुरू केल्याप्रमाणे वाटचाल करत राहणे म्हणजे आध्यात्मिक पुनर्जन्म होय. आपल्या गतकाळातील कृतींचा जो प्रवाह असतो, ज्याला ‘कर्म’ असे म्हटले जाते, त्यापासून मुक्त होणे म्हणजे आध्यात्मिक पुनर्जन्म होय; वेगळ्या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर, प्रकृतीच्या कार्य आणि कारणाची जी सामान्य गतिविधी असते त्या बंधनापासून सुटका, मुक्तता म्हणजे आध्यात्मिक पुनर्जन्म होय. जाणिवेमधून हे भूतकाळाचे बंध जेव्हा अगदी यशस्वीरीत्या तोडून टाकले जातात तेव्हा, त्या सगळ्या चुका, सगळे गुन्हे, सगळे दोष आणि मूर्खपणाच्या साऱ्या गोष्टी ज्या आपल्या स्मरणामध्ये अजूनही जाग्या असतात, रक्त शोषणाऱ्या जळवांप्रमाणे ज्या आपल्याला चिकटून बसलेल्या असतात, त्या सगळ्या गोष्टी गळून पडतात आणि आपण अत्यंत आनंददायीरीत्या मुक्त व्हावे म्हणून त्या आपल्याला सोडून जातात. हे स्वातंत्र्य ही काही केवळ विचारगम्य गोष्ट नाही; तर ते अतिशय सघन, व्यावहारिक आणि भौतिक असे वास्तव आहे. आपण खरोखरच मुक्त असतो, आपल्याला कोणतीच गोष्ट बंधनात पाडू शकत नाही, कोणतीच गोष्ट आपल्यावर परिणाम करू शकत नाही, जबाबदारीच्या जाणिवेने आपण ग्रस्त नसतो. आपल्याला आपल्या भूतकाळाच्या अतीत व्हायचे असेल, आपल्याला तो पुसून टाकायचा असेल किंवा त्याचा प्रतिकार करायचा असेल तर, केवळ पश्चात्ताप किंवा तत्सम गोष्टींद्वारे तसे करता येणार नाही. अशा प्रकारचा अरूपांतरित भूतकाळ कधी अस्तित्वात होता हेच आपण विसरून गेले पाहिजे आणि आपल्याला जखडून ठेवणाऱ्या बंधनांना तोडणाऱ्या चेतनेच्या प्रदीप्त अवस्थेमध्ये आपण प्रवेश केला पाहिजे. आध्यात्मिक पुनर्जन्म घ्यायचा म्हणजे जेथे आपण ईश्वराशी एकत्व पावलेले असतो आणि कर्माच्या प्रतिक्रियांपासून शाश्वतपणे मुक्त असतो अशा चैत्य जाणिवेमध्ये आपण प्रथम प्रवेश केला पाहिजे. चैत्य पुरुषाविषयी (Psychic being) जाग आल्याखेरीज हे करता येणे शक्य नाही; परंतु जो आत्मा सदासर्वदा ईश्वराप्रत समर्पित झालेला असतो, त्या आपल्या अंतर्यामी असणाऱ्या आत्म्याविषयी आपण एकदा का निःशंकपणे जागृत झालो की, सर्व बंधने नाहीशी होतात. मग मात्र भूतकाळ आपल्याला जखडून ठेवत नाही आणि जीवन नित्य नवीन स्वरुपात पुन्हा एकदा सुरू होते. आध्यात्मिक पुनर्जन्माच्या अंतिम उच्चावस्थेची तुम्हाला कल्पना यावी म्हणून सांगते की, अखिल विश्व प्रत्यक्षात प्रत्येक क्षणाला नाहीसे होत असते आणि प्रत्येक क्षणाला ते नव्याने निर्माण होत असते, असा सदोदित अनुभव येऊ शकतो.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 175-177)