Tag Archive for: साधना

साधनेची मुळाक्षरे – ०७

आपण का जगतो हे जाणून घेणे म्हणजे ‘ईश्वरा’चा शोध घेणे आणि ‘त्याच्या’शी जागृत ऐक्य पावणे; केवळ याच साक्षात्कारावर लक्ष एकाग्र करण्याची अभीप्सा बाळगणे; सर्व प्रकारच्या परिस्थितीचे रूपांतरण ध्येयप्राप्तीपर्यंत पोहोचण्याच्या साधनांमध्ये कसे करायचे हे जाणून घेणे.

*

प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हा एका नवीन आणि पूर्णतर अशा आत्मनिवेदनाचे निमित्त झाला पाहिजे. आणि ते आत्म-निवेदन, कार्याबद्दलच्या भ्रांतकल्पनांनी भरलेले, अतिरिक्त सक्रिय, उथळ, उत्तेजित अशा आत्म-निवेदनांपैकीचे एक असता कामा नये, तर ते सखोल, शांत असे आत्म-निवेदन असले पाहिजे, ते दृश्य स्वरूपात असलेच पाहिजे असे काही आवश्यक नाही परंतु ते आत खोलवर जाऊन पोहोचेल आणि तेथून साऱ्या कृतींचे परिवर्तन घडवून आणेल, असे असले पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 428), (CWM 01 : 80)

साधनेची मुळाक्षरे – ०६

प्रश्न : पण ईश्वराला या गोंधळामध्ये, या पृथ्वीवर आविष्कृत व्हायची इच्छा का असते?

श्रीमाताजी : पृथ्वी म्हणजे त्या ईश्वराचेच विरूप (deformation) आहे आणि ‘तो’ त्याचे सत्य पुन्हा एकदा या पृथ्वीवर प्रस्थापित करू इच्छितो. त्याचसाठी त्याने ही पृथ्वी निर्माण केली आहे ; त्यामागे अन्य कोणताही हेतू नाही. पृथ्वी ही ‘त्याच्या’पासून विलग झालेली गोष्ट नाही किंवा ‘त्याला’ परकी नाही. पृथ्वी म्हणजे ‘ईश्वरा’चे विरूपीकरण आहे; ही पृथ्वी तिच्या साररूपात जशी होती तशीच, म्हणजे ‘ईश्वरस्वरूप’ बनण्याची पुन्हा एकदा आवश्यकता आहे.

प्रश्न : पण मग तो ‘ईश्वर’ आपल्यासाठी इतका अनोळखी का आहे?

श्रीमाताजी : बाळा, तो काही अनोळखी नाही. तो अनोळखी आहे, अशी तुम्ही कल्पना करता पण तो तसा नाही, तो अजिबात तसा नाही. तो तुमच्या अस्तित्वाचे सार आहे – तो काही अनोळखी नाही. तुम्ही ‘त्याला’ ओळखत नसलात तरीही तो अनोळखी नाही; तो तुमच्या अस्तित्वाचे अगदी मूळ सार-सर्वस्व आहे. ‘ईश्वरा’खेरीज तुम्ही अस्तित्वातच राहू शकणार नाही. ईश्वराखेरीज सेकंदाच्या एक दशलक्षाव्या भागाइतका काळदेखील तुम्ही जिवंत राहू शकणार नाही. याचे कारणच असे आहे की तुम्ही एक प्रकारच्या भ्रमामध्ये व विरूपामध्ये जगत असता, तुम्हाला त्याची जाणीव नसते. तुम्ही स्वतःच्या मूळ स्वरूपाविषयी सजग नसता, तर तुम्ही जे आहात, असे तुम्हाला वाटत असते, त्याच्याविषयीच फक्त तुम्हाला जाणीव असते; पण वस्तुतः तुम्ही ते नसता.

प्रश्न : माताजी, मग मी स्वतः कोण आहे?

श्रीमाताजी : ईश्वर!

