Tag Archive for: साधना

साधना, योग आणि रूपांतरण – ८६

(रूपांतरण करू इच्छिणाऱ्या साधकासाठी आपल्या आंतरिक प्रांतांविषयी सजग होणे कसे महत्त्वाचे असते हे आपण कालच्या भागात पाहिले.)

तुम्ही जर तुमच्या बाह्य ‘स्व’ शीच जखडून राहिलात, तुमच्या शारीर-मनाशी आणि त्याच्या क्षुल्लक हालचालींशी स्वतःला बांधून ठेवलेत, तर तुमची अभीप्सा कधीच प्रत्यक्षात उतरू शकणार नाही. बाह्य अस्तित्व हे आध्यात्मिक प्रेरणेचा स्रोत नसते, तर ते केवळ पडद्याआडून, अंतरंगामधून आलेल्या प्रेरणांचे अनुसरण करत असते. तुमच्यामधील आंतरिक चैत्य पुरुष हा भक्त आहे, तो आनंदाचा आणि (ईश्वराच्या) सायुज्याचा शोध घेत आहे. बाह्य प्रकृती जशी आहे तशीच तिला सोडून दिली तर ती जे कधीच करू शकली नसती ते परिपूर्णतेने करणे तिला, तो अडथळा मोडून पडल्यावर आणि अंतरात्मा अग्रस्थानी आल्यावर शक्य होते. कारण ज्या क्षणी अंतरात्मा प्रभावीपणे अग्रस्थानी येतो किंवा तो जेव्हा चेतना स्वतःमध्ये सबळपणे ओढून घेतो तेव्हापासून शांती, आनंद, मुक्तता, विशालता, प्रकाशाप्रति उन्मुखता, उच्चतर ज्ञान या गोष्टी स्वाभाविक, सहजस्फूर्त होण्यास सुरुवात होते; बऱ्याचदा त्यांचा उदय अगदी त्वरेने होतो. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 218)

साधना, योग आणि रूपांतरण – ८५

(चेतना अंतराभिमुख झाल्यावर साधकाला कोणकोणते अनुभव येतात हे कालच्या भागात आपण समजावून घेतले.)

साधकाने हे समजून घेतले पाहिजे की, हे अनुभव म्हणजे नुसत्या कल्पना नसतात किंवा स्वप्नं नसतात, तर त्या वास्तव घटना असतात. आणि जसे बऱ्याचदा घडते त्याप्रमाणे जरी त्या गोष्टी म्हणजे अगदी, नुसत्या मनोरचना असल्या, जरी त्या अगदी चुकीच्या किंवा दिशाभूल करणाऱ्या किंवा विरोधी प्रकृतीच्या असल्या तरीही त्यांच्यामध्ये रचनांची म्हणून त्यांची स्वतःची अशी एक शक्ती असते. आणि म्हणून त्या रचनांना नकार देण्यापूर्वी किंवा त्या नाहीशा करण्यापूर्वी ही गोष्ट लक्षात घेतली गेली पाहिजे.

