Tag Archive for: अंतरात्मा

तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती चेतनेपासून मागे होऊन, अंतरंगात खोलवर शिरले पाहिजे. मग आत… आत… आत… खोलवर, खूप खोल, एका अतिशय खोल, अचल आणि शांत विवरामध्ये प्रवेश केला पाहिजे. तिथे गेल्यावर तुम्हाला अतिशय अचल व परिपूर्ण, माधुर्यपूर्ण असे आणि एक प्रकारच्या ऊबदार, स्थिरशांत तत्त्वामुळे समृद्ध झालेले असे काहीतरी आढळेल. तो अंतरात्मा असतो.

व्यक्ती जर तसाच प्रयत्न करत राहिली आणि सचेत राहिली तर, तिला एक प्रकारची परिपूर्णता अनुभवास येते आणि त्यामध्ये काहीतरी परिपूर्ण, अगाध खोली असल्याची तिला जाणीव होते. व्यक्तीला असे जाणवते की, तिने जर त्यामध्ये प्रवेश केला तर तिच्यासमोर अनेक रहस्यं प्रकट होतील. काहीतरी शाश्वत असावे आणि त्याचे अतिशय शांत, नितळ पाण्यामध्ये प्रतिबिंब पडलेले असावे तसे हे असते. येथे व्यक्तीला काळाच्या मर्यादेचे बंधन राहात नाही. व्यक्तीने जेव्हा अंतरात्म्याच्या गाभ्याला स्पर्श केलेला असतो तेव्हा, ‘आपण कायमच अस्तित्वात होतो आणि अनंत काळपर्यंत अस्तित्वात राहणार आहोत,’ अशी जाणीव व्यक्तीला होते. आणि हा संपर्क सचेत आणि पुरेसा परिपूर्ण असेल तर, तो तुम्हाला तुमच्या बाह्य रूपाकाराच्या बंधनांतून मुक्त करतो. तुमच्याकडे शरीर आहे म्हणूनच केवळ तुम्ही जिवंत आहात, असे आता तुम्हाला वाटेनासे होते.
(उत्तरार्ध उद्या…)

-श्रीमाताजी (CWM 09 : 310)

(व्यक्तीचा जेव्हा तिच्या अंतरात्म्याशी किंवा चैत्य पुरुषाशी संपर्क झालेला असतो, तेव्हाचे ते क्षण महत्त्वाचे असतात असे श्रीमाताजी सांगत आहेत…)

अंतरात्म्याशी होणाऱ्या संपर्काचे हे क्षण म्हणजे बरेचदा जीवनातील एखाद्या निर्णायक वळणाचे क्षण असतात. अशा वेळी व्यक्तीचे एक पाऊल पुढे पडलेले असते, चेतनेच्या दृष्टीने तिची प्रगती झालेली असते. आणि बरेचदा त्याचा संबंध संकटाशी किंवा एखाद्या अत्यंत बिकट परिस्थितीशी असतो. अशा प्रसंगी व्यक्तीच्या समग्र अस्तित्वाकडून त्या ईश्वराचा अत्यंत तीव्र, उत्कट धावा केला जातो. तो इतका आर्त असतो की, त्यामुळे व्यक्तीची आंतरिक चेतना, तिला झाकून टाकणारे अचेतनेचे सर्व पडदे भेदून, तिच्या सर्व दीप्तिमानतेनिशी पृष्ठभागावर येते.

व्यक्ती जेव्हा असा अत्यंत आर्ततेने ईश्वराचा धावा करते तेव्हा त्यातून एखाद्या व्यक्तित्वाचे, दिव्य अंशावताराचे (emanation) अवतरणदेखील घडून येऊ शकते. त्या विशिष्ट क्षणी, एखादे नियत कार्य पूर्ण करण्यासाठी, तुमच्या व्यक्तित्वाशी एखादा दिव्य पैलू जोडला जाऊ शकतो. एखादी लढाई जिंकणे किंवा एखादी गोष्ट अभिव्यक्त करणे अशा प्रकारचे हे नियत कार्य असू शकते. आणि एकदा का हे नियत कार्य पूर्ण झाले की, बहुतेक वेळा तो अंशावतार लोप पावतो.

