Tag Archive for: साधना

पूर्णयोगाचे अधिष्ठान – १०

ईश्वरी प्रभावाप्रत स्वत:ला खुले करणे हा पूर्णयोगाचा समग्र सिद्धान्त आहे. ईश्वरी प्रभाव तुमच्या ऊर्ध्वस्थित असतो आणि एकदा का तुम्ही त्याबाबत सचेत (conscious) होऊ शकलात तर मग, त्याने तुमच्यामध्ये प्रवेश करावा म्हणून तुम्ही केवळ त्याला आवाहन करायचे असते. तो ईश्वरी प्रभाव तुमच्या मनामध्ये, शरीरामध्ये शांतीच्या, प्रकाशाच्या, कार्यकारी शक्तीच्या रूपाने अवतरतो; आनंदरूपाने अवतरतो. ईश्वरी उपस्थिती म्हणून साकार किंवा निराकार रूपात तो अवतरतो. ही चेतना प्राप्त होण्यासाठी अगोदर व्यक्तीने श्रद्धा बाळगली पाहिजे आणि खुलेपणाची (opening) आस बाळगली पाहिजे.

अभीप्सा (aspiration), आवाहन (call), प्रार्थना (prayer) या सर्व गोष्टी म्हणजे एकाच गोष्टीची विविध रूपे असतात आणि या साऱ्याच गोष्टी सारख्याच प्रभावी असतात. यांपैकी, तुमच्यापाशी जी कोणती गोष्ट असते किंवा जी तुम्हाला अगदी सहजसोपी, स्वाभाविक वाटते त्या गोष्टीचा तुम्ही अवलंब करण्यास हरकत नाही.

दुसरा मार्ग एकाग्रतेचा. तुम्ही तुमची चेतना तुमच्या हृदयामध्ये एकाग्र करायची (काहीजण मस्तकामध्ये वा मस्तकाच्या वर एकाग्र करतात.) आणि अंत:करणामध्ये श्रीमाताजींचे ध्यान करायचे आणि तेथे त्यांना आवाहन करायचे.

व्यक्ती यांपैकी कोणत्याही गोष्टीचे अनुसरण करू शकते किंवा वेगवेगळ्या वेळी (आलटून-पालटून) या दोन्ही गोष्टी करू शकते. यापैकी जी गोष्ट तुम्हाला सहजस्वाभाविक वाटेल किंवा ज्या क्षणी तुम्ही जी गोष्ट करण्यासाठी प्रवृत्त व्हाल ती गोष्ट तुम्ही करावी.

विशेषत: सुरुवातीला एक गोष्ट आत्यंतिक निकडीची असते ती म्हणजे, मन निश्चल करायचे आणि ध्यानाच्या वेळी, साधनाबाह्य असे सारे विचार, स्पंदने हद्दपार करायची. अशा शांत मनामध्ये, अनुभूती येण्यासाठीची प्रगतिशील तयारी चालू होते.

परंतु हे सारे जरी एकदम जमले नाही तरी त्यामुळे तुम्ही अधीर, अस्वस्थ होता कामा नये. कारण मनामध्ये संपूर्ण निश्चलता येण्यासाठी बराच काळ लागतो; तुमच्या चेतनेची तयारी होईपर्यंत तुम्हाला वाटचाल करत राहावी लागते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 106)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ०९

प्रकाश, शांती, आनंद इ. गोष्टी सोबत घेऊन येणाऱ्या ‘दिव्य शक्ती’ला व्यक्तीने स्वत:मध्ये प्रवाहित होऊ देणे आणि तिला रूपांतरणाचे कार्य करू देणे, हे आत्म-उन्मुखतेचे (self-opening) उद्दिष्ट असते. अशा रितीने, व्यक्ती जेव्हा दिव्य शक्तीचे ग्रहण करते आणि ती शक्ती त्या व्यक्तीमध्ये कार्य करते आणि जेव्हा त्या कार्याचे परिणाम दिसू लागतात (भलेही मग, त्या व्यक्तीला त्या प्रक्रियेची जाणीव असो किंवा नसो) तेव्हा ती व्यक्ती खुली (open) आहे, असे म्हटले जाते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 106)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ०८

पूर्णयोगाच्या साधनेमध्ये, कोणतीही एकच एक अशी ठरावीक साचेबंद मानसिक शिकवण नसते किंवा ध्यानधारणेचे कोणते नेमून दिलेले प्रकार किंवा कोणत्या मंत्र-तंत्रादी गोष्टीदेखील नसतात.

