Tag Archive for: साधना

पूर्णयोगाचे अधिष्ठान – २६

‘ईश्वरी कृपा’ आणि ‘ईश्वरी शक्ती’ (साधकाच्या बाबतीत) सर्व काही करू शकते, पण ते ती साधकाच्या पूर्ण सहमतीनेच (assent) करू शकते. अशी पूर्ण सहमती द्यायला शिकणे हाच साधनेचा समग्र अर्थ आहे. अशा सहमतीसाठी मनामधील कल्पना, प्राणामधील इच्छावासना किंवा शारीरिक चेतनेमधील जडत्वामुळे, तामसिकतेमुळे कदाचित वेळ लागेल परंतु, या गोष्टी दूर केल्याच पाहिजेत आणि ते शक्य असते. ईश्वरी शक्तीने कार्य करावे यासाठी तिला आवाहन केल्याने आणि ईश्वरी शक्तीच्या साहाय्याने त्या गोष्टी दूर करता येऊ शकतात.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 171)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – २५

विश्वाची समस्त लीला व्यक्तीच्या विशिष्ट अशा सापेक्ष मुक्त इच्छेवर आधारलेली आहे. ती मुक्त इच्छा साधनेमध्येसुद्धा शिल्लक असते आणि (म्हणूनच) व्यक्तीची सहमती ही प्रत्येक पावलागणिक आवश्यक असते. ईश्वराला समर्पित झाल्यामुळे व्यक्ती अज्ञान, विभक्तपणा आणि अहंकारापासून मुक्त होते परंतु त्यासाठी ते समर्पण प्रत्येक पावलागणिक ‘मुक्त समर्पण’ असणे आवश्यक असते. (मुक्त समर्पण म्हणजे समर्पित व्हायचे की नाही याचे स्वातंत्र्य व्यक्तीला असते.)

– श्रीअरविंद (CWSA 29 : 68)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – २४

साधकाकडून अभीप्सा, नकार आणि समर्पण (aspiration, rejection and surrender) या तीन गोष्टींबाबत प्रयत्नांची अपेक्षा असते. या गोष्टी जर साधकाने केल्या तर उर्वरित गोष्टी स्वतःहूनच श्रीमाताजींच्या कृपेमुळे आणि त्यांचे तुमच्यामध्ये जे कार्य चालू असते त्यामुळे घडून येतात. या तिन्हीपैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे ‘समर्पण’. विश्वास, भरवसा आणि अडीअडचणींमध्ये देखील धैर्य टिकवून ठेवणे हे या समर्पणाचे पहिले आवश्यक रूप असते.

अभीप्सा असेल तरच विश्वास आणि भरवसा असतो असा काही नियम नाही. उलट, अगदी अभीप्सा नसतानासुद्धा, जडत्वाच्या, तामासिकतेच्या दबावामुळे भरवसा, विश्वास आणि धैर्यसुद्धा टिकून राहू शकते. अभीप्सा झाकोळलेली असताना, जर विश्वास आणि धैर्य अपयशी ठरले तर, तेव्हा साधक स्वतःच्या प्रयत्नांवरच निर्भर आहे, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे असा साधक म्हणत असतो की, “अरेरे, माझी अभीप्सा असफल ठरली, तेव्हा आता मला आशेला काही जागाच नाही. माझी अभीप्साच जिथे कुचकामी ठरली, तेथे आता श्रीमाताजी तरी काय करू शकतील?”

पण याच्या उलट, साधकाला असे वाटले पाहिजे की, “काही हरकत नाही, माझी अभीप्सा पुन्हा पूर्ववत होईल. आत्ता जरी मला श्रीमाताजींची उपस्थिती जाणवत नसली तरीही त्या माझ्या सोबतच आहेत; त्या मला घनांधकारामधूनही पार घेऊन जातील.” हा अगदी पूर्णपणे सुयोग्य असा दृष्टिकोन तुम्ही बाळगला पाहिजे. ज्यांनी असा दृष्टिकोन अंगीकारलेला असतो त्यांच्यावर नैराश्याचादेखील काही परिणाम होऊ शकत नाही; पण समजा अगदी नैराश्य आलेच तर त्या नैराश्यालाच अपयशी होऊन परतावे लागते. हे काही ‘तामसिक समर्पण’ नव्हे.