– श्रीमाताजी (CWM 15 : 341)

साधना, योग आणि रूपांतरण – १९३

योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया – भाग ०९

वरून होणाऱ्या अवतरणाच्या प्रक्रियेमध्ये आणि त्याच्या कार्याबाबत, स्वतःवर संपूर्णपणे विसंबून राहता कामा नये, ही गोष्ट सर्वाधिक महत्त्वाची आहे. येथे ‘सद्गुरू’च्या मार्गदर्शनावर अवलंबून राहिले पाहिजे. जे जे काही घडते ते ते सारे त्यांच्या विवेकावर, मध्यस्थीवर आणि त्यांच्या निर्णयावर सोपविले पाहिजे.

कारण बरेचदा असे घडते की, या अवतरणामुळे, कनिष्ठ प्रकृतीच्या शक्ती उत्तेजित होतात, उद्दीपित होतात आणि उच्चतर शक्तींमध्ये मिसळू पाहतात आणि त्यांना स्वत:च्या फायद्यासाठी स्वत:कडे वळवू पाहतात. बरेचदा तर असेही घडते की, परमेश्वर किंवा दिव्य मातेचे (मायावी) रूप घेऊन, एक किंवा अनेक अ-दैवी शक्ती प्रकट होतात आणि साधकाकडून सेवेची आणि शरणागतीची मागणी करतात. साधकाने जर त्यास संमती दिली तर मग अत्यंत विघातक परिणाम घडून येतात.

खरोखरच, साधक केवळ ‘ईश्वरी’ कार्यालाच सहमती देत असेल आणि त्याच्या मार्गदर्शनाला शरण जात असेल किंवा समर्पित होत असेल तर मग सारेकाही सुरळीत चालत राहते. ही सहमती देणे आणि सर्व अहंकारी शक्तींना किंवा अहंकाराला चुचकारणाऱ्या शक्तींना नकार देणे या गोष्टी साधनामार्गावरील संपूर्ण वाटचालीमध्ये संरक्षक कवचाप्रमाणे कार्य करतात. पण ‘प्रकृती’चे मार्ग हे मायाजालांनी भरलेले असतात, अहंकाराचे अगणित कपटवेश असतात; ‘राक्षसी माया’, ‘काळोखाच्या शक्तीं’ची भ्रांती, असाधारणरित्या कुशल असते. येथे तर्कबुद्धीचे मार्गदर्शन पुरे पडत नाही, बरेचदा त्यातून विश्वासघात होतो. आणि कोणत्याही आकर्षक, प्रलोभनकारी हाकेनुसार वागायला प्राणिक इच्छा तर आपल्यासोबत सदैव तयारच असते. आणि म्हणूनच आम्ही ज्याला ‘समर्पण’ असे संबोधतो, त्यावर ‘पूर्णयोगा’मध्ये आम्ही इतका अधिक भर देत असतो.

हृदयचक्र पूर्णपणे खुले झाले असेल आणि जर अंतरात्मा नेहमीच नियंत्रण ठेवत असेल तर, मग काही प्रश्नच उद्भवत नाही, मग सारेकाही सुरक्षित असते. परंतु कोणत्याही क्षणी, एखाद्या कनिष्ठ आवेगामुळे अंतरात्मा झाकोळला जाऊ शकतो. काही अगदी थोडेच जण या धोक्यांपासून दूर राहू शकतात आणि ही तीच माणसं असतात की, ज्यांना ‘समर्पण’ अगदी सहजतेने साध्य होते. या अतिशय कठीण प्रयासांमध्ये, जो ‘ईश्वरा’शी तादात्म्य पावलेला आहे किंवा जो ‘ईश्वरा’चे प्रतिनिधित्व करतो अशा व्यक्तीचे मार्गदर्शन आवश्यक आणि अनिवार्य ठरते.

