Tag Archive for: साधना

योगाच्या परिभाषेमध्ये चैत्य (Psychic) या संकल्पनेने कशाचा बोध होतो?

‘प्रकृतीमधील आत्म्याचा घटक’ या अर्थाने ‘चैत्य’ ही संकल्पना आहे. मन, प्राण आणि शरीर यांच्या पाठीमागे उभे असणारे ते शुद्ध चैत्य किंवा ईश्वरी केंद्र असते; (ते म्हणजे अहंकार नाही) परंतु आपल्याला त्याची अगदी पुसटशीच जाणीव असते.

हे चैत्य अस्तित्व म्हणजे ईश्वराचा अंश असतो आणि तो जन्मानुजन्म कायम असतो; स्वत:च्या बाह्य साधनांच्या माध्यमातून तो जीवनानुभव घेत राहतो. जसजसा हा अनुभव वाढत जातो तसतसे त्यामधूनच एक चैत्य व्यक्तिमत्त्व विकसित होऊ लागते. ते नेहमीच सत्य, शिव, सुंदरता यांवर भर देते आणि अंतिमत: मग त्याची प्रकृती ही ईश्वराभिमुख होण्यासाठी सज्ज आणि पुरेशी सक्षम होते.

नंतर मन, प्राण, शरीर यांचे पडदे भेदून, हे चैत्य अस्तित्व पूर्णत: पुढे येते व उपजत प्रेरणांचे नियमन करू लागते आणि प्रकृतीमध्ये परिवर्तन घडवून आणते. तेव्हा मग, प्रकृती आत्म्यावर सत्ता गाजवत नाही तर; आत्मा, पुरुष हा प्रकृतीवर अधिकार चालवू लागतो.

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 337)

जर तुम्ही मानवी प्रकृतीचे रूपांतरण गतिमान दिव्य प्रकृतीमध्ये करू इच्छित असाल तर, कोणतीही उणीव न ठेवता, किंवा कोणताही प्रतिकार, विरोध न करता, स्वत:ला माताजींच्या व त्यांच्या शक्तींच्या हाती सोपवा आणि त्यांना तुमच्यामध्ये त्यांचे कार्य, कोणत्याही अडथळ्याविना करू द्या. जाणीव, लवचीकता आणि हातचे काहीही राखून न ठेवता केलेले समर्पण ह्या तीन गोष्टी तुमच्याकडे असणेच आवश्यक आहे.

जाणीव :
श्रीमाताजी आणि त्यांच्या शक्ती व त्यांचे कार्य याविषयी तुमचे मन, आत्मा, हृदय, प्राण इतकेच काय पण, तुमच्या शरीरातील पेशीसुद्धा सजग असल्या पाहिजेत. कारण, जरी श्रीमाताजी तुमच्या अंधकारात आणि तुमच्या अचेतन भागांमध्ये, अचेतन क्षणांमध्ये देखील कार्य करू शकतात आणि तशा त्या करतात देखील, परंतु जेव्हा तुम्ही जागृत असता आणि त्यांच्याशी जिवंत संपर्क राखून असता तेव्हाची गोष्ट वेगळी असते.

लवचीकता :
तुमची समग्र प्रकृतीच श्रीमाताजींच्या स्पर्शाला घडणसुलभ लवचीक (Plastic) असली पाहिजे – स्वसंतुष्ट अज्ञानी मन जसे प्रश्न विचारत राहते, शंका घेत राहते, विवाद करत बसते आणि ते जसे प्रबोधनाचे व परिवर्तनाचे शत्रू असते, तशी तुमची प्रकृती असता कामा नये. ज्याप्रमाणे माणसातील प्राण स्वत:च्याच हालचालींवर भर देत राहतो आणि तो जसा आपल्या हट्टाग्रही इच्छा व दुरिच्छेमुळे, प्रत्येक ईश्वरी प्रभावाला सातत्याने विरोध करत राहतो, तशी तुमची प्रकृती स्वत:च्याच हालचालींवर भर देणारी असता कामा नये. माणसाची शारीरिक जाणीव जशी अडथळा निर्माण करते आणि त्याच्या किरकोळ आणि काळोख्या गोष्टींमधील सुखाला ती जशी चिकटून राहते; शरीराची आत्माविहिन दिनचर्या, आळस किंवा त्याची जी जड निद्रा असते त्याला धक्का पोहोचविणाऱ्या कोणत्याही स्पर्शाने जशी शारीरिक जाणीव आरडाओरडा करते; तशी तुमची प्रकृती ही अडथळा निर्माण करणारी, स्वत:ची अक्षमता, जडता आणि तामसिकता ह्यांना हटवादीपणे चिकटून राहिलेली अशी असता कामा नये.

