Tag Archive for: साधना

जीवन जगण्याचे शास्त्र – ३५

सदासर्वदा ‘ईश्वरी शक्ती’च्या संपर्कात राहा आणि तिला तिचे कार्य करू द्या, ही तुमच्यासाठी सर्वोत्तम गोष्ट आहे. आवश्यकता असेल तेव्हा ती शक्ती तुमच्यातील कनिष्ठ ऊर्जांचा ताबा घेईल आणि त्यांचे शुद्धिकरण करेल. इतर वेळी ती तुमच्यामधून त्या कनिष्ठ ऊर्जा काढून टाकेल आणि त्या जागी ती स्वतःला स्थापित करेल.

मात्र तुम्ही जर तुमच्या मनाला प्राधान्य दिलेत आणि काय केले पाहिजे किंवा काय नाही याचे (मानसिक निकषांच्या आधारे) चर्वितचर्वण करत बसलात आणि त्याआधारे निर्णय घेतलात, तर तुम्ही तुमचा ‘ईश्वरी शक्ती’शी असलेला संपर्क गमावून बसाल. आणि मग (ईश्वरी शक्तीच्या ऐवजी) त्या कनिष्ठ ऊर्जा कृतिप्रवण होतील आणि मग साऱ्याच गोष्टी गोंधळाच्या होऊन बसतील आणि त्यांना चुकीचे वळण लागेल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 189)

जीवन जगण्याचे शास्त्र – ३४

श्रीमाताजींचे नित्य स्मरण केल्यामुळे व्यक्तीची पूर्ण उन्मुखतेच्या, खुलेपणाच्या (opening) दृष्टीने तयारी होते. हृदय खुले होण्याने श्रीमाताजींच्या उपस्थितीची जाणीव व्हायला सुरुवात होते आणि ऊर्ध्वस्थित असलेल्या त्यांच्या शक्तिप्रत उन्मुख झाल्याने, उच्चतर चेतनेचे सामर्थ्य देहामध्ये खाली उतरते आणि तेथे राहून ते, (व्यक्तीची) संपूर्ण प्रकृती बदलण्याचे कार्य करते.
*
श्रीमाताजींची प्रार्थना करणे, त्यांचा धावा करणे या गोष्टी मनाच्या क्रिया आहेत; तर उन्मुखता ही चेतनेची एक अशी स्थिती आहे की, जी चेतनेची इतर सर्व गतिविधींपासून मुक्तता करून, तिला श्रीमाताजींकडे अभिमुख ठेवते. अशी चेतना ईश्वराकडून जे काही येईल केवळ त्याचीच आस बाळगून असते आणि ते ग्रहण करण्यास ती सक्षम असते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 167), (CWSA 29 : 105)

जीवन जगण्याचे शास्त्र – ३३

उन्मुख असणे, खुले असणे (To be open) याचा अर्थ असा की, श्रीमाताजींचे कार्य तुमच्यामध्ये कोणत्याही नकाराविना किंवा अडथळ्याविना चालावे अशा रितीने तुम्ही श्रीमाताजींकडे वळलेले असणे.

मन जर त्याच्या स्वतःच्या कल्पनांमध्येच बंदिस्त राहिले आणि त्याने जर स्वतःमध्ये ‘प्रकाश’ व ‘सत्य’ आणण्यासाठी, श्रीमाताजींना कार्य करू देण्यास नकार दिला तर ती व्यक्ती उन्मुख झालेली नाही, असा त्याचा अर्थ होतो.

प्राण जर त्याच्या इच्छावासनांनाच चिकटून राहिला आणि श्रीमाताजींची शक्ती, जी खरी प्रेरणा व खरे भावावेग घेऊन येत असते, त्या गोष्टींना जर त्याने स्वतःमध्ये प्रवेश करू दिला नाही तर, ती व्यक्ती उन्मुख झालेली नाही, असा याचा अर्थ होतो.