‘योगाची केंद्रवर्ती प्रक्रिया’ याविषयी मला नेमके काय म्हणायचे आहे याची पुरेशी स्पष्ट कल्पना येण्यासाठी तुम्हाला या लिखाणाची मदत होईल. येथे मी काहीसे विस्ताराने लिहिले आहे पण, अर्थातच, मी येथे फक्त मूलभूत गोष्टीच समाविष्ट करू शकलो आहे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 329-330)

साधना, योग आणि रूपांतरण – ८०

अंतरंगामध्ये खूप खोलवर आणि दूर गेल्यावर सौख्य आणि शांती यांचा अनुभव येतो कारण या गोष्टी अंतरात्म्यामध्ये (psychic) असतात आणि अंतरात्मा हा आपल्या अंतरंगामध्ये खूप खोलवर, मन आणि प्राण यांनी झाकलेला असतो. तुम्ही जेव्हा ध्यान करता तेव्हा तुम्ही या अंतरात्म्याप्रत खुले होता, उन्मुख होता, आणि तेव्हा तुम्हाला अंतरंगामध्ये खोलवर असणाऱ्या आंतरात्मिक चेतनेची जाणीव होते आणि मग तुम्हाला सौख्य, शांती या गोष्टी जाणवतात. सौख्य, शांती आणि आनंद या गोष्टी अधिक समर्थ व स्थिर व्हाव्यात आणि त्यांचा अनुभव तुमच्या सर्व व्यक्तित्वामध्ये, आणि अगदी शरीरामध्येदेखील यावा यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये अधिक खोलवर गेले पाहिजे आणि अंतरात्म्याची पूर्ण शक्ती शारीरिक अस्तित्वामध्ये आणली पाहिजे.

खऱ्या चेतनेसाठी अभीप्सा बाळगून, नियमित एकाग्रता आणि ध्यान केल्याने, हे सर्वाधिक सहजतेने शक्य होते. हे कर्माद्वारे, निष्ठेद्वारेसुद्धा शक्य होते; स्वतःसंबंधी विचार न करता, हृदयामध्ये श्रीमाताजींप्रति सातत्याने आत्मनिवेदन (consecration) करत राहण्याच्या संकल्पनेवर नेहमी लक्ष केंद्रित करून, ‘ईश्वरा’साठीच कर्म करत राहिल्यानेसुद्धा हे शक्य होते. परंतु हे परिपूर्णपणे सुयोग्य रीतीने करणे सोपे नसते.

*

‘ईश्वरा’च्या संपर्कात असण्यासाठी समाधीमध्येच असले पाहिजे असे नाही.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 299), (CWSA 30 : 250)

साधना, योग आणि रूपांतरण – ६२

अभीप्सेच्या शक्तीमधील आणि साधनेच्या ऊर्जेमधील चढ-उतार अटळ असतात. आणि जोवर साधकाचे संपूर्ण अस्तित्व हे रूपांतरणासाठी तयार झालेले नसते तोवर सर्वच साधकांच्या बाबतीत हे चढ-उतार नेहमीचेच असतात. अंतरात्मा जेव्हा अग्रभागी आलेला असतो किंवा तो सक्रिय असतो आणि मन, प्राण त्याला सहमती दर्शवितात तेव्हा तेथे उत्कटता आढळून येते.

परंतु अंतरात्मा जेव्हा तितकासा अग्रेसर नसतो आणि कनिष्ठ प्राण जेव्हा त्याच्या सामान्य गतिविधी बाळगून असतो किंवा मन हे त्याच्या अज्ञानी कृतीमध्ये मग्न असते आणि तेव्हा जर साधक अगदी सतर्क नसेल तर विरोधी शक्ती साधकामध्ये प्रवेश करतात. सहसा सामान्य शारीरिक चेतनेमधून जडत्व येते. विशेषतः जेव्हा साधनेला प्राणाचा सक्रिय आधार मिळत नाही, तेव्हा जडत्व येते. उच्चतर आध्यात्मिक चेतना सातत्याने अस्तित्वाच्या सर्व भागांमध्ये खाली उतरवीत राहिल्यानेच या गोष्टींचे निवारण करणे शक्य होते.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 61)

