Tag Archive for: साधना

नैराश्यापासून सुटका – १९

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

तुमच्यामध्ये शक्ती व शांती अवतरित होत आहेत आणि तुमच्यामध्ये स्थिरावण्यासाठी त्या अधिकाधिक कार्य करत आहेत, असे स्पष्ट दिसत आहे. उदास राहावेसे वाटणे, आनंदी असण्याची भीती वाटणे यांसारख्या भावना, तसेच आपण अक्षम आहोत किंवा अपात्र आहोत अशा सूचना ही प्राणिक रचनेची (vital formation) नेहमीचीच आंदोलने असतात, पण ती आंदोलने म्हणजे तुम्ही नाही (हे ओळखा.) ती तुम्हाला अजमावण्यासाठी किंवा तुमच्यामधील परिवर्तन रोखण्यासाठी निर्माण होत आहेत. या ज्या सूचना येत आहेत त्यांचा स्वीकार करण्यास नकार द्यायचा आणि तुम्हाला मुक्त व आनंदी करणाऱ्या तुमच्यामधील ‘सत्या’च्या बाजूने तुम्ही चिकाटीने उभे राहायचे, एवढेच तुम्हाला करायचे आहे. तसे केलेत तर सारे काही ठीक होईल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 180)

नैराश्यापासून सुटका – १८

 

(श्रीअरविंद लिखित एका पत्रामधून…)

तुमच्या प्राणामधील जो भाग बंड करू इच्छित आहे त्याच्याकडे, त्या बंडाचे समर्थन करण्यासारखी खरंतर कोणतीही कारणं नाहीयेत; त्यामुळे तो अडचणीत सापडल्याची किंवा अपेक्षाभंगाची तीव्र वेदना यांपैकी कोणत्यातरी एका मनोदशेला (mood) कवटाळून बसला आहे. प्राणामधील हा भाग अस्वस्थ, इच्छा-वासनामय, उतावळ्या, उदासीन, चंचल अशा सर्व प्रकारच्या मानवी प्रकृतीमधील एक घटक असतो. त्यापासून स्वतःला वेगळे करा आणि त्याला तुम्ही, तुमच्यावर शासन करण्याची किंवा तुम्हाला संचालित करण्याची मुभा देऊ नका.

प्राणाचा एक सुयोग्य भाग देखील असतो. तो उत्कट असतो, उच्चतर गोष्टींबाबत तो संवेदनशील असतो, त्याच्याकडे महान प्रेमाची आणि भक्तीची क्षमता असते. त्याचा उपयोग केलाच पाहिजे. प्राणाच्या त्या भागाला सामर्थ्यवान बनवा. अंतरात्म्याचा आणि वरून येणाऱ्या शांतीचा व विशालतेचा त्याला आधार द्या.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 142)

नैराश्यापासून सुटका – १७

 

प्राण सहसा परिवर्तनाच्या हाकेला प्रतिरोध करण्याचा प्रयत्न करतो, हाच बंडखोरी किंवा प्रतिकार याचा अर्थ आहे. आंतरिक इच्छेने आग्रह धरला आणि बंडखोरीला किंवा प्रतिकाराला प्रतिबंध केला तर, प्राणिक अनिच्छा बरेचदा नैराश्याचे आणि खिन्नतेचे रूप धारण करते. आणि जे शारीर-मन (physical mind) जुन्या कल्पना, सवयी, गतीविधी किंवा कृती यांच्या पुनरावृत्तीला आधार पुरवत असते त्याच शारीर-मनामधील प्रतिरोधाची साथ त्या अनिच्छेला मिळते. परिवर्तनाच्या हाकेला प्रतिसाद देण्याच्या भीतीमुळे किंवा आशंकेमुळे जेव्हा शारीर-चेतना (body consciousness) त्रस्त झालेली असते, तेव्हा ती त्या परिवर्तनाच्या हाकेपासून मागे सरकते किंवा मग तिच्यामध्ये एक प्रकारचा मंदपणा येतो, आणि ती त्या परिवर्तनाच्या हाकेचा स्वीकार करत नाही.