समर्पण :
हातचे काहीही राखून न ठेवता केलेले, तुमच्या आंतरिक व बाह्य अस्तित्वाचे समर्पण तुमच्या प्रकृतीच्या सर्व भागांमध्ये ही घडणसुलभ लवचीकपणा (Plasticity) आणेल; वरून प्रवाहित होणाऱ्या प्रज्ञा आणि प्रकाश, शक्ती, सुसंवाद आणि सौंदर्य, पूर्णता ह्या साऱ्या गोष्टींसाठीसातत्यपूर्ण खुलेपणा राखलात तर, तुमच्यामधील सर्व अंगांमध्ये जाणीव जागृत होईल. इतकेच काय पण तुमचे शरीरसुद्धा जागृत होईल आणि सरतेशेवटी, त्याची जाणीव ही त्यानंतर अर्धचेतन जाणिवेशी संबद्ध न राहता, अतिमानसिक अतिचेतन शक्तीशी एकत्व पावेल; आणि तिची ऊर्जा ही वरून, खालून, चोहोबाजूंनी शरीराला अनुभवास येईल आणि एका परम प्रेमाने व आनंदाने ते शरीर पुलकित होऊन जाईल.

पण सावध असा आणि तुमच्या क्षुल्लक अशा पार्थिव मनाने, की ज्याला त्याच्या पलीकडे असणाऱ्या गोष्टींनादेखील स्वत:च्या निकषांच्या, स्वत:च्या मोजमापांच्या अंकित करायला आवडते, स्वत:च्या संकुचित तर्काच्या आणि प्रमादशील समजुतींच्या, बिनबुडाच्या आक्रमक अज्ञानाच्या आणि स्वत:च्या क्षुद्र आत्म-विश्वासपूर्ण अज्ञानाच्या अंकित करायला आवडते, अशा पार्थिव मनाद्वारे, दिव्य मातेला समजून घेण्याचा किंवा त्यांची पारख करण्याचा यत्न करू नका.

दिव्य शक्तीच्या विविध स्तरांवरील बहुमुखी स्वातंत्र्याचे आकलन, अर्धवट उजळलेल्या अशा अंधकारमय तुरुंगात बंदिस्त झालेल्या मानवी मनाला होऊ शकणार नाही. दिव्य शक्तीच्या दृष्टीची आणि कृतीची गतिमानता आणि तिची जटिलता ही मनाच्या अडखळणाऱ्या आकलनाला ओलांडून कितीतरी पलीकडे जाते; तिच्या गतिविधींची परिमाणे ही मनाची परिमाणेच नव्हेत. हे मन दिव्य शक्तीच्या विविध व्यक्तिमत्त्वांमधील जलद बदलाने भयचकित होऊन जाते. तिचे लयताल निर्माण करणे आणि ते मोडूनही टाकणे, तिचे वेगामध्ये वाढ करणे आणि वेग मंद करणे, एकाची समस्या हाताळण्याची तिची एक पद्धत तर दुसऱ्याची समस्या हाताळताना तिची दुसरीच पद्धत, अशा तिच्या अनेकविध पद्धती, तिने आत्ता एक दिशा पकडणे आणि नंतर ती सोडूनही देणे व दुसरीच दिशा पकडणे आणि मग त्या सर्वच दिशा एकत्रित करणे या सगळ्या प्रकाराने मन भयचकित होते. आणि अशा मनाला, परमशक्ती जेव्हा अज्ञानाच्या जंजाळामधून वळणावळणाने वरवर ढकलत दिव्य प्रकाशाकडे घेऊन जात असते, तेव्हाच्या त्या परमशक्तीच्या पद्धतीचे आकलन होऊ शकत नाही.

त्यापेक्षा तुमचा आत्मा श्रीमाताजींप्रत खुला करा आणि तुमच्या चैत्य प्रकृतीने तरी तुम्ही श्रीमाताजींना जाणून घेऊ शकता, ह्याबाबत समाधानी राहा आणि त्यांच्याकडे चैत्य दृष्टीने पाहा, तीच एकमेव गोष्ट तुम्हाला सत्याप्रत थेटपणे घेऊन जाणारी असेल. आणि श्रीमाताजी स्वत:च त्यांच्या चैत्य घटकांद्वारे तुमचे मन, हृदय, प्राण आणि तुमची शारीरिक चेतना उजळून टाकतील आणि त्यांना त्या परमशक्तीच्या कार्यपद्धती, परमशक्तीची प्रकृती उघड करून दाखवतील. सर्वज्ञतेच्या व सर्वशक्तिमानतेच्या आपल्या ज्या अगदीच बाळबोध वरवरच्या संकल्पना असतात, त्या नुसारच ईश्वरी शक्तीने कायम वागावे, अशी आपल्या अज्ञानी मनाची जी सदोष मागणी असते, ती सुद्धा टाळा. प्रत्येक वळणावर सहजसुलभ यश, डोळे दिपवणारे वैभव आणि चमत्कारपूर्ण शक्ती अनुभवास यावी, ह्यासाठी आपल्या मनाचा गोंगाट चालू असतो. असे डोळे दिपवणारे, प्रभावित करणारे काही अनुभवास आले नाही तर, तेथे ईश्वर आहे ह्यावर त्याचा विश्वासच बसू शकत नाही. श्रीमाताजी अज्ञानाशी मुकाबला करण्यासाठी, अज्ञानाच्या क्षेत्रामध्ये उतरल्या आहेत. अज्ञानक्षेत्राच्या पलीकडे, उच्च स्थानी कोठेतरी राहून नव्हे तर, श्रीमाताजी प्रत्यक्ष अज्ञानाच्या क्षेत्रामध्ये उतरून, अज्ञानाशी दोन हात करत आहेत.