प्रत्येक अनुभवाच्या मूल्यामध्ये जरी पुष्कळ फरक असला तरीही प्रत्येक आंतरिक अनुभव हा त्याच्या स्वतःच्या पद्धतीने पूर्णपणे खरा असतो, अंतरात्मा आणि आंतरिक स्तरांच्या वास्तविकतेच्या साहाय्याने तो खरा ठरतो. आपण फक्त शरीरानेच जीवन जगत असतो किंवा केवळ बाह्य मन आणि प्राण यांच्या साहाय्यानेच जीवन जगत असतो असा विचार करणे चूक आहे. आपण सदासर्वकाळ चेतनेच्या इतर स्तरांमध्ये राहत असतो, तेथे कृती करत असतो, तेथे इतरांना भेटत असतो आणि त्यांच्यावर क्रिया करत असतो आणि आपण तेथे जे काही करतो, अनुभवतो आणि विचार करतो, तेथे ज्या शक्ती आपण गोळा करतो, तेथे ज्या परिणामांची आपण तयारी करतो त्या सगळ्याचे आपल्याला ज्ञात नसलेले, अगणित परिणाम आपल्या बाह्य जीवनावर होत असतात, त्यांचे मोल अमाप असते. त्यापैकी सर्वच अनुभव (ते सर्व प्रांत ओलांडून आपल्यापर्यंत) येत नाहीत आणि ते जरी येथवर आलेच तर ते जडभौतिकामध्ये येताना वेगळाच रूपाकार धारण करतात. कधीकधी त्यांच्यामध्ये अगदी तंतोतंत साम्य असते परंतु हे अल्पस्वल्प साम्य हा आपल्या बाह्यवर्ती अस्तित्वाचा पाया असतो. आपण या भौतिक, शारीरिक जीवनामध्ये जे काही करतो, जे काही धारण करतो, जे बनतो त्याची तयारी आपल्या अंतरंगामध्ये पडद्यामागे सुरू असते. आणि म्हणूनच जो योग जीवनाचे रूपांतरण हे आपले ध्येय म्हणून डोळ्यासमोर ठेवतो त्या योगामध्ये, या प्रांतांमध्ये काय सुरू असते याविषयी जागरूक होणे, आणि आपली नियती निर्धारित करणाऱ्या, तसेच आपली आंतरिक आणि बाह्य वृद्धी किंवा विनाश निर्धारित करणाऱ्या गुप्त शक्तींची जाणीव होण्यासाठी, त्यांचे ज्ञान होण्यासाठी आणि त्यांच्याशी व्यवहार करण्यासाठी सक्षम होणे, आणि तेथे प्रभुत्व संपादन करणे या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. जे ईश्वराशी सायुज्यता संपादन करू इच्छितात त्यांच्यासाठी देखील या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतात, (कारण) त्यांच्याविना रूपांतरण अशक्य असते. (क्रमशः)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 217-218)

साधना, योग आणि रूपांतरण – ८४

(आरोहण आणि अवरोहण प्रक्रियेचे परिणाम काय घडून येतात हे कालच्या भागात आपण पाहिले.)

एकदा हे अवरोहण स्वाभाविक झाले की, श्रीमाताजींची ‘दिव्य शक्ती’ आणि त्यांची ‘ऊर्जा’ कार्य करू लागते, आणि आता ती केवळ वरून किंवा पडद्याआडूनच कार्य करते असे नव्हे तर ती खुद्द ‘आधारा’मध्येच सचेतरितीने कार्यरत होते आणि आधाराच्या अडीअडचणी, त्याच्या संभाव्यता या गोष्टी हाताळू लागते आणि ती ‘दिव्य शक्ती’च तुमची योगसाधना करू लागते.

आणि मग सरतेशेवटी, सीमा ओलांडण्याची वेळ येते. तेथे चेतना निद्रिस्त नसते किंवा तिच्यात घट झालेली नसते. कारण चेतना ही सदासर्वकाळ तेथे असतेच; फक्त आता ती चेतना बाह्यवर्ती आणि भौतिकातून निघून, बाह्यवर्ती गोष्टींना आपली द्वारे बंद करून घेते आणि अस्तित्वाचा भाग असणाऱ्या आंतरिक आत्म्यामध्ये आणि प्राणामध्ये प्रवेश करण्यासाठी काहीशी मागे सरकते. आणि तेथे चेतना अनेकानेक अनुभवांमधून प्रवास करते. यामधील काही अनुभव हे जागृतावस्थेमध्ये सुद्धा जाणवले पाहिजेत, आणि तसे ते जाणवू शकतात. कारण, आंतरिक अस्तित्व अग्रभागी येणे आणि आंतरिक अस्तित्वाची आणि प्रकृतीची जाणीव होण्यासाठी चेतनेने अंतरंगामध्ये प्रविष्ट होणे, या दोन्हीही प्रक्रिया आवश्यक असतात.