शरीर जर स्वतःच्या इच्छा, सवयी व जडत्वामध्येच बंदिस्त राहिले आणि त्यामध्ये ‘प्रकाश’ व ‘शक्ती’चा प्रवेश होऊ देण्यास आणि कार्य करू देण्यास शरीराने मुभा दिली नाही, तर ती व्यक्ती उन्मुख झालेली नाही, असा त्याचा अर्थ होतो.

एकाच वेळी सर्व गतिविधींमध्ये संपूर्णतया खुले, उन्मुख होता येणे शक्य नसते, परंतु (फक्त मनामध्येच नव्हे तर) तुमच्या प्रत्येक भागामध्ये एक मध्यवर्ती उन्मुखता (central opening) असली पाहिजे आणि केवळ श्रीमाताजींच्या कार्यालाच प्रवेश करू देईल अशी प्रभावशाली अभीप्सा व संकल्पशक्ती असली पाहिजे, उर्वरित सर्व गोष्टी (श्रीमाताजींच्या शक्तीद्वारे) चढत्यावाढत्या क्रमाने केल्या जातील.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 151)

जीवन जगण्याचे शास्त्र – ३२

माझे प्रेम सततच तुमच्या सोबत आहे. पण तुम्हाला जर ते जाणवत नसेल तर त्याचे कारण हेच आहे की, तुम्ही ते स्वीकारण्यास सक्षम नाही. तुमची ग्रहणशीलता (receptivity) कमी पडत आहे, ती तुम्ही वाढविली पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही स्वत:ला खुले (open) केले पाहिजे. व्यक्ती जेव्हा आत्मदान करते तेव्हाच ती स्वत:ला खुली करू शकते. तुम्ही नक्कीच कळत वा नकळतपणे, ईश्वरी प्रेम आणि शक्ती तुमच्याकडे खेचू पाहत आहात. ही पद्धत चुकीची आहे. कोणतेही हिशोब न मांडता, कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न बाळगता, स्वत:स अर्पण करा म्हणजे मग तुम्ही ग्रहणक्षम होऊ शकाल.
*
अगदी या आध्यात्मिक क्षेत्रातसुद्धा अशी पुष्कळ माणसं आहेत की जी, वैयक्तिक कारणांसाठी, अगदी सर्व तऱ्हेच्या वैयक्तिक कारणांसाठी (योगसाधनादी) सर्व गोष्टी करत असतात. काही जण जीवनामुळे उद्विग्न झालेले असतात, काही जण दुःखी असतात, काही जणांना अधिक काही जाणून घेण्याची इच्छा असते, काही जणांना आध्यात्मिक दृष्ट्या कोणीतरी महान व्यक्ती बनायचे असते, इतरांना शिकविता यावे म्हणून काही जणांना काही गोष्टी शिकायच्या असतात, योगमार्ग स्वीकारण्याची खरोखरच हजारो वैयक्तिक कारणं असतात. पण एक साधीशी गोष्ट अशी की, ईश्वराप्रति आत्मदान करावे, जेणेकरून ईश्वरच तुम्हाला हाती घेईल आणि ‘त्याची’ जशी इच्छा असेल त्याप्रमाणे तो तुम्हाला घडवेल आणि ते सारे त्याच्या शुद्धतेनिशी व सातत्यानिशी घडवेल. आणि हे खरोखरच सत्य असते, पण असे करणारे फार जण आढळत नाहीत. खरेतर या आत्मदानामुळेच व्यक्ती ध्येयाप्रत थेट जाऊन पोहोचते आणि मग तिच्याकडून कोणत्या चुका होण्याचे धोकेही नसतात. पण इतर प्रेरणा मात्र नेहमीच संमिश्र असतात; अहंकाराने कलंकित झालेल्या असतात आणि स्वाभाविकपणेच त्या तुम्हाला कधी इकडे तर कधी तिकडे भरकटवत राहतात. कधीकधी तर त्या तुम्हाला ध्येयापासून खूप दूरही नेतात.

