Tag Archive for: साधना

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

व्यक्तीमध्ये दिव्य शक्तीचे अवतरण हे सहसा, त्या व्यक्तीच्या प्रकृतीवर कार्य करण्यासाठी आणि हृदयामध्ये ईश्वरी उपस्थितीची जाणीव व्हावी या दृष्टीने व्यक्तीची तयारी करून घेण्यासाठी होत असते. जे अवतरित होणार आहे ते धारण करता यावे यासाठी आधी मानवी प्रकृतीमधील बऱ्याच गोष्टींमध्ये परिवर्तन होणे आवश्यक असते. व्यक्तीचे मन अक्षम असते; ते सीमित, मर्यादित असते. व्यक्तीच्या हृदयामध्ये आणि इतर घटकांमध्ये पुरेशी विशुद्धता नसते, त्यांच्यामध्ये एक प्रकारची अस्वस्थता असते. (यासारख्या अनेक गोष्टींमध्ये परिवर्तन होणे आवश्यक असते.) होणारे अवतरण धारण करण्यासाठी अविचल मन आणि विशुद्ध हृदय यांची आवश्यकता असते.

आणि म्हणूनच ‘क्ष’ या साधिकेला तिच्यामध्ये असलेली अस्वस्थता जाणवत आहे, तिला तिच्या अक्षमतेची जाणीव होत आहे. हा असा अनुभव बहुतेक सगळ्यांनाच येतो. तिला प्रगतीसाठी जर पुढची वाटचाल करायची असेल तर तिने तिच्या मानसिक व भावनिक अस्तित्वामध्ये स्थिरता, शांती, विशुद्धता इत्यादी गोष्टींची आस बाळगली पाहिजे आणि तिच्यामध्ये ज्या गोष्टींचे अवतरण होत आहे त्या गोष्टी स्थिरस्थावर होऊ दिल्या पाहिजेत.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 488)

(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

विचारी मनाच्या (thinking mind) माध्यमातून ईश्वरी शक्तीचे ग्रहण करणे शक्य होणार नाही असे तुम्हाला का वाटते? व्यक्ती ज्याप्रमाणे प्राणाद्वारे, भावनिक अस्तित्वाद्वारे, शरीराद्वारे ईश्वरी शक्तीचे ग्रहण करू शकते, तशीच ती विचारी मनाच्या माध्यमातूनसुद्धा शक्तीचे ग्रहण करू शकते. विचारी मनदेखील प्राण आणि शरीराइतकेच सक्षम असते. अस्तित्वाच्या इतर घटकांप्रमाणेच विचारी मनाचेसुद्धा रूपांतरण करण्याची आवश्यकता असते. त्यासाठी त्याला ईश्वरी शक्ती कशी ग्रहण करायची याचे प्रशिक्षण देण्याची आवश्यकता असते. ते दिले गेले नाही तर विचारी मनाचे रूपांतरण शक्य होणार नाही.

शरीराची तामसिकतेने झाकोळलेली, मूढ, बाधक असणारी चेतना ही जशी आध्यात्मिक अनुभवामधील अडथळा ठरते किंवा प्राणाची सुसंस्कारित न झालेली सामान्य कृती ही जशी अडथळा ठरते; अगदी त्याचप्रमाणे बुद्धीची अज्ञानग्रस्त कृती ही देखील आध्यात्मिक अनुभवामधील अडथळा ठरते. त्यामुळे साधकाला पुढील गोष्टींची जाणीव असली पाहिजे.

• पहिली गोष्ट म्हणजे त्याने मानसिक संकल्पना किंवा संस्कार किंवा बौद्धिक निष्कर्ष या गोष्टींना साक्षात्कार समजण्याची चूक करता कामा नये.