पण “मी काहीच करणार नाही. श्रीमाताजींनीच सर्वकाही करावे; अगदी अभीप्सा, नकार, समर्पण या गोष्टीदेखील आवश्यक नाहीत. त्या गोष्टीसुद्धा त्यांनीच माझ्यामध्ये घडवून आणाव्यात,” असे जेव्हा व्यक्ती म्हणते, तेव्हा ते ‘तामसिक समर्पण’ असते. हा जो दृष्टिकोन असतो तो काहीही न करणाऱ्या कामचुकार माणसाचा असतो आणि दुसरा दृष्टिकोन असतो साधकाचा. या दोन दृष्टिकोनांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक असतो.

असा साधक जे जे सर्वोत्तम असते ते ते सारे काही करतो, परंतु जेव्हा गोष्टी प्रतिकूल असतात आणि साधक काही काळासाठी अक्रिय होतो तेव्हा असा साधक श्रीमाताजींच्या शक्तीवर विश्वास ठेवून असतो आणि (बऱ्यावाईट) साऱ्या गोष्टींमागे त्यांचीच उपस्थिती आहे असा विश्वास बाळगतो. त्याच्या या विश्वासामुळेच तो विरोधी शक्तीवर मात करतो आणि पुन्हा एकदा साधना करू लागतो.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 139-140)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – २२

साधनेच्या सुरुवातीच्या काळात प्रयत्न करणे अपरिहार्यच असते. सुरूवातीच्या काळात असे म्हणत असताना, अगदी थोड्या कालावधीसाठी असे मला म्हणायचे नाही; हे लक्षात घ्या. अर्थातच समर्पणसुद्धा आवश्यकच असते, पण समर्पण ही काही एका दिवसात घडून येणारी गोष्ट नाही. मनाच्या स्वतःच्या अशा काही कल्पना असतात आणि मन त्यांना चिकटून बसते. मानवी प्राण समर्पित होण्यास विरोध करतो, कारण सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये तो ज्याला ‘समर्पण’ असे संबोधत असतो ते म्हणजे एक प्रकारचे साशंकपणे केलेले आत्मदान असते आणि त्यासोबत एक मागणीदेखील असते. जडभौतिक चेतना ही जणू काही एखाद्या दगडासारखी असते आणि ती चेतना ज्याला ‘समर्पण’ असे संबोधते ते समर्पण म्हणजे बरेचदा जडत्व असते. समर्पण कसे करायचे हे केवळ चैत्य अस्तित्वालाच (psychic) माहीत असते आणि प्रारंभी हे चैत्य अस्तित्व सहसा बरेचसे झाकलेले असते. जेव्हा साधक चैत्य अस्तित्वाविषयी जागृत होतो तेव्हा ते संपूर्ण अस्तित्वाचे एकाएकी आणि खरेखुरे समर्पण घडवून आणू शकते, कारण उर्वरित भागांच्या अडचणी त्वरेने सोडविल्या जातात आणि त्या नाहीशा होतात. परंतु तोपर्यंत प्रयत्न हे अपरिहार्यच असतात.

अन्यथा, जोपर्यंत व्यक्तीमध्ये ‘दिव्य शक्ती‌’ (जल) प्रपाताप्रमाणे वरून खाली अवतरित होत नाही आणि त्या शक्तीकडून जोपर्यंत साधना हाती घेतली जात नाही, आणि व्यक्तीच्या व्यक्तिगत प्रयत्नांवर विसंबून न राहता, ती शक्ती जोपर्यंत स्वतःच अधिकाधिक साधना घडवून आणत नाही तोपर्यंत आणि अगदी तेव्हासुद्धा, म्हणजे ‘ईश्वरी शक्ती’कडून मन, इच्छा, प्राण आणि शरीर यांचा पूर्णपणे ताबा घेतला जात नाही तोपर्यंत तरी, अगदी प्रयत्न नाही तरी किमान, अभीप्सा आणि सतकर्ता या गोष्टी आवश्यकच असतात.