अनेक कारणांसाठी चेतनेची ही अंतराभिमुख प्रक्रिया अपरिहार्य असते. अभिव्यक्त होण्यासाठी अगदी अंशतः प्रयत्नशील असणारे आंतरिक अस्तित्व आणि बाह्य साधनभूत चेतना यांच्यामधला जो अडथळा आहे तो अडथळा मोडून पडण्यामध्ये किंवा किमान तो दूर होऊन, त्यातून पलीकडे जात येण्यामध्ये तिचा (अंतराभिमुख प्रक्रियेचा) प्रभाव दिसून येतो. त्यामुळे अनंत समृद्ध संभाव्यतेबाबत आणि अनुभूतीबाबत एक सचेत जाणीव भविष्यामध्ये निर्माण व्हावी आणि लोकं ज्याला चुकीने स्वतःचे संपूर्ण अस्तित्वच मानतात, त्या छोट्या, अगदी अंध आणि मर्यादित शारीरिक व्यक्तिमत्त्वाच्या पडद्याआड अलक्षितपणे पहुडलेल्या नवीन अस्तित्वाची आणि नव्या जीवनाची जाणीव (त्या लोकांना) भविष्यामध्ये निर्माण व्हावी यासाठी तिचा प्रभाव कृतिशील असतो. (चेतनेने) अंतराभिमुख होत घेतलेली बुडी आणि या आंतरिक जगतामधून पुन्हा जागृतावस्थेमध्ये येणे या दरम्यान गहनतर, संपूर्ण आणि समृद्ध असणाऱ्या जाणिवेचा प्रारंभ होतो आणि ती जाणीव निरंतर विस्तार पावू लागते. (क्रमशः)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 217)

साधना, योग आणि रूपांतरण – ८३

(साधकाला चेतनेच्या आरोहणाचा आणि अवरोहणाचा अनुभव कसा प्रतीत होतो, हे कालच्या भागात आपण पाहिले.)

आरोहण प्रक्रियेचे (ascension) विविध परिणाम आढळून येतात. ही प्रक्रिया चेतनेला मुक्त करू शकते त्यामुळे तुम्ही शरीरामध्ये बंदिस्त नाही किंवा शरीराच्या वर आहात असा अनुभव तुम्हाला येतो, किंवा तुम्ही शरीरासह इतके विशाल होता की जणूकाही तुमचे शारीर-अस्तित्व उरतच नाही. किंवा तुम्ही म्हणजे तुमच्या मुक्त विशालतेमधील केवळ एक बिंदू आहात असा तो अनुभव असतो. त्यामुळे व्यक्तीला किंवा तिच्या एखाद्या घटकाला शरीरातून बाहेर पडता येते आणि तो घटक इतरत्र जाऊ शकतो. शरीरातून बाहेर पडून इतरत्र जाण्याच्या या कृतीसोबतच सहसा एक प्रकारच्या आंशिक समाधीची अन्यथा संपूर्ण योगतंद्रीची अवस्था येते. किंवा त्यामुळे चेतना सशक्त होऊ शकते. आता ती चेतना शरीरापुरतीच किंवा बाह्यवर्ती प्रकृतीच्या सवयींपुरतीच मर्यादित राहत नाही. त्याची परिणती चेतना अंतरंगामध्ये शिरण्यामध्ये, आंतरिक मानसिक गहनतांमध्ये प्रवेश करण्यामध्ये, तसेच चेतना आतंरिक प्राणामध्ये, आंतरिक सूक्ष्म देहामध्ये, अंतरात्म्यामध्ये प्रवेश करण्यामध्ये होते. त्यामुळे व्यक्ती स्वतःच्या अगदी आंतरतम चैत्य अस्तित्वाविषयी किंवा आंतरिक मानसिक, प्राणिक आणि सूक्ष्म शारीर अस्तित्वाविषयी सजग होते. त्यामुळे व्यक्ती प्रकृतीच्या घटकांशी संबंधित असणाऱ्या त्या त्या क्षेत्रांमध्ये, त्या स्तरांमध्ये, त्या जगतांमध्ये वास्तव्य करण्यास आणि तेथे वावरण्यास सक्षम होते.