या गोष्टींपासून तुम्ही स्वतःची सुटका करून घेतलीच पाहिजे. पण त्यासाठी, दुःखी किंवा खिन्न मनोदशा ही योग्य परिस्थिती नव्हे. दुःख, वेदना आणि आशंका, काळजी या सर्व भावनांपासून तुम्ही अलिप्त झाला पाहिजे, त्यांना नकार दिला पाहिजे आणि होणाऱ्या प्रतिरोधाकडे शांतपणे पाहिले पाहिजे. त्याचवेळी, तुमच्यामध्ये असलेल्या परिवर्तनाच्या संकल्पाला नेहमी बळकटी देत राहिले पाहिजे. ईश्वरी साहाय्य लाभल्यामुळे, त्या ईश्वरी साहाय्याद्वारे आज ना उद्या परिवर्तन घडून येईलच आणि त्यामध्ये अपयश येणारच नाही यावर भर दिला पाहिजे. तेव्हा मग, साऱ्या अडचणींवर मात करू शकेल असे सामर्थ्य तुमच्यामध्ये येईल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 141)

नैराश्यापासून सुटका – १४

 

उद्वेग, असंतोष यांसारख्या भावावेगांना सावधपणे नकार द्या. अन्यथा त्यातून पुन्हा गोंधळ आणि नैराश्य निर्माण होते. हे भावावेग येण्यापूर्वीच त्यांना परतवून लावणे व्यक्तीला प्रत्येक वेळी जमेलच असे नाही, मात्र मनात ते भावावेग निर्माण झाल्याबरोबर लगेचच व्यक्ती ते काढून टाकू शकते. ते जितके जास्त नाकारले जातील, तितके त्यांचे पुन्हा पुन्हा येणे अवघड होत जाईल. किंवा जर ते भावावेग उत्पन्न झालेच तर, ते अगदी क्षणिक काळासाठीच तुमचा ताबा घेतील आणि नंतर नाहीसे होतील. त्यांना थारा देणे म्हणजे पुन्हा एकदा त्यांना खरी चेतना झाकोळू देण्याची संधी देण्यासारखे होईल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 187)

नैराश्यापासून सुटका – १३

 

(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

तुम्ही इतके अस्वस्थ व्हावे एवढे काही ते कारण मोठे नव्हते. खरंतर, ते कारण अगदीच किरकोळ होते. अर्ध्याकच्च्या आणि अवाजवी भावविवशतेची हीच मोठी अडचण असते. अगदी क्षुल्लक कारणामुळे, तुमच्यामधील ही भावविवशता उफाळून वर आली. साधकांमध्ये आढळून येणाऱ्या चिवट अशा अडथळ्यांपैकी ‘भावविवशता’ (sensitiveness) हा एक सर्वात मोठा अडथळा आहे.

त्यावर दोन उपाय आहेत. पहिला उपाय हा की, ‘श्रीमाताजीं‌’बद्दल आंतरात्मिक विश्वा स असला पाहिजे आणि त्याच्या जोडीला समर्पण असले पाहिजे; म्हणजे, “श्रीमाताजींची जी इच्छा असेल ती माझ्यासाठी सर्वेात्तमच असेल,” असा समर्पणाचा भाव असला पाहिजे.