श्रीमाताजी त्यांचे ज्ञान आणि त्यांची शक्ती झाकून ठेवतात, अंशत:च प्रकट करतात. बऱ्याचदा त्यांचे साधन झालेल्यांपासून आणि व्यक्तींपासून त्या ते ज्ञान व शक्ती रोखून ठेवतात आणि शोधक मनाच्या पद्धतीनुसार, अभीप्सा बाळगणाऱ्या चैत्य पुरुषाच्या पद्धतीनुसार, संघर्ष करणाऱ्या प्राणाच्या पद्धतीनुसार, बंदिवान होऊन दुःख भोगणाऱ्या शारीरिक प्रकृतीच्या पद्धतीनुसार, त्या साधनभूत झालेल्या व्यक्तींमध्ये रूपांतर घडून यावे असा त्यांचा प्रयत्न असतो.

परमशक्तीच्या संकल्पाद्वारे अशा काही अटी घालून देण्यातआलेल्या आहेत, बऱ्याचशा गुंतागुंतीच्या गाठी आहेत, ज्या आधी सैल करणे आवश्यक आहे; कारण त्या अचानकपणे कापून टाकता येत नाहीत.आजवर दीर्घकाळ ज्या जहागिऱ्यांवर व प्रांतांवर ज्यांनी अधिराज्य केले होते त्या असुरांनी व राक्षसांनी, ह्या विकसनगामी पार्थिव प्रकृतीवर ताबा मिळविलेला आहे. त्यांना त्यांच्या त्यांच्या प्रांतांमध्ये जाऊन, त्यांच्या अटींनुसार, त्यांच्याशी दोन हात करण्याची आणि त्यांच्यावर विजय प्राप्त करून घेण्याची आवश्यकता आहे. आपल्यातील मानवाला त्याच्या मर्यादांच्या अतीत जाण्यासाठी तयार केले पाहिजे, त्याला त्या दिशेने घेऊन गेले पाहिजे पण आत्तातरी मानव या मर्यादांच्या खूप पलीकडे असणाऱ्या अशा रूपांकडे अचानकपणे उचलले जाण्याच्या दृष्टीने खूपच दुर्बल आणि अंधकारपूर्ण आहे.

ईश्वरी चेतना व शक्ती अस्तित्वात आहेत आणि प्रत्येक क्षणी, जी गोष्ट करणे गरजेची आहे ती गोष्ट, त्या परिश्रमपूर्वक करत असतात. जो आदेश देण्यात आला आहे त्यानुसार त्या नेहमीच पावले उचलत असतात आणि जे पूर्णत्व अस्तित्वात यावयाचे आहे त्याला ती ईश्वरी चेतना ह्या अपूर्णतेमध्येच आकारास आणत असते.

…जर तुम्ही मनालाच अनुसरत राहिलात तर, श्रीमाताजी अगदी तुमच्या समोर प्रत्यक्षपणे जरी प्रकट झाल्या तरीही ते मन श्रीमाताजींना ओळखू शकणार नाही. आत्म्याचे अनुसरण करा, तुमच्या मनाला अनुसरू नका. जे मन बाह्य रूपांकडे धाव घेते त्या मनाला न अनुसरता, सत्याला प्रतिसाद देणाऱ्या आत्म्याचे अनुसरण करा. ईश्वरी शक्तीवर विश्वास ठेवा; ती तुमच्यातील देवसदृश घटकांना मुक्त करेल आणि त्यांना दिव्य प्रकृतीच्या अभिव्यक्तीचा आकार देईल.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 24-26)

विचलित न होणे, स्थिर आणि सश्रद्ध असणे हा खचितच योग्य दृष्टिकोन आहे. परंतु त्याचबरोबर, श्रीमाताजी आपले जे संगोपन करत असतात त्यापासून कोणत्याही कारणास्तव विन्मुख न राहणे आणि श्रीमाताजींकडून मिळणाऱ्या साहाय्याचा स्वीकार करणे हे देखील तितकेच आवश्यक आहे. व्यक्तीने स्वत:ची अक्षमता, प्रतिसाद देण्याची अक्षमता यांविषयीच्या कल्पनांमध्ये गुंतून राहणे; स्वतःचे दोष, अपयश ह्या गोष्टी अती उगाळत राहणे आणि त्याबद्दल दुःखीकष्टी होत राहण्यास किंवा त्याविषयी लाज बाळगत राहायला मनाला संमती देणे, या गोष्टी करता कामा नयेत; कारण या सर्व कल्पना, भावना ह्या गोष्टी अंततः व्यक्तीला दुर्बल बनविण्यास कारणीभूत ठरतात.

दुःखसंकटे आली, अपयश आले, ठोकरा खाव्या लागल्या तर, अशा प्रत्येक वेळी व्यक्तीने अविचल राहून त्यांकडे पाहावयास हवे आणि त्यांचा निरास व्हावा म्हणून समचित्ततेने आणि सातत्याने ईश्वरी साहाय्यासाठी धावा करावयास हवा. परंतु उदास होणे, व्यथित होणे वा नाउमेद होणे, ह्या गोष्टींना कधीच थारा देता कामा नये.