दुसऱ्या बाजूला असे काही लोक असतात की, जे संपूर्ण समर्पणाविषयीच्या एका खऱ्याखुऱ्या आणि कृतिशील इच्छेने आरंभ करतात. ज्या व्यक्तींवर चैत्य अस्तित्वाची किंवा सुस्पष्ट, प्रबुद्ध मानसिक इच्छेची सत्ता चालते त्यांनी ‘समर्पण हा साधनेचा नियम आहे’, ही गोष्ट एकदा का स्वीकारली की मग, ते त्याबाबतीत कोणताही उणे-अधिकपणा खपवून घेत नाहीत आणि अस्तित्वाच्या इतर घटकांनीदेखील चैत्य अस्तित्वाने दाखविलेल्या दिशेचेच अनुसरण केले पाहिजे, असा आग्रह ते धरतात. इथेसुद्धा प्रयत्न असतातच पण ते इतके सिद्ध आणि उत्स्फूर्त असतात आणि त्यांना त्यांच्या पाठीशी असणाऱ्या महत्तर शक्तीची इतकी ठाम जाणीव असते की, त्या साधकाला आपण काही सायास करत आहोत, प्रयत्न करत आहोत असे मुळी जाणवतच नाही.

उलट दुसऱ्या एखाद्या उदाहरणामध्ये, व्यक्तीला स्वतःच्या स्वतंत्र गतिविधी सोडून द्यायच्या नसतात आणि जेथे मन किंवा प्राण स्व-इच्छा टिकवून ठेवू इच्छित असतात अशा उदाहरणांबाबत पृष्ठवर्ती साधन आणि त्या साधनाच्या पाठीशी किंवा वर असणारे दिव्यत्व यांच्यामधील भिंत ढासळेपर्यंत संघर्ष आणि प्रयत्न क्रमप्राप्तच असतात. या बाबतीत निरपवादपणे सर्वांनाच लागू पडेल असा एकच एक नियम सांगता येणे अवघड आहे. मानवी प्रकृतीमध्ये इतकी प्रचंड विविधता आहे की, कोणत्याही एकाच परिणामकारक नियमामध्ये सारी मानवी प्रकृती बसविता येत नाही.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 83-84)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – २१

व्यक्ती ईश्वराप्रति जर विश्वासाने आणि खात्रीपूर्वक स्वत:स अर्पण करेल तर ईश्वराकडून व्यक्तीसाठी सारे काही केले जाईल. तिची आंतरिक चेतना जागृत केली जाईल, हृदय आणि प्रकृती शुद्ध केली जाईल, (आंतरिक व बाह्य चेतना यामधील तसेच कनिष्ठ चेतना व उच्चतर चेतना यामधील) पडदे हटवले जातील. व्यक्तीला हे आत्मार्पण जरी अगदी एकदम पूर्णत्वाने करता आले नाही तरी, व्यक्ती जेवढे ते अधिकाधिक प्रमाणात करेल, तेवढ्या अधिकाधिक प्रमाणात तिला आंतरिक साहाय्य व मार्गदर्शन मिळत राहील आणि अंतरंगामध्ये ईश्वराचा संपर्क व त्याची अनुभूती वाढत राहील. शंकेखोर मनाची लुडबुड कमी झाली आणि तुमच्यामध्ये विनम्रता व समर्पणाची इच्छा जर वाढीला लागली तर, हे घडून येणे निश्चितपणे शक्य आहे. तेव्हा मग त्यासाठी या व्यतिरिक्त, दुसऱ्या कोणत्याच तपस्येची आणि बळाची आवश्यकता उरणार नाही.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 69)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – २०

(आपण समर्पण म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते आणि आंतरिक समर्पण हा साधनेचा गाभा कसा असतो, हे अगोदरच्या दोन भागात समजावून घेतले. आता या भागात पूर्णयोगाचा मार्ग व इतर योग यातील फरक स्पष्ट केला आहे.)