कनिष्ठ चेतनेच्या या पुनःपुन्हा आणि नित्य होणाऱ्या आरोहणामुळे मन, प्राण आणि शरीर हे घटक अतिमानसिक स्तरापर्यंतच्या उच्चतर स्तरांच्या संपर्कात येण्यासाठी सक्षम होतात आणि त्या उच्चतर स्तरांच्या प्रकाशामुळे, त्यांच्या शक्तीमुळे आणि त्यांच्या प्रभावामुळे भारित होतात. आणि पुनःपुन्हा व नित्य होणारे ‘दिव्य चेतने’चे आणि तिच्या ‘ऊर्जे’चे हे अवरोहण हेच समग्र अस्तित्वाच्या आणि समग्र प्रकृतीच्या रूपांतरणाचे साधन असते. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 216)

साधना, योग आणि रूपांतरण – ८२

(बाह्यवर्ती चेतना आणि आंतरिक अस्तित्व यांमधील आवरण भेदण्याच्या प्रक्रियेसंबंधी आपण कालच्या भागात माहिती घेतली.)

ही आंतरिक प्रक्रिया अनेक प्रकारे घडू शकते. आणि संपूर्णपणे बुडी घेण्याच्या ज्या सर्व खुणा असतात त्या सर्व एकत्रितपणे आढळून येतील असा एक व्यामिश्र अनुभवदेखील कधीकधी येऊ शकतो. आपण कोठेतरी आतमध्ये जात आहोत किंवा खूप खोलवर जात आहोत अशी एक संवेदना त्यामध्ये असते. आंतरिक गहनतेच्या दिशेने प्रवास चालू असल्याची जाणीव असते; आणि बरेचदा एक स्थिरतेची, सुखद सुन्नतेची (numbness), आणि हातपाय जड झाल्याची जाणीव असते. वरून येणाऱ्या शक्तीच्या दबावामुळे चेतना, शरीरामधून निघून अंतरंगामध्ये वळत असल्याची ती खूण असते. त्या दबावामुळे शरीर हे आंतरिक जीवनासाठी (आवश्यक असणाऱ्या) एका अचल आधाराचे रूप घेते किंवा एक प्रकारच्या सुदृढ आणि स्थिर उत्स्फूर्त आसनाच्या स्थितीमध्ये येते. लाटा खालून वर डोक्यापर्यंत उसळत आहेत अशा प्रकारची एक जाणीव असते, आणि त्यामुळे बाह्यवर्ती चेतना आणि आंतरिक जागृतीचा अनुभव येतो.

आधारामधील (मन, प्राण, शरीर यातील) कनिष्ठ चेतना वर असणाऱ्या उच्चतर चेतनेस भेटण्यासाठी आरोहण (ascend) करत असते. तांत्रिक मार्गामध्ये ज्यावर खूप भर दिला जातो त्या कुंडलिनी जागृतीच्या प्रक्रियेशी ही प्रक्रिया मिळतीजुळती असते. कुंडलिनी शक्ती शरीरामध्ये वेटोळे घातलेल्या स्थितीत सुप्त असते आणि ती मज्जारज्जूद्वारे आरोहण करत जाते आणि चक्रांच्या माध्यमातून ब्रह्मरंध्राच्याही वर स्थित असणाऱ्या ‘ईश्वरा’ला भेटण्यासाठी ब्रह्मरंध्रापर्यंत जाते, या प्रक्रियेशी तो अनुभव समकक्ष असतो. आमच्या पूर्णयोगामध्ये, ही काही विशेष अशी प्रक्रिया नसते, तर समग्र कनिष्ठ चेतना ही कधी प्रवाहांच्या रूपात तर कधी लाटांच्या रूपात उत्स्फूर्तपणे वर उसळी मारत असते, तर कधीकधी ही प्रक्रिया कमी सघन असते. आणि दुसऱ्या बाजूने, ‘ईश्वरी चेतना’ आणि तिच्या ‘शक्ती’चे शरीरामध्ये अवरोहण (descent) होत असते. स्थिरता आणि शांती, ऊर्जा आणि शक्ती, प्रकाश, मोद आणि आनंद, व्यापकता आणि मुक्तता, आणि ज्ञान या गोष्टी जणू शरीरामध्ये वरून ओतल्या जात आहेत असा तो अवरोहणाचा अनुभव असतो. ‘ईश्वरी अस्तित्वा’चा किंवा ‘उपस्थिती’चा अनुभव येतो. कधीकधी यापैकी एखादा तर कधी त्यातील बरेचसे किंवा कधीकधी तर सर्वच एकत्रितपणे, असा अनुभव येतो. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 215-216)