योग हा काही सोपा मार्ग नाही आणि प्रकृतीमध्ये पूर्ण परिवर्तन ही काही एका दिवसात घडून येणारी गोष्ट नाही.

-श्रीअरविंद
(CWSA 32 : 294)

जर का कशाची आवश्यकता आहे, तर ती आहे प्रयत्न-सातत्याची! प्रकृतीची प्रक्रिया आणि श्रीमाताजींच्या शक्तीचे कार्य संकटकाळामध्ये देखील चालू आहे आणि जे जे आवश्यक आहे ते ते त्या करत राहतील, हे ओळखून नाऊमेद न होता, आपण मार्गक्रमण करत राहणे आवश्यक आहे. आपल्या क्षमताअक्षमतेस येथे महत्त्व नाही. येथे कोणीच मनुष्य असा नाही की, जो प्रकृतिशः सक्षम आहे. परंतु दिव्य शक्तीचे सुद्धा तेथे अस्तित्व असते. यावर जर व्यक्ती विश्वास ठेवेल तर, अक्षमतादेखील क्षमतेमध्ये परिवर्तित होईल. आणि मग अशावेळी, संकट आणि संघर्ष ह्या गोष्टीच स्वयमेव सिद्धीप्रत घेऊन जाणारे मध्यस्थ बनतील.

-श्रीअरविंद
(CWSA 31 : 727)

जो कोणी श्रीमाताजींप्रत वळलेला आहे तो माझा योग आचरत आहे. केवळ स्वबळावर, पूर्णयोग करता येईल वा पूर्णयोगाची सर्व अंगे पूर्णत्वाला नेता येतील असे समजणे ही फार मोठी चूक आहे. कोणताही मनुष्य असे करू शकत नाही. मग, व्यक्तीने काय करावयास हवे? तर स्वत:ला श्रीमाताजींच्या हाती सोपवून द्यावयास हवे आणि सेवा, भक्ती, अभीप्सा यांद्वारे त्यांच्याप्रत खुले व्हावयास हवे, म्हणजे मग श्रीमाताजी त्यांच्या प्रकाश व सामर्थ्यानिशी त्या व्यक्तीमध्ये कार्य करतील, जेणेकरून त्या व्यक्तीस साधना करता येईल. महान पूर्णयोगी बनण्याची, अतिमानसिक व्यक्ती बनण्याची आकांक्षा बाळगणे आणि त्या दिशेने स्वत:ची किती वाटचाल झाली आहे ह्याची स्वत:शीच विचारणा करणे हीदेखील एक चूकच आहे. श्रीमाताजींविषयी भक्ती बाळगणे आणि स्वत:ला त्यांच्याप्रत समर्पित करणे आणि तुम्ही जे बनावे अशी त्यांची इच्छा आहे तसे बनण्याची इच्छा बाळगणे हा योग्य दृष्टिकोन आहे. उरलेल्या सर्व गोष्टी ठरविणे आणि त्या तुमच्यामध्ये घडवून आणणे ह्या गोष्टी श्रीमाताजींनीच करावयाच्या आहेत.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 151-152)

भौतिक नियतीवादाने मार्गामध्ये अडचणी निर्माण करण्याचा जोर धरला आहे; अशावेळी त्याला अधिक धैर्याने आणि निश्चयाने तोंड देणे आवश्यक आहे.

पण कोणत्याही परिस्थितीत, काहीही झाले तरी, तुम्ही काहीही करीत असलात तरी, तुम्ही तुमच्यावर ‘भीती’चा पगडा पडू देता कामा नये. अगदी यत्किंचितही भीतीचा स्पर्श तुम्हाला होत आहे असे जाणवले तर, चटकन प्रतिकार करा आणि मदतीसाठी हाक मारा.

तुम्ही म्हणजे देह नाही हे तुम्ही शिकले पाहिजे. त्याला लहान बालकाप्रमाणे समजावले पाहिजे की, त्याने घाबरण्याची आवश्यकता नाही.

‘भीती’ हा सर्व शत्रूंपैकी सर्वात मोठा शत्रू आहे आणि आपण इथे, त्यावर एकदाच कायमची मात केली पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 183)

इ. स. १९७२ च्या पूर्वसंध्येला श्रीमाताजींना येणाऱ्या वर्षाविषयी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी जे उत्तर दिले ते, त्यांच्या साधनेतील अवस्थेविषयी होते, परंतु ते उत्तर सद्य परिस्थितीलाही चपखल लागू पडते असे वाटते, म्हणून येथे देत आहोत… दर क्षणी आपली प्रार्थना काय असावी ह्याचेही मार्गदर्शन यामध्ये आले आहे.

प्रश्न : नूतन वर्षाचा आरंभ होऊ घातला आहे… या नूतन वर्षाबाबत काही विशेष असे तुम्हाला जाणवते आहे का?