समर्पण हाच साधनेचा एकमेव मार्ग आहे आणि अन्य कोणत्या मार्गाने साधना करताच येऊ शकत नाही, असे म्हणण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. व्यक्तीने ईश्वराप्रति पोहोचावे यासाठी अनेकानेक मार्ग उपलब्ध आहेत. मात्र मला ज्ञात असलेली ही अशी एकमेव साधना आहे की जिच्यामध्ये, प्रकृतीची तयारी होण्यापूर्वीच, ईश्वराकडून साधना हाती घेतली जाणे, ही गोष्ट एक संवेद्य (sensible) वास्तविकता बनते. इतर साधनापद्धतींमध्ये ईश्वरी कृती आणि तिचे साहाय्य हे वेळोवेळी जाणवू शकते पण बहुतांश वेळा, म्हणजे जोवर सर्व सिद्धता होत नाही तोपर्यंत ते साहाय्य पडद्याआडूनच मिळत राहते. मात्र काही साधनापद्धतींमध्ये सारे काही तपस्येद्वारेच करावे लागते. त्यामध्ये ईश्वरी कृती ग्राह्य मानली जात नाही. बहुतेक सर्व पद्धतींमध्ये या दोन्हींचे मिश्रण असते, तपस्या अंतिमतः ईश्वराच्या थेट साहाय्यासाठी आणि हस्तक्षेपासाठी आवाहन करते. ‘ईश्वरच सारे काही करत असतो‌’ ही संकल्पना आणि त्याची अनुभूती या गोष्टी समर्पणावर आधारित योगमार्गांमध्येच आढळतात.

मार्ग कोणताही अनुसरला, तरी एक गोष्ट करणे आवश्यकच असते आणि ती गोष्ट म्हणजे एकनिष्ठ असणे आणि लक्षपूर्तीपर्यंत वाटचाल करणे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 71)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – १९

(आपण मागच्या भागात आंतरिक व बाह्य समर्पण यातील फरक थोडक्यात समजावून घेतला. आज आता आंतरिक समर्पणाविषयी अधिक जाणून घेऊ या.)

ईश्वरावरील श्रद्धा आणि विश्वास या गोष्टी आंतरिक समर्पणाचा गाभा आहेत.

”मला दुसरेतिसरे काहीही नको, केवळ ईश्वरच हवा, असा दृष्टिकोन व्यक्ती अंगीकारते… मी ईश्वराला संपूर्णपणे समर्पित होऊ इच्छितो आणि ती माझ्या आत्म्याचीच मागणी असल्याने, इतर काहीही नको, तर फक्त तोच हवा. मी त्याला भेटेन, मी त्याचा साक्षात्कार करून घेईन. मी त्याव्यतिरिक्त इतर काहीही मागणार नाही. ज्यामुळे, मला त्याच्या सन्निध जाता येईल असे कार्य त्याने माझ्यामध्ये करावे; मग ते कार्य गुप्त असेल अथवा उघड असेल, ते पडद्याआडून असेल किंवा प्रकट असेल, ते कोणत्याही प्रकारचे असले तरी हरकत नाही. सर्व गोष्टी, मी म्हणतो त्या पद्धतीनेच आणि तेव्हाच घडायला हव्यात असा आग्रह मी धरणार नाही. त्याने त्याच्या त्याच्या वेळेनुसार व त्याच्या पद्धतीने सारे काही करावे. मी त्याच्यावर विश्वास ठेवेन. त्याची इच्छा प्रमाण मानेन, त्याच्या प्रकाशाची, त्याच्या उपस्थितीची, त्याच्या आनंदाची, अविचलपणे अभीप्सा बाळगेन. कितीही अडचणी आल्या, कितीही विलंब लागला तरी मी त्याच्यावर पूर्णपणे विसंबून राहीन आणि हा मार्ग कधीही सोडणार नाही. माझे मन शांत होऊ दे व त्या ईश्वराकडे वळू दे आणि त्याने माझे मन त्याच्या प्रकाशाप्रत खुले करू देत; माझा प्राण शांत होऊ दे आणि केवळ त्याच्याकडेच वळू दे, त्याने त्या प्राणाला त्याच्या शांतीप्रत आणि त्याच्या आनंदाप्रत खुले करू देत. सारे काही त्याच्यासाठीच आणि मी स्वतःसुद्धा त्याच्यासाठीच आहे. काहीही झाले तरी, मी ही अभीप्सा आणि आत्मदान दृढ ठेवीन आणि ते घडून येईलच अशा पूर्ण विश्वासाने वाटचाल करत राहीन.”