• दुसरी गोष्ट म्हणजे मनाची चंचलता, अस्वस्थता. त्यामुळे आंतरात्मिक (psychic) आणि आध्यात्मिक (spiritual) अनुभवाच्या उत्स्फूर्त अचूकतेमध्ये बाधा निर्माण होते. आणि त्यामुळे प्रकाशित करणाऱ्या खऱ्या ज्ञानाच्या अवतरणाला वावच दिला जात नाही किंवा मग, या ज्ञानाचा मानवी मानसिक स्तराला स्पर्श झाल्याबरोबर किंवा पूर्णपणे तो स्पर्श होण्याआधीच, त्या ज्ञानामध्ये विकार निर्माण होतो. (म्हणून या गोष्टी घडू नयेत यासाठी साधकाने खबरदारी घेतली पाहिजे.)

…बुद्धी जर समर्पित झाली; ती जर खुली, अविचल, ग्रहणशील झाली तर, ती प्रकाश ग्रहण करण्याचे माध्यम किंवा आध्यात्मिक अवस्थेच्या अनुभवाला व आंतरिक परिवर्तनाच्या पूर्णतेला साहाय्यक का बरे होऊ शकणार नाही?

– श्रीअरविंद (CWSA 31 : 13-14)

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

तुम्ही आध्यात्मिक साधनेच्या बाबतीत फक्त स्व-बळावर विसंबून राहायचे ठरविले तर तुम्ही काहीच करू शकणार नाही, हे अगदी खरे आहे. आणि म्हणूनच, तुम्ही स्वतःसाठी जे करू शकत नाही ते तुमच्यासाठी केले जावे यासाठी, तुम्ही ऊर्ध्वस्थित असणाऱ्या ईश्वरी शक्तीच्या संपर्कात आले पाहिजे. तुम्ही एकच गोष्ट केली पाहिजे आणि ती म्हणजे त्या ईश्वरी शक्तीला तुमच्यामध्ये कार्य करण्यास वाव दिला पाहिजे तसेच तुम्ही (विरोधी शक्तीची बाजू न घेता) ईश्वरी शक्तीच्या पक्षात राहिले पाहिजे. याचा अर्थ असा की, तुमची तिच्यावर श्रद्धा असली पाहिजे, तुम्ही तिच्यावर विसंबून राहिले पाहिजे. स्वतःला उगाचच कष्टविता कामा नये. तिचे अविचलपणे स्मरण करत राहिले पाहिजे, अविचलपणे तिला आवाहन केले पाहिजे आणि कोणत्याही प्रकारे विचलित न होता, तिला तुमच्यामध्ये तिचे कार्य करू दिले पाहिजे. तुम्ही जर असे केलेत तर, बाकी साऱ्या गोष्टी तुमच्यासाठी केल्या जातील. अर्थात सर्व गोष्टी एकदमच केल्या जातील असे नाही, कारण त्यापूर्वी मार्गातील बऱ्याच अडचणी दूर करणे आवश्यक असते; पण तरीही आवश्यक ते सारे काही सुस्थिरपणाने आणि चढत्या वाढत्या प्रमाणात केले जाईल, (याची खात्री बाळगा.)

– श्रीअरविंद (CWSA 29 : 188)

 

(मनुष्याने स्वत:ला उच्चतर चेतनेप्रत समर्पित करायचे हा माणसाच्या चिंताग्रस्ततेवरील एक उपाय आहे, असे श्रीमाताजींनी सांगितले. ते आपण आजवर विचारात घेतले. त्या विवेचनाचा हा संपादित केलेला अंतिम भाग आहे. विषय समजण्यास सोपा जावा या दृष्टीने मराठी भाषांतरामध्ये वाक्यांचा क्रम व मांडणी यामध्ये बदल केला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.)

सर्व आध्यात्मिक साधनापद्धतींचा प्रारंभ सर्व जबाबदाऱ्या उच्चतर तत्त्वावर सोपवून, त्याला समर्पित होण्याच्या आवश्यकतेपासून होते. अन्यथा शांती लाभणे अशक्य असते. ‘शांततावादी’ (quietist) पद्धत असे त्या साधनापद्धतींचे वर्णन करता येईल.