आणि दुसरा उपाय म्हणजे, आत्ता तुमच्या अनुभवास येत असलेली विशालता! ही विशालता (wideness) खऱ्या आत्म्याची असते, तसेच ती खऱ्या मानसिक, प्राणिक आणि शारीरिक अस्तित्वाचीसुद्धा असते. त्यांपासून (भावविवशता, अस्वस्थता) या गोष्टी एखाद्या धुळीकणाप्रमाणे खाली पडतात. कारण या गोष्टींना त्यांच्या लेखी काही महत्त्वच नसते. तुम्ही एक गोष्ट केली पाहिजे आणि ती म्हणजे, या विशालतेमध्ये, शांतीमध्ये आणि निश्चल-निरवतेमध्ये नित्य वास्तव्य केले पाहिजे आणि त्यामध्ये तुमचा अहंकार विरघळून गेला पाहिजे आणि आसक्ती नाहीशी झाली पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 211)

नैराश्यापासून सुटका – ११

 

(एका साधकाला प्राणाच्या असहकार्यामुळे साधनेमध्ये ज्या अडचणी येत आहेत, त्याबाबत श्रीअरविंद यांनी केलेले मार्गदर्शन…)

तुमच्या शारीर-व्यवस्थेमध्ये काहीशी तामसिकता किंवा सुस्ती येताना दिसते आहे. प्राण (vital) त्याच्या परिस्थितीवर किंवा त्याला जे काही प्राप्त झाले आहे त्याबाबत असमाधानी असेल तर, काहीवेळा असे घडून येते. “मी संतुष्ट नाही, त्यामुळे मी कोणत्याही गोष्टीत रस घेणार नाही आणि काहीही करण्यासाठी तुला मदत करणार नाही,” असे म्हणत, तो एक प्रकारे असहकार किंवा निष्क्रिय प्रतिकार करायला सुरूवात करतो.

*

परिवर्तनाची जी हाक तुम्हाला आली आहे, त्याबद्दल तुमच्यामधीलच एखादा प्रतिरोध करणारा भाग (पूर्ण नव्हे तर एखादा भागच) अजूनही असमाधानी आहे; त्यामुळे तुमच्यामध्ये ही चलबिचल, (अस्वस्थतेची) आंदोलने निर्माण होत आहेत. जेव्हा एखाद्या प्राणिक घटकाला परिवर्तनाची हाक दिली जाते किंवा त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी त्याला भाग पाडले जाते, मात्र तसा बदल करण्यास अद्यापि तो इच्छुक नसतो; आणि जेव्हा तो नाराज व असमाधानी असतो तेव्हा, प्रतिसाद न देण्याची किंवा सहकार्य न करण्याची प्राणाची प्रवृत्ती असते. तसेच प्राणिक जोम नसल्यामुळे शारीरिक घटक हा देखील निरस आणि संवेदनाहीन ठरतो. (परंतु) आंतरात्मिक दबावामुळे प्रतिरोधाचे हे उरलेसुरले अवशेषदेखील निघून जातील.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 139, 138)

नैराश्यापासून सुटका – १०

(साधनाभ्यासामध्ये प्राण सहकार्य करत नाहीये, हे असे का होत असावे अशी विचारणा एका साधकाने श्रीअरविंद यांच्यापाशी केली आहे. तेव्हा त्यांनी दिलेले हे उत्तर…)

तुमचा प्राण (vital) इच्छावासनांच्या कचाट्यात सापडला होता त्यामुळे आणि मानसिक इच्छाशक्तीद्वारे नियंत्रित न झाल्यामुळे, तो आता अशा रितीने स्वत:च्याच तंत्राने वागू लागला आहे. जेव्हाजेव्हा त्याच्या इच्छावासना पूर्ण केल्या जात नाहीत तेव्हातेव्हा तो असाच आक्रस्ताळेपणा करत असतो. मानसिक इच्छाशक्तीकडून जेव्हा प्राणावर नियंत्रण ठेवले जात नाही आणि त्याला त्याच्या जागी ठेवले जात नाही तेव्हा, दिसून येणारी मनुष्याच्या प्राणाची ही सार्वत्रिक प्रतिक्रिया असते.
*
पुढील दोन प्रकारच्या परिस्थितीमध्ये प्राण सहकार्य करत नाही.
१) जेव्हा त्याच्या सामान्य अहंनिष्ठ कृतींना किंवा त्या कृतीमागील हेतुंना वाव दिला जात नाही तेव्हा प्राण सहकार्य करत नाही.
२) जेव्हा व्यक्ती अगदी शारीर स्तरापर्यंत खाली उतरते आणि जोपर्यंत वरची ‘शक्ती‌’ तिथे कार्यकारी नसते तोपर्यंत, प्राण कधीकधी किंवा काही काळासाठी सुस्त होऊन जातो.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 138, 138-139)