श्रीमाताजी : गोष्टींनी अगदी चरम रूप धारण केले आहे. त्यामुळे जणू काही संपूर्ण वातावरणाचे कल्पनातीत अशा उज्ज्वलतेप्रत उन्नयन केले जात आहे. परंतु त्याच वेळी अशीही संवेदना होत आहे की, कोणत्याही क्षणी मृत्यू येऊ शकेल – अगदी ”मृत्यू पावू शकेल” असेही नाही, परंतु देह विसर्जित होऊ शकतो. आणि ह्या दोन्ही गोष्टी मिळून एक अशी जाणीव उदयाला येत आहे की, ज्यामध्ये… साऱ्या गतगोष्टी पोरकट, बालीश, चेतनाशून्य भासत आहेत… हे विलक्षण व विस्मयकारक आहे.

परंतु या देहाची सदैव एकच प्रार्थना असते, ती अशी की,

तुला जाणून घेता यावे यासाठी मला सुपात्र बनव.
तुझी सेवा करता यावी यासाठी मला सुयोग्य बनव.
मी तूच व्हावे यासाठी मला सक्षम कर.

– श्रीमाताजी
(CWM 11 : 330)

• पहिला आणि कदाचित सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की, मन हे आध्यात्मिक गोष्टींचे आकलन करण्यासाठी अक्षम असते. आणि तरीसुद्धा, या मार्गावर प्रगत व्हावयाचे असेल तर, सर्व मानसिक मतमतांतरे आणि प्रतिक्रिया यांपासून स्वत:ला दूर राखणे अगदी अनिवार्य असते.

• सुखसोयी, समाधान, मौजमजा, आनंद यासाठीची सर्व धडपड सोडून द्या. केवळ प्रगतीचा एक धगधगता अग्नी बनून राहा. जे काही तुमच्यापाशी येईल, ते तुमच्या प्रगतीसाठी साहाय्यकारी आहे, असे समजून त्याचा स्वीकार करा आणि जी कोणती प्रगती करणे आवश्यक आहे, ती ताबडतोब करून मोकळे व्हा.

• तुम्ही जे काही करता, त्यामध्ये आनंद घेण्याचा प्रयत्न करा; परंतु, आनंद मिळवायचा म्हणून कधीच काही करू नका.

• कधीही उत्तेजित होऊ नका, उदास होऊ नका किंवा क्षुब्ध, अस्वस्थ होऊ नका. कोणत्याही परिस्थितीत पूर्णत: शांत राहून तिला सामोरे जा.

• आणि तरीसुद्धा, तुम्ही अजून कोणती प्रगती करणे आवश्यक आहे ह्याचा शोध घेण्यामध्ये कायम सतर्क राहा आणि तसे करण्यासाठी अजिबात वेळ दवडू नका.

• वरवर दिसणाऱ्या भौतिक घटनांकडे पाहून त्यांचे अर्थ लावू नका. कारण त्या घटना म्हणजे निराळेच काही अभिव्यक्त करण्याचा एक ओबडधोबड असा प्रयत्न असतो, खरी गोष्ट आपल्या वरवरच्या आकलनामधून निसटून जाते.

• एखादी व्यक्ती तिच्या प्रकृतीमधील अमुक एका गोष्टीमुळे, तमुक एका प्रकारे वागत असते, तिच्या प्रकृतीमधील ती गोष्ट बदलवून टाकण्याची ताकद तुमच्यामध्ये असल्याशिवाय, त्या व्यक्तीच्या वर्तणुकीविषयी कधीही तक्रार करू नका, आणि तुमच्याकडे जर ती ताकद असेलच, तर तक्रार करण्याऐवजी ती बदलून टाका.

• तुम्ही कोणतीही गोष्ट करत असलात तरी, तुम्ही जे ध्येय तुमच्या स्वत:समोर ठेवले आहे त्या ध्येयाचा कधीही विसर पडू देऊ नका.

• एकदा का तुम्ही या महान शोधासाठी प्रवृत्त झालात की, कोणतीच गोष्ट लहान वा थोर नसते; सर्व गोष्टी सारख्याच महत्त्वाच्या असतात आणि त्या एकतर तुम्हाला त्वरेने यश मिळवून देऊ शकतात किंवा त्या यशाला उशीर लावतात.

• खाण्यापूर्वी काही सेकंद अशा अभीप्सेने चित्त एकाग्र करा की, तुम्ही जे अन्न ग्रहण करणार आहात त्यामुळे, तुमचे परमशोधासाठी जे प्रयत्न चालू आहेत त्यांना एक भरभक्कम आधार प्राप्त होईल. तुमच्या शरीराला यथायोग्य असे द्रव्य मिळावे आणि तुमच्या त्या प्रयत्नांमध्ये सातत्य, चिकाटी राहावी म्हणून, त्या अन्नाद्वारे तुम्हाला ऊर्जा प्राप्त होईल.

• झोपी जाण्यापूर्वी काही सेकंद अशी अभीप्सा बाळगा की, त्या झोपेमुळे तुमच्या थकल्याभागल्या नसा पुन्हा ताज्यातवान्या होतील, तुमच्या मेंदूला शांतता आणि शांती प्राप्त होईल. त्यामुळे तुम्ही जागे झालात की, परत ताजेतवाने होऊन, ताज्या दमाने, परमशोधाच्या मार्गावरील तुमची वाटचाल तुम्ही पुन्हा सुरु करू शकाल.