– श्रीमाताजी (CWM 14 : 148), (CWM 07 : 190)

जीवन जगण्याचे शास्त्र – ३१

सर्वसाधारणपणे माणसं ज्याला प्रेम असे संबोधतात, ते प्रेम प्राणिक भावना असणारे प्रेम असते; ते प्रेम हे (खरंतर) प्रेमच नसते; तर ती केवळ एक प्राणिक वासना असते, एक प्रकारच्या अभिलाषेची ती उपजत प्रेरणा असते, तो मालकी भावनेचा आणि एकाधिकाराचा भावावेग असतो. योगमार्गामध्ये त्याच्या अंशभागाचीदेखील भेसळ होऊ देता कामा नये. ईश्वराभिमुख झालेले प्रेम हे असे प्रेम असता कामा नये. (कारण) ते दिव्य प्रेम नसते.

ईश्वराबद्दल वाटणाऱ्या प्रेमामध्ये आत्मदान (self-giving) असते, त्यामध्ये कोणतीही मागणी नसते. ते शरणभावाने आणि समर्पणाने परिपूर्ण असते. ते कोणतेही हक्क गाजवत नाही; ते कोणत्याही अटी लादत नाही; ते कोणताही सौदा करत नाही. मत्सर, अभिमान वा राग अशा प्रक्षोभक भावना त्याच्या ठिकाणी आढळत नाहीत, कारण या गोष्टी त्याच्या घडणीतच नसतात.

ईश्वराभिमुख झालेल्या प्रेमाला प्रतिसाद म्हणून ‘दिव्य माता’ खुद्द स्वत:लाच देऊ करते, अगदी मुक्तपणे! आणि आंतरिक वरदानामध्ये ती गोष्ट प्रतिबिंबित झालेली दिसते. दिव्य मातेचे अस्तित्व तुमच्या मनामध्ये, तुमच्या प्राणामध्ये, तुमच्या शारीरिक चेतनेमध्ये प्रतिबिंबित झालेले दिसते. तिची शक्ती तुमच्या अस्तित्वाच्या सर्व गतिविधी हाती घेऊन, त्यांना परिपूर्णत्व (perfection) आणि परिपूर्तीच्या (fulfillment) दिशेने घेऊन जात, दिव्य प्रकृतीमध्ये तुमची पुनर्घडण करते. तिच्या प्रेमाने तुम्हाला कवळून घेतले आहे आणि ती स्वतः तुम्हाला तिच्या कवेमध्ये घेऊन, ईश्वराकडे घेऊन जात आहे असे तुम्हाला जाणवते. तुम्हाला याची जाणीव व्हावी आणि तिने तुमच्या अगदी जडभौतिक अंगापर्यंत तुमचा ताबा घ्यावा, अशी अभीप्सा तुम्ही बाळगली पाहिजे. येथे मात्र कोणतीही मर्यादा असत नाही, ना काळाची ना समग्रतेची!

व्यक्तीने जर खरोखर अशी अभीप्सा बाळगली आणि ती जर तिला साध्य झाली तर, इतर कोणत्याही मागण्यांना किंवा अपूर्ण राहिलेल्या इच्छावासनांना जागाच असणार नाही. आणि व्यक्तीने जर खरोखरच अशी अभीप्सा बाळगली तर, ती जसजशी अधिकाधिक शुद्ध होत जाईल, तसतशी निश्चितपणे तिला ती गोष्ट अधिकाधिक साध्य होईलच. आणि आवश्यक असणारा बदल तिच्या प्रकृतीमध्ये घडून येईलच. कोणतेही स्वार्थी हक्क आणि इच्छा-वासना यांपासून मुक्त असे तुमचे प्रेम असू द्या; मग प्रेम ग्रहण करण्याची, धारण करण्याची तुमची जेवढी क्षमता आहे, तेवढे सर्व प्रेम प्रतिसादरूपाने तुम्हाला मिळत आहे, असे तुम्हाला आढळेल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 338-339)

जीवन जगण्याचे शास्त्र – ३०

साधक : अभीप्सेचा अग्नी कधीही विझू नये यासाठी मी काय केले पाहिजे?