साधना, योग आणि रूपांतरण – ८१

आंतरिक पुरुष आणि बाह्यवर्ती चेतना यांच्यातील आवरण भेदणे ही योगसाधनेमधील एक निर्णायक प्रक्रिया असते. ‘ईश्वरा’शी ऐक्य हा ‘योगा’चा अर्थ आहे, त्याचप्रमाणे, प्रथम तुमच्या आंतरिक आत्म्याप्रति आणि नंतर तुमच्या उच्चतर आत्म्याप्रति जागृत होणे, म्हणजे अंतर्मुख आणि ऊर्ध्वमुख होणे असा देखील ‘योगा’चा अर्थ आहे. वास्तविक, या जागृतीमुळे आणि आंतरिक पुरुष अग्रस्थानी आल्यामुळेच तुम्ही ‘ईश्वरा’शी एकत्व पावू शकता. बाह्यवर्ती भौतिक, शारीरिक मनुष्य म्हणजे केवळ एक साधनभूत व्यक्तिमत्त्व असते आणि ते स्वतःहून, या एकत्वापर्यंत जाऊन पोहोचू शकत नाही. त्याला केवळ कधीकधी घडणाऱ्या (ईश्वरी) संपर्कांचा, धार्मिक भावनांचा, अपूर्ण सूचनांचा अनुभव येऊ शकतो. आणि या गोष्टीसुद्धा बाह्यवर्ती चेतनेकडून येत नाहीत तर त्या आपल्या अंतरंगी जे आहे त्याच्याकडून येतात.

(आवरण भेदण्याच्या) दोन परस्परपूरक प्रक्रिया असतात. एका प्रक्रियेमध्ये आंतरिक पुरुष अग्रभागी येतो आणि त्याच्या स्वतःच्या स्वाभाविक गतिविधींचा ठसा बाह्यवर्ती चेतनेवर उमटवितो; त्या गतिविधी बाह्यवर्ती चेतनेच्या दृष्टीने असाधारण आणि अस्वाभाविक असतात. बाह्यवर्ती चेतनेपासून स्वतःला आत ओढून, आंतरिक स्तरांमध्ये प्रविष्ट होणे, तुमच्या आंतरिक आत्म्याच्या जगतामध्ये प्रवेश करणे आणि तुमच्या अस्तित्वाच्या झाकलेल्या भागांबाबत जागृत होणे ही झाली दुसरी प्रक्रिया. एकदा का तुम्ही (अंतरंगामध्ये) अशी बुडी घेतलीत की मग, तुम्ही योगमय, आध्यात्मिक जीवनासाठी आहात अशी मोहोर तुमच्यावर उमटविली जाते आणि ती कशानेही पुसली जाऊ शकत नाही. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 215)

साधना, योग आणि रूपांतरण – ८०

अंतरंगामध्ये खूप खोलवर आणि दूर गेल्यावर सौख्य आणि शांती यांचा अनुभव येतो कारण या गोष्टी अंतरात्म्यामध्ये (psychic) असतात आणि अंतरात्मा हा आपल्या अंतरंगामध्ये खूप खोलवर, मन आणि प्राण यांनी झाकलेला असतो. तुम्ही जेव्हा ध्यान करता तेव्हा तुम्ही या अंतरात्म्याप्रत खुले होता, उन्मुख होता, आणि तेव्हा तुम्हाला अंतरंगामध्ये खोलवर असणाऱ्या आंतरात्मिक चेतनेची जाणीव होते आणि मग तुम्हाला सौख्य, शांती या गोष्टी जाणवतात. सौख्य, शांती आणि आनंद या गोष्टी अधिक समर्थ व स्थिर व्हाव्यात आणि त्यांचा अनुभव तुमच्या सर्व व्यक्तित्वामध्ये, आणि अगदी शरीरामध्येदेखील यावा यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये अधिक खोलवर गेले पाहिजे आणि अंतरात्म्याची पूर्ण शक्ती शारीरिक अस्तित्वामध्ये आणली पाहिजे.