तर अभीप्सेद्वारे आणि अंतर्मुख व ऊर्ध्वमुख अशा आत्म-एकाग्रतेद्वारे, आणि आपल्या ऊर्ध्वस्थित असणाऱ्या ‘दिव्य शक्ती’प्रत व तिच्या कार्याप्रत, तिच्या ‘दिव्य प्रभावा’प्रत स्वतःला उन्मुख केल्यामुळे, तसेच हृदयामध्ये असणाऱ्या ‘दिव्य अस्तित्वा’प्रत स्वतःला खुले केल्यामुळे ही साधना घडत जाते. तसेच या सर्वांना विरोधी असणाऱ्या सर्व गोष्टींना नकार देणेही या साधनेमध्ये अभिप्रेत असते.

श्रद्धा, अभीप्सा आणि समर्पण यांद्वारेच केवळ ही आत्म-उन्मुखता (self-opening) घडून येते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 20)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ०६

ज्यांच्या अंतरंगामध्ये ईश्वरासाठीची एक प्रामाणिक हाक आलेली असते, त्यांच्या मनाने किंवा प्राणाने कितीही विघ्ने निर्माण केली किंवा अशा व्यक्तींवर कितीही आघात झाले किंवा त्यांची प्रगती अगदी संथगतीने व वेदनादायक झाली; जरी ते काही काळासाठी मार्गच्युत झाले किंवा ते पथभ्रष्ट झाले तरी सरतेशेवटी चैत्य अस्तित्वच (psychic) नेहमी विजयी होते आणि ईश्वरी साहाय्य प्रभावी ठरल्याचे सिद्ध होते. त्यावर विश्वास ठेवा आणि चिकाटी बाळगा, मग ध्येय निश्चितपणे साध्य होईल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 29)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ०५

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

योग-चेतनेमध्ये भलेही तुमचा नुकताच प्रवेश झालेला असला तरी पण, एकदा का तो प्रवेश झाला की, सर्व काही करता येणे शक्य आहे, हे तुमच्या लक्षात येते. सुरुवात करणेच महत्त्वाचे असते. दिव्य शक्ती आणि दिव्य ऊर्जा तेथे असल्या की, अगदी प्रारंभसुद्धा पुरेसा असतो.

वास्तविक, यश हे बाह्य प्रकृतीच्या क्षमतेवर अवलंबून नसते तर, ते आंतरिक पुरुषावर (inner being) अवलंबून असते आणि आंतरिक पुरुषाला सर्व काही शक्य असते. मात्र व्यक्तीला आंतरिक पुरुषाशी संपर्क साधला आला पाहिजे आणि तिने बाह्य दृष्टिकोन व चेतना ही अंतरंगातून बदलली पाहिजे; हेच साधनेचे कार्य असते. प्रामाणिकपणा, अभीप्सा आणि सहनशीलता यामधून ते निश्चितपणे साधते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 31-32)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ०४

पूर्णयोगाची साधना करण्याची कोणाचीच योग्यता नसते, (असे जेव्हा मी म्हणालो तेव्हा) त्याचा अर्थ असा आहे की, कोणीही फक्त स्वत:च्या एकट्याच्या क्षमतेवर ही साधना करू शकत नाही. प्रश्न आहे तो, ती दिव्यशक्ती पूर्णत: प्राप्त करून घेण्यासाठी स्वत:ला घडविण्याचा!

ही साधना व्यक्ती केवळ स्वबळावर करू शकत नाही. जर व्यक्तीची सहमती व अभीप्सा असेल तर ती दिव्य शक्तीच ही साधना करून घेऊ शकते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 32)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ०२

योगाच्या ध्येयाप्रत पोहोचणे नेहमीच कठीण असते, पण पूर्णयोग हा इतर कोणत्याही योगांपेक्षा अधिक दुस्तर आहे. आणि ज्यांना या योगाची हाक आलेली आहे, ज्यांच्याजवळ प्रत्येक गोष्टीला व प्रत्येक जोखमीला तोंड देण्याची क्षमता, इच्छाशक्ती आहे, अगदी अपयशाचा धोका पत्करण्याचीदेखील ज्यांची तयारी आहे; आणि पूर्णपणे निःस्वार्थीपणा, इच्छाविरहितता व समर्पण यांजकडे प्रगत होण्याचा ज्यांचा संकल्प आहे अशा व्यक्तींसाठीच पूर्णयोग आहे.