सर्व प्रकारच्या कृतींना नकार देत, अचल आंतरिक निश्चल-नीरवतेमध्ये बुडी घेण्यावर या शांततावादी पद्धती आधारलेल्या असतात. त्याचे अनुसरण करणाऱ्या व्यक्तींना अचानकपणे अशी जाणीव होते की, शांतीशिवाय कोणताच आंतरिक साक्षात्कार होणे शक्य नाही. आणि म्हणून अगदी स्वाभाविकपणे, त्यांच्या मनात असा विचार येतो की, कधीच न सुटणारे प्रश्न जोपर्यंत त्यांना भेडसावत आहेत आणि जोपर्यंत बाह्य अस्वस्थतेच्या परिस्थितीमध्ये त्यांना जीवन कंठावे लागत आहे, तोपर्यंत त्याना कधीच शांती लाभणे शक्य नाही.’ कारण ते प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक असणारे ज्ञानच त्यांच्यापाशी नाहीये. आणि म्हणून, शांती लाभावी यासाठी त्या शांततावादी साधनापद्धती सर्व प्रकारच्या जीवनाचा परित्याग करतात. (‘शांततावादी’ पद्धतीचे अनुसरण करणाऱ्या माणसांची विचारसरणी ही अशा प्रकारची असते.)

परंतु या अचल (immobile) व स्थिर शांतीपेक्षा (static peace) अधिक उच्च असणारी अशी आणखी एक स्थिती असते. मनुष्याला अशी एक चेतना प्रदान करण्यात आलेली आहे की, ज्यामुळे तो प्रगती करू शकतो, त्याला जे ज्ञात नाही ते तो शोधून काढू शकतो; तो जे अजूनपर्यंत होऊ शकलेला नाही त्यामध्ये तो विकसित होऊ शकतो. आणि हा जो विश्वास असतो तो, व्यक्तीने प्रगती करण्याची इच्छा कायम ठेवावी, सर्व प्रकारच्या चिंता व काळज्यांपासून मुक्त होऊन, फलिताची व परिणामांची कोणतीही काळजी न करता, प्रगतीसाठीचे प्रयत्न चालू ठेवावेत यासाठी पुरेसा असतो. शांततावादी पद्धतींपेक्षा एक पाऊल पुढे टाकणारी ही पद्धत आहे.

हे पुढचे पाऊल म्हणजे (जीवनाचा त्याग न करता, जीवनात राहून) प्रश्नांना सामोरे जाणे. ज्या परमशक्तीला सर्व काही ज्ञात आहे आणि जी तुम्हाला कार्यप्रवृत्त करू शकते, तिच्यावर संपूर्ण विश्वास ठेवून, त्या खात्रीनिशी आणि स्थिरचित्ताने प्रश्नांना सामोरे जायचे. आणि अशा वेळी व्यक्ती (शांततावादी पद्धतीप्रमाणे) कृती करण्याचे सोडून देत नाही तर ती आता, बलशाली आणि गतिशील असणाऱ्या उच्चतर शांतीमध्ये राहून कार्य करू शकते. ईश्वर आपल्याला जीवनामध्ये जो मदतीचा हात देतो त्याचा हा एक नवीन पैलू आहे; व्यक्तीमध्ये ईश्वरी शक्ती कार्यरत असल्याचे हे एक नवीन रूप आहे; किंबहुना आध्यात्मिक साक्षात्काराचा हा एक नवीनच आयाम आहे, असे म्हणता येईल.