– श्रीमाताजी
(CWM 07 : 191-192)

साधनेची मुळाक्षरे – ०५

आध्यात्मिक क्षेत्रातसुद्धा, अशी पुष्कळ माणसं आहेत (ज्यांनी आध्यात्मिक जीवन स्वीकारले आहे आणि जे योगसाधना करत आहेत त्यांच्यापैकी बहुतांशी लोक, असे मी म्हणेन.) की जी, म्हणजे त्यांच्यापैकी बरीच जणं ही वैयक्तिक कारणांसाठी सारे करत असतात, अनेक प्रकारची वैयक्तिक कारणं असतात : काही जण जीवनामुळे उद्विग्न झालेले असतात, काही दुःखी असतात, काही जणांना अधिक काही जाणून घेण्याची इच्छा असते, काहींना आध्यात्मिक दृष्ट्या कोणीतरी महान व्यक्ती बनायचे असते, इतरांना शिकविता यावे म्हणून काही जणांना काही गोष्टी शिकायच्या असतात; योगमार्ग स्वीकारण्याची खरोखरच हजारो वैयक्तिक कारणं असतात. पण एक साधीशी गोष्ट – ईश्वराप्रत स्वतःचे आत्मदान करावे, जेणेकरून ईश्वरच तुम्हाला हाती घेईल आणि त्याची जशी इच्छा आहे त्याप्रमाणे तो तुम्हाला घडवेल आणि ते सारे त्याच्या शुद्धतेनिशी आणि सातत्यानिशी घडवेल आणि हे खरोखरच सत्य आहे पण असे करणारे फार जण आढळत नाहीत; खरेतर या आत्मदानामुळेच व्यक्ती ध्येयाप्रत थेट जाऊन पोहोचते आणि मग तिच्याकडून कोणत्या चुका होण्याचेही धोके नसतात. पण त्यामध्ये नेहमीच इतर प्रेरणादेखील मिसळलेल्या असतात, अहंकाराने कलंकित झालेल्या असतात आणि स्वाभाविकपणेच त्या तुम्हाला कधी इकडे तर कधी तिकडे नेतात, कधीकधी तर त्या तुम्हाला ध्येयापासून खूप दूरही नेतात.

ईश्वराशी संपूर्ण, परिपूर्ण, समग्र आत्मनिवेदन हेच तुमच्या अस्तित्वाचे एकमेव कारण असले पाहिजे, एकमेव साध्य, एकमेव प्रेरणा असली पाहिजे; तुमच्यामध्ये आणि ईश्वरामध्ये कोणते वेगळेपणच जाणवणार नाही असे तुमचे आत्मनिवेदन असले पाहिजे; कोणत्याही वैयक्तिक प्रतिक्रियेची ढवळाढवळ न होता आपण स्वतःच पूर्णतः, संपूर्णतः, समग्रतेने तो ईश्वर व्हावे, अशी जर तुमची भावना असेल तर तो आदर्श दृष्टिकोन आहे. आणि शिवाय, तुम्हाला जीवनामध्ये आणि तुमच्या कार्यामध्येही पुढे घेऊन जाईल असा हाच एकमेव दृष्टिकोन आहे, तोच तुमचे सर्व गोष्टींपासून आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या स्वतः पासून (की जो सर्व धोक्यांमधील तुमच्यासाठी असलेला सर्वात मोठा धोका असतो.) रक्षण करेल; ‘स्वतः’ इतका इतर कोणताच धोका मोठा नसतो. (येथे ‘स्वतः’ हा शब्द ‘अहंकारयुक्त मी’ या अर्थाने घेतला आहे.)

– श्रीमाताजी
(CWM 07 : 190)

साधनेची मुळाक्षरे – ०४

प्रश्न : माताजी, इथे श्रीअरविंदांनी असे लिहिले आहे की, “ही मुक्ती, हे पूर्णत्व, ही समग्रतासुद्धा आपण आपल्यासाठी मिळविता कामा नये तर ती आपण ईश्वरासाठी मिळविली पाहिजे.” पण आपण जी साधना करतो ती तर आपल्या स्वतःसाठीच करत असतो ना?

श्रीमाताजी : पण श्रीअरविंद येथे नेमकेपणाने तेच तर सांगत आहेत. त्या मुद्द्यावर भर देण्यासाठीच त्यांनी असे लिहिले आहे. म्हणजे, आपण जे पूर्णत्व संपादन करणार आहोत ते आपल्या वैयक्तिक आणि स्वार्थी हेतुसाठी उपयोगात आणायचे नसून, ईश्वराचे आविष्करण शक्य व्हावे म्हणून, ते ईश्वराच्या सेवेत समर्पित करायचे आहे. वैयक्तिक पूर्णत्वाच्या स्वार्थी हेतुने आपण या विकासासाठी प्रयत्नशील नसून, ‘ईश्वरी कार्य’ सिद्धीस जावे म्हणून आपण त्याचा पाठपुरावा करत आहोत.

प्रश्न : पण आपण हे दिव्य ‘कार्य’ का करतो?