खऱ्या चेतनेसाठी अभीप्सा बाळगून, नियमित एकाग्रता आणि ध्यान केल्याने, हे सर्वाधिक सहजतेने शक्य होते. हे कर्माद्वारे, निष्ठेद्वारेसुद्धा शक्य होते; स्वतःसंबंधी विचार न करता, हृदयामध्ये श्रीमाताजींप्रति सातत्याने आत्मनिवेदन (consecration) करत राहण्याच्या संकल्पनेवर नेहमी लक्ष केंद्रित करून, ‘ईश्वरा’साठीच कर्म करत राहिल्यानेसुद्धा हे शक्य होते. परंतु हे परिपूर्णपणे सुयोग्य रीतीने करणे सोपे नसते.

*

‘ईश्वरा’च्या संपर्कात असण्यासाठी समाधीमध्येच असले पाहिजे असे नाही.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 299), (CWSA 30 : 250)

साधना, योग आणि रूपांतरण – ७९

साधक : बाह्यवर्ती घटकांमध्ये (मन, प्राण आणि शरीर) परिवर्तन होण्यासाठी आंतरिक साक्षात्कार आणि अनुभव यांचे साहाय्य होते का ?

श्रीमाताजी : साहाय्य झालेच पाहिजे असे काही आवश्यक नाही. त्यांचे साहाय्य व्हावे अशी तुमची इच्छा असेल तरच साहाय्य होईल. अन्यथा, व्यक्ती बाह्यवर्ती प्रकृतीपासून स्वतःला अधिकाधिक अलिप्त करत नेते. मुमुक्षू (मुक्तीची आस असलेल्या) लोकांबाबत नेहमीच असे घडत असते. बाह्य प्रकृती, तिचे स्वरूप आणि तिच्या सवयी या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्यामध्ये व्यक्तीने गुंतून पडता कामा नये अशा काहीतरी पूर्णपणे तिरस्करणीय गोष्टी आहेत, असे समजून ते त्या गोष्टी नाकारतात. त्यांच्या सर्व ऊर्जा, चेतनेच्या सर्व शक्ती (बाह्यवर्ती प्रकृतीमधून) काढून घेतात आणि उच्चतेप्रत वळवितात. आणि त्यांना हे जर पुरेशा पूर्णत्वाने साध्य करता आले तर सहसा ते कायमसाठी स्वतःच्या देहाचा त्याग करतात.

परंतु अशा उदाहरणांमध्ये, पुष्कळ वेळा असे आढळते की, ही गोष्ट ते आंशिकरितीनेच करतात आणि जेव्हा ते त्यांच्या ध्यानामधून, त्यांच्या निदिध्यासनामधून किंवा त्यांच्या समाधी अवस्थेमधून बाहेर येतात तेव्हा ते बहुधा इतरांपेक्षाही अधिक वाईट ठरतात कारण त्यांनी त्यांच्या बाह्यवर्ती प्रकृतीवर (परिवर्तनाचे) कोणतेही परिश्रम न घेता तिला आहे त्याच परिस्थितीत बाजूला सारलेले असते.