साधना, योग आणि रूपांतरण – ३६

श्रीमाताजी : आपल्यामध्ये असणाऱ्या अंतरात्म्याची उपस्थिती आपल्याला जाणवावी आणि सरतेशेवटी त्याच्याशी आपल्याला तादात्म्य पावता यावे यासाठी, आजवर वेगवेगळ्या काळामध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी बऱ्याच पद्धती सांगितल्या गेल्या आहेत. त्यापैकी काही पद्धती या मनोवैज्ञानिक असतात, काही धार्मिक तर काही अगदी यांत्रिकसुद्धा असतात. वास्तविक, प्रत्येक व्यक्तीने तिला सुयोग्य ठरेल अशी पद्धत स्वतः शोधली पाहिजे. आणि जर व्यक्तीकडे अतिशय उत्कट आणि दृढ अभीप्सा असेल, सातत्यपूर्ण आणि गतिमान संकल्प असेल तर, तिला या ना त्या मार्गाने ती पद्धत निश्चितपणे सापडते. बाह्यतः वाचन व अभ्यास, आणि आंतरिकरित्या एकाग्रता, ध्यान, प्रकटीकरण व अनुभूती यांच्या माध्यमातून व्यक्तीला तिच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असणारे साहाय्य मिळतेच.

साधक : यांत्रिक, धार्मिक आणि मनोवैज्ञानिक पद्धतींमध्ये काय फरक असतो?

श्रीमाताजी : विविध धर्मांनी ज्या पद्धतींचा स्वीकार केलेला असतो त्या पद्धती म्हणजे धार्मिक पद्धती. बहुतांशी धर्म आंतरिक सत्याविषयी काही बोलत नाहीत, ‘ईश्वरा’च्या संपर्कात येणे हीच एक गोष्ट त्यांच्या दृष्टीने महत्त्वाची असते.

ज्या पद्धतींमध्ये चेतनेच्या विविध स्तरांशी संबंध असतो, सर्व क्रियाकलापांमधून बाजूला होत ज्या पद्धतीमध्ये अंतरंगातील आत्म्याचा साक्षात्कार करून घेण्याचा प्रयत्न केला जातो; अलिप्तता, आत्म-तन्मयता (self-abstraction), एकाग्रता, उच्चतर सद्वस्तु, सर्व बाह्य गतिविधींचा परित्याग इत्यादी गोष्टींचा समावेश असलेली आंतरिक अवस्था जाणीवपूर्वकपणे तयार करण्याचा प्रयत्न केला जातो त्या पद्धतींची गणना मनोवैज्ञानिक पद्धतीमध्ये केली जाते. विचार, भावना आणि कृती यांच्यावर कार्य करणारी पद्धत ही मनोवैज्ञानिक पद्धत असते.

पूर्णपणे यांत्रिक साधनांवर आधारित असणाऱ्या पद्धती या यांत्रिक पद्धती असतात. त्यांचा विशिष्ट प्रकारे अवलंब केला तर व्यक्तीला त्यापासून लाभ होऊ शकतो. श्वासावरील नियंत्रणाची पद्धत हे उदाहरण पाहा. ही पद्धत कमीअधिक यांत्रिकपणे कार्य करते. परंतु विवेकानंदांनी त्यांच्या शिकवणुकीत सांगितल्याप्रमाणे, या पद्धतीच्या जोडीला कधीकधी व्यक्तीने विचारांची एकाग्रता करावी किंवा एखाद्या शब्दाचा जप करावा, असे सुचविण्यात येते. काही एका विशिष्ट टप्प्यापर्यंत तिचा उपयोग होतो पण नंतर ती पद्धत निष्प्रभ होते.

हे मानवी प्रयत्न विविध काळामध्ये आणि विविध ठिकाणी कमीअधिक प्रमाणात व्यक्तिगत स्तरावर यशस्वी झालेले आढळतात पण आजवर त्याचा कधीही सामुदायिक परिणाम साध्य झालेला नाही.

तुमच्या कृतींच्या माध्यमातून, तुमच्या अस्तित्वाच्या सत्याखेरीज तुमच्यामधील अन्य काहीही अभिव्यक्त होणार नाही, अशा एका आंतरिक संकल्पाच्या स्थितीमध्ये राहायचे आणि सर्वकाही त्या ‘सत्या’वरच अवलंबून राहील असे करायचे; ही मनोवैज्ञानिक पद्धत अधिक कठीण पण कितीतरी अधिक परिणामकारक असते. अर्थात तुम्ही काहीच करत नसाल तर ही पद्धत सोपी आहे पण या पद्धतीमुळे स्वतःचीच फसवणूक करून घेणे देखील अधिक सोपे असते.