श्रीमाताजी : ईश्वराची तशी ‘इच्छा’ आहे, म्हणून आपण ते करतो. ते आपण आपल्या कोणत्याही वैयक्तिक कारणासाठी करत नाही, आणि ते तसे करता कामा नये. आपण ते करतो कारण ती ईश्वरी इच्छा आहे आणि ते ईश्वरी कार्य आहे.

जोपर्यंत कोणतीही वैयक्तिक आकांक्षा किंवा इच्छाआकांक्षा, किंवा एखादी स्वार्थी इच्छा त्यामध्ये मिसळलेली असते, तेव्हा त्यातून एक प्रकारची भेसळ निर्माण होते आणि मग ती ‘ईश्वरी इच्छे’ची तंतोतंत अभिव्यक्ती राहात नाही. केवळ एकच एक गोष्ट महत्त्वाची असते आणि ती म्हणजे ‘ईश्वर’ ‘त्याचा संकल्प’, ‘त्याचे आविष्करण’ आणि ‘त्याची अभिव्यक्ती’! आणि त्यासाठीच व्यक्ती इथे आहे, व्यक्ती म्हणजे दुसरे तिसरे काही नसून, ती ईश्वरच आहे. पण जोपर्यंत ‘मी’ पणाची भावना आहे, अहंभावना आहे; जोपर्यंत स्व-व्यक्तित्वाची भावना डोकावत असते, तेव्हा त्यातून असे सिद्ध होते की, व्यक्ती जशी असणे आवश्यक आहे तशी ती अजूनपर्यंत झालेली नाही. हे एका रात्रीत करणे शक्य आहे, असे मला म्हणायचे नाही पण तरीही खरंतर हेच सत्य आहे.

– श्रीमाताजी
(CWM 07 : 189-190)

साधनेची मुळाक्षरे – ०३

प्रश्न : आम्हाला योगासंबंधी काही सांगाल का ?

श्रीमाताजी : तुम्ही योगसाधना कशासाठी करू इच्छिता? सामर्थ्य लाभावे म्हणून? मन:शांती, शांतचित्तता प्राप्त व्हावी म्हणून ? की मानवतेची सेवा करावयाची आहे म्हणून? परंतु, तुम्ही योगमार्ग स्वीकारण्यास पात्र आहात का हे लक्षात येण्यासाठी यांपैकी कोणतेही उद्दिष्ट पुरेसे नाही. त्यासाठी तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत – तुम्हाला ईश्वराकरता योगसाधना करायची आहे का? ईश्वर हेच तुमच्या जीविताचे परमोच्च सत्य आहे का? ईश्वरावाचून जगणेच आता अगदी अशक्य झाले आहे, अशी तुमची स्थिती आहे का? ईश्वर हाच तुमच्या अस्तित्वाचा एकमेव उद्देश आहे आणि ईश्वराविना तुमच्या जीवनास काहीच अर्थ नाही, असे तुम्हाला वाटते का? असे असेल तरच, तुम्हाला योगमार्ग स्वीकारण्याविषयी आंतरिक हाक आली आहे असे म्हणता येईल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 01)

साधनेची मुळाक्षरे – ०२

‘ईश्वरा’कडूनच सारे काही अस्तित्वात येते, सारे त्यातच निवास करतात, आणि (आत्ता अज्ञानामुळे झाकोळून गेलेले असले तरी) त्या ‘ईश्वरी’ सत्याकडे परतणे हेच आत्म्याचे जीवनातील ध्येय असते. स्वतःच्या परम सत्यामध्ये असलेला ‘ईश्वर’ हा केवल आणि अनंत शांती, चैतन्य, सत्, शक्ती आणि ‘आनंद’स्वरूप असतो.

*

आपण ‘ईश्वर’ जाणतो आणि ‘ईश्वर’ बनतो कारण आपल्या गुप्त प्रकृतीमध्ये आपण मूलतः ‘ईश्वर’च आहोत. सर्व शिकवण म्हणजे प्रकटीकरण (revealing) असते, सर्व निर्मिती म्हणजे उलगडत जाणे (unfolding) असते. आत्म-प्राप्ती हेच रहस्य आहे; आत्मज्ञान आणि उत्तरोत्तर वाढत जाणारी चेतना ही त्याची साधने आणि प्रक्रिया आहेत.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 05), (CWSA 23 : 54)

श्रीअरविंदांच्या लिखाणातील आणि श्रीमाताजींच्या संभाषणांमधील निवडक उताऱ्यांच्या आधारे येथे साधनेची तोंडओळख करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामधून श्रीअरविंद व श्रीमाताजींचे समग्र साहित्य वाचण्याची इच्छा वाचकांना होईल, अशी आशा आहे. किंवा त्यातील एखाद्या मार्गदर्शक तत्त्वाच्या आधारे ‘एकतरी ओवी अनुभवावी’ आणि त्या तत्त्वाला आपल्या चेतनेचा एक भाग बनवावे, असा प्रयत्न साधक करू शकतील.