• कोणतीही कृती करण्यापूर्वी अशी इच्छा बाळगा की, तुमची कृती तुम्हाला साहाय्यकारी होईल किंवा अगदीच नाही तर, परमशोधाच्या दिशेने चाललेल्या तुमच्या मार्गक्रमणामध्ये किमान ती अडथळा तरी ठरणार नाही.

• जेव्हा तुम्ही बोलायला सुरुवात करता तेव्हा तुमच्या मुखातून शब्द बाहेर पडण्यापूर्वी, ते शब्द पडताळून पाहण्यासाठी जेवढा कालावधी लागेल तेवढा वेळ चित्त एकाग्र करा आणि जे शब्द बाहेर पडणे नितांत आवश्यक आहेत तेवढेच बोलण्यास संमती द्या; परमशोधाच्या दिशेने चाललेल्या तुमच्या मार्गक्रमणामध्ये कोणत्याही प्रकारे हानीकारक ठरणार नाहीत केवळ त्याच शब्दांना मुखावाटे बाहेर पडण्यास संमती द्या.

• सारांश रूपाने म्हणायचे तर, तुमच्या जीवनाचे ध्येय आणि तुमचे उद्दिष्ट कधीही विसरू नका. त्या परमशोधाची इच्छा ही नेहमीच तुमच्या वर असली पाहिजे, तुम्ही जे काही करता, तुम्ही जे काही आहात त्या प्रत्येक अस्तित्वाच्या वर असली पाहिजे. तुमच्या अस्तित्वाच्या सर्व हालचालींवर प्रभुत्व गाजवणाऱ्या एखाद्या भल्यामोठ्या प्रकाशपक्ष्याप्रमाणे ती इच्छा असली पाहिजे.

• तुमच्या या सातत्यपूर्ण अथक परिश्रमांमुळे, एक दिवस अचानकपणे आंतरिक द्वार खुले होईल आणि एका लखलखीत, प्रकाशमान दीप्तिमध्ये तुमचा उदय होईल, त्यातून तुम्हाला अमर्त्यतेची खात्री पटेल, तुम्ही नेहमीच जिवंत होतात आणि पुढेही जिवंत असणार आहात, बाह्य रूपे केवळ नाहीशी होतात आणि तुम्ही वस्तुत: जे काही आहात त्याच्याशी तुलना करता, ही बाह्य रूपे म्हणजे फाटलेले कपडे जसे टाकून द्यावेत त्याप्रमाणे असतात, ह्याचा मूर्तिमंत अनुभव तुम्हाला येईल.

• आणि तेव्हा मग, सर्व बंधनातून मुक्त झालेले तुम्ही ताठपणे उभे राहाल. एरवी प्रकृतीने तुमच्यावर जे परिस्थितीचे ओझे लादलेले असते त्या ओझ्याखाली चिरडून जायला नको असेल तर, तुम्हाला मोठ्या कष्टाने ते ओझे वागवत पुढे चालावेच लागते, ते ओझे सहन करावेच लागते, आता मात्र तसे करावे न लागता, तुम्ही सरळ, खंबीरपणे मार्गक्रमण करू शकाल ; आता तुम्हाला तुमच्या नियतीची जाण असेल, आता तुम्ही तुमच्या जीवनाचे स्वामी असाल.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 33-35)

साधनेची दुसरी बाजू ही प्रकृती, मन, प्राण आणि शारीरिक जीवनाशी व त्यांच्या गतिविधींशी संबंधित आहे.

येथे तत्त्व हे आहे की, प्रकृती ही आंतरिक साक्षात्काराशी मिळतीजुळती असली पाहिजे म्हणजे, व्यक्तीचे दोन विसंगत भागात विभाजन व्हायला नको. आणि यासाठी, अनेक साधना किंवा प्रक्रिया आहेत.

समर्पण साधना :
त्यातील एक साधना म्हणजे, स्वतःच्या सर्व गतिविधी ह्या ईश्वरार्पण करायच्या आणि आंतरिक मार्गदर्शनासाठी व स्वतःची प्रकृती, उच्चतर शक्तीने हाती घ्यावी म्हणून तिला साद घालायची. जर का आंतरिक आत्म-उन्मीलन झाले असेल, जर का चैत्य पुरुष पुढे आलेला असेल तर मग, फार काही अडचण येत नाही – कारण त्याबरोबरच चैत्य विवेकसुद्धा येतो. सातत्याने सूचना मिळत राहतात, आणि अंततः त्याचे शासन सुरु होते, हे शासन सर्व अपूर्णता दाखवून देते आणि शांतपणे, धीराने त्या काढूनही टाकते; त्यामुळे योग्य मानसिक व प्राणिक हालचाली घडून येतात आणि त्यातून शारीरिक जाणिवेला सुद्धा एक आकार पुनर्प्राप्त होतो.

साक्षी भावाची साधना :
दुसरी पद्धत म्हणजे मन, प्राण आणि शारीरिक अस्तित्वाच्या साऱ्या हालचालींपासून अलिप्त होऊन मागे उभे राहवयाचे आणि त्यांच्या सर्व गतिविधी म्हणजे आपल्या सद्अस्तित्वाचा एक भाग आहेत असे न मानता; भूतकाळातील कर्मामुळे आपल्यावर लादल्या गेलेल्या, व्यक्तीमधील सामान्य प्रकृतीच्या नित्य रचना आहेत असे समजायचे.