श्रीमाताजी : व्यक्ती जेव्हा तिच्या सर्व अडीअडचणी, तिच्या इच्छावासना, तिच्या सर्व अपूर्णता यांचे त्या अग्नीमध्ये हवन करत राहते तेव्हा त्यामुळे, तो अग्नी तेवत राहतो. अभीप्सेचा हा अग्नी प्रज्वलित राहावा म्हणून सकाळ-संध्याकाळ मला अंतःकरणपूर्वक प्रार्थना करा आणि त्या अग्निमधील समिधा म्हणून त्या सर्व गोष्टी मला अर्पण करत जा.

साधक : अभीप्सारूपी या अग्नीची तीव्रता वाढीस लागावी म्हणून मला एकांतवासात जावे असे वाटत आहे. मी एकांतवासात जाऊ का?

श्रीमाताजी : दैनंदिन जीवनाच्या धुमश्चक्रीमध्येच हा अग्नी प्रज्वलित होत राहिला पाहिजे जेणेकरून, तो तुमच्या सर्व गतिविधी सुयोग्य करू शकेल.

साधक : मी माझ्या सर्व गतिविधी तुम्हाला अर्पण करत आहे आणि “माझा अभीप्सा-अग्नी प्रज्वलित राहू दे,’’ अशी प्रार्थना मी तुम्हाला करत आहे.

श्रीमाताजी : जोपर्यंत तुम्ही अभीप्सारूपी ज्योत तेवत ठेवण्याची आस बाळगत आहात तोपर्यंत ती मालवू नये याची काळजी मी घेईन.

साधक : मी त्या ज्योतीवर एकाग्रता करण्याचा खूप प्रयत्न केला, पण, ती ज्योत प्रज्वलित करण्याइतपत माझी अभीप्सा उत्कट नाही.

श्रीमाताजी : अभीप्सेचा अग्नी प्रज्वलित करणे हे तुमचे काम नाही. मी तुम्हाला म्हटले त्याप्रमाणे, तो अग्नी नेहमी मी प्रज्वलित करत असते. तो ग्रहण करण्यासाठी तुम्ही फक्त स्वतःला उन्मुख केले पाहिजे आणि तो अग्नी सद्भावनेने सांभाळला पाहिजे.

श्रीमाताजी (CWM 17 : 126)

जीवन जगण्याचे शास्त्र – २९

विश्वामध्ये जे जे काही केले जाते, त्या सर्व कृतींमागे ईश्वरच त्याच्या शक्तिद्वारे विद्यमान असतो; पण तो त्याच्या योगमायेने झाकला गेलेला असतो आणि कनिष्ठ प्रकृतीमध्ये तो जिवाच्या अहंकाराद्वारे कार्य करत असतो. योगामध्ये ईश्वर हाच साधक आणि तोच साधनाही असतो; त्याचीच शक्ती ही तिच्या प्रकाश, सामर्थ्य, ज्ञान, चेतना आणि आनंद यांच्या साहाय्याने आधारावर (मन, प्राण, शरीर यांवर) कार्य करत असते आणि जेव्हा तो आधार त्या शक्तिप्रत उन्मुख होतो, तेव्हा त्या सर्व दिव्य शक्ती त्या आधारामध्ये झिरपवल्या जातात आणि त्यामुळे साधना शक्य होते.

परंतु जोपर्यंत साधकाची कनिष्ठ प्रकृती सक्रिय असते, तोपर्यंत त्याच्या व्यक्तिगत प्रयत्नांची आवश्यकता असतेच. हा आवश्यक असलेला व्यक्तिगत प्रयत्न म्हणजे अभीप्सा (aspiration), नकार (rejection) आणि समर्पण (surrender) अशी त्रिविध तपस्या होय.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 06)

जीवन जगण्याचे शास्त्र – २८

तुम्ही जे कोणते कर्म कराल ते शक्य तेवढे परिपूर्णपणे करण्याचा प्रयत्न करा. मनुष्याच्या अंतर्यामी असणाऱ्या ईश्वराची ही सर्वोत्तम सेवा असते.

