श्रीमाताजी आणि समीपता – १७
(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)
श्रीमाताजींचे प्रेम सदोदित असतेच आणि त्यांच्या प्रेमापुढे मानवी प्रकृतीच्या अपूर्णतांचा पाडावच लागू शकत नाही. एकच गोष्ट महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे, तुम्हाला ते प्रेम सदोदित मिळत असल्याची जाणीव असणे आवश्यक असते. तुमचा चैत्य पुरुष (psychic being) अग्रभागी येण्यासाठी ती गोष्ट आवश्यक असते कारण त्या चैत्य पुरुषाला त्याची जाण असते; मन, प्राण आणि शरीर हे घटक फक्त बाह्य वरवरच्या दृष्यांकडे पाहत असतात आणि ते त्या दृष्यांचा चुकीचा अर्थ लावतात. आणि असे होऊ नये म्हणून श्रीमाताजींची शक्ती कार्यरत असते.
जेव्हा जेव्हा तुमचा चैत्य पुरुष पृष्ठभागाजवळ आलेला होता तेव्हा तेव्हा तुम्हाला श्रीमाताजींच्या प्रेमाची आणि त्यांच्या समीपतेची जाणीव झाली होती. परंतु तुमच्या इतर भागांनाही तीच जाणीव होण्यासाठी, तसाच अनुभव येण्यासाठी त्या भागांचीही तयारी होणे आवश्यक असते आणि त्यासाठी वेळ लागतो. म्हणून धीर धरणे आवश्यक असते. साधनेमध्ये कितीही अडीअडचणी आल्या, दिरंगाई झाली तरी त्या सर्व गोष्टींमधून मार्ग काढत, श्रीमाताजी तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत आणि त्या तुम्हाला त्यांच्या परमधामी घेऊन जाणार आहेत याची खात्री बाळगणे आवश्यक असते.
– श्रीअरविंद (CWSA 32 : 481)