व्यक्ती यामध्ये जितक्या प्रमाणात यशस्वी होते, म्हणजे जितक्या प्रमाणात ती निर्लिप्त होते, आणि मन व त्याच्या गतिविधी ह्या म्हणजेच आपण आहोत असे मानत नाही ; प्राण व त्याच्या गतिविधी म्हणजेच आपण आहोत असे मानत नाही; शरीर व त्याच्या हालचाली म्हणजेच आपण आहोत असे मानत नाही, तेव्हा व्यक्ती शांत, स्थिर, अमर्याद, अलिप्त अशा आणि ज्यामध्ये ऊर्ध्वस्थित असणाऱ्या सद्अस्तित्वाचे प्रतिबिंब दिसत असते आणि जे त्याचे थेट प्रतिनिधी असू शकते अशा, अंतरंगात असणाऱ्या आपल्या आंतरिक अस्तित्वाविषयी म्हणजे आंतरिक मन, आंतरिक प्राण, आंतरिक शरीर यांविषयी जागृत व्हायला लागते. आणि अशा या शांत आंतरिक अस्तित्वातूनच मग, जे त्याज्य आहे त्याचा अस्वीकार व्हायला सुरुवात होते; जे राखावयास हवे आणि ज्याचे परिवर्तन करावयास हवे त्याचा स्वीकार सुरु होतो. परिपूर्णत्वाविषयीची अगदी आंतरतम अशी इच्छा उदयास येते किंवा प्रकृतीच्या परिवर्तनासाठी जे आवश्यक आहे तेच प्रत्येक पावलागणिक करता यावे म्हणून दिव्य शक्तीचा धावा करणे सुरु होते.

त्यातूनच मग आंतरतम अशा चैत्य अस्तित्वाप्रत आणि त्याच्या मार्गदर्शक प्रभावाप्रत किंवा त्याच्या थेट मार्गदर्शनाप्रत मन, प्राण व शरीर खुले होण्याची शक्यता असते. बऱ्याच व्यक्तींमध्ये, ह्या दोन्ही पद्धती एकदमच उदयास येतात आणि एकत्रितपणे कार्य करतात आणि शेवटी एकमेकींमध्ये मिसळून जातात. पण व्यक्ती यातील कोणत्याही एका पद्धतीपासूनही सुरुवात करू शकते. जी पद्धत अनुसरण्यास सोपी आहे आणि जी व्यक्तीला अगदी स्वाभाविक वाटते त्या पद्धतीने तिने सुरुवात करावी. अंततः, सर्व प्रकारच्या अडचणींमध्ये जेथे वैयक्तिक प्रयत्न खुंटतात, तेव्हा गुरुच्या मदतीचा हस्तक्षेप होऊ शकतो आणि साक्षात्कारासाठी जे आवश्यक आहे ते किंवा लगेचची जी कोणती पायरी आवश्यक आहे ती गोष्ट त्यांच्याद्वारे घडून येऊ शकते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 06-08)

साधक : मानसिक प्रयत्नांचे, जिवंत अशा आध्यात्मिक अनुभूतीमध्ये परिवर्तन कसे कारावयाचे, त्यासाठी कोणती साधना करावयाची ?

श्रीअरविंद : तुमच्या अंतरंगात असणाऱ्या तुमच्या चेतनेवर एकाग्रता करण्याचा सराव करणे, ही पहिली आवश्यक गोष्ट आहे. सामान्य मानवी मनाच्या गतिविधी पृष्ठस्तरीय असल्यामुळे, खरा आत्मा झाकला जातो. परंतु या पृष्ठस्तरीय भागाच्या मागील बाजूस, अंतरंगामध्ये दुसरी एक गुप्त असणारी चेतना असते. आणि तिच्यामध्येच आपल्याला आपल्या खऱ्या आत्म्याची आणि प्रकृतीच्या महत्तर आणि गहनतर अशा सत्याची जाणीव होऊ शकते. परिणामतः आत्म्याचा साक्षात्कार होऊ शकतो आणि प्रकृतीला मुक्त करून, तिचे परिवर्तन घडवून आणता येऊ शकते. हे पृष्ठस्तरीय मन शांत करणे आणि अंतरंगात जीवन जगावयास सुरुवात करणे हे या एकाग्रतेचे उद्दिष्ट असते.

या पृष्ठस्तरीय चेतनेव्यतरिक्त अन्य अशी ही जी सत्य चेतना आहे, तिची दोन मुख्य केंद्र आहेत. एक केंद्र हृदयामध्ये (शारीरिक हृदयामध्ये नाही तर, छातीच्या मध्यभागी असणारे हृदयकेंद्र) आणि दुसरे केंद्र मस्तकामध्ये असते.