– श्रीमाताजी (CWM 09 : 304-305)

(माणसाची चिंताग्रस्तता आणि त्यावरील उपाय याविषयी श्रीमाताजी मार्गदर्शन करत आहेत. त्यातील हा पुढचा भाग…)

आता यापुढे, मनुष्याचे पतन होऊन तो पुन्हा प्राण्याच्या पातळीवर खाली घसरेल आणि त्याने संपादन केलेली चेतना तो गमावून बसेल हे शक्य नाही. आणि म्हणून, त्याच्यापाशी एकच उपाय शिल्लक राहतो. तो ज्या दयनीय परिस्थितीत जीवन जगत आहे त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा आणि जेथे चिंतेची जागा विश्वासपूर्ण समर्पणाने घेतलेली असते व जेथे प्रकाशमान परिणतीची खात्री असते अशा एका उच्चतर स्थितीमध्ये उन्नत होण्याचा एकच मार्ग त्याच्यापाशी उरतो. चेतनेमध्ये (consciousness) परिवर्तन घडवून आणणे हाच तो मार्ग आहे.

खरे सांगायचे तर, ज्याची किल्लीच आपल्यापाशी नाही अशा गोष्टीसाठी आपण जबाबदार असणे, यासारखी दुसरी दयनीय अवस्था नाही. (तशी मनुष्याची अवस्था झाली आहे कारण चिंताग्रस्ततेचा) हा प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक असणारे असे एखादे मार्गदर्शक सूत्र मनुष्याच्या हाती नाही. प्राण्यांना कोणतेही प्रश्न पडत नाहीत, ते नुसते जगत असतात. ते उपजत प्रेरणेनुसार जीवन जगत असतात. ते त्यांच्या सामूहिक चेतनेवर विसंबून असतात, या चेतनेकडे उपजत ज्ञान असते. आणि ही सामूहिक चेतना प्राण्यांच्या व्यक्तिगत चेतनेपेक्षा अधिक उन्नत असते. पण ती स्वयंचलित, सहजस्वाभाविक असते. प्राण्याला कोणता एखादा संकल्प करण्याची किंवा तो प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता नसते. प्राणी सहजस्वाभाविकपणे वागत असतात आणि ते कोणतीही काळजी करत बसत नाहीत. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 09 : 304)

 

 

(मनुष्यप्राणी या सृष्टीमधील सर्वात दु:खी जीव असला तरी, त्याच्याकडे असलेल्या एका विशेष क्षमतेमुळे तो चिंतामुक्त होऊ शकतो, ती क्षमता कोणती ते श्रीमाताजी येथे सांगत आहेत…)

मनुष्यामध्ये उच्चतर स्तरावर आरोहण करण्याची आध्यात्मिक क्षमता आहे; त्यामुळे तो त्याच्यामध्ये असलेल्या प्राण्याच्या अचेतनेच्या जागी आध्यात्मिक अतिचेतना (super-consciousness) स्थापित करू शकतो. आणि या क्षमतेमुळे, स्वतःच्या अस्तित्वाचे प्रयोजन काय आहे आणि त्याने केलेल्या प्रयत्नांची परिणती कशामध्ये होणार आहे हे भविष्यवेधी दृष्टीने पाहण्याची क्षमता त्याच्यामध्ये आली आहे.

एवढेच नव्हे तर, त्याच्यामध्ये उच्चतर आध्यात्मिक शक्तीवर विचक्षण, स्वच्छ दृष्टीने (clear-sighted) विश्वास ठेवण्याची क्षमतादेखील निर्माण झाली आहे. त्या आध्यात्मिक शक्तीप्रत तो स्वतःच्या समग्र अस्तित्वानिशी समर्पित होऊ शकतो. तो स्वतःच्या जीवनाची आणि भविष्याची सर्व जबाबदारी त्या शक्तीवर सोपवून सर्व प्रकारच्या काळज्या, चिंता यांपासून मुक्त होऊ शकतो. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 09 : 303-304)

 