जेव्हा तुम्ही सर्वांपासून दूर होऊन एकटे, पूर्णपणे शांत वातावरणात ध्यानाला बसता, आणि कमीअधिक सौम्य दृष्टीने स्वतःची परीक्षा करता तेव्हा तुम्ही अशी कल्पना करू लागता की, तुम्हाला कोणत्यातरी एखाद्या अद्भुत गोष्टीचा साक्षात्कार झाला आहे. परंतु जेव्हा तुम्हाला तुमच्या जीवनात हरघडी परीक्षेला सामोरे जावे लागते, तुमच्यातील अपूर्णता, तुमच्यातील दुर्बलता, दिवसभरातून शंभरवेळा तुमच्या मनात उद्भवणाऱ्या दुरिच्छायुक्त क्षुद्र गतिविधी यांविषयी जागरुक होण्याची संधी तुम्हाला वारंवार मिळते तेव्हा मग तुमचा स्वतःविषयीचा भ्रम मावळतो आणि परिणामतः तुमचे प्रयत्न अधिक प्रामाणिक होतात.

आणि म्हणूनच आपण एखाद्या अत्यंत मनोहारी, अतिशय आरामदायी, या जगापासून खूप दूर, फक्त स्वतःच्या छोट्याशा व्यक्तित्वाकडे लक्ष देता येईल अशा निर्जन अरण्यात आश्रम काढण्याऐवजी उलट, या जीवनातील सर्व कृती हाती घ्यायच्या आणि त्यांना होता होईल तेवढे सचेत बनवायचे आणि आपले इतर माणसांशी जे संबंध असतील त्या संबंधामध्ये असतानासुद्धा आपल्या सर्व आंतरिक गतिविधींविषयी अधिक सुस्पष्टपणे जागरुक राहायचे; हे प्रयत्न आपण येथे (श्रीअरविंद आश्रमात) करत आहोत. अडीअडचणींपासून दूर पळून जाणे हा त्यांच्यावर मात करण्याचा मार्ग कधीच होऊ शकत नाही. तुम्ही जर तुमच्या शत्रूला पाठ दाखवून पळ काढलात तर तुम्ही त्याला पराजित करू शकणार नाही आणि मग तुम्हाला पराजित करण्याची आयती संधीच तुम्ही त्या शत्रूला द्याल. आणि म्हणूनच आपण हिमालयातील कोणत्या गिरीशिखरावर नाही तर येथे पाँडिचेरीमध्ये आहोत. अर्थात हिमालयातील एखादे गिरीशिखर हे अगदी आनंददायी असेल हे मला मान्य आहे, पण कदाचित ते पाँडिचेरीएवढे परिणामकारक नसेल.

– श्रीमाताजी (CWM 15 : 303-305)

साधना, योग आणि रूपांतरण – ३५

ध्यानाच्या वेळी तुम्ही तुमचे लक्ष (शरीरांतर्गत) कोणत्या भागावर केंद्रित केले आहे यावर ध्यानाचे स्वरूप अवलंबून असते.

मानसिक केंद्रं
व्यक्तीच्या प्रत्येक स्तराशी संबंधित अशी केंद्रं शरीरामध्ये असतात. (शरीरामध्ये म्हणण्यापेक्षा सूक्ष्म शरीरामध्ये असतात, असे म्हणणे अधिक योग्य होईल. अर्थात ती केंद्रं सूक्ष्म शरीरात असली तरी ती स्थूल शारीरिक देहामधील संबंधित भागांशी जोडलेली असतात.) मस्तकाच्या शिखरावर एक केंद्र असते आणि त्याच्याही वर मनाच्या अतीत असणारे किंवा उच्चतर चेतनेचे केंद्र असते. कपाळावर भ्रूमध्यामध्ये जे केंद्र असते ते विचारी, चिंतनशील मनाचे, मानसिक संकल्पाचे आणि मानसिक दर्शनाचे केंद्र असते. कंठामध्ये असणारे केंद्र हे अभिव्यक्ती करणाऱ्या किंवा बाह्याविष्करण करणाऱ्या मनाचे केंद्र असते. ही सर्व केंद्रं मानसिक केंद्रं असतात.

प्राणिक केंद्रं
(मानसिक केंद्रांच्या) खाली प्राणिक केंद्रं असतात. हृदय-केंद्र (भावनिक केंद्र), नाभी-केंद्र (गतिमान प्राण-केंद्र), नाभीखाली उदरामध्ये असणारे केंद्र हे कनिष्ठ किंवा संवेदनात्मक प्राण-केंद्र असते.