हृदयकेंद्रामध्ये एकाग्रता :
हृदयकेंद्रामध्ये केलेल्या एकाग्रतेमुळे अंतरंग खुले होऊ लागते आणि या आंतरिक खुलेपणाचे अनुसरण करत करत, आत खोलवर गेल्यास, व्यक्तीला व्यक्तिगत दिव्य तत्त्वाचे म्हणजे, आत्म्याचे किंवा चैत्य पुरुषाचे ज्ञान होते. अनावृत (unveiled) झालेला तो पुरुष मग पुढे यायला सुरुवात होते, तो प्रकृतीचे शासन करू लागतो, तिला आणि तिच्या सर्व हालचालींना सत्याच्या दिशेने वळवू लागतो, ईश्वराच्या दिशेने वळवू लागतो आणि जे जे काही ऊर्ध्वस्थित आहे, ते अवतरित व्हावे म्हणून त्याला साद घालतो. त्यामुळे त्याला त्या ईश्वराच्या उपस्थितीची जाणीव होते, त्या सर्वोच्चाप्रत हा पुरुष स्वतःला समर्पित करतो आणि जी महत्तर शक्ती आणि चेतना, आमच्या ऊर्ध्वस्थित राहून, आमची वाट पाहत असते, तिचे आमच्या प्रकृतीमध्ये अवतरण घडवून आणण्यासाठी, तो तिला आवाहन करतो.

स्वतःला ईश्वराप्रत समर्पित करत, हृदयकेंद्रावर एकाग्रता करणे आणि हृदयातील ईश्वराच्या उपस्थितीची व आंतरिक उन्मुखतेची अभीप्सा बाळगणे हा पहिला मार्ग आहे आणि ते जर करता आले, तर ती स्वाभाविक सुरुवात म्हटली पाहिजे. कारण एकदा का त्याचे परिणाम दिसू लागले की मग, या मार्गाने केलेल्या वाटचालीमुळे, आध्यात्मिक मार्ग हा (दुसऱ्या मार्गाने सुरुवात केली असती त्यापेक्षा) अधिक सोपा आणि अधिक सुरक्षित होतो.

मस्तकामध्ये एकाग्रता :
दुसरा मार्ग म्हणजे मस्तकामध्ये, मानसिक चक्रामध्ये करावयाची एकाग्रता. त्यामुळे जर का पृष्ठस्तरीय मनामध्ये शांतता येऊ शकली तर, आतील, व्यापक, अधिक गहन असे आंतरिक मन खुले होते. हे मन आध्यात्मिक अनुभूती आणि आध्यात्मिक ज्ञान ग्रहण करण्यास अधिक सक्षम असते.

पण एकदा का येथे एकाग्रता साध्य झाली की मग, व्यक्तीने मनाच्या वर असणाऱ्या ऊर्ध्वस्थित शांत मानसिक चेतनेप्रत स्वतःला खुले केलेच पाहिजे. कालांतराने चेतना ऊर्ध्व दिशेने वाटचाल करत आहे अशी व्यक्तीला जाणीव होते आणि अंततः चेतना, आजवर तिला ज्या झाकणाने शरीरामध्येच बद्ध करून ठेवले होते, त्या झाकणाच्या पलीकडे चढून जाते. आणि मस्तकाच्या वर असलेले केंद्र तिला गवसते, तेथे ती अनंतत्वामध्ये मुक्त होते. तेथे ती चेतना वैश्विक आत्म्याच्या, दिव्य शांतीच्या, दिव्य प्रकाशाच्या, दिव्य शक्तीच्या, दिव्य ज्ञानाच्या, दिव्य आनंदाच्या संपर्कात येते व त्यामध्ये प्रवेश करते आणि प्रकृतीमध्येही या गोष्टींचे अवतरण अनुभवास यावे म्हणून, तेच होऊन जाते.

मनाच्या अचंचलतेची अभीप्सा बाळगत, मस्तकामध्ये एकाग्र होणे आणि आत्म्याचा आणि ऊर्ध्वस्थित अशा ईश्वराचा साक्षात्कार करून घेणे हा एकाग्रतेचा दुसरा मार्ग होय. मात्र मस्तकामध्ये जाणिवेचे केंद्रीकरण करणे हा, त्याहूनही वर असणाऱ्या केंद्राप्रत चढून जाण्याच्या तयारीचा केवळ एक भाग असतो, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे असते. अन्यथा कदाचित व्यक्ती स्वतःच्या मनामध्ये, आणि त्याच्या अनुभवांमध्येच बद्ध होण्याची शक्यता असते. किंवा व्यक्ती आध्यात्मिक विश्वातीतामध्ये चढून तेथे जीवन जगण्याच्या ऐवजी, फार फार तर, ऊर्ध्वस्थित सत्याचे केवळ प्रतिबिंबच प्राप्त करून घेऊ शकते.

काही जणांना मानसिक एकाग्रता सोपी वाटते; तर काही जणांना हृदयकेंद्रावर एकाग्रता साधणे अधिक सोपे जाते; काही जणांना या दोन्ही केंद्रांवर आलटूनपालटून एकाग्रता करणे शक्य होते – जर एखाद्याला हृदय केंद्रापासून सुरुवात करणे शक्य झाले तर ते अधिक इष्ट असते.

(उत्तरार्ध उद्याच्या भागात…)

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 06-08)