अगदी सामान्य माणसांच्या बाबतीत सुद्धा असे आढळते की, जर त्यांच्यातील दोष, दुर्गुण अगदी ठळकपणे नजरेत भरत असतील तर, जीवनामध्ये त्यामुळे फार त्रास होऊ नये म्हणून, ती माणसं त्या दोषांमध्ये सुधारणा करण्याचा किंवा त्यांच्यावर थोडे का होईना पण नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. (आणि या मुमुक्षू मंडळींच्या बाबतीत काय परिस्थिती असते?) व्यक्तीने आपले शरीर आणि आपली बाह्यवर्ती चेतना ही पूर्णपणे सोडली पाहिजे आणि संपूर्णपणे ”आध्यात्मिक उंची”प्रत स्वतःला नेले पाहिजे, हाच योग्य दृष्टिकोन आहे, अशी ज्यांची समजूत असते अशी माणसं शरीराला आणि बाह्यवर्ती प्रकृतीला एखादा जुना कपडा असावा त्याप्रमाणे टाकून देतात आणि त्यामध्ये सुधारणा करत नाहीत आणि मग जेव्हा तो कपडा पुन्हा वापरण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तो वापरण्याजोगा राहिलेला नसतो. त्याचा काहीही उपयोग होत नाही. परंतु परिवर्तन घडवावे अशी तुमच्यापाशी जर प्रामाणिक इच्छा असेल तरच आंतरिक अनुभव आणि साक्षात्कार यांचे साहाय्य होते.

तुमच्यापाशी परिवर्तन करण्याची प्रामाणिक इच्छा असेल तर मग मात्र त्याचे खूप साहाय्य होते कारण परिवर्तन घडवून आणण्यासाठी आवश्यक असणारी शक्ती त्यातून तुम्हाला मिळते, परिवर्तनासाठी आवश्यक असा आधार त्यातून तुम्हाला मिळतो. परंतु तुम्हाला परिवर्तन करण्याची खरोखरच प्रामाणिक इच्छा असली पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 04 : 348-349)

साधना, योग आणि रूपांतरण – ७८

साधक : समाधीमध्ये काही गोष्टी करणे सोपे जात असेल तर समाधी ही पूर्णयोगासाठीसुद्धा एक अतिशय चांगली अवस्था नाही का? काही महिन्यांपूर्वी मी जेव्हा समाधीसंबंधी बोललो होतो तेव्हा तुम्ही असे म्हटल्याचे मला स्मरते की, “समाधीची आवश्यकता नाही तर एका नवीन चेतनेची आवश्यकता आहे.”

श्रीअरविंद : निश्चितच (समाधी ही चांगली अवस्था आहे); समाधीला या योगामध्ये प्रतिबंध करण्यात आलेला नाही. श्रीमाताजी नेहमी समाधी-अवस्थेमध्ये प्रविष्ट होतात ही गोष्ट हा त्याचा पुरेसा पुरावा आहे. मी जेव्हा तुम्हाला तसे म्हणालो होतो तेव्हा ‘’समाधीची कधीच आवश्यकता नाही किंवा ती कधीच उपयुक्त नाही’’, अशा अर्थाचे ते सार्वत्रिक विधान नव्हते तर, ते विधान तुमच्या तेव्हाच्या गरजेला अनुसरून केलेले होते. (विशिष्ट परिस्थितीत, विशिष्ट संदर्भाने, विशिष्ट व्यक्तीला उद्देशून केलेली) विशिष्ट विधाने मनाद्वारे अनन्य आणि त्रिकालाबाधित नियमामध्ये परिवर्तित करू नयेत.

*

समाधी ही वर्ज्य करायला हवी अशी गोष्ट नाही पण ती अधिकाधिक चेतनायुक्त करणे आवश्यक असते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 41), (CWSA 30 : 250)

साधना, योग आणि रूपांतरण – ७७

[श्रीअरविंद येथे अवरोहण (descent) प्रक्रियेच्या संदर्भात काही सांगत आहेत.]