शारीरिक केंद्र
सर्वात शेवटी, मणक्याच्या तळाशी मूलाधार किंवा शारीरिक केंद्र असते.

आंतरात्मिक केंद्र
हृदयाच्या पाठीमागे आंतरात्मिक किंवा चैत्य केंद्र (psychic centre) असते. अनेक जण करतात त्याप्रमाणे व्यक्तीने जर मस्तकावर लक्ष एकाग्र केले तर ते मानसिक-आध्यात्मिक ध्यान असते, ज्यासाठी व्यक्ती प्रयत्नशील असते. व्यक्तीने जर हृदयकेंद्रावर लक्ष एकाग्र केले तर ते आंतरात्मिक ध्यान असते. व्यक्ती सहसा जेथे लक्ष केंद्रित करत असते अशी ही दोन स्थानं आहेत. परंतु जे केंद्र प्रथम उन्नत होते किंवा खुले होते ते मानसिक किंवा आंतरात्मिक केंद्रच असेल असे नाही; ते भावनिक किंवा प्राणिक केंद्रसुद्धा असू शकते. ते व्यक्तीच्या प्रकृतीवर अवलंबून असते. कारण व्यक्तीमध्ये खुले होण्यासाठी जे सर्वाधिक सोपे असते ते चक्र प्रथम खुले होण्याची शक्यता असते.

जर प्राणिक केंद्र खुले झाले तर ते ध्यान, चेतनेला प्राणिक स्तर आणि त्याचे अनुभव घेण्यासाठी प्रक्षेपित करण्याची शक्यता असते. परंतु तेथून व्यक्ती त्या प्राणिक अनुभवांमध्ये गुंतून न पडता, स्वतःला त्यापासून वेगळे करून, त्यांच्याकडे अलिप्तपणे पाहू शकली – म्हणजे जणू काही ती व्यक्ती स्वतः आतमध्ये खोलवर स्थित आहे आणि तेथून स्वतःच्या बाहेर असणाऱ्या गोष्टींचे निरीक्षण करत आहे या पद्धतीने जर ती त्या अनुभवांकडे पाहू लागली – आणि अशा रीतीने जर ती अधिकाधिक आत वळत गेली, तर ती व्यक्ती अंतरात्म्याप्रत जाऊन पोहोचण्याची शक्यता असते.

त्याचप्रमाणे, विचारांवर लक्ष एकाग्र केल्यामुळे आणि त्याच्याशी संबंधित असे अनुभव घेतल्यामुळे, व्यक्तीला मानसिक अनुभव येऊ शकतात. उदा. ‘सर्वकाही ब्रह्मच आहे’, असा विचार व्यक्ती करू शकते किंवा व्यक्ती स्वतःला विचारापासून मागे ओढून घेऊ शकते आणि बाहेरील वस्तुंकडे पाहावे त्याप्रमाणे ती स्वतःच्या विचारांचे निरीक्षण करू शकते. आणि सरतेशेवटी व्यक्तीचा शांतीमध्ये आणि निखळ आध्यात्मिक अनुभवामध्ये प्रवेश होतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 306-307)

साधना, योग आणि रूपांतरण – ३४

हृदयकेंद्रावर एकाग्रता केल्यामुळे अंतरात्मा खुला होतो; ती एकाग्रता करणे ही तुमची मुख्य आवश्यकता आहे.

एकाग्रता केल्यामुळे, तुम्हाला जर इतर गतिविधींचे स्वरूप समजत असेल आणि तुम्ही स्पष्टपणे त्या गतिविधींची योग्यायोग्यता ठरवू शकत असाल, म्हणजे तशी जाणीव, तसा सद्सद्विवेक तुमच्यामध्ये जागृत झाला असेल तर, तुमचा अंतरात्मा अगोदरच कार्यरत झाला आहे (असे समजावे.) कारण ज्या जाणिवेमुळे, येणाऱ्या सर्व गतिविधींबाबत एक सुस्पष्ट अंतर्दृष्टी प्राप्त होते आणि ज्या जाणिवेमुळे त्याज्य गोष्टींना नकार देणे आणि योग्य दृष्टिकोन व धारणा बाळगणे सोपे जाते अशी जाणीव ही आंतरात्मिक किंवा चैत्य जाणीव असते.