साधनेची मुळाक्षरे – ०१

तत्त्वतः आपल्या जीवनाचे केवळ एकच खरे कारण आहे आणि ते म्हणजे – स्वतःला जाणणे. आपण कोण आहोत, आपण येथे का आहोत आणि आपल्याला काय केले पाहिजे, हे शिकण्यासाठीच आपण येथे आहोत. आणि जर आपल्याला हे उमगले नाही, तर आपले जीवन अगदीच पोकळ ठरते – आपल्यासाठी आणि इतरांसाठीदेखील!

*

जीवनाचे एक प्रयोजन आहे. ईश्वराचा शोध घेणे आणि त्याची सेवा करणे हेच ते प्रयोजन आहे.

ईश्वर दूर कोठे नाही, तर तो आपल्यामध्येच, खोल अंतरंगात आणि भावना व विचार यांच्या वरती आहे. ईश्वरासोबत शांती आणि आश्वासकता आहे आणि सर्व अडचणींवरील तोडगादेखील आहे.

तुमच्या सगळ्या समस्या ईश्वरावर सोपवा म्हणजे तो तुम्हाला सर्व अडचणींमधून बाहेर काढेल.

*

ईश्वराचा शोध घेण्याचा आणि त्याच्याशी ऐक्य पावण्याचा आनंद हे व्यक्तिगत जीवनाचे प्रयोजन असते. व्यक्तीला जेव्हा हे उमगते तेव्हा ती व्यक्ती सर्व अडचणींवर मात करण्याच्या सामर्थ्यप्राप्तीसाठी सज्ज होते.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 15-16), (CWM 14 : 05), (CWM 16 : 423)

ईश्वरी कृपा – ३१

प्रकाश आणि सत्य या गोष्टी असतील अशा परिस्थितीतच परम ‘कृपा’ तिचे कार्य करेल; मिथ्यत्व आणि अज्ञान यांनी तिच्यावर लादलेल्या परिस्थितीत, त्यांच्या अटींनुसार ती कार्य करणार नाही. कारण मिथ्यत्वाच्या मागण्यांपुढे जर तिला नमते घ्यावे लागले तर, तिचा स्वतःचा हेतुच विफल झाल्यासारखे होईल.

…अस्तित्वाचा एखादा भाग समर्पित आहे पण दुसरा भाग स्वतःला समर्पणाविना तसाच राखू इच्छित असेल, स्वतःच्याच पद्धतीने चालत असेल किंवा स्वतःच्या अटी लादत असेल तर, असे जेव्हा जेव्हा घडते त्या त्या प्रत्येक वेळी, तुम्ही स्वतःच ‘ईश्वरी कृपे’ला तुमच्यापासून दूर लोटत असता.

तुम्ही जर तुमच्या इच्छा, अहंकारी मागण्या आणि प्राणिक आग्रह तुमच्या भक्तिच्या आणि समर्पणाच्या आड लपवून ठेवत असाल; खऱ्या अभीप्सेच्या जागी तुम्ही या गोष्टी ठेवत असाल किंवा त्या गोष्टी अभीप्सेमध्ये मिसळत असाल आणि त्या गोष्टी ‘दिव्य शक्ती’वर लादण्याचा प्रयत्न करत असाल तर, ‘ईश्वरी कृपे’ने तुमचे रूपांतरण घडवून आणावे म्हणून तिला आवाहन करणे व्यर्थ आहे.

तुम्ही सत्याप्रत एका बाजूने स्वतःला खुले करत असाल किंवा तुमच्यामधील एखादा घटक सत्याप्रत खुला करत असाल आणि दुसऱ्या बाजूने सातत्याने विरोधी शक्तींना दारे खुली करत असाल, तर ‘ईश्वरी कृपा’ तुमच्या सन्निध राहील, ही अपेक्षा करणे फोल आहे. तुम्हाला जर तुमच्या मंदिरामध्ये ईश्वराच्या जिवंत ‘अस्तित्वा’ची प्राणप्रतिष्ठा करायची असेल तर तुम्ही ते मंदिर स्वच्छ राखणेच पाहिजे.