पूर्वीचे योग हे प्रामुख्याने अनुभवांच्या मनो-आध्यात्मिक अतींद्रिय श्रेणींपुरतेच मर्यादित असत. त्यामध्ये उच्चतर अनुभव हे स्थिर मनामध्ये किंवा एकाग्रचित्त हृदयामध्ये एक प्रकारे झिरपत येतात किंवा प्रतिबिंबित होतात. या अनुभवाचे क्षेत्र हे ब्रह्मरंध्रापासून खाली असते. साधक (ब्रह्मरंध्राच्या) वर फक्त समाधी अवस्थेमध्येच जात असत किंवा अचल मुक्तीच्या स्थितीमध्ये जात असत, पण त्यांना गतिशील अवरोहणाचा कोणताही अनुभव येत नसे. (मला) जे जे गतिशील अनुभव आले होते ते सर्व अनुभव, आध्यात्मिकीकरण झालेल्या मनाच्या आणि प्राणिक-शारीरिक (vital-physical) चेतनेच्या क्षेत्रामध्ये आले होते. (काही विशिष्ट मनो-आध्यात्मिक-अतींद्रिय अनुभवांद्वारे, साधकाच्या कनिष्ठ क्षेत्राची, प्रकृतीची पूर्वतयारी झाल्यानंतर), पूर्णयोगामध्ये चेतना ही ब्रह्मरंध्राच्या वर, मूलभूत आध्यात्मिक चेतनेशी संबंधित असणाऱ्या उच्चतर श्रेणींप्रत ऊर्ध्वाभिमुख केली जाते. आणि तेथून नुसते काही ग्रहण करण्याऐवजी, चेतनेने तिथे निवास करून, तेथून कनिष्ठ चेतना पूर्णपणे परिवर्तित करणे अपेक्षित असते. कारण आध्यात्मिक चेतनेला साजेशी गतिशीलता, क्रियाशक्ती (dynamism) तेथे असते. दिव्य ‘प्रकाश’, ‘ऊर्जा’, ‘आनंद’, ‘शांती’, ‘ज्ञान’ आणि अनंत ‘बृहत्व’ हे तिचे स्वरूप असते आणि त्यांचे समग्र अस्तित्वामध्ये अवरोहण झाले पाहिजे. आणि साधकाने या सर्व गोष्टी प्राप्त करून घेतल्या पाहिजेत. अन्यथा त्याला मुक्ती लाभू शकते (सापेक्ष मनो-आध्यात्मिक बदल घडू शकतो.) परंतु त्याला पूर्णत्व मिळत नाही किंवा त्याचे रूपांतरण होऊ शकत नाही.

परंतु मी जर तसे म्हटले तर, ‘प्राचीन संतमहात्म्यांना अवगत नसलेले ज्ञान माझ्यापाशी आहे,’ असा दावा मी करत आहे आणि मी संतमहात्म्यांच्या अतीत गेलो असल्याचे दाखवितो आहे, अशी लोकांची समजूत होईल आणि या अक्षम्य गृहितकाच्या विरोधात गदारोळ उठेल. या संदर्भात मी असे म्हणू शकतो की, उपनिषदांमध्ये (नेमकेपणाने सांगायचे तर तैत्तरिय उपनिषदामध्ये) या उच्चतर स्तरांचे व त्यांच्या स्वरूपाचे आणि समग्र चेतना एकवटण्याच्या व त्या स्तरांमध्ये आरोहण करण्याच्या शक्यतेचे काही संकेत मिळतात. परंतु कालांतराने हे ज्ञान विस्मृतीमध्ये गेले आणि बुद्धी हीच सर्वोच्च गोष्ट आहे, आणि तिच्या किंचित वर ‘पुरूष’ किंवा ‘आत्मा’ आहे असे लोकं म्हणू लागले. परंतु त्यांना या उच्चतर स्तरांची सुस्पष्ट कल्पना नव्हती. परिणामी, समाधी अवस्थेमध्ये संभवतः, अज्ञाताप्रति आणि अनिर्वचनीय स्वर्गीय प्रदेशांमध्ये आरोहण होण्याची शक्यता असे; पण अवरोहण शक्य होत नसे. आणि त्यामुळे तशी संसाधनेसुद्धा उपलब्ध नसत; त्यामुळेच येथे भौतिकामध्ये रूपांतरणाचीही कोणती शक्यताच नसे. केवळ या जीवनापासून सुटका आणि गोलोकामध्ये, ब्रह्मलोकामध्ये, शिवलोकामध्ये किंवा परब्रह्मामध्ये मुक्ती लाभत असे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 378-379)