व्यक्तीने हा दृष्टिकोन चढत्यावाढत्या प्रमाणात बाळगला पाहिजे. कारण या गोष्टी एकदम एकाच वेळी परिपूर्ण होणे शक्य नसते; मानसिक व प्राणिक गतिविधी त्यांच्या आड येत राहतात. पण व्यक्ती जर वरीलप्रमाणे इच्छा बाळगेल, तर त्या गोष्टी व्यक्तीमध्ये वृद्धिंगत होत राहतील. उर्वरित गोष्टी या (ईश्वरी मार्गदर्शनाचे) आज्ञापालन करण्याचा भाग असतात; ईश्वरी मार्गदर्शन जेव्हा स्वतःला आविष्कृत करू लागते तेव्हा, व्यक्तीने स्वतःच्या मानसिक किंवा प्राणिक गतिविधींना त्यामध्ये लुडबूड करू न देता त्या मार्गदर्शनाचे पालन केले पाहिजे. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 29 : 70-71)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – १८

(श्रीअरविंद लिखित पत्रांमधून)

व्यक्तीला जर ‘ईश्वर’ हवा असेल तर, व्यक्तीच्या हृदयाची शुद्धिकरण प्रक्रियासुद्धा ईश्वरानेच हाती घ्यावी आणि त्यानेच साधना विकसित करावी आणि आवश्यक असे अनुभवही ईश्वरानेच त्या व्यक्तीला देऊ करावेत, ही जी तुमची ‘योगा‌’विषयीची आधीची कल्पना होती, त्याला अनुलक्षून उत्तर देताना, मी मागील पत्रात तसे लिहिले होते. असे होणे शक्य आहे आणि असे घडूनही येते. पण त्यासाठी त्या व्यक्तीचा ईश्वरावर विश्वास असला पाहिजे, भरवसा असला पाहिजे आणि (मुख्य म्हणजे) तिची समर्पणाची इच्छा असली पाहिजे. कारण, ईश्वराने सारे काही हाती घेण्यामध्ये, व्यक्तीने केवळ स्वतःच्या प्रयत्नांवर विसंबून न राहता, स्वतःला ईश्वराच्या हाती सोपविणे अंतर्भूत असते. यामध्ये व्यक्तीची सर्व श्रद्धा व विश्वास ईश्वरावरच असणे आणि तिने उत्तरोत्तर आत्मसमर्पण करत राहणे अभिप्रेत असते.

खरंतर, हेच साधनेचे मूलसूत्र आहे आणि तेच मी स्वतःही अनुसरलेले आहे. माझ्या दृष्टीने तरी, योगसाधनेचा हा गाभा आहे… पण सगळ्यांना हा मार्ग एकदमच अनुसरता येतो असे नाही. इथपर्यंत येऊन पोहोचण्यासाठी त्यांना वेळ लागतो. जेव्हा मन आणि प्राण शांत होतात तेव्हा मग हा मार्ग अधिक विकसित होतो. मी मन आणि प्राण यांच्या ‘आंतरिक समर्पणा‌’बद्दल सांगितले होते.