जेव्हा जेव्हा ‘ईश्वरी शक्ती’ हस्तक्षेप करते आणि सत्य घेऊन येते, तेव्हा प्रत्येक वेळी तुम्ही जर त्या सत्याकडे पाठ फिरवलीत आणि ज्या मिथ्यत्वाला घालवून दिले होते त्याला पुन्हा आमंत्रित केलेत तर, तुम्हाला अंतर दिल्याबद्दल ईश्वरी कृपेला तुम्ही दोष देता कामा नये, तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या इच्छेच्या खोटेपणाला आणि तुमच्या स्वतःच्या समर्पणाच्या अपूर्णतेला दोष दिला पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 03)

ईश्वरी कृपा – ३०

ईश्वराने स्वतःचे आविष्करण केलेच पाहिजे म्हणून त्याला आवाहन करण्याचा व्यक्तीला कोणताही अधिकार नाही; ते आविष्करण केवळ चेतनेच्या आध्यात्मिक किंवा आंतरात्मिक अवस्थेला प्रतिसाद म्हणून होऊ शकते किंवा योग्य प्रकारे केलेल्या दीर्घकालीन साधनेला दिलेला प्रतिसाद म्हणून होऊ शकते; किंवा जर ते आविष्करण त्यापूर्वी किंवा कोणत्याही दृश्य कारणाविना घडून येत असेल तर ती ‘ईश्वरी कृपा’ असते; परंतु व्यक्ती या ‘ईश्वरी कृपे’ची मागणी करू शकत नाही किंवा तिच्यावर सक्ती करू शकत नाही; ‘ईश्वरी कृपा’ ही व्यक्तीच्या अस्तित्वाचे एक मुक्त-पुष्प बनून, दिव्य चेतनेमधून उत्स्फूर्तपणे उसळून वर येते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 473)

ईश्वरी कृपा – २९

(ईश्वराची अनुभूती आल्याशिवाय मी त्याची भक्ती करू शकत नाही, असा दृष्टिकोन स्वीकारलेल्या एका साधकाला श्रीअरविंदांनी लिहिलेल्या पत्रातील हा अंशभाग…)

…आणि मग तुम्ही पुन्हा असे म्हणाल की, “मी भक्ती करेन किंवा करणार नाही पण मला मात्र तो हवा आहे, मला तो नेहमीच हवाहवासा वाटतो आणि आता तर तो मला अधिकच हवाहवासा वाटू लागला आहे आणि तरी मला काहीच मिळत नाही.’ पण इच्छा असणे म्हणजेच सारे काही झाले असे नाही. आत्ता कुठे तुमच्या लक्षात येऊ लागले आहे की, त्यासाठी हृदयाची शुद्धी वगैरे सारख्या काही अटींची पूर्तता करावी लागते. तुमचा सिद्धान्त असा असतो की, “मला जेव्हा ‘देव’ हवा असेल, तेव्हा ‘देवा’ने माझ्यासाठी आविष्कृत झालेच पाहिजे, माझ्यापाशी यायलाच हवे, अगदीच काही नाही तरी किमान मला त्याने ओझरते दर्शन तरी दिले पाहिजे, किंवा एखादा खराखुरा सघन अनुभव द्यायला पाहिजे, मला कळणार नाहीत किंवा मी ज्याला किंमत देत नाही अशा संदिग्ध गोष्टी मला नकोत. ‘देवाच्या कृपे’ने माझ्या हाकेला उत्तर दिलेच पाहिजे, माझी पात्रता असो वा नसो, त्याने उत्तर दिलेच पाहिजे अन्यथा ‘कृपा’ वगैरे काही अस्तित्वातच नाही.” काही विशेष बाबींमध्ये ‘देवाची कृपा’ खरोखरच असे करेलदेखील, पण ‘केलेच पाहिजे, दिलेच पाहिजे’ ही अशी हक्काची भाषा कोठून आली ? आणि मग जर ‘देव’ तसेच करेल तर ती ‘देवाची कृपा’ असणार नाही, तर ते मग, ‘देवा’चे कर्तव्य, देवावरील बंधन किंवा करार किंवा तह होऊन बसेल. ईश्वर तुमच्या हृदयामध्ये डोकावतो आणि योग्य क्षण आला आहे असे जाणवले की त्या क्षणी, पडदा बाजूला करून टाकतो.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 468)