जीवनाचे खरे उद्दिष्ट काय हे जर व्यक्तीला जाणून घ्यायचे असेल तर, त्या व्यक्तीने अहंकारी असता कामा नये, तिने आपल्या परम उगमापासून विभक्त होऊन, स्व-मग्न होता कामा नये; तिने अहंभावाचे समूळ उच्चाटन केलेच पाहिजे आणि याचीच खरी आवश्यकता असते. तेव्हाच व्यक्तीला जीवनाचे खरे उद्दिष्ट काय आहे हे ज्ञात होऊ शकते. तिथपर्यंत पोहोचण्याचा हा एकमेव मार्ग आहे. एखाद्या निरूपयोगी वस्त्राप्रमाणे, व्यक्तीचा अहंभाव गळून पडला पाहिजे आणि यासाठी जे प्रयत्न करावे लागतात ते किती सार्थ आहेत हे त्यांच्या परिणामावरून लक्षात येते.

आणि मग व्यक्ती या मार्गावर एकाकी नसते. (मी या मार्गावर एकाकी, एकटी नाही असा) विश्वास जर व्यक्तीमध्ये असेल तर, तिला साहाय्य मिळत राहते. तुम्ही एक क्षणभर जरी ईश्वरी कृपे‌च्या संपर्कात आलात तर ती कृपा, तुम्हाला तिच्यासोबत घेऊन जाते, त्या मार्गावरून तुमची वाटचाल द्रुतगतीने घडवून आणते. त्वरा केली पाहिजे याची तुम्हाला आठवणसुद्धा राहत नाही इतक्या सहजस्वाभाविक रितीने ती ते सारे घडवून आणते. तुमचा क्षणभर जरी त्या ईश्वरी कृपे‌शी संपर्क आला असेल तर, ती गोष्ट विस्मरणात जाऊ नये यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. मग तेव्हा एखाद्या बालकाच्या निर्व्याज साधेपणाने, निष्पापपणाने म्हणजे ज्यामध्ये कोणतीही जटिलता नसते अशा निष्पापपणाने तुम्ही त्या ईश्वरी कृपे‌स आत्मदान करा आणि ईश्वरी कृपे‌नेच सारे काही करावे यासाठी तिच्याप्रत खुले व्हा.

प्रतिकार करणाऱ्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका, विरोधी गोष्टींवर विश्वास ठेवू नका. तुमच्यामध्ये एक सच्चा, खराखुरा विश्वास असला पाहिजे. ज्यामुळे तुम्ही कोणताही हिशोब न करता, कोणतीही सौदेबाजी (bargaining) न करता, स्वतःचे आत्मदान करण्यास प्रवूत्त होता असा विश्वास तुमच्या ठायी असला पाहिजे. विश्वास ठेवा. मग त्या विश्वासापोटी तुम्ही ईश्वराला असे म्हणता की, “मी ही गोष्ट तुझ्यावर सोपवितो आहे. माझ्यासाठी तेवढे करशील ना?” आणि हाच सर्वोत्तम मार्ग असतो.

– श्रीमाताजी (CWM 09 : 426-427)

 

 

निश्चल-नीरव हृदयामध्ये एक असा दीप तेवत असतो की, जो कधीच विझू शकणार नाही. ईश्वराला जाणणे आणि समग्रतया ईश्वर‌च होऊन जीवन जगणे यासाठी असलेली उत्कट अभीप्सा हाच तो अग्नी आहे.

– श्रीमाताजी (CWM 14 : 74)

(श्रीमाताजी येथे ‘श्रीऑरोबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन’ या श्रीअरविंद-आश्रमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. हे मार्गदर्शन आबालवृद्ध सर्वांनाच उपयुक्त ठरू शकेल.)