अर्थातच ‘बाह्य समर्पण‌’देखील (outer surrender) असते. व्यक्ती जर ईश्वराकडून थेट मार्गदर्शन प्राप्त करून घेण्याच्या योग्यतेला पोहोचली असेल तर मग, त्या मार्गदर्शनाचे पालन करणे अन्यथा चैत्य पुरूषाच्या किंवा गुरूच्या माध्यमातून व्यक्तीला जे मार्गदर्शन लाभत असेल, त्याचे पालन करणे आणि ज्या ज्या गोष्टी आत्म्याच्या विरोधात किंवा साधनेच्या दृष्टीने आवश्ययक असणाऱ्या गोष्टींच्या विरोधात असतील अशा सर्व गोष्टी सोडून देणे, अर्पण करणे या साऱ्या गोष्टींचा समावेश बाह्य समर्पणामध्ये होतो. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 29 : 70)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – १७

स्वतःला ईश्वराच्या हाती सोपवणे म्हणजे समर्पण. व्यक्तीने तिचे सर्व-स्व ईश्वरास अर्पण करणे; कोणतीही गोष्ट स्वत:ची आहे असे न समजणे; अन्य कोणाच्याही नव्हे तर, फक्त ‘ईश्वरी’ इच्छेचे अनुसरण करणे; अहंकारासाठी नव्हे तर, ईश्वरासाठी जीवन व्यतीत करणे म्हणजे समर्पण.

*

समर्पण हे परिपूर्तीचे साधन असते हाच पूर्णयोगाच्या साधनेचा पहिला सिद्धांत आहे. मात्र जोपर्यंत अहंकार किंवा प्राणिक मागण्या आणि इच्छावासना यांना खतपाणी घातले जाते तोपर्यंत संपूर्ण समर्पण अशक्य असते आणि तोवर आत्मदानदेखील अपूर्ण असते… समर्पण अवघड असू शकते, ते तसे असतेही परंतु तोच तर साधनेचा खरा सिद्धांत आहे. समर्पण अवघड असल्यामुळेच, (रूपांतरणाचे) कार्य पूर्ण होईपर्यंत ते स्थिरपणे आणि धीराने करत राहिले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 67,75-76)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – १६

साधकाची योगमार्गावर जी वाटचाल चालू असते त्या वाटचालीमध्ये अशी एक अवस्था येते की, ज्या अवस्थेमध्ये साधक त्याच्या अंतरंगामध्ये कार्यरत असणाऱ्या दिव्य शक्तीविषयी सचेत असतो किंवा किमानपक्षी, तो त्या कार्याच्या परिणामाविषयी तरी नक्कीच सचेत असतो. (आणि अशा रितीने सचेत झाल्यामुळे) तो आता तिच्या अवतरणामध्ये किंवा तिच्या कार्यामध्ये, स्वतःच्या मानसिक गतिविधींमुळे किंवा स्वतःच्या प्राणिक अस्वस्थतेमुळे किंवा शारीरिक जडतेमुळे व तमोमयतेमुळे अडथळे निर्माण करत नाही. यालाच ‘ईश्वराप्रति खुले असणे’ (openness to the Divine) असे म्हणतात.

ईश्वराप्रति खुले होण्याचा समर्पण (Surrender) हा सवोत्तम मार्ग आहे. पण साधकामध्ये जोपर्यंत समर्पण भाव निर्माण होत नाही तोपर्यंत, अभीप्सा आणि अविचलतेच्या साहाय्याने एका विशिष्ट मर्यादेपर्यंत हे खुलेपण येऊ शकते.

स्वतःकडे असलेले सर्वकाही ईश्वराच्या स्वाधीन करणे; तसेच स्वतःकडे जे आहे ते सर्व आणि एवढेच नव्हे तर, स्वत:ला सुद्धा ईश्वराप्रति अर्पण करणे म्हणजे ‘समर्पण’. समर्पण करणाऱ्या व्यक्तीने स्वत:च्या कल्पना, इच्छा, सवयी यांचा आग्रह धरता कामा नये तर, त्या प्रत्येकाची जागा दिव्य सत्याच्या ज्ञानाने, संकल्पाने आणि कार्याने घ्यावी यासाठी, त्या दिव्य सत्याला मोकळीक देणे म्हणजे ‘समर्पण’.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 67)