– श्रीमाताजी (CWM 14 : 306)

*

कर्म हा योगसाधनेचा एक भाग आहे. प्राण व त्याच्या क्रियांमध्ये ईश्वरी ‘उपस्थिती’, ‘प्रकाश’ आणि ‘शक्ती’ अवतरित व्हाव्यात म्हणून त्यांना आवाहन करण्यासाठी कर्म एक उत्तम संधी प्राप्त करून देते; कर्मामुळे समर्पणाचे क्षेत्रदेखील विस्तारित होते आणि समर्पणाची संधीही वाढीस लागते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 247)

जीवन जगण्याचे शास्त्र – २६

पूर्णयोगाचा मार्ग खूप दीर्घ आहे. स्वतःमधील आणि जगातील ईश्वराला आपली सर्व कर्मे त्यागबुद्धीने, यज्ञबुद्धीने समर्पित करणे हे या मार्गावरील पहिले पाऊल असते. हा मनाचा आणि हृदयाचा भाव असतो, त्याचा आरंभ करणे हे फारसे अवघड नाही, परंतु तो दृष्टिकोन पूर्ण मन:पूर्वकतेने अंगीकारणे आणि तो सर्वसमावेशक करणे फार अवघड असते.

कर्मफलावर असणारी आपली आसक्ती सोडून देणे हे या मार्गावरील दुसरे पाऊल असते. आपल्यामध्ये अनुभवास येणारी ‘ईश्वरी उपस्थिती, दिव्य चेतना आणि दिव्य सामर्थ्य’ हे त्यागाचे खरे, अपरिहार्य, अतिशय इष्ट असे फळ असते. ही एक गोष्ट आवश्यक असते. हे फळ मिळाले की, अन्य सर्व गोष्टींची त्याला जोड मिळेलच. हे दुसरे पाऊल म्हणजे आपल्या प्राणिक अस्तित्वातील, आपल्या वासनात्म्यातील (desire-soul), वासनामय प्रकृतीतील अहंभावप्रधान इच्छेचे रूपांतर असते; आणि ते फारच अवघड असते.

केंद्रस्थ अहंभावाचे उच्चाटन आणि एवढेच नव्हे तर, ईश्वराचे साधन झाल्याच्या अहं जाणिवेचे देखील उच्चाटन हे या मार्गावरील तिसरे पाऊल असते. हे रूपांतरण सर्वाधिक अवघड असते; आणि जोपर्यंत पहिली दोन पावले उचलली जात नाहीत तोपर्यंत हे रुपांतरण पूर्ण होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत तिसऱ्या कळसरूपी पावलाची जोड मिळत नाही म्हणजेच अहंभाव नष्ट करून, वासनेचे मूळच उखडून फेकून दिले जात नाही तोपर्यंत, आधीच्या दोन पावलांचे कार्यसुद्धा पूर्ण होत नाही.

क्षुद्र अहंभाव प्रकृतीतून मुळापासून दूर केला जातो तेव्हाच, साधकाला ऊर्ध्वस्थित असणाऱ्या त्याच्या खऱ्या अस्तित्वाची जाणीव होऊ शकते; ईश्वराची शक्ती आणि ईश्वराचा एक अंशभाग असे त्याचे स्वरूप असते. साधकाला या खऱ्या अस्तित्वाची ओळख होते तेव्हाच तो ईश्वरी शक्तीच्या संकल्पाव्यतिरिक्त असणाऱ्या इतर सर्व प्रेरक-शक्तींचा त्याग करतो.

– श्रीअरविंद (CWSA 23-24 : 247-248)

जीवन जगण्याचे शास्त्र – २४

साधक : “सर्व कर्मं म्हणजे अनुभवाची पाठशाळा असते,” असे श्रीअरविंदांनी का म्हटले आहे?