*

(योगमार्गासाठी एखाद्या व्यक्तीची) तयारी असणे, याचा मला अभिप्रेत असलेला अर्थ ‘क्षमता’ असा नसून ‘इच्छाशक्ती’ असा आहे. सर्व अडचणींना तोंड देऊन, त्यावर मात करण्याची आंतरिक इच्छा जर व्यक्तीकडे असेल, तर या मार्गाचा अवलंब करता येईल; मग त्यासाठी किती काळ लागतो हे तितकेसे महत्त्वाचे नाही.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 27)

नैराश्यापासून सुटका – ४०

जीवन आणि त्यातील अडचणींना धीराने आणि खंबीरपणे तोंड देण्याचे धैर्य ज्याच्याकडे नाही, अशा व्यक्तीला साधनेमधील त्याहून अधिक खडतर अशा आंतरिक अडचणींमधून पार होणे शक्य होणार नाही. जीवन आणि त्याच्या अग्निपरीक्षा यांना शांत, अविचल मनाने, धीराने आणि ईश्वरी शक्ती‌वरील संपूर्ण विश्वासाने सामोरे जाता आले पाहिजे; हा पूर्णयोगाच्या साधनेमधील पहिला धडा आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 111)

नैराश्यापासून सुटका – ३९

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

अभीप्सा अधिक एकाग्र असेल तर साहजिकच प्रगती अधिक वेगाने होते. पण त्यामध्ये जर प्राणाचा त्याच्या इच्छावासनांसहित आणि शरीराचा त्याच्या गतकालीन सवयीच्या वृत्तींसहित शिरकाव झाला तर मात्र अडचण येते आणि तसा तो शिरकाव बहुतेक सर्वांमध्येच होतो. असा शिरकाव होतो तेव्हाच, अभीप्सेमध्ये अस्वाभाविकता निर्माण होते आणि साधनेमध्ये एक प्रकारचा कोरडेपणा येतो. असा कोरडेपणा हा साधनेतील सर्वश्रुत अडथळा आहे. परंतु व्यक्तीने निराश होता कामा नये; चिकाटी बाळगली पाहिजे. या कालावधीमध्येही व्यक्तीने जर दृढ इच्छा बाळगली तर (अस्वाभाविकता आणि कोरडेपणा) या गोष्टी निघून जातात आणि त्यानंतर अभीप्सेची एक महत्तर शक्ती व अनुभूती शक्य होते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 61)

नैराश्यापासून सुटका – ३८

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

आपल्याला काही किंमतच नाही अशी आत्म-अवमूल्यनाची (self-depreciation) अतिरंजित भावना, हताशपणा, असहाय्यता या भावना म्हणजे विरोधी शक्तींच्या सूचना असतात आणि त्या सूचनांचा व्यक्तीने कधीही स्वतःमध्ये शिरकाव होऊ देता कामा नये. तुम्ही ज्या दोषांबद्दल सांगत आहात ते दोष सर्व मानवी प्रकृतीमध्ये असतातच आणि प्रत्येकच साधकाचे बाह्यवर्ती अस्तित्व हे असे दोषयुक्त असते. त्या दोषांची जाणीव होणे ही गोष्ट रूपांतरणासाठी (transformation) आवश्यक असते, परंतु ते रूपांतरणाचे कार्य चैत्य पुरुषाला (psychic being) स्वाभाविक असे म्हणजे अविचल मनाने, ईश्वरा‌विषयीच्या श्रद्धेने व समर्पणाने आणि उच्चतर चेतनेबद्दलच्या प्रगाढ अभीप्सेने केले गेले पाहिजे.

बाह्यवर्ती अस्तित्वाचे (external being) रूपांतरण ही पूर्णयोगा‌मधील सर्वात कठीण गोष्ट आहे आणि त्यासाठी श्रद्धा, धीर, अविचलता आणि दृढ निश्चयाची आवश्यकता असते. नैराश्य वगैरे सर्व गोष्टी तुम्ही भिरकावून दिल्या पाहिजेत आणि योगमार्गावर स्थिरपणाने वाटचाल केली पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 207)