नैराश्यापासून सुटका – ०६

आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये सामर्थ्याला (strength) निश्चितच एक मूल्य असते, पण आध्यात्मिक साक्षात्कार हा केवळ सामर्थ्यामुळेच होऊ शकतो आणि तो अन्य कोणत्याच मार्गामुळे होऊ शकत नाही, असे म्हणणे ही खूपच अतिशयोक्ती ठरेल.

‘ईश्वरी कृपा’ ही काही एखादी काल्पनिक गोष्ट नाही, तर ती अनुभवास येणारी आध्यात्मिक वस्तुस्थिती आहे. विद्वान आणि सामर्थ्यवान व्यक्ती ज्यांना अगदी नगण्य समजतात अशा अनेक जणांना ‘ईश्वरी कृपे‌’मुळे आध्यात्मिक साक्षात्कार झालेला आहे. अशिक्षित असताना आणि कोणतीही मानसिक शक्ती किंवा प्रशिक्षण नसताना, व्यक्तित्वामध्ये (तुम्ही म्हणता तसे त्यांच्यापाशी) कोणतेही ‘सामर्थ्य’ नसताना किंवा संकल्पशक्ती नसताना देखील, त्यांनी (फक्त आणि फक्त) अभीप्साच बाळगली होती आणि त्यांना एकाएकी, अगदी अल्पावधीतच आध्यात्मिक साक्षात्कार झाला होता; कारण त्यांच्यापाशी श्रद्धा होती किंवा ते प्रामाणिक होते.

ही जी तथ्यं आहेत, ती आध्यात्मिक इतिहासातील तथ्यं आहेत आणि ती तथ्यं अगदी सार्वत्रिक आध्यात्मिक अनुभवाचा भाग आहेत. असे असूनही या गोष्टी काल्पनिक आहेत असे समजून, त्यांच्या बाबतीत एवढा उहापोह का केला जातो, त्यांच्या बाबतीत इतके युक्तिवाद का केले जातात, किंवा या गोष्टी नाकारल्या का जातात हेच मला कळत नाही.

सामर्थ्य, जर आध्यात्मिक असेल तर, त्यामध्ये आध्यात्मिक साक्षात्काराची शक्ती असते; (पण) त्याहूनही अधिक शक्ती प्रामाणिकपणामध्ये असते; आणि सर्वाधिक शक्ती ‘ईश्वरी कृपे‌’मध्ये असते. कितीही वेळ लागला आणि कितीही अडचणी आल्या तरी, एखादी व्यक्ती जर प्रामाणिक असेल तर ती या सगळ्यामधून पार होतेच, हे मी असंख्य वेळा सांगितले आहे. मी अनेकवेळा ईश्वरी कृपे‌विषयीदेखील बोललो आहे. “शोक करू नकोस; मी तुला सर्व पापांमधून आणि अनिष्ट गोष्टींपासून मुक्त करेन,” (अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्ष्ययिष्यामि मा शुच:) हे ‘गीते‌’मधील वचन मी अनेकवेळा उद्धृत केले आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 172)