आपण इथे एका नूतन चेतनेच्या (अतिमानासिक चेतनेच्या) बहरासाठी आणि एका नवीन जीवनासाठी स्वतःला घडविण्यासाठी आलो आहोत. आणि म्हणूनच मी तुम्हाला म्हणजे, जे जे कोणी शिकू इच्छितात त्या सर्वांना सांगत आहे की, नेहमी अधिकाधिक आणि उत्तमात उत्तम असे शिकत राहा. म्हणजे एक दिवस तुम्ही त्या नूतन शक्तीप्रत स्वतःला खुले करण्यास सक्षम व्हाल आणि त्याद्वारे ती नूतन शक्ती या जडभौतिक स्तरावर आविष्कृत होण्याची शक्यता निर्माण होईल. त्यासाठी हा शारीरिक शिक्षणाचा कार्यक्रम आहे आणि तुम्हाला त्याचा विसर पडता कामा नये.

तुम्ही येथे का आहात याचे खरे कारण जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे; ती अशी की, आपल्याला शक्य तितके परिपूर्ण साधन व्हायचे आहे; ईश्वरी इच्छा या जगामध्ये अभिव्यक्त करण्याचे साधन आपल्याला व्हायचे आहे आणि साधनं जर परिपूर्ण व्हायची असतील तर त्यांची जोपासना केली पाहिजे; ती शिक्षित, प्रशिक्षित केली पाहिजेत; ती विकसित केली पाहिजेत. ती साधनं पडीक किंवा खडकाळ जमिनीसारखी ठेवता कामा नयेत. हिऱ्याला पैलू पाडल्यानंतरच त्याचे सौंदर्य खुलून दिसते. तुमच्याबाबतीतही अगदी तसेच आहे.

अतिमानसिक चेतनेच्या आविष्करणासाठी तुमचे शरीर हे एक परिपूर्ण साधन व्हावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्याची जोपासना केली पाहिजे. ते पीळदार बनविले पाहिजे, त्याच्यावर संस्करण केले पाहिजे; त्याच्यामध्ये ज्या उणिवा, कमतरता आहेत त्या भरून काढल्या पाहिजेत आणि त्याच्यामध्ये आधीपासूनच ज्या क्षमता आहेत त्या परिपूर्ण करत नेल्या पाहिजेत.

– श्रीमाताजी (CWM 12 : 72-73)

लहान मुलांना भीती का वाटते? कारण ती दुर्बल असतात. त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या मोठ्या माणसांपेक्षा शारीरिकदृष्ट्या ती दुर्बल असतात आणि सहसा ती प्राणिक व मानसिकदृष्ट्या देखील कमकुवत असतात. दुर्बलतेच्या भावनेतून भीती उद्भवते. तथापि, भीतीपासून सुटका करून घेण्याचा एक मार्ग असतो.

ईश्वरी कृपेवर श्रद्धा ठेवणे आणि सर्व प्रकारच्या परिस्थितींमध्ये तिने तुमचे संरक्षण करावे म्हणून तुम्ही तिच्यावर विसंबून असणे हा तो मार्ग होय. तुमच्या आत्म्याशी म्हणजे तुमच्या अस्तित्वाच्या सत्याशी असणारा संपर्क तुम्ही वाढवत नेलात तर आणि तुम्ही जो विचार कराल, तुम्ही जे काही बोलाल, तुम्ही जे काही कराल त्या सर्व गोष्टी म्हणजे अंतरंगात असणाऱ्या सत्याची अभिव्यक्ती ठरली पाहिजे असा प्रयत्न जर तुम्ही नेहमीच करत राहिलात तर, तुम्ही जसजसे मोठे होत जाल तसतसे तुम्ही या भीतीमधून बाहेर पडाल.

तुम्ही जेव्हा त्या सत्यामध्येच जाणीवपूर्वक निवास करू लागाल तेव्हा तुमच्या अस्तित्वाच्या कोणत्याही भागातून (शरीराने, प्राणाने किंवा मनाने) तुम्ही कोणत्याही गोष्टीला घाबरणार नाही. कारण तेव्हा तुम्ही या जगाचे संचालन करणाऱ्या वैश्विक सत्याशीच एकात्म पावलेले असाल.

श्रीमाताजी (CWM 12 : 125)