(ध्यानामध्ये) श्रीमाताजींची प्रतिमा दिसते किंवा नाही हे तितकेसे महत्त्वाचे नाही. त्या साकार रूपात दिसोत किंवा न दिसोत, मात्र सदासर्वदा त्यांच्या उपस्थितीची जाणीव होणे महत्त्वाचे असते आणि आंतरात्मिक खुलेपणातून (psychic opening ) हे नक्कीच घडून येईल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 310)

अमृतवर्षा २६

(आपल्या व्यक्तित्वामधील विभिन्न घटकांमध्ये ऐक्य, एकजिनसीपणा कसा निर्माण करावा, हे श्रीमाताजी येथे सांगत आहेत.)

संकल्प दृढ ठेवा. आज्ञापालन न करणाऱ्या मुलांना ज्याप्रमाणे योग्य वळण लावले जाते त्याप्रमाणे, तुमच्यातील अडेलतट्टू, हट्टी भागांना वळण लावा. त्यांच्यावर सातत्यपूर्वक, सहनशीलतेने काम करा. त्यांच्या चुका त्यांना समजावून सांगा.

तुमच्या चेतनेच्या आत खोलवर चैत्य पुरुष (Psychic being) असतो. हा चैत्य पुरुष म्हणजे तुमच्या अंतरंगामध्ये असणाऱ्या ‘ईश्वरा’चे मंदिर असते. या केंद्राभोवती तुमच्यातील विभिन्न असणाऱ्या सर्व भागांचे, तुमच्या अस्तित्वातील सगळ्या परस्परविरोधी हालचालींचे एकीकरण झाले पाहिजे. एकदा का तुम्हाला त्या चैत्य पुरुषाची चेतना व त्याची अभीप्सा प्राप्त झाली की, सगळ्या शंका, अडचणी नाहीशा होऊ शकतात. त्याला कमी-अधिक वेळ लागेल, परंतु अंतिमत: तुम्ही यशस्वी होणार हे निश्चित!

एकदा जरी तुम्ही ‘ईश्वरा’कडे वळला असाल आणि म्हणाला असाल की, “मला तुझे होऊन राहायचे आहे”, आणि तो जर “हो” म्हणाला असेल, तर हे अखिल जग सुद्धा तुम्हाला त्यापासून रोखू शकणार नाही. अंतरात्मा (Inner being) जेव्हा स्वत:चे समर्पण करतो तेव्हा मुख्य अडचणच नाहीशी होते.

बाह्य अस्तित्व हे केवळ एखाद्या कवचाप्रमाणे असते. सामान्य व्यक्तींमध्ये हे कवच इतके टणक आणि जाड असते की, त्यामुळे त्यांना त्यांच्या अंतरंगामध्ये असणाऱ्या ‘ईश्वरा’ची यत्किंचितही जाणीव नसते. (परंतु) एकदा, अगदी एका क्षणासाठी जरी, अंतरात्मा म्हणला असेल, “मी इथे आहे आणि मी तुझाच आहे” तर जणू एक प्रकारचा सेतू निर्माण होतो आणि मग ते बाह्य कवच हळूहळू पातळ होत जाते. जोपर्यंत अंतरंग व बहिरंग भाग पूर्णपणे जोडले जाऊन, एकत्व पावत नाहीत तोपर्यंत ही प्रक्रिया चालू राहते.

– श्रीमाताजी [CWM 03 : 07]

भौतिकामध्ये अंतरात्म्याची प्राप्ती व्हावी अशी जर तुमची इच्छा असेल तर, केवळ ध्यानामध्ये बसल्याने आणि अमूर्त अनुभव घेतल्याने ते साध्य होणार नाही; भौतिक जीवन आणि कर्मामध्ये, श्रीमाताजींसाठी केलेल्या कार्याद्वारे, आज्ञापालनाद्वारे व श्रीमाताजींप्रत केलेल्या कर्मसमर्पणाद्वारे, त्याचा शोध घेतल्यानेच तो अंतरात्मा तुम्हाला प्राप्त होईल…

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 249-250)