नैराश्यापासून सुटका – ०३

(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

एखादी अशी गोष्ट की, जी अद्यापि आविष्कृत किंवा साध्य झालेली नाही, किंवा जी अद्यापि प्रत्यक्षात उतरलेली नाही; परंतु ती सत्य आहे आणि अनुसरण्यास किंवा साध्य करून घेण्यास परमयोग्य आहे याची जाणीव आपल्या अंतरंगात वसणाऱ्या ‘ज्ञात्या‌’ला असते. अगदी कोणतेही संकेत मिळालेले नसतानासुद्धा ज्ञात्याला तशी जाणीव असते. त्या गोष्टीबाबत असणारे आत्म्याचे साक्षित्व म्हणजे श्रद्धा! मनामध्ये जरी त्या गोष्टीबाबत अगदी ठाम विश्वास नसला किंवा प्राण जरी त्याबाबतीत झगडत असला, बंड करत असला किंवा त्या गोष्टीस नकार देत असला तरीसुद्धा आपल्या अंतरंगातील ती गोष्ट तशीच टिकून राहू शकते.

योगसाधना करणाऱ्या प्रत्येकालाच कधी ना कधी निराशेच्या, अपयशाच्या, अविश्वासाच्या आणि अंधकाराच्या प्रदीर्घ कालावधीस सामोरे जावे लागलेले असते. परंतु त्याच्याठायी अशी एक गोष्ट असते की, जी त्याला आधार देते व त्यामुळे तो टिकून राहतो आणि स्वतःबाबत साशंकता असतानासुद्धा, तो मार्गक्रमण करत राहतो. कारण त्याच्या श्रद्धेला असे जाणवत असते, किंबहुना त्याला हे ज्ञात असते की, तो ज्याचे अनुसरण करत आहे ते आजही सत्यच आहे. ‘ईश्वर’ अस्तित्वात आहे आणि जिचे अनुसरण केले पाहिजे अशी ‘ईश्वर’ हीच एकमेव गोष्ट आहे, हे त्याला ज्ञात असते. त्या तुलनेत जीवनातील अन्य कोणतीच गोष्ट प्राप्त करून घेण्यायोग्य नाही, ही जिवामध्ये उपजत असणारी श्रद्धाच, योग‌मार्गामधील मूलभूत श्रद्धा असते.

तुमच्या पत्रावरून असे दिसून येते की, या चढत्यावाढत्या श्रद्धेमुळेच तुम्ही या योगा‌कडे वळला आहात आणि तुमच्यामधील ही श्रद्धा अजूनही मृत पावलेली नाही किंवा मंदावलेली नाही. (उलट) ती अधिक दृढ आणि स्थायी झालेली आहे. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीमध्ये ही श्रद्धा टिकून असते, तोपर्यंत ती व्यक्ती आध्यात्मिक जीवनासाठी पात्र असते. मी तर असेही म्हणेन की, त्या व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये कितीही अडथळे असले, तिची प्रकृती अडीअडचणी व नकारांनी अगदी कितीही ठासून भरलेली असली आणि अनेक वर्षे जरी त्या व्यक्तीला संघर्ष करावा लागलेला असला तरीसुद्धा, तिला आध्यात्मिक जीवनात यश मिळणार हे निश्चित!

– श्रीअरविंद (CWSA 29 : 93)

जीवन जगण्याचे शास्त्र – ३६

साधकासमोर ‘कर्माधिपती’ (Master of the work) स्वतःला अचानक प्रकट करत नाही. त्याची ‘शक्ती’ नेहमीच पडद्याआडून कार्य करत असते, आणि आपण जेव्हा कार्य-कर्ते असल्याचा अहंकार सोडून देतो तेव्हाच तो कर्माधिपती आविष्कृत होतो. आणि हा अहंकार-त्याग जितका अधिकाधिक परिपूर्ण होत जातो तेवढ्या प्रमाणात त्या कर्माधिपतीचे प्रत्यक्ष कार्य वाढीस लागते. जेव्हा त्याच्या ‘ईश्वरी शक्ती’प्रति असलेले आपले समर्पण हे निरपवाद, निःशेष होईल तेव्हाच त्याच्या असीम उपस्थितीमध्ये जीवन जगण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होईल.

– श्रीअरविंद (CWSA 23-24 : 243)