श्रीमाताजी : तुम्ही जर कोणतेही कर्मच केले नाही, तर तुम्हाला कोणताच अनुभव येणार नाही. समग्र जीवन हे अनुभवाचे क्षेत्र आहे. तुम्ही केलेली प्रत्येक हालचाल, तुमच्या मनात उमटलेला प्रत्येक विचारतरंग, तुम्ही केलेले प्रत्येक कर्म हा एक अनुभव असू शकतो आणि तो अनुभव असलाच पाहिजे. आणि विशेषतः तुमचे कार्यक्षेत्र हे तर तुमचे अनुभवाचे क्षेत्र असते; तुम्ही जी प्रगती करण्यासाठी आंतरिकरित्या प्रयत्न करत असता ती सर्व प्रगती, त्या (बाह्य) क्षेत्रामध्येसुद्धा उपयोगात आणली गेली पाहिजे.

तुम्ही कोणतेही काम न करता केवळ ध्यानामध्ये किंवा निदिध्यासनामध्ये राहिलात, तर तुम्ही प्रगती केली आहे किंवा नाही, हे तुम्हाला कळणार नाही. आणि मग तुमची प्रगती झाली आहे अशा भ्रमात तुम्ही राहाल. उलट, जेव्हा तुम्ही एखादे काम करायला सुरुवात करता, तेव्हा तुमच्या कामाच्या ठिकाणची परिस्थिती, तुमचे इतरांशी येणारे संबंध, तुमचा नोकरीव्यवसाय या सर्व गोष्टी म्हणजे अनुभवाचे असे एक क्षेत्र असते की, जेथे तुम्हाला तुम्ही केलेल्या प्रगतीची जाणीव तर होतेच; पण अजून जी कोणती प्रगती करून घ्यायची राहिली आहे, त्याचीही जाणीव तुम्हाला होते.

तुम्ही जर काहीही काम न करता, स्वतःमध्येच बंदिस्त होऊन राहिलात तर, कदाचित पूर्णपणे व्यक्तिगत भ्रमामध्ये तुम्ही तुमचे जीवन व्यतीत कराल, अशी शक्यता असते. परंतु ज्याक्षणी तुम्ही बाह्य जगात कृती करू लागता आणि इतरांच्या संपर्कात येता; विविध प्रकारच्या परिस्थितीच्या आणि जीवनामधील विविध वस्तुंच्या संपर्कात येता, तेव्हा तुम्हाला तुम्ही प्रगती केली आहे किंवा नाही; तुम्ही अधिक स्थिर, शांत झाला आहात की नाही; अधिक सचेत, अधिक सशक्त, अधिक निःस्वार्थी झाला आहात की नाही; तुमच्यामध्ये इच्छावासना शिल्लक आहेत की नाहीत; काही अग्रक्रम, काही दुर्बलता, काही अविश्वासूपणा शिल्लक तर नाही ना, इत्यादी सर्व गोष्टींची कर्म करत असताना तुम्हाला पूर्णतया वस्तुनिष्ठपणे जाणीव होऊ लागते.

परंतु तुम्ही जर फक्त ध्यानामध्येच स्वतःला बंदिस्त करून घेतलेत तर ते पूर्णपणे वैयक्तिक असते, आणि मग तुम्ही पूर्णपणे एका भ्रमामध्ये जाण्याची आणि त्यामधून कधीही बाहेर न पडण्याची शक्यता असते. आणि मग तुम्हाला असे वाटू शकते की, तुम्हाला काही असामान्य गोष्टींचा साक्षात्कार झाला आहे. प्रत्यक्षात मात्र तुम्हाला तशी प्रचिती आली असल्याचा किंवा तुम्ही प्रगती केली असल्याचा एक आभास, एक भ्रम तुमच्यापाशी असतो. श्रीअरविंद येथे हेच सांगू इच्छित आहेत.

– श्रीमाताजी (CWM 07 : 287-288)